DNA मराठी

Pune News

img 20251122 wa0004

Pune News: कचरावेचक अंजुताईंना दहा लाख रुपयांची बॅग सापडली, पण अंजू ताईंचा प्रामाणिकपणा पाहून सॅल्यूट ठोकाल…

Pune News : स्वार्थाने भरलेल्या या जगामध्ये प्रामाणिक पणाची सुद्धा कमी नाही. कष्ट आणि प्रामाणिक पणाच्या तत्त्वांवर आयुष्य जगणारे अनेक लोक आपल्या आजूबाजूला वावरत असतात. अशीच एक प्रामाणिकपणाची आणि पैशांचा लोभ नसणाऱ्या पुण्यातील कचरावेचक मंजू माने यांची कथेची पुण्यात जोरदार चर्चा आहे. सदाशिव पेठेत कचरा वेचत रोजची कष्टाची लढाई लढणाऱ्या अंजू माने यांचा प्रामाणिकपणा पाहून संपूर्ण परिसर थक्क झाला आहे. 20 नोव्हेंबरची सकाळ… साधारण सात वाजता अंजूताई नेहमीप्रमाणे घराघरातून कचरा गोळा करत होत्या. त्याचवेळी रस्त्याकडेला एक बॅग पडलेली दिसली. ‘कशाची तरी औषधांची पिशवी असेल’ असा साधा अंदाज करून त्यांनी ती बॅग उचलून फीडर पॉइंटवर सुरक्षित ठेवली. पण नंतर जे दिसलं ते पाहून कोणाच्याही पायाखालची जमीन सरकावी! बॅगेत औषधांसोबत तब्बल दहा लाख रुपये होते. त्या क्षणी पैशाचा लोभ न होता, ‘ही कोणाच्या तरी आयुष्यभराची कमाई असेल’ एवढाच विचार अंजूताईंच्या मनात आला. वीस वर्षांपासून या भागात कष्टाने काम करत असल्यामुळे त्यांना इथलं प्रत्येक घर ओळखीचं. त्यांनी लगेचच लोकांना विचारपूस सुरू केली. तेवढ्यात एक नागरिक अतिशय अस्वस्थ होऊन काहीतरी शोधताना दिसला. अंजूताईंनी त्याला बसवून आधी पाणी दिलं, शांत केलं… आणि त्यांची बॅग हरवली आहे का ते विचारलं. तोंडातून शब्दच फुटेना! खात्री पटल्यावर अंजूताईंनी ती बॅग त्याच्याकडे परत दिली पैशाचा एक नोटही कमी न करता. या प्रामाणिकपणामुळे त्या माणसाच्या डोळ्यांत पाणी आलं आणि आसपासच्या नागरिकांच्या मनात अंजूताईंबद्दल प्रचंड आदर. लोकांनी स्वखुशीने साडी, थोडी रोख आणि भरभरून कौतुक देत त्यांचा सत्कार केला. अंजू माने यांची ही कृती म्हणजे खरा मानवीपणा कसा असतो याचं जिवंत उदाहरण. कष्टाची कामं करत असली तरी मन मात्र सोन्यासारखं हीच पुण्याची खरी शान. लाखो रुपयांची हाव मनात न ठेवता पैशांची बॅग परत करणाऱ्या अंजुमाने यांनी खरे लखमोलाची माणसं कशी असतात याच दर्शन घडवलं….

Pune News: कचरावेचक अंजुताईंना दहा लाख रुपयांची बॅग सापडली, पण अंजू ताईंचा प्रामाणिकपणा पाहून सॅल्यूट ठोकाल… Read More »

vijay kumbhar

Vijay Kumbhar : पार्थ पवारांना दिलेली “क्लिन चिट” म्हणजे केवळ विनोद; मुंढवा जमीन प्रकरणात विजय कुंभार भडकले

