DNA मराठी

Radhakrishna Vikhe Patil

vikhe patil

Bhandardara Dam Centenary : भंडारदरा धरण ‘शताब्दी वर्षात’ जागतिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करा पालकमंत्री विखे पाटलांचे आदेश

Bhandardara Dam Centenary : उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरणाचे हे शताब्दी वर्ष केवळ उत्सवापुरते मर्यादित न राहता, या निमित्ताने हे धरण शाश्वत व जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाले पाहिजे. यासाठी जुन्या वास्तूंचे जतन, वॉटर टुरिझम व स्थानिकांना रोजगार देणारा सर्वसमावेशक पर्यटन विकास आराखडा त्वरित सादर करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. भंडारदरा धरणाच्या शताब्दी वर्षानिमित्त करावयाच्या उपाययोजना व पर्यटन विकास आराखड्याचा आढावा घेण्यासाठी निळवंडे धरण विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार अमोल खताळ, माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे, माजी सभापती मारुती मेंगाळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे व सोनल शहाणे आदी उपस्थित होते. पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, 2026 पासून धरणाचे 100 वे वर्ष सुरू होत आहे. त्यादृष्टीने ‘डॅम रिहॅबिलिटेशन इम्प्रुव्हमेंट प्रोजेक्ट’ (DRIP) अंतर्गत निधी व राज्य शासनाचा विशेष निधी वापरून कामे केली जातील. या महोत्सवाच्या नियोजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. जलसंपदा विभाग, वन विभाग व एमटीडीसी यांनी समन्वय साधून 15 दिवसांत अंतिम ‘मास्टर प्लॅन’ तयार करावा, जेणेकरून त्याचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांकडे करता येईल. काय आहेत प्रमुख आकर्षणे व योजना लेझर शो आणि डॉक्युमेंटरी : पर्यटकांच्या आकर्षणासाठी धरणाच्या भिंतीवर इतिहासाचा उलगडा करणारा भव्य ‘लेझर शो’ व डिजिटल डॉक्युमेंटरी दाखवली जाईल. तसेच, हा शो पाहण्यासाठी नैसर्गिक पद्धतीचे ॲम्फीथिएटर विकसित केले जाईल. वॉटर टुरिझम आणि अम्ब्रेला फॉल पाण्याचा पुनर्वापर करून सुट्टीच्या दिवशी ‘अम्ब्रेला फॉल’ सुरू ठेवण्याचे नियोजन करावे. तसेच, अधिकृत ‘बोटिंग क्लब’ स्थापन करून लाईफ जॅकेट वापरणे सक्तीचे करावे आणि रेस्क्यू बोटची उपलब्धता अनिवार्य करावी. चित्रपट आठवणी व निसर्ग : या परिसरात चित्रीकरण झालेल्या जुन्या चित्रपटांच्या आठवणी जागवण्यासाठी विशेष म्युझियम, जुन्या नकाशांचे प्रदर्शन आणि शताब्दी स्मृती पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येईल. स्थानिकांना रोजगार जलसंपदा विभागाने धरण परिसरातील अतिक्रमण हटवून सुमारे 17 ते 18 हेक्टर जागा उपलब्ध केली आहे. या जागेवर पर्यटनाचे प्रकल्प उभारले जातील. प्रदूषण टाळण्यासाठी खासगी वाहनांना बंदी घालून इलेक्ट्रिक बस किंवा गोल्फ कार्ट्सची सुविधा सुरू केल्यास स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल. तसेच, आदिवासी भागातील उत्पादनांच्या विक्रीसाठी बाजारपेठ, गाईड व्यवसाय आणि रिसॉर्ट्सच्या माध्यमातून स्थानिकांना संधी उपलब्ध करून देण्याचे धोरण असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले. कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड आणि रतनगड या परिसरातील ट्रेकिंग पॉईंट्सवरही पर्यटकांना सुविधा पुरवण्याबाबत विचार करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

Bhandardara Dam Centenary : भंडारदरा धरण ‘शताब्दी वर्षात’ जागतिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करा पालकमंत्री विखे पाटलांचे आदेश Read More »

img 20251120 wa0007

सहकाराची परंपरा, नेतृत्वाचा वारसा : राष्ट्रपतींच्या गौरवात उमटलेली विखे घराण्याची तीन पिढी

