DNA मराठी

हायलाईट

Devendra Fadnavis: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी राज्य शासनाची विशेष मदत

Devendra Fadnavis: अहिल्यानगरसह राज्यातील पुणे, नाशिक व अमरावती विभागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी विशेष मदत जाहीर करण्यात आली आहे. जुलै ते सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, जुलै ते सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रति हेक्टरी १०,००० प्रमाणे (कमाल ३ हेक्टरपर्यंत) मदत DBT पोर्टलद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. तसेच बियाणे व इतर अनुषंगिक बाबींसाठी सहाय्य एकूण मंजूर निधी १७६५ कोटी २२ लाख ९२ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी राज्य शासनाची विशेष मदत Read More »

ajit pawar

Ajit Pawar: खेळाडूंवर क्रीडा मंत्र्यांकडून कोणताही दबाव नाही; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे स्पष्टीकरण

Ajit Pawar : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या सध्याच्या कार्यकारिणीच्या काही सदस्यांच्या कार्यपद्धतीवर शंका घेऊन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि विधान परिषदेतील आमदार संदीप जोशी यांनी काल पत्रकार परिषदेत केलेले सर्व आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळले असून त्यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. सन २०१३ पासून आपण महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.या कालावधीत खेळाचा दर्जा सुधारावा, खेळाडूंना उच्च दर्जाच्या सुविधा मिळाव्यात,म्हणून सर्वांना सोबत घेऊन आपण काम केले. आम्ही कार्यभार घेण्याआधी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र राज्य सातव्या/ आठव्या स्थानावर होते.पण सलग मागील तीन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र आता प्रथम क्रमांकावर आहे. या यशाबद्दल महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या पथकाचे आणि  पदाधिकाऱ्यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये सत्कारही झाले आहेत. प्रदीप गंधे,संजय शेटे, स्मिता शिरोळे, नामदेव शिरगावकर, धनंजय भोसले आधी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि खेळाडूंच्या मेहनतीमुळे हे सगळं शक्य झालं. अस असताना केवळ निवडणुकांवर डोळा ठेऊन काही राजकीय व्यक्ती,संघटनेच्या एका विशिष्ट व्यक्तीला टार्गेट करण्यासाठी विविध आरोप राजकीय हेतूने करत आहेत, हे वागणे महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीला शोभणारे नाही. खेळाडूंची अशी कोणतीही तक्रार नसून,असे आरोप कोणत्याही खेळाडूने अद्याप केलेले नाहीत,असे अजित पवार स्पष्ट केले आहे.   उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की,१३ कोटीच्या भ्रष्टाचाराचा  राजकीय आरोप ज्या पदाधिकाऱ्यावर केला आहे,  तो पदाधिकारी खजिनदारही नाही.संघटनेकडे जो निधी येतो तो कोणा एका पदाधिकाऱ्याच्या हातामध्ये नसतो. संपूर्ण एक्झिक्यूटिव्ह कौन्सिल त्याच्यावर देखरेख करत असते. तिच्या मान्यतेने तो खर्च होतो.या खर्चाचा हिशेब खजिनदार ठेवतात.संघटनेचे खजिनदार म्हणून धनंजय भोसले यांच्या अखत्यारीमध्ये त्याचे हिशोब होते. प्रत्येक राष्ट्रीय स्पर्धेमध्ये विविध खेळांसाठी महाराष्ट्राचे साधारणतः ८०० ते १०००  खेळाडू सहभागी होतात. या सर्व सहभागी खेळाडूंना स्पर्धेच्या ठिकाणी जाण्या- येण्यासाठी विमान प्रवासाची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली. आवश्यक प्रशिक्षण शिबिरे घेण्यात आली होती. महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेच्या रचनेनुसार संलग्न विविध खेळांच्या ३० संघटनांकडून देखील शासनाकडून आलेल्या निधीतील बराचसा  निधी वापरला जातो आणि त्याचा हिशोब त्यांच्याकडून आल्यानंतर तो एकत्रित करून क्रीडा विभागाला तो सादर करण्यात येतो. त्या संघटनांनी हिशेब दिल्याशिवाय ऑलिंपिक असोसिएशनला शासनाला एकत्रित हिशेब देणे शक्य होत नाही. तेव्हा खऱ्या दोषी या हिशेब न देणाऱ्या संघटना असतात.अशा दोषी संघटनांमध्ये मोहोळ यांची संघटना व त्यांना पाठिंबा देणाऱ्या ५/६ संघटना आहेत. त्यांनी त्वरित हिशेब द्यावेत. त्यांनी हिशेब न दिल्याने असोसिएशनला हिशेब देणे शक्य झाले नाही,हे विचारात घेऊनच शासनाने हिशेब सादर करण्यास दोन महिने मुदतवाढ दिली आहे. प्रत्येक राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी शासन चार ते पाच कोटी रुपयांचे अनुदान देते.हे अनुदान महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन त्यांच्या संलग्न ३० संघटनांच्या माध्यमातून खर्च करत असते.