Vijay Kumbhar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार सध्या राज्यातील राजकारणात चर्चेत आहे. पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्यात त्यांचा नाव आल्याने पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी विरोधक करत आहे. तर आता मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना दिलेली “ क्लिन चिट” म्हणजे केवळ विनोद नाही तर ते महाराष्ट्राचं प्रशासन रसातळाला गेल्याचं लक्षण आहे अशी टीका सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे. विजय कुंभार म्हणाले की, मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना दिलेली “ क्लिन चिट” म्हणजे केवळ विनोद नाही तर ते महाराष्ट्राचं प्रशासन रसातळाला गेल्याचं लक्षण आहे. घोटाळ्याची सुरुवात ज्यातून झाली त्या LLP च्या ठरावावर त्यांची स्वतःची सही आहे. – जिल्हा उद्योग केंद्राकडून LOI – करोडोंच्या स्टॅम्प ड्युटीतून सूट – रजिस्ट्रेशनची सर्व प्रक्रिया प्रत्येक कागद त्यांच्या स्वाक्षरीमुळे शक्य झाला आणि तरीही ते “निर्दोष”! ही चौकशी नाही. हे प्रशासनाने राजकारण्यांशी – घराणेशाहीशी केलेलं संगनमत आहे. कागदपत्रांचा मार्ग सुरू होतो आणि संपतो तो पार्थ पवारांवर त्यामुळे क्लिन चिट देणं म्हणजे त्या व्यवहारात थेट सहभागी असणं असं विजय कुंभार यांनी म्हटले आहे.

Vijay Kumbhar : पार्थ पवारांना दिलेली “क्लिन चिट” म्हणजे केवळ विनोद; मुंढवा जमीन प्रकरणात विजय कुंभार भडकले Read More »

sheetal tejwani

Sheetal Tejwani : कोरेगाव पार्क जमीन प्रकरण : शीतल तेजवानीचा संशयास्पद भूतकाळ समोर…

Sheetal Tejwani : कोरेगाव पार्क परिसरातील सुमारे 40 एकरांचा भूखंड बेकायदेशीररीत्या लाटल्याप्रकरणी अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील यांच्या ‘अमेडिया कंपनी’चे नाव समोर येत आहे. या व्यवहाराबाबत सह जिल्हा निबंधक (वर्ग 1) संतोष अशोक हिंगाणे यांनी बावधन पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, जमीन विक्रेता शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील, तसेच सह दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य व्यक्ती ठरलेली शीतल तेजवानी हिच्याबद्दल आता नव्या आणि चक्रावून टाकणाऱ्या बाबी उघडकीस येत आहेत. प्राप्त माहितीनुसार, संबंधित 40 एकरांचा भूखंड हा मूळतः बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताब्यात होता. सरकारी ताब्यातील ही जमीन सोडवून तिच्या विक्रीसाठी तेजवानीने युक्ती रचल्याचे तपासात समोर आले आहे. तिने मूळ 272 मालकांना शोधून त्यांच्याकडून नाममात्र 10 ते 15 हजार रुपयांच्या मोबदल्यात कधीही रद्द न होणारी पॉवर ऑफ अटर्नी (POA) आपल्या नावावर घेतल्याचे समोर आले आहे. या व्यवहाराचा पाया हाच फसवणुकीवर आधारलेला असल्याचे तपास अधिकाऱ्यांच प्राथमिक निरीक्षण आहे. याच पार्श्वभूमीवर, 2025 साली तेजवानीने ‘अमेडिया कंपनी’च्या भागीदारीबद्दल माहिती मिळवून पुढील आर्थिक गणित आखले, असे सांगितले जाते. या कंपनीत पार्थ पवार यांचा 99 टक्के, तर दिग्विजय पाटील यांचा 1 टक्का हिस्सा आहे. हे गिऱ्हाईक लाभदायक ठरेल, हे लक्षात घेऊन तेजवानीने पुढील व्यवहार रचल्याची चर्चा आहे. मात्र, शीतल तेजवानीचा भूतकाळही संशयास्पद असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिचा पती सागर सूर्यवंशी हा सेवा विकास सहकारी बँक घोटाळ्याचा आरोपी असून, त्याची चौकशीदेखील झाल्याची नोंद आहे. या दाम्पत्यावर तब्बल 100 कोटी रुपयांहून अधिकचे कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. दस्तऐवजनुसार, सागर सूर्यवंशीने ‘रेणुका लॉन्स’च्या नावावर दोन वाहन कर्जे आहेत एक 1.16 कोटी आणि दुसरे 2.24 कोटी रुपये घेतली आहेत. शीतल तेजवानीनेही दोन वाहनांसाठी 4.80 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे नोंदीत आढळते. त्याशिवाय सागर सूर्यवंशीने ‘सागर लॉन्स’च्या नावावर 16.48 कोटींचे कॅश क्रेडिट कर्ज, तर शीतल तेजवानीवर स्वतंत्र 10 कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे समोर आले आहे. तिच्या ‘पॅरामाउंट इन्फ्रा’ या कंपनीवर 5.95 कोटी, तर ‘रेणुका लॉन्स’च्या नावावर आणखी 5.25 कोटींचे कर्ज असल्याने, या दाम्पत्याची एकत्रित थकबाकी कोट्यवधी रुपयांत गेल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, शीतल तेजवानी सध्या कुठे आहे, तिचे कार्यालय कुठे आहे तसेच,ती कुठे कामकाज पाहते, याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र, कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी ही अत्यंत महत्त्वाचे दुवा असल्याने, तिच्या चौकशीमधून अमेडिया कंपनी आणि पार्थ पवार यांच्यातील संबंधांवर नव्या माहितीचा पडदा उघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढे या प्रकरणात काय ट्वीस्ट येतो आणि काय नवीन बाबी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तूर्तास याप्रकरणी पार्थ पवारांच नाव समोर आल्यानंतर कुठल्याही चुकीच्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असं अजित पवारांनी सांगितलं आहे मात्र, प्रत्यक्षात काय होतं हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे.

