DNA मराठी

हायलाईट

vikas gogawale

Raigad News : महाड राडा प्रकरण ; विकास गोगावलेसह सात आरोपी पोलीस ठाण्यात हजर

Raigad News  :  रायगड जिल्ह्यातील महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या आणि गाजलेल्या राडा प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड घडली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेले विकास गोगावले यांच्यासह एकूण सात आरोपी अखेर आज महाड पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत. कालच या प्रकरणात आरोपींना अटक न झाल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. सुनावणीदरम्यान न्यायालयाने सरकारला अक्षरशः धारेवर धरत, “मुख्यमंत्री इतके असहाय्य झाले आहेत की त्यांना काहीच करता येत नाही,” अशा शब्दांत संताप व्यक्त केला होता. “अटक करायची असेल तर 24 तासांत कोणालाही अटक होऊ शकते. मात्र अटक करायची नसली की प्रतिज्ञापत्रे सादर केली जातात,” अशी बोचरी टिप्पणी करत न्यायालयाने सरकारची गंभीरता तपासली. याच सुनावणीत मुख्यमंत्री तसेच मंत्री भरत गोगावले यांच्याकडून थेट निर्देश घ्या, अशा स्पष्ट सूचनाही न्यायालयाने सरकारला दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आज विकास गोगावले यांचे पोलिस ठाण्यात हजर होणे ही बाब अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या प्रकरणात विकास गोगावले यांच्यासह त्यांचे पुतणे महेश गोगावले यांच्यासह इतर आरोपींवरही गुन्हे दाखल आहेत.

Raigad News : महाड राडा प्रकरण ; विकास गोगावलेसह सात आरोपी पोलीस ठाण्यात हजर Read More »

Sujay Vikhe:  पारनेरमध्ये 10 किलो ड्रग्ज कुणाच्या घरात होते..? सुजय विखेंचा नाव न घेता लंकेंवर हल्लाबोल