या सर्व हौशी,विश्वस्त संस्था असल्यामुळे त्यांच्याकडे शासकीय यंत्रणेप्रमाणे पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्यामुळे हिशोब येण्यास उशीर होतो. ही एक फार महत्त्वाची बाब आहे,याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष वेधले आहे.   ३६ व्या आणि ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा हिशोब क्रीडा विभागाला असोसिएशनकडून याआधीच सादर झालेला आहे. ३८ व्या स्पर्धेचा हिशोब मात्र वेगवेगळ्या टप्प्यावर प्रक्रियेमध्ये असून सदस्य संघटनांकडून तो अद्याप प्राप्त झालेला नाही. मोहळांच्या संघटनेकडून आणि त्यांच्यासोबत असलेल्या अन्य पाच सहा संघटनांकडून देखील अद्याप हिशोब सादर करण्यात आलेले नाही. त्याचबरोबर अन्य दहा-बारा संघटनांचा देखील हिशोब आलेला नाही. तो एकत्रित करून उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही प्रक्रिया सुरू असताना केवळ हिशेब सादर झाला नाही म्हणून त्यांनी भ्रष्टाचार केला, असे म्हणणे योग्य नाही.  महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन ही धर्मादाय संस्था आहे. तेव्हा या संस्थेविरुद्धच्या तक्रारी धर्मादाय आयुक्तांकडे होणे आवश्यक होते.असे न करता,केवळ हिशेब सादर केले नाही म्हणून राजकीय दबावापोटी पहाटे तीन वाजता ऑलिंपिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला जातो.यात पोलिसांवर कोणी दबाव टाकला, हे संदीप जोशींनी सांगावं, असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.   ही निवडणुक पुढे ढकलण्याचेही प्रयत्न झाले. ती पुढे ढकलण्यासाठी उच्च न्यायालयात एकूण सहा प्रकरणे दाखल झाली होती .पण न्यायालयाने ती सर्व फेटाळून लावली. जी प्रकरणे न्यायालयात फेटाळून लावली,त्यात ज्या गोष्टी,कारणे नमूद होती,ती सर्व कारणे न्यायालयाने फेटाळली असताना,त्याच गोष्टींसाठी पुन्हा तक्रारी,गुन्हे दाखल झाले. पोलीसांना  तक्रारी घेण्यास भाग पाडण्यात आले. पोलिसांमध्ये तक्रारी करून संबंधित पदाधिकाऱ्यांना त्रास देण्यास  सुरुवात केली.निवडणुकीसाठी नेमलेल्या निवडणूक अधिकारी,जे सेवानिवृत्त न्यायाधीश आहेत,त्यांना पोलिसांनी राजकीय तक्रारीवरून पोलिस स्टेशनमध्ये चौकशी साठी बोलावले.हे सर्व कोणाच्या दबावाने झाले, हे संदीप जोशींनी सांगावे असा सवालही अजित पवार यांनी केला आहे.  क्रीडा संघटनाच्या निवडणुकांमध्ये राजकारण नको म्हणून आपण हे सर्व सहन केलं. कुठलेही राजकीय भाष्य अद्याप पर्यंत केल नाही. पण आता तेच जर पत्रकार परिषद घेऊन आरोप करत असतील,तर त्याला उत्तर देणे आवश्यक आहे,म्हणून आपण हे स्पष्टीकरण देत असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री दबाव टाकण्याची भाषा करतात असे ते म्हणतात. त्यांच्यासाठीही अनेक मंत्र्यांपासून केंद्रीय स्तरावरील पदाधिकाऱ्यांचे फोन मतदारांना  येत आहेत. याला काय दबाव म्हणायचं ?मुख्यमंत्र्यांनीही बऱ्याच क्रीडा संघटनांना वर्षा बंगल्यावर अलीकडेच बोलावले होते. म्हणजे त्यांनी दबाव आणला असे आम्ही म्हणणार नाही. केवळ ऑलिंपिक असोसिएशन नाही,तर अनेक संघटनांनी अद्याप निधीच्या खर्चाचे हिशेब दिलेले नाहीत.   केंद्रीय मंत्री मुरलीधर  मोहोळ यांच्या संस्थेला राज्यस्तर कुस्ती स्पर्धेसाठी शासनाने अनुदान म्हणून सन २०२३- २०२४ साठी दिलेल्या १ कोटी एवढ्या रकमेचा हिशेब अद्याप शासनास सादर केलेला नाही.अजूनही बऱ्याच संघटनांना हिशेब सादर करणे शक्य झालेले नाही.म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार केला असे होत नाही.हिशेब सादर केले नाही, म्हणून या  सर्वांवर पोलीस केस दाखल करावी का ? वा भ्रष्टाचार केल्याचे आरोप करावेत का ? … असे करणे मला योग्य वाटत नाही. खेळात खिलाडूपणा पाहिजे.सुडाची भावना नको,या मताचे आम्ही आहोत. मोहोळांच्या संघटनेसह प्रत्येक संघटनेने आपापले हिशोब वेळेत द्यावेत,म्हणजे आमच्या असोसिएशनला वेळेत हिशेब सादर करता येतील,अशी विनंती अजित पवार यांनी केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा स्वरूपाचे राजकीय आरोप क्रीडा संघटनांच्या निवडणूक प्रक्रियेत होणं हे काहीस अस्वस्थ करणार आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये आपण गेली अनेक वर्षे कार्यरत आहोत. आमचे काम संघटनांना आवडत असेल तर संघटना आम्हाला निवडून देतील. आतापर्यंत माझ्यासह, माझ्या सहकाऱ्यांनी केलेले कार्य पाहून पुन्हा आमच्या हातात पुन्हा ही सूत्र दिली जातील,असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Ajit Pawar: खेळाडूंवर क्रीडा मंत्र्यांकडून कोणताही दबाव नाही; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे स्पष्टीकरण Read More »