Sheetal Tejwani : कोरेगाव पार्क जमीन प्रकरण : शीतल तेजवानीचा संशयास्पद भूतकाळ समोर… Read More »

crime

Pune Crime: धक्कादायक, अंधश्रद्धेच्या जाळ्यात आयटी अभियंता अडकला; भोंदूनी 14 कोटींचा गंडा घातला…

Pune Crime: पुण्यात अंधश्रद्धेचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील एका आयटी क्षेत्रातील अभियंत्याची तब्बल 14 कोटी रुपयांची फसवणूक एका तथाकथित ‘गुरु’ आणि त्याच्या शिष्येने केल्याचे उघड झाले आहे. ‘दैवी शक्ती अंगात येते’ या नावाखाली या भोंदू जोडीने अभियंता आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक व मानसिकपणे मोठी फसवणूक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फसवणुकीचा बळी ठरलेले अभियंता दीपक डोळस हे काही वर्षे इंग्लंडमध्ये नोकरी करत होते. त्यांच्या दोन मुली आजारपणाने त्रस्त असल्याने त्यांनी उपचारासाठी अनेक ठिकाणी धावपळ केली. त्याच काळात त्यांची ओळख राजेंद्र उर्फ दीपक खडके आणि त्याची शिष्या वेदिका पंढरपुरकर यांच्याशी झाली. या दोघांनी ‘शंकर महाराज आमच्यात अवतरतात आणि ते दुर्धर आजार बरे करतात’ असा दावा करत डोळस कुटुंबाचा विश्वास संपादन केला. वेदिका हिने स्वतःच्या अंगात ‘शंकर महाराज’ आले आहेत असा आभास निर्माण केला. त्यानंतर त्यांनी डोळस यांना सांगितले की, पूजा करून आणि धन ‘दैवी शक्ती’साठी वापरल्यास त्यांच्या मुलींचे आजार दूर होतील. या बहाण्याने दोघांनी डोळस दांपत्याकडील सर्व बँक ठेवी आणि बचत निधी आपल्या खात्यात वळवून घेतला. एवढ्यावर न थांबता, डोळस यांचे इंग्लंडमधील घर आणि फार्महाऊस विकून त्याचे पैसेही वेदिका पंढरपुरकरच्या खात्यात जमा करण्यात आले. तरीही मुलींच्या तब्येतीत सुधारणा न झाल्याने डोळस यांनी कारण विचारले असता, खडके-पंढरपुरकर जोडीने त्यांच्या घरात ‘दोष’ असल्याचे सांगून आणखी पैसे मागितले. त्यांनी पुण्यातील मालमत्ता विकण्यास सांगितले, आणि जेव्हा काहीच उरले नाही, तेव्हा घरावर आणि वैयक्तिक कर्ज काढण्यास भाग पाडले. 2018 पासून सुरू असलेल्या या फसवणुकीतून या भोंदू जोडीने एकूण 14 कोटी रुपये डोळस यांच्याकडून घेतले. पोलिस तपासात समोर आले आहे की, या पैशातून दोघांनी कोथरुडमधील महात्मा सोसायटी परिसरात एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. या घटनेनंतर डोळस कुटुंबाचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले असून, सध्या पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली होत असलेल्या अशा आर्थिक फसवणुकीने पुन्हा एकदा समाजात जागरूकतेची गरज अधोरेखित केली आहे.

