DNA मराठी

Maharashtra Politics

bhiwandi gas news

Bhivandi Gas News : भिवंडीत गॅस सिलेंडरचा तुटवडा; कामगार रात्रभर एजन्सीबाहेर झोपून

Bhivandi Gas News : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धांमुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून त्याचा मोठा फटका भिवंडी शहरातील कामगार वर्गाला बसत आहे. भिवंडी हे कामगारांचे शहर म्हणून ओळखले जाते. येथे मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग ५ किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडरवर अवलंबून आहे. मात्र सध्या गॅस तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस एजन्सीकडे दररोज केवळ ४० ते ५० सिलेंडर उपलब्ध होत असल्याने “जे लवकर येतील त्यांनाच सिलेंडर मिळेल” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कामगार मध्यरात्रीपासूनच रांगा लावत आहेत. सिलेंडरसाठी नंबर लावून अनेक कामगार एजन्सीबाहेरच झोपून रात्र काढत आहेत, जेणेकरून सकाळी त्यांना सिलेंडर मिळू शकेल. मात्र मर्यादित पुरवठ्यामुळे अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत रांगेत उभे राहूनही सिलेंडर मिळत नसल्याने कामगारांमध्ये नाराजी वाढली आहे. गॅसअभावी जेवण बनवणे कठीण झाले असून रोजच्या जीवनावर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर कामगारांनी प्रशासनाकडे ५ किलो कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा वाढवण्याची मागणी केली आहे.

Bhivandi Gas News : भिवंडीत गॅस सिलेंडरचा तुटवडा; कामगार रात्रभर एजन्सीबाहेर झोपून Read More »

maharashtra government

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यात 8 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कारण काय?

Maharashtra Government : राज्य सरकारने मोठा निर्णय घेत पुन्हा एकदा राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आयएएस अधिकारी रुबल प्रखेर अग्रवाल यांची विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. रुबल प्रखेर अग्रवाल यापूर्वी महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होत्या. तर नयना गुंडे महिला व बाल आयुक्त, पुणे यांची विभागीय आयुक्त, अमरावती येथे बदली करण्यात आली आहे. आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या १. श्रीमती रुबल प्रखेर अग्रवाल (आयएएस:आरआर:२००८), व्यवस्थापकीय संचालक, महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई यांची विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई म्हणून बदली झाली आहे. २. श्रीमती नयना गुंडे (आयएएस:एससीएस:२००८), महिला व बाल आयुक्त, पुणे यांची विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती म्हणून बदली झाली आहे. ३. श्रीमती श्वेता सिंघल (आयएएस:आरआर:२००९), विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती यांची व्यवस्थापकीय संचालक, महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई म्हणून बदली झाली आहे. ४. श्री अशोक काकडे (आयएएस:एससीएस:२०१०), जिल्हाधिकारी, सांगली यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ (एमएआयडीसी), मुंबई म्हणून बदली झाली आहे. ५. श्री राहुल रेखवार (आयएएस:आरआर:२०११) यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई येथे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. ६. श्री एम. देवेंद्र सिंग (आयएएस:आरआर:२०११) यांची बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे सहआयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. ७. डॉ. मैनक घोष (आयएएस:आरआर:२०१९), जिल्हा परिषद, धाराशिव, यांची सांगली येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. ८. श्री प्रियंवदा म्हाड्डळकर (आयएएस:आरआर:२०२२) यांची जिल्हा परिषद, धाराशिव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यात 8 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कारण काय? Read More »

