DNA मराठी

Maharashtra Politics

atul save osd

Atul Save OSD : पत्नीच्या खुनाचा प्रयत्न अन्मा मुलाला मारहाण, भाजप मंत्र्यांच्या OSD वर गुन्हा दाखल…

Atul Save OSD : पुण्यातील क्वीन्स गार्डन परिसरात कौटुंबिक वादातून गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीचा जीव घेण्याचा प्रयत्न आणि मुलावर हल्ला केल्याच्या आरोपावरून एका शासकीय अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे. विजय धुलचंद कारंडे असे आरोपीचे नाव आहे. त्यांच्या पत्नीने (वय ३०) रविवारी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. कारंडे हे मूळ नांदेड येथील समाजकल्याण विभागात कार्यरत असून सध्या मुंबईतील मंत्रालयात मंत्री अतुल सावे यांचे विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) म्हणून प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. तक्रारीनुसार, ३० एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या क्वीन्स गार्डन येथील घरात हा प्रकार घडला. पत्नीने कारंडे यांच्या मोबाईलमधील काही चॅट्सबाबत विचारणा करत पासवर्ड मागितल्याने वाद झाला. त्यातून संतापलेल्या कारंडे यांनी पत्नीला बॅटने मारहाण केली आणि तिचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या वेळी आईला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या मुलावरही त्यांनी बॅटने हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र प्रसंगावधान राखत संबंधित महिलेनं कारंडे यांना दूर ढकलले आणि मुलासह घराबाहेर पडत स्वतःचा जीव वाचवला. यानंतर महिलेने तात्काळ पोलिसांत धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून कोरेगाव पार्क पोलिसांनी विजय कारंडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम १०९(१) (खून करण्याचा प्रयत्न), ११८(१) (जाणीवपूर्वक दुखापत) आणि ३५१(२) (गुन्हेगारी धमकी) यांनुसार गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Atul Save OSD : पत्नीच्या खुनाचा प्रयत्न अन्मा मुलाला मारहाण, भाजप मंत्र्यांच्या OSD वर गुन्हा दाखल… Read More »

missing link

Missing Link : ‘सेल्फी’ साठी कनेक्टिंग लिंकवर थांबू नका; सीसीटीव्हीची 24 × 7 नजर राहणार

Missing Link : यशवंतराव चव्हाण मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक ( मिसिंग लिंक ) लोकार्पणानंतर वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र प्रवासादरम्यान सेल्फी, फोटो, घेण्यासाठी वाहन चालक केबल स्टेड ब्रिज व बोगद्याजवळ वाहने थांबवत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. द्रुतगती मार्गावर वाहने थांबवण्यास परवानगी नसून वाहनधारकांसाठी अपघाताचा धोका असल्याने ते टाळावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने करण्यात येत आहे. महाराष्ट्र दिनी रोजी यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे मार्गावरील कनेक्टिंग लिंक अर्थात मिसिंग लिंकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण झाले. महामार्ग पोलिसांनी अधिसूचनेद्वारे मुंबई–पुणे कनेक्टिंग लिंक प्रकल्पासाठी वेग मर्यादा जाहीर केली आहे.तसेच बोगद्यात हलक्या मोटार वाहनांसाठी ताशी १०० किमी वेग मर्यादा आणि बस व प्रवासी वाहनांसाठी ताशी ८० किमी वेग निश्चित केला आहे. कनेक्टिंग लिंक प्रकल्पातील दोन बोगदे व दोन पुलावर पूर्णपणे २४x७ सीसीटीव्ही यंत्रणेचे लक्ष आहे. यावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष असून द्रुतगती मार्गावर थांबणाऱ्या गाड्यांची माहिती महामार्ग पोलिसांना दिली जाणार आहे. सेल्फी, फोटो आणि रिल काढण्यासाठी थांबू नका नाहीतर मोठ्या दंडाची आकारणी होऊ शकते. तसेच तुमच्यासह इतरांच्याही वाहनांना धोका होऊ शकतो. या कारणास्तव, नियमांचे पालन करा आणि सुरक्षित, सुखकर प्रवास करा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

