DNA मराठी

Maharashtra Politics

Pune News: भाजप पदाधिकाऱ्यांवर वसुली व धमकीचे आरोप, ऑडिओ क्लिपमुळे खळबळ

Pune News : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात भाजपच्या महिला पदाधिकारी आशा बुचके यांच्यावर वसुली आणि धमकी दिल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. या प्रकरणाची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुचके यांनी एका युवकाला पैशासाठी धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. युवकाला विश्रामगृहात बोलावून अपमानास्पद व धमकीची भाषा वापरल्याचे या ऑडिओत ऐकू येत आहे. यामुळे त्या लोकप्रतिनिधी आहेत की दबाव टाकणाऱ्या टोळीप्रमाणे वागत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तक्रारदार रोशन बिरमल यांनी आरोप केला आहे की, त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट हाऊसमध्ये बोलावून जबरदस्तीने चेक घेण्यात आला. तसेच पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या घटनेमुळे आशा बुचके पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. यापूर्वीही त्यांच्यावर धक्काबुक्कीचे आरोप झाले होते. दरम्यान, या प्रकरणी युवकाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक राजकारणात तणाव निर्माण झाला असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pune News: भाजप पदाधिकाऱ्यांवर वसुली व धमकीचे आरोप, ऑडिओ क्लिपमुळे खळबळ Read More »

vijay wadettiwar

Vijay Wadettiwar: शेतकरी कर्जमाफी फसवा फसवी, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा

Vijay Wadettiwar: सरकारने घोषित केलेली कर्जमाफी ही एक बनवाबनवी आहे. सरकार शेतकऱ्यांना भुलवत आहे,पण जोपर्यंत 7/12 कोरा होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा खऱ्या अर्थाने फायदा होणार नाही, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात केली. प्रसार माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, सध्याच्या कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांचे उर्वरित कर्ज कायम राहणार आहे.त्यामुळे त्यांना भविष्यात नवीन कर्ज मिळणे कठीण होईल. पीकविमा योजनेतून केवळ विमा कंपन्यांचे भले होत असून शेतकरी आजही मदतीपासून वंचित आहे.त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचा 7/12 कोरा केला पाहिजे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या फोडाफोडीला ऊत आला असून, राजकारणात कोणतीही नीतिमत्ता उरलेली नाही. कोणाला तरी आधी डोक्यावर घ्यायचे आणि नंतर पायाखाली तुडवायचे ही आता एक फॅशन झाली आहे, अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी फोडाफोडीचे राजकारणावर प्रतिक्रिया देताना टीका केली. राज्यातील सत्ताधारी गोटात सर्व काही आलबेल नसल्याचे सांगत वडेट्टीवार म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तेत असूनही अस्वस्थ आहेत, त्यांचे मंत्रीही अस्वस्थ आहेत. राज्याला कर्जबाजारी करून हे सत्तेचे खेळ सुरू आहेत,जनतेच्या प्रश्नांकडे बघायला वेळ नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली. मुंबई महापालिकेतील नगरसेवक निधीच्या मुद्द्यावरून वडेट्टीवार यांनी सरकारवर पक्षपातीपणाचा आरोप केला. राजकारण हे निवडणुकीपुरते मर्यादित असले पाहिजे. विकास निधी देताना मात्र सर्वांना समान न्याय मिळणे अपेक्षित आहे. मात्र, सध्याचे सरकार विरोधकांच्या नगरसेवकांना निधी न देता लोकशाहीची घातक पद्धत रुजवत आहे,असे ते म्हणाले. राज्यात लव्ह जिहादच्या मुद्द्यावर फाशीची मागणी करणारे सत्ताधारी पक्षाचे नेते महिला शोषणाच्या प्रकरणांवर गप्प का? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. चांगल्या घरातील महिलांचे शोषण होत असताना सरकारमधील लोकांचे तोंड शिवले आहे का? असा टोला लगावत त्यांनी हे सर्व मतांच्या राजकारणाचे धंदे असल्याची टीका केली.

