DNA मराठी

Maharashtra Politics

“मतदान हीच खरी क्रांती : तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करा” त्यांची टक्केवारी तुमची मृत्यूची वारी

DNA मराठी विशेष लेख Election 2025: – “ज्या दिवशी तुम्ही मुलांचा, नातवांचा आणि त्यांच्या भविष्याचा विचार करून मतदान कराल, तेव्हाच खऱ्या अर्थाने भविष्यातील तुमच्या पिढीला काहीतरी द्याल,” ही साधी पण खोल अर्थ सांगणारी भावना आजच्या समाजव्यवस्थेसमोर आरसा धरते. देशात किंवा राज्यात निवडणुका जरी वारंवार येत असल्या, तरी ‘मतदान’ या घटकाचा खरी सामाजिक जबाबदारी म्हणून विचार फार कमी वेळा केला जातो. आज जनतेने विचार करायची गरज आहे की, आपण केवळ जात, पंथ, पक्ष, किंवा तात्कालिक फायद्याच्या आधारावर मतदान करत आहोत का? की आपल्या पिढ्यांच्या आरोग्याचा, शिक्षणाचा, आणि नैतिक अधिष्ठानाचा विचार करत आहोत? आज समाजात वाढत चाललेला भ्रष्टाचार, टक्केवारीची रीत, आणि कंत्राटी साखळीतील माफियांची झोपमोड करणारी उपस्थिती, या सर्व गोष्टींचा थेट परिणाम आपण खात असलेल्या अन्नधान्यावर, पिण्याच्या पाण्यावर, आणि शेतीमालावर होत आहे. शेतीमध्ये मारल्या जाणाऱ्या अतिरिक्त कीटकनाशकांपासून ते रासायनिक खतांपर्यंत, दूध आणि शीतपेयांतील रसायनांची मात्रा, आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांतील अपायकारक घटक या सर्व गोष्टी आरोग्यास घातक ठरत आहेत आणि यामागील मूळ कारण म्हणजे नफेखोरीचा हव्यास आणि प्रशासकीय दुर्लक्ष. आज हे निर्णय घेणारे अधिकारी, हे कायद्याचे रक्षक, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे निवडून दिले गेलेले लोकप्रतिनिधी हेच सर्व स्वतःच्या अपत्यांच्या भविष्यातील आरोग्याचा विसर पावले आहेत. आज ते भ्रष्ट मार्गाने पैसा कमवतात, सत्ता गाजवतात, ठेके वाटतात, नियम मोडतात… पण त्यांचेही मूल हीच विषारी फळे आणि विषारी अन्न आणि दुधाचे पदार्थ खाणार आहे, हे वास्तव ते विसरत आहेत. म्हणूनच, एक नागरिक म्हणून, प्रत्येकाने विचार करावा “माझ्या मुलांच्या आणि त्यांच्या भावी आयुष्याच्या आरोग्यासाठी मी कोणाला निवडतोय?” हा प्रश्न फक्त आजच्या राजकारणाला नाही, तर समाजाला प्रश्न विचारण्याची आणि सजग करण्याची एक नवी दिशा ठरतोय. मतदान म्हणजे केवळ बोटावर शाई लावणे नव्हे, तर भविष्यात आपल्या घरात कुठल्या प्रकारचं अन्न शिजणार आहे, हे ठरवण्याचं एक महत्त्वाचं पाऊल आहे. “काय खावे राजकारण्यांनी ठरवायचं? का नागरिकांनी?” देशात सध्या एक विचित्र आणि धोकादायक प्रवृत्ती वाढत चालली आहे “कोणत्या धर्माने काय खावे, कुणाच्या घरात काय शिजावे हे राजकारणी ठरवत आहेत!” एखाद्या देशाची ओळख ही त्याच्या विविधतेमुळे असते, त्याच्या खाद्यसंस्कृती, परंपरा, आणि व्यक्तिगत निवडींमुळे असते पण आज काही राजकारणी व्यक्तिशः पातळीवर जाऊन, धर्माच्या आधारावर ताटात काय असावे याचेही राजकारण करत आहेत. धर्म, जात, परंपरा या प्रत्येकाचा सन्मान व्हायलाच हवा. मात्र एखाद्या धर्माला धक्का लागतो म्हणून दुसऱ्या धर्मातील अन्नपदार्थावर बंदी घालणे, किंवा त्यास राजकीय मुद्दा बनवणे, हे लोकशाहीच्या तत्त्वांना धरून नाही. दुर्दैव हे की, हेच लोक जेंव्हा प्रश्न येतो विषारी, भेसळयुक्त अन्न, रसायनांनी भरलेल्या पिकांचे, तेव्हा गप्प बसतात. ना ते कृषी कायदे काटेकोरपणे अंमलात आणतात, ना अन्न सुरक्षा कायद्याचे पालन करतात, ना फूड सॅम्पलिंग किंवा गुणवत्तेच्या तपासण्या नियमित करतात. साधा प्रश्न आहे “कोण काय खातो, याच्यावर राजकारण करणाऱ्या नेत्यांनी हे का सांगितलं नाही की, तुम्ही जे खात आहात ते शुद्ध आहे की नाही?” काहींना कोणती भाजी खावी हे सांगणाऱ्या नेत्यांनी कधीही हे सांगितले नाही की, त्या भाजीत किती किटकनाशक आहे. दूध पिण्याचा सल्ला देणाऱ्यांनी कधी तपासलं नाही की, ते दूध कोणत्या केमिकल्सने पातळ केलं गेलं आहे. हे दुटप्पीपणं आता सर्वसामान्य जनतेनं ओळखलं पाहिजे. आज गरज आहे ती सजग मतदाराची, जो प्रतिनिधी निवडताना त्याच्या भूतकाळाचा, कार्यशैलीचा, आणि विचारसरणीचा अभ्यास करतो. धर्माच्या आणि ताटातल्या नावावर भांडण लावणारे नव्हे, तर भविष्यात आपल्या घरात शुद्ध अन्न, स्वच्छ पाणी, आणि सुरक्षित जीवन मिळेल यासाठी आवाज उठवणारे प्रतिनिधी आपल्याला निवडायला हवेत. कारण मतपेढ्या जिंकण्यासाठी पेटवले जाणारे हे विषय उद्याच्या आपल्या पिढीच्या आरोग्यावर पडणाऱ्या परिणामांपासून लक्ष विचलित करणारे आहेत. तर मग ठरवूया आपला प्रतिनिधी असा असावा जो “कोण खाल यावर नाही”, तर “कोण चांगलं खाईल यासाठी” लढा देईल. जागरूक नागरिकत्वाची जाणीव करणारा विचार! आपण ठरवूया – मतदान करताना ‘धर्म’, ‘जाती’, ‘भावना’ यांच्याऐवजी ‘स्वच्छता’, ‘सत्शासन’, ‘नैतिकता’ यांना महत्त्व द्यायचं. कारण भविष्यातील पिढीसाठी आपली हीच निवड आधारभूत ठरणार आहे.