Missing Link : ‘सेल्फी’ साठी कनेक्टिंग लिंकवर थांबू नका; सीसीटीव्हीची 24 × 7 नजर राहणार Read More »

solapur triple murder

Solapur Crime: सोलापूरमध्ये तिहेरी हत्याकांड; जमीन वादातून आई, मुलगी आणि 17 वर्षीय मुलाचा तलवारीने खून

Solapur Crime: सोलापूर जिल्ह्यातील बोरामणीजवळील मस्के वस्तीत जमीन वादातून एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत आई, मुलगी आणि १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण असून आरोपी फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायत्री मस्के (३६), त्यांची मुलगी प्रियंका मस्के (२०) आणि मुलगा शिवराज मस्के (१७) हे उन्हाळ्यामुळे घराच्या गच्चीवर झोपले होते. याचाच फायदा घेत मध्यरात्री अज्ञात हल्लेखोर गच्चीवर चढले आणि तिघांवर तलवारीने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गायत्री आणि प्रियंका यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, शिवराजने आई आणि बहिणीला वाचवण्यासाठी धाडसी प्रयत्न करत हल्लेखोरांना प्रतिकार केला. मात्र हल्लेखोरांनी त्याच्या हातावर वार करत त्याचा पाठलाग केला. जीव वाचवण्यासाठी तो खाली पळाला, पण आरोपींनी त्याला घरात गाठून त्याच्यावर पुन्हा वार करत त्याचा खून केला. नेमकं कारण काय? प्राथमिक माहितीनुसार, मस्के कुटुंबाची सुमारे दीड एकर जमीन असून तिची किंमत अंदाजे ७५ लाख रुपये आहे. याच जमिनीच्या वादातून हे हत्याकांड घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात गायत्री मस्के यांचा दीर पप्पू मस्के हा संशयित असून तो सध्या फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी सोलापूर तालुका पोलिसांनी सहा पथके तयार केली असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Solapur Crime: सोलापूरमध्ये तिहेरी हत्याकांड; जमीन वादातून आई, मुलगी आणि 17 वर्षीय मुलाचा तलवारीने खून Read More »

child marriages

Ahilyanagar News: एकाच दिवसात 9 बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश

Ahilyanagar News : महिला व बालविकास विभागाच्या सतर्कतेमुळे जिल्ह्यात एका दिवसात एकूण ९ बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. या कारवाईमुळे बालविवाह प्रतिबंधाबाबत प्रशासनाची सजगता अधोरेखित झाली आहे. ३ मे २०२६ रोजी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई प्रभावीपणे राबविण्यात आली. या कारवाईत नगर शहरात ३, अकोल्यात १, राहुरीत १, श्रीगोंद्यात १, पाथर्डीत १, नेवाशात १ आणि नगर तालुक्यात १ असे एकूण ९ बालविवाह थांबविण्यात आले.या मोहिमेत पोलीस यंत्रणा, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, अंगणवाडी सेविका, मुख्यसेविका, जिल्हा बालसंरक्षण कक्ष तसेच चाइल्ड हेल्पलाइन कक्ष यांचा सक्रिय सहभाग राहिला. सर्व यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय साधून ही कारवाई करण्यात आली. नागरिकांनीही अशा घटनांची माहिती तत्काळ प्रशासनाला द्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Ahilyanagar News: एकाच दिवसात 9 बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश Read More »

harshwardhan sapkal

Harshwardhan Sapkal on Pune Case : पुणे जिल्ह्यात चिमुरडीवरील अत्याचार हत्या कायदा सुव्यवस्थेचे मोठे अपयश