police bharti

Police Bharti: मोठी दुर्घटना, पोलीस भरतीदरम्यान 1600 मीटर धावताना तरुणाचा मृत्यू

Police Bharti: राज्यात सध्या कारागृह विभागातील रिक्त पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र, पुण्यातून मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मैदानी चाचणीसाठी आलेल्या पुरुषोत्तम बुरकुल या तरुणाचा धावताना मृत्यू झाला आहे. १६०० मीटर धावण्याची चाचणी पूर्ण करण्याच्या तयारीत असतानाच हा तरुण कोसळला आणि त्याच्या मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम हा कारागृह पोलीस भरतीसाठी पुण्यात आला होता. शनिवारी सकाळी साधारण साडेनऊ ते दहाच्या सुमारास त्याची १६०० मीटर धावण्याची चाचणी सुरू होती. तीन फेऱ्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर, जेव्हा तो चौथ्या आणि शेवटच्या राऊंडला आला, तेव्हा अचानक त्याला प्रचंड दम लागला. धावताना अचानक छातीत कळ आल्याने किंवा थकवा जाणवल्याने तो मैदानातच कोसळला. मैदानावर उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि वैद्यकीय पथकाने तातडीने त्याला प्रथमोपचार देऊन रुग्णवाहिकेने ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार, धावताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असे सांगण्यात येत आहे. मैदानावर उपस्थित असलेल्या त्याच्या मित्रांनी सांगितले की, सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. पुरुषोत्तम जेव्हा धावत होता, तेव्हा उन्हामुळे त्याला मोठ्या प्रमाणात थकवा आणि दम लागला असावा. उन्हात धावताना शरीर साथ न दिल्याने ही दुर्घटना घडल्याची शक्यता आहे . या प्रकरणात आता पुढील तपासात काय समोर येते आणि कोणावर कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Police Bharti: मोठी दुर्घटना, पोलीस भरतीदरम्यान 1600 मीटर धावताना तरुणाचा मृत्यू Read More »

parth pawar

Parth Pawar : मुंढवा जमीन प्रकरण; पार्थ पवारांवर पोलीस तपासाची टांगती तलवार कायम

Parth Pawar : मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात खारगे समिती ने आपला ४,३९२ पानांचा विस्तृत अहवाल सादर केला असून राजकीय वर्तुळात नवे वादळ निर्माण झाले आहे . महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पार्थ पवार यांना थेट जबाबदार ठरवले नसले तरी, त्यांच्या कंपनीशी संबंधित व्यवहारावर पोलीस तपासाची टांगती तलवार कायम ठेवली आहे. खारगे समितीने स्पष्ट केले की, चौकशी प्रामुख्याने दिवाणी स्वरूपाच्या बाबींवर (जमीन हस्तांतरण, मुद्रांक शुल्क, अनियमितता) केंद्रित होती. फौजदारी स्वरूपाच्या मुद्द्यांवर भाष्य करणे किंवा चौकशी करणे हे समितीच्या कार्यकक्षेत नव्हते. त्यामुळे समितीने कोणत्याही फौजदारी निष्कर्षापर्यंत जाणे टाळले आहे. मात्र महत्त्वाची टिप्पणी करताना स्पष्ट केले कि,या प्रकरणात आणखी कोणी सामील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्यास, ते देखील घोटाळ्यास जबाबदार धरले जाणार आहे.त्यामुळे खासदार पार्थ पवार यांच्यावर पोलीस कारवाईची टांगती तलवार कायम आहे. समितीने फौजदारी जबाबदारी पूर्णपणे पुणे पोलिसांवर सोपवली आहे. कोरेगाव पार्क परिसरातील मुंढवा येथील सुमारे ४० एकर सरकारी (महार वतन)जमीन बाजारभावाने १,८०० कोटी रुपयांची असताना, मेसर्स अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी कंपनीला अवघ्या ३०० कोटी रुपयांमध्ये (२१ कोटी मुद्रांक शुल्क माफीसह) विकण्याचा प्रयत्न झाला होता. या कंपनीत पार्थ पवार यांचा ९९ टक्के हिस्सा असल्याचे समोर आले. समितीने या व्यवहाराला नियमबाह्य आणि बेकायदेशीर’ ठरवले असून, खरेदी दस्त नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली असून समितीने स्पष्ट नावे घेतली. शीतल तेजवाणी, अशोक गायकवाड व इतर २७१ कुळांच्या वतीने कुलमुखत्यारधारक. – दिग्विजय अमरसिंह पाटील – अमेडिया कंपनीकडून जमीन खरेदी करणारे (पार्थ पवार यांचे चुलत भाऊ/नातेवाईक). – रवींद्र तारू (सहाय्यक उपनिबंधक). – सूर्यकांत येवले (पूर्वीचे पुणे तहसीलदार).वरील चौघांवर दोन गुन्हे दाखल झाले असून, त्यांच्याविरुद्ध बडतर्फीची प्रक्रिया सुरू आहे. बोपोडी जमीन प्रकरणातही येवले यांनी असाच नियमबाह्य आदेश दिल्याचा उल्लेख अहवालात आहे. अमेडिया कंपनीने २१ कोटी मुद्रांक शुल्क भरण्याच्या आदेशाविरुद्ध अपील दाखल केले आहे. समितीने दोन महिन्यांत निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, ही जमीन अद्याप शासकीय आहे. तिचा ताबा भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था (BSI) कडे आहे. सरकारने विहीत प्रक्रिया राबवून ही जमीन कायमस्वरूपी BSI ला देण्याची कारवाई दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे ठरवले आहे. विकास खारगे समितीने पार्थ पवार यांचा थेट उल्लेख करणं टाळला आहे. कारण व्यवहाराच्या दस्तऐवजांवर त्यांची स्वाक्षरी नव्हती. यामुळे विरोधकांकडून ‘क्लिन चीट’ दिल्याची टीका होत असली तरी, वास्तव वेगळे आहे. ९९ टक्के मालकी असलेल्या कंपनीच्या फायद्यात अप्रत्यक्षपणे त्यांचा संबंध येतो. समितीने फौजदारी जबाबदारी पोलिसांकडे ढकलून, सदर प्रकरणात ‘आणखी कोणी सामील आहे का’ याबाबत चौकशीचा मार्ग खुला ठेवला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी विधानसभेत हा अहवाल सादर केला असून सरकारने तो स्वीकारला देखील आहे. मात्र आता पोलीस तपास किती सखोल आणि निष्पक्ष होईल? दिग्विजय पाटील यांच्या नंतर तपास पुढे सरकत पार्थ पवार यांच्यापर्यंत तो पोहोचेल का? मुंढवा प्रकरण पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सरकारी जमिनींच्या संरक्षणात यंत्रणेची उदासीनता आणि राजकीय-प्रशासकीय संबंधांचे जाळे उघड करते. सरकारी ‘महार वतन’ जमीन इतक्या स्वस्तात खासगी हाती कशी गेली, याचे उत्तर अद्याप पूर्णपणे मिळालेले नाही. पोलिस तपास, मुद्रांक अपीलाचा निर्णय आणि BSI ला जमीन हस्तांतरण याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. हा अहवाल केवळ प्रशासकीय अपयश दाखवतो की, त्यापलीकडे मोठ्या घोटाळ्याची पाळेमुळे शोधण्याची सुरुवात आहे का हे महत्वाचे असणार आहे.