Vijay Wadettiwar: शेतकरी कर्जमाफी फसवा फसवी, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा Read More »

Ram Shinde: राहुरी व बारामतीसाठी प्रा. शिंदे स्टार प्रचारक; केंद्रीय भाजपने केली नियुक्ती

Ram Shinde: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी व पुणे जिल्ह्यातील बारामती या विधानसभा मतदार संघांच्या पोटनिवडणुकीसाठी केंद्रीय भाजपने 40जणांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचाही समावेश आहे. त्यांनी राहुरी मतदार संघातील भाजपचे उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या उमेदवारी दाखल करण्याच्या वेळी आवर्जून उपस्थित राहून प्रचाराला सुरुवात केली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी आमदार दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती व राहुरी विधानसभा मतदार संघात येत्या 23 एप्रिलला पोटनिवडणूक होत आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अजित राष्ट्रवादीने व राहुरीमध्ये शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी केंद्रीय व प्रदेश भाजपने तब्बल 40 स्टार प्रचारकांची फळी मैदानात उतरवली आहे. भाजपाच्या केंद्रीय कार्यालयाकडून ही यादी निवडणूक आयोगाकडे अधिकृतरित्या सादर करण्यात आली आहे. यात अहिल्यानगर जिल्ह्यातून विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यासह अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या आमदार मोनिका राजळे व नगरचे भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे केंद्रीय व राज्यातील मंत्रीही या स्टार प्रचारकांमध्ये आहेत. सभापती प्रा. राम शिंदे यांनी यापूर्वी तेलंगणा, गोवा, मध्य प्रदेश, राजस्थान व कर्नाटक या राज्यांमधील निवडणुकीमध्ये स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. या राज्यांमधील महत्त्वाच्या मतदारसंघात त्यांनी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार व प्रसार केला होता. आता राहुरी व बारामती मतदार संघातील महायुतीच्या प्रचारात ते सक्रिय सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे प्रा. राम शिंदे यांना स्टार प्रचारक म्हणून संधी देत भाजपाने त्यांच्या राजकीय वजनाला अधोरेखित केले आहे. बारामती व राहुरी या दोन्ही मतदारसंघांकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे. भाजपने या निवडणुकीसाठी राज्यातील आणि केंद्रातील प्रभावी नेत्यांची फळी मैदानात उतरवून प्रचार मोहीम आक्रमक करण्याचे संकेत दिले आहेत. विशेषतः बारामतीसारख्या प्रतिष्ठेच्या लढतीत पक्षाने संपूर्ण ताकदीनिशी झोकून देण्याची रणनीती आखली आहे. राहुरी मतदारसंघातही स्थानिक मुद्द्यांबरोबरच राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा प्रचार मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे.

Ram Shinde: राहुरी व बारामतीसाठी प्रा. शिंदे स्टार प्रचारक; केंद्रीय भाजपने केली नियुक्ती Read More »

img 20260410 wa0013

Ashok Kharat: भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

Ashok Kharat: पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून त्याचा पाय आणखी खोलात गेला आहे. पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत त्याच्यासह आणखी दोघांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे एक वर्षापूर्वी खबरदार पुढारी या दैनिकातून पत्रकार दत्तात्रय खेमनर यांनी अशोक खरात याच्या संशयास्पद कृत्यांबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तामुळे संतप्त झालेल्या खरातने त्या वेळेपासूनच खेमनर यांच्याविरोधात वैयक्तिक आकस ठेवला असल्याचे समोर आले आहे. तक्रारीनुसार, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर खरात याने आपल्या काही हस्तकांच्या माध्यमातून पत्रकार खेमनर यांना वारंवार धमकावण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न, तसेच कायदेशीर नोटिसा पाठवून मानसिक त्रास देण्याचे प्रकारही केल्याचा आरोप होत आहे. या सर्व प्रकारामुळे खेमनर यांना मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास सहन करावा लागला.या सततच्या छळाला कंटाळून अखेर पत्रकार दत्तात्रय खेमनर यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणात विशेष तपास पथक (SIT) ची परवानगी घेतल्यानंतरच पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भोंदू अशोक खरात आणि त्याच्या इतर दोन सहकाऱ्यांविरोधात पत्रकार संरक्षण कायदा, धमकावणे तसेच अब्रूनुकसानी संदर्भातील विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तपास सुरू केला असून, संबंधित आरोपींवर पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पत्रकार संघटना, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध राजकीय नेत्यांकडून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे.दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे,” अशी मागणी विविध स्तरांतून केली जात आहे.या घटनेमुळे पत्रकारांना निर्भयपणे काम करण्यासाठी कायदेशीर संरक्षण किती आवश्यक आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. तसेच, पत्रकारांवर होणाऱ्या अशा प्रकारच्या दबावाच्या घटना रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस भूमिका घेण्याची गरजही व्यक्त होत आहे.