Harshwardhan Sapkal on Pune Case : राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही सुरक्षित नाहीत हे सातत्याने उघड होत आहे. पुणे जिल्ह्यातील एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्याचा प्रकार महाराष्ट्राच्या नावाला काळीमा फासणारा आहे, हे गृहविभागाचे अपयश असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने गुन्हेगार मोकाट आहेत, त्याचाच हा प्रकार असून आतातरी देवेंद्र फडणवीस यांनी जनाची नाही तर मनाची बाळगून प्रायश्चित म्हणून तरी गृह मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा व पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री राज्याला द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर तोफ डागली, ते पुढे म्हणाले की, गृहविभागात भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे, खालपासून वरपर्यंत भ्रष्टाचार बोकाळला आहे. बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख प्रकरणातील निघृणता, स्वारगेट एसटी स्टँडवरील बलात्कार, केंद्रीय मत्र्यांच्या घरातील मुलींना छेडछाड, बदलापूरातील शाळकरी मुलींवरील लैंगिक अत्याचार, अशोक खरात प्रकरण, महिला व मुलींचे बेपत्ता होणारे प्रकार…ड्रग्जच्या खुलेआम काळ्याधंद्याने उडता महाराष्ट्र झाला आहे, तरुण पिढीला व्यसनाच्या खाईत ढकलले जात असताना गृहमंत्री म्हणून काहीतरी ठोस कारवाई करणे अपेक्षित आहे पण फक्त घोषणा होतात कारवाई मात्र काहीच होत नाही. राज्यातील महिला सुरक्षा, कायदा व सुव्यवस्थेचा वाजलेला बोजवारा याला थेट गृहमंत्रीच जबाबदार आहेत, असा हल्लाबोल करत भाजपा महायुती सरकारचा भ्रष्टाचार सुस्साट असून जनता व प्रशासन यांच्यात मिसिंगलिंक आहे, कायदा व सुव्यवस्थेमध्ये मिसिंग लिंक आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला आहे. देशभर जनगणना सुरु झाली असली तरी जातनिहाय जनगणना मात्र होत नाही. जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा पंतप्रधांनी केली होती पण ती आता करत नाहीत कारण हा व्यक्ती फक्त फेकूच नाही तर अत्यंत खोटारडा आहे. मुंह में राम और बगल में नथुराम, असे त्यांचे काम आहे. मोदी यांचा आचार, विचार व व्यवहार हे अगदी उलटे आहे. नथुराम गोडसे महात्मा गांधींच्या पाया पडला व नंतर त्यांचा खून केला, मोदी संसदेच्या पाया पडले व त्यांनी संविधान व लोकशाहीचा गळा घोटला. 100 स्मार्ट सिटी, दरवर्षी दोन कोटीरोजगार, शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पन्न, रुपयाची घसरण थोपवणे यातील काहीच त्यांनी केलेले नाही. आता जनगणनेसाठी आधार कार्ड मागत आहेत, ते लिंक करणार आहेत, आधारशी सर्व लिंक केलेले आहे, पण मतदार यादीशी ते लिंक करत नाहीत, असेही सपकाळ म्हणाले. या पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे ही उपस्थित होते.

Harshwardhan Sapkal on Pune Case : पुणे जिल्ह्यात चिमुरडीवरील अत्याचार हत्या कायदा सुव्यवस्थेचे मोठे अपयश Read More »

water issue

Ahilyanagar News: नगर जिल्ह्यातील एवढ्या गावांमध्ये पाणी टंचाई…टँकरद्वारे पाणीपुरवठा

Ahilyanagar News: जिल्ह्यात वाढते तापमान व संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन करत पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन शाखेमार्फत टंचाईग्रस्त भागांचे सूक्ष्म देखरेख करण्यात येत असून, कोणत्याही नागरिकाला पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी यंत्रणा दक्षतेने कार्यरत आहे. दि. २९ एप्रिल २०२६ रोजीच्या अहवालानुसार जिल्ह्यातील एकूण ३४ गावे व १६२ वाड्या-वस्त्यांमध्ये पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली असून सुमारे ६४ हजार ५८६ नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या भागांसाठी एकूण ३० टँकर (४ शासकीय व २६ खासगी) कार्यरत असून संगमनेर, पारनेर व नगर या तालुक्यांमध्ये टंचाईचे प्रमाण अधिक असल्याने तेथे अनुक्रमे १०, १३ व ६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. टँकरच्या खेपांबाबतही समाधानकारक प्रगती नोंदविण्यात आली आहे. मंजूर ९०.९२ खेपांपैकी ८८ खेपा पूर्ण करण्यात आल्या असून हे प्रमाण सुमारे ९६.७९ टक्के आहे. यामुळे टंचाईग्रस्त भागांमध्ये पाणी वेळेत पोहोचत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पाणीटंचाईवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यातील १२ विहिरी व बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले असून त्यापैकी ३ जलस्त्रोत थेट गावांसाठी तर ९ टँकर भरण्यासाठी वापरण्यात येत आहेत. आवश्यकतेनुसार अतिरिक्त खाजगी जलस्त्रोत अधिग्रहित करण्याचे अधिकार संबंधित तहसीलदारांना देण्यात आले आहेत. संभाव्य टंचाईग्रस्त गावांसाठी आगाऊ कृती आराखडा तयार करण्यात आला असून टँकर प्रस्तावांना तात्काळ मंजुरी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ओआरएस व आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना गळती किंवा पाण्याची चोरी होऊ नये यासाठी विशेष भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने व जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले असून, पाणीपुरवठा व्यवस्थापनासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे स्पष्ट केले आहे.