Sujay Vikhe: अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्याला मंगळवारी अटक झाली. पुणे जिल्ह्यातील ड्रग्ज रॅकेटच्या संशयावरुन पुणे पोलिसांनी शामसुंदर गुजर या पोलिसाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. गुजर हा सध्या अहिल्यानगर एलसीबीत कार्यरत आहे. तो पूर्वी पारनेर पोलिस ठाण्यात कार्यरत होता. पारनेरच्या बाँण्ड्रीवरील पुणे जिल्ह्यातील शिरुरमध्ये ड्रग्जच रॅकेट सापडलं. त्याचे धागेदोरे थेट पारनेर व नगरपर्यंत पोहोचले. पारनेर आणि ड्रग्ज हे समीकरण उघड झालं. अहिल्यानगरच्या पोलिस अधिक्षकांनी या प्रकरणाच्या तपासातील सगळं सत्य पत्रकारांना सांगावं, अशी अपेक्षा माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली. विखेंनी या प्रकरणावर काही गंभीर शंकाही उपस्थित केल्या. ड्रग्ज सारख्या गंभीर प्रकरणात, नगरमधील पोलिस कर्मचाऱ्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत पत्रकारांनी डॉ. सुजय विखे पाटील यांना प्रश्न विचारला. या प्रकरणात आपली भूमिका काय, असा सवाल पत्रकारांनी विखेंना विचारला. त्यावर डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिलेल्या उत्तराने, अनेकांच्या भुवया उंचावल्या. सुजय विखे म्हणाले, ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतलेला पोलिस कर्मचारी हा पारनेर पोलिस ठाण्यात कार्यरत होता. त्यावेळी तेथील अवैध व्यावसायिकांसोबत त्यांचे संबंध होते. इतरही अनेक गंभीर प्रकरणात त्याचा सहभाग होता. त्याच्याविरोधात पोलिस अधिक्षकांकडे तक्रारी करुन त्याची बदली करण्याची मागणीही त्यावेळी झाली होती. वादग्रस्त असलेल्या या पोलिसाची बदली थेट नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेत झाली. म्हणजेच त्याच्या डोक्यावर कोणत्यातरी मोठ्या नेत्याचा हात होता. एकीकडे एसपी स्थानिक गुन्हे शाखेत इमानदार पोलिस घेतल्याचे सांगतात. मग त्या वादग्रस्त पोलिसाला थेट एलसीबीत कुणाच्या सांगण्यावरुन घेतलं गेलं, हे पोलिस अधिक्षकांनी सांगावं. आत्ताच्या ड्रग्ज प्रकरणात 10 किलो ड्रग्ज हे पारनेरमधील दोघांच्या घरी ठेवले गेले होते. मग ते कुणाच्या घरात होते? त्यांची नावं पोलिस का सांगत नाहीत. ज्यांच्या घरात हे 10 किलो ड्रग्ज होते, ते कुणाचे कार्यकर्ते होते? त्यांची नावं गुन्ह्यात येऊ नये म्हणून पोलिस ठाण्यात कोण अर्धा तास बसून होतं? हे सगळं मला माहित आहे. परंतु पोलिसांनी हे स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगावं, असंही विखेंनी स्पष्ट केलं. सुजय विखेंनी ड्रग्जसारख्या गंभीर प्रकरणावर आपली भुमिकाही स्पष्ट केली. ते म्हणाले, पोलिसांवर या प्रकरणात कुणाचा दबाव आहे, हे त्यांनी स्वतः सांगावं. मी जे प्रश्न उपस्थित करतोय, त्याचीही उत्तरे द्यावीत. अन्यथा पुढच्या आठ दिवसांत आपण स्वतः पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील सगळ्यांची नावे उघड करु. गंभीर गुन्हा करणारे कुणाचेही कार्यकर्ते असो, त्यांना कायद्याने शिक्षा व्हायलायच हवी, असंही विखेंनी स्पष्ट केलं. विखेंनी कोणत्याही लोकप्रतिनीधींचं नाव घेतलं नसलं तरी, दक्षिणेचे खा. निलेश लंके यांच्याकडे संशयाची सुई असल्याच्या चर्चा आहेत. ज्यांच्या घरात ड्रग्ज ठेवले होते, ते खा. लंके यांचे कार्यकर्ते होते का? हा प्रश्नही विचारला जात आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांनी पारनेमध्ये लोकसभा निकालानंतर झालेल्या राड्याबाबतही आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले, मी काल आजारी असल्याने हे प्रकरण संपूर्ण पाहिलं नाही. परंतु त्यावेळी एका गर्भवती महिलेला मारहाण झाली होती. लोकप्रतिनीधींच्या कुटुंबातील व्यक्तीने असं करणं, हे गंभीर आहे. आपला न्यायालयावर विश्वास आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Sujay Vikhe:  पारनेरमध्ये 10 किलो ड्रग्ज कुणाच्या घरात होते..? सुजय विखेंचा नाव न घेता लंकेंवर हल्लाबोल Read More »

prajakt tanpure

Prajakt Tanpure : राहुरी-शनि शिंगणापूर रेल्वे प्रकल्पाविरोधात प्राजक्त तनपुरेंचा एल्गार

Prajakt Tanpure : प्रस्तावित राहुरी–शनि शिंगणापूर रेल्वे मार्गासाठी होणाऱ्या भूमिसंपादनाला परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या संदर्भात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरीचे तहसीलदार यांना निवेदन देत शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याची मागणी केली आहे. या रेल्वे मार्गासाठी तांदूळवाडी, देसवंडी, कोंढवड, तमनर आखाडा, उंबरे, ब्राह्मणी, आदी गावांतील अत्यंत सुपीक शेतीजमीन संपादित करण्याचे प्रस्तावित आहे. या भागातील बहुतांश शेतजमीन नदीकाठालगत असून कालव्यांद्वारे नियमित सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे या जमिनींवर मोठ्या प्रमाणात शेती उत्पादन घेतले जाते. रेल्वे प्रकल्पासाठी होणाऱ्या भूमिसंपादनामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प तातडीने रद्द करण्यात यावा, अशी ठाम मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. या निवेदनाद्वारे शेतकऱ्यांच्या भावना राज्य व केंद्र शासनापर्यंत पोहोचवून भूमिसंपादन प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला, ज्यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Prajakt Tanpure : राहुरी-शनि शिंगणापूर रेल्वे प्रकल्पाविरोधात प्राजक्त तनपुरेंचा एल्गार Read More »