Ashok Kharat: भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल Read More »

crime

Sambhajinagar Crime: नवऱ्याकडून पत्नीचा पेट्रोल पंपावर गळा चिरून खून

Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. करमाड परिसरातील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिलेचा तिच्याच दुसऱ्या नवऱ्याने भर दिवसा गळा चिरून खून केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. करमाड परिसरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर ही घटना घडली. पूजा गवांडे असे मृत महिलेचे नाव आहे. ती पंपावर काम करत असताना सत्यम गवांडे याने धारदार चाकूने तिच्या गळ्यावर वार करत तिचा निर्घृण खून केला. माहितीनुसार, पूजाचे यापूर्वी एक लग्न झाले होते आणि तिला एक मुलगा व एक मुलगी आहे. पहिल्या पतीच्या निधनानंतर काही महिन्यांपूर्वी तिने सत्यम गवांडे याच्यासोबत आळंदी येथे विवाह केला होता. मात्र, लग्नानंतर दोघेही एकत्र राहत नव्हते. सत्यम गवांडे याला दुसरे लग्न करायचे असल्याने तो पूजाकडे सोडचिठ्ठी देण्याचा तगादा लावत होता. मात्र, पूजाने यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यातूनच त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अवघ्या एका तासात आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती विनयकुमार राठोड पोलीस अधीक्षक, ग्रामीण यांनी दिली.

Sambhajinagar Crime: नवऱ्याकडून पत्नीचा पेट्रोल पंपावर गळा चिरून खून Read More »

election

Election Commission: ईव्हीएमची तपासणी आणि छाननी करण्याचा आदेश ऐतिहासिक, मुंबईत होणार तपासणी

Election Commission: भारताच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच, मुंबई उच्च न्यायालयाने ईव्हीएमची (EVMs) तपासणी आणि छाननी करण्यास परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांनी हा आदेश दिला आहे. या प्रकरणातील याचिकाकर्ते हे काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य आणि माजी मंत्री नसीम खान आहेत तर प्रतिवादी दिलीप लांडे आहेत. २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, शिंदेसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांनी, मुंबई उपनगर जिल्ह्यातील चांदिवली मतदारसंघातून नसीम खान यांचा पराभव केला. खान यांनी निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यासंदर्भात बोलताना नसीम खान म्हणाले की, भारताच्या इतिहासात आतापर्यंत असे कधीही घडलेले नाही की, निवडणुका पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाने (ECI) उमेदवार आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत EVM ची तपासणी किंवा तपासणी मोहीम राबवली असेल. “हा एक ऐतिहासिक आदेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एप्रिल २०२४ मधील निकालाचा संदर्भ देत नसीम खान म्हणाले की, “या निकालानुसार, निकालांच्या घोषणेनंतर प्रत्येक विधानसभा मतदार संघातील ५ टक्के ईव्हीएममधील म्हणजेच कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि VVPAT मधील ‘बर्न झालेली मेमरी’ (burnt memory) किंवा मायक्रोकंट्रोलरची तपासणी व पडताळणी ईव्हीएम उत्पादकांच्या अभियंत्यांच्या एका पथकाद्वारे केली जाईल.” मुंबई उपनगर जिल्ह्याच्या उप-निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नसीम खान यांना पाठवलेल्या पत्रानुसार, EVM उत्पादक कंपनी असलेल्या ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बंगळुरू’ यांच्यामार्फत १६ आणि १७ एप्रिल रोजी मुंबईत केवळ ‘निदान चाचणी’ (diagnostic check) करण्यास परवानगी दिली जाईल. काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांना त्यांच्या संबंधित मतदारसंघांमध्ये EVM आणि ‘व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल’ (VVPAT) युनिट्सची पडताळणी करून घेण्यास सांगितले होते.काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘INDIA’ विरोधी आघाडीतील सुमारे दोन डझन उमेदवारांनी EVM च्या विश्वासार्हतेबाबत चिंता व्यक्त केली होती.

