DNA मराठी

Maharashtra Politics

uddhav thackeray

Uddhav Thackeray: नीट पेपरफुटी प्रकरण; ठाकरे बंधूंचा 26 जुलैला मुंबईत मोर्चा

Uddhav Thackeray : देशातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून नीट पेपर फुटीवरून चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. या प्रकरणावरून दिल्लीत आंदोलन देखील होत असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामान्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे आता या प्रकरणावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत मोठी घोषणा केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी संयुक्तपणे 26 जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचार थांबवावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी ही लढाई कोणत्याही पक्षाची नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याची असल्याचे स्पष्ट केले. लाखो विद्यार्थी वर्षभर कठोर परिश्रम करून परीक्षेला सामोरे जातात. मात्र पेपरफुटीसारख्या गैरप्रकारांमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरते. त्यामुळे अशा घटनांबाबत सरकारने कठोर भूमिका घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले. मोर्चा मुंबईतील शिवाजी पार्क येथून सुरू होणार असून मोठ्या संख्येने कार्यकर्ते, विद्यार्थी संघटना आणि विविध सामाजिक संस्था सहभागी होण्याची शक्यता आहे. या आंदोलनाद्वारे केंद्र सरकारवर दबाव निर्माण करून नीट पेपरफुटी प्रकरणाची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी, दोषींवर कठोर कारवाई तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याची मागणी करण्यात येणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात आंदोलनाची लाट उसळली असून विविध राज्यांमध्ये विद्यार्थी आणि राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रस्तावित मेगा मोर्च्याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न केंद्रस्थानी ठेवून होणारे हे आंदोलन आगामी काळातील शिक्षण व्यवस्थेवरील चर्चेला नवी दिशा देऊ शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Uddhav Thackeray: नीट पेपरफुटी प्रकरण; ठाकरे बंधूंचा 26 जुलैला मुंबईत मोर्चा Read More »

rain

Ahilyanagar Rain Alert: अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा येलो अलर्ट; जाणून घ्या हवामान अंदाज

Ahilyanagar Rain Alert : भारतीय हवामान विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यात आज सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवून जिल्ह्यास ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. तसेच नदीकाठच्या नागरिकांसह धरणक्षेत्रातील पर्यटकांनी विशेष सतर्कता बाळगून जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये आज दुपारी १२.०० वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भीमा नदीत दौंड पुलाजवळ २७ हजार ६५१ क्युसेक, घोड धरणातून घोड नदीत ४ हजार क्युसेक आणि गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ५५ हजार ७७८ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास भीमा, घोड व गोदावरी नद्यांच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे व मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू असून धरणांमध्ये पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे प्रवरा व मुळा नदीकाठच्या नागरिकांसह धरणक्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांनी विशेष खबरदारी घ्यावी. मेघगर्जना व विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली अथवा झाडांजवळ उभे राहू नये. तसेच मोकळी मैदाने, टॉवर, ध्वजांचे खांब, विद्युतवाहिन्या, ट्रान्सफॉर्मर, धातूचे कुंपण आणि रोहित्रांपासून दूर राहावे. वादळी वाऱ्यादरम्यान कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. ट्रॅक्टर, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल आदींपासून सुरक्षित अंतर राखावे. मोकळ्या जागेत अडकल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हातांनी कान व डोके झाकावे आणि जमिनीशी कमीत कमी संपर्क ठेवावा. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जाहिरात फलक कोसळण्याची शक्यता असल्याने त्यांच्या आजूबाजूला थांबणे टाळावे. पर्यटकांनी धरणे, नद्या व ओढ्यांच्या पाण्याच्या प्रवाहात उतरू नये तसेच धोकादायक ठिकाणी छायाचित्रे (सेल्फी) काढणे टाळावे. नदी, ओढे व नाल्यांवरील पूल अथवा बंधारे पाण्याखाली गेले असल्यास ते ओलांडू नयेत. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासून सुरक्षित अंतर राखून तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. अतिवृष्टीमुळे भूस्खलन अथवा दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांनी दक्षता घ्यावी तसेच घाटरस्त्यांवरील प्रवास शक्यतो टाळावा. जुनाट अथवा धोकादायक इमारतींमध्ये आश्रय घेऊ नये. सर्व नागरिकांनी स्वतःचे तसेच जनावरांचे संरक्षण करून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाचे ०२४१-२३२३८४४, ०२४१-२३५६९४० हे दूरध्वनी क्रमांक अथवा ११२ आणि १०७७ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Ahilyanagar Rain Alert: अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा येलो अलर्ट; जाणून घ्या हवामान अंदाज Read More »

kangana ranaut

Kangana Ranaut on Rahul Gandhi: मोदींनी राजीनामा का द्यावा? ते लोकप्रिय नेते; राहुल गांधींवर कंगना राणौत यांची टीका

