DNA मराठी

Nilesh Lanke

nilesh lanke

Nilesh Lanke: शनि शिंगणापूर येथे शनिदेव ‘बंदिस्त’ प्रकरणी स्पष्टीकरणाची मागणी; खासदार लंकेंनी वेधले प्रशासनाचे लक्ष

Nilesh Lanke : जगप्रसिद्ध शनि शिंगणापूर येथे अलीकडेच सुरक्षा व्यवस्थेच्या नावाखाली शनिदेवाच्या मूर्तीभोवती लोखंडी संरचना उभारण्यात आल्याची बाब निदर्शनास आली असून, याबाबत खासदार नीलेश लंके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खासदार लंके यांनी शनिवारी मध्यरात्री मंदिराला भेट दिली असता, पारंपरिक स्वरूपात उघड्यावर असलेली शनिदेवाची शिळा लोखंडी दरवाज्यांमधून बंदिस्त केल्याचे आढळले. शिंगणापूर हे “देव आहे पण देऊळ नाही, घरं आहेत पण दरवाजे नाहीत” या वैशिष्ट्यपूर्ण परंपरेमुळे देश-विदेशात ओळखले जाते. अशा ठिकाणी श्रद्धेच्या केंद्रस्थानी असलेल्या देवतेला बंदिस्त करणे ही भाविकांच्या भावना दुखावणारी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या संदर्भात मंदिर प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात येणार असून, अशा प्रकारच्या निर्णयामागील कारणे स्पष्ट करण्याची मागणी करण्यात येत आहे. सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी सीसीटीव्ही, दर्शन व्यवस्थापन यांसारखे उपाय स्वीकारार्ह असले तरी, परंपरेला धक्का पोहोचवणारे बदल टाळावेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, शिंगणापूरची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आणि धार्मिक अस्मिता अबाधित राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, भविष्यात अशा प्रकारचे निर्णय घेताना स्थानिक भाविक व परंपरा यांचा आदर राखावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याप्रकरणी लवकरच अधिकृत पत्रव्यवहार करून प्रशासनाकडून सविस्तर स्पष्टीकरण मागविण्यात येणार असल्याची माहितीही खासदार लंके यांनी दिली.

Nilesh Lanke: शनि शिंगणापूर येथे शनिदेव ‘बंदिस्त’ प्रकरणी स्पष्टीकरणाची मागणी; खासदार लंकेंनी वेधले प्रशासनाचे लक्ष Read More »

img 20260326 wa0004

Nilesh Lanke: 4 हजार एकर जमिनीसंदर्भात खा. लंके यांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

