DNA मराठी

ऑटोमोबाईल

नगरकरांनो पाणी जपून वापरा, ‘या’ भागात आज होणार नाही पाणीपुरवठा

Ahilyanagar News: अहिल्यानगर शहर पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत झाल्याने शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. 20 मे रोजी अहिल्यानगर शहर पाणी पुरवठा योजनेच्या विळद पंपीग स्टेशन येथील विज पुरवठा दुपारी चार वाजले पासुन सायंकाळी सहा वाजेपर्यंत तीन वेळा खंडीत झाल्याने पाणी वाटप सुरू असलेल्या स्टेशन रोड परिसर व काही उपनगर भागास पाणी पुरवठा करता आलेला नाही. तर दुसरीकडे बूधवार 21 मे रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच मंगलगेट , झेडीगेट ,सर्जेपुरा, रामचंद्र खुंट , दाळमंडई , जुने कलेक्टर ऑफिस परिसर , हातमपूरा, धरतीचौक , बंगाल चौकी , कोठी व तसेच गुलमोहोर रोड, प्रोफेसर कॉलणी परिसर , सिव्हील हडको, प्रेमदान हडको , टी.व्ही . सेंटर परिसर , म्युसिपल हाडको इ . भागाचा पाणी पुरवठा बंद राहाणार आहे. या भागास गुरुवार 22 मे रोजी पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. तर 22 मे रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागाचा म्हणजेच सिद्धार्थ नगर, दिल्लीगेट , नालेगांव, चितळे रोड , आनंदी बाजार , तोफखाना, जुने मनपा कार्यालय परिसर , पंचपीर चावडी , कापड बाजार खिस्त गल्ली , इ . भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार असुन या भागास शुक्रवार 23 मे रोजी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तरी सदय स्थितीत वादळी वाऱ्यासह पाऊस होत असल्याने व त्यामुळे शहर पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांनी असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन अहिल्यानगर महानगर पालिकेने केलेले आहे.

नगरकरांनो पाणी जपून वापरा, ‘या’ भागात आज होणार नाही पाणीपुरवठा Read More »

परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत 159 मोटार वाहन निरीक्षकांच्या ऑन लाईन बदल्या

Pratap Sarnaik : मोटार परिवहन विभागाच्या ऑन लाईन बदल्यामुळे पारदर्शकते बरोबरच जास्तीत जास्त अधिकारी – कर्मचाऱ्यांनी मागणी केलेला पसंतीक्रम मिळत असल्याने बहुतेक अधिकाऱ्यांचे समाधान होते. त्यामुळे भविष्यात परिवहन विभागाच्या ऑन लाईन बदल्यांमध्ये अधिक सुसूत्रता आणावी, तसेच महिला अधिकारी वर्गाच्या अडचणी प्राधान्याने विचारात घ्याव्यात असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले. परिवहन मंत्री सरनाईक यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात परिवहन विभागाकडील १५९ मोटार वाहन निरीक्षकांच्या (IMV) ऑन लाईन बदल्या करण्यात आल्या. व संदर्भात आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीस परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर आदी उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले, ऑनलाइन बदल्या करतांना अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या विशेषतः महिलांच्या समस्या जाऊन घेऊन त्या दूर करण्यास प्राधान्य द्यावे. भविष्यात अधिकाऱ्यांना ३ ऐवजी ५ पसंती क्रम दिल्यास ऑन लाईन बदल्यांमुळे जास्तीत जास्त अधिकाऱ्यांना पसंतीचे ठिकाण मिळण्यास मदत होईल. पुढील वर्षापासून ऑन लाईन बदली प्रक्रिया अधिक चांगल्या पद्धतीने राबवावी. असे ते म्हणाले.तसेच यावेळी गतवर्षी राबविलेल्या ऑन लाईन बदल्या पद्धतीचा देखील आढावा घेण्यात आला.

परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत 159 मोटार वाहन निरीक्षकांच्या ऑन लाईन बदल्या Read More »

… तर कलम 142 लागू केले असते, कार्यक्रमादरम्यान भडकले सरन्यायाधीश बीआर गवई

CJI BR Gavai : भारताचे नवनियुक्त सरन्यायाधीश (सीजेआय) बीआर गवई यांनी त्यांच्या अलीकडील महाराष्ट्र दौऱ्यात राज्य प्रशासनाकडून अपेक्षित आदर न मिळाल्याबद्दल नाराजी जाहीर केली आहे. बीआर गवई रविवारी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात बोलताना ते म्हणाले की, मुख्य न्यायाधीश झाल्यानंतर जेव्हा ते पहिल्यांदा मुंबईत आले तेव्हा मुख्य सचिव, पोलिस महासंचालक (डीजीपी) किंवा मुंबई पोलिस आयुक्तांसारखे राज्य सरकारचे उच्च अधिकारी त्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित नव्हते. सरन्यायाधीश गवई यांनी त्यांच्या निवेदनात लोकशाहीचे तीन स्तंभ, न्यायपालिका, कार्यकारी आणि कायदेमंडळ यांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे यावर भर दिला. ते म्हणाले, “जर महाराष्ट्राचा नागरिक देशाचा सरन्यायाधीश बनला आणि तो पहिल्यांदाच त्याच्या मूळ राज्यात आला, तर प्रोटोकॉलनुसार, राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती अपेक्षित असते. जर त्यांना ते योग्य वाटत नसेल, तर त्यांनी त्याचा विचार करावा.” प्रोटोकॉल ही केवळ औपचारिकता नाही, तर ती आदराचे प्रतीक आहे. सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले की, प्रोटोकॉल ही केवळ औपचारिक प्रक्रिया नाही तर ती संवैधानिक पदांमधील परस्पर आदराचे प्रतीक आहे. ते म्हणाले की, एका संवैधानिक संस्थेने दुसऱ्या संस्थेला दिलेला हा सन्मान लोकशाहीची प्रतिष्ठा राखतो. या मुद्द्यावर भाष्य करताना गवई विनोदाने म्हणाले, “जर माझ्या जागी दुसरे कोणी असते तर त्यांनी कलम 142 वापरण्याचा विचार केला असता.” कलम 142 काय आहे? त्यांच्या निवेदनात, सरन्यायाधीश गवई यांनी भारतीय संविधानाच्या कलम 142 चा उल्लेख केला, जो सर्वोच्च न्यायालयाला न्यायाच्या उद्दिष्टांची खात्री करण्यासाठी आवश्यक असलेला कोणताही आदेश देण्याचा अधिकार देतो. या कलमाअंतर्गत, सर्वोच्च न्यायालयाला कोणत्याही पक्षाला समन्स बजावण्याचा, कारवाई थांबवण्याचा किंवा निर्देश देण्याचा अधिकार आहे. ही तरतूद भारतीय न्यायव्यवस्थेच्या शक्तीचे प्रतिबिंब आहे, जी सरन्यायाधीशांनी प्रतीकात्मकपणे वापरली होती. गवई म्हणाले की ते सहसा अशा बाबींवर बोलत नाहीत, परंतु यावेळी त्यांनी ते नमूद केले जेणेकरून लोकांना कळेल की संवैधानिक पदांचा आदर करणे का महत्त्वाचे आहे. त्यांच्या मते, हा मुद्दा छोटा असू शकतो, पण लोकशाही रचनेच्या स्थिरतेवर त्याचा मोठा परिणाम होतो. गेल्या आठवड्यात भारताचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणारे बीआर गवई हे हे पद भूषवणारे दुसरे दलित आहेत. यापूर्वी, न्यायमूर्ती के.जी. बालकृष्णन यांनी हे पद स्वीकारले आहे.

… तर कलम 142 लागू केले असते, कार्यक्रमादरम्यान भडकले सरन्यायाधीश बीआर गवई Read More »

Solapur Fire: मोठी बातमी! सोलापूरच्या एमआयडीसीत भीषण आग, 8 जणांचा मृत्यू

Solapur Fire: एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, सोलापूर येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या टॉवेल कारखान्यात काल (रविवार, 18 मे) भीषण आग लागली. या आगीच्या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. बचाव कार्यात अग्निशमन दलाचे जवानही जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन अधिकारी राकेश साळुंके म्हणाले की, टॉवेल कारखान्यातील भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना 17 तास लागले.