Kangana Ranaut on Rahul Gandhi: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर केलेल्या आंदोलनावरून भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानासारख्या अतिसंवेदनशील परिसरात आंदोलन करणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी राहुल गांधी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देशभरात विविध विद्यार्थी संघटनांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी NEET पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांशी संबंधित मुद्दे तसेच लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलन छेडले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. या आंदोलनात राहुल गांधी, प्रियांका गांधी व काँग्रेसचे अनेक खासदार सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध करत सरकारवर टीका करण्यात आली आणि पंतप्रधान तसेच शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना कंगना रणौत म्हणाल्या की, देशाच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानाची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील बाब आहे. अशा ठिकाणी आंदोलन करण्याची परवानगी मागणे किंवा तिथे आंदोलन करण्याचा प्रयत्न करणे हे गंभीर स्वरूपाचे आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार असला तरी राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित ठिकाणांचा विचार करूनच निर्णय घेतला पाहिजे, असे त्यांनी म्हटले. कंगना यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत, विरोधासाठी विरोध करण्यापेक्षा जबाबदारीने वागणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी काँग्रेसच्या आंदोलनाच्या पद्धतीवरही प्रश्न उपस्थित करत अशा कृतीमुळे चुकीचा संदेश जात असल्याचे मत व्यक्त केले. दरम्यान, काँग्रेसने आपल्या आंदोलनाचे समर्थन केले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि विविध मुद्द्यांवर सरकारला जाब विचारण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलन करणे हा घटनात्मक अधिकार असल्याचा दावा पक्षाने केला आहे. या प्रकरणामुळे सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस यांच्यात पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, कंगना रणौत यांच्या वक्तव्यामुळे या वादाला आणखी रंग चढला आहे.

Kangana Ranaut on Rahul Gandhi: मोदींनी राजीनामा का द्यावा? ते लोकप्रिय नेते; राहुल गांधींवर कंगना राणौत यांची टीका Read More »

sharad pawar

Sharad Pawar Meet PM Modi : PM मोदींची शरद पवार आणि सुप्रिया सुळेंशी भेट; राजकीय चर्चांना उधाण

Sharad Pawar Meet PM Modi : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. ही भेट नेमक्या कोणत्या कारणासाठी झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, संसदीय कामकाज किंवा इतर महत्त्वाच्या राष्ट्रीय विषयांवर चर्चा झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या पक्षाच्या भविष्यातील राजकीय भूमिकेबाबतही नव्याने तर्कवितर्क सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे, या भेटीपूर्वी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी विविध सार्वजनिक प्रश्नांवर भूमिका घेतली होती. त्यानंतर थेट पंतप्रधानांची भेट झाल्याने विरोधी राजकारण आणि सत्ताधारी पक्षातील संभाव्य संवादाबाबत चर्चा रंगू लागली आहे. मात्र, या भेटीला कोणताही राजकीय अर्थ लावू नये, असे मत काही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केले असून संसदीय कामकाजाच्या निमित्ताने अशा भेटी होत असतात, असेही सांगितले जात आहे. तरीही या बैठकीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

