Sunetra Pawar: गुरुवारी रात्री अकरा वाजेपर्यंत प्रशासनाशी विकासकामांचा आढावा, लोकप्रतिनिधींसोबत चर्चा, नागरिकांच्या अडचणी… आणि अवघ्या काही तासांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी सकाळी सात वाजता उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात दाखल झाल्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘ॲक्शन मोड’ने त्यांनी खऱ्या अर्थाने बीडचे पालकत्व स्वीकारल्याची भावना बीडकरांनी व्यक्त केली.
माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांनी स्वतःहून बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारले होते. त्यानंतर ज्या झपाट्याने त्यांनी विकासकामांना गती दिली, मोठ्या निधीला मंजुरी मिळवून दिली आणि प्रशासनाला कामाला लावले, त्यामुळे बीडकरांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्यांच्या अकाली निधनानंतर हा विकासाचा वेग कायम राहील का, सुरू असलेल्या कामांचे काय होईल, अशी चिंता बीडकरांच्या मनात होती.
मात्र सुनेत्रा अजित पवार यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्याने त्या चर्चांना नवी दिशा मिळाली आहे. गुरुवारी सलग बैठका घेऊन रात्री जवळपास अकरा वाजेपर्यंत विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी नागरिकांच्या अडचणीही ऐकून घेतल्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी सात वाजता जिल्हा रुग्णालयात पोहोचून आरोग्य सेवांची पाहणी, सुरू असलेल्या कामांचा आढावा आणि अधिकाऱ्यांना दिलेल्या स्पष्ट सूचनांतून त्यांनी कामालाच सर्वोच्च प्राधान्य असल्याचा संदेश दिला.
बीडच्या विकासाचा धागा तुटू दिला जाणार नाही. सुनेत्रा पवार यांनी केवळ पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारलेली नाही, तर ती कृतीशील आणि परिणामकारक पद्धतीने पार पाडण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या कामाच्या झपाट्यामुळे बीडकरांच्या अपेक्षांना पुन्हा नवी पालवी फुटल्याचे बोलले जात आहे.
अजितदादा पवार यांनी दाखवून दिलेल्या विकासाच्या वाटेवर आता सुनेत्रा पवार त्याच तळमळीने पुढे जात असल्याचे चित्र या दोन दिवसांच्या दौऱ्यातून स्पष्टपणे समोर आले. त्यामुळे बीडच्या विकासाला पुन्हा वेग मिळेल, अशी आशा जिल्ह्यातील नागरिकांकडून व्यक्त होताना दिसत आहे.






