DNA मराठी

ऑटोमोबाईल

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये वाहनांवरील ‘ब्लॅक फिल्म’ विरोधात धडक मोहीम ; 458 वाहनांवर दंडात्मक कारवाई

Ahilyanagar News : प्रादेशिक परिवहन विभागाने पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने वाहनांच्या विंडस्क्रीन व खिडक्यांच्या काचांवर बेकायदेशीरपणे लावण्यात येणाऱ्या ‘ब्लॅक फिल्म’ विरोधात जिल्ह्यात विशेष संयुक्त तपासणी मोहीम राबवली. २८ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण २ हजार २१ वाहनांची तपासणी करण्यात आली. यात दोषी आढळलेल्या ४५८ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, एकूण ६ लाख ४६ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला असल्याची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांनी दिली. या मोहिमेत अहिल्यानगर प्रादेशिक परिवहन कार्यालय व श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत कार्यरत सर्व वायुवेग पथके, तसेच जिल्ह्यातील १४ तालुका पथकांमधील मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षकांनी सहभाग घेतला. या पथकांनी एकूण २०२१ वाहनांची कसून तपासणी केली. तपासणीदरम्यान ज्या ४५८ वाहनांवर बेकायदेशीर ब्लॅक फिल्म आढळल्या, त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. आकारण्यात आलेल्या ६ लाख ४६ हजार रुपये दंडापैकी ३७ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तसेच संबंधित वाहनांवरील ब्लॅक फिल्म्स काढून टाकण्यात आल्या आहेत. या विशेष मोहिमेत ब्लॅक फिल्म व्यतिरिक्त इतर बाबींचीही पडताळणी करण्यात आली. यात वैध विमा नसलेली वाहने, नोंदणी प्रमाणपत्र किंवा वाहन परवाना नसणे, वाहन चालवण्याचा परवाना नसणे, वाहनांतील दिव्यांमधील त्रुटी व वायू प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. “जिल्ह्यातील वाहन मालक व चालकांनी मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार वाहनांची समोरील (दर्शनी) काच व खिडक्यांच्या काचांवर ब्लॅक फिल्म बसवू नये. कायद्यातील अटी व शर्तींचे तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सहकार्य करावे,” असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी केले आहे.

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये वाहनांवरील ‘ब्लॅक फिल्म’ विरोधात धडक मोहीम ; 458 वाहनांवर दंडात्मक कारवाई Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke: नाशिक–अहिल्यानगर–सोलापूर महामार्गास मंजुरी; निलेश लंकेंच्या प्रयत्नांना यश

Nilesh Lanke: केंद्रीय मंत्रिमंडळाने नाशिक–अहिल्यानगर–सोलापूर–अक्कलकोट या ६ पदरी, प्रवेश-नियंत्रित (ॲक्सेस कंट्रोल्ड) ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्पास मंजुरी दिली असून, हा निर्णय अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्याचा समावेश राष्ट्रीय दर्जाच्या द्रुतगती महामार्ग जाळ्यात होणार असून, दळणवळणाच्या दृष्टीने अहिल्यानगरला नवे महत्त्व प्राप्त होणार असल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली. या महामार्गाची एकूण लांबी सुमारे ३७४ किलोमीटर असून, सुमारे १९ हजार १४२ कोटींची गुंतवणूक या प्रकल्पासाठी करण्यात येणार आहे. ‘पीएम गतीशक्ती’ राष्ट्रीय मास्टर प्लॅनअंतर्गत विकसित होणारा हा महामार्ग पश्चिम किनारपट्टीपासून दक्षिण भारतापर्यंतचा एक महत्त्वाचा दळणवळण दुवा ठरणार आहे. परिणामी राज्यातील आणि देशातील प्रमुख आर्थिक केंद्रांशी अहिल्यानगरचा संपर्क अधिक वेगवान व सुलभ होणार आहे. महामार्गामुळे प्रवासाच्या वेळेत सुमारे ४५ टक्के घट होण्याची शक्यता असून, त्याचा थेट लाभ व्यापार, शेती आणि उद्योग क्षेत्राला मिळणार आहे. शेतमाल, दुग्धव्यवसाय तसेच कृषीपूरक उद्योगांच्या वाहतुकीवरील खर्चात लक्षणीय बचत होणार असून, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) लॉजिस्टिक्स अधिक सक्षम होणार आहे. यासोबतच औद्योगिक, गोदाम, प्रक्रिया उद्योग आणि सेवा क्षेत्रात नव्या गुंतवणुकीस चालना मिळणार असल्याचे अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील युवकांसाठी थेट व अप्रत्यक्ष स्वरूपात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. सुधारित दळणवळण व्यवस्था आणि वाढणारी औद्योगिक गुंतवणूक यामुळे जिल्ह्याचा आर्थिक पाया अधिक भक्कम होणार असून, अहिल्यानगर केवळ भौगोलिकदृष्ट्या नव्हे तर आर्थिक व औद्योगिकदृष्ट्याही केंद्रस्थानी येणार आहे. या निर्णयाचे स्वागत करताना खासदार निलेश लंके यांनी सांगितले की, अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा महामार्ग अत्यंत निर्णायक ठरणार आहे. दळणवळण, व्यापार, शेती, उद्योग आणि रोजगार या सर्वच क्षेत्रांना या प्रकल्पामुळे नवी दिशा मिळेल. केंद्र सरकारने अहिल्यानगरच्या विकास क्षमतेवर दाखवलेला विश्वास महत्त्वाचा असून, या महामार्गाचा जिल्ह्याला जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी केंद्र व राज्य पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. नाशिक–अहिल्यानगर–सोलापूर ६ पदरी महामार्ग हा अहिल्यानगरच्या भविष्यकालीन विकासाचा कणा ठरणार असून, जिल्ह्याला विकासाच्या नव्या युगात नेणारा हा ऐतिहासिक निर्णय असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Nilesh Lanke: नाशिक–अहिल्यानगर–सोलापूर महामार्गास मंजुरी; निलेश लंकेंच्या प्रयत्नांना यश Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke : खड्ड्यांत अडकलेला महामार्ग ; आरोपांत अडकलेली जबाबदारी