Sharad Pawar Meet PM Modi : PM मोदींची शरद पवार आणि सुप्रिया सुळेंशी भेट; राजकीय चर्चांना उधाण Read More »

raj thackeray

Raj Thackeray: सरकार मानसिक रुग्ण, रुग्णालयात भरती करण्याची गरज; राज ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Raj Thackeray: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामान्याची मागणी करण्यासाठी दिलीतील जंतरमंतर मैदानावर हजारो विद्यार्थी आंदोलन करत असून २० जुलै रोजी या मागणीसाठी त्यांच्याकडे संसदेवर मोर्चा काढण्यात आला होता मात्र या मोर्चात मोठ्या प्रमाणात दिल्ली पोलिसांकडून लाटी चार्ज करण्यात आल्याने विरोधक आता मोदी सरकारवर जोरदार लागून करताना दिसत आहे. राज ठाकरे यांनी देखील केंद्र सरकारवर हल्ला केला आहे. सरकारच मानसिक रुग्ण झालं आहे आणि त्यांनाच रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? केंद्र सरकारने शनिवार १८ जुलै २०२६ ला सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून रुग्णालयात भरती केलं. सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी वाटून त्यांना रुग्णलयात दाखल केलं असं सरकारचं म्हणणं आहे. सरकारने त्यांना ज्या पद्धतीने फरफटत नेलं त्यावरून सरकारला वांगचुक यांची काळजी नव्हती हे नक्की. त्यानंतर काल आंदोलकांवर केलेला बेफाम लाठीचार्ज, हे पाहून हे सरकारच मानसिक रुग्ण झालं आहे आणि त्यांनाच रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे असं दिसतंय. आम्ही रास्त मागण्यांसाठीची आंदोलनं कशी चिरडतो हे जगाला दाखवण्याची आणि ती कशी चिरडली हे आपल्याला स्वतःला आजूबाजूच्या इतर राष्ट्राध्यक्षांच्या कोणत्याच भाषा येत नसताना फक्त कॅमेऱ्यासाठी गडगडाटी हास्य करून जगभरातील राष्ट्राध्यक्षांना ते सांगण्याची हौस सध्या सत्ताधीशांना जडली आहे . मुळात धर्मेंद्र प्रधान कोण लागून गेले की ज्यांचा राजीनामा घेणं हे सरकारला स्वतःच अपयश वाटत आहे ? मणिपूर पेटलेलं असताना त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना बिरेन सिंग यांना पण याच सरकारने असंच अभय दिलं होतं. बरं हे दोघे असतील किंवा यांच्यासारखे इतर असतील त्यांच्याबद्दल वरच्या दोन सत्ताधीशांना शून्य प्रेम आहे. आम्ही काय करायचं हे कोणी सांगायचं नाही, मग ते विरोधी पक्षांनी पण नाही आणि जनतेने तर नाहीच नाही. कारण तुमच्या मतांवर आम्ही थोडी निवडून येतो. आम्ही निवडून येतो ते सगळ्या यंत्रणा, मतदार याद्यातील गोंधळ आणि अर्थात ईव्हीएमच्या जोरावर. मग विद्यार्थ्यांना कोण विचारतं. काल पंतप्रधान हा मुद्दा सोडून सगळं बोलले.इंग्रजीत एक शब्दप्रयोग आहे, ‘लेम डक’ प्रेसिडेंट. म्हणजे ज्या पंतप्रधानांचा किंवा राष्ट्राध्यक्षांचा शेवटचा कार्यकाळ सुरु असतो ते पंतप्रधान हे निवांत असतात, जगभर दौरे करतात, आणि त्यांचा प्रभाव कमी झालेला असतो आणि त्यांचा उत्तराधिकारीच सगळा कारभार हाकत असतो. सध्या मोदींची अवस्था अशी झाली आहे असं दिसतंय. मोदींच्या मनात या सगळ्याबद्दल समजा कृती करण्याची इच्छा जरी असली तरी उत्तराधिकारी होण्याच्या स्पर्धेत असलेली शक्ती त्यांना दुर्लक्ष करायला भाग पाडत असावी. अर्थात मोदी पंतप्रधान असताना विद्यार्थ्यांचं आंदोलन निर्दयीपणे चिरडलं गेलं हे इतिहास लक्षात ठेवेलच ! तशीच प्रतिमा व्हावी अशी कोणाची इच्छा असेल आणि मोदी त्याला बळी पडणार असतील तर मग प्रश्नच संपला ! माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे. ती ‘परीक्षा पे चर्चा’ इत्यादी करता ना मग आता विद्यार्थ्यांशी चर्चा करा. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. धर्मेंद्र प्रधान आणि सरकारचा इगो यापेक्षा या देशातील विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्वाचा आहे. आणि सरकारने हे देखील समजून घ्यावं की हे आंदोलन फक्त विद्यार्थ्यांचं, एका परीक्षेपुरतं नाही आहे. लोकांच्या मनात सरकारच्या कारभाराबद्दल राग आहे, ज्या पद्धतीने एकाच उद्योगपतीला मोठं केलं जात आहे, त्याच्या घशात संपूर्ण देश घातला जात आहे, ज्या पद्धतीने महागाईने कळस गाठला आहे, जंगल तोडून कंत्राटदारांच भलं केलं जात आहे , शहरच्या शहर विकासाच्या नावाखाली गुदमरली आहेत, रुग्णालय खच्चून भरली आहेत , अशा अनेक गोष्टींच्या विरोधातील हा आक्रोश आहे. गृहखात्याच्या आदेशावरून आंदोलकांना जसं निर्दयीपणे मारलं जात आहे आणि तरीही आंदोलक मुलं-मुली इंचभर हलत नाही आहेत यावरून एक नक्की की हे धैर्य एका मुद्द्यावरच्या रागातून नाही तर देशातील एकूणच परिस्थितीतून आलेल्या नैराश्यातून आहे. त्यामुळे सरकारने निर्दयीपणा सोडून समजूतदारपणा दाखवावा. लोकपाल विधेयकाच्या आंदोलनातून मिळवलेली सत्ता विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून जायला लागणार हे निश्चित ! २०१८/१९ पासून मी जनतेला सांगत होतो की मी काय या सरकार बद्दल बोलतोय हे तुम्हाला आज नाही कळणार पण ज्या दिवशी तुमच्या दरवाजावर अन्यायाची टकटक होईल तेव्हा मी काय सांगत होतो हे समजेल ! आज सर्वांच्याच दरवाजावर टकटक सुरू झाली आहे ! या सगळ्यात विद्यार्थ्यांनी जो संघर्ष उभा केला आहे त्याचं मनापासून कौतुक. शेजारच्या श्रीलंकेत २०२२ ला विद्यार्थ्यांनी असंच आंदोलन उभं केलं होतं. २०११ चं अरब स्प्रिंग, नेपाळ मध्ये देखील तेच. ही सगळी अगदी ताजी उदाहरण आहेत. जय प्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचं आंदोलन उभं केलं त्याचा पाया हा पण विद्यार्थ्यांच्या असंतोष होता. आज आपल्या देशातील विद्यार्थ्यांच्या या धैर्याला पण सलाम ! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या आंदोलनाला, या मागण्यांना पाठींबा आधीपासून होता आणि यापुढे राहील. खरतर निट सारख्या परिक्षांनाच आम्ही पहिल्यांदा विरोध केला होता, विनाकारण केंद्राने या इतकी वर्षे चालू असलेल्या पद्धतीत ढवळाढवळ करू नये पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हेच खरे !