Ahilyanagar News: नगर जिल्ह्यातील एवढ्या गावांमध्ये पाणी टंचाई…टँकरद्वारे पाणीपुरवठा Read More »

ashok kharat

Ashok Kharat Case: भोंदू खरात प्रकरणाचा इम्पॅक्ट ; एका महिन्यात 15 भोंदू बाबांवर गुन्हे दाखल

Ashok Kharat : भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर एकच महिन्यात पोलिसांनी राज्यातील विविध ठिकाणी 15 भोंदू बाबांवर गुन्हे दाखल केले आहे. यात बहुतेक प्रकरणात महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रामध्ये 2013 मध्ये ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा व त्याचे समूळ उच्चाटन अधिनियम 2013’ हा कायदा अस्तित्वात आला. असा कायदा बनविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले होते. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात सरकार अयशस्वी ठरले असले तरी अंनिस आपल्या पातळीवर त्याचे प्रबोधन, प्रचार, प्रसार करत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होत आहे. नाशिक येथे घडलेल्या भोंदू अशोक खरातच्या प्रकरणानंतर एक महिन्यात राज्यात एकून 15 गुन्हे दाखल झाले आहेत. पुरोगामी महाराष्ट्राला चिंतेत टाकणारी व विचार करायला लावणारी ही घटना आहे. भोंदू बाबांनी ग्रामीण भागासह शहरी भागातील महिला व पुरुषांची फसवणूक केल्याचे या घटनांवरून उघड झाले आहे. विशेषता यात महिलांचे शारीरिक शोषण, आर्थिक लुटीचे प्रमाण अधिक आहे. भितीपोटी व सामाजिक प्रतिष्टेपोटी अनेक पीडित समोर येण्यास घाबरत आहे, त्यांनी न घाबरता पुढे यावे, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाह ॲड रंजना गवांदे , सहकार्यवाह विष्णू लोणारे यांनी प्रसिद्धी पत्रक काढून केले आहे. “खरात प्रकरणानंतर पीडित महिलांना लढण्याची हिंमत निर्माण झाली आहे. त्यांना न्यायाची अपेक्षा पण निर्माण झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी उत्स्फूर्त तर काही ठिकाणी अंनिसच्या प्रयत्नाने गुन्हे दाखल झाले आहे. इतरही आणखी पीडितांनी पुढे यावे, असे आवाहन अंनिस करत आहे “ -संजय बनसोडे, राज्य कार्याध्यक्ष, अंनिस गेल्या एक महिन्यातील दाखल गुन्हे: 1) अशोक कुमार खरात , नाशिक 2) गडगेबाबा ( राजेंद्र गडगे) , संगमनेर , अहिल्यानगर 3) चेतन सुनील माळी ( मूर्तिजापूर, अकोला ) 4) पंकज देवराम घोलप, (येडगांव, पुणे ) 5) मनोहर मामा भोसले, (कुरुडवाडी , सोलापूर ) 6)नाना बर्डे , (आळे फाटा , पुणे ) 7) ऋषिकेश वैद्य ( वसई .मुंबई ) 8) अल्ताफ रईस खान ( मालाड, मुंबई) 9) रिधम पांचाळ ( मालाड, मुंबई ) 10) गणेश शिंदे ( श्रीरामपुर, अहिल्यानगर ) 11) अर्जुन चव्हाण उर्फ टनटन बाबा , नवी मुंबई 12)विठोबा वाल्मीक जाट, सातपूर, नाशिक 13)किसन तळपे मंदोशी, खेड 14 ) महेशगिरी ( महेश काकडे) निफाड,नाशिक 15) अब्दुल रशीद शेख, खालापूर, रायगड

