DNA मराठी

PM Modi

onion farmers

Onion Farmers : कांद्याचे दर कोसळले; संतप्त शेतकऱ्यांचा नगर-कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Onion Farmers : कांदा पिकवूनही हातात काहीच राहत नाही, मग जगायचं कसं? असा आक्रोश करत कांदा उत्पादक शेतकरी शुक्रवारी रस्त्यावर उतरले. कांद्याच्या भावात झालेल्या अभूतपूर्व घसरणीमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नगर-कल्याण महामार्गावरील टाकळी ढोकेश्वर येथे जोरदार रास्ता रोको आंदोलन छेडत शासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. कांद्याला योग्य हमीभाव मिळावा, प्रतिक्विंटल १५०० रुपये अनुदान द्यावे, निर्यातबंदी तात्काळ उठवावी तसेच बाजार समित्यांमधील दलाली आणि शोषण बंद करावे, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. कष्ट आमचे, नफा व्यापाऱ्यांचा आणि तोटा शेतकऱ्यांचा, ही व्यवस्था आता चालणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरकांद्या सह रस्त्यावर ठिय्या मांडत सरकारच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त केला. अनेक शेतकरी अक्षरशः डोळ्यात पाणी आणून आपल्या व्यथा मांडताना दिसून आले. यंदा उत्पादन खर्च प्रचंड वाढला असताना बाजारात कांद्याला अत्यल्प दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. एकीकडे खत, औषधे, मजुरी आणि वाहतूक खर्च वाढत असताना दुसरीकडे बाजारात कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरत नसल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली. दलालांकडून शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी शासनावर गंभीर आरोप करत बाजार समित्यांमध्ये व्यापारी आणि दलालांकडून शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप केला. तसेच साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रवींद्र राजदेव यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन सुरू असून परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने तातडीने लक्ष दिले नाही तर पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. कांद्याच्या दरघटीमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचा संताप आता रस्त्यावर उतरला असून, शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर आंदोलन तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Onion Farmers : कांद्याचे दर कोसळले; संतप्त शेतकऱ्यांचा नगर-कल्याण महामार्गावर रास्ता रोको Read More »

rbi

Foreign Exchange Reserves : भारताच्या परकीय चलन साठ्यात 37.8 अब्ज डॉलर्सची घट; अर्थव्यवस्थेवर काय होणार परिणाम?