“मतदान हीच खरी क्रांती : तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करा” त्यांची टक्केवारी तुमची मृत्यूची वारी Read More »

राम शिंदेंच्या पराभवामागे षडयंत्र! – महसूल मंत्री बावनकुळेंचा घणाघात”पण कुणी पाडलं?” – राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

अहिल्यानगर – “राम शिंदे हे कर्तबगार आणि जनतेशी जोडलेले नेते आहेत. त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत जाणीवपूर्वक षडयंत्र रचून पाडण्यात आलं,” असा घणाघात करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक नवा राजकीय भडका उडवला आहे. मात्र, त्यांनी कोणावरही थेट नाव घेऊन आरोप न करता, ‘पण कुणी पाडलं?’ या सवालाने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. शेवगावमध्ये नुकत्याच पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत बोलताना बावनकुळे म्हणाले, “राम शिंदेंनी मैदानात आणि राजकारणात नेहमी झुंज दिली आहे. त्यांच्यावर अन्याय झाला आहे. हा पराभव नैसर्गिक नव्हता, तर हे एक संगनमताचे षडयंत्र होतं.“ राजकीय सूत्रांच्या मते, बावनकुळे यांचा हा इशारा पक्षांतर्गत गटबाजीकडे असल्याची शक्यता आहे. मात्र, बावनकुळे यांनी नामोल्लेख टाळल्याने चर्चा आणि तर्कांना अधिक उधाण आलं आहे. स्थानिक कार्यकर्ते आणि राम शिंदे समर्थकांनी देखील या वक्तव्याला दुजोरा देत, “खरं कुणी पाडलं, हे आता लोकांनी समजून घ्यायला हवं,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, या विधानामुळे भाजपच्या अंतर्गत गोटात पुन्हा एकदा खदखद वाढण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. पुढील काही दिवसांत या आरोपाचा प्रतिध्वनी दिल्लीपासून जिल्हापर्यंत ऐकू येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय भूकंप होतोय का? की केवळ इशारा? या आरोपाच्या पडद्यामागे नेमकं काय? – येणाऱ्या काळात स्पष्ट होईल!

