DNA मराठी

ट्रेंडिंग

rain alert

IMD Rain Alert : नगरकरांनो जिल्ह्यात आज धो धो पाऊस; ‘यलो अलर्ट’ जारी

IMD Rain Alert : तीन – चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जिल्ह्यात मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. ३ ऑक्टोबर रोजी नगर जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू होता. तर आता पुन्हा एकदा पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात ४ ऑक्टोबर रोजी वीजांचा कडकडाट, हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नद्यांच्या विसर्गात वाढ; पूरस्थितीचा धोका   पुणे, नाशिक,अहिल्यानगर व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील धरणांमधून सोडलेल्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.   सध्या भिमा नदीवर दौंड पूल येथे १२,०३८ क्युसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ६,३१० क्युसेक, जायकवाडी धरणातून २८,२९६ क्युसेक, प्रवरा नदीवरील निळवंडे धरणातून १,३५६ क्यूसेक,ओझर बंधारा २,७५७ क्युसेक, मुळा धरणातून ३,००० क्युसेक, घोड धरणातून ४,००० क्युसेक, सीना धरणातून ३,३९३ क्युसेक, कुकडी नदीवरील येडगांव धरणातून ५०० क्युसेक, हंगा नदीवरील विसापूर धरणातून १,२२० क्युसेक, खैरी धरण येथून ५१९ क्सुसेक इतका विसर्ग सुरू आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सूचना मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये, वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत / दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या / लोंबणाऱ्या  केबल्स् पासून दूर रहावे. जाहिरात फलक (होर्डिंग्ज) कोसळून होणाऱ्या दूर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून जाहिरात फलकांच्या (होर्डिंग्ज) आजूबाजूला थांबू नये व योग्य ती दक्षता घ्यावी. विजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, धरणाचे पाण्यात वा नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी (Selfie) काढू नये. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासुन तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे-नाल्यांवरील पुल व बंधा-यांवरुन पाणी वाहत असल्यास पुल/बंधारे ओलांडू नये. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. जुनाट/मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी व वेळीच सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.

IMD Rain Alert : नगरकरांनो जिल्ह्यात आज धो धो पाऊस; ‘यलो अलर्ट’ जारी Read More »

nilesh ghaywal

Nilesh Ghaywal : दोन जिल्ह्यात काढली बायको अन् स्वतःची ओळखपत्र…, निलेश घायवळचा आणखी एक प्रताप

Nilesh Ghaywal : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला निलेश घायवळ सतत वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतो. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असूनही त्याने पासपोर्ट आणि व्हिसा सहज मिळवून परदेश गाठल्याने प्रशासनावरच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहे. आता त्याच्याशी संबंधित आणखी एक प्रकरण समोर आल आहे. घायवळने पुणे आणि अहिल्यानगरमध्ये दुहेरी मतदान नोंदणी करून आपल्या अन बायकोच्या नावे ओळखपत्र मिळवली आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश घायवळ आणि त्याच्या पत्नीच्या नावावर दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मतदान ओळखपत्रे तयार करण्यात आली आहेत. पुणे आणि अहमदनगर या ठिकाणी एकाच व्यक्तीच्या दोन नावांनी व दोन वयोगटात ओळखपत्रे मिळवण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ओळखपत्रातील विसंगती 1. पती – निलेशकुमार बन्सीलाल गायवळ • क्रमांक: DRD1360288 • मतदारसंघ: कोथरूड, पुणे • दाखवलेले वय: 47 2. पती – निलेश बन्सीलाल गायवळ • क्रमांक: TKM8217994 • मतदारसंघ: कर्जत-जामखेड, अहमदनगर • दाखवलेले वय: 48 3. पत्नी – स्वाती निलेश गायवळ • क्रमांक: SAO7387947 • मतदारसंघ: कोथरूड, पुणे • दाखवलेले वय: 42 4. पत्नी – स्वाती निलेश गायवळ • क्रमांक: TKM8218026 • मतदारसंघ: कर्जत-जामखेड, अहमदनगर • दाखवलेले वय: 33 अहमदनगर व पुणे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने व वयात बदल करून ही ओळखपत्रे मिळवण्यात आली. इतकेच नव्हे, तर कर्जत-जामखेड मतदारसंघात घायवळ दांपत्याची नावे सलग क्रमांकावर नोंदवली गेल्याचेही उघड झाले आहे. यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया केवळ नावातील फेरफार व खोट्या माहितीवर आधारित असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, घायवळ हे सर्व कुणाच्या आश्रयाने करतो? प्रशासनातील कोणत्या अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे दुहेरी ओळखपत्रे बनवली गेली? हे प्रश्न आता पुढे येत आहेत. यामुळे त्याच्या जवळील असलेल्या राजकीय मंडळींवरही संशयाची सुई फिरू लागली आहे. त्यामुळे हे प्रकरण प्रशासन किती गांभीर्याने घेत आणि काय कारवाई करत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Nilesh Ghaywal : दोन जिल्ह्यात काढली बायको अन् स्वतःची ओळखपत्र…, निलेश घायवळचा आणखी एक प्रताप Read More »