Foreign Exchange Reserves : अमेरिका – इराण युद्धाचा फटका आता भारतीय अर्थव्यवस्थेला बसताना दिसतोय. या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 104 च्या वर गेल्याने देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढत आहे. यातच देशाची सर्वात मोठी बँक भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आलेल्या आकडेवारीने देशाच्या चिंतेत वाढ केली आहे. या आकडेवारीनुसार, गेल्या दोन महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी ते मे 2026 पर्यंत भारताच्या परकीय चलन साठ्यात सुमारे 37.8 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. अवघ्या दोन महिन्यात इतकी मोठी घट झाल्याने देशात आता महागाई नियंत्रित करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना काटकसरीचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर देशात पुन्हा एकदा परकीय चलन साठा चर्चेचा विषय बनला आहे. एक वर्षासाठी सोन्याची खरेदी करणे टाळावे, परदेश प्रवास पुढे ढकलावे आणि इंधनाचा वापर कमी करावा असं आवाहन देशातील नागरिकांना पंतप्रधान मोदींकडून हैदराबाद येथे आयोजित सभेत बोलताना करण्यात आले होते. परकीय चलन साठा म्हणजे देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे डॉलर, सोने आणि इतर विदेशी चलनांचा साठा. भारतात या साठ्याचे व्यवस्थानप आरबीआयकडून करण्यात येते. परकीय चलन साठा आयात खर्च, रुपयाची स्थिरता आणि आर्थिक संकटाच्या काळात खूप महत्त्वाचा मानला जातो. ताज्या आकडेवारीनुसार, सध्या भारताचा परकीय चलन साठा 690.69 अब्ज डॉलर इतका असून हा साठा फेब्रुवारी 2026 मध्ये 728.49 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर होता. मात्र अवघ्या दोन महिन्यांत जवळपास 37.8 अब्ज डॉलरची घट झाली असल्याची माहिती आरबीआयकडून देण्यात आलीय. तज्ज्ञांच्या मते, रुपयाला आधार देण्यासाठी RBI कडून डॉलर विक्री करण्यात आली. याशिवाय कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमती, परदेशी गुंतवणूक बाहेर जाणे आणि जागतिक तणाव यामुळे डॉलरची मागणी वाढली. त्याचा थेट परिणाम भारताच्या परकीय चलन साठ्यावर झाला. भारत परकीय चलन कसे मिळवतो? भारत निर्यातीद्वारे, परकीय गुंतवणुकीद्वारे (FDI/FPI) आणि परदेशातून येणाऱ्या पैशांद्वारे परकीय चलन मिळवतो. जेव्हा भारत इतर देशांना वस्तूंची विक्री करतो, तेव्हा त्याला परकीय चलनाच्या स्वरूपात मोबदला मिळतो. याव्यतिरिक्त, जेव्हा परदेशात वास्तव्यास असलेले भारतीय नागरिक आपल्या मायदेशी असलेल्या कुटुंबाला पैसे पाठवतात, तेव्हा परदेशातून येणारा हा पैसा (रेमिटन्स) देशासाठी परकीय चलनाचा एक महत्त्वपूर्ण स्रोत ठरतो. या सर्व स्रोतांपासून प्राप्त होणाऱ्या परकीय चलनाचा समावेश देशाच्या अधिकृत परकीय चलन साठ्यामध्ये करून, त्याचे व्यवस्थापन RBI द्वारे केले जाते. आरबीआयच्या सहामाही ‘राखीव निधी व्यवस्थापन अहवालानुसार’, मार्च 2026 च्या अखेरीस भारताचा परकीय चलन साठा 691.11 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. सुमारे 11 महिन्यांच्या आयात खर्चाची (import bills) पूर्तता करण्यासाठी हा साठा पुरेसा मानला जातो. या अहवालानुसार, भारताच्या राखीव साठ्यामध्ये सोन्याचा वाटाही वाढला आहे. मार्च 