Pune Crime: धक्कादायक, अंधश्रद्धेच्या जाळ्यात आयटी अभियंता अडकला; भोंदूनी 14 कोटींचा गंडा घातला… Read More »

Crime

Pune Crime: पुण्यात पुन्हा गोळीबार अन् कोत्याने वार; एकाचा जागीच मृत्यू

Pune Crime: मागील काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्याने आता पुण्यातील कायदे सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात गोळीबार झाला असून या गोळीबारात एक जणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोंढवा परिसरात गोळीबार झाला असून या गोळीबारात एक जणाचा मृत्यू झाला आहे. कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात गुन्हेगाराकडून गोळीबार करण्यात आला आणि या गोळीबाळात गणेश काळे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. माहितीनुसार, गणेश काळे हा आंदेकर टोळीतील दत्ता काळे याचा भाऊ आहे. आरोपीने एकूण 4 गोळ्या झाडल्या यानंतर गणेश काळे वर कोयत्याने वार करण्यात आला ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. गणेश काळे याचा भाऊ दत्ता काळे हा आंदेकर टोळीतील नंबरकारी असून आयुष कोमकर हत्या प्रकरणात आरोपी होता. आयुष कोमकर हत्याप्रकरणी दत्ता काळे याला अटक करण्यात आली होती.

Pune Crime: पुण्यात पुन्हा गोळीबार अन् कोत्याने वार; एकाचा जागीच मृत्यू Read More »

ajit pawar

Ajit Pawar: खेळाडूंवर क्रीडा मंत्र्यांकडून कोणताही दबाव नाही; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे स्पष्टीकरण