Parth Pawar : मुंढवा जमीन प्रकरण; पार्थ पवारांवर पोलीस तपासाची टांगती तलवार कायम Read More »

chhagan bhujbal

Chhagan Bhujbal : राज्यात इंधनसाठा मुबलक; पेट्रोल, डिझेल व एलपीजी पुरवठा सुरळीत

Chhagan Bhujbal : राज्यातील इंधनपुरवठ्याबाबत कोणतीही टंचाई नसून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल), भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) आणि इंडियन ऑइल (आयओसीएल) यांच्या माध्यमातून राज्यभर इंधनाचे वितरण नियमित आणि सुरळीतपणे सुरू असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे. राज्यातील इंधनसाठ्याची स्थिती समाधानकारक तेल विपणन कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, २५ मार्च २०२६ रोजी राज्यातील इंधनसाठ्याची स्थिती समाधानकारक असून, पेट्रोलचा साठा 2,05,232 किलोलीटर, डिझेलचा साठा 4,67,603 किलोलीटर तर एलपीजीचा साठा 30,767 मेट्रिक टन इतका उपलब्ध आहे. हा साठा राज्याच्या गरजा पूर्ण करण्यास पुरेसा आहे. एलपीजीच्या दैनिक उत्पादनात वाढ तेल रिफायनरींकडून एलपीजीच्या दैनिक उत्पादनात वाढ करण्यात आली असून सर्व उत्पादक कंपन्या पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. त्यामुळे तेल विपणन कंपन्यांना नियमितपणे पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा होत आहे आणि पुरवठा साखळीमध्ये कोणताही अडथळा निर्माण झालेला नाही. इंधन वितरण यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा व नियमित साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही. इंधन वितरण यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत असून संबंधित विभागांकडून सातत्याने देखरेख ठेवली जात आहे. याशिवाय, खासगी क्षेत्रातील कंपन्यांकडे देखील पेट्रोलियम पदार्थांचा साठा उपलब्ध असल्याने एकूण पुरवठा अधिक सक्षम झाला आहे. नागरिकांना आवाहन नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवा, सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेश किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये. भीतीपोटी इंधनाचा साठा करण्याचा प्रयत्न करू नये किंवा एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पेट्रोल किंवा डिझेल खरेदी करू नये. पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळावी, ज्यामुळे वाहतूक कोंडी किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. तसेच, इंधनपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन व संबंधित कंपन्यांकडून सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून यावर नागरिकांनी विश्वास ठेवावा. कोणतीही शंका किंवा माहिती जाणून घेण्यासाठी केवळ अधिकृत शासकीय माध्यमांवरच अवलंबून राहण्याचे आवाहन अन्न नागरी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे. शासनाचे इंधन पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण सद्यस्थितीत केंद्र व राज्य शासन इंधन पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण ठेवून परिस्थिती प्रभावीपणे हाताळत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता शांतता व संयम राखून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.