scientific balloon flying from hyderabad

Ahilyanagar News : हैदराबादहून उड्डाणाऱ्या वैज्ञानिक बलूनचा प्रवास अहिल्यानगर जिल्ह्यातही; प्रशासनाने दिली खबरदारीची सूचना

Ahilyanagar News :  हैदराबाद येथील टाटा मूलभूत संशोधन संस्था (TIFR) यांच्यावतीने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत वैज्ञानिक संशोधनासाठी हवेतील बलून उड्डाणे करण्यात येणार आहेत. या बलूनपैकी काही बलूनची उपकरणे अहिल्यानगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागात पडण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. या उड्डाणांना भारत सरकारच्या परमाणु ऊर्जा विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांचे सहकार्य लाभले आहे. ही बलून उड्डाणे हैदराबाद येथील ईसीआयएल परिसरातून केली जाणार असून, एकूण दहा बलून आकाशात झेपावतील. या बलूनचा व्यास ५० ते ८५ मीटर असून ते हायड्रोजन वायूने भरलेले असतील. उड्डाणे रात्री ८ ते सकाळी ६.३० या वेळेत होतील. या बलूनमध्ये बसवलेली वैज्ञानिक उपकरणे सुमारे ३० ते ४२ किलोमीटर उंचीपर्यंत जातील आणि काही तास संशोधन करून पॅराशूटच्या साहाय्याने जमिनीवर उतरतील. वाऱ्याच्या दिशेनुसार ही उपकरणे २०० ते ३५० किलोमीटर अंतरावर येऊ शकतात. त्यामुळे ती महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांतील भागांमध्ये उतरू शकतात. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर , बीड, नांदेड, धाराशिव , परभणी, सांगली, सातारा, अहिल्यानगर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, जळगाव आणि सोलापूर  या जिल्ह्यांमध्ये उपकरणे पडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी ही उपकरणे सापडतील, ती हलवू नयेत, उघडू नयेत किंवा छेडछाड करू नये. त्या पॅकेजवर दिलेल्या पत्त्यावर त्वरित माहिती द्यावी तसेच जवळच्या पोलीस ठाण्याला व प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. उपकरणे सुरक्षित असली तरी त्यामध्ये संवेदनशील वैज्ञानिक साधने असल्याने छेडछाड झाल्यास माहिती नष्ट होऊ शकते. संशोधन संस्था अशा उपकरणांची माहिती दिलेल्या नागरिकांना योग्य बक्षीस आणि खर्चाची भरपाई देणार आहे. या प्रयोगांविषयीची माहिती गावपातळीपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पहिले बलून उड्डाण ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