Nilesh Lanke : श्रीरामपूर तालुक्यातील महाराष्ट्र शासनाच्या मालकीची व शेती महामंडळाकडे असलेली सुमारे ४ हजार एकर बागायती जमीन झेड आर टू ग्रुप होल्डिंग कंपनी व झेड आर टू बायो एनर्जी कंपनी लिमिटेड या खाजगी कंपन्यांना देण्याच्या प्रस्तावावर खासदार नीलेश लंके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवेदनात खा. लंके यांनी नमूद केले आहे की, संबंधित कंपन्यांची रचना, आर्थिक व्यवहार व संचालक मंडळातील परस्पर संबंध अत्यंत संशयास्पद असून या कंपन्यांची ‘शेल’ स्वरूपाची शक्यता नाकारता येत नाही. झेड आर टू ग्रुप होल्डिंग कंपनी व झेड आर टू बायो एनर्जी कंपनी लिमिटेड यांच्यात ६१ टक्के भागभांडवलाद्वारे थेट नियंत्रण संबंध असून दोन्ही कंपन्यांमध्ये समान संचालक कार्यरत आहेत. तसेच या कंपन्यांचे इतर संबंधित संस्थांशीही हितसंबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. कंपनीच्या आर्थिक व्यवहारांमध्येही विसंगती आढळून येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अत्यल्प किंवा शून्य उलाढाल असताना कोट्यवधी रुपयांचा नफा दाखविणे, तसेच अचानक मोठ्या प्रमाणात भांडवली वाढ दर्शविणे व त्याबाबत स्पष्ट माहिती न देणे या बाबी गंभीर स्वरूपाच्या असल्याचे खा. लंके यांनी म्हटले आहे. याशिवाय, विमान इंधन निर्मितीसारख्या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली तांत्रिक व व्यावसायिक पात्रता संबंधित कंपन्यांकडे नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांशी कोणतेही करार नसताना एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी जमीन मागणी करण्यात येत असल्यामुळे प्रकल्पाच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. श्रीरामपूर तालुक्यातील ही जमीन हजारो कोटी रुपयांची मौल्यवान सार्वजनिक संपत्ती असून तिचे हस्तांतरण करताना पारदर्शकता व सखोल तपासणी आवश्यक असल्याचे खा. लंके यांनी अधोरेखित केले आहे. “जनतेच्या मालकीची जमीन कोणत्याही परिस्थितीत संशयास्पद कंपन्यांना देण्यात येऊ नये,” अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली. खा. लंके यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केलेल्या मागण्यांमधे संबंधित कंपन्यांची आर्थिक, तांत्रिक व कायदेशीर पात्रता स्वतंत्र उच्चस्तरीय समितीमार्फत तपासावी, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, जमीन हस्तांतरणाचा प्रस्ताव तात्काळ स्थगित किंवा रद्द करण्यात यावा यांचा समावेश आहे.

Nilesh Lanke: 4 हजार एकर जमिनीसंदर्भात खा. लंके यांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन Read More »

sujay vikhe

Sujay Vikhe: सुजय विखे पाटील यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी निवड; अहिल्यानगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण

Sujay Vikhe : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश संघटनात महत्त्वपूर्ण बदल करत भारतीय जनता पक्षने अहिल्यानगर जिल्ह्याचे युवा नेतृत्व आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड जाहीर केली आहे. या निवडीमुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. डॉ. सुजय विखे पाटील हे जिल्ह्यातील सक्रिय, अभ्यासू आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जातात. खासदार म्हणून त्यांनी विविध विकासकामांसाठी पाठपुरावा केला असून युवक आणि ग्रामीण भागातील प्रश्न मांडण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या संघटन कौशल्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली असल्याचे मानले जात आहे. प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे पक्ष संघटना अधिक मजबूत होईल आणि राज्यभरात भाजपची ताकद वाढेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या निवडीमुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात राज्याच्या राजकारणात डॉ. सुजय विखे पाटील यांची भूमिका अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Sujay Vikhe: सुजय विखे पाटील यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी निवड; अहिल्यानगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण Read More »

img 20260213 wa0008

Nilesh Lanke: खासदार नीलेश लंके गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला; अनेक चर्चांना उधाण