Nilesh Lanke: नगर–मनमाड महामार्ग हा केवळ वाहतुकीचा रस्ता नाही तो अहिल्यानगर जिल्ह्याच्या आर्थिक, सामाजिक आणि प्रशासकीय हालचालींचा मुख्य मेरुदंड आहे. मात्र गेल्या आठ–नऊ वर्षांपासून हा महामार्ग ‘काम सुरू आहे’ या एका वाक्यात अडकलेला आहे. खड्डे, धूळ, अपघात आणि मृत्यू हेच या रस्त्याचं वास्तव बनलं आहे. या महामार्गावरून प्रवास करणं म्हणजे दररोज जीव धोक्यात घालण्यासारखं झालं आहे. अनेकांनी प्राण गमावले, कित्येक संसार उद्ध्वस्त झाले. तरीही जबाबदार यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींच्या संवेदना जाग्या होत नाहीत, हे दुर्दैव. आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट खंडणीखोरीचे आरोप करत या रखडपट्टीचं मूळ कारण समोर आणलं आहे. ठेकेदारांकडून लोकप्रतिनिधी पैसे मागतात, त्यामुळे पाच–सहा ठेकेदारांनी काम अर्धवट सोडल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार गेल्यानंतर एका लोकप्रतिनिधीला दम दिल्याचंही उघड झालं. मात्र एवढं सगळं सांगूनही ‘तो लोकप्रतिनिधी कोण?’ हा प्रश्न अनुत्तरितच ठेवण्यात आला. याच मुद्द्यावर खासदार निलेश लंके यांनी संतप्त प्रतिक्रिया देत, “साईबाबांच्या चरणी हात ठेवून सांगा पैसे कुणी मागितले?” असं आव्हान दिलं. मागील सात–आठ वर्षांत काम अर्धवट सोडणारे ठेकेदार का गेले, कुणी वैतागून दिलं, कुणी काय मागितलं, हे समाजासमोर यावं, अशी त्यांची मागणी आहे. या आरोप–प्रत्यारोपांत मात्र सर्वाधिक दुर्लक्षित घटक आहे सामान्य नागरिक. रोज या रस्त्यावरून जाणारा शेतकरी, विद्यार्थी, रुग्णवाहिका, कामगार… यांच्यासाठी हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. राजकीय लढाया सुरू असताना रस्त्यावर पडलेला प्रत्येक खड्डा एखाद्या अपघाताची नांदी ठरत आहे. नगर–मनमाड महामार्गाचा प्रश्न आता फक्त बांधकामाचा राहिलेला नाही तो राजकीय इच्छाशक्तीचा आणि प्रशासकीय अपयशाचा आरसा बनला आहे. आरोप करणाऱ्यांनी नावे जाहीर करावीत, चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी. अन्यथा हा महामार्ग पूर्ण होण्याआधी आणखी किती जीव जाणार, हा प्रश्न कायम राहील.