Ahilyanagar News : हैदराबादहून उड्डाणाऱ्या वैज्ञानिक बलूनचा प्रवास अहिल्यानगर जिल्ह्यातही; प्रशासनाने दिली खबरदारीची सूचना Read More »

bacchu kadu

Bachu Kadu : दीपक बोऱ्हाडे यांचा बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा…

Bachu Kadu : जालन्यातील धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांनी बच्चू कडू यांच्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. बळीराजा देशाचा आणि अर्थव्यवस्थेचा कणा आहे असं म्हणत बळीराजावरील हे सर्वात मोठं संकट असल्याचं बोऱ्हाडे यांनी म्हटलय. जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संकटाच्या काळात बळीराजासोबत राहणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असं म्हणत सरकारने बळीराजाच्या संयमाचा अंत पाहू नये, असंही बोऱ्हाडे यांनी म्हटलय. दरम्यान, जालन्यात 1 नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व धनगर आंदोलक, धनगर उपोषणकर्ते यांची राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहितीही बोऱ्हाडे यांनी दिलीय. तसेच राज्यात ज्या दिवशी धनगर समाजाचा मेळावा होईल, त्यादिवशी आम्ही मुंबई जायची तारीख जाहीर करू, असं देखील बोऱ्हाडे यांनी स्पष्ट केलंय.

Bachu Kadu : दीपक बोऱ्हाडे यांचा बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा… Read More »

Chandrashekhar Bawankule : जागा हडप करणाऱ्या लॉबीला महसूलमंत्र्यांचा दणका

Chandrashekhar Bawankule : माझगाव येथील जीजाभॉय ट्रस्टचा शासकीय भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नामंजूर केला. तसेच, ट्रस्ट किंवा विकासकाने चुकीच्या पद्धतीने भरलेली रक्कम परत करावी, असे स्पष्ट निर्देश महसूलमंत्र्यांनी दिले आहेत. या संदर्भात महसूलमंत्र्यांच्या दालनात आज बैठक झाली. आमदार सचिन अहिर, आमदार अमोल मिटकरी आणि दूरदृश्य प्रणालीद्वारे मुंबई शहर जिल्हाधिकारी, आंचल गोयल यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. याबाबत अधिक माहिती अशी, माझगाव महसूल विभागातील भुकर क्रमांक ३६५ (क्षेत्र ७२५.७६ चौ. मी.) व भुकर क्रमांक ३६९ (क्षेत्र ९१५४.१० चौ. मी.) या मिळकतींचा भाडेपट्टा जे. पी. एम. जीजाभॉय ट्रस्ट यांच्याकडे होता. ट्रस्टने नूतनीकरणाची रक्कम भरण्यास विलंब केला होता. त्यानंतर, नूतनीकरणाची रक्कम ऐक्य रिॲलिटी प्रा.लिमिटेड या खासगी कंपनीकडून अनावधानाने शासनखाती भरणा करण्यात आली होती. महसूल विभागाने २४ सप्टेंबर २०२५ च्या अध्यादेशाद्वारे ही रक्कम परत करणे आणि भाडेपट्टा नूतनीकरण करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार ही रक्कम परत करण्याची कार्यवाही सुरु आहे. आमदार सचिन अहिर यांनी या मिळकती तातडीने शासनाच्या ताब्यात घेऊन त्यांचा लिलाव करावा आणि त्यानंतर विकसित करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. काही व्यापारी ट्रस्टच्या आडून शासकीय जागा हडपण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्याला तातडीने मज्जाव झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या जमीनीचा भाडेपट्टा नुतनीकरण करु नये, तसेच भरलेली रक्कम तात्काळ परत करावी. तसेच जर ट्रस्टने नवीन अर्ज केल्यास शासन त्याबाबत पुन्हा बैठक घेऊन निर्णय घेईल असे स्पष्ट केले.

