DNA मराठी

ट्रेंडिंग

virat and rohit

BCCI Central Contract:  रोहित, विराटला धक्का, BCCI आता देणार नाही 7 कोटी मानधन; कारण काय?

BCCI Central Contract:  जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआय मोठा निर्णय घेत सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये बदल करण्याचा विचार करत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार बीसीसीआय त्यांच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून ए+ ग्रेड काढून टाकण्याचा विचार करत आहे. सध्या ए+ ग्रेडमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा सारखे दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. जर ए+ ग्रेड काढून टाकण्यात आले तर या चौघांनाही मोठ्या प्रमाणावर पगार कपात होणार आहे. बीसीसीआयच्या ग्रेड ए+ कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत, खेळाडूंना दरवर्षी 7 कोटी मिळतात, परंतु ही ग्रेड आता अस्तित्वात राहणार नाही. बीसीसीआय आता फक्त तीन कॅटेगरी राखेल: ए, बी आणि सी. रोहित आणि विराट कोहलीच्या पगारात लक्षणीय घट रोहित आणि विराट कोहलीच्या पगारात लक्षणीय घट होईल. त्यांना बी ग्रेडमध्ये हलवले जाईल. सध्या बी ग्रेड खेळाडूंना दरवर्षी 3 कोटी मिळतात. याचा अर्थ विराट आणि रोहितला आता 7 कोटींऐवजी 3 कोटी मिळतील. जडेजा देखील बी ग्रेडमध्ये हलवला जाऊ शकतो, तर जसप्रीत बुमराहला ए ग्रेडमध्ये हलवले जाऊ शकते. कोणत्या खेळाडू कोणत्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ?   भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एकूण 34 खेळाडूंना केंद्रीय करार दिले आहेत, त्यापैकी 19 खेळाडूंना सी-ग्रेड करार आहेत. सध्या, पाच खेळाडू बी-ग्रेडमध्ये आहेत. सहा खेळाडू ए-ग्रेडमध्ये आहेत. ए-प्लस श्रेणीमध्ये चार खेळाडू आहेत. ए-प्लस श्रेणी: रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा. ए-ग्रेड: मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी, ऋषभ पंत. बी-ग्रेड: सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यर. सी ग्रेड: रिंकू सिंग, टिळक वर्मा, रुतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, प्रसीध कृष्णा, रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, सरफराज खान, नितीश कुमार रेड्डी, इशान किशन, अभिषेक शर्मा, अभिषेक शर्मा, अभिषेक शर्मा, अभिषेक वर्मा.

BCCI Central Contract:  रोहित, विराटला धक्का, BCCI आता देणार नाही 7 कोटी मानधन; कारण काय? Read More »

seema anand

Who is Seema Anand : सीमा आनंद Google वर सर्वाधिक सर्च होणारी भारतीय महिला; नेमकं कारण काय?

