DNA मराठी

Maharashtra Politics

aditi tatkare

Aditi Tatkare : लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; मंत्री आदिती तटकरेंची ग्वाही

Aditi Tatkare : लाडकी बहीण योजना बंद होणार नाही नसल्याची ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, लाडक्या बहिण योजनेला यशस्वी वर्षपूर्ती होत आहे. सव्वा दोन ते अडीच कोटी महिलांना आम्ही या योजनेचा लाभ देत आहोत. दोन दिवसांपूर्वीच जुलै महिन्याचा हप्ता देण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक योजना ही दरवर्षी एक प्रक्रियेतून जात असते. पात्रतेचे काही नियम या योजनेसाठी आहेत.माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने काही डेटा आम्हाला दिला आहे.त्यांनी दिलेल्या डेटानुसार पात्र लाभार्थ्यांना लाभ चालू राहणार, अपात्र असणाऱ्यांचा लाभ कमी होईल. 2100 रुपये देण्या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री व  दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ योग्य वेळी घेईल. मात्र आम्ही ही योजना चालूच ठेवणार आहोत. ही योजना बंद होणार नाही. असं माध्यमांशी बोलताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या. तसेच यावेळी त्यांनी पिंक रीक्षा ही सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत कोल्हापुरात 700 पेक्षा अधिक अर्ज आले आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात महिलांना रिक्षा वाटप केले जात आहे. यावर्षी कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रासाठी 400 पिंक रिक्षाचे उद्दिष्ट असल्याचीही माहिती दिली.

Aditi Tatkare : लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; मंत्री आदिती तटकरेंची ग्वाही Read More »

img 20250809 wa0001

Maharashtra Politics : “फोडाफोडीच्या राजकारणातून उगम पावणारे नवे नेतृत्व”

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पक्ष बदलणे, आमदार फोडणे आणि सत्ता स्थापनेसाठी राजकीय डावपेच रचणे हे काही नवीन राहिले नाही. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये या सगळ्याला एक वेगळे आणि अधिक धोकादायक दिशा मिळालेली दिसते. शरद पवारांसारख्या थोर राजकारण्यांनीही भूतकाळात पक्ष फोडला, नवा पक्ष उभारला, सत्ता मिळवली. पण त्या काळात पक्षाचे नाव, चिन्ह, नेत्याचा फोटो यावर असा थेट दावा कुणी केला नव्हता. तात्पर्य, राजकीय भूक होती, पण तिची एक मर्यादा होती. पण आज ती मर्यादा धूसर होत चालली आहे. “मी निवडून आलोय, म्हणजे माझीच मक्तेदारी,” असा अहंकार काही निवडून आलेल्या काही लोकप्रतिनिधींच्या वागण्यात दिसतो. जनतेने मतदान पेटीतून ज्यांना विश्वासाने निवडलं, तेच प्रतिनिधी निवडून आल्यानंतर जनतेच्या अपेक्षांनाच कमी लेखतात. हीच का लोकशाही असा प्रश्न पडतो? या सगळ्या घडामोडींचा एक सकारात्मक पैलूही आहे. आज या अस्थिर आणि अस्वस्थ राजकारणात दोन तरुण नेते उभे राहताना दिसतात रोहित पवार आणि आदित्य ठाकरे. या दोघांनीही आपल्या राजकीय प्रवासात पक्ष फोडणे, दबाव तंत्र, आमदारांची खरेदी-विक्री, विश्वासघात, एकनाथ शिंदें व अजित पवारांसारखे बंड आणि सत्तापालट यांचे साक्षीदार झाले आहेत. हे राजकारण त्यांनी बाहेरून पाहिलं नाही अनुभवलं आहे. आज हे दोघंही नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करताना, पक्ष रचनेचा गाभा कसा मजबूत करायचा, कार्यकर्त्यांशी नातं कसं टिकवायचं, जनतेचा विश्वास कसा जपायचा, आणि राजकारणात नैतिकता जिवंत कशी ठेवायची याचा धडा घेऊन पुढे येत आहेत. आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेबांचा वारसा आणि ठाकरे बाणा जपण्याचा प्रयत्न केला. तर रोहित पवार यांनी शरद पवारांच्या परंपरेचा अभ्यास केला, तरुणाचे प्रश्न कसे हाताळायची आणि ग्रामीण भागातील जनतेशी थेट संपर्क कास रहायचं “शरद पवार जसे आज बहुतांशी गाडीने प्रवास करताय. असं रोहित पण काकांचा वारसा जपतानी दिसतंय, ग्रामीण भागात नाळ जुळून घेण्याचे त्याचे कौशल्य त्यांच्यात दिसते. हे दोघेही आज सत्तेच्या खेळात नाहीत, पण राजकारणाच्या अभ्यासातून आणि प्रत्यक्ष संघर्षातून त्यांनी आपले राजकीय स्थान मजबूत केले आहेत. म्हणूनच भविष्यकाळाकडे पाहताना वाटते आजच्या फोडाफोडीच्या राजकारणातूनच उद्याचं ठाम आणि विचारधारेशी बांधिल नेतृत्व उगम पावू शकतं आणि या बदलत्या महाराष्ट्राच्या राजकारणात रोहित पवार आणि आदित्य ठाकरे ही नावं नजरेआड करणं अशक्य आहे.