Chandrashekhar Bawankule : जागा हडप करणाऱ्या लॉबीला महसूलमंत्र्यांचा दणका Read More »

maharashtra government

Ahilyanagar News : अनेकांना दिलासा, भूसंपादन दाखला आता मोबाईलवर; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Ahilyanagar News : ‘लोकाभिमुख, पारदर्शक व गतीमान प्रशासन’ या संकल्पनेला मूर्त रूप देत जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथील भूसंपादन शाखेत दाखला देण्याची प्रक्रिया आता पूर्णपणे संगणकीकृत करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा मोहिमेच्या अंतर्गत सुरू झालेल्या या डिजिटल प्रणालीमुळे नागरिकांना दाखल्याची प्रत थेट त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मिळणार आहे. संगणक प्रणालीची वैशिष्ट्ये • अर्जदाराकडून दाखला अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची नोंद संगणक प्रणाली मध्ये ‘ई – ऑफिस’ द्वारे करण्यात येईल. • संबंधित माहिती व पडताळणी पूर्ण झाल्यावर त्रुटि असल्यास तसे व्हॉट्स ॲपद्वारे संबधित अर्जदार यांना कळेल, त्रुटी नसल्यास दाखल्याची डिजिटल प्रत तयार होईल. • तयार झालेला दाखला अर्जदाराच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे पाठविण्यात येईल. • प्रणालीमुळे कागदी कामकाजात घट येऊन वेळेची व मानवी श्रमांची बचत होईल. • नागरिकांना अर्जाची सद्यस्थिति जाणून घेणे व प्रमाणपत्र प्राप्त करणे यास्तव कार्यालयात यावे लागते. अहिल्यानगर जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती विचारात घेता  प्रवासाचे अंतर व नागरिकांच्या वेळेची बचत होऊन सेवा वितरणात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढेल. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले, “राज्य शासनाच्या प्रशासकीय सुधारणा मोहिमेत जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगरने या नव्या डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून एक अभिनव पाऊल उचलले आहे. नागरिकांना दाखले जलद, पारदर्शक आणि डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देणे हे ‘ई-गव्हर्नन्स’च्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. या प्रणालीचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना थेट घरबसल्या मिळणार आहे. यापुढे ई प्रणालीचा वापर करून विविध शासन सेवा सुलभतेने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे” भूसंपादन अधिकारी (क्र. १) अतुल चोरमारे म्हणाले, “भूसंपादन शाखेत दाखला वितरण प्रक्रिया नागरिकांसाठी सर्वाधिक मागणीची सेवा आहे. या प्रक्रियेला डिजिटल स्वरूप दिल्यामुळे पारदर्शकता, गती आणि जबाबदारीत मोठी वाढ झाली आहे. आता अर्जदारांना कार्यालयात (अर्ज करण्या व्यतिरिक्त) येण्याची आवश्यकता राहणार नाही . दाखला तयार झाल्यानंतर तो काही क्षणांतच त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पोहचेल. या प्रणालीमुळे व ई ऑफिसमुळे  दाखला देण्याची संपूर्ण प्रक्रिया ‘पेपरलेस’ आणि ‘मुदतीत निपटारा करणारी’ झाली आहे. नागरिकांचा वेळ, खर्च व श्रम यांची मोठी बचत होणार आहे. हा उपक्रम शासनाच्या “स्मार्ट गव्हर्नन्स – लोकाभिमुख प्रशासन” या संकल्पनेला प्रत्यक्ष रूप देणारा ठरेल. दाखला मिळवणे झाले सोपे आणि जलद कुंभारवाडी (ता. पारनेर) येथील सुनील कारभारी ठाणगे म्हणाले,“पूर्वी भूसंपादन दाखल्यासाठी दोन – तीन वेळा कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. आता मोबाईलवरच दाखल्याची प्रत मिळते, हे खरंच आश्चर्यकारक आहे. वेळ, प्रवास व खर्च या तिन्हींची बचत झाली. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही मोठी सोय ठरली आहे. शासनाने उपलब्ध करून दिलेली ही प्रणाली आमच्यासाठी खरी डिजिटल क्रांती आहे.” भविष्यातील योजना या प्रणालीच्या पुढील टप्प्यात दाखल्याबरोबर भूसंपादन प्रकरणांची स्थिती ट्रॅकिंग, निर्णय पत्र डाउनलोड सुविधा व ऑनलाइन चौकशी नोंदणी  सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Ahilyanagar News : अनेकांना दिलासा, भूसंपादन दाखला आता मोबाईलवर; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis: अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण:  मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis : राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जवळपास 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यात आतापर्यंत 8 हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय वितरित करण्यात आले असून, याचा लाभ 40 लाख शेतकर्‍यांना होतो आहे. आणखी 11 हजार कोटी रुपये वितरित करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ही मदत पुढच्या 15 दिवसांत शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री  फडणवीस माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले, अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. त्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी 11 हजार कोटी रुपये वितरीत करण्यास मान्यता देण्यात आल्याने मदतीसाठी निधीची कुठलीही कमतरता नाही. पुढील 15 दिवसांत ही मदत अतिवृष्टग्रस्त जिल्ह्यातील किमान 90 टक्के शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी जशा याद्या मिळाल्या, तसा निधी वितरित करण्यात आला. ज्यांना केवळ दोन हेक्टरसाठी मदत मिळाली आहे, त्यांना पुढील हेक्टरसाठीचे अर्थसहाय्य दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री  फडणवीस यांनी सांगितले. पुढे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, काही शेतकर्‍यांच्या बँक खात्यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत, तर काहींच्या नोंदींमध्ये त्रुटी आहेत. काही ठिकाणी एकापेक्षा जास्त खाती असल्याचे दिसून आले. या सर्व बाबी तपासून उर्वरित 10 टक्के शेतकर्‍यांपर्यंतही तातडीने मदत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कुणीही पात्र शेतकरी मदतपासून वंचित राहू नये व अपात्र खातेधारकांच्या खात्यावर निधी जावू नये, यासाठी ई-केवायसी केली जात आहे. अ‍ॅग्रीस्टॅकचा डेटा राज्य शासनाकडे असून यामध्ये ज्या शेतकर्‍यांची माहिती उपलब्ध आहे. त्यांची पुन्हा ई-केवायसी केली जात नसून सहायता निधी थेट त्यांच्या खात्यात जमा केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतमालाच्या विक्रीसाठी नोंदणी करा: मुख्यमंत्री  फडणवीस शेतमालाच्या खरेदीसाठी राज्यात नोंदणी सुरू केली जात असून यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. अशा नोंदणीमुळे पारदर्शकता आली असून आता शेतकर्‍यांना हमी भाव मिळत आहे. यापूर्वी व्यापारी शेतकर्‍यांकडून कमी दराने माल घेवून शासनाला जास्त दराने विकला जात असे. नोंदणी करून शासकीय खरेदी केंद्रावर किंवा शासनाने जाहीर केलेला हमी भावाप्रमाणे खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांनाच मालाची विक्री करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री  फडणवीस यांनी केले आहे.