Raj Thackeray: सरकार मानसिक रुग्ण, रुग्णालयात भरती करण्याची गरज; राज ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल Read More »

maharashtra government

Maharashtra Cabinet Decision : मंत्रिमंडळाचे पाच महत्त्वाचे निर्णय; आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवणार

Maharashtra Cabinet Decision: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या विकासाशी संबंधित पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये प्रशासन अधिक प्रभावी करणे, ग्रामीण भागाचा विकास आणि विविध योजनांना गती देण्यावर भर देण्यात आला. बैठकीतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्यातील १७७ आकांक्षित तालुक्यांमध्ये सन २०२६-२७ या वर्षासाठी प्रायोगिक तत्त्वावर ‘आकांक्षित तालुका कार्यक्रम’ राबविण्याचा. या कार्यक्रमासाठी प्रत्येक तालुक्याला पाच कोटी रुपयांपर्यंत निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, शेती, रोजगार आणि मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. याशिवाय विविध विभागांशी संबंधित विकासकामांना मंजुरी देण्यात आली असून प्रशासनातील कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवश्यक निर्णयही घेण्यात आले. राज्यातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याबरोबरच नागरिकांना अधिक चांगल्या सेवा उपलब्ध करून देण्यावर सरकारने भर दिला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत विकासकामांचा वेग वाढविणे, निधीचा प्रभावी वापर करणे आणि मागास भागांतील विकासाला प्राधान्य देण्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याचेही बैठकीत नमूद करण्यात आले. या निर्णयांमुळे राज्यातील विकास प्रक्रियेला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, विशेषतः आकांक्षित तालुका कार्यक्रमामुळे मागास तालुक्यांमध्ये मूलभूत सुविधा आणि सार्वजनिक सेवांचा दर्जा सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे.