congress

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद निवडणुकांसाठी काँग्रेसच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Zilla Parishad Election: राज्यातील १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समिती निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला,  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,  विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार, खासदार छत्रपती शाहू महाराज, विधान परिषदेतील गटनेते आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खा. मुकुल वासनिक, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, खासदार रजनीताई पाटील, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, अखिल भारतीय कार्य समितीचे सदस्य नसीम खान,  अखिल भारतीय कार्य समितीच्या सदस्या यशोमती ठाकूर, खासदार प्रणिती शिंदे, आमदार अमिन पटेल, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत,  आ. अमित देशमुख, आ. डॉ. विश्वजित कदम,  अनिस अहमद, माजी मंत्री रमेश बागवे, माजी खा. हुसेन दलवाई, आ. साजिद खान पठाण,  माजी मंत्री वसंत पुरके,  माजी आमदार धिरज देशमुख, रामहरी रुपनवर, एम. एम. शेख, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, मुफ्ती हारुन नदवी, शाह आलम शेख, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे, अक्षय राऊत व हनुमंत पवार यांचा या यादीत समावेश आहे.

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद निवडणुकांसाठी काँग्रेसच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर Read More »

Vijay Wadettiwar: पाच वर्ष काँग्रेसचा महापौर बसणार; चंद्रपूरबाबत विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?

Vijay Wadettiwar : चंद्रपूर महापालिकेमधील वादावर अखेरीस पडदा पडला असून तिथे महापौर कोण होणार याबाबतचा निर्णय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ घेणार असल्याचे, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. चंद्रपुरात पाच वर्ष काँग्रेसचा महापौर असणार,सगळ्यांचे समाधान होईल असा निर्णय काँग्रेस घेणार अस सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणाला पूर्णविराम दिला. चंद्रपूर महापालिकेबाबत काँग्रेस पक्षात वाद निर्माण झाल्याने चंद्रपुरात काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते. भाजपचे कोणतेही नेते कितीही ओरडले तरी चंद्रपुरात काँग्रेसचाच महापौर होणार अस,काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी आज ठासून सांगितले. नेत्यांमध्ये गैरसमज होत असतात पण कार्यकर्ता हा महत्वाचा असल्याने त्यांना समाधान वाटेल असा निर्णय घेण्यात येईल, असं वडेट्टीवार यांनी स्पष्टं केले. चंद्रपुरात महापौर बसविण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ जमले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेत्यांशी चर्चा झाली आहे. शिवसेना हा पक्ष काँग्रेस बरोबर सत्तेत असेल असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. 29 महापालिका निकडवणुकांसाठी आरक्षणाची लॉटरी काढण्यात आली.पण ही फिक्सिंग होती,पारदर्शक पद्धतीने आरक्षण प्रक्रिया पार पाडली गेलीं नाही. भाजपचे नगरसेवक निवडून त्या सोयीने आरक्षण पडल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. नागपुरात खुला महिला प्रवर्ग आला त्यासाठी भाजपचे महापौर पदाच्या उमेदवार शिवानी दाणी ठरल्या होत्या आणि आज तसेच आरक्षण पडले असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना केला. मुंबईतील मनसे नेत्यांनी चंद्रपुरात भाजप आणि काँग्रेस एकत्र असल्याचे तारे तोडले याचा समाचार घेताना वडेट्टीवार म्हणाले, चंद्रपुरात भाजप आणि काँग्रेस एकत्र आहे हे दिव्य स्वप्न मनसे नेत्यांना कुठून पडले? लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचे काम मनसेने करू नये. मनसे भाजपची बी टीम आहे अशी टीका काँग्रेसने केली तर चालेल का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. महाराष्ट्रात भाजप आणि MIM हे पक्ष एकत्र आहेत, ते रात्री एकत्र जेवतात दिवसा भांडतात.काँग्रेस पक्षाला अडचणीत आणण्यासाठी त्यांचा वापर केला जात आहे.त्यांना रसद कोण पुरवते,ताकद कोण देते हे महाराष्ट्रातील जनतेला कळेल अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी केली. वाराणसी येथील मणिकर्णिका घाट भाजप सरकारने जमीनदोस्त केला.आता भाजपचे नेते का बोलत नाही? भाजपचे हिंदुत्व हे निवडणुकी पुरता आहे ,सत्तेसाठी हिंदुत्वाचा वापर करतात अशी टीकाही वडेट्टीवार यांनी यावेळी केली.