Vikhe Patil – महाराष्ट्राच्या सहकार चळवळीची वाटचाल सांगताना काही नावे अनिवार्यपणे उच्चारावी लागतात. त्यांमध्ये सर्वात प्रखर ठसा उमटवलेले नाव म्हणजे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील. सहकार म्हणजे केवळ आर्थिक संघटना नव्हे, तो ग्रामीण समाजाचा विकासमार्ग आहे, ही भूमिका ज्या व्यक्तींनी आपल्या कामाने सिद्ध केली त्यापैकी अग्रगण्य व्यक्तिमत्त्व हेच. आज, जेव्हा त्यांच्या कुटुंबातील तीन पिढ्यांना वेगवेगळ्या कालखंडात भारताच्या राष्ट्रपतींकडून गौरव मिळाला आहे, तेव्हा हा प्रवास केवळ एका घराण्याचा नाही. तर महाराष्ट्रातील ग्रामीण नेतृत्व, सहकार आणि लोकाभिमुख प्रशासनाच्या सातत्याचा दस्तऐवज ठरतो. पहिली पायाभरणी- विठ्ठलराव विखे पाटील यांचे राष्ट्रपतींकडून झालेले पहिले गौरव 1950 च्या दशकात भारत स्वराज्याच्या पहिल्या श्वासांसोबत पुढे जात असताना ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया अस्थिर होता. शेतकऱ्यांच्या उत्पादनावर मध्यस्थांची पकड होती, कर्जपुरवठ्याची व्यवस्था बळकट नव्हती. त्याच काळात डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना उभारून ग्रामीण अर्थव्यवस्थेचे रूपच बदलले. हे केवळ एका उद्योगाची कथा नव्हती ही होती शेतकऱ्याला उद्योगाचा ‘हिस्सेदार’ बनवण्याची नवचेतना. त्यामुळेच देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना पद्मश्री देऊन गौरवताना सहकार चळवळीच्या मूलभूत मूल्यांना मान्यता दिली. आजही हा पुरस्कार केवळ सन्मान नसून भारतीय सहकाराच्या क्रांतिकारी युगाची सुरुवात मानला जातो. नवी वाटचाल बाळासाहेब विखे पाटील यांचे राष्ट्रीय योगदान सहकाराच्या घराण्यात जन्मलेल्या बाळासाहेब विखे पाटील यांनी राजकारण, शिक्षण आणि सहकार या त्रिसूत्रीला वेगळा आयाम दिला. सहकार क्षेत्राचा विस्तार, शिक्षणसंस्थांची उभारणी आणि ग्रामीण भागातील सामाजिक पायाभूत सुविधांचा विकास ही त्यांची प्रमुख कामगिरी. 2010 मध्ये राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी दिलेला पद्मभूषण हा पुरस्कार राज्य आणि केंद्राच्या धोरणनिर्मितीत त्यांच्या प्रभावी योगदानाची दखल होता. हेही लक्षात घ्यावे लागेल की बाळासाहेब विखे यांचे कार्य केवळ सहकारपुरते मर्यादित राहिले नाही. तर ग्रामीण समाजातील सामाजिक भान आणि प्रशासकीय दूरदृष्टीचा एक नमुना म्हणून ते राष्ट्रीय नेतृत्वात स्वीकारले गेले. समकालीन परंपरा – डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जलव्यवस्थापन आजच्या महाराष्ट्रात सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे पाणी. हवामानबदल, वाढती मागणी, सिंचनातील असमानता आणि जलसंपत्तीचे अव्यवस्थापन यांमधून मार्ग शोधताना परिणामकारक प्रशासन, वैज्ञानिक धोरणे आणि जलसाक्षरता हे तीन घटक महत्त्वाचे ठरतात. 2024 मध्ये केंद्र सरकारने जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून दिलेला “बेस्ट स्टेट कॅटेगरी” राष्ट्रीय पुरस्कार हा या व्यापक बदलांचा सरकारी शिक्का आहे. हा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देण्यात आला. या सन्मानाचा स्वीकार राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हा पुरस्कार व्यक्तीगत कामगिरीचा नसून संपूर्ण विभागाच्या कार्यक्षमतेचा राष्ट्रीय पुरावा आहे, आणि विखे पाटील यांच्या नेतृत्वातील धोरणात्मक स्थिरतेचे प्रतीकही. एकाच कुटुंबाच्या तीन पिढ्या — महाराष्ट्राची सहकार परंपरा जगाच्या नकाशावर एका घराण्याच्या तीन पिढ्यांना राष्ट्रपतींकडून सन्मान मिळणे, हे अपवादात्मक आहे. पण या सन्मानांमागे घराणेशाही नसून सातत्यपूर्ण समाजकार्य, सहकार विचारांची परंपरा आणि ग्रामीण विकासाचे अधिष्ठान आहे. डॉ. विठ्ठलराव – सहकाराची क्रांती बाळासाहेब – सहकार + शिक्षण + राजकीय नेतृत्व राधाकृष्ण – आधुनिक प्रशासन, जलव्यवस्थापन, तंत्रज्ञानाधारित धोरण ही परंपरा एका घराण्यापुरती मर्यादित नसून महाराष्ट्राच्या ग्रामीण समाजशास्त्राचा आराखडा ठरते. विखे पाटील कुटुंबाच्या तीन पिढ्या हे सिद्ध करतात की विकास हा योगायोग नसतो तो दृष्टिकोन, कष्ट आणि मूल्ये यांची सलग परंपरा असते. आज जेव्हा महाराष्ट्र जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर पहिले स्थान मिळवतो, तेव्हा या परंपरेची बाजू अजूनही मजबूत असल्याचे दिसते. राजकीय मतभेद असोत वा सहकारातील नवनवे आव्हान महाराष्ट्राची ग्रामीण परिवर्तनाची गाथा लिहिताना विखे पाटील कुटुंबाचा उल्लेख अपरिहार्य राहणार आहे. सन्मान ही केवळ मानाची पाऊलवाट नाही तर ग्रामीण भागाचा आत्मविश्वास वाढवणारी प्रेरणा आहे. ही परंपरा पुढच्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरावी, हीच आजच्या संपादकीयाची मुळ भूमिका.