Maharashtra Cabinet Decision : मंत्रिमंडळाचे पाच महत्त्वाचे निर्णय; आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवणार Read More »

rahul gandhi

Rahul Gandhi: जंतरमंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन; राहुल गांधी, शरद पवारांचा पाठिंबा

Rahul Gandhi: दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे. या आंदोलनाला अनेक राजकीय नेत्यांनी पाठिंबा दर्शविला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंदोलनस्थळी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी परीक्षेतील गैरव्यवहार हा लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित गंभीर विषय असल्याचे सांगितले. शरद पवार म्हणाले की, देशातील स्पर्धा परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि विश्वासार्ह असणे आवश्यक आहे. पेपरफुटी किंवा गैरप्रकारांमुळे मेहनती विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी केंद्र सरकारने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी त्यांनी मागणी केली. आंदोलनादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. त्यांनी सरकारवर टीका करत परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याची गरज व्यक्त केली. विद्यार्थ्यांनीही वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे त्यांच्या करिअरवर परिणाम होत असल्याची भावना व्यक्त केली आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली. जंतरमंतरवरील आंदोलनात विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई आणि भविष्यात अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कडक कायदे करण्याची मागणी केली. या आंदोलनामुळे देशभरातील स्पर्धा परीक्षांच्या विश्वासार्हतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, विद्यार्थ्यांच्या न्याय्य अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Rahul Gandhi: जंतरमंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन; राहुल गांधी, शरद पवारांचा पाठिंबा Read More »

ahilyanagar district bank election

Ahilyanagar District Bank Election : जिल्हा बँकेची निवडणूक : सहकारापेक्षा ‘घोडेबाजार’च चर्चेत?

Ahilyanagar District Bank Election : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक अजून जाहीर व्हायची आहे. मात्र, जिल्ह्यातील राजकीय वातावरणाने आधीच निवडणुकीचा रंग धारण केला आहे. सहकार क्षेत्राच्या निवडणुका पूर्वी विकास, आर्थिक शिस्त आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या मुद्द्यांवर लढल्या जात असत. आता मात्र त्यांचे स्वरूप सत्तेच्या अंकगणितात अडकत चालल्याची भावना निर्माण होत आहे. जिल्ह्यात सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती “घोडेबाजार” आणि अंतर्गत राजकीय हालचालींची. पारनेर, पाथर्डी, शेवगाव, कोपरगाव, राहुरी या तालुक्यांत विविध सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींशी संपर्क, गाठीभेटी आणि मोर्चेबांधणी सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या चर्चांची सत्यता संबंधितांनाच माहीत; मात्र अशा चर्चांनाही वाव मिळणे, हेच सहकार चळवळीसाठी चिंतेचे लक्षण आहे. भाजपचे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या निवडणुकीत सक्रिय भूमिका घेतल्याने समीकरणे बदलत आहेत. कर्जत-जामखेडच्या राजकारणापुरती मर्यादित असलेली त्यांची ताकद आता संपूर्ण जिल्ह्यातील सहकाराच्या राजकारणात कसोटीला लागणार आहे. दुसरीकडे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सहकार क्षेत्रातील प्रभाव कायम आहे. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि खासदार निलेश लंके हेही आपापल्या पातळीवर राजकीय मोर्चेबांधणी करत असल्याचे चित्र दिसते. या सर्व घडामोडींमध्ये सर्वाधिक उत्सुकता आहे ती भाजपमधील अंतर्गत राजकीय हालचालींविषयी. एकाच पक्षातील वेगवेगळे प्रभावकेंद्रे आपापले संख्याबळ मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. ही स्पर्धा जर उघड संघर्षात बदलली, तर त्याचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालावर होऊ शकतो. विरोधकांपेक्षा पक्षांतर्गत मतभेदच अनेकदा निर्णायक ठरतात, हा सहकार क्षेत्राचा इतिहास आहे. सहकार संस्था या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जातात. त्या शेतकरी, सभासद आणि ग्रामीण उद्योगांच्या विश्वासावर उभ्या आहेत. अशा संस्थांच्या निवडणुकांमध्ये जर विचारांपेक्षा व्यवहार, तत्त्वांपेक्षा तडजोडी आणि सेवाभावापेक्षा घोडेबाजार चर्चेचा विषय ठरू लागला, तर सहकाराच्या मूलभूत मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे. जिल्हा बँकेची निवडणूक कोण जिंकणार, यापेक्षा ती कशा पद्धतीने लढवली जाते, हे अधिक महत्त्वाचे आहे. पारदर्शकता, लोकशाही आणि सभासदांचा विश्वास या तीन मूल्यांवरच सहकाराचे भविष्य टिकून राहणार आहे. अन्यथा प्रत्येक निवडणुकीनंतर सत्ता बदलेल पण सहकार मात्र हरत जाईल.

