DNA मराठी

Maharashtra government

राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोठडीत मृत्यू झाला तर कैद्याच्या वारसांना मिळणार पाच लाख

Maharashtra Government: राज्यातील कारागृहांमध्ये कोठडीत असलेल्या कैद्यांचा मृत्यू अनैसर्गिक कारणांमुळे झाल्यास त्याच्या वारसांना राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या सूचनेनुसार भरपाई देण्याच्या धोरणास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने या निर्णयाला मान्यता दिली आहे. या धोरणानुसार कारागृहामध्ये काम करताना झालेल्या अपघातामुळे, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे, कारागृह कर्मचाऱ्यांच्या मारहाणीमुळे किंवा कैद्यांच्या आपापसातील भांडणात मृत्यू झाल्यास आणि संबंधित प्रकरणात प्रशासनाचा निष्काळजीपणा चौकशीतून सिद्ध झाल्यास, कैद्याच्या वारसांना पाच लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. तुरुंगवासातील आत्महत्येच्या प्रकरणात कैद्याच्या वारसांना एक लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व कारागृहांमध्ये हे धोरण लागू राहणार आहे. कैद्याचा मृत्यू वार्धक्य, दीर्घ आजार, कारागृहातून पलायन करताना अपघातात, जामीनावर असताना, किंवा उपचार नाकारल्याने झाला असल्यास कोणतीही भरपाई देण्यात येणार नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाल्यास मात्र शासनाच्या विद्यमान धोरणानुसार भरपाई मिळेल. भरपाईसाठी संबंधित कारागृह अधीक्षकांनी प्राथमिक चौकशी, शवविच्छेदन, पंचनामा, वैद्यकीय अहवाल, न्यायालयीन व जिल्हाधिकाऱ्यांचा तपास आदी कागदपत्रांसह अहवाल प्रादेशिक विभाग प्रमुखांकडे सादर करावा लागेल. यानंतर प्रकरणाची सखोल चौकशी करून अंतिम प्रस्ताव अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे सादर केला जाईल. त्यांच्या शिफारशींच्यानंतर शासन स्तरावर निर्णय घेतला जाईल आणि भरपाई दिली जाईल. मृत्युच्या प्रकरणांमध्ये दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोठडीत मृत्यू झाला तर कैद्याच्या वारसांना मिळणार पाच लाख Read More »

मोठी बातमी! राज्याचे वाळू-रेतीबाबचे धोरण जाहीर, लिलाव पद्धतीने होणार विक्री

Maharashtra Government: राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या नवीन वाळू-रेतीबाब च्या धोरणाला मान्यता दिली आहे. या नवीन धोरणानुसार आता राज्यात नदी,खाडीपात्रातील वाळू, रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन विक्री (डेपो पद्धती) ऐवजी लिलावपद्धतीद्वारे करण्यात येणार आहे. याच बरोबर विविध योजनांमधील राज्यातील घरकूल लाभार्थ्यांसाठी 5 ब्रास पर्यंत मोफत वाळू उपलब्ध करुन देण्याचा निर्णय देखील महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. तर दुसरीकडे पुढील तीन वर्ष विविध शासकीय/निमशासकीय बांधकामामध्ये 20 टक्के कृत्रिम वाळू वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर आता या धोरणानुसार पर्यावरण विभागाच्या परवानगीनंतर नदीपात्रातील वाळू गटांसाठी जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाळू गटांचा एकत्रितरित्या एकच ई-लिलाव प्रसिद्ध करण्यात येईल. या लिलावाचा कालावधी 2 वर्षासाठी राहणार. तर पूर परिस्थिती अथवा इतर नैसर्गिक कारणामुळे शेत जमिनीमध्ये वाळू जमा झाल्यास, अशी शेतजमीन पुन्हा लागवड योग्य करण्यासाठी वाळूची निर्गती करण्यात येणार असल्याचा निर्णय देखील महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.

मोठी बातमी! राज्याचे वाळू-रेतीबाबचे धोरण जाहीर, लिलाव पद्धतीने होणार विक्री Read More »