Ashok Kharat Case: भोंदू खरात प्रकरणाचा इम्पॅक्ट ; एका महिन्यात 15 भोंदू बाबांवर गुन्हे दाखल Read More »

mummaka sudarshan

Mummaka Sudarshan : मुम्मका सुदर्शन अहिल्यानगरचे नवे पोलीस अधीक्षक; सोमनाथ घार्गे यांची बदली

Mummaka Sudarshan :  जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी मुम्मका सुदर्शन यांची अहिल्यानगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. घार्गे यांच्या बदलीची चर्चा मागील एका महिन्यापासून सुरू होती. अवघ्या एका वर्षात घार्गे यांनी बदली झाल्याने जिल्ह्यात उलट-सुलट चर्चा रंगू लागली आहे. सोमनाथ घार्गे यांनी वर्षभरापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदभार स्वीकारल्यावर मोठे बदल करण्यास सुरूवात केली होती. त्यांच्या कारकिर्दीत गोवंशीय जनावरांच्या हत्येविरोधात कारवाई मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे समाजात त्यांच्या विषयी चांगली भावना झाली होती. मात्र, पुणे जिल्ह्यातील शिरुर येथील आमली पदार्थ तस्करी प्रकरणात थेट जिल्हा पोलीस मुख्यालयातील कर्मचारीच दोषी आढळल्याने पोलीस प्रशासनात घार्गे यांच्याबाबत नाराजी निर्माण झाल्याची चर्चा होती. या शिवाय कर्मचाऱ्यांच्या बदल्या, बडतर्फी आदी प्रकरणेही यामागे असल्याची चर्चा आहे. अशातच घार्गे यांची मुंबई येथील पोलीस मुख्यालयात बदलीचे आदेश निघाले. तर चंद्रपूर येथील पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची अहिल्यानगरमध्ये बदलीचे आदेशही निघाले. या बदलीमुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात मोठे बदल होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

Mummaka Sudarshan : मुम्मका सुदर्शन अहिल्यानगरचे नवे पोलीस अधीक्षक; सोमनाथ घार्गे यांची बदली Read More »

vaibhav naik

Vaibhav Naik on Nitesh Rane: नितेश राणे आपण कोणाची लाचारी करून पद घेतलेलं आहे? वैभव नाईक भडकले