सहकाराची परंपरा, नेतृत्वाचा वारसा : राष्ट्रपतींच्या गौरवात उमटलेली विखे घराण्याची तीन पिढी Read More »

fb img 1758080430876

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

Vikhe Patil: अतिवृष्टीमुळे पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील शेतपीके, फळपीके, बंधारे, रस्ते, घरे, ओढे पुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एक लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आपत्तीच्या काळात शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानीच्या मदतीपासून एकही नागरिक वंचित राहणार नाही. अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्यात यावेत, असे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. अतिवृष्टीमुळे पाथर्डी व शेवगाव तालुक्यात झालेल्या नुकसानीची विखे पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकरी व नागरिकांसमवेत संवाद साधून त्यांनी त्यांना धीर दिला. नुकसानीची माहिती घेतली. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उप विभागीय अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, सायली पाटील, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडूरंग गायसमुद्रे तसेच अक्षय कर्डीले यांच्यासह संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे पुलाची तसेच ग्रामस्थांच्या घराची, किराणा दुकानाची पाहणी करत झालेल्या नुकसानीची ग्रामस्थांकडून माहिती घेतली. मौजे देवराई, मौजे तिसगाव येथील अतिवृष्टीमुळे शेतपीक, घरांच्या झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. शेवगाव तालुक्यातील मौजे अमरापूरकर व परिसरातील नुकसानीची पाहणी करत ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेवगाव येथे नागरिकांच्या समस्या, तक्रारींचे लेखी निवेदन स्वीकारली. पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, केवळ आपल्या जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. मागील अनेक वर्षात झाला नाही एवढा पाऊस या भागामध्ये झाला आहे. पावसामुळे नाले, ओढे वाहून जाण्याबरोबरच अनेक ठिकाणी तलावांची हानी झाली आहे. नागरिकांच्या घरांची, दुकानांचे तसेच शेतपिकांची मोठी हानी झाली आहे. या पावसामुळे साधारणपणे १ लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अशा संकटाच्या काळात नागरिकांना आधार देण्याची गरज आहे. नुकसानग्रस्त गावातील सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने होण्यासाठी जिल्ह्याच्या इतर तालुक्यातील मनुष्यबळ याकामी उपयोगात आणावे, असेही त्यांनी सांगितले. पावसाच्या पाण्यामुळे ज्या नागरिकांच्या घराचे नुकसान झाले असेल अशा कुटुंबांच्या निवाऱ्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात यावी. त्याठिकाणी अन्न, पाणी, वीज पुरेशा प्रमाणात औषधी उपलब्ध करून देण्यात यावी. ज्या नागरिकांची घरे संपूर्ण उध्वस्त झाली असतील अशा नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घर उभारणीसाठी मदत करण्याचा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीबाबत प्राथमिक अंदाज सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. एनडीआरएफ व एसडीआरएफच्या निकषांनुसार मदत देण्यात येईल तसेच अधिकाधिक मदत व पुनर्वसनासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील, असे पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील Read More »

img 20250829 wa0005

Amol Khatal : आमदार अमोल खताळ यांच्यावर माथेफिरुचा हल्ला ; आरोपी ताब्यात

Amol Khatal : संगमनेर शहर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात चर्चेत असून आता शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आमदार आमदार अमोल खताळ यांच्यावर माथेफिरुने हल्ला केला असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका तरुणाला ताब्यात देखील घेतले आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार शहरातील मालपाणी लॉन्स याठिकाणी संगमनेर फेस्टिवल आयोजित करण्यात आले होते. उदघाट्न व आरती झाल्यानंतर राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष सुमित अट्टल यांनी सर्वांचे स्वागत केले. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर आमदार खताळ यांचे भाषण झाल्यानंतर ते परत निघताना प्रत्येकाशी हस्तांदोलन करत चालले असता एका माथेफिरुने मुख्य प्रवेशद्वाराजवळ खताळ यांच्यावर हल्ला केला. हल्ला झाल्यानंतर अचानक खूप मोठा गोंधळ झाला. उपस्थितांनी या माथेफिरूला भरपूर चोप दिला. सदर इसमाचे नाव प्रसाद अप्पासाहेब गुंजाळ असल्याचे समजते आहे. उपस्थितांमध्ये 20 मिनिटे गोंधळाचे वातावरण होते. आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला केला. यांच्यावर झालेल्या हल्ल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त होत आहे. तालुक्यातून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार खांडगाव येथील एक माथेफिरू युवक मालपाणी लॉन्स येथे सुरु असलेल्या कार्यक्रमासाठी आला होता. यावेळी आमदार अमोल खताळ यांनी सदर कार्यक्रमाचे उदघाट्न करून आरती आटोपल्यावर भाषण झाल्यावर ते पुढच्या कार्यक्रमासाठी निघाले त्यावेळी ते प्रत्येकाच्या हातात हात देत पुढे चालले असता जमावात असलेला एक माथेफिरूने थेट खताळ यांच्या तोंडाकडे हात भिरकवत हल्ला केला. यावेळी सोबत असणाऱ्या सुरक्षा राक्षकाने त्याला ताब्यात घेत पोलिसांच्या स्वादिन केले. यावेळी खताळ यांचे समर्थक हजारोच्या संख्येने जमा झाले होते. मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आमदार खताळ पुन्हा घटनास्थळी आले. माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्त्यांनी याठिकाणी थांबायचं नाही. आणि कोणीही कायदा हातात घ्यायचा नाही असे सांगितल्याने जमाव खताळ यांच्या कार्यालयात गेला. काहीवेळ घटनास्थळावर तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.