राम शिंदेंच्या पराभवामागे षडयंत्र! – महसूल मंत्री बावनकुळेंचा घणाघात”पण कुणी पाडलं?” – राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण Read More »

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश

Pratap Sarnaik : प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्न करीत असते. त्यानुसार इवे ट्रान्स प्रा. लि. कंपनीकडून 5150 ईलेक्ट्रीक बसेस भाडेतत्त्वावर घेण्याबाबत करार करण्यात आला. प्रवाशांना या बसेसच्या माध्यमातून सुविधा मिळण्यासाठी नवीन वेळापत्रकानुसार महामंडळाला ई- बसेसचा पुरवठा करावा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. मंत्रालयात कंपनी प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत मंत्री सरनाईक बस पुरवठ्याबाबत आढावा घेताना बोलत होते. बैठकीस अपर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, कंपनीचे के. व्ही प्रदीप आदी उपस्थित होते. बस पुरवठादार कंपनीने दिलेल्या वेळापत्रकानुसार बस पुरवठा करणे अपेक्षीत असल्याचे सूचीत करीत मंत्री सरनाईक म्हणाले, कंपनीने दिलेल्या बसेसचा चालनीय तोटा लक्षात घेता, राज्य शासनाकडून निधी मिळण्यासाठी व्यवहार्यता अंतर अर्थपुरवठ्यासाठी (viability gap funding) चा प्रस्ताव पाठविण्यात यावा. कंपनीने आतापर्यंत 220 बसेसचा पुरवठा केला आहे. उर्वरित पुरवठा सुधारित करारानुसार करण्यासाठी कंपनीने नियोजन करावे. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, भाडेतत्वावर कंपनीने 5150 ईलेक्ट्रीक बसेस पुरवठा करण्याचा करार करण्यात आला. त्यापैकी 220 बसेसचा पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये 12 मीटर व 9 मीटर लांबीच्या बसेस आहेत. महामंडळाने विभागनिहाय नवीन खाते तयार करून इलेक्ट्रीक बसच्या उत्पन्नामधून कंपनीला बिलांची रक्कम देण्यात येत आहे. त्यानुसार 60 कोटी रूपये कंपनीला देण्यात आले आहे. उर्वरित 40 कोटी रक्कम देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महामंडळाला 12 मीटर बस चालविताना प्रति किलोमीटर 12 रूपये आणि 9 मीटर बस चालविताना 16 रूपये प्रति किलोमीटर तोटा ग्राह्य धरून पुढील काही वर्षात 3191 कोटी रूपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. तोट्याची रक्कम राज्य शासनाकडून देण्याचे मान्य केल्यास बस पुरवठ्याचा हा करार पूर्णत्वास जावू शकतो. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्समंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेवून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली.

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश Read More »

वैष्णवी हगवणे प्रकरण, अनिल कस्पटे यांच्या मागणीनंतर सरकारी वकील म्हणून आर. आर. कावेडिया यांची नियुक्ती