Ahilyanagar District Bank Election : जिल्हा बँकेची निवडणूक : सहकारापेक्षा ‘घोडेबाजार’च चर्चेत? Read More »

fifa world cup

FIFA World Cup 2026 : स्पेनचा विश्वविजेतेपदावर कब्जा; मेस्सीचे स्वप्न भंग, अर्जेंटिनाचा अंतिम फेरीत पराभव

FIFA World Cup 2026 : फिफा विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात स्पेनने गतविजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 असा अतिरिक्त वेळेत पराभव करत दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. न्यू जर्सीतील अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. निर्धारित 90 मिनिटांत दोन्ही संघांना गोल करता आला नाही. मात्र अतिरिक्त वेळेच्या 106व्या मिनिटाला फेरान टोरेसने निर्णायक गोल झळकावत स्पेनला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. संपूर्ण सामन्यात स्पेनने चेंडूवरील नियंत्रण राखत अर्जेंटिनाच्या बचावफळीवर सतत दबाव ठेवला. अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझने अनेक अप्रतिम बचाव करत संघाला सामन्यात टिकवून ठेवले. मात्र अतिरिक्त वेळेत स्पेनच्या वेगवान हल्ल्यापुढे अर्जेंटिनाची बचावफळी अखेर ढासळली. सामन्याच्या उत्तरार्धात एन्झो फर्नांडेझला रेड कार्ड मिळाल्याने अर्जेंटिनाला 10 खेळाडूंसह खेळावे लागले, ज्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर झाला. या पराभवासह लिओनेल मेस्सीचे पुन्हा एकदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. अनुभवी मेस्सीला स्पेनच्या शिस्तबद्ध बचावापुढे प्रभावी खेळ करता आला नाही. अंतिम शिट्टीनंतर स्पेनच्या खेळाडूंनी जल्लोष केला, तर अर्जेंटिनाच्या खेळाडूंमध्ये आणि चाहत्यांमध्ये निराशेचे वातावरण होते. स्पेनने तब्बल 16 वर्षांनंतर विश्वचषक जिंकत जागतिक फुटबॉलमध्ये पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले.

FIFA World Cup 2026 : स्पेनचा विश्वविजेतेपदावर कब्जा; मेस्सीचे स्वप्न भंग, अर्जेंटिनाचा अंतिम फेरीत पराभव Read More »

sanjay raut

Sanjay Raut on BJP : मोदी सरकारवर संजय राऊतांचा घणाघात; भाजपला थेट इशारा

Sanjay Raut on BJP : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शिवसेना (Shivsena UBT) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पाठिंबा दर्शवला. कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होत राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. राऊत म्हणाले की, नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार, बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींमुळे देशातील तरुणांमध्ये मोठा असंतोष आहे. लोकशाहीत नागरिकांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार असून, आंदोलकांवर कारवाई करणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी अभिजीत दिपके यांनीही आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका पुन्हा स्पष्ट केली. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासह विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. जंतर-मंतर परिसरात मोठ्या संख्येने विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका करत लोकशाहीत विरोधी मतांचा सन्मान होणे आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर राजकारण न करता ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. आंदोलनामुळे शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा मुद्दा पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला आहे.

Sanjay Raut on BJP : मोदी सरकारवर संजय राऊतांचा घणाघात; भाजपला थेट इशारा Read More »