Ajit Pawar : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या सध्याच्या कार्यकारिणीच्या काही सदस्यांच्या कार्यपद्धतीवर शंका घेऊन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि विधान परिषदेतील आमदार संदीप जोशी यांनी काल पत्रकार परिषदेत केलेले सर्व आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळले असून त्यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. सन २०१३ पासून आपण महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.या कालावधीत खेळाचा दर्जा सुधारावा, खेळाडूंना उच्च दर्जाच्या सुविधा मिळाव्यात,म्हणून सर्वांना सोबत घेऊन आपण काम केले. आम्ही कार्यभार घेण्याआधी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र राज्य सातव्या/ आठव्या स्थानावर होते.पण सलग मागील तीन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र आता प्रथम क्रमांकावर आहे. या यशाबद्दल महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या पथकाचे आणि  पदाधिकाऱ्यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये सत्कारही झाले आहेत. प्रदीप गंधे,संजय शेटे, स्मिता शिरोळे, नामदेव शिरगावकर, धनंजय भोसले आधी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि खेळाडूंच्या मेहनतीमुळे हे सगळं शक्य झालं. अस असताना केवळ निवडणुकांवर डोळा ठेऊन काही राजकीय व्यक्ती,संघटनेच्या एका विशिष्ट व्यक्तीला टार्गेट करण्यासाठी विविध आरोप राजकीय हेतूने करत आहेत, हे वागणे महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीला शोभणारे नाही. खेळाडूंची अशी कोणतीही तक्रार नसून,असे आरोप कोणत्याही खेळाडूने अद्याप केलेले नाहीत,असे अजित पवार स्पष्ट केले आहे.   उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की,१३ कोटीच्या भ्रष्टाचाराचा  राजकीय आरोप ज्या पदाधिकाऱ्यावर केला आहे,  तो पदाधिकारी खजिनदारही नाही.संघटनेकडे जो निधी येतो तो कोणा एका पदाधिकाऱ्याच्या हातामध्ये नसतो. संपूर्ण एक्झिक्यूटिव्ह कौन्सिल त्याच्यावर देखरेख करत असते. तिच्या मान्यतेने तो खर्च होतो.या खर्चाचा हिशेब खजिनदार ठेवतात.संघटनेचे खजिनदार म्हणून धनंजय भोसले यांच्या अखत्यारीमध्ये त्याचे हिशोब होते. प्रत्येक राष्ट्रीय स्पर्धेमध्ये विविध खेळांसाठी महाराष्ट्राचे साधारणतः ८०० ते १०००  खेळाडू सहभागी होतात. या सर्व सहभागी खेळाडूंना स्पर्धेच्या ठिकाणी जाण्या- येण्यासाठी विमान प्रवासाची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली. आवश्यक प्रशिक्षण शिबिरे घेण्यात आली होती. महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेच्या रचनेनुसार संलग्न विविध खेळांच्या ३० संघटनांकडून देखील शासनाकडून आलेल्या निधीतील बराचसा  निधी वापरला जातो आणि त्याचा हिशोब त्यांच्याकडून आल्यानंतर तो एकत्रित करून क्रीडा विभागाला तो सादर करण्यात येतो. त्या संघटनांनी हिशेब दिल्याशिवाय ऑलिंपिक असोसिएशनला शासनाला एकत्रित हिशेब देणे शक्य होत नाही. तेव्हा खऱ्या दोषी या हिशेब न देणाऱ्या संघटना असतात.अशा दोषी संघटनांमध्ये मोहोळ यांची संघटना व त्यांना पाठिंबा देणाऱ्या ५/६ संघटना आहेत. त्यांनी त्वरित हिशेब द्यावेत. त्यांनी हिशेब न दिल्याने असोसिएशनला हिशेब देणे शक्य झाले नाही,हे विचारात घेऊनच शासनाने हिशेब सादर करण्यास दोन महिने मुदतवाढ दिली आहे. प्रत्येक राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी शासन चार ते पाच कोटी रुपयांचे अनुदान देते.हे अनुदान महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन त्यांच्या संलग्न ३० संघटनांच्या माध्यमातून खर्च करत असते.या सर्व हौशी,विश्वस्त संस्था असल्यामुळे त्यांच्याकडे शासकीय यंत्रणेप्रमाणे पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्यामुळे हिशोब येण्यास उशीर होतो. ही एक फार महत्त्वाची बाब आहे,याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष वेधले आहे.   ३६ व्या आणि ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा हिशोब क्रीडा विभागाला असोसिएशनकडून याआधीच सादर झालेला आहे. ३८ व्या स्पर्धेचा हिशोब मात्र वेगवेगळ्या टप्प्यावर प्रक्रियेमध्ये असून सदस्य संघटनांकडून तो अद्याप प्राप्त झालेला नाही. मोहळांच्या संघटनेकडून आणि त्यांच्यासोबत असलेल्या अन्य पाच सहा संघटनांकडून देखील अद्याप हिशोब सादर करण्यात आलेले नाही. त्याचबरोबर अन्य दहा-बारा संघटनांचा देखील हिशोब आलेला नाही. तो एकत्रित करून उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही प्रक्रिया सुरू असताना केवळ हिशेब सादर झाला नाही म्हणून त्यांनी भ्रष्टाचार केला, असे म्हणणे योग्य नाही.  महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन ही धर्मादाय संस्था आहे. तेव्हा या संस्थेविरुद्धच्या तक्रारी धर्मादाय आयुक्तांकडे होणे आवश्यक होते.असे न करता,केवळ हिशेब सादर केले नाही म्हणून राजकीय दबावापोटी पहाटे तीन वाजता ऑलिंपिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला जातो.यात पोलिसांवर कोणी दबाव टाकला, हे संदीप जोशींनी सांगावं, असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.   ही निवडणुक पुढे ढकलण्याचेही प्रयत्न झाले. ती पुढे ढकलण्यासाठी उच्च न्यायालयात एकूण सहा प्रकरणे दाखल झाली होती .पण न्यायालयाने ती सर्व फेटाळून लावली. जी प्रकरणे न्यायालयात फेटाळून लावली,त्यात ज्या गोष्टी,कारणे नमूद होती,ती सर्व कारणे न्यायालयाने फेटाळली असताना,त्याच गोष्टींसाठी पुन्हा तक्रारी,गुन्हे दाखल झाले. पोलीसांना  तक्रारी घेण्यास भाग पाडण्यात आले. पोलिसांमध्ये तक्रारी करून संबंधित पदाधिकाऱ्यांना त्रास देण्यास  सुरुवात केली.निवडणुकीसाठी नेमलेल्या निवडणूक अधिकारी,जे सेवानिवृत्त न्यायाधीश आहेत,त्यांना पोलिसांनी राजकीय तक्रारीवरून पोलिस स्टेशनमध्ये चौकशी साठी बोलावले.हे सर्व कोणाच्या दबावाने झाले, हे संदीप जोशींनी सांगावे असा सवालही अजित पवार यांनी केला आहे.  क्रीडा संघटनाच्या निवडणुकांमध्ये राजकारण नको म्हणून आपण हे सर्व सहन केलं. कुठलेही राजकीय भाष्य अद्याप पर्यंत केल नाही. पण आता तेच जर पत्रकार परिषद घेऊन आरोप करत असतील,तर त्याला उत्तर देणे आवश्यक आहे,म्हणून आपण हे स्पष्टीकरण देत असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री दबाव टाकण्याची भाषा करतात असे ते म्हणतात. त्यांच्यासाठीही अनेक मंत्र्यांपासून केंद्रीय स्तरावरील पदाधिकाऱ्यांचे फोन मतदारांना  येत आहेत. याला काय दबाव म्हणायचं ?मुख्यमंत्र्यांनीही बऱ्याच क्रीडा संघटनांना वर्षा बंगल्यावर अलीकडेच बोलावले होते. म्हणजे त्यांनी दबाव आणला असे आम्ही म्हणणार नाही. केवळ ऑलिंपिक असोसिएशन नाही,तर अनेक संघटनांनी अद्याप निधीच्या खर्चाचे हिशेब दिलेले नाहीत.   केंद्रीय मंत्री मुरलीधर  मोहोळ यांच्या संस्थेला राज्यस्तर कुस्ती स्पर्धेसाठी शासनाने अनुदान म्हणून सन २०२३- २०२४ साठी दिलेल्या १ कोटी एवढ्या रकमेचा हिशेब अद्याप शासनास सादर केलेला नाही.अजूनही बऱ्याच संघटनांना हिशेब सादर करणे शक्य झालेले नाही.म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार केला असे होत नाही.हिशेब सादर केले नाही, म्हणून या  सर्वांवर पोलीस केस दाखल करावी का ? वा भ्रष्टाचार केल्याचे आरोप करावेत का ? … असे करणे मला योग्य वाटत नाही. खेळात खिलाडूपणा पाहिजे.सुडाची भावना नको,या मताचे आम्ही आहोत. मोहोळांच्या संघटनेसह प्रत्येक संघटनेने आपापले हिशोब वेळेत द्यावेत,म्हणजे आमच्या असोसिएशनला वेळेत हिशेब सादर करता येतील,अशी विनंती अजित पवार यांनी केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा स्वरूपाचे राजकीय आरोप क्रीडा संघटनांच्या निवडणूक प्रक्रियेत होणं हे काहीस अस्वस्थ करणार आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये आपण गेली अनेक वर्षे कार्यरत आहोत. आमचे काम संघटनांना आवडत असेल तर संघटना आम्हाला निवडून देतील. आतापर्यंत माझ्यासह, माझ्या सहकाऱ्यांनी केलेले कार्य पाहून पुन्हा आमच्या हातात पुन्हा ही सूत्र दिली जातील,असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Ajit Pawar: खेळाडूंवर क्रीडा मंत्र्यांकडून कोणताही दबाव नाही; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे स्पष्टीकरण Read More »