sana mir

Sana Mir Controversy : पाकिस्तान बांगलादेश सामना अन् “आझाद काश्मीर” चा उल्लेख; नवीन वादाला सुरुवात

Sana Mir Controversy: महिला विश्वचषक 2025 ची शानदार सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामन्यादरम्यान एका नवीन वादाला सुरुवात झाली आहे. पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार सना मीरने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात समालोचन करताना पाकिस्तानी खेळाडू नतालिया परवेझच्या गावाचा उल्लेख केला आणि ती आझाद काश्मीरची असल्याचे सांगितले. हे विधान प्रसारित होताच सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि अनेक चाहत्यांनी त्यावर टीका केली, ज्यामुळे त्याला राजकीय वळण मिळाले. लोकांनी आयसीसीकडून कारवाईची मागणी करण्यास सुरुवात केली. माफी मागण्यास नकार सना मीरच्या विधानामुळे खळबळ उडाली असली तरी तिने माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला. टीकेला तोंड द्यावे लागल्यानंतर, सनाने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहून तिची भूमिका स्पष्ट केली. तिने म्हटले की तिच्या टिप्पण्या कोणालाही दुखावण्यासाठी नव्हत्या, तर त्या खेळाडूला तिच्या प्रदेशामुळे येणाऱ्या आव्हानांवर आणि तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी प्रगती केली यावर प्रकाश टाकण्यासाठी होत्या. सना मीरची सोशल मीडिया पोस्ट सना यांनी तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “खेळाशी संबंधित साध्या गोष्टीही प्रमाणाबाहेर फेकल्या जातात हे दुर्दैवी आहे. मी नतालिया परवेझ आणि त्यांच्या संबंधित क्षेत्रातील दोन इतर पाकिस्तानी खेळाडूंचा उल्लेख केला. खेळाडूंनी त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या परिस्थितीतून जावे लागले आहे हे अधोरेखित करणे हा समालोचनाचा एक भाग आहे. कृपया याचे राजकारण करू नका.” सना यांनी असेही म्हटले आहे की, समालोचक म्हणून तिचे काम खेळाडूंच्या प्रवास आणि कथांवर प्रकाश टाकणे आहे, राजकीय वाद निर्माण करणे नाही. तिने नतालिया परवेझच्या पार्श्वभूमीबद्दल माहिती गोळा केलेली संशोधन सामग्री देखील शेअर केली. भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी तणाव तर दुसरीकडे सना मीर यांचे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेटवरून आधीच तणाव आहे. दोन्ही संघांमधील अलिकडच्या आशिया कप सामन्यादरम्यान राजकीय आणि क्रीडा वादांमुळे परिस्थिती आणखी चिघळली. 5 ऑक्टोबर रोजी कोलंबोमध्ये होणाऱ्या 2025 च्या महिला विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर येणार आहेत. असे मानले जाते की हा सामना पुन्हा एकदा राजकारणाने व्यापला जाऊ शकतो. भारतीय महिला संघाची भूमिका वृत्तानुसार, पुरुष संघाप्रमाणे भारतीय महिला क्रिकेट संघही सामन्यांनंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचे धोरण स्वीकारत आहे. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या तणावात आणखी वाढ होऊ शकते. त्यामुळे क्रिकेट चाहते 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या बहुप्रतिक्षित सामन्याकडे उत्सुकतेने पाहत आहेत.