Devendra Fadnavis: अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण:  मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा Read More »

farmers

Farmers Relief Fund : साडेआठ लाख शेतकऱ्यांना भरपाई; अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय

Farmers Relief Fund : संपूर्ण राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगावसह जामखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे हजारो घरांची पडझड झाली होती. तर आता नगर जिल्ह्यातील साडेआठ लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षीच्या अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेती, पशुधन आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जिल्ह्यातील ८ लाख ४९ हजार ७१६ शेतकऱ्यांना एकूण ₹८८०२३.६६ लाख रुपये (म्हणजेच सुमारे ₹८८०.२३ कोटी) भरपाई मंजूर करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया दिली. तसेच बँकांनी ही भरपाई रक्कम कर्ज किंवा अन्य खात्यात हस्तांतरित करू नये अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असा इशारा देखील जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी बँकांना दिला आहे. ५.७६ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून १४ तालुक्यांतील १,३११ गावांवर अतिवृष्टीचा फटका बसला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिली. शेतकऱ्यांच्या पाठीशी प्रशासन ठामपणे उभं आहे. भरपाई वाटप प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ देणार नाही असं देखील यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी म्हटले आहे. जिल्ह्यात घरांची पडझड (१ एप्रिल ते ३० सप्टेंबर): एकूण – ५,६९७ घरे 🔹 पाथर्डी – १,०२० 🔹 शेवगाव – ९२१ 🔹 जामखेड – ९०६ 🔹 नगर – ५२२ 🔹 नेवासा – ५६५ 🔹 राहुरी – ३९६ 🔹 संगमनेर – २२७ 🔹 राहाता – २०३ (इतर तालुके : अकोले, कर्जत, कोपरगाव, पारनेर, श्रीगोंदे, श्रीरामपूर) जनावरे व कुक्कुटधन हानी : 🔸 १,०५९ जनावरे दगावली 🔸 १३,८७९ कोंबड्या मृत 🔸 आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू

Farmers Relief Fund : साडेआठ लाख शेतकऱ्यांना भरपाई; अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय Read More »

doctor

Ahilyanagar News : कोरोना काळातील धक्कादायक प्रकरण! पाच नामांकित डॉक्टर आणि हॉस्पिटलवर गुन्हा दाखल

Ahilyanagar News : कोरोना काळात रुग्णाच्या मर्जीविरुद्ध उपचार करून घेतल्याचा, अवाजवी बिल आकारल्याचा आणि मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा स्फोटक आरोप शहरातील पाच नामांकित डॉक्टरांसह डॉ. विखे पाटील मेमोरिअल हॉस्पिटलच्या पॅथॉलॉजिकल लॅबमधील तज्ञ डॉक्टरांवर करण्यात आला आहे. या प्रकरणात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. फिर्यादी अशोक खोकराळे यांच्या तक्रारीनुसार, ऑगस्ट २०२० मध्ये त्यांच्या वडिलांना कोरोनाची लक्षणं दिसल्याने त्यांना न्यूक्लिअस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णाच्या संमतीशिवाय जबरदस्तीने अॅडमिट करण्यात आलं, आरोग्यस्थितीची खरी माहिती लपवण्यात आली, आणि जाणूनबुजून जास्त प्रमाणात औषधं देण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय रुग्णालयाकडून अवाजवी बिल आकारण्यात आलं, असा दावाही फिर्यादीत करण्यात आला आहे. परंतु सगळ्यात धक्कादायक आरोप म्हणजे, रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांना माहिती न देता मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली, आणि पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात डॉ. गोपाळ बहुरुपी, डॉ. सुधीर बोरकर, डॉ. मुकुंद तांदळे, डॉ. अक्षयदीप झावरे पाटील, डॉ. सचिन पांडुळे, तसेच डॉ. विखे पाटील मेमोरिअल हॉस्पिटलच्या पॅथॉलॉजिकल लॅबमधील तज्ञ डॉक्टर आणि काही अज्ञात कर्मचारी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा गुन्हा न्यायालयाच्या आदेशानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून, भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. “कोरोना काळात आमच्या वडिलांचा मृत्यू झाला, पण हॉस्पिटल प्रशासनाने आम्हाला याबाबत काहीच माहिती दिली नाही. आम्ही वारंवार संपर्क साधला तरी प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला.” संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास तोफखाना पोलीस करत असून, वैद्यकीय व्यवसायातील नैतिकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. या प्रकरणामुळे रुग्णांमध्ये भीती आणि अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं असून, नागरिकांकडून आरोग्य व्यवस्थेतील पारदर्शकतेची मागणी होत आहे.

Ahilyanagar News : कोरोना काळातील धक्कादायक प्रकरण! पाच नामांकित डॉक्टर आणि हॉस्पिटलवर गुन्हा दाखल Read More »

Chandshaili Ghat Accident : चांदशैली घाटात भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू 15 गंभीर जखमी

Chandshaili Ghat Accident : नंदुरबार जिल्ह्यातील चांदशैली घाटात आज सकाळी एक भीषण अपघात झाला आहे. भगवान अस्तंबा ऋषी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची पीकअप जीप खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तात्काळ तळोदा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. दिवाळीच्या दिवशी यात्रेला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला पडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Chandshaili Ghat Accident : चांदशैली घाटात भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू 15 गंभीर जखमी Read More »