Nilesh Lanke : खासदार नीलेश लंके यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन नागरिकांशी संबंधित विविध गंभीर प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी खासदार लंके यांनी तीन स्वतंत्र निवेदने सादर करून तातडीच्या कारवाईची मागणी केली. पहिल्या निवेदनात महाराष्ट्र राज्यात गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या प्रकरणाकडे लक्ष वेधण्यात आले. जादा परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून गुंतवणूक करून घेतल्यानंतर पैसे परत न देणे, धमकावणे व आर्थिक गैरव्यवहार केल्याचे गंभीर आरोप संबंधित संस्थेवर आहेत. या प्रकरणाची ईडी, सीबीआय यांसारख्या केंद्रीय तपास संस्थांमार्फत सखोल चौकशी करून गुंतवणूकदारांना न्याय मिळवून द्यावा, तसेच भविष्यात अशा फसव्या योजनांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. दुसऱ्या निवेदनात पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी संदर्भातील प्रश्न उपस्थित करण्यात आला. पंतप्रधान कार्यालय ‘सेवा तीर्थ’ या नव्या इमारतीत स्थलांतरित झाल्यानंतर लोकप्रतिनिधींना अधिकृत कामासाठी प्रवेश नाकारला जात असल्याने गंभीर आजारी नागरिकांच्या मदत प्रकरणांवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले. लोकप्रतिनिधींना त्यांच्या संवैधानिक कर्तव्यांचे पालन करण्यासाठी पीएमएनआरएफ विभागात प्रवेश देण्याच्या स्पष्ट सूचना द्याव्यात, अशी विनंती करण्यात आली. तिसऱ्या निवेदनात पुणे येथील गुन्हे शाखा युनिट-13 (गुप्तचर विभाग) च्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. न्यायालयाच्या आदेशानंतरही युनिटचे कामकाज सुरू न झाल्याने आणि 170 कर्मचाऱ्यांचे 18 महिन्यांचे वेतन थकीत राहिल्याने त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबांवर गंभीर आर्थिक संकट ओढावले आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार युनिट-13 चे कामकाज तातडीने सुरू करून सर्व थकीत वेतन अदा करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी खासदार लंके यांनी केली. सामान्य नागरिकांच्या हिताशी निगडित प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने, समन्वयाने आणि प्रभावी कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करत खासदार नीलेश लंके यांनी सकारात्मक प्रतिसादाची आशा व्यक्त केली.

Nilesh Lanke: खासदार नीलेश लंके गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला; अनेक चर्चांना उधाण Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke: अहिल्यानगर–पुणे रेल्वे डबल लाईनचा डीपीआर पूर्ण…, खासदार नीलेश लंके यांची माहिती

Nilesh Lanke : अहिल्यानगर जिल्ह्याच्या दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अहिल्यानगर–पुणे नवीन दुहेरी (डबल लाईन) रेल्वेमार्गाचा डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) तयार झाला असून, या प्रकल्पाला तातडीने मंजुरी मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू असल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली. केंद्र सरकारच्या पीएम गतीशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनअंतर्गत पुणे–नाशिक रेल्वे कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी विविध टप्प्यांवर काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून १३३ किलोमीटर लांबीचा अहिल्यानगर–पुणे नवीन डबल लाईन रेल्वेमार्ग प्रस्तावित असून, हा मार्ग अहिल्यानगर जिल्ह्यातील भागातून जाणार आहे. या संदर्भात खासदार लंके म्हणाले की, हा प्रकल्प केवळ दोन शहरांमधील अंतर कमी करणारा नसून शेतकरी, विद्यार्थी, कामगार, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात थेट सकारात्मक बदल घडवणारा आहे. डीपीआर तयार होणे ही महत्त्वाची पायरी असून, आता मंजुरी व प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणे आवश्यक आहे. अहिल्यानगर परिसरात यापूर्वीच रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. पुणतांबा –निंबळक दुहेरीकरण पूर्ण, निंबळक–अहिल्यानगर दुहेरीकरण प्रगतीपथावर असून, साईनगर शिर्डी–पुणतांबा दुहेरीकरणाला मंजुरी मिळाल्याने अहिल्यानगर हा पुणे, नाशिक, शिर्डी आणि मराठवाडा मार्गांचा केंद्रबिंदू ठरत आहे. अहिल्यानगर–पुणे डबल लाईन प्रकल्पामुळे शेतमाल वाहतूक सुलभ होईल, उद्योगांना चालना मिळेल, रोजगारनिर्मिती वाढेल आणि धार्मिक पर्यटनालाही लाभ होईल, असेही खासदार लंके यांनी स्पष्ट केले. केंद्र व राज्य शासनातील संबंधित विभागांशी समन्वय साधून हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

Nilesh Lanke: अहिल्यानगर–पुणे रेल्वे डबल लाईनचा डीपीआर पूर्ण…, खासदार नीलेश लंके यांची माहिती Read More »

Sujay Vikhe: गोड बोलणाऱ्यांना घरात बसवा अन्… अजित पवारांच्या शैलीत सुजय विखेंचा थेट हल्ला