Maharashtra Politics : “फोडाफोडीच्या राजकारणातून उगम पावणारे नवे नेतृत्व” Read More »

Congress On EVM : देवेंद्र फडणवीस ‘चिप मिनिस्टर’; मतचोरीविरोधात काँग्रेस आक्रमक

Congress On EVM : लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपाने मतचोरी कशी केली, हे पुराव्यासह मांडल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. दादरमध्ये चक्काजाम करून निवडणूक आयोग व भाजपा सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तासभर चक्काजाम करण्यात आला, या आंदोलनात प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, राजन भोसले, किशोर कन्हेरे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, अनंत गाडगीळ यांच्यासह आंदोलनात शेकडो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला. या आंदोलनाआधी टिळक भवनमधील पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोग व भाजपाचा खरपूस समाचार घेतला, राहुल गांधी यांनी अत्यंत तर्कसंगत मांडणी करून मतदानातील मोठा घोटाळा उघड केला, लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम कसे सुरु आहे? हे दाखवून दिले. निवडणुकीतील हा घोटाळा स्पष्ट दिसत असल्याने सरकारने राजधर्म पाळत एखादी एसआयटी गठीत करायला हवी होती अथवा सर्वोच्च न्यायलयाच्या न्यायमूर्तींकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली पाहिजे होती. पण राहुल गांधी यांनी पुरावे देत तथ्य मांडूनही ना केंद्र सरकारने चौकशी करण्याची धमक दाखवली ना निवडणूक आयोगाने काही खुलासा केला, उलट राहुल गांधी यांनाच प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले, हा आणखी हास्यास्पद प्रकार आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या 1960 च्या नियमावलीनुसार, जर अशा प्रकारे कोणी हरकत घेतली वा आक्षेप नोंदवला तर नियम 17/18/19 नुसार ताबडतोब चौकशी करावी, असे कायदाच सांगत आहे, मग चौकशी का केली जात नाही? असे सपकाळ म्हणाले. देवेंद्र फडणवीस ‘चिप मिनिस्टर’! निवडणूक आयोगाची पोलखोल केल्यानंतर भाजपाची पिलावळ राहुल गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल जी भाषा वापरली त्यातून ते निवडणूक आयोगाचे दलाल आहेत, वकील आहेत की प्रवक्ते असा प्रश्न पडतो. फडणवीस यांच्यात अहंकार दडलेला आहे, या अहंकराचा दर्प नाही तर दुर्गंधी त्यांच्या बोलण्यातून दिसली. हे ‘चिफ मिनिस्टर’ नाही चर ‘चिप मिनिस्टर’ आहेत. जेव्हा जेव्हा निवडणूक आयोगावर बोलले जाते तेव्हा तेंव्हा भाजपा व देवेंद्र फडणवीस यांची तडफड का होते? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व फडणवीस आयोगाचा बचाव करण्यास का येतात? कारण ‘दाल में कुछ काला है’ असे नाही तर सर्व दालच काळी आहे. राहुल गांधी यांनी जो घोटाळ दाखवला त्यातून निवडणूक आयोग बरोबरचे हितसंबंध उघडे पडतील याची भिती देवेंद्र फडणवीस यांना वाटत असावी म्हणूनच त्यांची फडफड होत असावी, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