Amol Khatal : आमदार अमोल खताळ यांच्यावर माथेफिरुचा हल्ला ; आरोपी ताब्यात Read More »

श्रीरामपूर शहराचा चेहरामोहरा बदलणार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची ग्वाही

Vikhe Patil: येत्या काळात श्रीरामपूर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी, शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करण्यासोबत शहर हरित करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. श्रीरामपूर येथे तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा, जलजीवन मिशन व महावितरण विभागांच्या कामकाजाचा आढावा बैठकीत विखे पाटील बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती सुनंदा नरवाडे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, तहसीलदार मिलिंद वाघ आदी उपस्थित होते. पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, जलजीवन मिशनचे काम करतांना पाण्याचे स्त्रोत शोधल्यानंतर पाईप खरेदी करावी. उन्हापासून पाइप खराब होऊ नयेत यासाठी पाईप बंदीस्त ठिकाणी ठेवावेत. जलजीवन मिशनच्या कामात गुणवत्ता ठेवावी. कामात अनियमितता करणाऱ्या ठेकेदारांवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणीबाबत ग्रामस्थांच्या तक्रारींची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन निकृष्ट कामांची, अनियमितेची चौकशी करण्यात यावी. त्रुटींची दुरूस्ती करून पाणी पुरवठा योजना तात्काळ पूर्ण कराव्यात. ज्या गावांना पाणीपुरवठा योजना सुरू आहेत त्या गावांना टँकरद्वारे पाणी पुरविण्याची गरज पडू नये, असेही त्यांनी सांगितले. महावितरण कामांचा आढावा घेतांना पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे यासाठी मुख्यमंत्री सौर पंप योजनेत येत्या काळात सर्वच शेतकऱ्यांना सोलर पंप देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेत सौर फिडर केंद्रांसाठी जिल्ह्यात 3 हजार एकर शासकीय जमीन देण्यात आली आहे. कुसुम’ आणि ‘मागेल त्याला सोलर पंप’ या योजनेंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ सोलर पंप वितरित करण्यात यावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तालुक्यातील नादुरुस्त उपकेंद्रांची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. जिल्ह्यातील महावितरणच्या प्रलंबित कामांना जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून 40 कोटी रूपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. गावठाण जमीनीवर असलेले घरकुल नियमित करण्याचे शासनाचे धोरण आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यात 20 लाख घरकुले बांधण्यात येणार आहेत. यासर्व घरांना सोलरद्वारे विज दिली जाणार आहे . श्रीरामपूर तालुक्यासाठी जास्तीत जास्त घरकुले मंजूर करण्यात येतील, अशी ग्वाही विखे पाटील यांनी दिली. ग्रामीण पाणीपुरवठा व महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाच्या योजनेत तालुक्यातील गावांमध्ये करण्यात येणाऱ्या कामांच्या प्रगतीचा पालकमंत्र्यांनी गावनिहाय आढावा घेतला. या बैठकीला महसूल, पंचायत समिती, ग्रामीण रस्ते, जलसंधारण अशा विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

श्रीरामपूर शहराचा चेहरामोहरा बदलणार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची ग्वाही Read More »

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प अन् थोरात-विखे पुन्हा आमनेसामने

Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीनंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदले असून 11 विधानसभा मतदारसंघात महायुतीने बाजी मारली आहे. संगमनेरमध्ये देखील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यानंतर विखेंनी बाळासाहेब थोरात यांना राजकीय दृष्ट्या मोठा धक्का दिला असल्याची चर्चा सुरू झाली होती मात्र पुन्हा एकदा जिल्ह्यात थोरात विरुद्ध विखे यांच्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. या संघर्षाचे प्रमुख कारण म्हणजे नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प आणि संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याचा मुद्दा. नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पनाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प मंजूर झाल्यानंतर त्यासाठी 30 टक्के जमिनीचे संपादन झाले आहे. या प्रकल्पामुळे या भागातील विकासाच्या नव्या दिशा खुल्या होतील, परंतु त्याचबरोबर राजकीय नेत्यांमधील वादही तीव्र होत आहेत. बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे यांच्यातील हा वाद केवळ प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबतच नाही तर त्याच्या राजकीय फायद्यांबाबतही आहे. आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालयसंगमनेर तालुक्यातील आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याच्या मुद्द्यावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे यांनी या कार्यालयाची स्थापना आश्वीलाच होणार असल्याची स्पष्टोक्ती केली आहे. या मुद्द्यावरून थोरात आणि विखे यांच्यातील राजकीय शह-काटशह सुरू आहे. राजकीय परिणामया संघर्षाचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांवर पडतील. बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे हे दोन्ही दिग्गज नेते आहेत आणि त्यांच्यातील वादामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापत आहे. या वादाचा फायदा इतर राजकीय पक्षांना घेता येऊ शकतो, ज्यामुळे राज्यातील राजकीय स्थिती अधिक जटिल होऊ शकते. बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे यांच्यातील संघर्ष हा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. या संघर्षाचे परिणाम राज्याच्या राजकीय भूमितीवर पडतील आणि त्याचा फायदा घेण्यासाठी इतर राजकीय पक्षांना संधी मिळू शकते.