Sujay Vikhe: राहुरीत नगर मनमाड राज्य महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत आयोजित बैठकीत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी अत्यंत स्पष्ट आणि रोखठोक भूमिका घेतली. “आम्ही कधीही पदाचा अहंकार बाळगलेला नाही. जनतेसाठी काम करताना सरळ आणि प्रामाणिक भूमिका घेतो,” असे सांगत त्यांनी प्रशासन, ठेकेदार आणि नागरिकांनाही जबाबदारीची जाणीव करून दिली. काम करताना गोड बोलण्यापेक्षा थेट आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. नगर मनमाड महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर असून 20 फेब्रुवारीपर्यंत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या कालावधीत नागरिकांनी आणि प्रवाशांनी संयम व सहकार्य ठेवावे, असे आवाहन करण्यात आले. महामार्गालगतच्या बंदिस्त साईड गटारापासून चार मीटरपर्यंत असलेली अतिक्रमणे संबंधित व्यापारी व नागरिकांनी स्वतःहून हटवावीत, अन्यथा प्रशासनामार्फत कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला. व्यापाऱ्यांच्या तक्रारींवर थेट चर्चा सध्या राहुरी शहर हद्दीत साईड गटाराचे काम सुरू असून गटारी रस्त्याच्या पातळीपेक्षा उंच झाल्याने व्यवसायावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी व्यापाऱ्यांकडून मांडण्यात आल्या होत्या. या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी ज्ञानेश्वर चित्र मंदिर येथे बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीदरम्यान नागरिक व व्यापाऱ्यांनी आपापल्या अडचणी मोकळेपणाने मांडल्या. “थोडा त्रास सहन करा, प्रश्न कायमचा सुटेल” काम पूर्ण होईपर्यंत काही काळ गैरसोय होईल, मात्र त्यानंतर नगर–मनमाड महामार्गाचा प्रश्न कायमचा सुटेल, असा विश्वास डॉ. विखे यांनी व्यक्त केला. अतिक्रमणे काढून घेण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करत त्यांनी विकासकामांना अडथळे निर्माण होऊ नयेत, यावर भर दिला. समस्या ऐकून थेट आदेश बैठकीत उपस्थित नागरिकांनी पाणी निचरा, रस्त्याची उंची, दुकानांपर्यंत पोहोच आणि वाहतुकीसंबंधी विविध प्रश्न उपस्थित केले. या प्रत्येक समस्येची गंभीर दखल घेत डॉ. सुजय विखे यांनी ठेकेदार व प्रशासनाला जागेवरच स्पष्ट आदेश दिले. गैरसमज दूर करत कामाला गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. समस्या सोडवणे हाच उद्देश अनेक तांत्रिक अडचणी असूनही हे काम सुरू आहे. सध्या आंदोलन किंवा वाद न करता सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करणे अत्यावश्यक आहे. श्रेय कुणीही घ्यावे, मात्र काम वेळेत पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. पुढील एका महिन्यात शहरातील काम पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. “मी पदाचा नव्हे, कामाचा माणूस आहे” “मी माजी खासदार असलो तरी अनावश्यक गोंधळ निर्माण करू नका. रखडलेली व वाढीव रस्त्यांची कामे वरिष्ठ पातळीवरून मंजूर करून आणण्याची जबाबदारी मी घेतो. ठेकेदाराला अडथळे आले तर काम थांबेल, आणि त्याची किंमत आपल्यालाच मोजावी लागेल. भविष्यातील पिढीने आपल्याला दोष देऊ नये, यासाठी हे काम पूर्ण होऊ द्या,” असा स्पष्ट संदेशही त्यांनी दिला. अजित पवार यांच्या निर्णयक्षम नेतृत्वाची आठवण नगर मनमाड महामार्गावरील दीर्घकाळापासून प्रलंबित व नागरिकांना त्रासदायक ठरलेल्या समस्यांवर आयोजित बैठकीत डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका घेतली. कोणतीही तडजोड न करता त्यांनी वेळेत काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे अनेकांना स्वर्गीय अजित पवार यांच्या निर्णयक्षम बैठकीची आठवण झाली.