Vijay Wadettiwar: पाच वर्ष काँग्रेसचा महापौर बसणार; चंद्रपूरबाबत विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले? Read More »

ek naata asahi

Ek Naata Asahi : पनवेल मध्ये रंगणार “एक नातं असंही” नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग

Ek Naata Asahi : सद्यस्थितीवर भाष्य, नात्यातली गुंतागुंत, थोडसं हशा पिकवणार, सामाजिक गांभीर्य असणारा विषय, नात्यात होणारे गैरसमज, व्यक्ती व्यक्तीतला फरक, समाजात असणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींचे वेगवेगळे स्वभाव गुणधर्म, थोडीशी कॉमेडी थोडं सिरीयस असा सगळा मालमसाला असलेलं एक नाटक सध्या व्यावसायिक रंगभूमीवर आहे. ज्याचं नाव आहे “एक नातं असंही” आहे. हे दोन अंकी नाटक प्रत्येकाच्या आयुष्यावर किंबहुना नात्यावर प्रकाश टाकणार असे असून या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग येत्या 31 जानेवारीला वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे संपन्न होणार आहे. “एक नातं असंही” या नाटकाची निर्मिती शिवाय मेघा या निर्मिती संस्थेने केली असून अभिजीत भालेराव हे या नाटकाचे निर्माते आहेत. नाटकाचे लेखन विस्मय दिपक कासार यांनी केलेले असून दिग्दर्शन दर्शन सिद्धार्थ घोलप यांचे आहे. या नाटकात अभिनेत्री मृण्मयी सुपल, विस्मय कासार, मोहिनी, प्रवीण भाबल, राजस वैद्य, तन्वी महाडिक, सुजल दळवी या कलाकारांच्या भूमिका आहेत. नाटकाचे संगीत रुपेश मोहन जाधव यांचे तर प्रकाश योजना निखिल मारणे यांची आहे. या नाटकात काव्याच्या भूमिका अभिनेत्री मृण्मयी सुपलने साकारली असून आजवर अनके मालिका आणि चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. या नाटकाच्या निमित्ताने मृण्मयीने पहिल्यांदाच व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले आहे. नाटकाच्या शीर्षकावरूनच हे नाटक एका नात्याची गोष्ट सांगणार असल्याचा अंदाज आपल्याला बांधता येतो. मुंबईच्या एका कॉलनीत एखाद्या सामान्य कुटुंबाप्रमाणेच “देशमुख कुटुंब” राहत असतं. आई, वडील, भाऊ, बहीण या सर्वजणांनी भरलेलं असं एक सुखी कुटुंब. कार्तिक आणि काव्या या भावा बहिणीच्या नात्यावर या नाटकाची कथा आधारित आहे. अचानक एक दिवशी देशमुख कुटुंबावर खूप मोठ संकट कोसळतं. कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरपत. कार्तिक मोठा असल्याने घरची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर येते, त्याला गायक व्हायचं असतं पण एकंदरीत परिस्थिती पाहता गायक होण्याचे स्वप्न तो सोडून देतो आणि बहिणीचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून एका कंपनीत नोकरी करतो. आपल्याला सांभाळणार या जगात एकमेकांशिवाय कोणीच नाही याची त्या दोघांनाही जाणीव असल्यामुळे ते दोघे एकमेकाची काळजी घेतात. दोघेही आता दुःखातून सावरून एकमेकाला सांभाळत असतात. पुढे काव्याच्या आयुष्यात एक