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प अन् थोरात-विखे पुन्हा आमनेसामने Read More »

Vikhe Patil News: मृत झालेल्या SDRF जवानांच्या कुटूबियांना दहा लाख रुपयांची मदत मिळणार: राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती

Vikhe Patil News:  प्रवरा नदीपात्रात मृत झालेल्या  तरूणाचा मृतदेह शोधण्यासाठी स्थानिक प्रशासनाने एस.डी.आर.एफच्या पथकाला पाचारण केले होते. सुगाव येथे पथक दाखल झाल्यानंतर त्यांनी शोधकार्य सुरू केले मात्र पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने या पथकातील पी.एस.आय प्रकाश नाना शिंदे, कॉन्स्टेबल राहूल गोपीचंद पावरा, वैभव सुनिल वाघ यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेन प्रशासन हादरले, ग्रामस्थांच्या मदतीने या तीन जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. यापैकी पंकज पंढरीनाथ पवार, अशोक हिम्मतराव पवार यांना पुढील उपचकरा करीता स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचे वृत्‍त समजल्या नंतर पालकमंत्री ना.विखे पाटील यांनी महसूल आणि पोलीस प्रशासनास सूचना देवून, मृत जवानांच्या कुटूबियांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या. दुपारी स्वत: पालकमंत्री विखे पाटील, मा.आ.वैभव पिचड, राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर, जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह महसुल व प्रशासनातील अधिकारी घटनास्‍थळी दाखल झाले. यासर्व मृत जवानांच्या पार्थिवावर मंत्री विखे पाटील आणि वरीष्ठ अधिका-यांनी यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली अर्पण केली. पोलीस पथकाने शोकधून आणि बंदूकीची सलामी देवून मृतदेह त्यांच्या गावी रवाना करण्‍यात आले. याप्रसंगी जवानाचे नातेबाईक आणि त्याच्या सहका-यांना भावना आवरणे अवघड झाले होते. यासर्वांना मंत्री विखे पाटील यांनी दिलासा दिला. यासर्व जवानांच्या कुटूबियांना दहा लाख रुपयांची मदत करण्‍यात येणार असल्‍याची माहीती ना.विखे पाटील यांनी माध्‍यमांशी बोलताना दिली. घडलेली घटना अत्‍यंत दुर्दैवी असून, सर्व मृतदेह नातेवाईकांकडे रवाना करण्‍यात आले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. पाण्‍यामध्‍ये बुडालेल्‍या  अन्‍य दोन व्‍यक्तिंचा तपास करण्‍यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्‍यात येत असून, धरणातून पाण्‍याचा प्रवाहही आता बंद करण्‍यात आला आहे. याच कारणासाठी युवकांनी केलेल्‍या रस्‍ता रोको आंदोलनासही मंत्री ना.विखे पाटील यांनी भेट दिली. घटना घडल्‍यानंतर पाण्‍याचा प्रवाह कमी करण्‍याच्‍या सुचना आपण यापुर्वीच दिल्‍या होत्‍या परंतू आंदोलकांच्‍या  भावना लक्षात घेवून संपूर्ण प्रवाहच बंद करण्‍याच्‍या सुचना जलसंपदा विभागाला त्‍यांनी दिल्‍या.

Vikhe Patil News: मृत झालेल्या SDRF जवानांच्या कुटूबियांना दहा लाख रुपयांची मदत मिळणार: राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती Read More »

Ahmednagar News: केवळ दहा जागा लढविणारे देशाचे भवितव्‍य घडवू शकणार नाहीत : राधाकृष्‍ण विखे पाटील

Ahmednagar News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली देश आज महासत्‍ता  बनत आहे. त्‍यांचे नेतृत्‍व आता विश्‍वमान्‍य झाल्‍यामुळेच देशाचे भवितव्‍य घडणार आहे. केवळ दहा जागा लढविणारे  देशाचे भवितव्‍य घडवू शकणार नाहीत असा टोला लगावून जिल्‍ह्यातील औद्योगिक क्षेत्र अधिक विकसीत करण्‍याचा आपला प्रयत्‍न असून, आपली भूमि‍का उद्योग व्‍यवसाय आणण्‍याची आहे. इतरांसारखी धाक, दडपशाही करुन घालविण्‍याची नाही अशी टिका अशी खरमरीत टिका महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली.  तालुकयातील टाकळी ढोकेश्‍वर येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या  कार्यकर्त्‍यांच्‍या मेळाव्‍यात ना.विखे पाटील बोलत होते. जेष्‍ठनेते खिलारी गुरुजी, सुजीत झावरे, तालुका अध्‍यक्ष राहुल शिंदे, मंगलदास बांगल आदी याप्रसंगी उपस्थित होते.  आपल्‍या भाषणात मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, मागील दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली देशाचा विकास सर्व क्षेत्रांमध्‍ये होत आहे. मोदींची गॅरंटी आता देशवासियांना मिळाली आहे. त्‍यामुळेच त्‍यांना तिस-यांदा पंतप्रधान करण्‍यासाठी देशातील नागरीक सज्‍ज झाले असून, ही निवडणूक देशाचे भवितव्‍य घडविणारी आहे.  कोव्‍हीड संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांच्‍या पाठीशी उभे राहीले. मोफत धान्‍य योजनेपासून ते आयुष्यमान भारत योजने पर्यंत, सामाजिक योजनांना त्‍यांनी प्राधान्‍य दिले. जिल्‍ह्यात किसान सन्‍मान योजनेच्‍या माध्‍यमातून पारनेर तालुक्‍यात ४४  हजार ३८० शेतक-यांना ६७ कोटी ७१ लाख रुपयांचे अनुदान आले. राज्‍य सरकारने सुरु केलेल्‍या एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ १ लाख २७ हजार शेतक-यांना झाला असल्‍याची माहीती देवून पालकमंत्री विखे पाटील म्‍हणाले की, मागील अडीच वर्षे फक्‍त मुख्‍यमंत्री घरात बसून होते. नगर जिल्‍ह्यासाठी कोणतीही मदत महाविकास आघाडीचे नेते करु शकले नाहीत.  पारनेर तालुक्‍यातील पिंपळगाव जोगा धरणाचा प्रश्‍न प्राधान्‍याने सोडविण्‍याची आपली भूमिका असून, या तालुका आता बागायती कसा होईल यासाठी सुध्‍दा प्रयत्‍न करणार आहोत. जिल्‍ह्यातील तरुणांना जिल्‍ह्यातच रोजगार निर्माण करुन देण्‍यासाठी अनेक उद्योग नव्‍याने आणण्‍याची आपली भूमिका आहे. इतरांसारखी उद्योजकांना धाक दडपशाहीने पळवून लावण्‍याची भूमिका आमची नसल्‍याचा टोला त्‍यांनी लगावला.  याप्रसंगी सुजीत झावरे यांनी आपल्‍या भाषणात पारनेर तालुकयातून खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी मताधिक्‍य देण्‍याची ग्‍वाही दिली. मंगलदास बांगर यांनी शरद पवारांचे नाव न घेता त्‍यांनी आपल्‍या पुतण्‍याला या निवडणूकीत उभे का केले नाही असा सवाल उपस्थित केला. धनगर समाजाचे नेते श्री.बाचकर यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. सभेपुर्वी मंत्री विखे पाटील यांचे ग्रामस्‍थांनी मिरवणूक काढून स्‍वागत केले.