Sana Mir Controversy : पाकिस्तान बांगलादेश सामना अन् “आझाद काश्मीर” चा उल्लेख; नवीन वादाला सुरुवात Read More »

raj thackeray

Raj Thackeray: रविवारपासून राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर; पूरग्रस्त शेतकऱ्यांना करणार मदत

Raj Thackeray: राज्यातील अनेक गावात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाल्याने पिके वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी आता विरोधकांकडून जोर धरत आहे. तर दुसरीकडे सरकारमधील अनेक मंत्री तसेच विरोधी पक्षातील नेते पूरग्रस्त भागाचा दौरा करत परिस्थिती जाणून घेत आहे. तर आता मनसे प्रमुख राज ठाकरे देखील रविवारपासून मराठवाडा दौऱ्यावर असणार आहे. मनसेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार राज ठाकरे या दौऱ्यात लातूर, नांदेड, सोलापूर, धाराशिव आणि इतर काही जिल्ह्यात जाणार आहे. तर दुसरीकडे पूरग्रस्त शेतकऱ्यांना बीज बियाणे आणि खते मनसेकडून दिली जाणार. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनोज चव्हाण रविवारपासून मदत घेऊन मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार. लातूर, नांदेड, सोलापूर, धाराशिव आणि इतर भागातही मनसेची मदत पोहोचवली जाणार. शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेली बी-बीयाने आणि खते मनसेकडून दिली जाणार असल्याची माहिती मनसेकडून देण्यात आली आहे.

Raj Thackeray: रविवारपासून राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर; पूरग्रस्त शेतकऱ्यांना करणार मदत Read More »

ajit pawar

Ajit Pawar: त्रास होणार नाही, पारनेर – सुपा MIDC च्या विकासासाठी सहकार्य करा; अजित पवार स्पष्टच बोलले

Ajit Pawar: राज्यातील उद्योग क्षेत्राचा जास्तीत जास्त विकास करून रोजगार निर्मितीला शासन प्राधान्य देत आहे. उद्योजकांना संरक्षण देणे हे शासनाचे कर्तव्य असून, पारनेर – सुपा औद्योगिक वसाहतीच्या विकासासाठी प्रशासनाने उद्योजकांना सर्वोतोपरी सहकार्य करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उद्योजकांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता आपले काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. उपमुख्यमंत्री पवार हे पारनेर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पारनेर – सुपा औद्योगिक वसाहतीमधील विविध विषयासंबंधी आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. बैठकीस आमदार काशीनाथ दाते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय अधिकारी गणेश राठोड, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग अधिकारी अशोक बेनके, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुनील शिंदे, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त रविकुमार पंतम आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, उद्योगासाठी शासनाचे नेहमीच सकारात्मक धोरण राहिले आहे. पारनेर – सुपा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची पोलीस प्रशासनाने काळजी घ्यावी. उद्योजकांना वेठीस धरून दबाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. औद्योगिक वसाहतीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी पोलीस विभागाने अधिक कार्यक्षम व दक्षतेने काम करावे. उद्योग टिकून राहावेत यासाठी उद्योजकांनीही कामगारांना उद्योगामध्ये सामावून घेण्याचे आवाहन केले. सुपा – पारनेर औद्योगिक क्षेत्रात वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्यामुळे उद्योजकांना मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या तक्रारीवर तातडीने उपाययोजना करून उद्योगक्षेत्राला अखंडित वीज पुरवठा तसेच पाणी पुरवठा सुनिश्चित केला जावा. औद्योगिक क्षेत्रात कामगार महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस विभागाने साध्या वेषातील पोलिसांमार्फत गस्त वाढवावी. उद्योगांनी सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी. तसेच, औद्योगिक क्षेत्रात प्रदूषणमुक्त वातावरण राखले जावे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी उद्योगांनी खबरदारी घेण्यास निर्देशही त्यांनी दिले. कौशल्यावर आधारित प्रशिक्षणाला अधिक महत्त्व दिले जात असून, कौशल्य विकास विभागामार्फत विद्यार्थी व विद्यार्थिनींना मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. सी ट्रिपल आय.टी. च्या माध्यमातून उद्योगासाठी उपयुक्त मनुष्यबळ तयार करण्यावर भर देण्यात येत आहे. जर्मन भाषा अवगत असलेल्या बेरोजगारांना सुमारे दहा लाख रोजगार उपलब्ध असल्याची माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. बैठकीत उपस्थित उद्योजकांनी त्यांच्या अडचणी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमोर मांडल्या. संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी व उद्योजक देखील उपस्थित होते.