Sujay Vikhe: गोड बोलणाऱ्यांना घरात बसवा अन्… अजित पवारांच्या शैलीत सुजय विखेंचा थेट हल्ला Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke: नाशिक–अहिल्यानगर–सोलापूर महामार्गास मंजुरी; निलेश लंकेंच्या प्रयत्नांना यश

Nilesh Lanke: केंद्रीय मंत्रिमंडळाने नाशिक–अहिल्यानगर–सोलापूर–अक्कलकोट या ६ पदरी, प्रवेश-नियंत्रित (ॲक्सेस कंट्रोल्ड) ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्पास मंजुरी दिली असून, हा निर्णय अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्याचा समावेश राष्ट्रीय दर्जाच्या द्रुतगती महामार्ग जाळ्यात होणार असून, दळणवळणाच्या दृष्टीने अहिल्यानगरला नवे महत्त्व प्राप्त होणार असल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली. या महामार्गाची एकूण लांबी सुमारे ३७४ किलोमीटर असून, सुमारे १९ हजार १४२ कोटींची गुंतवणूक या प्रकल्पासाठी करण्यात येणार आहे. ‘पीएम गतीशक्ती’ राष्ट्रीय मास्टर प्लॅनअंतर्गत विकसित होणारा हा महामार्ग पश्चिम किनारपट्टीपासून दक्षिण भारतापर्यंतचा एक महत्त्वाचा दळणवळण दुवा ठरणार आहे. परिणामी राज्यातील आणि देशातील प्रमुख आर्थिक केंद्रांशी अहिल्यानगरचा संपर्क अधिक वेगवान व सुलभ होणार आहे. महामार्गामुळे प्रवासाच्या वेळेत सुमारे ४५ टक्के घट होण्याची शक्यता असून, त्याचा थेट लाभ व्यापार, शेती आणि उद्योग क्षेत्राला मिळणार आहे. शेतमाल, दुग्धव्यवसाय तसेच कृषीपूरक उद्योगांच्या वाहतुकीवरील खर्चात लक्षणीय बचत होणार असून, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) लॉजिस्टिक्स अधिक सक्षम होणार आहे. यासोबतच औद्योगिक, गोदाम, प्रक्रिया उद्योग आणि सेवा क्षेत्रात नव्या गुंतवणुकीस चालना मिळणार असल्याचे अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील युवकांसाठी थेट व अप्रत्यक्ष स्वरूपात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. सुधारित दळणवळण व्यवस्था आणि वाढणारी औद्योगिक गुंतवणूक यामुळे जिल्ह्याचा आर्थिक पाया अधिक भक्कम होणार असून, अहिल्यानगर केवळ भौगोलिकदृष्ट्या नव्हे तर आर्थिक व औद्योगिकदृष्ट्याही केंद्रस्थानी येणार आहे. या निर्णयाचे स्वागत करताना खासदार निलेश लंके यांनी सांगितले की, अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा महामार्ग अत्यंत निर्णायक ठरणार आहे. दळणवळण, व्यापार, शेती, उद्योग आणि रोजगार या सर्वच क्षेत्रांना या प्रकल्पामुळे नवी दिशा मिळेल. केंद्र सरकारने अहिल्यानगरच्या विकास क्षमतेवर दाखवलेला विश्वास महत्त्वाचा असून, या महामार्गाचा जिल्ह्याला जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी केंद्र व राज्य पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. नाशिक–अहिल्यानगर–सोलापूर ६ पदरी महामार्ग हा अहिल्यानगरच्या भविष्यकालीन विकासाचा कणा ठरणार असून, जिल्ह्याला विकासाच्या नव्या युगात नेणारा हा ऐतिहासिक निर्णय असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Nilesh Lanke: नाशिक–अहिल्यानगर–सोलापूर महामार्गास मंजुरी; निलेश लंकेंच्या प्रयत्नांना यश Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke : खड्ड्यांत अडकलेला महामार्ग ; आरोपांत अडकलेली जबाबदारी