Election Commission: ईव्हीएमची तपासणी आणि छाननी करण्याचा आदेश ऐतिहासिक, मुंबईत होणार तपासणी Read More »

samarjeetsinh ghatge

Samarjeetsinh Ghatge : समरजितसिंह घाटगे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

Samarjeetsinh Ghatge : कागल येथील राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) पक्षाचे नेते आणि शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, त्यांचे पुत्र राजे अखिलेश सिंह, राजे विरेंद्रसिंह घाटगे, पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा पाटील, उपनगराध्यक्ष जयंत रावण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खा.धनंजय महाडिक, राजवर्धन नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रकाश आवाडे, भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले की, समरजितसिंह घाटगे यांच्या प्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची ताकद आणखी वाढणार आहे. भाजपाची विचारधारा गावखेड्यात नेण्यासाठी पोषक वातावरण आहे. घाटगे यांच्या नेतृत्वाखाली यापुढील काळात सर्वांनी एकदिलाने काम करायचे आहे. ज्या विश्वासाने त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे त्याला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली. यावेळी समरजितसिंह घाटगे म्हणाले की यापुढे पक्ष सांगेल त्यानुसार चालायचे असे आम्ही ठरवले आहे. पक्षाकडून जी काही जबाबदारी सोपवली जाईल ती पार पाडण्यासाठी आम्ही जोमाने काम करून पक्षाची विचारधारा गावागावात, घराघरात पोहचवू. यावेळी जिल्हा परिषद सदस्या शिवानी विजयसिंह भोसले, पंचायत समिती सदस्य अनिलकुमार हेगडे, रंजना बापू अस्वले, नगरसेवक दीपक मगर, सभापती शिक्षण समिती अरुण गुरव, महिला बालकल्याण समिती सौ. सारिका बारड, नगरसेविका साधना विष्णू पाटील, नगरसेवक सुशांत कालेकर, उमेश सावंत, बाळासाहेब माळी, मेघा गजानन माने, आनंदा पसारे, विजय राजगिरे, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कृष्णात पाटील, हमिदवाडा साखर कारखान्याचे संचालक कैलाश जाधव, सरपंच संभाजी फराकटे यांनीही भाजपात प्रवेश केला.

Samarjeetsinh Ghatge : समरजितसिंह घाटगे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश Read More »

eknath shinde

Eknath Shinde: काम नाही तर पद नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिला पदाधिकाऱ्यांना सज्जड दम