Chhagan Bhujbal : राज्यात इंधनसाठा मुबलक; पेट्रोल, डिझेल व एलपीजी पुरवठा सुरळीत Read More »

Petrol Price: अहिल्यानगर जिल्ह्यात सुट्या पेट्रोल – डिझेल विक्रीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Petrol Price : – समाजमाध्यमांवर पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्याबाबत पसरत असलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केले आहेत. पेट्रोलियम नियम २००२ मधील तरतुदींचा आधार घेत काढण्यात आलेले हे आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत. या नव्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात उघड्यावर म्हणजे कॅन, बाटली किंवा डब्यात पेट्रोल आणि डिझेल देण्यावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांनी पेट्रोल आणि डिझेल केवळ वाहनांच्या इंधन टाकीतच भरावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत पेट्रोल किंवा डिझेलची खुल्या स्वरूपात म्हणजेच प्लास्टिक बाटली, कॅन, डबा किंवा इतर कोणत्याही भांड्यात विक्री करू नये, अशी सक्त मनाई करण्यात आली आहे. यासोबतच प्रशासनाने सर्व पेट्रोल पंप परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवणे आणि इंधन विक्रीच्या नोंदी नियमितपणे ठेवणे बंधनकारक केले आहे. या आदेशाचे काटेकोर पालन करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित पेट्रोल पंप मालक आणि व्यवस्थापक यांची राहील. जे कोणी या नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर ‘पेट्रोलियम नियम २००२’, ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३’ तसेच ‘आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५’ मधील तरतुदींनुसार दंडात्मक आणि फौजदारी स्वरूपाची कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. याशिवाय, सर्व पेट्रोलियम कंपन्यांच्या व्यवस्थापकांना जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर इंधनाचा पुरेसा साठा राहील याची दक्षता घेण्याचे निर्देशही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

Petrol Price: अहिल्यानगर जिल्ह्यात सुट्या पेट्रोल – डिझेल विक्रीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश Read More »

img 20260326 wa0004

Nilesh Lanke: 4 हजार एकर जमिनीसंदर्भात खा. लंके यांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

