Sanjay Raut on PM Modi : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जुन्नर अत्याचार प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. जुन्नरमध्ये अजूनही संतप्त वातावरण असून, अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणात सरकारची भूमिका काय, असा सवाल राऊत यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुम्हाला काही वाटत नाही का? याबद्दल तुम्हाला काही बोलावंसं वाटत नाही का?” असा सवाल करत राऊत यांनी फडणवीस यांच्यावर ‘फेल्युअर मुख्यमंत्री’ अशी टीका केली. पोलिसांनीही या प्रकरणात हात वर केल्याचा आरोप त्यांनी केला.
शिंदे सेनेचे स्वीकृत नगरसेवक साहिल देविदास चौघुले यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याचा दावा राऊत यांनी केला. संबंधित मुलगी न्यायासाठी विविध ठिकाणी जाऊन थकली असल्याचेही ते म्हणाले. या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्यांना रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत चार-चार तास बसवून ठेवतात आणि प्रकरण मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात टाकण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप करत राऊत यांनी पोलिसांना थेट आव्हान दिले. “नवी मुंबईचे पोलीस आयुक्तांनी हे प्रकरण मार्गी लावावे, नाहीतर मी हे प्रकरण मार्गी लावेन,” असे ते म्हणाले. तसेच, एकनाथ शिंदे या प्रकरणात कोणाला वाचवत आहेत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भाजप आणि शिंदे शिवसेनेकडून वरून दबाव येत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला.
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर भाष्य टाळले
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबत बोलताना राऊत यांनी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने त्यावर भाष्य करणार नसल्याचे स्पष्ट केले. कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांचा युक्तिवाद स्पष्ट असल्याचे त्यांनी म्हटले.
मंत्र्यांच्या विद्यापीठ दौऱ्यावर टीका
मंत्र्यांच्या विद्यापीठ दौऱ्यावरही राऊत यांनी टीका केली. पंतप्रधानांचा दौरा कठीण असताना मंत्र्यांनी खात्याचे काम सोडून विद्यापीठात जाण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी केला. “विद्यापीठात जाण्यापेक्षा महाराष्ट्रातील आश्रमशाळांमध्ये या मंत्र्यांनी जावे,” असे राऊत म्हणाले.
भाजपसोबत आता जनरेशन झेड येणार नसल्याचा दावाही त्यांनी केला. विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांशी चर्चा करू द्या, असे म्हणत त्यांनी या दौऱ्याची खिल्ली उडवली.
पंतप्रधान मोदींवरही निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसावरूनही राऊत यांनी मोठा राजकीय दावा केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून हा शेवटचा वाढदिवस असेल. त्यानंतर ते पंतप्रधान राहणार नाहीत,” असे ते म्हणाले.
17 सप्टेंबरनंतर मोदींना कोणत्या प्रसंगांना सामोरे जावे लागेल, हे कळेल, असा इशाराही त्यांनी दिला. अमित शाह कधीच पंतप्रधान होणार नाहीत, असे सांगत राऊत यांनी मोदी आणि शाह यांच्यावरही टीका केली. मोदींच्या वाढदिवशी समर्थकांनी उत्सव साजरा करावा; त्यानंतरच्या राजकीय घडामोडी पाहा, असे ते म्हणाले.
चंपत राय यांच्यावरूनही टीका
चंपत राय यांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील सरकारवर टीका करताना राऊत यांनी महाराष्ट्रातही ‘चंपत राय’ असल्याचे म्हटले. बलात्काराच्या आरोपींना ज्याप्रमाणे क्लीनचिट दिली जाते, त्याचप्रमाणे चंपत राय यांना क्लीनचिट देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, पुण्यात शनिवारी मोरगाव येथे रामरक्षा आंदोलन करण्यात येणार असून, आपण स्वतः या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.