Eknath Shinde: निवडणुका संपल्यात आता पक्ष वाढीचा हंगाम सुरु झालाय. राज्यात शिवसेनेला बळकट करण्यासाठी तळागाळातील शिवसैनिकांपर्यंत पोहोचा, जनतेच्या प्रश्नांवर तत्परतेनं काम करा आणि पक्षवाढीसाठी योगदान देण्याचे निर्देश शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदार, खासदार, विभागीय संपर्कप्रमुख, सह संपर्कप्रमुख तसेच लोकसभा संपर्कप्रमुखांना दिले. मतदार याद्यांचे बारकाईने पुनरावलोकन करण्यासाठी बूथ प्रतिनिधींची नियुक्ती करा, काम दिसले नाही तर पद राहणार नाही, अशी तंबीच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिली. नुकताच शिवसेनेकडून संपर्कप्रमुख, विभागीय संपर्कप्रमुख आणि लोकसभा संपर्कप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची महत्त्वपूर्ण ऑनलाईन आढावा व मार्गदर्शन बैठक उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत आज पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्री, आमदार, खासदार यांना पद विसरुन कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम करण्याचे निर्देश दिले. मतदार संघांच्या विभाजनानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संपर्क प्रमुखांना कामाचा रोडमॅप दिला. लोकसभा संपर्कप्रमुखांनी त्यांच्या क्षेत्रातील प्रत्येक विधानसभेची स्वतंत्र बैठक घेऊन त्या बैठकीचे फोटो आणि तपशील दररोज मला पाठवावा तो मी स्वतः बघणार, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. निवडणूक आयोगाकडून राज्यात राबवल्या ‘एसआयआर’ मोहीमेसाठी आतापर्यंत कोणी किती बीएलए नेमले, कितीवेळा मतदार संघाचा दौरा केला, किती बैठका घेतल्या? याची विचारणा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संपर्कप्रमुखांना केली. कामाचा अहवाल नसेल, जे काम करणार नाहीत, त्यांना थेट नारळ देणार, असा सज्जड दम शिंदेंनी या बैठकीत दिला. मतदार संघाचे विभाजन लक्षात घेऊन प्रत्येकाने मतदार यादींचे बारकाईने पुनरावलोक करण्यासाठी दोन ‘बीएलए’ नियुक्त करावेत तसेच ‘बीएलए’सोबत रोज बैठक घेण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. पक्षाची संघटन रचना अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रात अधिक जोमाने काम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या. संपर्क प्रमुखांना केलेल्या सूचना – मतदार संघाचा दौरा करणे, बैठका घेणे – मतदार याद्यांचे बारकाईने पुनरावलोकन करा – ‘एसआयआर’साठी दोन ‘बीएलए’ नियुक्त करावेत – ‘बीएलए’सोबत दररोज बैठक घेणे – लोकसभा संपर्कप्रमुखांनी प्रत्येक विधानसभेची स्वतंत्र बैठक घेणे – बैठकीचे फोटो आणि तपशील दररोज पाठवणे नुकताच केली होती संपर्क प्रमुखांची घोषणा शिवसेनेने विभागीय संपर्कप्रमुख, सह संपर्कप्रमुखांची, लोकसभा संपर्क प्रमुखांची नुकताच घोषणा केली होती. यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, मंत्री योगेश कदम, मंत्री भरत गोगावले, मंत्री प्रकाश आबिटकर आणि मंत्री संजय राठोड, आमदार डॉ. मनीषा कायंदे, आमदार किरण सामंत आमदार निलेश राणे, आमदार दिलीप लांडे, आमदार तुकाराम काते, आमदार किशोर अप्पा पाटील, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यावर पक्षाने महत्वाची जबाबदारी सोपवली आहे.

Eknath Shinde: काम नाही तर पद नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिला पदाधिकाऱ्यांना सज्जड दम Read More »

farmers

E Pik Pahani : शेतकऱ्यांनो, ई-पीक पाहणी नोंदणी 21 मेपूर्वी करा नाहीतर…

E Pik Pahani : उन्हाळी हंगाम २०२५-२०२६ करिता राज्यात ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणीस सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी २४ मे २०२६ पूर्वी आपल्या पिकांची अचूक नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे. पिकांची नोंदणी न केल्यास सातबारा उताऱ्यावर पीक नोंद कोरी राहील व ती नंतर भरता येणार नाही. परिणामी, अवकाळी पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्तीच्या काळात मिळणारी मदत, पीक विमा तसेच शासकीय अनुदान मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. शासन निर्णयानुसार ई-पीक पाहणी प्रक्रिया दोन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. शेतकरी स्तरावर ८ एप्रिल ते २४ मे २०२६ या कालावधीत, तर सहाय्यक स्तरावर २५ मे ते ८ जुलै २०२६ या कालावधीत पिकांची नोंद करण्यात येईल. उन्हाळी हंगामात शेतात उभे असलेले पीक, कायम पड तसेच चालू स्थितीत पड असलेल्या जमिनींची नोंद करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेची शंभर टक्के अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सर्व तहसीलदारांना निर्देश देण्यात आले आहेत. भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी विहित कालावधीत मोबाईलद्वारे पीक नोंदणी पूर्ण करावी, असे‌ आवाहनही आशिया यांनी केले आहे.