Congress On EVM : देवेंद्र फडणवीस ‘चिप मिनिस्टर’; मतचोरीविरोधात काँग्रेस आक्रमक Read More »

raju shetty

माधुरी हत्तीणी संदर्भातील वाद-विवाद संपला; राजू शेट्टी यांनी मानले अंबानी परिवार आभार

Raju Shetty : कोल्हापूरच्या जनतेचे महादेवीशी असलेले भावनिक नाते आणि तिच्या तातडीच्या वैद्यकीय गरजा लक्षात घेऊन, वनताराने एक अभूतपूर्व उपाय सुचवला आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात, खास करून कोल्हापूरच्या जवळच नांदणी परिसरात हत्तींसाठी देशातील पहिलं अत्याधुनिक सॅटेलाईट पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे केंद्र आधुनिक सुविधांनी युक्त असणार आहे. वनताराने प्रस्तावित केलेल्या या केंद्रात महादेवीसाठी सर्व अत्याधुनिक आणि वैज्ञानिक सुविधा असतील. ज्यामुळे तिला उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा मिळेल. लोकभावना, मठाचे नेतृत्व आणि प्राणी कल्याण या तिन्ही गोष्टींचा आदर करत वनताराने हा एक अनोखा तोडगा काढला काढल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी या निर्णयाचे स्वागत करत आपली भूमिका जाहीर केली आहे. राजू शेट्टी यांनी अंबानी परिवार आणि विशेषतः अनंत अंबानी यांचे मनापासून आभार मानले आहेत. अनंत अंबानींच्या मोठेपणामुळे तसेच या निर्णयामुळे महादेवी (माधुरी) हत्तीणी संदर्भातील वाद-विवाद संपला असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. आम्ही जैन समाजाचे असून जिओ और जिने दो या तत्वाने जगत असतो. माधुरी हत्तीची काळजी घेत नसल्याचा व तिचा छळ करण्याचा आरोप पेटाने आमच्यावर लावला. हा आरोप आम्हाला सहन नाही झाला. जीव, जंतू आणि जनावर यांच्यावर प्रेम असल्यामुळे आम्हाला त्रास झाला. यामुळे थोडा रोष निर्माण झाला होता. मात्र आता शेवट छान होत असून यामध्ये अनंत अंबानींची विशेष भूमिका राहिल्याने राजू शेट्टी यांनी अंबानी परिवाराचे आभार मानले.

माधुरी हत्तीणी संदर्भातील वाद-विवाद संपला; राजू शेट्टी यांनी मानले अंबानी परिवार आभार Read More »

the demonic form of the teacher in pathardi

शिक्षकाचं राक्षसी रूप l चौथीतील विद्यार्थिनीवर बलात्काराचा आरोप, गावात आर्थिक तडजोडीच्या चर्चेने खळबळ

अहिल्यानगर | प्रतिनिधी – पाथर्डी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत चौथीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणात गावातील सरपंचपतीने मध्यस्थी करत कथितपणे आर्थिक तडजोड घडवून आणल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. पीडित मुलगी परप्रांतीय असल्याची माहिती असून, तिच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीच्या मोबदल्यात मौन बाळगण्यास भाग पाडल्याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून, सरपंचपतीच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे, पीडिता अल्पवयीन असल्यामुळे हा प्रकार ‘पॉक्सो कायद्या’च्या (Protection of Children from Sexual Offences Act) चौकटीत येतो. मात्र, अद्यापही या प्रकरणी कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, तसेच पोलिसांकडूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. स्थानिक पातळीवर दबाव आणि राजकीय हस्तक्षेपामुळे संपूर्ण प्रकरण दडपले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पीडितेला न्याय मिळावा, आरोपी शिक्षकाला निलंबित करून कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी गावकरी करत आहेत. दरम्यान, महिला व बालकल्याण विभाग, पोलीस प्रशासन आणि जिल्हा परिषदेने या गंभीर प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन चौकशी सुरू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. प्रमुख मुद्दे:

शिक्षकाचं राक्षसी रूप l चौथीतील विद्यार्थिनीवर बलात्काराचा आरोप, गावात आर्थिक तडजोडीच्या चर्चेने खळबळ Read More »