Who is Seema Anand  : गेल्या काही दिवसांपासून भारतात सोशल मीडियावर सर्वात जास्त चर्चेत असलेला नाव म्हणजे सीमा आनंद. सीमा आनंद काहींना काही कारणाने सोशल मीडियावर चर्चेत आहे. तर ती आता गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या भारतीय महिलांपैकी एक बनली आहे. काही दिवसांपुर्वी तिचे काही एआय-जनरेटेड, आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाले होते, त्यानंतर तिने या प्रकरणात एफआयआर दाखल केला आणि डिजिटल छळाच्या सामान्यीकरणाविरुद्ध बोलले. जर तुम्हाला तिच्याबद्दल माहिती नसेल तर जाणून घ्या सीमा आनंद कोण आहे? सीमा आनंद कोण आहे? सीमा आनंद एक लेखिका, व्यावसायिक कथाकार आणि पौराणिक कथा तज्ञ आहे. ती मानसशास्त्र आणि कामसूत्र सारख्या प्राचीन भारतीय ग्रंथांवर आधारित नातेसंबंध आणि लैंगिक आरोग्यावर चर्चा करते. सीमा आनंद अलिकडच्या काळात, विशेषतः तरुण पिढीमध्ये वाढत्या प्रमाणात लोकप्रिय झाली आहे. ती सोशल मीडियावर नातेसंबंध, जवळीक आणि स्वतःवर प्रेम यासारख्या विषयांवर उघडपणे सल्ला देते. तिच्याविरुद्ध डिजिटल छळाचा एक खटला उघडकीस आल्यानंतर तिला आणखी लक्ष वेधले गेले. तिने या छळाविरुद्ध कडक भूमिका घेतली आणि पोलिस तक्रार दाखल केली. या वयात तिच्या धाडसी कृतीने आणि आत्मविश्वासाने लाखो लोकांची मने जिंकली. ती अनेकदा तिच्या व्हिडिओंमध्ये म्हणते की वय हे फक्त एक संख्या आहे आणि ती स्वतःच्या मुळांशी आणि संस्कृतीशी जोडून आधुनिक समस्यांवर उपाय शोधण्यावर विश्वास ठेवते.  सीमा आनंद पुस्तके सीमा आनंद यांनी “द आर्ट्स ऑफ सेडक्शन” आणि अलिकडेच “स्पीक इझी” सारखी लोकप्रिय पुस्तके लिहिली आहेत. या पुस्तकांमध्ये, ती प्राचीन भारतीय ज्ञानाचा वापर करून नातेसंबंधांमध्ये संवाद आणि आदराचे महत्त्व स्पष्ट करते. “द आर्ट ऑफ सेडक्शन” वरील तिचा टेड टॉक लाखो वेळा पाहिला गेला आहे. 

Who is Seema Anand : सीमा आनंद Google वर सर्वाधिक सर्च होणारी भारतीय महिला; नेमकं कारण काय? Read More »

img 20260121 wa0007

Ahilyanagar Municipal Corporation : भाजपकडून धनगर समाजातील शारदा ढवण यांना गटनेतेपद

Ahilyanagar Municipal Corporation :  अहिल्यानगर महापालिकेच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाने नवा अध्याय सुरू केला असून पक्षाच्या नगरसेवक गटाची अधिकृत नोंदणी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात पूर्ण झाली आहे. या प्रक्रियेत भाजपच्या नगरसेविका शारदा दिगंबर ढवण यांची गटनेतेपदी निवड जाहीर केली आहे अहिल्यानगर नामांतरानंतर धनगर समाजाला मिळालेले हे सर्वोच्च पद मानले जात असून स्वर्गीय दिगंबर ढवण यांना ही निवड श्रद्धांजली ठरत आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाने महापालिकेत प्रथमच एका महिलेला गटनेतेपदाची संधी देत महिला नेतृत्वालाही ठोस व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. भाजप पक्षाने पहिल्यांदाच धनगर समाजातील प्रतिनिधीस हे महत्त्वाचे पद देत शहरातील विविध समाजघटकांपर्यंत सामाजिक संदेश पोहोचण्याचा दिला आहे. ही निवड केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिकदृष्ट्याही महत्त्वाची मानली जात आहे. शारदा दिगंबर ढवण या दिवंगत दिगंबर ढवण यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा वारसा पुढे नेत आहेत. त्या माजी खासदार डॉ  सुजय विखे पाटील यांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जातात. दिगंबर ढवण यांच्या निधनानंतर निवडणुकीच्या काळात स्वतः मैदानात उतरून केलेल्या प्रचारामुळे शारदा ढवण यांना मिळालेला जनसमर्थनाचा पाया आज गटनेतेपदाच्या रूपाने अधिक दृढ झाल्याचे दिसते. अहिल्यानगर महापालिकेत भाजपचे 25 नगरसेवक निवडून आले असून नामांतरानंतर हे पहिलेच गटनेतेपद आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर निर्णयक्षम आणि स्पष्ट नेतृत्व उभे राहत असल्याचे चित्र आहे. पक्षाच्या धोरणात्मक भूमिकांना महापालिकेत प्रभावीपणे मांडण्यासाठी ही निवड महत्त्वाची ठरणार आहे.