Vaibhav Naik on Nitesh Rane: मुख्यमंत्री पदावरुन राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी नितेश राणे यांना प्रत्युत्तर देत टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री हे स्वतःहून झाले नाहीत, तर त्यांना त्यावेळी ‘महाविकास आघाडी’च्या लोकांनी आग्रह केला होता आणि भारतीय जनता पार्टीने जो ‘मातोश्री’मध्ये शब्द दिला होता तो शब्द फिरवला म्हणून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हावे लागले. शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा अशी उद्धवजींची तेव्हा पण इच्छा होती. ​आज आपण बघितलं असेल की, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धवजींनी स्वतःहून विधान परिषद सदस्य म्हणून शपथ घेतली असती, त्याला सगळ्यांचा पाठिंबा होता. परंतु, उद्धवजींनी नेहमीच पक्षातल्या सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याचं ठरवलं होतं आणि म्हणूनच आज अनेक लोक मोठ्या-मोठ्या पदांपर्यंत पोहोचले आहेत. ​ नितेश राणेंनी हे लक्षात घेतलं पाहिजे की, आपण कोणाची लाचारी करून पद घेतलेलं आहे? आपण काँग्रेसमधून जेव्हा तुम्हाला तिकीट मिळालं, तेव्हा काँग्रेसने तुम्हाला तिकीट दिलं, पहिल्यांदा आमदार केलं आणि त्यानंतर त्या काँग्रेसला सोडून तुम्ही स्वतःचा पक्ष विसर्जित करून भाजपच्या पदराखाली गेलात आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये भाजप ज्या पद्धतीने निवडणुका जिंकतोय, त्यामुळे तुम्ही भाजपच्या नावावर निवडणूक जिंकलात तर ते काही मोठं नाहीये. ​पण उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे असणारे कार्यकर्ते आजही एका शक्तीविरुद्ध लढत आहेत आणि ते कुठेही लाचारी करत नाहीत. जर लाचारी करायची असती तर उद्धवजींना अनेक पदं मिळाली असती आणि आज पण आपण बघितलं असेल की जो तुम्ही मोर्चा काढताय, जे काही सरकारच्या विरोधात, आपल्याच सरकारच्या विरोधात आहे. कारण तुम्ही कुठेतरी कमी पडला आहात आणि त्यामुळे लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी तुम्ही हे करताय. ​परंतु आता मात्र तुमच्या राजकारणामध्ये, पुढच्या काळामध्ये तुमच्या राजकारणात ट्विस्ट येईल आणि उद्धव ठाकरेंवर तुम्ही बोलल्याशिवाय तुम्हाला किंमत नाहीये हे तुम्हाला माहिती आहे, म्हणून वारंवार तुम्ही त्यांच्याविरुद्ध बोलताय. ​नारायण राणेंना मुख्यमंत्री बाळासाहेबांनी केल्यानंतर, पुढच्या वर्षीच्या निवडणुकीमध्ये सत्ता गेली आणि त्यामुळे ते मुख्यमंत्रीपदावर बसले नाहीत. त्याच्या पुढच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी प्रयत्न केले होते. पण तरीपण सत्ता आली नाही, त्यामुळे नारायण राणे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. उद्धव ठाकरेंनी स्वतः आपण बघितलं असेल की, त्यानंतर सुद्धा आमची सत्ता आली आणि त्या सत्तेमध्ये स्वतः कुठलं पद घेतलं नव्हतं. दुसऱ्या वेळी सत्ता आली तेव्हा सुद्धा ते कुठले सदस्य नव्हते, परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांचं नाव सगळ्यांनी सुचवलं म्हणून त्यांना मुख्यमंत्री व्हावं लागलं. आणि त्याच वेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, त्याचबरोबर सदस्यत्वाचा पण राजीनामा ते त्यावेळी देणार होते. परंतु वरिष्ठांनी त्यांना थांबवलं आणि त्यांच्या शब्दाला मान म्हणून तो दिला नव्हता. ​आज पण उद्धवजींनी स्वतः म्हटलं असतं तर स्वतः पण सदस्य झाले असते. काही लोक आपण बघितलं असेल की ५०-५० वर्ष सदस्य म्हणून काम करतायत, परंतु उद्धवजींनी तसं केलं नाही, सामान्य कार्यकर्त्याला पुन्हा एकदा संधी दिली असं वैभव नाईक म्हणाले. नेमकं काय म्हणाले होते नितेश राणे? सिंधुदुर्गात मंत्री नितेश राणे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री बनण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी 1995 पासूनच षडयंत्र रचल्याचा आरोप राणे यांनी केला. राणेसाहेब आणि राज ठाकरे यांच्या विरोधातही घाणेरड्या पद्धतीने राजकारण केल्याचा दावा त्यांनी केला. तसेच एकनाथ शिंदेंना दिलेला शब्द फिरवून स्वतः मुख्यमंत्री झाल्याचाही आरोप त्यांनी केला. सध्याच्या राजकीय परिस्थितीत सत्ता हातातून निसटत असल्यामुळे अंबादास दानवेंना पुढे केल्याची टीकाही राणे यांनी केली.