Nilesh Lanke : खड्ड्यांत अडकलेला महामार्ग ; आरोपांत अडकलेली जबाबदारी Read More »

shirdi news

Shirdi News :  शिर्डीत भाविकांची अडवणूक करणाऱ्या एजंटांवर मोठी कारवाई

Shirdi News : साईबाबा समाधी मंदिर परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची पिळवणूक थांबवण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. भाविकांची वाहने अडवून त्यांना विशिष्ट दुकानातूनच पूजासाहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या व खासगी पार्किंगचा आग्रह धरणाऱ्या एजंटांवर आता भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 152 अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचे सशर्त आदेश शिर्डी विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी माणिक आहेर यांनी निर्गमित केले आहेत. शिर्डीत दररोज देश-विदेशातून लाखो साईभक्त दर्शनासाठी येतात. मात्र, मंदिर परिसर व शिर्डी शहरात अनेक ठिकाणी खासगी व्यक्तींकडून सार्वजनिक रस्त्यावर भाविकांची वाहने बेकायदेशीरपणे अडवली जातात. भाविकांना खासगी पार्किंगच्या ठिकाणी वाहने घेण्याचा आग्रह धरला जातो. तसेच विशिष्ट दुकानांतून अव्वाच्या सव्वा दरात पूजासाहित्य खरेदी करण्यास भाग पाडले जाते. यातून भाविकांची मोठी आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अनेकदा भाविकांना दमदाटी, शिवीगाळ व धक्काबुक्की करण्याचे प्रकारही घडले आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने हे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार शिर्डी गावाच्या बाहेरील किंवा गावातील सार्वजनिक रस्ते, चौक, बसथांबे व प्रवेश मार्गावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाहने थांबवून त्यांची दिशाभूल करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच कोणत्याही गावातून शिर्डी येथे येणाऱ्या प्रवाशांच्या वाहनांनी विशिष्ट दुकान अथवा आस्थापनेतूनच खरेदी करावी किंवा निवास करावा, असा आग्रह आता धरता येणार नाही. कोणत्याही व्यक्तीने स्वतःला देवस्थान ट्रस्ट किंवा प्रशासनाचा अधिकृत प्रतिनिधी असल्याचे भासवू नये, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. भोजन, निवास किंवा दर्शनाच्या नावाखाली मध्यस्थीचे व्यवहार करणाऱ्यांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 223 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या आदेशाने प्रभावित झालेल्या कोणत्याही व्यक्तीला दिनांक 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपली बाजू मांडता येईल, असे प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.

Shirdi News :  शिर्डीत भाविकांची अडवणूक करणाऱ्या एजंटांवर मोठी कारवाई Read More »

silver rate

Silver Rate Today : गुंतवणूकदारांना मोठा धक्का; चांदीचा भाव 85 हजार रुपयांनी घसरला, जाणून घ्या आजचा भाव