2026 पर्यंत, देशाच्या एकूण परकीय चलन साठ्यामध्ये सोन्याचे प्रमाण 16.7 टक्क्यांपर्यंत वाढले तर सप्टेंबर 2025 मध्ये हे प्रमाण 13.92 टक्के होते. मार्च 2026 च्या स्थितीनुसार, भारताकडे एकूण 880.52 मेट्रिक टन सोन्याचा साठा होता, ज्यापैकी सुमारे 680.05 मेट्रिक टन सोने देशांतर्गत (भारतातच) साठवून ठेवण्यात आले आहे. आरबीआय आणि इतर जागतिक संस्थांच्या अंदाजानुसार, मे 2026 च्या सुमारास भारताचा परकीय चलन साठा $700 अब्ज डॉलर्सच्या वर असणे अपेक्षित होते मात्र भारताला अपेक्षित साठा गाठता आला नाही. अपेक्षित साठा गाठता आल्या नसल्याने देशात महागाई वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Foreign Exchange Reserves : भारताच्या परकीय चलन साठ्यात 37.8 अब्ज डॉलर्सची घट; अर्थव्यवस्थेवर काय होणार परिणाम? Read More »

Sharad Pawar

Sharad Pawar On PM Modi : अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होणार, मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar on PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथे बोलताना देशातील नागरिकांना पुढील एका वर्षासाठी सोने खरेदी टाळण्याचे तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या बचतीसाठी जास्तीत जास्त वर्क फ्रॉर्म होम आणि विदेशी प्रवास टाळण्याचे आवाहन केल्याने देशात सध्या खळबळ उडाली आहे. विरोधक मोदी यांच्या या आहवानानंतर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे. तर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांनी देखील यावर भाष्य करत प्रधानमंत्र्यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्व पक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय-प्रक्रिया राबविण्याचा सल्ला दिला आहे. शरद पवार यांनी एक्सवर म्हटले आहे की, मध्यपूर्वेतील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या. त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब निश्चितच काळजी निर्माण करणारी आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रधानमंत्र्यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्व पक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय-प्रक्रिया राबविणे देशहितासाठी अत्यंत आवश्यक आहे. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने अधिक संवेदनशीलता आणि व्यापक सल्लामसलत यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. यासोबतच प्रधानमंत्र्यांनी देशातील नामवंत अर्थतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि संबंधित तज्ज्ञांची तातडीने बैठक बोलावून परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा. पुढील धोरणांबाबत व्यापक विचारविनिमय करावा. देशातील जनतेमध्ये विश्वास आणि स्थैर्य निर्माण करणे, यालाच सद्यस्थितीत सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, अशी आमची ठाम भूमिका आहे असं शरद पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. नरेंद्र मोदींनी देशाला कोणती आवाहनं केली? पुढील एका वर्षासाठी सोन्याची खरेदी टाळा वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा नैसर्गिक शेतीचा अवलंब करा परदेश प्रवास टाळा खाद्यतेलाचा वापर कमी करा