Ahilyanagar Municipal Corporation : भाजपकडून धनगर समाजातील शारदा ढवण यांना गटनेतेपद Read More »

karnataka dgp viral video

Karnataka DGP Viral Video :  कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरण, कर्नाटकचे डीजीपी रामचंद्र राव निलंबित

Karnataka DGP Viral Video : कथित अश्लील व्हिडिओ प्रकरणात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोठी कारवाई करत कर्नाटकचे पोलीस महासंचालक के. रामचंद्र राव निलंबित केले आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर दुसरीकडे के. रामचंद्र राव यांनी व्हायरल व्हिडिओ फेक असून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे. त्यांनी या व्हिडिओची फॉरेन्सिक चौकशीची मागणी केली आहे. नेमकं प्रकरण काय? के. रामचंद्र राव यांच्यावर व्हिडिओमध्ये महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसल्याचा आरोप करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये के. रामचंद्र राव इतर महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीत खुर्चीवर बसलेले दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राव कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांना भेटण्यासाठीही गेले होते, परंतु बैठक अयशस्वी झाली. तर दुसरीकडे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागितला. वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा व्हिडिओ कोणत्या परिस्थितीत रेकॉर्ड करण्यात आला आणि तो कोणी प्रसारित केला याची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, व्हिडिओचा स्रोत आणि सत्यता निश्चित करण्यासाठी प्राथमिक चौकशी सुरू होण्याची शक्यता आहे. हे फुटेज डिजिटल पद्धतीने हाताळण्यात आले आहे का हे शोधण्यासाठी सायबर गुन्हे तज्ञांचीही मदत घेतली जाईल. या घटनेने राजकीय वर्तुळातही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

Karnataka DGP Viral Video :  कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरण, कर्नाटकचे डीजीपी रामचंद्र राव निलंबित Read More »

bmc election

BMC Election: आरक्षणाची चिठ्ठी ठरवणार मुंबईचा महापौर; नेमकं घडणार काय?