E Pik Pahani : शेतकऱ्यांनो, ई-पीक पाहणी नोंदणी 21 मेपूर्वी करा नाहीतर… Read More »

VBA on Gas Cylinder: गॅसचा काळाबाजार! तर आमदार खासदारांच्या दारासमोर चूल पेटवून आंदोलन करणार…वंचितने दिला इशारा

VBA on Gas Cylinder : वंचित बहुजन आघाडी, जामखेड तालुका यांच्या वतीने “नरेंद्र, कब मिलेगा सिलेंडर?” गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई काळाबाजार सर्वसामान्य जनतेची होणारी आर्थिक लुटमार या मुद्द्यावर वंचितच्या वतीने आंदोलन करण्यात आले. वंचितच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर चुल पेटवून आंदोलन करण्यात आले यावेळी वंचितचे प्रवक्ते अरुण जाधव म्हणाले की सध्या देशभरात गॅस सिलिंडरची भीषण व कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आलेली आहे. ही टंचाई नैसर्गिक नसून नियोजनबद्ध पद्धतीने तयार करण्यात आली असल्याचा ठोस संशय जनतेमध्ये निर्माण झाला आहे. याचाच फायदा घेत काळाबाजार करणारे दलाल व काही संबंधित यंत्रणा सर्वसामान्य नागरिकांची उघडपणे आर्थिक लूट करत आहेत. ९१६ रुपयांना उपलब्ध असणारा गॅस सिलिंडर जाणीवपूर्वक बाजारातून गायब करण्यात आला असून, तोच सिलिंडर ४,००० ते ५,००० रुपयांपर्यंत काळ्या बाजारात विकला जात आहे. ही परिस्थिती अत्यंत संतापजनक असून, यामागे कोणाचे संरक्षण आहे, असा थेट प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. महिला, गृहिणी, गरीब, श्रमिक व मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वयंपाकासाठी गॅस मिळत नसल्याने त्यांच्या घरातील चुली अक्षरशः विझल्या आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांना तासन्तास लांबच लांब रांगेत उभे राहूनही गॅस मिळत नाही. ही परिस्थिती अत्यंत अमानुष व असह्य बनली आहे. एकीकडे सर्वसामान्य जनता मूलभूत गरजांसाठी झगडत असताना, दुसरीकडे काळाबाजार करणारे लोक हजारो रुपये कमवत आहेत. ही परिस्थिती केवळ प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे व संबंधित यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे निर्माण झाली आहे, असे स्पष्टपणे दिसून येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भाजपा सरकारला जाब विचारण्यासाठी आणि जनतेच्या हक्कासाठी हे तीव्र आंदोलन उभारण्यात आले आहे असे म्हणाले तातडीच्या मागण्या 1. गॅस सिलिंडरची कृत्रिम टंचाई तात्काळ दूर करून पुरवठा सुरळीत करण्यात यावा. 2. काळाबाजार करणाऱ्या दलालांविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. 3. जादा दराने गॅस विक्री करणाऱ्या एजन्सींवर छापे टाकून त्यांचे परवाने तात्काळ रद्द करण्यात यावेत. 4. गॅस वितरण व्यवस्थेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. 5. सर्वसामान्य नागरिकांना योग्य दरात व नियमित गॅस पुरवठा हमीने उपलब्ध करून देण्यात यावा. जर वरील मागण्यांकडे तात्काळ लक्ष देऊन कार्यवाही करण्यात आली नाही, तर जनतेचा तीव्र रोष उफाळून येईल आणि हे आंदोलन आणखी व्यापक व तीव्र करण्यात येईल. त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन व सरकारची राहील, याची नोंद घ्यावी असा ईशारा अरुण जाधव यांनी देऊन जामखेड तहसीलदार धनंजय बांगर यांना निवेदन दिले.

VBA on Gas Cylinder: गॅसचा काळाबाजार! तर आमदार खासदारांच्या दारासमोर चूल पेटवून आंदोलन करणार…वंचितने दिला इशारा Read More »