Vijay Wadettiwar on Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्या ; विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPAT मशीन नसणार अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी दिल्यानंतर विरोधक याचा विरोध करत आहे. एक प्रभागात जास्त उमेदवार असणार, मतदारांना एकावेळी चार मते द्यावी लागणार त्यामुळे प्रक्रियेला वेळ लागेल आणि मतदान केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता आहे. असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी दिले आहे. तर आता निवडणुका पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी VVPAT ची आवश्यकता आहे. मतदाराने कुणाला मत दिले हे त्यांना समजले पाहिजे. राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशीन शिवाय घेऊ नये, या मशीन नसतील तर बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना वडेट्टीवार यांनी हे सरकार जैन समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप केला. भाजप आमदाराने कबुतरखाने याबाबत प्रश्न उपस्थित केला होता, मुंबई महापालिकेने कारवाई केली. जैन समाज रस्त्यावर उतरला तेव्हा भाजपचे मंत्री या निर्णयाविरोधात जातात. म्हणजे निर्णय हेच सरकार घेणार आणि मग यू टर्न पण घेणार. नसलेले प्रश्न आणि समस्या हे सरकार निर्माण करत आहे आणि जैन समाजाचे तारणहार हे सरकार आहे असा दिखावा तयार करत आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुका समोर ठेवून मतांसाठी भाजप आपली राजकीय पोळी भाजत आहे ,भाजपची ही दुटप्पी भूमिका असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. आपल्या देशाबाबत केंद्र सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना आहे. चीनच्या आक्रमणाबाबत त्यांनी प्रश्न विचारले तर न्यायाधीशांनी सच्चा भारतीय अस विधान करू शकत नाही, अशी टिपण्णी केली, हे योग्य नाही. देशात घडणाऱ्या घटनांबाबत सरकारला प्रश्न विचारण्याचे कर्तव्य विरोधी पक्ष नेत्यांचे आहे. पण कोण खरा भारतीय, कोण नाही याचे प्रशस्तीपत्रक न्यायाधीशांनी देऊ नये अशी स्पष्ट भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली. एकीकडे भाजप प्रवक्तेपदी असलेली व्यक्ती उच्च न्यायालयात न्यायाधीश होणार दुसरीकडे न्यायाधीश विरोधी पक्ष नेते यांच्यावर टिपण्णी करतात याने न्यायव्यवस्थेवरचा विश्वास लोकांचा उडून जाईल. त्यामुळे देशातील लोकशाहीला गालबोट लागेल अशी विधान किमान न्यायाधीशांनी करू नये, असे वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar on Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्या ; विजय वडेट्टीवार Read More »

img 20250807 wa0001

Sharad Pawar: राजकारणात अजूनही पवारांचा ‘सेंटर स्टेज’