Nilesh Lanke: नगर–मनमाड महामार्ग हा केवळ वाहतुकीचा रस्ता नाही तो अहिल्यानगर जिल्ह्याच्या आर्थिक, सामाजिक आणि प्रशासकीय हालचालींचा मुख्य मेरुदंड आहे. मात्र गेल्या आठ–नऊ वर्षांपासून हा महामार्ग ‘काम सुरू आहे’ या एका वाक्यात अडकलेला आहे. खड्डे, धूळ, अपघात आणि मृत्यू हेच या रस्त्याचं वास्तव बनलं आहे. या महामार्गावरून प्रवास करणं म्हणजे दररोज जीव धोक्यात घालण्यासारखं झालं आहे. अनेकांनी प्राण गमावले, कित्येक संसार उद्ध्वस्त झाले. तरीही जबाबदार यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींच्या संवेदना जाग्या होत नाहीत, हे दुर्दैव. आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट खंडणीखोरीचे आरोप करत या रखडपट्टीचं मूळ कारण समोर आणलं आहे. ठेकेदारांकडून लोकप्रतिनिधी पैसे मागतात, त्यामुळे पाच–सहा ठेकेदारांनी काम अर्धवट सोडल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार गेल्यानंतर एका लोकप्रतिनिधीला दम दिल्याचंही उघड झालं. मात्र एवढं सगळं सांगूनही ‘तो लोकप्रतिनिधी कोण?’ हा प्रश्न अनुत्तरितच ठेवण्यात आला. याच मुद्द्यावर खासदार निलेश लंके यांनी संतप्त प्रतिक्रिया देत, “साईबाबांच्या चरणी हात ठेवून सांगा पैसे कुणी मागितले?” असं आव्हान दिलं. मागील सात–आठ वर्षांत काम अर्धवट सोडणारे ठेकेदार का गेले, कुणी वैतागून दिलं, कुणी काय मागितलं, हे समाजासमोर यावं, अशी त्यांची मागणी आहे. या आरोप–प्रत्यारोपांत मात्र सर्वाधिक दुर्लक्षित घटक आहे सामान्य नागरिक. रोज या रस्त्यावरून जाणारा शेतकरी, विद्यार्थी, रुग्णवाहिका, कामगार… यांच्यासाठी हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. राजकीय लढाया सुरू असताना रस्त्यावर पडलेला प्रत्येक खड्डा एखाद्या अपघाताची नांदी ठरत आहे. नगर–मनमाड महामार्गाचा प्रश्न आता फक्त बांधकामाचा राहिलेला नाही तो राजकीय इच्छाशक्तीचा आणि प्रशासकीय अपयशाचा आरसा बनला आहे. आरोप करणाऱ्यांनी नावे जाहीर करावीत, चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी. अन्यथा हा महामार्ग पूर्ण होण्याआधी आणखी किती जीव जाणार, हा प्रश्न कायम राहील.

Nilesh Lanke : खड्ड्यांत अडकलेला महामार्ग ; आरोपांत अडकलेली जबाबदारी Read More »

Sujay Vikhe:  पारनेरमध्ये 10 किलो ड्रग्ज कुणाच्या घरात होते..? सुजय विखेंचा नाव न घेता लंकेंवर हल्लाबोल