Sharad Pawar On PM Modi : अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होणार, मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया Read More »

raj thackeray

Raj Thackeray on PM Modi: चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?  काटकसरीच्या आवाहनानंतर राज ठाकरे भडकले

Raj Thackeray on PM Modi:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना पुढील एका वर्षासाठी पेट्रोल आणि डिझेल जपून वापरण्याचा सल्ला दिला आहे. तसेच सोने खरेदी टाळा असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यावर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी मोदी यांना पत्र लिहित चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ? असा प्रश्न विचारला आहे. राज ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी तमाम भारतीयांना काटकसर करण्याचं आवाहन केलं. सोनं खरेदी कमी करा किंवा जवळपास थांबवाच, परदेशात गरज नसेल तर जाऊ नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, विजेवर चालणाऱ्या गाड्या जास्त वापरा, वर्कफ्रॉम होमचा पर्याय स्वीकारा इत्यादी इत्यादी. हे सगळं का ? तर, सोनं, पेट्रोल डिझेल हे आयात करावं लागतं आणि त्यात विदेशी गंगाजळी मोठ्या प्रमाणवर खर्च होते. आणि सध्या इराण युद्धामुळे खनिज तेलाचे भाव प्रचंड वाढलेत. बरं, मग स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काही शे गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढत आहेत, स्वतःवर फुलं उधळून घेत आहेत त्याचं काय करणार आहात आपण ? आमच्याकडून चूक झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून, यापुढे माझ्यासकट कोणीही काही असं करणार नाही असं सांगणार आहात का ? चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ? सध्या खनिज तेलाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव हा साधारणपणे ९० ते १०० डॉलर्स प्रति बॅरल असा आहे. हा भाव जगाने या आधी कधी पाहिला नाही असं नाही. २००८ ला पुढे २०११-२०१२ मध्ये अरब स्प्रिंगच्या वेळेस, २०१३-२०१४ च्या काळात ( जेंव्हा भाजपवाले खनिज तेलाच्या किंमती आणि देशाची इभ्रत यावर तावातावाने बोलत होते तो काळ ), पुढे अशीच परिस्थिती २०२२ आणि २०२३ च्या दरम्यान जेंव्हा ओपेकने खनिज तेलाचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा देखील बॅरलचा भाव ९० ते १०० डॉलर्सच्या दरम्यान गेला होता. या घटनांपैकी ३ ते ४ वेळा मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि एकदा तर स्वतः मोदी पंतप्रधान होते. मनमोहन सिंगांनी असं आवाहन केलं नाही की तेंव्हा मोदींनी केलं नाही. मग आत्ताच का ? काटकसर करा हे आवाहन करताना खरं कारण देशाच्या आणि राज्याराज्यांच्या अर्थव्यवस्थेचं जे काही कंबरडं मोडून ठेवलं आहे त्याबद्दल पंतप्रधान काहीच बोलत नाहीयेत. बरं जेंव्हा बॅरलचा भाव ६० ते ६५ डॉलर्सच्या आसपास होता तेंव्हा पण तुम्ही चढ्या भावाने आम्हाला पेट्रोल डिझेल विकत होतात त्यावेळेस जे पैसे लोकांकडून घेतले जे काही लाख कोटी रुपये असतील ते कुठे गेले ? त्याचं काय झालं ? ज्या रेवडी संस्कृतीची पंतप्रधानांनी खिल्ली उडवली त्याच रेवड्या मग २०२४ ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक असो की त्यानंतरच्या बिहार, पश्चिम बंगाल निवडणूका असोत की इतर कुठल्याही निवडणुका ‘रेवड्या’ वाटूनच निवडणुका जिंकल्यात. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेने राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीला आणली. महिलांना सक्षम करायचं सोडून त्यांना तुटपुंजे पैसे द्यायचे आणि ते पैसे महागाईच्या रूपाने पुन्हा काढून घ्यायचे. देशाची आणि राज्याची अर्थव्यवस्था जर नाजूक झाली आहे तर या रेवड्या वाटू नका असं पंतप्रधान ठामपणे सांगणार आहेत का ? पेट्रोल, डिझेलच्या वापरात काटकसर करा असं पंतप्रधान सांगतात. ठीक आहे. मग हे आत्ताच का सुचलं ? पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि इतर राज्यांच्या निवडणुकीत प्रचार, रोड शो करताना आणि देशभरातून लाखो माणसं त्या त्या राज्यात नेताना जे कोट्यवधी लिटर्स पेट्रोल, डिझेल वाया गेलं तेंव्हा का नाही सुचलं ? या राज्यांमध्ये जो अफाट पैशाचा खेळ करून मतदान मिळवलं तेंव्हा का नाही सुचलं ? लोकांनी परदेशात जाणं टाळावं असं पंतप्रधान म्हणतात. पण किती टक्के लोकांना परदेशात जाणं आत्ता परवडत आहे ? ज्या वर्गाला परवडू शकतो त्यांना पुढच्या महिन्यात आपली कंपनी आपल्याला कामावर ठेवेल का याची खात्री नाही. विद्यार्थ्यांना परदेशात शिकायला जावंस वाटतं कारण गेल्या १० ते ११ वर्षांत आपण शिक्षणात फार मूलभूत गुंतवणूक पण केली नाही भारतात रहावं असं वाटावं असं वातावरण पण निर्माण केलं नाही. शिक्षणात फक्त हिंदी कशी लादता येईल याकडे सगळं लक्ष लागलेलं. गेले काही महिने विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून अंग काढून घेत आहेत. एक अंदाज असा आहे जवळपास दीड लाख करोड रुपये गेल्या तीन महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतलेत. भारतात विदेशी गुंतवणूक होत नाहीये. पंतप्रधान आणि त्यांचे मुख्यमंत्री फक्त गुंतवणुकीचे करार करतात, त्यासाठी थंड हवेच्या देशांत जातात. बरं तिथे जाऊन भारतीय कंपन्यांसोबत करार करायचे मग त्यासाठी स्वित्झर्लंडला काय जायचं? स्वतः पंतप्रधान आता १५ मे पासून ५ देशांच्या परदेश दौऱ्यावर निघालेत, हे दौरे तुम्ही थांबवा. आणि मग लोकांना आवाहन करा असं राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटलं आहे.