Vaibhav Naik on Nitesh Rane: नितेश राणे आपण कोणाची लाचारी करून पद घेतलेलं आहे? वैभव नाईक भडकले Read More »

exit polls

Rahuri and Baramati Exit Polls : राहुरीमध्ये अक्षय कर्डिले तर बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या एकतर्फी विजयाची शक्यता

Rahuri and Baramati Exit Polls : राज्यातील राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघात 23 एप्रिल 2026 रोजी पोटनिवडणूक झाली. राहुरीमध्ये एकूण 56.20% तर बारामतीमध्ये 58.17% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राहुरी मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन झाले. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री व बारामती मतदारसंघाचे आमदार अजित पवार यांच्या निधनानंतर या दोन्ही मतदारसंघातील जागा रिक्त होती. भाजपकडून राहुरी मतदारसंघासाठी दिवंगत शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले तर बारामती मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उमेदवार होत्या. राहुरीमध्ये भाजपविरोधात विरोधी पक्षाकडून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली होती. बारामतीमध्ये कुठल्याच मोठ्या पक्षाने उमेदवार दिला नव्हता. ‘रुद्र रिसर्च अँड एनालिटिक्स’ या आमच्या संस्थेने राहुरी आणि बारामती मतदारसंघात थेट ग्राउंडवर जाऊन मतदारांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. संस्थेच्या सर्वेक्षणानुसार राहुरीमध्ये भाजप तर बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठ्या मताधिक्याने एकतर्फी विजय होण्याचा अंदाज आहे. राहुरी मतदारसंघात भाजपचे अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे गोविंद मोकाटे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे बंडखोर नेते रावसाहेब खेवरे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके यांच्यासह इतर तीन अपक्ष असे एकूण 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व इतर 22 असे एकूण 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. ‘रुद्र रिसर्च’च्या अंदाजानुसार राहुरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजप पुन्हा आपला गड राखणार असल्याचे दिसून येते. अंदाजानुसार, भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांना 142500 (76%), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना 25500 (14%) तर इतरांना 19463 (10%) मतदान मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा तब्बल 117000 (62%) इतक्या मोठ्या मताधिक्याने विजयाची शक्यता असल्याचे दिसून येते. अक्षय कर्डिले यांच्यासोबत स्व. शिवाजी कर्डिले यांची असणारी सहानुभूती, माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांची निवडणुकीतून मागार व कार्यकर्त्यांचा भाजपच्या बाजूने असलेला कल, विरोधात तुल्यबळ उमेदवार नसणे, विखे पाटील कुटुंबीयांचा असणारा पाठिंबा व अहिल्यानगर तालुक्यातील प्रभाव, आमदार मोनिका राजळे यांनी केलेला प्रचार आणि पाथर्डी तालुक्यातील प्रभाव, अक्षय कर्डिले यांनी गावोगावी केलेला प्रचार, अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरेंमुळे होणारे मतांचे विभाजन, महाविकास आघाडीला वातावरण निर्मिती करण्यात आलेल्या मर्यादा या कारणांमुळे अक्षय कर्डिले यांच्या विजयाची एकतर्फी शक्यता आहे. ‘रुद्र रिसर्च’च्या अंदाजानुसार, बारामती मतदारसंघ पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना 212000 (95%) तर इतरांना 11705 (5%) मते मिळण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांचा 207000 इतक्या मोठ्या मताधिक्याने विजय होण्याची शक्यता आहे. बारामती मतदारसंघावर पवार कुटुंबीयांचा असलेला प्रभाव आणि प्रमुख सदस्यांनी मतदारांमध्ये जाऊन केलेला प्रचार, स्व. अजित पवार यांच्या निधनामुळे नागरिकांमध्ये असणारी सहानुभूतीची मोठी लाट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झालेली सभा, कोणत्याही प्रमुख पक्षाने विरोधात न दिलेला उमेदवार, सुनेत्रा पवार यांच्या व्यतिरीक्त असणाऱ्या उमेदवारांचा मर्यादित प्रभाव यामुळे सुनेत्रा पवार यांचा एकतर्फी विजय होण्याचा अंदाज आहे.राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानंतर प्रमुख उमेदवारांनी मागार घेतली. याचा फायदा महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना होत असल्याचे दिसून येते.

Rahuri and Baramati Exit Polls : राहुरीमध्ये अक्षय कर्डिले तर बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या एकतर्फी विजयाची शक्यता Read More »