Babasaheb Patil : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावर RBI ची मोठी कारवाई; जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून हटवले
Babasaheb Patil : राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावर सलग दहा वर्षांपेक्षा अधिक काळ राहिल्याच्या आक्षेपावरून भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) त्यांच्यावर कारवाई केली असून, त्यांना संचालकपदावरून दूर करण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात बँकेचे सभासद आणि अधिकृत मतदार प्रतिनिधी सतीश शेषराव जाधव यांनी केलेल्या तक्रारीपासून झाली. त्यांनी 25 मे 2026 रोजी RBIकडे तक्रार दाखल करत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील आठ संचालकांनी निर्धारित कालावधीपेक्षा अधिक काळ पदावर राहिल्याचा आरोप केला होता. या यादीत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचाही समावेश होता. दहा वर्षांच्या कार्यकाळाचा नियम चर्चेत सहकारी बँकांच्या संचालकांच्या कार्यकाळाबाबत करण्यात आलेल्या कायद्यातील बदलामुळे हे प्रकरण महत्त्वाचे ठरले आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार, सहकारी बँकांमधील अध्यक्ष आणि पूर्णवेळ संचालक वगळता इतर संचालकांचा सलग कार्यकाळ कमाल दहा वर्षांचा करण्याची तरतूद करण्यात आली आहे. सतीश जाधव यांनी आपल्या तक्रारीत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 19 सदस्यांच्या संचालक मंडळातील आठ संचालकांच्या कार्यकाळावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांच्यावर नियमांनुसार अपात्र ठरवण्याची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्याचबरोबर बँकेतील कथित नोकरभरती प्रक्रियेबाबतही तक्रारीत आक्षेप नोंदवण्यात आले होते. उच्च न्यायालयातही प्रकरण या प्रकरणी सतीश जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. 3 ऑगस्ट 2026 रोजी न्यायालयाने संबंधित प्राधिकरणाला 25 मे रोजी करण्यात आलेल्या तक्रारीवर गुण-दोषांच्या आधारे सहा आठवड्यांच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, न्यायालयाने स्वतः आठ संचालक अपात्र असल्याचा अंतिम निष्कर्ष दिलेला नव्हता; RBIने तक्रारीवर निर्णय घ्यावा, एवढाच निर्देश देण्यात आला होता. यानंतर तक्रारीतील आठ संचालकांपैकी सात जणांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्याचे वृत्त आहे. मात्र, बाबासाहेब पाटील यांनी राजीनामा दिला नाही. त्यानंतर RBIकडून त्यांना संचालकपदावरून दूर करण्याची कारवाई करण्यात आली. तक्रारीत कोणत्या संचालकांची नावे? तक्रारीमध्ये बाबासाहेब पाटील यांच्यासह आठ संचालकांचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामध्ये अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर, श्रीपतराव निवृत्ती काकडे, स्वयंप्रभा धनंजय पाटील, व्यंकटराव धोंडीराम बिरादार, पृथ्वीराज हरिश्चंद्र सिरसाट, प्रमोद जाधव आणि नागोराव आर. पाटील यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. तक्रारीत त्यांच्या बँकेतील कार्यकाळावर आक्षेप घेण्यात आला होता. बाबासाहेब पाटील काय म्हणाले? RBIच्या कारवाईवर बाबासाहेब पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. 2021 मध्ये संचालकांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळासंदर्भात झालेला कायदा आपल्याला लागू होतो, असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे आपल्याला संचालकपदावरून हटवता येणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. RBI चा निर्णय योग्य नसून या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार.