मुलगा येतो त्याच्या येण्याने कार्तिक आणि काव्याच्या नात्यात दुरावा निर्माण होतो की संबंध चांगले राहतात? एका भावाने बहिणीसाठी आपल्या गायक होण्याच्या स्वप्नाला बाजूला ठेवून केलेल्या त्याग्याची जाणीव बहिणीला राहते का? याची रंजक गोष्ट या नाटकातून आपल्याला पहायला मिळणार आहे. आजच्या पिढीसाठी नाती जपणं म्हणजे फक्त स्टेटस, रील्स किंवा मेसेजपुरतं मर्यादित न राहता, भावनिक समज, आपुलकी, संयम आणि जबाबदारी यांचा अर्थ काय असतो, ते “एक नातं असंही” या नाटकातून प्रभावीपणे अनुभवता येतं. हे नाटक नात्यांच्या मुळाशी जाऊन आपल्याला आरसा दाखवतं आपण कुठे आहोत आणि कुठे जायला हवं, याची जाणीव करून देतं. आजच्या धावपळीच्या आणि डिजिटल जगात नाती आणि संस्कार यांचं खरं मोल समजून घ्यायचं असेल, तर “एक नातं असंही” हे नाटक प्रेक्षकांनी नक्की पाहावं असे अभिनेत्री मृण्मयी सुपलने सांगितले . आजच्या जगात जपण्यासारख्या खूप कमी गोष्टी उरल्या आहेत, आपण नेहेमी फक्त त्याच गोष्टी जपतो ज्या आपल्या साठी खास असतात, “एक नातं असंही” हे नाटक सुद्धा तसंच आहे एका सामान्य नात्याची असामान्य गोष्ट म्हणजे हे नाटक आहे, त्याच बरोबर आपल्याला विचार करायला भाग पाडणार आहे, कसं ते जाणून घेण्यासाठी हे नाटक तुम्ही नक्की पाहा असे या नाटकाचा लेखक आणि अभिनेता विस्मय कासार याने आवर्जून नमूद केले.

Ek Naata Asahi : पनवेल मध्ये रंगणार “एक नातं असंही” नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग Read More »

kalyan dombivli municipal corporation

Kalyan-Dombivli Municipal Corporation : महायुतीचं ठरलं, कल्याण-डोंबिवलीत महापौर महायुतीचाच होणार

Kalyan-Dombivli Municipal Corporation : कल्याण-डोंबिवली महापालिकेत महापौर कुणाचा यावर सध्या अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. तर दुसरीकडे मनसेने शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने एकनाथ शिंदे यांनी भाजपला मोठा धक्का दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली. माध्यमांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरुन आल्यानंतर यावर अंतिम निर्णय होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावरून परतल्यावर मुंबईत एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्रित बैठक होणार आहे असं देखील रवींद्र चव्हाण म्हणाले. माहितीनुसार, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या तिन्ही महानगरपालिकामध्ये महायुतीचा महापौर होण्यासंदर्भात यापूर्वीच गेल्या आठवड्यात बैठक झाली होती. या बैठकीत यावर सविस्तर चर्चा देखील दोघांमध्ये झाली आहे. तीनही महानगरपालिकेमध्ये महायुतीला जनादेश मिळाला आहे. त्यामुळे या जनादेशानुसारच तीनही महानगरपालिकेत महायुतीचीच सत्ता स्थापन होणार असल्याची देखील माहिती भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली.