Sujay Vikhe: अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्याला मंगळवारी अटक झाली. पुणे जिल्ह्यातील ड्रग्ज रॅकेटच्या संशयावरुन पुणे पोलिसांनी शामसुंदर गुजर या पोलिसाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. गुजर हा सध्या अहिल्यानगर एलसीबीत कार्यरत आहे. तो पूर्वी पारनेर पोलिस ठाण्यात कार्यरत होता. पारनेरच्या बाँण्ड्रीवरील पुणे जिल्ह्यातील शिरुरमध्ये ड्रग्जच रॅकेट सापडलं. त्याचे धागेदोरे थेट पारनेर व नगरपर्यंत पोहोचले. पारनेर आणि ड्रग्ज हे समीकरण उघड झालं. अहिल्यानगरच्या पोलिस अधिक्षकांनी या प्रकरणाच्या तपासातील सगळं सत्य पत्रकारांना सांगावं, अशी अपेक्षा माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली. विखेंनी या प्रकरणावर काही गंभीर शंकाही उपस्थित केल्या. ड्रग्ज सारख्या गंभीर प्रकरणात, नगरमधील पोलिस कर्मचाऱ्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत पत्रकारांनी डॉ. सुजय विखे पाटील यांना प्रश्न विचारला. या प्रकरणात आपली भूमिका काय, असा सवाल पत्रकारांनी विखेंना विचारला. त्यावर डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिलेल्या उत्तराने, अनेकांच्या भुवया उंचावल्या. सुजय विखे म्हणाले, ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतलेला पोलिस कर्मचारी हा पारनेर पोलिस ठाण्यात कार्यरत होता. त्यावेळी तेथील अवैध व्यावसायिकांसोबत त्यांचे संबंध होते. इतरही अनेक गंभीर प्रकरणात त्याचा सहभाग होता. त्याच्याविरोधात पोलिस अधिक्षकांकडे तक्रारी करुन त्याची बदली करण्याची मागणीही त्यावेळी झाली होती. वादग्रस्त असलेल्या या पोलिसाची बदली थेट नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेत झाली. म्हणजेच त्याच्या डोक्यावर कोणत्यातरी मोठ्या नेत्याचा हात होता. एकीकडे एसपी स्थानिक गुन्हे शाखेत इमानदार पोलिस घेतल्याचे सांगतात. मग त्या वादग्रस्त पोलिसाला थेट एलसीबीत कुणाच्या सांगण्यावरुन घेतलं गेलं, हे पोलिस अधिक्षकांनी सांगावं. आत्ताच्या ड्रग्ज प्रकरणात 10 किलो ड्रग्ज हे पारनेरमधील दोघांच्या घरी ठेवले गेले होते. मग ते कुणाच्या घरात होते? त्यांची नावं पोलिस का सांगत नाहीत. ज्यांच्या घरात हे 10 किलो ड्रग्ज होते, ते कुणाचे कार्यकर्ते होते? त्यांची नावं गुन्ह्यात येऊ नये म्हणून पोलिस ठाण्यात कोण अर्धा तास बसून होतं? हे सगळं मला माहित आहे. परंतु पोलिसांनी हे स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगावं, असंही विखेंनी स्पष्ट केलं. सुजय विखेंनी ड्रग्जसारख्या गंभीर प्रकरणावर आपली भुमिकाही स्पष्ट केली. ते म्हणाले, पोलिसांवर या प्रकरणात कुणाचा दबाव आहे, हे त्यांनी स्वतः सांगावं. मी जे प्रश्न उपस्थित करतोय, त्याचीही उत्तरे द्यावीत. अन्यथा पुढच्या आठ दिवसांत आपण स्वतः पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील सगळ्यांची नावे उघड करु. गंभीर गुन्हा करणारे कुणाचेही कार्यकर्ते असो, त्यांना कायद्याने शिक्षा व्हायलायच हवी, असंही विखेंनी स्पष्ट केलं. विखेंनी कोणत्याही लोकप्रतिनीधींचं नाव घेतलं नसलं तरी, दक्षिणेचे खा. निलेश लंके यांच्याकडे संशयाची सुई असल्याच्या चर्चा आहेत. ज्यांच्या घरात ड्रग्ज ठेवले होते, ते खा. लंके यांचे कार्यकर्ते होते का? हा प्रश्नही विचारला जात आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांनी पारनेमध्ये लोकसभा निकालानंतर झालेल्या राड्याबाबतही आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले, मी काल आजारी असल्याने हे प्रकरण संपूर्ण पाहिलं नाही. परंतु त्यावेळी एका गर्भवती महिलेला मारहाण झाली होती. लोकप्रतिनीधींच्या कुटुंबातील व्यक्तीने असं करणं, हे गंभीर आहे. आपला न्यायालयावर विश्वास आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Sujay Vikhe:  पारनेरमध्ये 10 किलो ड्रग्ज कुणाच्या घरात होते..? सुजय विखेंचा नाव न घेता लंकेंवर हल्लाबोल Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke: खासदार निलेश लंकेंच्या भावाला ‘त्या’ प्रकरणात दोन आठवड्यात पोलिसांसमोर हजर होण्याचे आदेश