Ajit Pawar: त्रास होणार नाही, पारनेर – सुपा MIDC च्या विकासासाठी सहकार्य करा; अजित पवार स्पष्टच बोलले Read More »

pt chhannulal mishra death

Pt Chhannulal Mishra Death: पद्मविभूषण पंडित छन्नुलाल मिश्रा यांचे निधन; 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pt Chhannulal Mishra Death : शास्त्रीय गायक आणि पद्मविभूषण पंडित छन्नूलाल मिश्रा यांचे गुरुवारी पहाटे उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी पहाटे 4.15 वाजता त्यांची मुलगी नम्रता मिश्रा हिच्या मिर्झापूर येथील घरी अखेरचा श्वास घेतला. ते काही काळापासून आजारी होते आणि बनारस हिंदू विद्यापीठातील (BHU) वैद्यकीय विज्ञान संस्थेत त्यांच्यावर उपचार सुरू होते. नंतर त्यांची मुलगी त्यांना मिर्झापूर येथील त्यांच्या घरी घेऊन गेली, जिथे ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहिले. छन्नूलाल मिश्रा यांनी त्यांच्या शास्त्रीय संगीताद्वारे लोकांच्या हृदयात स्थान मिळवले. त्यांचे “खेले मसाने में होली…” हे गाणे अजूनही सर्वांच्या ओठांवर आहे. मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्कार छन्नूलाल मिश्रा यांच्या निधनाने संगीत विश्वात शोककळा पसरली आहे. त्यांचे अंत्यसंस्कार आज वाराणसीतील मणिकर्णिका घाटावर केले जातील. पंडित छन्नूलाल मिश्रा गेल्या सात महिन्यांपासून अनेक आरोग्य समस्यांशी झुंजत होते. बीएचयूच्या सर सुंदरलाल रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालानुसार, त्यांना अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (एआरडीएस) होता, जो त्यांच्या फुफ्फुसांमध्ये तीव्र जळजळ होण्यामुळे उद्भवणारा आजार होता. त्यांना टाइप २ मधुमेह, उच्च रक्तदाब, ऑस्टियोआर्थरायटिस आणि वाढलेले प्रोस्टेट यासारख्या समस्या देखील होत्या. अनेक गंभीर आजारांनी ग्रस्त होते 11 सप्टेंबर 2025 रोजी, मिर्झापूर येथील त्यांच्या मुलीच्या घरी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. छातीत दुखण्याची तक्रार केल्यानंतर, त्यांना ताबडतोब मिर्झापूर येथील रामकृष्ण सेवाश्रम रुग्णालयात दाखल करण्यात आले. 13 सप्टेंबरच्या रात्री त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना बीएचयूच्या सर सुंदरलाल रुग्णालयात हलवण्यात आले. 17 दिवसांच्या रुग्णालयात उपचारानंतर, त्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना 27 सप्टेंबर रोजी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते त्यांच्या मुलीसह मिर्झापूर येथील त्यांच्या घरी गेले, जिथे ते डॉक्टरांच्या जवळच्या देखरेखीखाली राहिले. त्यांनी गुरुवारी पहाटे शेवटचा श्वास घेतला. बनारस घराण्याचे एक अनमोल रत्न पंडित छन्नुलाल मिश्रा यांचा जन्म 3 ऑगस्ट 1936 रोजी उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील हरिहरपूर येथे झाला. ते भारतीय शास्त्रीय संगीताच्या बनारस घराण्यातील सर्वात प्रमुख गायकांपैकी एक होते. त्यांच्या गायनात बनारसच्या गंगा-जमुनी संस्कृतीचे स्पष्ट प्रतिबिंब होते. ठुमरी, दादरा, कजरी, चैती आणि भजन यासारख्या शास्त्रीय आणि अर्धशास्त्रीय गायन शैलींवर त्यांचे प्रभुत्व अतुलनीय होते. त्यांच्या आवाजात एक अनोखी जादू होती जी श्रोत्यांना मोहित करते.