Ahmednagar News: केवळ दहा जागा लढविणारे देशाचे भवितव्‍य घडवू शकणार नाहीत : राधाकृष्‍ण विखे पाटील Read More »

Ahmednagar News: महाविद्यालयात येणारा विद्यार्थी कोचिंग क्‍लासकडे का वळाला? राधाकृष्‍ण विखे पाटील

Ahmednagar News: नव्‍या शैक्षणिक धोरणाच्‍या अंमलबजावणीमध्‍ये कौशल्‍य शिक्षणाला दिलेले प्राधान्‍य विचारात घेवून औद्योगिक क्षेत्राला आवश्‍यक असलेले मनुष्‍यबळ निर्माण करण्‍याचे काम विद्यापीठाच्‍या उपकेंद्रातून व्‍हावे अशी अपेक्षा महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त  केली.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या नगर येथील उपकेंद्राचे उद्घाटन पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत संपन्‍न झाले. उच्‍च व तंत्रशिक्षण मंत्री ना.चंद्रकांत पाटील दुरदृष्‍य प्रणालीव्‍दारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.  खासदार डॉ.सुजय विखे पाटील, जिल्‍हाधिकारी सिध्‍दराम सालिमठ, जिल्‍हा बॅकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, विद्यापीठाच्‍या व्‍यवस्‍थापन परिषदेचे सदस्‍य राजेंद्र विखे पाटील, कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी, प्र.कुलगुरु डॉ.पराग काळकर यांच्‍यासह व्‍यवस्‍थापन परिषदेचे सर्व सदस्‍य याप्रसंगी उपस्थित होते.   मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, नगर येथे उपकेंद्र व्‍हावे यासाठी सुरु असलेल्‍या प्रयत्‍नांना अनेक वर्षांनंतर यश आले. या केंद्रासाठी पुढाकार घेणा-या सर्वांचेच अभिनंदन करुन, उपकेंद्र आता नगर येथे सुरु झाल्याने अधिकची जबाबदारी वाढली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्र सरकारने दिलेल्या नव्‍या राष्‍ट्रीय शैक्षणि‍क धोरणाची अंमलबजावणी करण्‍याचे मोठे आव्‍हान आपल्‍या सर्वांपुढे आहे. त्‍यासाठी आता विद्यापीठां बरोबरच महाविद्यालयांनीही पुढाकार घेण्‍याचे त्‍यांनी आवाहन केले.  आज शिक्षणाच्‍या परिभाषा सर्व बदलल्‍या आहेत. एकाच वेळी अनेक विद्या शाखांचे ज्ञान संपादन करण्‍याची प्रक्रीया गतीने पुढे जात आहे. यामध्‍ये पुणे विद्यापीठालाही मागे राहुन चालणार नाही. कारण केवळ बी.ए, बी.कॉम सारख्‍या तत्‍सम पदव्‍या घेवून विद्यार्थी आता स्‍पर्धेत टिकू शकणार नाही.  यासाठी या पदवी शिक्षणा बरोबरच विद्यार्थ्‍यांना कौशल्‍य  आणि तांत्रिक शिक्षणही कसे घेता येईल याचाही विचार व्‍हावा असे सुचीत करुन, मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, नगर येथे सुरु झालेले उपकेंद्र हे कौशल्‍य शिक्षणाचे एक महत्‍वपूर्ण केंद्र ठरावे यासाठी कौशल्‍य विकासाचे सर्व कोर्स येथे तातडीने सुरु करुन, विद्यार्थ्‍यांना संधी देण्‍याची व्‍यवस्‍था  निर्माण करावी.   विद्यापीठाने आता आपली व्‍याप्‍ती वाढविणे गरजेचे आहे. कारण यापुर्वी विद्यापीठं एका चाकोरीमध्‍ये अडकली गेली. ए.आय.सी.टी, यु.जी.सी यांसारख्‍या कमिट्यांच्‍या मार्गदर्शक सुचनांमुळे आजपर्यंत संस्‍था  कार्यरत राहील्‍या. परंतू आता या कमिट्यांचेच योगदान काय? असा प्रश्‍न  विचारण्‍याची वेळ आली आहे असे स्‍पष्‍ट करुन, याबाबत आता केव्‍हा तरी प्रधानमंत्र्यांशी आपण बोलणार असून, जिल्‍ह्यांमध्‍ये असलेल्‍या शैक्षणिक संस्‍थाची संख्‍या लक्षात घेवून प्रत्‍येक जिल्‍ह्यात आता स्‍वतंत्र विद्यापीठ निर्माण करण्‍याची मागणीही त्‍यांनी आपल्‍या भाषणात केली.  शिक्षण व्‍यवस्‍थेमध्‍ये कोचिंग क्‍लासचा वाढलेला हस्‍तक्षेप हे व्‍यवस्‍थेच अपयश आहे. या कोचिंग क्‍लासवर आपण कुठलेही नियंत्रण आणू शकलो नाही. महाविद्यालयात येणारा विद्यार्थी या कोचिंग क्‍लासकडे का वळाला? याचे आत्‍मपरिक्षण करण्‍याची गरज ना.विखे पाटील यांनी आपल्‍या भाषणातून व्‍यक्‍त केली. खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी उपकेंद्राच्‍या इमारतीची निर्मिती ही स्‍व.दादा पाटील शेळके यांची स्‍वप्‍नपुर्ती असून, 25 वर्षे न सुटलेला प्रश्न हा मागील दोन वर्षात मार्गी लागला. या उपकेंद्राच्‍या इमारतीमुळे गावाचे अन्‍य प्रश्‍नही सोडविण्‍याची ग्‍वाही त्‍यांनी दिली.  याप्रसंगी कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी, डॉ.राजेंद्र विखे पाटील यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक सिनेट सदस्‍य सचिन गोर्डे यांनी केले.  विद्यापीठाच्‍या विस्‍तारासाठी जिल्‍हा नियोजन व विकास समितीच्‍या माध्‍यमातून 5 कोटी रुपयांचा निधी तसेच ई-बस उपलब्‍ध  करुन देण्‍याची केलेली मागणी मंत्री विखे पाटील यांनी मान्‍य करुन, या उपकेंद्राकडे येणा-या रस्‍त्‍याचे रुंदीकरण व विद्युतीकरणासाठी मदत करण्‍याचे आश्‍वासन त्‍यांनी दिले.