Raj Thackeray on PM Modi: चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?  काटकसरीच्या आवाहनानंतर राज ठाकरे भडकले Read More »

varsha gaikwad

Varsha Gaikwad : पंतप्रधानांच्या सल्ल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी गाड्यांचा ताफा सोडून मेट्रो, बेस्ट व लालपरीने प्रवास करावा

Varsha Gaikwad : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अखेर देश संकटात आहे हे कबुल करून स्वतःचे अपयश मान्य केले आहे. १२ वर्षांपासून नरेंद्र मोदींनी देशाला वेठीस धरले आहे. निवडणुका, प्रचार व द्वेष पसरण्यापलिकडे भाजपा व मोदी सरकारने काहीही केलेले नाही. अमेरिका-इराण युद्धाचा फटका देशाला बसणार हे माहित असतानाही मोदी सरकारने कोणतेही नियोजन केले नाही, त्याचा मोठा फटका जनतेला बसत आहे. नरेंद्र मोदींच्या चुकांचे ओझे जनतेने का सहन करायचे? असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी विचारला आहे. नरेंद्र मोदींच्या विधानावर प्रतिक्रिया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, नरेंद्र मोदी स्वतः ८ हजार कोटी रुपयांचे विमान वापरतात, महागड्या वस्तू वापरतात, जनतेच्या पैशावर परदेश वाऱ्या करतात आणि पेट्रोल डिझेल कमी वापरा, सोने वर्षभर खरेदी करू नका, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा असे सल्ले जनतेला देत आहेत. नरेंद्र मोदी यांनी व त्यांच्या मंत्र्यांनीच आधीच काटकसर करण्याची सवय लावावी. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सल्ला प्रमाण मानून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गाड्यांचा ताफा घेऊन फिरण्यापेक्षा मुंबई, पुणे, नागपूर शहरात मेट्रो, सीटी बस व राज्यभरात लालपरीने प्रवास करून इंधन बचतीची सवय लावावी. देशासाठी एवढा त्याग करायला काय हरकत आहे. नरेंद्र मोदींचा सल्ला म्हणजे ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण’, असा आहे. संध्याकाळी जनतेला इंधन बचतीचा उपदेश देऊन दोन तासाने स्वतः मोदीच गाड्यांचा मोठा ताफा घेऊन फिरत होते, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या. सलग १२ वर्षांपासून सत्तेत असतानाही नरेंद्र मोदी यांना देशावर येणाऱ्या संकटासाठी नियोजन करता आले नाही, हे मोदी यांचे मोठे अपयश आहे. जनता आधीच महागाईने पिचलेली आहे, त्यात गॅस, इंधनाच्या संकटाने भर घातली आहे. पेट्रोल-डिझेल हे चैन किंवा उधळपट्टी नाही तर दररोजची गरज झालेली आहे. राहुल गांधी यांनी इराण युद्धाच्यावेळीच संकटाचा इशारा दिला होता पण मोदींच्या हुकुमशाही कारभारामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

Varsha Gaikwad : पंतप्रधानांच्या सल्ल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी गाड्यांचा ताफा सोडून मेट्रो, बेस्ट व लालपरीने प्रवास करावा Read More »

Gold

Gold Price Today: फक्त एका वर्षात भारताने आयात केले तब्बल 6 लाख कोटींचे सोने

Gold Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका जाहीर सभेत बोलताना पुढील एक वर्ष सोने खरेदी टाळा असे आवाहन केल्यानंतर देशातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे भारतातील सोन्याच्या आयातीबाबतची ताजी आकडेवारी अतिशय धक्कादायक आणि महत्त्वाची आहे. वाणिज्य मंत्रालयाने (Commerce Ministry) प्रसिद्ध केलेल्या २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या आकडेवारीनुसार माहिती खालीलप्रमाणे आहे. आयात मूल्य (Value in USD) २०२५-२६ या आर्थिक वर्षात भारताने ७१.९८ अब्ज डॉलर्स (सुमारे ₹६ लाख कोटी) किमतीचे सोने आयात केले आहे. ही आतापर्यंतची ऐतिहासिक उच्चांकी (Record High) वाढ आहे. २०२४-२५ मध्ये ही आयात ५८ अब्ज डॉलर्स होती. म्हणजेच एका वर्षात यात २४% वाढ झाली आहे. आयातीचे प्रमाण (Quantity in Tonnes) विशेष म्हणजे, सोन्याच्या किमती प्रचंड वाढल्यामुळे मूल्याच्या बाबतीत आयात वाढली असली, तरी सोन्याच्या वजनात (टक्केवारीनुसार) थोडी घट झाली आहे. २०२५-२६: ७२१.०३ टन तर २०२४-२५ : ७५७.०९ टन (प्रमाण सुमारे ४.७६% ने घटले आहे, पण किमती वाढल्याने देशाला जास्त पैसे मोजावे लागले आहेत.) आयात करणारे प्रमुख देश भारताला सोन्याचा पुरवठा करणाऱ्या देशांमध्ये हे देश आघाडीवर आहेत: स्वित्झर्लंड: सुमारे ४०% वाटा (सर्वात मोठा पुरवठादार). संयुक्त अरब अमिराती (UAE): सुमारे १६% वाटा. दक्षिण आफ्रिका: सुमारे १०% वाटा. अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम व्यापार तूट (Trade Deficit): एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोने आयात केल्यामुळे भारताची व्यापार तूट ३३३.२ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. परकीय चलन: भारताला हे सोने खरेदी करण्यासाठी डॉलर्समध्ये पेमेंट करावे लागते, ज्यामुळे आपल्या परकीय चलन साठ्यावर ताण येतो. याच कारणामुळे सरकारने नागरिकांना सोन्याची खरेदी काही काळ टाळण्याचे किंवा कमी करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून देशाचे परकीय चलन वाचवता येईल.