Silver Rate Today : गुरुवारी, सोने आणि चांदीच्या किमतीत झालेल्या ऐतिहासिक वाढीमुळे सामान्य लोकांमध्ये धाकधूक वाढली होती.  परंतु एकाच दिवसात संपूर्ण परिस्थिती बदलली आहे. गुरुवारी, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीने प्रति किलोग्रॅम ₹4,20,048 या नवीन उच्चांकावर पोहोचला. विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर अवघ्या एका दिवसात, नफा-बुकिंगने सराफा बाजाराला हादरवून टाकले. मार्चमध्ये संपणारे चांदीचे वायदे जवळजवळ 17 टक्क्यांनी घसरून प्रति किलोग्रॅम 3,32,002 वर आले. ही घसरण केवळ 24 तासांत अंदाजे 21 टक्के (प्रति किलोग्रॅम ₹88,046) घसरण दर्शवते. सोन्याचा भाव MCX वर एप्रिलमध्ये संपणारे सोन्याचे वायदे जवळजवळ 9 टक्क्यांनी घसरून प्रति 10 ग्रॅम ₹1,67,406 या नीचांकी पातळीवर पोहोचले. फक्त एक दिवस आधी, सोन्याचे वायदे प्रति 10 ग्रॅम ₹1,93,096 या नवीन उच्चांकावर पोहोचले होते. याचा अर्थ असा की सोन्याच्या वायदा किमती फक्त 24 तासांत 13 टक्क्यांनी (₹26,960 प्रति 10 ग्रॅम) घसरल्या. दिल्ली सराफा बाजाराची परिस्थिती शुक्रवारी, दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किमती प्रति 10 ग्रॅम 14,000 रुपयांनी आणि चांदीच्या किमती प्रति किलोग्रॅम 20,000 रुपयांनी घसरल्या. अहवालांनुसार, 99.9 टक्के शुद्धता असलेले सोने प्रति 10 ग्रॅम 14,000 रुपयांनी किंवा 7.65 टक्क्यांनी घसरून 169,000 रुपयांनी (सर्व करांसह) झाले. गुरुवारी, सोन्याच्या किमती 12,000 रुपयांनी वाढून 183,000 रुपयांनी प्रति 10 ग्रॅम या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचल्या. चांदीच्या किमती 20,000 रुपयांनी किंवा जवळजवळ पाच टक्क्यांनी घसरून 384,500 रुपयांनी प्रति किलोग्रॅमवर पोहोचल्या (सर्व करांसह). मागील व्यापार सत्रात चांदीच्या किमती 19,500 रुपयांनी वाढून 4,04,500 रुपयांनी प्रति किलोग्रॅमवर पोहोचल्या. तज्ञ काय म्हणतात एचडीएफसी सिक्युरिटीजमधील वरिष्ठ विश्लेषक – कमोडिटीज सौमिल गांधी म्हणाले की, शुक्रवारी सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली कारण अलिकडच्या विक्रमी तेजीनंतर गुंतवणूकदारांनी वेगाने नफा बुक करण्यास सुरुवात केली. ही घसरण प्रामुख्याने मोठ्या संस्थात्मक व्यापाऱ्यांनी दीर्घ मुदतीच्या पोझिशन्सची जोरदार विक्री केल्यामुळे झाली, ज्यांनी अनेक सत्रांमध्ये जोरदार वाढ झाल्यानंतर नफा बुक करण्याचा प्रयत्न केला.

Silver Rate Today : गुंतवणूकदारांना मोठा धक्का; चांदीचा भाव 85 हजार रुपयांनी घसरला, जाणून घ्या आजचा भाव Read More »

pratap sarnaik

Pratap Sarnaik : एसटी चालकांच्या मद्यपानाविरुद्ध होणार कारवाई ; मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा

Pratap Sarnaik : महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी चार दिवसापूर्वी अचानकपणे परळ बसस्थानकाला भेट दिली. त्यावेळी चालक -वाहक विश्रांतीगृहांमध्ये अनेक ठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या. तसेच काही कर्मचारी मद्यपान केल्याचे देखील आढळून आले. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व आगारात कर्तव्यावर जाण्यापूर्वी चालकांची ब्रेथ आणलायझर चाचणी अनिवार्य करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले. त्यानुसार कर्तव्यावर असताना मद्यपान करणाऱ्या एसटी चालकांविरुद्ध कठोर आणि तातडीची कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाकडून देण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत ही मोहीम अधिक काटेकोरपणे राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यंत्र अभियंता (चालन) विभागामार्फत सर्व विभाग नियंत्रक, विभागीय कार्यशाळा तसेच संबंधित अधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांनुसार, कर्तव्यावर जाण्यापूर्वी चालकाने मद्यपान केले नसल्याची खात्री करणे आता अधिक सक्तीचे करण्यात आले आहे. तपासणी अधिक कडक १)कर्तव्यावर जाणाऱ्या चालकांनी मद्यपान केले नसल्याची खात्री करूनच त्यांना ड्युटीवर पाठविण्यात यावे. २)ज्या चालकाला विशिष्ट वाहनावर कर्तव्य देण्यात येणार आहे, त्या वाहनासोबतच त्याची अल्कोहोल तपासणी (ब्रिथ अ‍ॅनालायझर चाचणी) करण्यात यावी. ३)वाहन परीक्षकांनी चालकाची तपासणी न करता वाहन बाहेर जाऊ देऊ नये. ४)मद्यपान केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित चालकाला तत्काळ कर्तव्यातून दूर ठेवून त्याची माहिती आगार व्यवस्थापकांना द्यावी. आगार व्यवस्थापकांवर जबाबदारी आगार व्यवस्थापकांनी अशा प्रकरणांची स्वतः खात्री करून संबंधित चालकांविरुद्ध नियमानुसार तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यासोबतच, मुख्यालयाकडून अचानक तपासण्या (सरप्राइज चेक) घेण्यात येणार असल्याने सर्व आगारांनी या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रवासी सुरक्षेला प्राधान्य एसटी ही राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी मानली जाते. त्यामुळे चालकांची शारीरिक व मानसिक स्थिती उत्तम असणे अत्यावश्यक आहे. मद्यपान करून वाहन चालविणे ही गंभीर बाब मानून महामंडळाने शून्य सहनशीलता (Zero Tolerance) धोरण अवलंबले असल्याचे या परिपत्रकातून स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे प्रवाशांच्या सुरक्षेत अधिक वाढ होणार असून एसटी सेवेत शिस्त आणि जबाबदारी अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली जात आहे.