Ahmednagar News: महाविद्यालयात येणारा विद्यार्थी कोचिंग क्‍लासकडे का वळाला? राधाकृष्‍ण विखे पाटील Read More »

ज‍िल्ह्यात 23 हजार रोजगार न‍िर्माण होणार –  पालकमंत्री राधाकृष्ण व‍िखे पाटील

Ahmednagar News:-  बेरोजगारीवर मात करण्यासाठी शासन प्रमाणिक प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र शासनाने नुकताच जर्मनीबरोबर सामंजस्य करार केला असून यामाध्यमातून ४ लाख बेरोजगार तरूणांना प्रशिक्षण देऊन नोकरी दिली जाणार आहे‌. दावोस येथे झालेल्या गुंतवणूक परिषदेत ३ लाख ७३ हजार कोटींचे करार करण्यात आले‌ असून यातून २ लाख तरूणांना रोजगार निर्माण होणार आहे.  राज्यात सुरू असलेल्या विभागीय नमो महारोजगार रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून २ लाखांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केली. नमो महारोजगार मेळावा व‌ करिअर मार्गदर्शन शिबिरास त्यांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून थेट सहभागी होत मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते.  कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभाग विभागीय नमो महारोजगार मेळावा व‌ करिअर मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ,जिल्हा पर‍िषदेचे मुख्य कार्यकारी अध‍िकारी आश‍िष येरेकर, महानगरपालिका आयुक्त डॉ.पकंज जावळे, कौशल्य व‍िकास व‍िभागाचे नाश‍िक व‍िभागीय उपायुक्त सुन‍िल सैंदाणे, ज‍िल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त न‍िशांत सुर्यवंशी आदी उपस्थित होते.  राज्यात नागपूर, लातूर नंतर अहमदनगर येथे नमो व‍िभागीय रोजगार मेळावा होत आहे. असे नमूद करून मुख्यमंत्री एकनाथ श‍िंदे म्हणाले, शासन हे सर्वसामान्य लोकांचे आहे. तरूणांना रोजगार देण्यासाठी शासन प्रामाण‍िक प्रयत्न करत आहे. राज्यात सर्व व‍िभागात रोजगार मेळावे आयोज‍ित केले जात आहेत. येत्या काळात बेरोजगार तरूणांच्या दारात जाऊन शासन त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे.  शासन आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात अडीच कोटी लोकांना शासकीय योजनांचा लाभ म‍िळाला. अशाच प्रकारे रोजगार मेळाव्यातून लाखो तरूणांना रोजगार म‍िळून तरूण त्यांच्या पायावर उभे राहून सक्षम होणार आहेत.  प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांतून ५० हजार तरूणांना प्रश‍िक्षण- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वनीमुद्रीत दृकश्राव्य संदेशाच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश दिला. ते म्हणाले की, राज्य शासन सातत्याने कौशल्य विकासावर भर देत आहे.  राज्यात दोन हजार प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात घेण्यात आला.  ३४ जिल्ह्यातील २५०  तालुक्यातील ५११ गावात  या केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे. या केंद्रातून दरवर्षी ५० हजार तरुण- तरुणींना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याने ग्रामीण भागात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहेत. प्रत्येक  उद्योग  व रोजगारक्षम युवा यांच्या संवादातून सुद्धा अनेक संधी निर्माण होत असतात. रोजगार मिळणे हे कुटुंबाच्या समृद्धीसाठी अत्यंत आवश्यक असते. या रोजगार मेळाव्यात प्रत्येकाला आपल्या गुणवत्तेनुसार, कौशल्याप्रमाणे  रोजगार मिळेल.  हा नमो महारोजगार मेळावा अनेक युवक-युवतींना आपल्या पायावर उभा करणारा ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. ज‍िल्ह्यात दोन ठ‍िकाणी संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधनी सुरू करणार – कौशल्य व‍िकास मंत्री मंगलप्रभात लोढा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री श्री.