Solapur Fire: मोठी बातमी! सोलापूरच्या एमआयडीसीत भीषण आग, 8 जणांचा मृत्यू Read More »

मोठी बातमी! डबलडेकर बसला भीषण आग, 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू

Double-decker Bus Fire : गुरुवारी सकाळी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, लखनऊमध्ये गुरुवारी सकाळी एका डबल डेकर बसला भीषण आग लागली, ज्यामध्ये 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मोहनलालगंजजवळील किसान पथावर हा अपघात झाला. ही बस दिल्लीहून बिहारला जात होती आणि त्यात 60 हून अधिक प्रवासी होते. अपघाताच्या वेळी बहुतेक प्रवासी झोपेत होते. अचानक बस धुराने भरली तेव्हा सर्वांना जाग आली. आग लागल्यानंतर चालक आणि कंडक्टर बसमधून उड्या मारून पळून गेले. आपत्कालीन गेट उघडला नाही त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आले नाही म्हणून अनेक प्रवासी बसमध्ये अडकले. आगीची परिस्थिती आणि बचाव कार्य बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी आजूबाजूचे लोक मदतीला आले. मात्र आग इतकी भीषण होती की, आगीच्या ज्वाळा 1 किलोमीटर अंतरापर्यंत दिसत होत्या. अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांनी तासन्तास अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आणि तपास सुरू केला. आगीचे कारण एका प्रवाशाने सांगितले की, गिअरजवळील ठिणगीमुळे आग लागली. आगीमुळे बस अवघ्या 10 मिनिटांत पूर्णपणे जळून खाक झाली. दुसऱ्या प्रवाशाने सांगितले की, आग लागल्यानंतर बसमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि त्याने त्याच्या पत्नीला उठवले आणि दोघेही बसमधून बाहेर पडले.

मोठी बातमी! डबलडेकर बसला भीषण आग, 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू Read More »

“ऑनलाइन गेमचं विष पेरलंय – उद्याच्या दंगलींसाठी जमीन तयार!”

DNA मराठी विश्लेषण टीम: आपल्या देशातील तरुणांच्या हातात काम नाही. शिक्षण पूर्ण करूनही रोजगार नाही, उद्योग धंद्यांचे दरवाजे बंद आणि नवनवीन संधी निर्माण व्हायच्या ऐवजी हरवत चाललेल्या. अशा स्थितीत, तरुणांच्या हातात येतो तो स्मार्टफोन आणि ऑनलाइन गेमचा नसा. या गेम्सना केंद्र सरकारने अधिकृत परवानग्या दिल्या आहेत. कुणी म्हणेल, उद्योग चालावा म्हणून. कुणी म्हणेल, कर महसूल वाढावा म्हणून. पण खरी भीती ही आहे की यामागे आहे एक सूक्ष्म पण ठोस रणनीती – तरुणांना विचार करण्याच्या क्षमतेपासून दूर ठेवण्याची. गेम्स खेळल्याने काही केवळ ‘मनोरंजन’ होतंय का? नव्हे. मुले आता क्षुल्लक कारणांवरही रागावतात. चिडचिड करतात. संयम हरवतोय. संवाद हरवत चाललाय. निर्णय क्षमताही कमी झाली आहे. आपल्या आजूबाजूला वावरताना ते स्पष्ट जाणवतं. पूर्वीची खेळांची मैदानं ओस पडलीत, आणि डिजिटल रणांगणं गजबजलीयत. हा सर्व प्रकार कुठे तरी जाणीवपूर्वक घडतोय, अशी शंका का यावी? कारण समाजात शांत, विचारशील आणि सुज्ञ नागरिकांपेक्षा – संतापलेल्या, उत्तेजित, नेतृत्वाच्या नावावर उफाळून येणाऱ्या जमावाची गरज काही राजकीय शक्तींना अधिक असते. समाजात जेव्हा विचारसरणी कमकुवत होते, तर नेतृत्वासाठी विचार न करता झेंडा उचलणारे हात सहज तयार होतात आणि मग वेळ पडली की हेच तरुण, रस्त्यावर उतरवले जातात. कुणाच्या तरी घोषणांनी भारलेले, कुठल्या तरी मुद्द्यावर एकमुखाने ओरडणारे, पण प्रत्यक्षात त्या मुद्द्याच्या मुळाशी काय आहे हे न समजलेले. तरुण पिढीला रोजगाराच्या संधी न देता, त्यांच्या रचनात्मक ऊर्जेचा योग्य वापर न करता, त्यांना डिजिटल व्यसनात अडकवणं – हे आधुनिक काळातील ‘soft control’ आहे. हे केवळ सरकार किंवा व्यवस्थेच्या चुकीचं नव्हे, तर आपल्यालाही आरसा दाखवणारं वास्तव आहे. पालकांनी, शिक्षकांनी आणि समाजाने एकत्र येऊन, या धोरणांच्या पार्श्वभूमीचा विचार करणे आवश्यक आहे. कारण देशाचा खरा भविष्यकाळ ही त्याची विचार करणारी तरुण पिढी असते – आणि ती जर भावनिक, रागीट आणि विचारशून्य झाली, तर आपल्याला काळजी घ्यायलाच हवी.