BMC Election: मुंबई महापौरपदाची निवड आता फक्त निवडणुकीनंतरची औपचारिक बाब राहिलेली नाही. आरक्षणाच्या सोडतीने सत्तेची दिशा बदलण्याची वेळ आली आहे. गुरुवारी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात सकाळी ११ वाजता २९ महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत होणार असून, या एका प्रक्रियेवर मुंबईच्या सत्तासमीकरणाचा भविष्यातील आराखडा अवलंबून असल्याचे चित्र आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोडतीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. याचे कारण स्पष्ट आहे. मुंबई महापौरपदाचे आरक्षण जर अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात गेले, तर सत्ताधारी भाजप–शिवसेना महायुतीकडे बहुमत असूनही महापौरपदासाठी योग्य उमेदवार उरणार नाही. याच वेळी, सत्तेबाहेर असलेले उद्धव ठाकरे यांच्या गटाला अनपेक्षित राजकीय संधी मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. एसटी आरक्षण आणि महायुतीची कोंडी महापालिकेतील विद्यमान संख्याबळ पाहता, भाजप–शिवसेना महायुतीकडे एसटी प्रवर्गातील एकही निवडून आलेला नगरसेवक नाही. याउलट, एसटीसाठी राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक ५३ आणि १२१ मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)चे जितेंद्र वळवी आणि प्रियदर्शनी ठाकरे विजयी झाले आहेत. त्यामुळे एसटी आरक्षण पडल्यास ठाकरे गटाचा महापौर बिनविरोध निवडून येण्याची शक्यता बळावते. हीच शक्यता सध्या सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सत्तेचे अंकगणित हाताशी असतानाही महापौरपद विरोधकांकडे जाण्याची भीती महायुतीच्या अंतर्गत चर्चांना धार देत आहे. चक्राकार पद्धत: नियम की राजकीय कवच? सरकारकडून दिलासा देणारा मुद्दा म्हणजे महापौरपदाचे आरक्षण चक्राकार पद्धतीने काढले जाणार आहे. या प्रक्रियेनुसार, सुरुवातीला खुला प्रवर्ग निश्चित केला जाईल आणि त्यानंतर पुढील आरक्षणे ठरतील. त्यामुळे यंदा लगेचच एसटी आरक्षण येण्याची शक्यता कमी असल्याचा दावा महायुतीकडून केला जात आहे. मात्र, राजकीय जाणकार वेगळे चित्र मांडतात. त्यांच्या मते, “नियम जरी स्पष्ट असले, तरी सोडतीचा क्रम बदलला तर राजकीय समीकरणे एका क्षणात उलटू शकतात.” एससी–ओबीसी आरक्षणात फारसा संघर्ष नाही अनुसूचित जाती (एससी) किंवा इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षण पडल्यास मात्र सत्तासंघर्षाची तीव्रता कमी राहील. भाजप–शिवसेना महायुती, ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) — सर्वच आघाड्यांकडे या प्रवर्गांतील नगरसेवक उपलब्ध आहेत. त्यामुळे या दोन प्रवर्गांमध्ये महापौरपदाबाबत फारसा राजकीय पेच निर्माण होणार नाही. तथापि, एससी प्रवर्गातील प्रभावी नगरसेवकांची संख्या ठाकरे गटाकडे अधिक आहे, ही बाब त्यांच्या आत्मविश्वासात भर घालणारी ठरत आहे. संयमित भाषा, पण स्पष्ट संकेत अलीकडच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या भाषणांत दिसणारी संयमित पण सूचक भाषा अनेक अर्थांनी घेतली जात आहे. “देवाच्या मनात असेल तर…” अशा वाक्यांमागे दडलेली राजकीय अपेक्षा आजच्या घडीला अधिक ठळकपणे जाणवते आहे. सत्तेपासून दूर असतानाही महापौरपदाची संधी चालून येणे, हे ठाकरे गटासाठी केवळ पदप्राप्ती नसून राजकीय पुनरुज्जीवनाचे संकेत मानले जात आहेत. एक सोडत, अनेक शक्यता गुरुवारची सोडत म्हणजे केवळ नावांची चिठ्ठी नाही, तर मुंबईच्या सत्तेचा कौल आहे. महायुतीला चक्राकार पद्धतीचा आधार आहे, तर ठाकरे गटाची आशा एसटी आरक्षणाच्या शक्यतेवर टिकून आहे. शेवटी प्रश्न तोच राहतो कि महापौरपदाचा निर्णय लोकशाही बहुमत ठरवणार की आरक्षणाची चिठ्ठी? उत्तर काही तासांत समोर येईल; पण या उत्तराचे पडसाद मुंबईच्या राजकारणात दीर्घकाळ घुमत राहणार, हे नक्की.

BMC Election: आरक्षणाची चिठ्ठी ठरवणार मुंबईचा महापौर; नेमकं घडणार काय? Read More »

jaykumar gore on praniti shinde

Jaykumar Gore on Praniti Shinde : प्रणिती शिंदेंवर जयकुमार गोरे यांची वादग्रस्त टीका; राजकीय वाद पेटणार?

