DNA मराठी

Ahilyanagar News : तपोवन रोडवरील लक्ष्मीनगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या त्रासाला कंटाळून परिसरातील रहिवाशांनी महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

या बैठकीस माजी नगरसेवक निखील वारे आणि बाळासाहेब पवार हेही उपस्थित होते. सयाजीराव वाव्हळ, नानासाहेब माळवदे, बंडोपंत ढोले, राजेंद्र डहाळे, संजय कांडेकर, रमेश चौधरी, किरण विरकर, संजय धामने, पोपटराव राठोड, प्रशांत फुगनर, सुरेश बोडखे, भानुदास दातीर, अशोक कोरडे, सुर्यकांत झेंडे आणि पत्रकार साहेबराव कोकणे यांनी नागरिकांचे म्हणणे मांडत सविस्तर चर्चा केली.

नागरिकांनी यावेळी स्पष्ट केले की, लक्ष्मीनगरमधील जलवाहिनी ही जुनी व गंजलेली आहे, त्यामुळे पुरेसा दाब मिळत नाही. फेज टू पाण्याकरिता सर्वांनी नियमाप्रमाणे शुल्क भरले असून नवीन नळजोडण्या देखील दिल्या गेल्या आहेत, मात्र अपेक्षित पाणीपुरवठा अद्याप मिळत नाही.

यावर आयुक्त यशवंत डांगे यांनी दोन दिवसांत प्रत्यक्ष पाहणी करून परिसरात पुरेशा दाबाने आणि नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.

नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत काम लवकर सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *