DNA मराठी

Maharashtra Politics

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांचा अर्ज दाखल

Ravindra Chavan : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदाची विद्यमान कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. युवा मोर्चाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकीय प्रवास सुरु केलेल्या चव्हाण यांना संघटनेच्या कामाचा मोठा अनुभव असल्याने ते प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ताकदीने पार पाडतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टीच्या राज्य परिषदेचे अधिवेशन आज 1 जुलै रोजी वरळी येथे होणार असून या अधिवेशनात प्रदेशाध्यक्षपदाच्या नावाची घोषणा होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या 3 वर्षांत प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अतिशय समर्थपणे पेलली आहे. बावनकुळे यांनी संघटनेच्या केलेल्या बांधणीमुळेच विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, मुंबई भाजपा अध्यक्ष तथा सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, ज्येष्ठ नेते भाई गिरकर, आ. सुनील कांबळे, आ. उमा खापरे, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. चित्रा वाघ आदींनी चव्हाण यांच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केले. केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री व या निवडणुकीसाठीचे निरीक्षक किरेन रिजिजू, राष्ट्रीय सरचिटणीस व प्रदेश प्रभारी खा. अरुण सिंह यांच्याकडे श्री. चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक अधिकारी आ. चैनसुख संचेती हेही यावेळी उपस्थित होते. संघटन पर्वा अंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणीची प्रक्रिया पार पडल्यानंतर पक्षाच्या 80 संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यापाठोपाठ मंडल अध्यक्षांच्या निवडी झाल्या. प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय परिषद व राज्य परिषद सदस्य निवडणुकीचा कार्यक्रम 28 जून रोजी घोषित करण्यात आला. त्यानुसार 30 जुलै रोजी प्रदेशाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली.

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांचा अर्ज दाखल Read More »

35 वर्षांनंतर नोंद; सावेडी जमीन प्रकरणामुळे प्रशासनावर संशयाची सावली

Ahilyanagar News : सावेडी परिसरातील तब्बल 35 वर्षांपूर्वीचा जमीन व्यवहार सध्या संशयाच्या भोवर्यात सापडला आहे. सर्वे नंबर 245/ब 1 (0.72 हेक्टर आर) आणि 245/ब 2 (0.63 हेक्टर आर), एकूण 1 हेक्टर 35 आर जमिनीची नोंद इतक्या वर्षांनी तलाठी कार्यालयात झाली असून, त्यामुळे भू-माफिया, शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचार आणि राजकीय वरदहस्ताचे धागेदोरे समोर येत आहेत. ही जमीन मूळत: अब्दुल अजीज डायाभाई (मूळ पत्ता – झेंडीगेट, अहिल्यानगर; सध्या वास्तव्य मुंबई) यांच्या नावावर होती. 15 ऑक्टोबर 1991 रोजी पारसमल मश्रीमल शहा यांना ही जमीन खरेदीखताद्वारे विकली गेली होती. मात्र इतक्या वर्षांनंतर अचानक नोंद घेताना मूळ मालकाला कोणतीही नोटीस दिली न गेल्याने आणि मूळ खरेदीखताची प्रत न तपासता नोंदणी झाल्याने प्रकरणात गंभीर अनियमितता झाल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे बाहेरगावी गेलेल्या किंवा मृत व्यक्तींच्या नावावरील जमिनी हडप करण्याचा डाव अधिकाऱ्यांच्या संगनमताने रचला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यात लाखोंच्या उलाढाली, अधिकाऱ्यांना मिळणारे मोठे आर्थिक फायदे आणि वरून मिळणारे राजकीय संरक्षण यामुळे असे प्रकार सर्रास घडत असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. शासकीय यंत्रणेतील अशा भ्रष्ट कारभाराला लगाम घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे, असा सूर नागरिकांमध्ये उमटत आहे. सावेडी जमीन व्यवहार : 35 वर्षांनंतर नोंदणीचा गोंधळ जमिनीचा तपशील सर्वे नं. : 245/ब 1 (0.72 हेक्टर आर) सर्वे नं. : 245/ब 2 (0.63 हेक्टर आर) एकूण क्षेत्रफळ: 1 हेक्टर 35 आर मूळ मालक : अब्दुल अजीज डायाभाई (सध्या मुंबईत वास्तव्य) खरेदीदार : पारसमल मश्रीमल शहा खरेदीखत दिनांक : 15 ऑक्टोबर 1991 संशयास्पद बाबी तब्बल 35 वर्षांनंतर नोंदणी मूळ मालकास नोटीस न देता नोंद मूळ खरेदीखताची प्रत न तपासता नोंद तलाठी कार्यालयाच्या कारभारावर संशय

35 वर्षांनंतर नोंद; सावेडी जमीन प्रकरणामुळे प्रशासनावर संशयाची सावली Read More »

सरकारची माघार, त्रिभाषा सूत्रासंदर्भात GR रद्द, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

Devendra Fadnavis: राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीपासून मराठी भाषा सक्तीची आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाप्रमाणे त्रिभाषा सूत्राबाबत सांगोपांग अभ्यास करुन तसेच भविष्यात महत्त्वाच्या ठरणाऱ्या अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिटचे महत्त्व विचारात घेऊन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या समितीचा अहवाल येईपर्यंत तृतीय भाषा संदर्भातील काढण्यात आलेले राज्य सरकारचे 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 रोजीचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यावर शासनाचा भर; एकनाथ शिंदे राज्य शासन जनभावनेचा आदर करणारे असून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यावर राज्य शासनाचा भर असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी 3600 कोटी महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनामार्फत लाडकी बहीण योजना राबविली जात आहे. या लाडक्या बहिणींकरिता पुढील हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून आजपासून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

सरकारची माघार, त्रिभाषा सूत्रासंदर्भात GR रद्द, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा Read More »

अहिल्यानगरमध्ये 35 वर्षांनंतर जमिनीचा संशयास्पद व्यवहार नोंद

अहिल्यानगरमध्ये 35 वर्षांनंतर जमिनीचा संशयास्पद व्यवहार नोंद; भूमाफियांना प्रशासनाचा हात?

अहिल्यानगरमध्ये 35 वर्षांनंतर जमिनीचा संशयास्पद व्यवहार नोंद; भूमाफियांना प्रशासनाचा हात? land Scam Sawedi :- अहिल्यानगर – सध्या राज्यात अहमदनगर मधील शहरी भागातील जमिनींचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत त्यातच झटपट आणि कमी काळात श्रीमंत होण्याची स्पर्धा जोरात सुरू आहे जे नागरिक हयात नाहीत किंवा पूर्वी शहर सोडून निघून गेले अशा अशा नागरिकांच्या जमिनी आणि प्लॉट शोधून अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्या जमिनीचे बनावट खरेदीखत करायचं आणि ती चढ्या भावाने विकायची हा धंद्या सध्या अहिल्यानगर मध्ये जोरात सुरू आहे, अहिल्यानगर (सावेडी) (land Scam Sawedi) येथील सर्वे नंबर 245/ब 1 (क्षेत्रफळ 0.72 हेक्टर आर) व 245/ब 2 (क्षेत्रफळ 0.63 हेक्टर आर), एकूण 1 हेक्टर 35 आर जमिनीचा 35 वर्षांपूर्वीचा खरेदी व्यवहार तब्बल तीन दशकांनंतर सावेडी तलाठी कार्यालयात नोंदवला गेल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. मूळ मालक अब्दुल अजीज डायाभाई (मूळ पत्ता झेंडीगेट, अहिल्यानगर; सध्या वास्तव्य – मुंबई) यांनी 15 ऑक्टोबर 1991 रोजी पारसमल मश्रीमल शहा यांना विकलेली जमीन एवढ्या दीर्घ काळानंतर शासकीय नोंदवहीत दाखल होणं संशयाचे धुके गडद करत आहे.या प्रकरणात भूमाफियांना शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचाराचा आणि राजकीय वरदहस्ताचा आधार मिळाल्याची जोरदार चर्चा आहे. एवढ्या वर्षांनंतर नोंद घेताना मूळ मालकाला कोणतीही नोटीस न देता नोंद प्रक्रिया पूर्ण करण्यात आली, खरेदीखताची मूळ प्रत तपासण्यात आली नाही, यामुळे नोंदवह्यांची शुद्धता आणि शासकीय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. *भूमाफियांचे संगनमताने?बाहेरगावी वास्तव्यास असलेल्या किंवा मृत व्यक्तींच्या नावावरील जमिनीवर खोटे दस्तऐवज तयार करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमीन हडप करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. अशा प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना मिळणारा मोठा आर्थिक फायदा, वरिष्ठांचे मूक समर्थन आणि काही राजकीय लोकांचा आशीर्वाद असल्याने हे घोटाळे बेधडक सुरू आहेत, असा आरोप केला जात आहे.उच्चस्तरीय चौकशीची मागणीया संशयास्पद व्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि शासकीय यंत्रणेत पसरलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालावा, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. अहिल्यानगर परिसरात भूमाफियांचे वाढते धाडस आणि प्रशासनातील संदिग्ध भूमिका यामुळे जनतेत तीव्र संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणामुळे भूमी नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता आणि शासकीय यंत्रणेच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अहिल्यानगरमध्ये 35 वर्षांनंतर जमिनीचा संशयास्पद व्यवहार नोंद; भूमाफियांना प्रशासनाचा हात? Read More »

ठाकरे बंधूंना शरद पवारांचा जाहीर पाठिंबा; 5 तारखेच्या मोर्चात सहभागी होणार

Sharad Pawar: मराठीच्या समर्थनार्थ पुकारलेल्या ५ जुलै रोजीच्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दर्शविला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी एक पत्र ट्विट करत भूमिका स्पष्ट केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आपल्या पत्रात म्हटले आहेत की, महाराष्ट्राहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा महाराष्ट्रासाठी आणि जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा राष्ट्रासाठी पक्षीय भेदाभेद बाजूला सारून उभं राहणं हेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचं स्पष्ट धोरण आहे असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) याअंतर्गत त्रिभाषा सूत्राचं समीकरण पुढे करत इयत्ता पहिलीपासून शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा बंधनकारक करण्याचे योजिले आहे. ह्याविरोधात महाराष्ट्रात मराठी भाषिकांमध्ये टोकाचं जनमत तयार होत आहे. अनेक विद्यार्थी, पालक, शिक्षणतज्ञ, भाषातज्ञ अशा सर्व मान्यवरांनी त्रिभाषा सूत्र इयत्ता पहिलीपासून राबविण्यास विविधं आक्षेप नोंदविले आहेत. पण कुणालाही न जुमानता राज्य सरकार ‘हिंदी सक्ती’साठी हट्ट धरून बसलं आहे असे ते म्हणाले. खरं तर, महाराष्ट्राच्या जनमानसाचा कानोसा घेतलात तर जाणवतं की, कुणाचाही विविधं भाषा शिकण्याला किंबहुना हिंदी भाषेलाही विरोध नाही, पण इयत्ता पहिलीपासूनच प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावं असा आग्रह आहे, जो योग्य आहे. आणि, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्ष म्हणून आमचीही हीच भूमिका आहे असे स्पष्ट करताना त्यांनी शैक्षणिक धोरणाच्या त्रिभाषा सूत्राआडून मातृभाषेला डावलण्यासाठी प्रयत्न होत असतील तर मराठी माणूस एकदिलाने त्याचा विरोध करणार, ह्याची सत्ताधाऱ्यांनी नोंद घ्यावी असा इशाराही दिला. महाराष्ट्र सरकारच्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020)’ अंतर्गत त्रिभाषा सूत्रान्वये केल्या जाणाऱ्या हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी येत्या शनिवारी, ५ जुलै २०२५ रोजी तमाम मराठीजनांकडून मुंबईत एक मोर्चा पुकारण्यात आला आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचा ह्या मोर्चाला संपूर्ण पाठिंबा आहे. महाराष्ट्राहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा महाराष्ट्रासाठी आणि जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा राष्ट्रासाठी पक्षीय भेदाभेद बाजूला सारून उभं राहणं हेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचं स्पष्ट धोरण आहे. म्हणूनच, मी पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधींना, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन करत आहे की, येत्या ५ जुलैच्या मोर्चात प्रचंड संख्येने आवर्जून सहभागी व्हा असे आवाहन त्यांनी केले आहे.

ठाकरे बंधूंना शरद पवारांचा जाहीर पाठिंबा; 5 तारखेच्या मोर्चात सहभागी होणार Read More »

जवखेडे खालसा येथील पीर बाबा रमजान दर्गाला संरक्षण द्या, मुस्लिम समाजाची मागणी

Ahilyanagar News : पाथर्डी तालुक्यातील मौजे जवखेडे खालसा येथे 25 व 26 जून रोजी पीर बाबा रमजान दर्गा उर्फ कान्हुबा येथे बेकायदेशीरपणे काही विघ्नसंतोषी लोक एकत्र येऊन धार्मिक द्वेष पसरविण्याच्या उद्देशाने गैरकृत्य करणार असल्याने त्यांना रोखण्याची मागणी जवखेडे खालसा मधील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. दर्गात येऊन मुजावर यांना धमकावून आरती करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावणार नाही व कोणतीही विपरीत घटना घडणार नाही, यासाठी प्रशासनाने योग्य भूमिका घेण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. पाथर्डी तालुक्यातील मौजे जवखेडे खालसा येथे पीर बाबा रमजान उर्फ कान्हुबा दर्गा आहे. या दर्गाच्या दिवा बत्तीसाठी मुस्लिम समाजाला पिढ्यानपिढ्या दीडशे वर्षापासून इनामी जमिनी मिळालेली आहे. शासनाच्या गॅजेटमध्ये देखील तसा उल्लेख असून, ॲलिनेशन रजिस्टरला याबाबतची नोंद आहे. परंतु गावातील काही विघ्नसंतोषी व गावाबाहेरील जातीवादी संघटनेचे लोक यामध्ये राजकारण करून तीन वर्षापासून दर्गावर येऊन दमबाजी करण्याचा प्रयत्न करीत आहे. समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून, मुस्लिम समाजातील मुजावर यांना सदर दर्गातून शिवीगाळ करून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक गुरुवारी सकाळी दर्गावर येऊन आरती करण्याच्या उद्देशाने मुस्लिम समाजाचे मुजावर यांना दमबाजी करुन दर्गा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. गावात मुस्लिम समाज अल्प असून, त्यांच्यात भीतीपूर्ण वातावरण निर्माण करण्यात येत आहे. दर्गावर असलेला हिरवा झेंडा काढून, मजारवर भगवी चादर टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आला आहे. या दर्गावर कधीही आरती झालेली नसून, दर्गावर आरती करण्याच्या उद्देशाने चिथावणी देऊन जमाव जमविण्याचा प्रयत्न सुरु आहे. 19 जून रोजी दर्गातील मुजावर यांना मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दोन्ही समाजाची बैठक घेतली, मात्र मुस्लिम समाजावर दबाव टाकण्यात येत आहे. जातीय द्वेष पसरविण्यासाठी युवकांचे माथी भडकविण्याचे काम सुरु आहे. प्रशासन देखील यासंदर्भात सहकार्य करत नसून, विघ्नसंतोषी लोक दर्गाचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. 25 व 26 जून रोजी पीर बाबा रमजान दर्गा येथे जमाव जमवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. यासाठी विघ्नसंतोषी लोकांना गैरकृत्य करण्यापासून रोखण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी भैय्या शेख, शाहिद पठाण, डॉ परवेज अशरफी, फिरोज शेख, हुसेन शेख, शफिक शेख, शाकीर शेख, असिफ शेख, इरफान शेख, अन्वर शेख, आदींसह गावातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जवखेडे खालसा येथील पीर बाबा रमजान दर्गाला संरक्षण द्या, मुस्लिम समाजाची मागणी Read More »

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय, मुख्यमंत्री फडणवीसांनी भूमिका स्पष्ट

Hindi Language Controversy: त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्रिभाषा सूत्रासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी 23 जूनच्या रात्री एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि शिक्षण विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते. या विषयावर सांगोपांग चर्चा झाल्यानंतर सर्व राज्यांची स्थिती सर्वांसमोर मांडावी, नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत मराठी मुलांचे अ‍ॅकडेमिक बँक ऑफ क्रेडिटच्या अनुषंगाने नुकसान होऊ नये, यासह इतरही पर्यायांवर सर्वांसाठी समग्र सादरीकरण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मराठी भाषेचे अभ्यासक, साहित्यिक, राजकीय नेते यासह सर्व संबंधितांसमोर याचे सादरीकरण आणि सल्लामसलतीची प्रक्रिया राबविण्यात यावी, असे या बैठकीत ठरले. ही सल्लामसलतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे हे आता पुढची सल्लामसलतीची प्रक्रिया प्रारंभ करणार आहेत. या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंग देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार हे उपस्थित होते.

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय, मुख्यमंत्री फडणवीसांनी भूमिका स्पष्ट Read More »

ठाकरे गटाला धक्का, दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

Uddhav Thackeray: शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या १०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. मुंबई भाजपा अध्यक्ष मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी त्यांना प्रवेश देऊन पक्षात स्वागत केले. यावेळी आमदार प्रविण दरेकर, मुंबई भाजपा उपाध्यक्ष कमलाकर दळवी उपस्थितीत होते. यावेळी मंत्री शेलार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने प्रेरित होऊन तसेच भारतीय जनता पक्षाच्या ध्येयधोरणांशी एकरूप होऊन काम करण्याची इच्छा व्यक्त करत शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या १०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. याचा अर्थ त्यांनी उबाठाचे नेतृत्व नाकारले आहे. हा या नाटकाचा पहिला अंक आहे लवकरच दुसरा आणि तिसरा व शेवटचा अंक तुम्हाला पहायला मिळेल. उबाठाची अवस्था धोकादायक आणि जिर्ण झाली आहे. त्यांनी मुंबई, मुंबईकर, हिंदुत्व, हिंदु सण उत्सव यांच्या विरोधात भूमिका घेतली त्यामुळे ते धोकादायक स्थितीत आहेत, तर त्यांना सोडून ज्या पद्धतीने पक्षाचे पदाधिकारी, आमदार, खासदार जात आहेत त्यावर तो पक्ष जिर्ण अवस्थेत आहे. 2017 च्या निवडणूकीत त्यावेळच्या शिवसेनेपेक्षा भाजपाला फक्त दोन जागा कमी होत्या आता भाजपामध्ये चार माजी नगरसेवकांंनी प्रवेश केल्यानंतर भाजपा नंबर 1 चा पक्ष झालाच शिवाय मुळ शिवसेनेतील 50 हून अधिक नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले त्यामुळे उबाठा सेना हा पक्ष अत्यंत जिर्ण अवस्थेत आहे, अशी टीका शेलार यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने मुंबईला 5 लाख कोटींचा निधी दिला आम्ही मुंबईकरांची सेवा करीत असून देव, देश आणि धर्मासाठी आमची लढाई सुरु आहे, असेही ते म्हणाले.

ठाकरे गटाला धक्का, दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश Read More »

बंदर विभागाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी समन्वयाने काम करा, केंद्रीय बंदरे मंत्री सर्वानंद सोनोवाल

