Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्ष खाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज काही मोठे निर्णय घेण्यात आले आहे.
या निर्णयानुसार राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबवण्यात येणार आहे. अभियानात अत्युत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळाने घेतला आहे. या निर्णयानुसार एकूण १ हजार ९०२ पुरस्कार दिले जाणार आहे.
तसेच ‘उमेद’- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत १० जिल्ह्यात ‘उमेद मॉल’ (जिल्हा विक्री केंद्र) ची उभारणी करण्यात येणार आहे. राज्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ आता उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.
याच बरोबर राज्यात ‘ई-नाम’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय नामांकित बाजारस्थळ स्थापन होणार. त्यासाठी कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे सनियंत्रण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता मंत्रिमंडळाने दिली आहे.
तर दुसरीकडे महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशिम येथे विशेष न्यायालय स्थापन करण्यात येणार आहे. तसेच पिंपरी-चिंचवड (जि. पुणे) येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर अशा दोन न्यायालयांची स्थापना होणार आहे.