Kalyan-Dombivli Municipal Corporation : महायुतीचं ठरलं, कल्याण-डोंबिवलीत महापौर महायुतीचाच होणार Read More »

harshwardhan sapkal

Harshwardhan Sapkal: बुलडोझर लावून उद्ध्वस्त केलेल्या मणिकर्णिका घाटाची हर्षवर्धन सपकाळ करणार पाहणी

Harshwardhan Sapkal: मोदी–योगी यांच्या डबल इंजिन सरकारने काशीतील पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला पवित्र मणिकर्णिका घाट बुलडोझर लावून उद्ध्वस्त केला आहे. घाटावरील अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती तसेच शिवलिंगही उद्धवस्त करण्यात आली आहेत. हा प्रकार हिंदू श्रद्धेवर आणि सांस्कृतिक वारशावर थेट आघात आहे. या गंभीर प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शुक्रवारी वाराणसी दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या सोबत प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, तसेच काँग्रेस पक्षाचे व धनगर समाजाचे विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. हे शिष्टमंडळ मणिकर्णिका घाटाला भेट देऊन भाजपच्या बुलडोझर सरकारने केलेल्या तोडफोडीची पाहणी करणार आहे. मणिकर्णिका घाट हा हिंदू धर्मासाठी अत्यंत पवित्र व ऐतिहासिक महत्त्व असलेला घाट आहे. मात्र ‘विकासाच्या’ गोंडस नावाखाली या घाटाची तोडफोड करण्यात आली आहे. यापूर्वीही मोदी आणि योगी सरकारने काशी परिसरातील शेकडो मंदिरे उद्ध्वस्त केली आहेत. आता मणिकर्णिका घाट, तेथील देवी-देवतांच्या मूर्ती आणि लहान मंदिरे नष्ट करून पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा अपमान करण्यात आला आहे. हा प्रकार केवळ अहिल्याबाई होळकर यांचा फक्त वारसाच नाही, तर धनगर समाजाचा, तसेच संपूर्ण हिंदू समाजाच्या श्रद्धेचा अपमान आहे. भाजप सरकारचे हे कृत्य म्हणजे संस्कृती, परंपरा आणि इतिहास पुसण्याचा प्रयत्न असल्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Harshwardhan Sapkal: बुलडोझर लावून उद्ध्वस्त केलेल्या मणिकर्णिका घाटाची हर्षवर्धन सपकाळ करणार पाहणी Read More »

img 20260122 wa0002

Ahilyanagar Municipal Corporation: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी प्रकाश भागानगरे यांची सर्वानुमते निवड

Ahilyanagar Municipal Corporation: महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजितदादा गट) पक्षाच्या महानगरपालिका गटनेते पदी ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश भागानगरे यांची सर्वानुमते निवड झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विजेत्या सर्व 27 नगरसेवकांची बुधवारी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात गट नोंदणी झाली. यावेळी गटनेते पदी ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश भागानगरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. माजी खासदार डॉ.सुजय विखे यांनी तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक संपत बारस्कर यांनी प्रकाश भागानगरे यांचा सत्कर करून अभिनंदन केले. यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार संग्राम जगताप म्हणाले,  प्रकाश भागानगरे यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वाचा फायदा शहराच्या विकासासाठी निश्चितपणे होईल. त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्याकडून आणि समस्त कार्यकर्त्यांकडून मनःपूर्वक शुभेच्छा! यावेळी नूतन गटनेते प्रकाश भागानगरे म्हणाले, स्व.अरुणकाका जगताप यांच्या आशीर्वादाने व आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मला पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी पार पाडताना सर्व नगरसेवक तसेच पक्षाचे सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वसात व बरोबर घेऊन काम करू. महानगरपालिकेत सर्व नगरसेवकांचे तसेच नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या पदाच्या माध्यमातून प्रयत्न करू. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक सागर बोरुडे, दिपाली बारस्कर, संपत बारस्कर, महेश तवले, संध्या पवार, ज्योती गाडे, गौरी बोरकर, काजल भोसले, हरप्रीतकौर गंभीर, मोहित पंजाबी, सुनिता भिंगारदिवे, कुमार वाकळे, अशा डागवाले, सुरेश बनसोडे, सुजाता पडोळे, अनिता शेटिया, गणेश भोसले., अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, सुनिता फुलसौंदर, मीना चोपडा, पोर्णिमा गव्हाळे, गीतांजली काळे, सुनीता कांबळे, वर्षा काकडे, मयूर बांगरे व अश्विनी लोंढे आदी उपस्थित होते.