Pratap Sarnaik : एसटी चालकांच्या मद्यपानाविरुद्ध होणार कारवाई ; मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा Read More »

maharashtra government

Maharashtra Cabinet Decisions: शत्रू संपत्तीच्या विक्री-खरेदीसाठी मुद्रांक शुल्क होणार माफ, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Cabinet Decisions: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता केंद्र सरकार किंवा राज्य शासनाच्या ताब्यातील शत्रू संपत्तीच्या विक्री-खरेदीसाठी मुद्रांक शुल्क माफ करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अनेकांना मोठा फायदा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त) औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये ‘पीएम सेतू’ योजना राबविण्यात येणार. होतकरू युवकांना दिलासा. पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये अंमलबजावणी. पुढच्या टप्प्यात राज्यातील अन्य संस्थांचा समावेश होणार.पीएम सेतू Pradhan Mantri Skilling And Employability Transformation through Upgraded ITIs) मुळे उमेदवारांना रोजगार संधी मिळवणे सोपे होणार. (कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता) कंत्राटदारांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी ट्रेड्स प्लॅटफॉर्म (TReDS Platform) . सार्वजनिक बांधकाम विभागाशी निगडित सूक्ष्म, लघू व मध्यम कंत्राटदार- उद्योजकांसाठी सुविधा. (सार्वजनिक बांधकाम) धुळे येथील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीचे पुनरूज्जीवन होणार. राष्ट्रीय सहकारी विकास निगम, नवी दिल्ली यांच्याकडे शिफारस. (वस्त्रोद्योग) वेगवेगळ्या कारणांसाठी देण्यात येणाऱ्या शासकीय जमीनीच्या भाडे पट्टे कालावधी वाढवून देण्यात येणार. विशेषतः ३० वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ आणि तसेच, महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट करणे) नियम, १९७१ मधील तरतुदी अन्वये शासकीय जमिनींचा कालावधी वाढवून देण्यात येणार. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क) केंद्र सरकार किंवा राज्य शासनाच्या ताब्यातील शत्रू संपत्तीच्या विक्री-खरेदीसाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क)

Maharashtra Cabinet Decisions: शत्रू संपत्तीच्या विक्री-खरेदीसाठी मुद्रांक शुल्क होणार माफ, राज्य सरकारचा मोठा निर्णय Read More »