“ऑनलाइन गेमचं विष पेरलंय – उद्याच्या दंगलींसाठी जमीन तयार!” Read More »

आनंदाची बातमी, एसटीत लवकरच नोकरभरती, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा

Pratap Sarnaik : एसटीत विभागात लवकरच मोठ्या प्रमाणात नोकरभरती होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. एसटीला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण 25 हजार स्वमालकीच्या बसेस घेत आहोत. या बसेसच्या चालविण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज लागणार असून चालक तथा वाहक पदा बरोबरच अन्य काही वर्गातील पदे देखील येत्या काही वर्षात एसटी महामंडळात भरती केली जाणार आहेत. त्याबाबतच्या ठरावाला नुकतीच संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की, एसटी महामंडळाची तत्कालीन आर्थिक परिस्थिती लक्षात घेता माननीय उच्च न्यायालयाने एसटी महामंडळातील नोकर भरतीला सन. 2024 पर्यंत मनाई केली होती. तथापि, येत्या काही वर्षांमध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचारी यांची लक्षणिय संख्या लक्षात घेता, नव्या बसेस चालवण्यासाठी चालक तथा वाहक या पदासह अन्य कर्मचारी व अधिकाऱ्यांची भरती करणे अत्यंत आवश्यक असून याबाबतच्या ठरावाला एस टी महामंडळाच्या 307 व्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. तसेच सदर प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात वाढत्या चालनीय बस संख्येनुसार कर्मचाऱ्यांच्या नवीन आकृतीबंधाला मंजुरी घेण्यात येईल त्यानुसार पुढील भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अभियंत्यांची रिक्त पदे भरणार सध्या एसटी महामंडळाच्या अनेक विभागांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. अनेक ठिकाणी चांगले शिक्षण अधिकारी आवश्यक असून विशेषतः भविष्यात पीपीपी तत्त्वावर विकसित होणाऱ्या एसटीच्या जागे बाबतीत बांधकाम विभागाकडे कुशल अभियंत्यांची गरज भासणार आहे. त्यामुळे सध्या रिक्त असलेल्या अभियंत्यांच्या जागा करार पद्धतीने आणि सरळ सेवा भरतीच्या माध्यमांतून भरण्यात येणार आहेत. नव्या नोकर भरतीच्या अनुषंगाने एसटीच्या प्रत्येक खात्यांनी आपल्या विभागातील रिक्त पदांचा फेर आढावा घेऊन आवश्यक असणाऱ्या पदांची भरती करणे संदर्भात एकत्रित मागणी सादर करावी, असे निर्देश संबंधित देण्यात आल्याची माहिती यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

आनंदाची बातमी, एसटीत लवकरच नोकरभरती, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा Read More »

जीएसटी विभागात घोळ, गोपनीय माहितीची गळती होतेय; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

Ambadas Danve : विधानपरिषद विरोध पक्षनेते अंबादास दानवे यांनी जीएसटी विभागात घोळ होत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी जीएसटी नोंदणी संबंधित गोपनीय माहितीच्या गळतीच्या प्रकरणाची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. जीएसटीसाठी अर्ज केलेल्या अनेक व्यावसायिकांना नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यावर विविध बँकांकडून सदर कंपनीच्या नावाने खाते उघडण्यासाठी फोन येण्यास सुरूवात झालेली आहे. जीएसटी विभागाकडे असलेली करदात्याची गोपनीय माहिती काही अधिकारी व कर्मचारी तृतीय पक्षांना देत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. वस्तू व सेवा कर अधिनियम व संबंधित नियमांनुसार करदात्याची माहिती अत्यंत गोपनीय असून उक्त माहिती कोणत्याही परिस्थितीत बाह्य घटकांसोबत सामायिक करणे, ही बाब कायद्याची उल्लंघन करणारी आहे. या प्रकरणामध्ये करदात्याची माहिती तृतीय पक्षांपर्यंत पोहोचल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. त्यामुळे या प्रकरणात विभागातील काही कर्मचाऱ्यांकडून माहितीची बेकायदेशीर विक्री किंवा गळती होत असल्याचा संशयही दानवे यांनी व्यक्त केला आहे. तसेच ग्राहकांची संवेदनशील माहिती ही व्यवसायिक स्पर्धकांपर्यंत पोहोचवली जात असल्याने निष्पक्ष व्यावसायिक स्पर्धेवरही विपरीत परिणाम होत असल्याचे दानवे यांनी म्हटले. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून त्यामुळे शासन व कर प्रशासन यांच्याबाबत करदात्यांमध्ये अविश्वासाची भावना निर्माण झाली असल्याची बाब माझ्या निदर्शनास आली असल्याचे दानवे यांनी म्हटले. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणीही अंबादास दानवे यांनी वित्तमंत्री यांच्याकडे केली आहे.