Ahilyanagar Municipal Corporation: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी प्रकाश भागानगरे यांची सर्वानुमते निवड Read More »

stock market

Stock Market Crash : शेअर बाजार पुन्हा कोसळला, 3 दिवसांत 15 लाख कोटी रुपयांचे नुकसान; जाणून घ्या सर्वकाही

Stock Market Crash : पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजार कोसळल्याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सततच्या टॅरिफ हल्ल्यांमुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये घबराट पसरली आहे. आठवड्याच्या तिसऱ्या व्यापारी दिवशी सुरुवात होताच आशियाई बाजार कोसळले, ज्यामुळे भारतीय शेअर बाजारासाठी नकारात्मक संकेत मिळाले. बुधवारी सेन्सेक्स-निफ्टी मंदावले असले तरी, ही मंदी एका तासातच लक्षणीय घसरणीत रूपांतरित झाली. एका घसरणीत बीएसई सेन्सेक्स दिवसाच्या उच्चांकावरून सुमारे 1100 अंकांनी घसरला. एनएसई निफ्टीमध्येही मोठी घसरण झाली. या पातळीवर घसरल्यानंतर, निर्देशांक सावरला आहे. सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा कोसळला शेअर बाजार सलग तीन व्यापारी दिवसांपासून घसरणीत आहे. मंगळवार शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी अशुभ ठरला आणि बुधवारीची परिस्थिती तशीच राहिली. सुरुवातीच्या किरकोळ चढउतारांचे रूपांतर लवकरच लक्षणीय घसरणीत झाले. बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 81,794 वर उघडला, जो त्याच्या मागील बंद 82,180 अंकांपेक्षा कमी होता आणि नंतर सुरुवातीला 82,282 अंकांवर पोहोचला, परंतु नंतर या पातळीपासून ते 81,124 अंकांवर झपाट्याने घसरला. तर निफ्टी दिवसाच्या उच्चांकापासून 358 अंकांनी घसरला. निफ्टी 50 25,232 अंकांपेक्षा कमी होऊन 25,141 अंकांवर उघडला आणि नंतर 25,277 अंकांना स्पर्श करून 24,919 पर्यंत घसरला. बाजारातील सततच्या घसरणीमुळे, शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना एकामागून एक धक्का बसत आहे. तीन व्यापार दिवसांत झालेल्या बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. ज्यामुळे 15 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त जास्त नुकसान झाले आहे. सोमवारी, आठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी, बीएसई बाजार भांडवल ₹465. 68 लाख कोटींवर घसरले, ते मंगळवारी आणखी घसरून ₹455.72 लाख कोटींवर पोहोचले, एकाच दिवसात ₹10 लाख कोटींपेक्षा जास्त तोटा झाला. बुधवारी, त्यात आणखी एक लक्षणीय घट झाली, ही घट ₹4.53 लाख कोटींवर पोहोचली.

Stock Market Crash : शेअर बाजार पुन्हा कोसळला, 3 दिवसांत 15 लाख कोटी रुपयांचे नुकसान; जाणून घ्या सर्वकाही Read More »