Pt Chhannulal Mishra Death: पद्मविभूषण पंडित छन्नुलाल मिश्रा यांचे निधन; 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास Read More »

vishal

Vishal Brahma Drug Case : 40 कोटी किमतीच्या ड्रग्जसह ‘या’ बॉलीवूड अभिनेत्याला अटक

Vishal Brahma Drug Case : स्टुडंट ऑफ द इयर 2 या बॉलिवूड चित्रपटात काम करणारा अभिनेता विशाल ब्रह्मा याला चेन्नई विमानतळावर ड्रग्जसह अटक करण्यात आली आहे. वृत्तानुसार, सिंगापूरहून AI-347 या फ्लाइटमधून उतरल्यानंतर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून अंदाजे 40 कोटी (अंदाजे US$1.2 अब्ज) किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. नायजेरियन टोळीने अडकवले तपासात असे दिसून आले की 32 वर्षीय विशालला नायजेरियन ड्रग्ज टोळीने आमिष दाखवले होते. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या विशालला कंबोडियाला सुट्टीचे आमिष दाखवण्यात आले होते, परंतु तो परत आल्यावर त्याला ड्रग्जने भरलेली ट्रॉली बॅग देण्यात आली, जी तो घेऊन भारतात परतला. या टोळीचा हेतू असा होता की सुरक्षा एजन्सी त्याच्या अभिनेत्याच्या रूपामुळे त्याच्यावर संशय घेऊ नयेत. विशालला टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया यांच्या भूमिका असलेल्या स्टुडंट ऑफ द इयर 2 मधून प्रसिद्धी मिळाली. तो “बिहू अटॅक” चित्रपटातही दिसला. मात्र त्याच्या अलीकडील अटकेमुळे त्याच्या कारकिर्दीला मोठा धक्का बसला आहे. तपास सुरूच, टोळीपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न संचालनालय (डीआरआय) आणि इतर तपास संस्था आता संपूर्ण नेटवर्क उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत. नायजेरियन टोळ्यांची भूमिका, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी कट आणि भारतातील त्याची मुळे तपासण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

Vishal Brahma Drug Case : 40 कोटी किमतीच्या ड्रग्जसह ‘या’ बॉलीवूड अभिनेत्याला अटक Read More »

da hike

DA Hike : दिवाळी गिफ्ट, ‘या’ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

DA Hike : दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी डीएमध्ये 3% वाढ जाहीर केली. ही घोषणा दसरा आणि दिवाळीच्या सणानिमित्त करण्यात आली आहे. 1 जुलैपासून याचा फायदा मिळणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही घोषणा केली. केंद्र सरकार वर्षातून दोनदा डीए वाढवते. एकदा होळीपूर्वी, जानेवारी-जून दरम्यान आणि दुसऱ्यांदा दिवाळीपूर्वी, जुलै-डिसेंबर दरम्यान. या वाढीचा फायदा देशभरातील 1.5 कोटी केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होईल. डीए वाढ किती असेल? सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डीए अंदाजे 3% ने वाढवण्यात आला आहे. यामुळे एकूण डीए त्यांच्या मूळ पगाराच्या 58% वर जाईल. या वर्षी जानेवारी-जूनमध्ये डीए 2% ने वाढवण्यात आला होता, जो गेल्या सहा वर्षातील सर्वात कमी वाढ होता. पगार वाढ किती असेल? मूळ पगार 36,000 आहे असे गृहीत धरा. याचा अर्थ महागाई भत्ता दरमहा 1,080 ने वाढेल. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात 3% वाढ मोजली तर पेन्शनधारकांनाही प्रमाणानुसार लाभ मिळेल आणि महागाई सवलतीतही वाढ होण्याची अपेक्षा आहे. सध्या, महागाई भत्त्यात वाढ सातव्या वेतन आयोगांतर्गत लागू केली जाते. या सातव्या वेतन आयोगाचा 10 वर्षांचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2025 रोजी संपेल. आठवा वेतन आयोग पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत लागू होण्याची अपेक्षा आहे.