जीएसटी विभागात घोळ, गोपनीय माहितीची गळती होतेय; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप Read More »

भारताने दिला पाकिस्तानला धक्का, 40 सैनिक मारले तर 100 हून अधिक दहशतवादी ठार

DGMO Rajiv Ghaiv : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावा वाढत असून दोन्ही देशांकडून हवाई हल्ले करण्यात येत आहे. 7 ते 10 मे दरम्यान पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तरात भारताने पाकिस्तान सैन्याचे 35 – 40 सैनिक मारले असून तसेच 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले असल्याची माहिती लष्कराचे महासंचालक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, म्हणाले की या काळात भारताने 5 शूर सैनिकही गमावले, परंतु या मोहिमेचे यश धोरणात्मक दृष्टिकोनातून ऐतिहासिक आहे. पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला डीजीएमओ म्हणाले की, पाकिस्तानकडून काही एअरफील्ड आणि गोदामांवर वारंवार हवाई हल्ले होत होते, जे भारतीय सैन्याने पूर्णपणे हाणून पाडले. 7 ते 10 मे दरम्यान, नियंत्रण रेषेवर तोफखाना आणि लहान शस्त्रांच्या गोळीबारात 35 ते 40 पाकिस्तानी सैनिक मारले गेले. ऑपरेशन सिंदूर दहशतवाद्यांचा अंत ठरला लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर 7 आणि 8 मार्चच्या मध्यरात्री सुरू करण्यात आले. या अचूक आणि गुप्त कारवाईत, 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले, ज्यात अनेक उच्च दर्जाच्या लक्ष्यांचा समावेश होता. डीजीएमओ म्हणाले की, आम्ही युसूफ अझहर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदस्सीर अहमद सारख्या दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे जे आयसी-814 अपहरण आणि पुलवामा बॉम्बस्फोट यासारख्या हल्ल्यांमध्ये सहभागी होते.

भारताने दिला पाकिस्तानला धक्का, 40 सैनिक मारले तर 100 हून अधिक दहशतवादी ठार Read More »

शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवारांची सांत्वनपर भेट

India Pakistan War: नांदेड मधील देगलूर तालुक्यातील तमलूर गावाचे सुपुत्र, भारतीय लष्करातील शहीद जवान सचिन यादवराव वनंजे यांच्या कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देगलूर येथील त्यांच्या राहत्या घरी सांत्वनपर भेट घेतली. शहीद सचिन यांच्या कुटुंबीयांना शासनाच्यावतीने सर्वोतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली. आमदार प्रतापराव चिखलीकर, आमदार विक्रम काळे, आमदार जितेश अंतापूरकर, उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, तहसीलदार भरत सूर्यवंशी, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीलिमा कांबळे आदिंची यावेळी उपस्थिती होती. भारतीय लष्करातील जवान सचिन यांचा मृत्यू ही अतिशय दुःखद घटना आहे. सचिन यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या घरकुल योजनेतून घर दिले जाईल. त्यांच्या पत्नी वा भावाला नोकरी दिली जाईल. त्यांच्या मुलीच्या शिक्षण व उज्वल भविष्यासाठी शासनाच्यावतीने तरतूद करण्यात येईल. त्यांच्या पेन्शनची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी स्वतः तहसीलदारांनी लक्ष द्यावे, अशी यावेळी सूचना करून अजित पवार यांनी करतानाच शहीद सचिन वनंजे यांना शहिदाचा दर्जा मिळावा यासाठी देखील शासन प्रयत्न करेल, असे स्पष्ट केले.

शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवारांची सांत्वनपर भेट Read More »