Nilesh Lanke : श्रीरामपूर तालुक्यातील महाराष्ट्र शासनाच्या मालकीची व शेती महामंडळाकडे असलेली सुमारे ४ हजार एकर बागायती जमीन झेड आर टू ग्रुप होल्डिंग कंपनी व झेड आर टू बायो एनर्जी कंपनी लिमिटेड या खाजगी कंपन्यांना देण्याच्या प्रस्तावावर खासदार नीलेश लंके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवेदनात खा. लंके यांनी नमूद केले आहे की, संबंधित कंपन्यांची रचना, आर्थिक व्यवहार व संचालक मंडळातील परस्पर संबंध अत्यंत संशयास्पद असून या कंपन्यांची ‘शेल’ स्वरूपाची शक्यता नाकारता येत नाही. झेड आर टू ग्रुप होल्डिंग कंपनी व झेड आर टू बायो एनर्जी कंपनी लिमिटेड यांच्यात ६१ टक्के भागभांडवलाद्वारे थेट नियंत्रण संबंध असून दोन्ही कंपन्यांमध्ये समान संचालक कार्यरत आहेत. तसेच या कंपन्यांचे इतर संबंधित संस्थांशीही हितसंबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. कंपनीच्या आर्थिक व्यवहारांमध्येही विसंगती आढळून येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अत्यल्प किंवा शून्य उलाढाल असताना कोट्यवधी रुपयांचा नफा दाखविणे, तसेच अचानक मोठ्या प्रमाणात भांडवली वाढ दर्शविणे व त्याबाबत स्पष्ट माहिती न देणे या बाबी गंभीर स्वरूपाच्या असल्याचे खा. लंके यांनी म्हटले आहे. याशिवाय, विमान इंधन निर्मितीसारख्या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली तांत्रिक व व्यावसायिक पात्रता संबंधित कंपन्यांकडे नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांशी कोणतेही करार नसताना एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी जमीन मागणी करण्यात येत असल्यामुळे प्रकल्पाच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. श्रीरामपूर तालुक्यातील ही जमीन हजारो कोटी रुपयांची मौल्यवान सार्वजनिक संपत्ती असून तिचे हस्तांतरण करताना पारदर्शकता व सखोल तपासणी आवश्यक असल्याचे खा. लंके यांनी अधोरेखित केले आहे. “जनतेच्या मालकीची जमीन कोणत्याही परिस्थितीत संशयास्पद कंपन्यांना देण्यात येऊ नये,” अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली. खा. लंके यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केलेल्या मागण्यांमधे संबंधित कंपन्यांची आर्थिक, तांत्रिक व कायदेशीर पात्रता स्वतंत्र उच्चस्तरीय समितीमार्फत तपासावी, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, जमीन हस्तांतरणाचा प्रस्ताव तात्काळ स्थगित किंवा रद्द करण्यात यावा यांचा समावेश आहे.

Nilesh Lanke: 4 हजार एकर जमिनीसंदर्भात खा. लंके यांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis on Ashok Kharat:  … तर खरात परदेशात पळून जाणार होता; CM फडणवीसांचा मोठा खुलासा

Devendra Fadnavis on Ashok Kharat: नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा करत अशोक खरात विदेशाला पळून जाण्याची तयारी करत होता असा खुलासा केला आहे. फडणवीस म्हणाले, आरोपी म्हणजे अशोक खरात हा देश सोडून पळून जाण्याची शक्यता होती. तो पळून गेला असता, तर त्याला शोधणे जिकरीचे ठरले असते. त्यामुळे पोलिसांनी त्याचा लुकआउट सर्क्युलन्स जारी करण्याबाबत अहवाल एअरपोर्ट अथॉरिटी यांना १० मार्च २०२६ रोजी सादर केला व एअर अथॉरिटीने तत्काळ त्यास परदेश गमनासाठी बंदी घातली. वावी पोलिस स्टेशन व शिर्डी पोलिस स्टेशन येथील गुन्ह्याच्या तपासात समोर आलेली गंभीर बाब गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, वावी व शिर्डी येथील दोन्ही गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी १३ मार्च २०२८ विशेष तपास पथक एसआयटीची स्थापना विशेष पोलिस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था यांच्या आदेशान्वये करून दोन्ही तपास एसआयटीकडे वर्ग करण्यात आले. महिलेच्या तक्रारीने फुटले खरातचे बिंग मुख्यमंत्री म्हणाले, दिनांक १७ मार्च २०२६ रोजी रात्री एका महिलेने सरकारवाडा पोलिस स्टेशन तक्रार दिली की, अशोक खरात याने स्वत:कडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून मंत्र, तंत्र व धार्मिक विधीच्या नावाखाली फिर्यादीच्या मनात विश्वास निर्माण करून तिला ओकस प्रॉपर्टीज, कॅनडा कॉर्नर या ऑफिसमध्ये बोलावून, तिच्या धार्मिक विश्वासाचा फायदा घेऊन, गुंगीकारक पदार्थ व पाणी पिण्यास देऊन, तिला संमोहित करून, तिचे आयुष्य बर्बाद करून टाकेन अशी धमकी देऊन, तिच्या पतीच्या मरणाची भीती तिला घालून, तिची इच्छा नसताना वारंवार बलात्कार केला. अशी तक्रार दिल्याने सरकारवाडा पोलिस स्टेशन येथे ७३/२०२६ बीएनएस कलम ६४-१ ७४ ३५१ २ महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम कलम ३ (१) व (२) प्रमाणे दाखल करून, आरोपी अशोक खरात यास दिनांक १७ मार्च २०२६ रोजी २३ वाजून ५९ मिनिटांनी तत्काळ अटक करण्यात आली.