Jaykumar Gore on Praniti Shinde : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर भाजपमधील नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंचतारांकित हॉटेल ‘बालाजी सरोवर’ येथे खासदार प्रणिती शिंदेंबाबत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. प्रणिती शिंदें यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी एक भावनिक पत्र लिहिले होते. त्या पत्राच्या शेवटी हिंदीतून “झुकना हमारी फितरत नहीं। दो कदम पीछे हटे हैं, पर सिर्फ अगली छलांग लगाने” असे म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी, “दो कदम पीछे नहीं हटे… 50 कदम नीचे गिरे हैं, वो भी टांग ऊपर” अशा शेलक्या आणि आक्षेपार्ह शब्दांत प्रणिती शिंदेंवर टीका केली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीबाबत आत्मविश्वास व्यक्त करताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी “अब की बार सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजप सरकार” असा नारा दिला. यानंतर त्यांनी खासदार प्रणिती शिंदेंच्या भावनिक पत्रावर वादग्रस्त टिप्पणी केली. “दो कदम पीछे नहीं हटे… 50 कदम नीचे गिरे हैं, वो भी टांग ऊपर” अशा वक्तव्यामुळे काँग्रेस पक्ष आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोलापूर महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून विरोधी पक्ष म्हणून एमआयएम भूमिका बजावणार आहे.

Jaykumar Gore on Praniti Shinde : प्रणिती शिंदेंवर जयकुमार गोरे यांची वादग्रस्त टीका; राजकीय वाद पेटणार? Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis: दावोसमध्ये पहिल्याच दिवशी 14 लाख 50 हजार कोटी गुंतवणूकींचे 19 सामंजस्य करार