Gold Price Today: फक्त एका वर्षात भारताने आयात केले तब्बल 6 लाख कोटींचे सोने Read More »

LPG Gas Price

VBA on Gas Cylinder: गॅसचा काळाबाजार! तर आमदार खासदारांच्या दारासमोर चूल पेटवून आंदोलन करणार…वंचितने दिला इशारा

VBA on Gas Cylinder : वंचित बहुजन आघाडी, जामखेड तालुका यांच्या वतीने “नरेंद्र, कब मिलेगा सिलेंडर?” गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई काळाबाजार सर्वसामान्य जनतेची होणारी आर्थिक लुटमार या मुद्द्यावर वंचितच्या वतीने आंदोलन करण्यात आले. वंचितच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर चुल पेटवून आंदोलन करण्यात आले यावेळी वंचितचे प्रवक्ते अरुण जाधव म्हणाले की सध्या देशभरात गॅस सिलिंडरची भीषण व कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आलेली आहे. ही टंचाई नैसर्गिक नसून नियोजनबद्ध पद्धतीने तयार करण्यात आली असल्याचा ठोस संशय जनतेमध्ये निर्माण झाला आहे. याचाच फायदा घेत काळाबाजार करणारे दलाल व काही संबंधित यंत्रणा सर्वसामान्य नागरिकांची उघडपणे आर्थिक लूट करत आहेत. ९१६ रुपयांना उपलब्ध असणारा गॅस सिलिंडर जाणीवपूर्वक बाजारातून गायब करण्यात आला असून, तोच सिलिंडर ४,००० ते ५,००० रुपयांपर्यंत काळ्या बाजारात विकला जात आहे. ही परिस्थिती अत्यंत संतापजनक असून, यामागे कोणाचे संरक्षण आहे, असा थेट प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. महिला, गृहिणी, गरीब, श्रमिक व मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वयंपाकासाठी गॅस मिळत नसल्याने त्यांच्या घरातील चुली अक्षरशः विझल्या आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांना तासन्तास लांबच लांब रांगेत उभे राहूनही गॅस मिळत नाही. ही परिस्थिती अत्यंत अमानुष व असह्य बनली आहे. एकीकडे सर्वसामान्य जनता मूलभूत गरजांसाठी झगडत असताना, दुसरीकडे काळाबाजार करणारे लोक हजारो रुपये कमवत आहेत. ही परिस्थिती केवळ प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे व संबंधित यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे निर्माण झाली आहे, असे स्पष्टपणे दिसून येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भाजपा सरकारला जाब विचारण्यासाठी आणि जनतेच्या हक्कासाठी हे तीव्र आंदोलन उभारण्यात आले आहे असे म्हणाले तातडीच्या मागण्या 1. गॅस सिलिंडरची कृत्रिम टंचाई तात्काळ दूर करून पुरवठा सुरळीत करण्यात यावा. 2. काळाबाजार करणाऱ्या दलालांविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. 3. जादा दराने गॅस विक्री करणाऱ्या एजन्सींवर छापे टाकून त्यांचे परवाने तात्काळ रद्द करण्यात यावेत. 4. गॅस वितरण व्यवस्थेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. 5. सर्वसामान्य नागरिकांना योग्य दरात व नियमित गॅस पुरवठा हमीने उपलब्ध करून देण्यात यावा. जर वरील मागण्यांकडे तात्काळ लक्ष देऊन कार्यवाही करण्यात आली नाही, तर जनतेचा तीव्र रोष उफाळून येईल आणि हे आंदोलन आणखी व्यापक व तीव्र करण्यात येईल. त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन व सरकारची राहील, याची नोंद घ्यावी असा ईशारा अरुण जाधव यांनी देऊन जामखेड तहसीलदार धनंजय बांगर यांना निवेदन दिले.