Vaishnavi Hagavane: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी तिचे वडील अनिल कस्पटे यांनी पुढाकार घेत, या गुन्ह्याची प्रभावी व निष्पक्षपणे न्यायालयात मांडणी व्हावी, यासाठी सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून आर. आर. कावेडिया यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता एस. व्ही. मोरे देसाई यांनी गुरुवारी (29 मे) अधिकृत आदेश जारी करून कावेडिया यांची या प्रकरणात सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडवून दिली होती. तिच्या मृत्यूमागील कारणे व संभाव्य आरोपींची भूमिका उघड व्हावी, यासाठी तिचे वडील अनिल कस्पटे सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. आर. आर. कावेडिया हे अनुभवी व निष्णात वकील असून त्यांनी याआधी अनेक गुन्हेगारी व सामाजिक प्रकरणांत सरकारी बाजू प्रभावीपणे मांडली आहे. त्यामुळे वैष्णवीच्या कुटुंबीयांना या नियुक्तीमुळे न्याय मिळविण्याच्या लढ्याला नवे बळ मिळाले आहे. दरम्यान, या प्रकरणात संबंधित आरोपींविरोधात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी वैष्णवीच्या नातेवाइकांनी केली आहे. आता सरकारी वकील म्हणून कावेडिया यांची नियुक्ती झाल्याने या खटल्याच्या न्यायालयीन कार्यवाहीस अधिक गती मिळण्याची शक्यता आहे. कावेडिया यांचा अनुभव लक्षात घेता, या प्रकरणात न्याय मिळण्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्वाची ठरणार आहे..

वैष्णवी हगवणे प्रकरण, अनिल कस्पटे यांच्या मागणीनंतर सरकारी वकील म्हणून आर. आर. कावेडिया यांची नियुक्ती Read More »

वैष्णवी हगवणे प्रकरणात गंभीर खुलासे; उच्च पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीकडून जबरदस्तीने रुखवत खरेदी

Neelam Gorhe On Vaishnavi Hagavane Case : विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मयुरी जगताप आणि वैष्णवी हगवणे या दोन्ही सूनांच्या तक्रारीवर महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्या म्हणाल्या की, या दोन्ही प्रकरणांमध्ये हगवणे कुटुंबाच्या विरोधात छळाच्या गंभीर तक्रारी आहेत. काल त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत कस्पटे कुटुंबियांची भेट घेतली असता, त्यावेळी एका नव्या घटनेबाबत माहिती समोर आली. हगवणे कुटुंबाने लग्नावेळी एका उच्च पदस्थ पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या रुखवतातून रुखवत विकत घेण्यासाठी दीड लाख रुपये जबरदस्तीने घेतले, अशी तक्रार संबंधित मुलीच्या कुटुंबाने केली आहे. डॉ. गोऱ्हे यांनी यासंदर्भात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांशी तपशीलवार चर्चा केल्याचेही सांगितले. मयुरी जगताप या हगवणे कुटुंबाच्या दुसऱ्या सुनेशीही त्यांनी सविस्तर संवाद साधला असून, त्या प्रकरणातील तपशील देखील पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले आहेत. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, छळाच्या या दोन्ही घटनांमध्ये क्रूरतेची पद्धत स्पष्टपणे दिसते. मयुरी जगतापने दाखल केलेल्या 354 कलमाखालील तक्रारीचे प्रकरण सध्या पौड पोलीस स्टेशनवरून पिंपरी चिंचवड आयुक्तालयात वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणाची चार्जशीट अंतिम टप्प्यात असून, लवकरच ती सादर होणार असल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, या प्रकरणात कोणत्याही उच्च पदस्थ व्यक्तीला संरक्षण दिले जाणार नाही. साक्षीपुराव्यांमध्ये हस्तक्षेप करणाऱ्यांविरोधातही कठोर कारवाई डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, या प्रकरणात ॲड. राजेश कावेडिया आणि ॲड. उज्वला पवार यांची नावे पुढील कायदेशीर प्रक्रियेत असून, सरकारी वकिलांचीही नेमणूक आवश्यक ठरणार आहे. त्यांनी राज्य सरकारकडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सर्व माहिती सोपविणार असल्याचे सांगितले. राज्य महिला आयोगाच्या संदर्भात डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, त्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा होणे गरजेचे आहे. त्याला जर राजकीय हेतू म्हणायचं असेल, तर तो दृष्टीकोन चुकीचा आहे. महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दोष सिद्धीचे प्रमाण वाढावे, महिलांना न्याय मिळावा आणि पुनर्वसनाचे काम अधिक प्रभावी व्हावे, यासाठी आयोगाला अधिक निधी, कर्मचारी आणि कार्यक्षमता देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पुणें, नाशिक, आणि नव्या मुंबईतील अलीकडील महिलांच्या आत्महत्या तसेच राजगुरूनगर येथील बालिका अत्याचार घटनांचा दाखला देत, त्या म्हणाल्या की अशा घटना टाळण्यासाठी वेळेत न्याय देणं गरजेचं आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना आरोपींना फरार होण्यासाठी वेळ मिळू नये, यासाठी शासनाने ठोस भूमिका घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वैष्णवी हगवणे प्रकरणात गंभीर खुलासे; उच्च पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीकडून जबरदस्तीने रुखवत खरेदी Read More »