Devendra Fadnavis on Ashok Kharat:  … तर खरात परदेशात पळून जाणार होता; CM फडणवीसांचा मोठा खुलासा Read More »

chandrashekhar bawankule

Chandrashekhar Bawankule : शर्तभंग’ नियमित करण्याचे अधिकार आता जिल्हाधिकार्‍यांना; सुधारणा विधेयक मंजूर

Chandrashekhar Bawankule : राज्यातील शासकीय जमिनींच्या व्यवहारातील ‘शर्तभंग’ नियमित करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडलेले ‘महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) विधेयक २०२६’ (विधेयक क्र. २८) विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. या नवीन कायद्यामुळे आता छोट्या स्वरूपाचे शर्तभंग नियमित करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना मिळणार असल्याने ९० टक्के प्रकरणांचा निकाल स्थानिक पातळीवरच लागणार आहे. कायदेशीर तरतुदीचा अभाव होणार दूर आतापर्यंत शासनाने कब्जेहक्काने किंवा भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनींच्या बाबतीत होणारे शर्तभंग नियमित करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये (MLRC) कोणतीही स्पष्ट कायदेशीर तरतूद नव्हती. हे काम केवळ शासकीय परिपत्रकांच्या आधारे केले जात होते. मात्र, या प्रक्रियेला कायदेशीर आधार नसल्याने अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट होत होती किंवा प्रलंबित राहत होती. ही उणीव दूर करण्यासाठी मंत्री बावनकुळे यांनी संहितेत कलम ३७ ‘अ’ आणि ३२८ ‘अ’ अंतर्गत नवीन सुधारणा सुचवली आहे. नव्वद टक्के प्रकरणे निकाली निघणार महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले की,” आजवर अगदी छोट्या शर्तभंगासाठी देखील फाईल्स मंत्रालयात येत होत्या. यामुळे मंत्रालयावर कामाचा मोठा ताण होता आणि सर्वसामान्यांना छोट्या कामांसाठी मुंबईच्या वाऱ्या कराव्या लागत होत्या. आता आम्ही अधिकारांचे विकेंद्रीकरण करत आहोत. एक कोटी रुपयांपर्यंतची सुमारे ९० टक्के प्रकरणे आता जिल्हाधिकारी किंवा विभागीय आयुक्त स्तरावरच निकाली निघतील. केवळ अति-उच्च मूल्याची प्रकरणेच मंत्रालयाकडे येतील.” विधेयक सभागृहात मांडले असता, त्याचे महत्त्व लक्षात घेऊन सर्वपक्षीय आमदारांनी याला पाठिंबा दिला. विधेयक मांडताना बावनकुळे यांनी या बदलाचा प्रशासकीय फायदा सभागृहाच्या लक्षात आणून दिला.

Chandrashekhar Bawankule : शर्तभंग’ नियमित करण्याचे अधिकार आता जिल्हाधिकार्‍यांना; सुधारणा विधेयक मंजूर Read More »

acid attack

Sangamner News : ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडितेला आर्थिक साहाय्य मंजूर

Sangamner News : संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे ११ वर्षीय मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याच्या घटनेच्या अनुषंगाने “पीडितांना नुकसानभरपाई देण्याबाबत योजना, २०२२” अंतर्गत पीडितेला ३ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय कदम यांनी दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे यांच्या निर्देशानुसार दिनांक १८ मार्च २०२६ रोजी संबंधित समितीची तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पीडितेच्या आईच्या बँक खात्यात तात्काळ १ लाख रुपयांची आर्थिक मदत जमा करण्यात आली. त्यानंतर दिनांक २४ मार्च २०२६ रोजी समितीची पुढील बैठक घेण्यात आली. या बैठकीत परिवीक्षा अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या गृह चौकशी अहवालाचे परीक्षण करून पीडितेच्या आईच्या खात्यात अतिरिक्त २ लाख रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली. अशा प्रकारे या प्रकरणात पीडितेला एकूण ३ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य मंजूर करून वितरित करण्यात आले.

Sangamner News : ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडितेला आर्थिक साहाय्य मंजूर Read More »