mns

Raj Thackeray: मनविसेकडून ABVP कार्यालयाला टाळं, प्रत्युत्तरात ABVP चीही घोषणाबाजी…

Raj Thackeray: पुणे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (मनविसे) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. वाडिया कॉलेज परिसरात ABVP ने ‘बायकॉट मनविसे’ अशी पोस्टर्स लावल्याचा आरोप करत मनविसे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. या निषेधार्थ मनविसे कार्यकर्त्यांनी टिळक रोडवरील ABVP च्या पुणे कार्यालयावर धडक देत कुलूप ठोकले. कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत त्यांनी जोरदार आंदोलन केले. मनविसेच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की ABVP जाणूनबुजून वाद निर्माण करत आहे. दरम्यान, या घटनेनंतर ABVP कार्यकर्त्यांनीही त्यांच्या बंद कार्यालयाबाहेर प्रतिउत्तरात घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले. त्यामुळे पुण्यात दोन्ही विद्यार्थी संघटनांमध्ये संघर्षाचे वातावरण चिघळले आहे. दरम्यान आता यामध्ये पोलिसांनी मध्यस्थी केली असून पुढील कारवाई सुरू केली असल्याची माहिती कृषिकेश रावले,पोलीस उपायुक्त झोन-1 यांनी दिली.