राज्यात विक्रमी मान्सून धडक, 68 वर्षांचा विक्रम मोडला

Maharashtra Rain Alert: राज्याच्या हवामान इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. भारतीय हवामान विभागाने २६ मे २०२५ रोजी मुंबईत मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली असून, ही नोंद गेल्या ६८ वर्षांत सर्वात लवकर झालेली आहे. सरासरी मान्सून आगमनाची तारीख ११ जून असून, यंदा तब्बल १६ दिवस आधी मान्सूनची दमदार एंट्री झाली आहे. इतिहासातले सर्वात लवकर मान्सून आगमन — संदर्भीय नोंदी गेल्या काही दशकांतील सर्वात लवकर मान्सून आगमन खालीलप्रमाणे: १९५६: २९ मे १९६१: २९ मे १९७1: २९ मे २०९१ ते २०२४ पर्यंत: बहुतांश वेळा ७ जून ते १३ जून दरम्यान २०२५: २६ मे (सर्वात लवकर!) ही नोंद केवळ मुंबईसाठीच नव्हे तर पश्चिम किनारपट्टीसाठीही एक ऐतिहासिक बदल मानली जात आहे. हवामानतज्ज्ञांच्या मते, अरबी समुद्रावरील कमी दाबाचा पट्टा आणि बदललेली वाऱ्यांची दिशा यामुळे यंदाचा मान्सून गतीने पुढे सरकला. पावसाचा पहिला जोर: मुंबई जलमय २६ मे रोजी सकाळी ८:३० ते ११:३० यावेळेतील पावसाची नोंद: कुलाबा: १०५.२ मिमी सांताक्रूज: ५५ मिमी मुंबईत अनेक सखल भाग जलमय झाले असून वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. नागरिकांनी सोशल मीडियावर पावसाचे व्हिडीओ आणि परिस्थिती शेअर करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. आपत्ती व्यवस्थापन सज्ज — गिरीश महाजन मैदानात उतरले राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात थेट उपस्थित राहून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षालाही भेट दिली. विशेष म्हणजे, महापालिकेच्या नियंत्रण कक्षात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः उपस्थित होते. त्यांनी स्थानिक यंत्रणांशी समन्वय साधून उपाययोजनांचा आढावा घेतला. गिरीश महाजन यांनी सांगितले की, “सध्या मी स्वतः मंत्रालयात उपस्थित असून राज्य नियंत्रण कक्षातून सतत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मी सातत्याने समन्वय साधत आहे. सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे, हीच विनंती.” नागरिकांना प्रशासनाचे आवाहन अनावश्यक प्रवास टाळावा पाण्याच्या प्रवाहात किंवा साचलेल्या भागात जाणे टाळावे समुद्रकिनाऱ्यांवर फिरायला जाणे पूर्णतः टाळावे हवामान खात्याच्या सूचना आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अपडेट्सवर सतत लक्ष ठेवावे पूर्वीचा अनुभव, यंदाची तयारी २०१९ साली मुंबईत मुसळधार पावसामुळे संपूर्ण यंत्रणा विस्कळीत झाली होती. ट्रेन सेवा बंद पडली होती, शाळांना सुट्ट्या जाहीर झाल्या होत्या, आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. मात्र यंदा गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून, पहिल्याच दिवशी योग्य उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. सरकार सज्ज, जबाबदारी सर्वांची राज्य सरकारने यंत्रणा तातडीने कामाला लावली आहे. मात्र पावसामुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीतून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनीही सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे.