Devendra Fadnavis : भारतातील उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्रच गेटवे-ऑफ-इंडिया’ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान खरे ठरवणारे तब्बल १४ लाख ५० हजार कोटींचे गुंतवणूक करार पहिल्याच दिवशी करण्यात आले. या गुंतवणूकीसोबतच राज्यात १५ लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाच्या माध्यमातून यंदा विविध विभागांनी आणि विविध क्षेत्रातील उद्योगांच्या प्रतिनिधी समवेत मुख्यमंत्री फडणवीस, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. हरित ऊर्जा, अन्न प्रक्रीया, पोलाद निर्मिती, आयटी-आयटीईस, डाटा सेंटर्सह ईव्ही- ऑटोमोबाईल, जहाज बांधणी, डीजिटल इन्फ्रा अशा विविध क्षेत्रातील ही गुंतवणूक मुंबईसह राज्याच्या रत्नागिरी, पालघर, गडचिरोली, अहिल्यानगर या भागात पोहचणाऱ असल्याने, तेथे उद्योग वाढीसह मोठ्या प्रमाणा रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्यासह महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाचे प्रतिनिधीमंडळ दावोस येथे उपस्थित आहे. दावोस मधील पहिल्याच दिवसापासून जगभरातील विविध क्षेत्रातील उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी स्वारस्य दर्शवणे सुरु केले. यातून गुंतवणुकीचा मोठा ओघ सुरु झाल्याने महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये उत्साहाचे चित्र निर्माण झाले. तत्पुर्वी, दावोस मधील महाराष्ट्र पॅव्हेलियनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.’ भविष्याचे वेध घेण्यासाठी सज्ज, विश्वासार्ह आणि दीर्घकाळचा भागीदार म्हणून महाराष्ट्र स्वागत करीत आहे. भारताच्या भविष्याचे पॉवर हाऊस म्हणून महाराष्ट्र जगाला, उद्योग विश्वाला साद घालत आहे, अशी मनोदय भावनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. सामंजस्य करारांवरील स्वाक्षरी व करारांच्या आदान-प्रदान प्रसंगी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ‘महाराष्ट्रावरील उद्योग क्षेत्राचा, गुंतवणूकदारांचा हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत. येथे होणाऱ्या करारांवरील पुढील कार्यवाहीबाबत वॉर रूमच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येईल. उद्योजकांना आवश्यक सुविधा वेळेत आणि दर्जदार पद्धतीने मिळाव्यात याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले. ‘उद्योजक – गुंतवणूकदारांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता, यंदा गतवर्षीहून अधिक गुंतवणूक आणि रोजगार संधीचे सामंजस्य करार होतील असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. विशेषतः मुंबईतील घन कचरा व्यवस्थापन, हवा आणि पाणी गुण संनियत्रणाच्या माध्यमातून सर्क्युलर ईकॉनॉमीची संरचना उभी केली जात आहे. तसेच महाराष्ट्र हे अमर्याद संधीचे राज्य आहे. त्याबाबत आणि एमएमआर क्षेत्राच्या विकासासह, तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार समितीने आराखडा निश्चित करून दिला आहे. या माध्यमातून व्यवसायाच्या आणि चांगल्या पगाराच्या रोजगार निमिर्तीवर भर दिला जात असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. दरम्यान, आगामी दोन दिवसात दावोसमध्ये एआय़, क्वांटम कंम्प्युटींग, डीजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, यांसह फिनटेक, लॉजिस्टिक्स अँण्ड इन्फ्रास्ट्रक्चर तसेच जहाज बांधणी, ईव्ही, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील आणखी काही उद्योग घटकांशीही गुंतवणूकीचे सामंजस्य करार होणार आहेत. त्यादृष्टीने त्यांच्या प्रतिनिधींशी, बोलणी -चर्चांच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार गतवर्षी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा कक्ष (MAITRI) या गुंतवणूक आणि उद्योग सुलभतेला प्रोत्साहन देणाऱ्या समर्पित संस्थात्मक व्यवस्थेमुळे यंदा गुंतवणूकदार, उद्योग क्षेत्राचा महाराष्ट्राकडील ओघ आणखी वाढला आहे. सामंजस्य करार पुढीलप्रमाणे… महाराष्ट्र सरकार-काल्सबर्ग क्षेत्र: अन्न प्रक्रिया आणि कृषी गुंतवणूक: ५०० कोटी रोजगार : ७५० महाराष्ट्र सरकार- योकी ग्रीन एनर्जी प्रा. लि. क्षेत्र: नविनिकरणीय ऊर्जा गुंतवणूक: ४ हजार कोटी रोजगार : ६ हजार ठिकाण: पालघर/एमएमआर महाराष्ट्र सरकार-बीएफएन फॉर्जिंग्स क्षेत्र: स्टील गुंतवणूक: ५६५ कोटी रोजगार : ८४७ ठिकाण: पालघर/एमएमआर एमएमआरडीए-सुमिटोमो रियालिटी गुंतवणूक: सुमारे ८ बिलियन डॉलर्स रोजगार : ८० हजार. एमएमआरडीए-के. रहेजा गुंतवणूक: सुमारे १० बिलियन डॉलर्स रोजगार : एक लाख. एमएमआरडीए-अल्टा कॅपिटल/पंचशील गुंतवणूक: सुमारे २५ बिलियन डॉलर्स रोजगार : २ लाख ५० हजार. एमएमआरडीए-एसबीजी समूह क्षेत्र: लॉजिस्टिक्स गुंतवणूक: सुमारे २० बिलियन डॉलर्स रोजगार : ४ लाख ५० हजार. एमएमआरडीए-आयआयएसएम ग्लोबल गुंतवणूक: सुमारे ८ बिलियन डॉलर्स रोजगार : ८० हजार. एमएमआरडीए-जायका धोरण आणि स्ट्रॅटेजी पार्टनर एमएमआरडीए-सेम्बकॉर्प डेवलपमेंट लि. सिंगापूर एकीकृत इंडस्ट्रियल पार्कसाठी नॉलेज पार्टनर एमएमआरडीए-टेक्निकल युनिव्हर्सिटी, मुनीच, जर्मनी शाश्वत नागरी वाहतूक प्रणाली महाराष्ट्र सरकार-सुरजागड इस्पात क्षेत्र: स्टील गुंतवणूक: २० हजार कोटी रोजगार: ८ हजार. ठिकाण: गडचिरोली महाराष्ट्र सरकार-लोढा डेव्हलपर्स क्षेत्र: आयटी, डेटा सेंटर्स गुंतवणूक: १ लाख कोटी रोजगार: १ लाख ५० हजार. ज्यांनी महाराष्ट्रात आणखी गुंतवणूक आणि विस्तार करण्याची तयारी दर्शवली असे: कोकाकोला, आयकिया, स्कोडा ऑटो. याशिवाय, कार्लसबर्गचे सीईओ जेकब अँडरसन यांनी महाराष्ट्रातील गुंतवणूकीला पोषक वातावरणाचे कौतुक करताना राज्याच्या उद्योग धोरणाला दाद दिली. कंपनी लवकरच भांडवली बाजारात आयपीओ आणण्यासाठी प्रय़त्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कोका-कोला कंपनीचे सीनिअर व्हाईस प्रेसिडेंट मायकेल गोल्टझमन यांच्या समेवत देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुंतवणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली.