Raj Thackeray: मनविसेकडून ABVP कार्यालयाला टाळं, प्रत्युत्तरात ABVP चीही घोषणाबाजी… Read More »

Crime 1

Pune Crime News : पुण्यात तलवारीचा थरार, घरात घुसून महिलेस व मुलास मारहाण

Pune Crime News: पुण्यातील येरवडा परिसरात एक धक्कादायक घटना घडली. माहितीनुसार, लक्ष्मीनगर येथे रविवारी सकाळी चार जणांनी घरात शिरून एका महिलेस आणि तिच्या मुलावर तलवारीने हल्ला केला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण आहे. फिर्यादी रहीसा महंमद शेख (वय 44, रा. कामराजनगर, येरवडा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जहूर शेख (28), सुलतान खान (20), आझाद खान (22) आणि मुस्तफा खान (21) हे सर्व एकाच परिसरातील रहिवासी असून, अचानक त्यांच्या घरात घुसले. “माझ्या आईला का मारले?” असा प्रश्न विचारत जहूर शेख याने हातातील तलवारीने फिर्यादी महिला आणि तिच्या मुलगा साजिदवर वार केले. यात दोघे गंभीर जखमी झाले. दरम्यान इतर आरोपींनी घरातील वस्तूंचे नुकसान केले तसेच शिवीगाळ करत दहशत निर्माण केली. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. आरोपींनी केलेल्या हल्ल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, नागरिकांनी पोलिसांकडून तत्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Pune Crime News : पुण्यात तलवारीचा थरार, घरात घुसून महिलेस व मुलास मारहाण Read More »

img 20251006 wa0006

Pune Crime News: धक्कादायक, गुन्हे शाखेच्या हवालदारावर कोयत्याने हल्ला

Pune Crime News: गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारी वाढत असल्याने नागरिकांमध्ये आता भीतीची वातावरण निर्माण होत आहे. यातच आता पोलिसांवरच हल्ल्यांच्या घटना घडू लागल्याने कायदा-सुव्यवस्थेची स्थिती किती गंभीर झाली आहे. रविवारी पुण्यात एक धक्कादायक घटना घडली ज्यामुळे पुण्यातील कायद्याव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री डेक्कन परिसरात गुन्हे शाखा युनिट-3 मध्ये कार्यरत असलेले पोलीस हवालदार अमोल काटकर (बकल क्र. 7835) यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. ही घटना लॉ कॉलेज रोडसमोर घडली. मिळालेल्या माहितीनुसार काटकर हे शनिवारी रात्री ड्युटी संपवून आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना रात्री सुमारे एकच्या सुमारास हा प्रकार घडला. अचानक आलेल्या दोन दुचाकीस्वारांनी अज्ञात कारणावरून त्यांच्यावर कोयत्याने वार केला. यात त्यांच्या डोक्याच्या मागील भागाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. प्राथमिक तपासात ‘कट मारल्याच्या’ वादातून हल्ला झाल्याची चर्चा आहे. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून डेक्कन पोलीस ठाण्याने त्यांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरुवात केली असून, आरोपींना अटक करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा पुण्यात पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यावरच असा हल्ला होणे हे अत्यंत गंभीर असल्याचे पोलिस वर्तुळात बोलले जात आहे.

Pune Crime News: धक्कादायक, गुन्हे शाखेच्या हवालदारावर कोयत्याने हल्ला Read More »

screenshot 2025 09 06 19 15 45 11 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

Pune Ganesh Visarjan 2025 : मोठी बातमी, गणेश विसर्जनादरम्यान दोन युवकांचा मृत्यू

Pune Ganesh Visarjan 2025 : पुणेसह संपूर्ण राज्यभरात आज गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. तर दुसरीकडे एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक इथे गणेश विसर्जनादरम्यान दोन युवकांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरातून याविषयी हळहळ व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे ठिकठिकाणच्या विहिरी तलाव नद्या याठिकाणी विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने नागरिकांनी सर्तक रहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Pune Ganesh Visarjan 2025 : मोठी बातमी, गणेश विसर्जनादरम्यान दोन युवकांचा मृत्यू Read More »