लोढा म्हणाले की, पंधरा दिवसांच्या आत राहाता (शि‍र्डी) व अहमदनगर येथे संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधनी सुरू करण्यात येईल. एक महिन्याच्या आत अहमदनगर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय कौशल्य व‍िकास संस्था सुरू करण्यात येईल. या संस्थेच्या माध्यमातून कौशल्याबरोबर परदेशी भाषेचे शिक्षण दिले जाईल. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक आयटीआय सुरू करण्यात येऊन युवकांना १५ दिवसाचा कौशल्य अभ्यासक्रम शिकविण्यात येईल.  ज‍िल्ह्यात  २३ हजार रोजगार न‍िर्माण होणार –  पालकमंत्री राधाकृष्ण व‍िखे पाटील महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, औद्योगिककरणाच्या दृष्टीने आपण मोठे पाऊल उचलले आहे. वर्षभरात दीड हजार एकर जमीन अहमदनगर जिल्ह्यात उद्योगांसाठी देण्यात आले. ५ हजार १४ कोटींचे सामंजस्य करारातून २३ हजार रोजगाराची निर्मिती होणार आहे. ज‍िल्ह्यातील औद्योगिक परिसरातील शांततेसाठी ज‍िल्हा प्रशासन  कटीबद्ध आहे. अहमदनगर जिल्हा सहा राष्ट्रीय महामार्गाने जोडला गेला आहे‌. जिल्ह्यातील तरूणांना जिल्ह्यातच रोजगारासाठी आमचा प्रयत्न आहे. प्रवरेत पंचवीस वर्षांपूर्वी कौशल्य विकासाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. अशी आठवण ही त्यांनी यावेळी काढली. या रोजगार मेळाव्यात १२ हजार तरूणांना रोजगार देण्याचा प्रयत्न राहणार असल्याची ग्वाही महसूलमंत्र्यांनी यावेळी दिली.  संत गाडगेबाबा कौशल्य संस्थेचे जिल्ह्यात राहाता तालुक्यातील शिर्डी व अहमदनगर शहरात केंद्र सुरू करण्यात यावे. अशी मागणी ही महसूलमंत्र्यांनी यावेळी केली. खासदार डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील कमीत कमी एक लाख बेरोजगार तरूणांना हमीचा रोजगार उपलब्ध करून देणारे नमो रोजगार मेळावे एक नवी सुरूवात आहे. मागील वर्षभरात ज‍िल्ह्यातील १८ हजार तरूणांना रोजगार न‍िर्माण होईल असे उपक्रम राबव‍िण्यात आले. ५०० एकराच्या तीन एमआयडीसी ज‍िल्ह्यात न‍िर्माण करण्यासाठी शासकीय जम‍िन महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिल्या. श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे  शेती महामंडळांची १८० कोटींची जमीन एमआयडीसीसाठी उपलब्ध करून देण्यात आली. यातून  अहमदनगर व नाश‍िक व‍िभागातील तरूणांना रोजगार उपलब्ध होणार आाहे. प्रास्ताविकात जिल्हाधिकारी श्री. सालीमठ म्हणाले की, या विभागीय रोजगार मेळाव्यासाठी ६४ हजार तरूणांनी नोंदणी केली आहे. यात ३०२ कंपन्या व आस्थापनांनी सहभाग घेतला आहे. यामेळाव्यातून १० हजार रोजगार न‍िर्माण होणार आहेत. ज‍िल्ह्यात घेण्यात आलेल्या गुंतवणूक पर‍िषदेच्या माध्यमातून ६४८ उद्योजकांसोबत सामंजस्य करार करून ५ हजार १४ कोटींची गुंतवणूक झाली आहे. कार्यक्रमात जिल्हा उद्योग केंद्राच्या पहिल्या निर्यात सुविधा केंद्राचे दूरदृष्‍य प्रणालीच्या माध्यमातून  मान्यवरांच्या हस्ते  उद्धाटन करण्यात आले.  जिल्हा उद्योग केंद्रामार्फत ‍ज‍िल्हा गुंतवणूक पर‍िषद सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या व देवाणघेवाण अहवाल प्रकाश‍ित करण्यात आला. यावेळी ज‍िल्ह्यातील व‍िव‍िध उद्योजक उपस्थ‍ित होते.  यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही  यूवक-युवतींना ॲप्रेंटीशिप नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

ज‍िल्ह्यात 23 हजार रोजगार न‍िर्माण होणार –  पालकमंत्री राधाकृष्ण व‍िखे पाटील Read More »