Devendra Fadnavis: दावोसमध्ये पहिल्याच दिवशी 14 लाख 50 हजार कोटी गुंतवणूकींचे 19 सामंजस्य करार Read More »

nana patole

Nana Patole : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या; नाना पटोलेंची मागणी

Nana Patole: राज्यात नुकत्याच झालेल्या 29 महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची टक्केवारी ही केवळ मतदार उदासिन नसून निवडणूक प्रक्रियेवरचा जनतेचा विश्वास कमी होत असल्याचे निर्दशक आहे. देशातील अनेक राज्यांनी जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी तसेच वाद टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग महाराष्ट्रातच EVM चा हट्ट का? व कोणाच्या फायद्यासाठी? असे प्रश्न मतदार विचारात आहेत. या जनभावनेचा आदर करत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात नाना पटोले पुढे म्हणाले की, मतदार यादीतील घोळ, मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदारांना दोन-तीन तास करावी लागणारी वणवण, हजारो मतदारांना मतदान न करताच परत जाण्याची येणारी वेळ, या साऱ्या बाबी निवडणूक आयोगाच्या अकार्यक्षमतेचे गंभीर निदर्शक आहेत, ही परिस्थिती लोकशाहीसाठी घातक आहे. अत्यंत गंभीर बाब म्हणजे पालिका निवडणुकीत VVPAT प्रणालीचा वापर करण्यात आला नाही, त्यामुळे आपल्या मतदानाची खात्री करण्याचा मतदाराचा अधिकारच हिरावून घेण्यात आला, त्यात भर म्हणजे मतदारांच्या बोटाला लावलेली शाई हात धुतल्यानंतर पुसली जात होती. या साऱ्या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेतीला पारदर्शकता, विश्वासार्हता आणि आयोगाची निष्पक्षता यावर गंभीर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका लोकशाहीच्या कणा आहेत, या निवडणुकीबाबत जर संशय, अविश्वास आणि गैरव्यवस्थेचे वातावरण राहिले तर ते लोकशाहीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणारे आहे म्हणून जनभावनेचा विचार करून या निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात, असे नाना पटोले या पत्रात म्हणाले आहेत.

Nana Patole : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या; नाना पटोलेंची मागणी Read More »

shrikant pangarkar

Shrikant Pangarkar : मी निर्दोश, गौरी लंकेश हत्या प्रकरणाशी माझा संबंध नाही ; श्रीकांत पांगारकर