DA Hike : दिवाळी गिफ्ट, ‘या’ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ Read More »

court

Ahilyanagar News : मोठी बातमी, गोळीबार प्रकरणात आरोपीस तीन वर्षांची शिक्षा

Ahilyanagar Crime News : कर्जत तालुक्यातील गोळीबार प्रकरणात आरोपी विनोद मोहन मुरकुटे (वय ३३, रा. मुरकुटे वस्ती) यास श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. शिंगाडे यांनी शिक्षा सुनावली. भा.दं.वि. कलम ३२४ अंतर्गत तीन वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड, तसेच भारतीय शस्त्र अधिनियम कलम २७(१) अंतर्गत आणखी तीन वर्षे शिक्षा व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा भोगावी लागेल. प्रकरणाची हकीगत अशी की, ४ मार्च २०२३ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास फिर्यादी प्रमोद आतार (वय १९, रा. आतारवस्ती, कर्जत) हा आपल्या चुलत चुलत्यासोबत उसाचे वाढे गोळा करत असताना, आरोपी विनोद मुरकुटे याने पिस्तुलातून गोळी झाडून फिर्यादीच्या पायावर गोळीबार केला. यात तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला कर्जत, त्यानंतर अहमदनगर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेवरून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी, पंच साक्षीदार, ससून रुग्णालयातील डॉक्टर, वैज्ञानिक विश्लेषक महेश कदम तसेच तपास अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकार पक्षाचा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकिल पुष्पा कापसे (गायके) यांनी केला. सरकारी पक्षाने मांडलेल्या पुराव्यांचा स्वीकार करत न्यायालयाने आरोपीस शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी आशा खामकर यांनी सहकार्य केले.

Ahilyanagar News : मोठी बातमी, गोळीबार प्रकरणात आरोपीस तीन वर्षांची शिक्षा Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis अनुकंपाचा अनुशेष संपणार; 10,309 नियुक्तीपत्रे प्रदान करणार

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यानंतर आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, येत्या 4 ऑक्टोबर रोजी 5187 अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार आहेत. याचवेळी 5122 एमपीएससीद्वारे नियुक्तांनाही प्रमाणपत्र दिली जाणार असून, एकाचदिवशी 10,309 उमेदवार शासकीय नोकरीत दाखल होतील. अशाप्रकारचा हा इतिहासातील एक अनोखा कार्यक्रम ठरेल. शासकीय नोकरीत असताना कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी अथवा अपत्याला नोकरी दिली जाते. पण, कधी तांत्रिक कारणाने तर कधी प्रशासकीय दिरंगाईने या नियुक्त्या रखडत होत्या. त्यामुळे त्यांना दीर्घ प्रतिक्षा करावी लागते. अशात या संवेदनशील विषयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले. त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला सूचना केल्या. सातत्याने प्रशासकीय बैठकांमध्ये त्याचा आढावा घेतला आणि नवीन अनुकंपा धोरण तयार करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून अनुकंपा प्रतिक्षायादीतील 5187 अनुकंपा उमेदवारांना एकाचवेळी नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. यामुळे अनुकंपाचा एक मोठा अनुशेष संपुष्टात येणार आहे. 4 ऑक्टोबरला मुख्य कार्यक्रम हा मुंबईत होईल आणि त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित असतील, तर पालकमंत्री आपआपल्या जिल्ह्यात नियुक्तीपत्रे वितरित करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी 100 दिवस आणि नंतर 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणांच्या हाती घेतलेल्या कार्यक्रमातील हा महत्त्वाचा टप्पा होता. यासोबतच एमपीएससीतर्फे परीक्षा घेण्यात आलेल्या लिपीक-टायपिस्ट श्रेणीतील 5122 उमेदवारांना सुद्धा नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. एकूण 10,309 उमेदवारांपैकी सर्वाधिक 3078 उमेदवार हे कोकण विभागातील असून, 2597 हे विदर्भातील आहेत. पुणे विभागात 1674, नाशिक विभागात 1250, तर मराठवाड्यातील 1710 उमेदवार आहेत.

Devendra Fadnavis अनुकंपाचा अनुशेष संपणार; 10,309 नियुक्तीपत्रे प्रदान करणार Read More »