infosys

Infosys देणार तब्बल 20 हजार नोकऱ्या; एआयमुळे होणार फायदा

Infosys Vacancy in 2027 : आयटी क्षेत्रात आज मोठ्या प्रमाणात एआयचा वापर वाढत असल्याने अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात येणार असल्याचा गैरसमज सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत असल्याने एआयला विरोध वाढतोय. तसेच वाढत्या एआय सेवांमुळे आयटी क्षेत्रात बेरोजगारी निर्माण होणार असल्याचा दावा देखील करण्यात येतोय मात्र दुसरीकडे आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसने 2027 या आर्थिक वर्षात तब्बल 20  हजार महाविद्यालयीन पदवीधरांची भरती करणार असल्याची मोठी घोषणा केलीय. कंपनीचे सीईओ सलिल पारेख यांनी दावोस येथील जागतिक आर्थिक मंचच्या वार्षिक बैठकीत याबाबत घोषणा केलीय. आयटी क्षेत्रात एआय वाढीच्या संधी दिसत असल्याने कंपनीने हा निर्णय घेतला असं यावेळी सलिल पारेख म्हणाले. सलिल पारेख यांच्या या घोषणेमुळे जगात पुन्हा एकदा एआय आयटी किंवा इतर क्षेत्रात फायदेशीर ठरणार का? याबाबत आता अनेक तर्कवितर्क लावण्यात येत असून एआयच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतंय.  आयटी क्षेत्रात सध्या जागतिक कंपन्यांकडून नोकरी कपातचा दबाव असताना, इन्फोसिसने मोठा निर्णय घेत एका मोठ्या भरतीची घोषणा केलीयं. ग्राहक त्यांचे बजेट AI आणि ऑटोमेशनकडे वळवत असल्याने मागणीचे स्वरूप बदलत असून आम्हाला काही ठिकाणी घट आणि काही ठिकाणी वाढ दिसत आहे. आम्हाला घट दिसण्यापेक्षा वाढ थोडी जास्त दिसत आहे असं म्हणत त्यांनी 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत इन्फोसिस आणखी 20 हजार महाविद्यालयीन पदवीधरांची भरती करणार असून आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तीन तिमाहींत, इन्फोसिसने 18 हजार महाविद्यालयीन पदवीधरांची भरती केली असं त्यांनी सांगितलं. तर केवळ तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या कर्मचारी संख्येत 5 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची वाढ झाली असल्याची देखील माहिती त्यांनी जागतिक आर्थिक मंचच्या वार्षिक बैठकीत दिलीये.  तसेच एआय एजंट्स, फाउंडेशन मॉडेल्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट,कस्टमर सपोर्ट आणि जुन्या ॲप्लिकेशन्सचं आधुनिकीकरण या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन काम तयार होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. महत्त्वाचं म्हणजे, इन्फोसिसने फ्रेशर्ससाठी सुरुवातीचं वेतनही वाढवलं आहे. एआय आणि डिजिटल कौशल्य असलेल्या तरुणांसाठी वार्षिक 21 लाख रुपयांपर्यंतचं पॅकेज देण्यात येत आहे. म्हणूनच, आयटी क्षेत्रात करिअर घडवू पाहणाऱ्या तरुणांसाठी इन्फोसिसची ही घोषणा मोठी संधी ठरणार आहे. इन्फोसिसने घेतलेल्या निर्णयामुळे आयटी क्षेत्राला नवी दिशा मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Infosys देणार तब्बल 20 हजार नोकऱ्या; एआयमुळे होणार फायदा Read More »

stock market

Stock Market Crash : शेअर बाजार पुन्हा कोसळला, 3 दिवसांत 15 लाख कोटी रुपयांचे नुकसान; जाणून घ्या सर्वकाही

Stock Market Crash : पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजार कोसळल्याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सततच्या टॅरिफ हल्ल्यांमुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये घबराट पसरली आहे. आठवड्याच्या तिसऱ्या व्यापारी दिवशी सुरुवात होताच आशियाई बाजार कोसळले, ज्यामुळे भारतीय शेअर बाजारासाठी नकारात्मक संकेत मिळाले. बुधवारी सेन्सेक्स-निफ्टी मंदावले असले तरी, ही मंदी एका तासातच लक्षणीय घसरणीत रूपांतरित झाली. एका घसरणीत बीएसई सेन्सेक्स दिवसाच्या उच्चांकावरून सुमारे 1100 अंकांनी घसरला. एनएसई निफ्टीमध्येही मोठी घसरण झाली. या पातळीवर घसरल्यानंतर, निर्देशांक सावरला आहे. सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा कोसळला शेअर बाजार सलग तीन व्यापारी दिवसांपासून घसरणीत आहे. मंगळवार शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी अशुभ ठरला आणि बुधवारीची परिस्थिती तशीच राहिली. सुरुवातीच्या किरकोळ चढउतारांचे रूपांतर लवकरच लक्षणीय घसरणीत झाले. बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 81,794 वर उघडला, जो त्याच्या मागील बंद 82,180 अंकांपेक्षा कमी होता आणि नंतर सुरुवातीला 82,282 अंकांवर पोहोचला, परंतु नंतर या पातळीपासून ते 81,124 अंकांवर झपाट्याने घसरला. तर निफ्टी दिवसाच्या उच्चांकापासून 358 अंकांनी घसरला. निफ्टी 50 25,232 अंकांपेक्षा कमी होऊन 25,141 अंकांवर उघडला आणि नंतर 25,277 अंकांना स्पर्श करून 24,919 पर्यंत घसरला. बाजारातील सततच्या घसरणीमुळे, शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना एकामागून एक धक्का बसत आहे. तीन व्यापार दिवसांत झालेल्या बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. ज्यामुळे 15 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त जास्त नुकसान झाले आहे. सोमवारी, आठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी, बीएसई बाजार भांडवल ₹465. 68 लाख कोटींवर घसरले, ते मंगळवारी आणखी घसरून ₹455.72 लाख कोटींवर पोहोचले, एकाच दिवसात ₹10 लाख कोटींपेक्षा जास्त तोटा झाला. बुधवारी, त्यात आणखी एक लक्षणीय घट झाली, ही घट ₹4.53 लाख कोटींवर पोहोचली.