राज्यात विक्रमी मान्सून धडक, 68 वर्षांचा विक्रम मोडला Read More »

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण, आतापर्यंत काय काय घडलं? पोलिसांनी सांगितली A to Z माहिती

Vaishnavi Hagwane : राजेंद्र हगवणेला शोधायला 3 पथक तयार करण्यात आले असून हगवणेला लवकरच अटक करणार येणार असल्याची माहिती सुनील कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी दिली. तसेच आमच्यावर या प्रकरणात कोणाचाही दबाव नाही नाही आम्हाला कोणाचा फोन आला आहे. एका महिलेचा असा दुर्दैवी आणि अत्यंत क्रूरतेने अंत झाला आहे त्यामुळे या घटनेकडे आम्ही अत्यंत गांभीर्याने पाहत आहोत. आरोपींना कोर्टात हजर करून पोलीस रिमांड वाढवून घेणार असल्याची देखील माहिती त्यांनी दिली. माध्यमांशी बोलताना सुनील कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त पुढे म्हणाले की, शिवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी जे ॲडव्हान्स मेडिकल सर्टिफिकेट दिलेलं आहे. त्यामध्ये डॉक्टरांनी काही पार्ट्स काढून ठेवलेले आहेत ते पुढील तपासासाठी आम्ही पाठवणार आहोत. त्यामध्ये डॉक्टरांनी हँगिंगचं एक कारण दिलेला आहे आणि शरीरावर मारहाणीच्या खुणा आहेत. ॲडव्हान्स मेडिकल सर्टिफिकेटमध्ये या सगळ्यांचा उल्लेख आहे. त्यानुसार आम्ही कलम 304 हे वाढवले आहे. त्यासोबतच हुंडाबळी 80(2), 108 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. उर्वरित दोन आरोपी म्हणजे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा यांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या तीन-तीन बनवल्या आहेत आणि त्यांचा वेगवेगळ्या पथकांमार्फत तपास सुरू आहे त्यांना लवकरच अटक करण्यात येईल. या गुन्ह्याचा जो सिक्वेन्स आहे जे पुरावे आहेत त्यानुसार या घटनेचा जो लेखाजोखा आहे मारहाण केल्यापासून आत्महत्येस प्रवृत्त करण्यापर्यंतच्या दोन तासाचे अनेक पुरावे आम्हाला मिळाले आहेत. त्यामुळे आज आरोपींना कोर्टात हजर करून त्यांचं पोलीस रिमांड वाढवून घेणार आहोत. असं देखील ते म्हणाले. हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी त्यांच्या घरी असणारे पाच ते सहा सीसीटीव्ही कॅमेरे परिस्थितीजन्य पुरावे आहे. आजूबाजूला असणारे साक्षीदार यांना जमा करण्यास आम्हाला वेळ मिळाला आहे. आमच्यावर कोणताही राजकीय दबाव नाही आम्हाला कुणाचाही फोन आला नाही कायदेशीर पद्धतीने आमचा तपास सुरू आहे. ही घटना जी आहे. एका महिलेचा असा दुर्दैवी आणि अत्यंत क्रूरतेने अंत झाला आहे त्यामुळे या घटनेकडे आम्ही अत्यंत गांभीर्याने पाहत असून अगदी बारकाईने सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. अशी माहिती देखील सुनील कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी दिली.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण, आतापर्यंत काय काय घडलं? पोलिसांनी सांगितली A to Z माहिती Read More »

पुण्यात मोठी राजकीय खेळी, माजी आमदार धंगेकर यांची महानगर प्रमुखपदी नियुक्ती

Ravindra Dhangekar : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची शिवसेनेच्या महानगर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा राजकीय डाव टाकला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची पुढील एका वर्षासाठी शिंदे यांनी शिवसेनेच्या महानगर प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. महानगर प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. तसेच, पुण्यात पक्षाच्या वाढीसाठी पूर्ण प्रयत्न करून आपण टाकलेला विश्वास सार्थकी लावेन, असा शब्दही दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रवींद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. तेव्हापासून धंगेकर यांना कोणते पद मिळणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. पण, धंगेकर यांनी ‘मी कुठल्याही पदासाठी नव्हे; तर लोकांच्या समस्या जलद गतीने आणि प्रभावीपणे सोडवण्यासाठी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे, असे जाहीर केले होते. वंदनीय हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा मी सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार करेन. पुण्यात शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करेन. शिवसेनेच्या महानगर प्रमुखपदी माझी निवड केल्याबद्दल मनस्वी आभार.: रवींद्र धंगेकर, माजी आमदार