Sharad Pawar : राजकीय पटावर मातब्बर नेता म्हणून चार दशके आपली बुद्धिमत्ता, व्यूहरचना आणि निर्णयक्षमता सिद्ध केलेल्या शरद पवार यांच्यासाठी गेले काही महिने विशेषतः आव्हानात्मक ठरले. उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासारखे जुने, कणखर आणि चाणाक्ष सहकारी पक्षातून बाहेर पडले, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन फाट्यांमध्ये विभागला गेला. साहजिकच, ‘पवारांचे युग संपले’ अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. मात्र, शरद पवार हे नजरेआड झाले तरी मन:पटलावरून अदृश्य झाले नाहीत, हे त्यांनी आपल्या शांत पण निश्चित पावलांमधून पुन्हा सिद्ध केले. “कुस्ती अजून संपलेली नाही, फड अजून मांडायचा आहे,” हा त्यांचा ठाम संदेश होता. आणि याचे प्रत्यंतर मिळाले ते नुकत्याच काही महिन्यांतील घडामोडींमध्ये विशेषतः आमदार रोहित पवार यांच्या राजकीय भूमिकेमुळे. रोहित पवारांनी विधानसभेत आणि सभागृहाबाहेर ज्या आक्रमकतेने भूमिका मांडल्या, त्या केवळ विरोधकांना अडचणीत आणणाऱ्या नव्हत्या, तर सत्ताधाऱ्यांच्या गोंधळलेल्या रणनीतीलाही तडाखा देणाऱ्या होत्या. मंत्र्यांना थेट जाब विचारण्याची त्यांची शैली, शेतकरी प्रश्नांपासून ते महागाई, भ्रष्टाचार, आणि जलव्यवस्थापनाच्या विषयांवर आवाज उठवण्याची तळमळ पाहता, ‘पवारांची नवी फळी तयार झाली आहे,’ अशी जाणीव राजकीय विश्लेषकांना होऊ लागली आहे. विशेष म्हणजे रोहित पवार केवळ शरद पवारांचे नातू म्हणून नव्हे, तर एक स्वतंत्र, अभ्यासू आणि खंबीर व्यक्तिमत्त्व म्हणून पुढे येताना दिसत आहेत. ही घडामोड केवळ एक पिढीगत बदल न राहता, एक नव्या राजकीय लढाईची नांदी ठरत आहे. शरद पवार यांचे बलस्थान नेहमीच संकटात संधी शोधण्याचे राहिले आहे. ऐन अडचणीच्या काळातही संयम न सोडता, भक्कम पर्याय उभा करणे हा त्यांचा राजकीय स्वभाव आहे. त्यामुळेच आज जेव्हा अनेक जुन्या सहकाऱ्यांनी त्यांची साथ सोडली, तेव्हा पवारांनी तरुण नेतृत्वाला पुढे करून, नव्या स्वरूपातील विरोधी भूमिका घडवण्यास प्रारंभ केला. ही भूमिका, केवळ सत्तेच्या विरोधातील नकारात्मक मानसिकतेतून नव्हे, तर जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याच्या प्रेरणेवर आधारित आहे. शरद पवारांचे राजकारण नेहमीच दीर्घदृष्टी असलेले राहिले आहे. एका बाजूला ते स्वतःची भूमिका सांभाळत आहेत, तर दुसरीकडे नव्या नेतृत्वाला तयार करत आहेत. ‘मोठे नेते गेले तरी पक्ष संपत नाही,’ हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. आणि हीच आहे त्यांची नवी खेळी शांत, पण प्रभावी. राजकीय रंगमंचावरून पवारांचा पडदा कधीच खाली जाणार नाही, हे त्यांनी दाखवून दिलं आहे. “पवार संपले” असं म्हणणाऱ्यांना त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की, “खेळ अजून बाकी आहे!”

Sharad Pawar: राजकारणात अजूनही पवारांचा ‘सेंटर स्टेज’ Read More »

maratha mahamandal

बँकांनी लाभार्थ्यांची कर्ज मंजुरीची प्रकरणे वेळेत मार्गी लावावीत; महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील

Narendra Patil : मराठा समाजातील नवउद्योजकांना चालना देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे कर्ज प्रस्ताव बँकांनी सुलभ पद्धतीने व विहित कालावधीत मार्गी लावावेत, असे निर्देश महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी दिले. महामंडळाच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक घेण्यात आली. त्यावेळी पाटील बोलत होते. बैठकीस उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी आशिष नवले, महामंडळाच्या विभागीय समन्वयक पल्लवी मोरे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्राचे सहायक आयुक्त रविकुमार पंतम, जिल्हा समन्वयक अमोल बोथे,कौशल्य विकास अधिकारी शुभदा पाठक, अनिल मोहिते, दिलीप भालसिंग व विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते. पाटील म्हणाले, की महामंडळाच्या योजनांद्वारे राज्यातील १ लाख ५० हजार लाभार्थ्यांना उद्योगासाठी १२,६०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले असून, १,२२२ कोटी रुपयांचा व्याज परतावा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील १८ हजार लाभार्थ्यांना राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांमार्फत १,३४० कोटींचे कर्ज व १२३ कोटी रुपयांचा व्याज परतावा मिळाला आहे. महामंडळामार्फत प्रामुख्याने मराठा समाजासाठी, तसेच ज्या प्रवर्गासाठी स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही अशा घटकांसाठी स्वयंरोजगारासाठी कर्ज व्याज परतावा योजना राबवली जाते. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प व्याज परतावा योजना या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना असून, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत या योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी त्यांचा व्यापक प्रचार-प्रसार होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. बँकांनी योजनेचे स्वरूप समजून घेऊन कर्जवाटपाचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण होईल, यासाठी प्रयत्न करावेत. पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात कोणताही विलंब होऊ नये. प्रस्तावात त्रुटी असल्यास त्यांचे तात्काळ निराकरण करावे व विनाकारण प्रलंबित प्रस्ताव थांबवू नयेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. बैठकीदरम्यान पाटील यांनी बँक अधिकाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच ज्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत, त्यांच्या समस्या समजून घेत त्या सोडवण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना केल्या. अर्ज कुठे व कसा करायचा? ऑनलाईन अर्जासाठी: आपण राज्य शासनाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकता: ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक टप्पे:  कागदपत्रे लागणारी शक्यता (योजनेनुसार थोडी बदलू शकतात):  ऑफलाइन / प्रत्यक्ष अर्ज करू इच्छिणाऱ्यांसाठी: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रकिंवामहामंडळाचा विभागीय कार्यालय / जिल्हा समन्वयक कार्यालय येथे भेट देऊन सहाय्य मिळवता येते.  अहमदनगर जिल्ह्यासाठी संपर्क करा:जिल्हा समन्वयक – अण्णासाहेब पाटील महामंडळ(आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोजगार विभागात याबाबत माहिती मिळू शकते)  मदत हवी असल्यास: महामंडळाची हेल्पलाइन किंवा संपर्क क्रमांक वेबसाइटवर दिलेले आहेत.https://annasahebpatilmvcgmc.gov.in/ContactUs

बँकांनी लाभार्थ्यांची कर्ज मंजुरीची प्रकरणे वेळेत मार्गी लावावीत; महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील Read More »

pratap sarnaik

Pratap Sarnaik : एसटी महामंडळ चालवणार ‘यात्री ॲप’ प्रताप सरनाईक यांची घोषणा

Pratap Sarnaik : चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप लवकरच एसटी महामंडळ मार्फत सुरू करण्यात येत आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते मंत्रालयातील आपल्या दालनामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या ॲग्रीगेटेड पॉलिसीच्या (समुच्चयक धोरण) आधीन राहून राज्य शासनाचे यात्री ॲप बनवण्याच्या अंतिम मसुद्यावरील चर्चेवेळी बोलत होते. या बैठकीला आमदार प्रवीण दरेकर , परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व इतर अधिकारी उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले, राज्य सरकारने मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, भरमसाठ नफा कमवून प्रवासी व चालकांना वेठीस धरणाऱ्या खाजगी कंपन्यांच्या जोखंडातून मुक्त करण्याच्या प्रमाणित हेतूने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रवासी अ‍ॅप बस, रिक्षा , टॅक्सी व ई-बस या वाहन सेवा करीता सुरू करण्याचे निश्चित केले आहे. सदर ॲप राज्य शासनाच्या परिवहन विभागाच्या सहकार्याने एसटी महामंडळा मार्फत सुरू करण्यात येईल. भविष्यात एस टी महामंडळाला उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करणे व प्रवाशांना एक विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देणे हा उद्देश समोर ठेवून हे शासकीय ॲप एसटी महामंडळाने चालवणे योग्य राहील असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले. ” छावा राईड ” नावावर एकमत..! या ॲप ला जय महाराष्ट्र, महा – राईड, महा-यात्री, महा-गो छावा राईड यापैकी एखादे नाव देण्या बाबत चर्चा झाली. नवीन शासकीय ॲप ला ” छावा राईड ॲप ” हे नाव द्यावे असे सर्वानुमते ठरले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या अंतिम मान्यतेने हे ॲप लवकरच कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले जातील अे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. बेरोजगार मराठी तरुण-तरुणींना कर्ज देण्यासाठी मुंबै बँकेचा पुढाकार एसटी महामंडळातर्फे चालवण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या अधिकृत ॲप द्वारे रोजगाराची संधी मिळणाऱ्या मराठी तरुण- तरुणींना मुंबै बँकेच्या माध्यमातून विशेष आर्थिक पाठबळ देण्यात येईल असे आश्वासन बॅंकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी दिले. या तरुण-तरुणींना रोजगार देण्यासाठी मुंबई बँकेच्या माध्यमातून वाहन खरेदीसाठी १० टक्के व्याजदराने कर्ज दिले जाईल. तसेच अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटके विमुक्त महामंडळ, ओबीसी महामंडळ आणि एमएसडीसी या संस्थांतर्फे ११ टक्के व्याज परतावा अनुदानाच्या स्वरूपात देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाणार असून, त्यामुळे हे कर्ज बिनव्याजी असल्यासारखे आहे. असे प्रतिपादन आमदार प्रवीण दरेकर यांनी केले. मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की, केंद्र सरकारच्या अ‍ॅग्रीगेटर मार्गदर्शक तत्वानुसार या ॲप ची नियमावली अंतिम टप्यात आहे. सध्या खाजगी संस्था अनाधिकृत ॲप च्या माध्यमातून प्रचंड नफा कमवतात. त्यासाठी त्या कंपन्या चालक व प्रवासी यांची लूट करीत आहेत. एसटी महामंडळडे कडे यंत्रणा, तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ व जागा मुबलक प्रमाणात असल्यामुळे शासनाने असे ॲप विकसित करून चालविण्यासाठी एसटी महामंडळाला दिल्यास त्याचा फायदा प्रवाशां बरोबर एसटी महामंडळाला देखील होईल.