Stock Market Crash : शेअर बाजार पुन्हा कोसळला, 3 दिवसांत 15 लाख कोटी रुपयांचे नुकसान; जाणून घ्या सर्वकाही Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis: दावोसमध्ये पहिल्याच दिवशी 14 लाख 50 हजार कोटी गुंतवणूकींचे 19 सामंजस्य करार

Devendra Fadnavis : भारतातील उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्रच गेटवे-ऑफ-इंडिया’ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान खरे ठरवणारे तब्बल १४ लाख ५० हजार कोटींचे गुंतवणूक करार पहिल्याच दिवशी करण्यात आले. या गुंतवणूकीसोबतच राज्यात १५ लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाच्या माध्यमातून यंदा विविध विभागांनी आणि विविध क्षेत्रातील उद्योगांच्या प्रतिनिधी समवेत मुख्यमंत्री फडणवीस, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. हरित ऊर्जा, अन्न प्रक्रीया, पोलाद निर्मिती, आयटी-आयटीईस, डाटा सेंटर्सह ईव्ही- ऑटोमोबाईल, जहाज बांधणी, डीजिटल इन्फ्रा अशा विविध क्षेत्रातील ही गुंतवणूक मुंबईसह राज्याच्या रत्नागिरी, पालघर, गडचिरोली, अहिल्यानगर या भागात पोहचणाऱ असल्याने, तेथे उद्योग वाढीसह मोठ्या प्रमाणा रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्यासह महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाचे प्रतिनिधीमंडळ दावोस येथे उपस्थित आहे. दावोस मधील पहिल्याच दिवसापासून जगभरातील विविध क्षेत्रातील उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी स्वारस्य दर्शवणे सुरु केले. यातून गुंतवणुकीचा मोठा ओघ सुरु झाल्याने महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये उत्साहाचे चित्र निर्माण झाले. तत्पुर्वी, दावोस मधील महाराष्ट्र पॅव्हेलियनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.’ भविष्याचे वेध घेण्यासाठी सज्ज, विश्वासार्ह आणि दीर्घकाळचा भागीदार म्हणून महाराष्ट्र स्वागत करीत आहे. भारताच्या भविष्याचे पॉवर हाऊस म्हणून महाराष्ट्र जगाला, उद्योग विश्वाला साद घालत आहे, अशी मनोदय भावनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. सामंजस्य करारांवरील स्वाक्षरी व करारांच्या आदान-प्रदान प्रसंगी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ‘महाराष्ट्रावरील उद्योग क्षेत्राचा, गुंतवणूकदारांचा हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत. येथे होणाऱ्या करारांवरील पुढील कार्यवाहीबाबत वॉर रूमच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येईल. उद्योजकांना आवश्यक सुविधा वेळेत आणि दर्जदार पद्धतीने मिळाव्यात याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले. ‘उद्योजक – गुंतवणूकदारांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता, यंदा गतवर्षीहून अधिक गुंतवणूक आणि रोजगार संधीचे सामंजस्य करार होतील असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. विशेषतः मुंबईतील घन कचरा व्यवस्थापन, हवा आणि पाणी गुण संनियत्रणाच्या माध्यमातून सर्क्युलर ईकॉनॉमीची संरचना उभी केली जात आहे. तसेच महाराष्ट्र हे अमर्याद संधीचे राज्य आहे. त्याबाबत आणि एमएमआर क्षेत्राच्या विकासासह, तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार समितीने आराखडा निश्चित करून दिला आहे. या माध्यमातून व्यवसायाच्या आणि चांगल्या पगाराच्या रोजगार निमिर्तीवर भर दिला जात असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. दरम्यान, आगामी दोन दिवसात दावोसमध्ये एआय़, क्वांटम कंम्प्युटींग, डीजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, यांसह फिनटेक, लॉजिस्टिक्स अँण्ड इन्फ्रास्ट्रक्चर तसेच जहाज बांधणी, ईव्ही, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील आणखी काही उद्योग घटकांशीही गुंतवणूकीचे सामंजस्य करार होणार आहेत. त्यादृष्टीने त्यांच्या प्रतिनिधींशी, बोलणी -चर्चांच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार गतवर्षी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा कक्ष (MAITRI) या गुंतवणूक आणि उद्योग सुलभतेला प्रोत्साहन देणाऱ्या समर्पित संस्थात्मक व्यवस्थेमुळे यंदा गुंतवणूकदार, उद्योग क्षेत्राचा महाराष्ट्राकडील ओघ आणखी वाढला आहे. सामंजस्य करार पुढीलप्रमाणे… महाराष्ट्र सरकार-काल्सबर्ग क्षेत्र: अन्न प्रक्रिया आणि कृषी गुंतवणूक: ५०० कोटी रोजगार : ७५० महाराष्ट्र सरकार- योकी ग्रीन एनर्जी प्रा. लि. क्षेत्र: नविनिकरणीय ऊर्जा गुंतवणूक: ४ हजार कोटी रोजगार : ६ हजार ठिकाण: पालघर/एमएमआर महाराष्ट्र सरकार-बीएफएन फॉर्जिंग्स क्षेत्र: स्टील गुंतवणूक: ५६५ कोटी रोजगार : ८४७ ठिकाण: पालघर/एमएमआर एमएमआरडीए-सुमिटोमो रियालिटी गुंतवणूक: सुमारे ८ बिलियन डॉलर्स रोजगार : ८० हजार. एमएमआरडीए-के. रहेजा गुंतवणूक: सुमारे १० बिलियन डॉलर्स रोजगार : एक लाख. एमएमआरडीए-अल्टा कॅपिटल/पंचशील गुंतवणूक: सुमारे २५ बिलियन डॉलर्स रोजगार : २ लाख ५० हजार. एमएमआरडीए-एसबीजी समूह क्षेत्र: लॉजिस्टिक्स गुंतवणूक: सुमारे २० बिलियन डॉलर्स रोजगार : ४ लाख ५० हजार. एमएमआरडीए-आयआयएसएम ग्लोबल गुंतवणूक: सुमारे ८ बिलियन डॉलर्स रोजगार : ८० हजार. एमएमआरडीए-जायका धोरण आणि स्ट्रॅटेजी पार्टनर एमएमआरडीए-सेम्बकॉर्प डेवलपमेंट लि. सिंगापूर एकीकृत इंडस्ट्रियल पार्कसाठी नॉलेज पार्टनर एमएमआरडीए-टेक्निकल युनिव्हर्सिटी, मुनीच, जर्मनी शाश्वत नागरी वाहतूक प्रणाली महाराष्ट्र सरकार-सुरजागड इस्पात क्षेत्र: स्टील गुंतवणूक: २० हजार कोटी रोजगार: ८ हजार. ठिकाण: गडचिरोली महाराष्ट्र सरकार-लोढा डेव्हलपर्स क्षेत्र: आयटी, डेटा सेंटर्स गुंतवणूक: १ लाख कोटी रोजगार: १ लाख ५० हजार. ज्यांनी महाराष्ट्रात आणखी गुंतवणूक आणि विस्तार करण्याची तयारी दर्शवली असे: कोकाकोला, आयकिया, स्कोडा ऑटो. याशिवाय, कार्लसबर्गचे सीईओ जेकब अँडरसन यांनी महाराष्ट्रातील गुंतवणूकीला पोषक वातावरणाचे कौतुक करताना राज्याच्या उद्योग धोरणाला दाद दिली. कंपनी लवकरच भांडवली बाजारात आयपीओ आणण्यासाठी प्रय़त्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कोका-कोला कंपनीचे सीनिअर व्हाईस प्रेसिडेंट मायकेल गोल्टझमन यांच्या समेवत देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुंतवणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली.

Devendra Fadnavis: दावोसमध्ये पहिल्याच दिवशी 14 लाख 50 हजार कोटी गुंतवणूकींचे 19 सामंजस्य करार Read More »