VBA on Gas Cylinder: गॅसचा काळाबाजार! तर आमदार खासदारांच्या दारासमोर चूल पेटवून आंदोलन करणार…वंचितने दिला इशारा Read More »

chhagan bhujbal

Chhagan Bhujbal : राज्यात इंधनसाठा मुबलक; पेट्रोल, डिझेल व एलपीजी पुरवठा सुरळीत

Chhagan Bhujbal : राज्यातील इंधनपुरवठ्याबाबत कोणतीही टंचाई नसून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल), भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) आणि इंडियन ऑइल (आयओसीएल) यांच्या माध्यमातून राज्यभर इंधनाचे वितरण नियमित आणि सुरळीतपणे सुरू असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे. राज्यातील इंधनसाठ्याची स्थिती समाधानकारक तेल विपणन कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, २५ मार्च २०२६ रोजी राज्यातील इंधनसाठ्याची स्थिती समाधानकारक असून, पेट्रोलचा साठा 2,05,232 किलोलीटर, डिझेलचा साठा 4,67,603 किलोलीटर तर एलपीजीचा साठा 30,767 मेट्रिक टन इतका उपलब्ध आहे. हा साठा राज्याच्या गरजा पूर्ण करण्यास पुरेसा आहे. एलपीजीच्या दैनिक उत्पादनात वाढ तेल रिफायनरींकडून एलपीजीच्या दैनिक उत्पादनात वाढ करण्यात आली असून सर्व उत्पादक कंपन्या पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. त्यामुळे तेल विपणन कंपन्यांना नियमितपणे पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा होत आहे आणि पुरवठा साखळीमध्ये कोणताही अडथळा निर्माण झालेला नाही. इंधन वितरण यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा व नियमित साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही. इंधन वितरण यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत असून संबंधित विभागांकडून सातत्याने देखरेख ठेवली जात आहे. याशिवाय, खासगी क्षेत्रातील कंपन्यांकडे देखील पेट्रोलियम पदार्थांचा साठा उपलब्ध असल्याने एकूण पुरवठा अधिक सक्षम झाला आहे. नागरिकांना आवाहन नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवा, सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेश किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये. भीतीपोटी इंधनाचा साठा करण्याचा प्रयत्न करू नये किंवा एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पेट्रोल किंवा डिझेल खरेदी करू नये. पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळावी, ज्यामुळे वाहतूक कोंडी किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. तसेच, इंधनपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन व संबंधित कंपन्यांकडून सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून यावर नागरिकांनी विश्वास ठेवावा. कोणतीही शंका किंवा माहिती जाणून घेण्यासाठी केवळ अधिकृत शासकीय माध्यमांवरच अवलंबून राहण्याचे आवाहन अन्न नागरी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे. शासनाचे इंधन पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण सद्यस्थितीत केंद्र व राज्य शासन इंधन पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण ठेवून परिस्थिती प्रभावीपणे हाताळत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता शांतता व संयम राखून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.

Chhagan Bhujbal : राज्यात इंधनसाठा मुबलक; पेट्रोल, डिझेल व एलपीजी पुरवठा सुरळीत Read More »

prajakt tanpure

Prajakt Tanpure : नगर जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढला; प्राजक्त तनपुरे आक्रमक, थेट मोदींना पाठवले 20 हजार पत्र

Prajakt Tanpure :  नगर जिल्ह्यात गेल्या काही महिन्या पासून पुन्हा एकदा बिबट्याचा वावर वाढला असून बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये अनेकांना आपले प्राण देखील गमावे लागले आहे आता याच धर्तीवर ती राहुरी मध्ये नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळाला असून शेतकरी व नागरिकांनी राहुरी नगरपरिषद कार्यालयासमोर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा या मागणीसाठी तब्बल 20000 शेतकऱ्यांच्या सह्यांची पत्र थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. सरकारने यावर उपाययोजना केल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे. नगर शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर हा पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसतोय अनेक ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये नागरिकांना बळी गेला आहे प्रशासनाकडून केवळ नुकसान भरपाई दिली जात असली मात्र नागरिकांचा बळी जात असल्याने आता असंतोषाची भावना तयार होत आहे. राहुरी नगरपरिषद कार्यालयासमोर शेतकरी हे एकवटले व केंद्र सरकारने वन्यजीव संरक्षण कायदा तातडीने बदल करून बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी तब्बल 20000 शेतकऱ्यांच्या सह्या करण्यात आलेली पत्र थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आली आहे कुत्रंप्रमाणे बिबटेही रस्त्यावर फिरतील बिबट्यांची वाढती संख्या पाहता ज्याप्रमाणे रस्त्यावरती कुत्रे फिरत आहेत तर येणाऱ्या काळात बिबटे ही तसेच रस्त्यावर फिरतील सरकारने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा व बिबट्यांबाबत ठोस कारवाई कारवाई करावी अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राहुरीचे माजी आमदार तसेच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिलेला आहे. बिबट्याला घेऊन आंदोलन बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांची जीवन अत्यंत धोक्यात आले असून या व्यथा मांडण्यासाठी राहुरी मध्ये आंदोलन पुकारण्यात आले यावेळी बिबट्याची वेशभूषा परिधान केलेल्या बालकांना घेऊन शहरातून मिरवणूक काढण्यात आली दरम्यान हा केवळ प्रतीकात्मक बिबट्या आहे उद्या खराब बिबट्या घराशीला तर याला जबाबदार कोण असा सवाल देखील उपस्थित शेतकऱ्यांनी केला यामुळे केंद्राने यावरती तातडीने निर्णय घ्यावा यासाठी थेट मोदींना पत्र पाठवण्यात आलेली आहे यावर आता काय निर्णय घेण्यात येणार हे पाहणं देखील महत्त्वाचे असणार आहे.