Pratap Sarnaik : एसटी महामंडळ चालवणार ‘यात्री ॲप’ प्रताप सरनाईक यांची घोषणा Read More »

Devendra Fadnavis: महादेवी हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

Devendra Fadnavis: नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) माधुरी हत्तीण पुन्हा नांदणीत यावी, अशी जन भावना आहे. ही जनभावना लक्षात घेऊन नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. राज्य शासनही स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात हत्तीणीला परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल, असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नांदणी मठ (ता. शिरोळ, जिल्हा कोल्हापूर) येथील माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीणीच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्य शासनाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, वन मंत्री गणेश नाईक, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह नांदणी मठाचे प्रतिनिधी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते. हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांसह पथक तयार करणार नांदणी मठाच्या परंपरा आणि स्थानिक जनतेच्या भावनांचा विचार करून कायदेशीर प्रक्रिया मार्गाने माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीणीला पुन्हा मठात परत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गेल्या 34 वर्षांपासून माधुरी हत्तीण नांदणी मठात आहे. माधुरी पुन्हा मठात यावी ही जन भावना आहे. ही जन भावना लक्षात घेऊन राज्य शासन पुनर्विचार याचिका दाखल करेल. मठानेही आपल्या याचिकेमध्ये राज्य शासनाचाही समावेश करावा. तसेच वन विभागाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र सविस्तर भूमिका मांडण्यात येईल. यामध्ये केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या निकषाप्रमाणे व उच्चस्तरीय समितीने सुचविलेल्या सर्व मुद्द्यांचे निराकरण करण्यात येईल. हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरसह राज्य शासन एक पथक तयार करून आवश्यक ती सर्व मदत करेल. आवश्यक वाटल्यास रेस्क्यू सेंटरसारखी व्यवस्थाही करण्यात येईल व त्या प्रमाणे सुविधा देण्यात येतील आदी बाबींचा समावेश करून या बाबी तपासण्यासाठी सर्वोच्च न्यायालयास स्वतंत्र समिती नेमण्याची विनंतीही राज्य शासनामार्फत या याचिकेमध्ये करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तसेच या प्रकरणात नागरिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील जे हत्ती बाहेर नेण्यात आले, अशा सर्व हत्तींची माहिती वन विभागाने गोळा करावी, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा, अशी भूमिका मांडली. खासदार धैर्यशील माने, खासदार विशाल पाटील, आमदार सर्वश्री आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, विश्वजीत कदम, सतेज पाटील, अशोक माने, सदाभाऊ खोत, राहुल आवाडे, अमल महाडिक, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार प्रकाश आवाडे, नांदणी मठाचे पूज्य स्वस्तीश्री जिनसेन महास्वामीजी, जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्य जीव) श्रीनिवास राव, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे आदीसह जैन स्वामी व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Devendra Fadnavis: महादेवी हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार Read More »