Nilesh Lanke : महिलेचा विनयभंग करुन तिला जातीवाचक शिवागाळ केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने खा. निलेश लंके यांचे बंधू दीपक लंके यांच्यासह त्यांच्या इतर दोन समर्थकांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. या प्रकरणातील आरोपी राहुल बबन झावरे, संदीप लक्ष्मण चौधरी आणि दीपक ज्ञानदेव लंके यांनी दाखल केलेले अटकपूर्व जामिनाचे अपील न्यायालयाने फेटाळून लावले. न्यायमूर्ती वाय. जी. खोब्रागडे यांनी दिलेल्या आदेशानुसार, आरोपींना दोन आठवड्यांच्या आत तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे प्रकरण पारनेर तालुक्यात आहे. परंतु ते अहिल्यानगर येथील तोफखाना पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आले होते. फिर्यादी महिला ही अनुसूचित जातीतील आहे. फिर्यादीनुसार, 6 जून 2024 रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान खा. लंके यांचे बंधू दीपक लंके यांच्यासह 24 जण चारचाकी वाहनांमधून फिर्यादीच्या घरासमोर आले. यावेळी आरोपी राहुल बबन झावरे याने फिर्यादीला जातिवाचक शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी महिलेचे कपडे फाडून तिचा विनयभंग केला. आरोपी तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी या महिलेच्या पोटात लाथ मारून तिला बेदम मारहाण केली होती. दीपक ज्ञानदेव लांके आणि संदीप लक्ष्मण चौधरी हेही यात सामील होते. सत्र न्यायालयाने 14 जूनला या प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर केला होता. परंतु त्यानंतर फिर्यादीने याबाबत ओरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. न्यायालयाने फिर्यादीतील आरोप हे प्रथमदर्शनी गंभीर स्वरूपाचे असून, घटना ही फिर्यादीच्या घरासमोर सार्वजनिक ठिकाणी घडल्याचे स्पष्ट होत असल्याचे नमूद केले. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3(1)(r) आणि 3(1)(s) अंतर्गत गुन्हा होत असल्याने, अशा प्रकरणात अटकपूर्व जामिनावर कायदेशीर बंदी असल्याचे न्यायालयाने ठामपणे सांगितले. या प्रकरणात अ‍ॅड. आर. डी. राऊत यांनी तर फिर्यादीतर्फे अ‍ॅड. ए. डी. ओस्तवाल यांनी जोरदार युक्तिवाद केला. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. आर. आर. करपे यांनी बाजू मांडली. अखेर, उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेला तात्पुरता अटकपूर्व जामीन रद्द करत, राहुल बबन झावरे, संदीप लक्ष्मण चौधरी आणि खा. निलेश लंके यांचे बंधू दीपक ज्ञानदेव लंके यांना दोन आठवड्यांत आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये न्यायालयाचा कठोर दृष्टिकोन पुन्हा एकदा स्पष्ट झाला असून जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Nilesh Lanke: खासदार निलेश लंकेंच्या भावाला ‘त्या’ प्रकरणात दोन आठवड्यात पोलिसांसमोर हजर होण्याचे आदेश Read More »