पुण्यात मोठी राजकीय खेळी, माजी आमदार धंगेकर यांची महानगर प्रमुखपदी नियुक्ती Read More »

नगरकरांनो पाणी जपून वापरा, ‘या’ भागात आज होणार नाही पाणीपुरवठा

Ahilyanagar News: अहिल्यानगर शहर पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत झाल्याने शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. 20 मे रोजी अहिल्यानगर शहर पाणी पुरवठा योजनेच्या विळद पंपीग स्टेशन येथील विज पुरवठा दुपारी चार वाजले पासुन सायंकाळी सहा वाजेपर्यंत तीन वेळा खंडीत झाल्याने पाणी वाटप सुरू असलेल्या स्टेशन रोड परिसर व काही उपनगर भागास पाणी पुरवठा करता आलेला नाही. तर दुसरीकडे बूधवार 21 मे रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच मंगलगेट , झेडीगेट ,सर्जेपुरा, रामचंद्र खुंट , दाळमंडई , जुने कलेक्टर ऑफिस परिसर , हातमपूरा, धरतीचौक , बंगाल चौकी , कोठी व तसेच गुलमोहोर रोड, प्रोफेसर कॉलणी परिसर , सिव्हील हडको, प्रेमदान हडको , टी.व्ही . सेंटर परिसर , म्युसिपल हाडको इ . भागाचा पाणी पुरवठा बंद राहाणार आहे. या भागास गुरुवार 22 मे रोजी पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. तर 22 मे रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागाचा म्हणजेच सिद्धार्थ नगर, दिल्लीगेट , नालेगांव, चितळे रोड , आनंदी बाजार , तोफखाना, जुने मनपा कार्यालय परिसर , पंचपीर चावडी , कापड बाजार खिस्त गल्ली , इ . भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार असुन या भागास शुक्रवार 23 मे रोजी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तरी सदय स्थितीत वादळी वाऱ्यासह पाऊस होत असल्याने व त्यामुळे शहर पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांनी असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन अहिल्यानगर महानगर पालिकेने केलेले आहे.

नगरकरांनो पाणी जपून वापरा, ‘या’ भागात आज होणार नाही पाणीपुरवठा Read More »

छगन भुजबळ तो झाकी है सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील अभी बाकी है! लक्ष्मण हाके स्पष्ट बोलले

Laxman Hake on Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर मंत्री पदासाठी अजित पवार कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ देखील अजित पवारांवर नाराज असल्याचे वृत्त समोर येत असल्याने छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती मात्र आता अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना मंत्रीपदाची संधी देत भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले असल्याचे देखील बोलले जात आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ तो झाकी है सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील अभी बाकी है. सुप्रिया सुळे केंद्रात , रोहित पवार, जयंत पाटील राज्य मंत्रिमंडळात काहीच दिवसांत पाहायला मिळतील असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. ते आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी लक्ष्मण हाके म्हणाले की, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उशिरा का होईना छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान दिले त्याचा स्वागत आहे.ओबीसींच्या दृष्टिकोनातून छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळातील समावेश आवश्यक होता. मात्र ओबीसींचे आरक्षण आणि आरक्षणामधील घुसखोरी हे ओबीसी आणि ओबीसी नेत्यांसमोरील येत्या निवडणुकीमधील अडचणीचे प्रश्न आहेत. छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाने या लढाईला बळ मिळणार आहे. असं माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले. तसेच छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि जयंत पाटील या सगळ्यांना सदिच्छा आहे पण ओबीसींच्या प्रश्नांवर भूमिका घेणार नसाल तर गाठ ओबीसी चळवळीशी आहे हे लक्षात ठेवा असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

छगन भुजबळ तो झाकी है सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील अभी बाकी है! लक्ष्मण हाके स्पष्ट बोलले Read More »