Shrikant Pangarkar : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयित आरोपी श्रीकांत पांगारकर जालना महानगर पालिकेत नगरसेवक पदी निवडून आल्याने राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. जालना महापालिका निवडणुकीत श्रीकांत पांगारकर यांनी प्रभाग क्रमांक 13 मध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याठिकाणी श्रीकांत पांगारकर विजयी झालेत. गौरी लंकेश यांची सप्टेंबर 2017 मध्ये हत्या झाली होती. या प्रकरणात श्रीकांत पांगारकर  संशयित म्हणून अटकेत होते. न्यायालयाने सप्टेंबर 2024 मध्ये श्रीकांत पांगारकरना जामीन मंजूर केला होता.. त्यांनतर दोन दिवसांपूर्वी झालेल्या जालना महानगरपालिका निवडणुकीत पांगारकर यांनी अपक्ष म्हणून उडी घेतली. या निवडणुकीत श्रीकांत पांगारकर विजयी झालेत. दरम्यान गौरी लंकेश हत्या प्रकरणात मी निर्दोश आहे. म्हणून माझा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया पांगारकर यांनी दिलीये. जालना महापालिकेसाठी पहिल्यांदा झालेल्या निवडणुकीत भाजपने 41 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे भाजप महापौरासाठी कुणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Shrikant Pangarkar : मी निर्दोश, गौरी लंकेश हत्या प्रकरणाशी माझा संबंध नाही ; श्रीकांत पांगारकर Read More »

Sujay Vikhe Patil : नगर–मनमाड महामार्गावरील वाहतूक कोंडीवर डॉ. सुजय विखे पाटील थेट रस्त्यावर! 

Sujay Vikhe Patil : नगर–मनमाड महामार्गावरील रखडलेल्या कामामुळे गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. कामाच्या संथ गतीमुळे सकाळ-संध्याकाळ लांबच लांब वाहनांच्या रांगा लागण्याचे चित्र सातत्याने दिसत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्वतः प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. डॉ. विखे पाटील यांनी महामार्गावरील विविध ठिकाणी थांबून वाहतूक कोंडीची कारणे जाणून घेतली. रस्त्याचे अपूर्ण काम, अव्यवस्थित वळणमार्ग, तसेच अपुरा वाहतूक बंदोबस्त यामुळे समस्या अधिक तीव्र होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. नागरिक, वाहनचालक आणि स्थानिक व्यावसायिकांशी संवाद साधत त्यांनी अडचणी थेट ऐकून घेतल्या. यावेळी पोलीस प्रशासन आणि संबंधित अधिकारी उपस्थितीत होते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांनी संबंधित यंत्रणांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. आवश्यक ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ नेमणे, वाहतूक नियंत्रणासाठी तात्पुरते पर्यायी मार्ग निश्चित करणे, तसेच कामाच्या ठिकाणी सूचना फलक आणि प्रकाशव्यवस्था वाढवण्यावर त्यांनी भर दिला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केवळ सूचना देऊन थांबण्याऐवजी जबाबदारी स्वतःवर घेतली. वाहतूक नियंत्रणासाठी ज्या ठिकाणी मनुष्यबळ अपुरे आहे, तेथे होमगार्डची तातडीने नियुक्ती व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. नागरिकांचा त्रास कमी व्हावा, वाहतूक सुरळीत व्हावी आणि दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ नये, यासाठी गरज भासल्यास “होमगार्डचा पगार मी स्वतः देईन” असे ठाम आणि संवेदनशील आश्वासन त्यांनी दिले. सध्याच्या परिस्थितीत केवळ प्रशासनच नव्हे तर नागरिकांनीही संयम ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विशेषतः राहुरी परिसरातील नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, वाहतूक व्यवस्थेचा सन्मान ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. विखे पाटील यांनी तातडीच्या उपायांसोबतच महामार्गाच्या कामाचा वेग वाढवण्याची गरज अधोरेखित केली. काम वेळेत पूर्ण झाल्यासच कायमस्वरूपी दिलासा मिळेल, असे सांगत त्यांनी संबंधित कंत्राटदार आणि यंत्रणांवरही जबाबदारी निश्चित करण्याचे संकेत दिले.

Sujay Vikhe Patil : नगर–मनमाड महामार्गावरील वाहतूक कोंडीवर डॉ. सुजय विखे पाटील थेट रस्त्यावर!  Read More »