Prajakt Tanpure : नगर जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढला; प्राजक्त तनपुरे आक्रमक, थेट मोदींना पाठवले 20 हजार पत्र Read More »

Harshwardhan Sapkal

Harshwardhan Sapkal: नवी मुंबई विमानतळाला स्वत:चे नाव द्यायचे असल्याने पंतप्रधानांनी दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा केली नाही

Harshwardhan Sapkal : महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टी आणि पुराने उद्ध्वस्त झाला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भव्य दिव्य कार्यक्रमात विमानतळाचे उद्घाटन करून आपली प्रसिद्धीझोतात राहण्याची हौस भागवून घेतली, मात्र पूरग्रस्त शेतक-यांना मदत देण्याबाबत चकार शब्द काढला नाही. पंतप्रधानांना जनतेच्या जगण्या मरण्यापेक्षा निवडणुकांची आणि प्रसिद्धीची जास्त काळजी आहे, हे आज पुन्हा दिसून आले अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले आणि आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी स्वत:ची स्तुती केली. काम पूर्ण न झालेल्या विमानतळाचे उद्घाटन सोहळ्यातही त्यांनी काँग्रेसवर टीका करण्यातच धन्यता मानली. पण नवी मुंबई विमानतळाला स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची घोषणा केली नाही. नवी मुंबई विमानताळाला स्वत:चे नाव द्यायचे असल्याने त्यांनी दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची घोषणा केली नाही. वर्षाला २ कोटी रोजगार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख, शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्याचं वचन, १०० स्मार्ट सिटी उभा करण्याचे आश्वासन याचे काय झाले ते मात्र पंतप्रधानांनी सांगितले नाही. पंतप्रधानानी काँग्रेसवर टीका केली पण याच काँग्रेसच्या सरकारने पाकिस्तानचे दोन टुकडे केले होते. काँग्रेस सरकारने मुंबई हल्ल्याच्या आरोपींना फाशी दिली. पण मोदी सरकारने पाकिस्तानच्या आयएसआयला पठाणकोठ हल्ल्याच्या तपासासाठी देशात बोलावले होते. ३०० किलो आरडीक्स घेऊन अतिरेक्यांनी पुलवामात हल्ला केला, मोदी सरकार त्यांना पकडू शकले नाही. पहलगाम हल्ला सर्वांना माहित आहेच त्यामुळे मोदींनी काँग्रेसवर टीका करण्याऐवजी अमेरिकेला घाबरून ऑपरेशन सिंदूर का थांबवले याचे उत्तर द्यावे. पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीने राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर जबाबदारीने बोलावे आणि वागावे अशी अपेक्षा असते पण मोदी बेजबाबदार पणे बोलून आणि वागून राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याचा वापर राजकीय फायद्यासाठी करून पद आणि गोपनीयतेच्या शपथेचा भंग करतात हा अधर्म आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. १० वर्षापूर्वी पंतप्रधानांनी बिहार निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत येऊन इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले होते, त्याचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. २०१७ साली मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन केले होते त्याचे कामही अद्याप सुरु नाही. उद्घाटन केलेल्या नवी मुंबई विमानतळाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने उद्घाटनाची घाई केली, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Harshwardhan Sapkal: नवी मुंबई विमानतळाला स्वत:चे नाव द्यायचे असल्याने पंतप्रधानांनी दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा केली नाही Read More »