Nitesh Rane: महाराष्ट्रातील बंदर विभागाचे प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी केंद्रीय आणि राज्य शासनाचे विभाग यांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना केंद्रीय बंदरे मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दिल्या. किनारपट्टीच्या विकासासाठी केंद्रीय आणि राज्य विभागाची एकत्रित बैठक ही एक सकारात्मक पाऊल असल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले. राज्यातील बंदर विकास आणि महत्वाच्या प्रकल्पांविषयी केंद्रीय मंत्री सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली आणि मंत्री राणे यांच्या उपस्थितीत केंद्रीय आणि राज्य शासनाचे विभाग यांची एकत्र बैठक झाली. यावेळी केंद्रीय मंत्री सोनोवाल आणि राज्याचे मंत्री राणे बोलत होते. बैठकीस बंदरे व परिवहन सचिव संजय सेठी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, जेएनपीटी चे अध्यक्ष उन्मेष वाघ, एम बी पी टी चे उपाध्यक्ष आदेश तितारमारे, डिजिसीएचे महासंचालक श्याम जगन्नाथ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री सोनोवाल म्हणाले की, सागरी व्यापार आणि उद्योग क्षेत्रात भरपूर संधी आहेत. महाराष्ट्रातील बंदरे क्षेत्रातील प्रकल्प महत्वाचे असून त्यासाठी लागणाऱ्या परवानगी लवकर देण्यात याव्यात. रेल्वे आणि रस्ते मार्गाने बंदराची जोडणी करणारे प्रकल्प तातडीने मार्गी लावावेत. सागरमाला अंतर्गत महाराष्ट्रात मंजूर करण्यात आलेले प्रकल्प 2026 सालापर्यंत पूर्ण करावेत. मंत्री राणे म्हणाले की, केंद्रीय विभागांची परवानगी वेळेत मिळण्यासाठी दोन्ही विभागणी समन्वयाने काम करावे. तसेच या परवानग्या मिळणे सुलभ व्हावे यासाठी प्रयत्न व्हावे. त्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन खर्चात बचत होईल. आजची बैठक ही सकारात्मक झाली असून यामुळे राज्यातील बंदर विभागाची कामे गतीने मार्गी लागतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. या बैठकीमध्ये वैभववाडी कोल्हापूर रेल्वे प्रकल्प, आनंदवाडी बंदर, रो रो सेवा, वॉटर टॅक्सी, अंतर्गत जलमार्ग, जेटीचे प्रश्न याबाबत चर्चा झाली.

बंदर विभागाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी समन्वयाने काम करा, केंद्रीय बंदरे मंत्री सर्वानंद सोनोवाल Read More »

Maharashtra Politics: “महाराष्ट्र गरीब झाला, पण नेते श्रीमंत झाले!

Maharashtra Politics: महाराष्ट्राची ओळख कष्टकरी, बुद्धिजीवी आणि परिवर्तनवादी राज्य म्हणून होती. पण गेल्या काही दशकांत ही ओळख झाकोळली आहे. राज्य आर्थिक संकटात आहे, शेतकरी अडचणीत, तरुण बेरोजगार, शिक्षण व आरोग्य व्यवस्था कोलमडलेली त्यामुळे जनता अडचणीत आहे. मात्र याच काळात नेत्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. राज्याच्या निवडणुकांमध्ये उमेदवार दाखल करत असलेल्या मालमत्ता विवरणपत्रांवर नजर टाकली, तर अनेक नेत्यांची संपत्ती काही वर्षांत दुप्पट-तिप्पट झाल्याचे स्पष्ट होते. कुठून येतो हा पैसा? सत्तेचा वापर फक्त समाजसेवेकरता नाही, तर वैयक्तिक फायदा मिळवण्यासाठी होतो, अशीच जनता भावना बळावते. शेतकरी कर्जमाफीसाठी विनवणी करत असतो, विद्यार्थी फी भरू शकत नाहीत, रुग्णांना उपचार मिळत नाहीत. पण मंत्रीमहोदयांच्या कोट्यवधींच्या गाड्या, फौजफाटा, बंगल्यांची झळाळी मात्र झकास असते. ही दुहेरी परिस्थिती लोकशाहीला सुरुंग लावत आहे. महाराष्ट्रातील सत्ता म्हणजे केवळ सत्ता नव्हे, ती संपत्तीची शिडी बनली आहे. विरोधात असताना “भ्रष्टाचारविरोधी” घोषणा करणारे सत्तेत गेल्यावर मात्र त्याच भ्रष्ट व्यवस्थेचा भाग होतात आणि जनतेला आश्वासनांची विषारी गोळी देत राहतात. आज महाराष्ट्राला गरज आहे ती जबाबदार नेतृत्वाची, पारदर्शक कारभाराची आणि जागरूक जनतेची. अन्यथा “महाराष्ट्र गरीब, नेते श्रीमंत” ही ओळख आपणच कायमस्वरूपी स्वीकारावी लागेल.

Maharashtra Politics: “महाराष्ट्र गरीब झाला, पण नेते श्रीमंत झाले! Read More »