Chandrashekhar Bawankule : महायुती सरकार विरोधात आज संपूर्ण राज्यात शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तर आता राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना प्रतिउत्तर देत उद्धव ठाकरे जी, खंडणीखोरांचं सरदार कोण आहे? हे जनतेला माहिती आहे. अशी टीका केली आहे.
यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे जी, खंडणीखोरांचं सरदार कोण आहे? हे जनतेला माहिती आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत कोण ‘चिफ मिनिस्टर‘ आहे? आणि कोण ‘ थिफ मिनिस्टर‘ हे देखील महाराष्ट्रातील जनतेनं दाखवून दिलं आहे. वाझे काय लादेन आहे का? असे म्हणत उद्योगपतींच्या घराबाहेर जिलेटीन ठेवून तुमच्या नेतृत्वात शंभर कोटी वसुली सुरू होती हे जनता विसरली नाही. त्यामुळे आदरणीय देवेंद्रजींवर टीका करताना जरा आपला भूतकाळ आठवा आणि विचार करून बोला
बाकी इंडी आघाडीत तुमची शेवटच्या रांगेतील किंमत महाराष्ट्रानं बघितली. आजही आपल्याला शेवटच्या रांगेत उभं राहावं लागेल म्हणून तुम्ही दिल्लीतील आंदोलनात गेला नाहीत आणि इथं चार टाळके घेऊन आंदोलन केलं. असं बावनकुळे म्हणाले.
पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, तिकडं राहुल गांधींचं आंदोलन सुरू असताना आपली वेगळी चूल मांडून तुम्ही लक्ष वेधण्याचा निष्फळ प्रयत्न केला.
उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री असताना लोकशाहीचा आणि नैतिकतेचा गळा घोटला होता. आज देवेंद्रजींसारख्या प्रामाणिक नेतृत्वावर बोट ठेवण्याआधी तुम्ही स्वतःला आरशात पाहायला हवं. देवेंद्रजी फडणवीस यांचं काम हे फक्त भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राचं नाही, तर स्थिर, विकासाभिमुख आणि पारदर्शक प्रशासन देण्याचं आहे. महाराष्ट्रातील जनतेचा देवेंद्रजींच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला लोकं कंटाळले आहेत. असं देखील यावेळी बावनकुळे म्हणाले.