Maharashtra Government: मोठी बातमी! मंत्रालयात ऑनलाईन ॲपद्वारे मिळणार प्रवेश

Maharashtra Government: मंत्रालय सुरक्षा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातंर्गत पहिल्या टप्प्यात चेहरा ओळख आधारित प्रवेश प्रक्रिया कार्यान्वीत करण्यात आली. तसेच टप्पा २ अंतर्गत प्रवेशासाठी व्हीजीटर मॅनेजमेंट सिस्टीम प्रणाली विकसित करण्यात आली आहे. मंत्रालयात क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, अभ्यागत यांना यापुढे कोणत्याही कामाकरिता प्रवेश हवा असल्यास त्यांना ‘डिजीप्रवेश’ या ऑनलाईन ॲप आधारित प्रणालीद्वारे मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे. अभ्यांगतांना मंत्रालयाच्या ज्या विभागात कामानिमित्त प्रवेश आवश्यक आहे. केवळ त्यांना दिलेल्या वेळेत आणि अनुज्ञेय असलेल्या मजल्यावरच प्रवेश करावा. अनधिकृत मजल्यावर प्रवेश केल्यास अभ्यागत कारवाईस पात्र राहतील. अभ्यागतांनी संबंधित विभागातील आपले काम पूर्ण झाल्यावर विहीत वेळेत मंत्रालयातून बाहेर पडावे. ज्येष्ठ नागरीक व दिव्यांग अभ्यागतांना रांगेत उभे राहण्यामुळे होणारा त्रास विचारात घेता त्यांना दुपारी १२ वाजता प्रवेश देण्यात येईल. तर दुपारी १२ नंतर ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग अभ्यांगत यांचेसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था राहील. तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग अभ्यांगत यांनी तत्संबंधीचे वैध प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. मंत्रालयात येणाऱ्या सर्व अभ्यागतांना दुपारी २ वाजेनंतर प्रवेश देण्यात येईल. अशा प्रवेशासाठी त्यांना डिजीप्रवेश या ऑनलाईन ॲप आधारीत प्रणालीद्वारे मंत्रालय प्रवेशपास घेऊन मंत्रालयात प्रवेश मिळविता येईल. अभ्यागतांनी मंत्रालयात प्रवेश मिळविण्यासाठी आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड आदी शासन मान्य ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. अशिक्षीत तसेच स्मार्टफोन नसलेल्या अभ्यांताकरीता गार्डन गेट येथे ऑनलाईन ॲप आधारीत प्रणालीद्वारे मंत्रालय प्रवेश नोंदणीकरीता तसेच मदतीकरीता एक खिडकी उपलब्ध असणार आहे. ‘डिजीप्रवेश’ ॲपद्वारे आपली नोंदणी केल्यानंतर मिळणाऱ्या क्यू आर कोड आधारे मंत्रालयाबाहेर असलेल्या खिडकीवर मंत्रालय प्रवेशाकरिता आरएफआयडी कार्ड वितरीत करण्यात येईल. हे आरएफआयडी कार्ड आधारे सुरक्षाविषयक तपासणी करून मंत्रालयात प्रवेश देण्यात येईल. अभ्यागतांना आरएफआयडी प्रवेश ओळखपत्र परिधान करणे व मंत्रालयातून बाहेर जाताना ते सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे जमा करणे बंधनकारक राहील. अभ्यागतांनी अशी करावी नोंदणी‘डिजीप्रवेश’ ॲप हे मोबाईल ॲप ॲण्ड्राईड आणि आयओएस ॲपल या दोन्ही प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. आपल्या मोबाईल च्या प्रणालीनुसार ॲण्ड्राईडमध्ये प्ले स्टोअर वर तर आयओएस ॲपलवर ॲपल स्टोअरवर digi pravesh हे सर्च केल्यास हे ॲप विनामुल्य डाऊनलोड करता येते. या ॲपवर सुरूवातीला केवळ एकदाच नोंदणी करणे आवश्यक राहील. नोंदणी झाल्यानंतर आधार क्रमांकावर आधारीत यंत्रणेद्वारे छायाचित्राची ओळख पटवून नोंदणी पूर्ण केल्यानंतर ज्या विभागात काम आहे, त्याचा स्लॉट बुक करून रांगेशिवाय प्रवेश घेता येईल. या संपूर्ण प्रक्रियेला तीन मिनीटांपेक्षा कमी कालावधी लागतो.

Maharashtra Government: मोठी बातमी! मंत्रालयात ऑनलाईन ॲपद्वारे मिळणार प्रवेश Read More »

अनेकांना दिलासा, वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यास 30 जूनपर्यंत मुदतवाढ

Maharashtra Government: राज्य सरकारने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) पाटी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यासाठी 31 मार्च 2025 पर्यंत वाहन मालकांना मुदत देण्यात आली होती. मात्र आता सरकारने मोठा निर्णय घेत आजपर्यंत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्याचे काम कमी झाले असल्याने उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यासाठी 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या जुन्या वाहनांना ही पाटी बसविण्याकरिता 3 संस्थाची /उत्पादकांची परिवहन विभागामार्फत निवड केली आहे. तरी संबंधित वाहन मालकांनी याची नोंद घेऊन 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी असलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यात यावी, असे आवाहन परिवहन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

अनेकांना दिलासा, वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यास 30 जूनपर्यंत मुदतवाढ Read More »

Maharashtra Government: राज्य अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स ; 364 पदांना मंत्रिमंडळाची मंजुरी

Maharashtra Government: राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यास तसेच त्याकरिताच्या 364 पदांना व त्यासाठीच्या खर्चास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यासाठी 31 ऑगस्ट 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे. या फोर्ससाठी आवश्यक असणारे 346 पदांच्या मनुष्यबळाचा प्रस्तावास मंजूरी देण्यात आली. यापैकी 310 पदे नियमित असतील तर 36 पदे बाह्य यंत्रणेकडून भरली जाणार आहेत. नियमित पदे पुढीलप्रमाणे (पदनाम आणि संख्या) – विशेष पोलीस महानिरीक्षक- एक, पोलीस उपमहानिरीक्षक एक, पोलीस अधीक्षक-तीन, अपर पोलीस अधीक्षक-तीन, पोलीस अधीक्षक- 10, पोलीस निरीक्षक 15, सहाय्यक पोलीस निरीक्षक – 15, पोलीस उपनिरीक्षक – 20, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक – 35, पोलीस हवालदार – 48, पोलीस शिपाई – 83, चालक पोलीस हवालदार -18, चालक पोलीस शिपाई -32, कार्यालय अधीक्षक – एक, प्रमुख लिपीक – दोन , वरिष्ठ श्रेणी लिपीक -11, कनिष्ठ श्रेणी लिपीक – सात, उच्च श्रेणी लघुलेखक – दोन, निम्न श्रेणी लघुलेखक – तीन.बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाची पदे ( पदनाम आणि संख्या या क्रमाने) वैज्ञानिक सहाय्यक-तीन, विधी अधिकारी – तीन, कार्यालयीन शिपाई -18, सफाईगार – 12 एकूण – 36. यासाठी येणाऱ्या आवर्ती खर्च रुपये 19, 24, 18,380 रुपये (एकोणीस कोटी चोवीस लाख अठरा हजार तीनशे ऐंशी रुपये) तर वाहन खरेदीसह अनावर्ती खर्चास 3,12,98,000 ( तीन कोटी बारा लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे ऐंशी रुपये) मान्यता देण्यात आली. सहाव्या राज्य वित्त आयोगाची स्थापनातर याच बरोबर सहाव्या राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्यास देखील मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. हा आयोग 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी शिफारशी करेल. या शिफारशींबाबत अहवाल सादर करण्यास या आयोगाला 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत असेल. आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या नावाची राज्यपाल यांच्याकडे शिफारस करण्याचे अधिकार मुख्यमंत्री यांना देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली. आयोगाच्या सदस्य सचिव पदावर भारतीय प्रशासन सेवेतील कनिष्ठ प्रशासकीय श्रेणीच्या अधिकारीच्या श्रेणी पेक्षा कमी नसेल किंवा समतुल्य दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल. आयोगाच्या कालावधीत आवश्यक पद निर्मिती करण्यास, आयोगाचे कामकाज अधिक परिणामकारकरीत्या चालण्यासाठी आवश्यक कार्यालय आणि आवर्ती अनावर्ती खर्चाकरिता पुरेशी अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात आली.सहावा राज्य वित्त आयोग पंचायती व नगरपालिका यांच्या आर्थिक स्थितीचे पुनर्विलोकन करून पुढील बाबींच्या संबंधात शिफारशी करील. राज्याकडून वसूल करण्यात यावयाच्या कर, शुल्क, पथकर व फी यांच्यापासून मिळणाऱ्या संविधानाच्या भाग नऊ व नऊ-अ अन्वये, पंचायती व नगरपालिका यांच्यात विभागून द्यावयाच् निष्वळ उत्पन्नाचे राज्य, पंचायती व नगरपालिका यांच्यात विभागणी करणे व अशा उत्पन्नाती पंचायती व नगरपालिका यांच्या सर्व स्तरांवरील त्यांच्या त्यांच्या हिश्श्यांचे वाटप करणे. पंचायती किंवा यथास्थिती, नगरपालिका यांच्याकडे अभिहस्तांकित करण्यात येतील, किंवा यथास्थिती, पंचायती किंवा नगरपालिका यांच्याकडून ज्यांचे विनियोजन करण्यात येईल असे कर, शुल्क, पथकर व फी निर्धारित करणे. पंचायती किंवा यथास्थिती, नगरपालिका यांना राज्याच्या एकत्रित निधीमधून देण्यात यावयाच्या सहाय्यक अनुदान यांचे नियमन करणारी तत्त्वे ठरविणे. पंचायती व नगरपालिका यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना. आयोगाला पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निधी व्यवस्थापनासाठी चांगल्या कार्यपद्धती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या चांगल्या आर्थिक व्यवस्थापनासाठी इतर काही संबंधित बाबीसंदर्भात शिफारशी करता येतील. आयोगास केंद्रीय वित्त आयोगाने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन त्यांच्या शिफारशी करता येतील.या निरनिराळ्या बाबींवरील शिफारशी करतेवेळी करातील हिस्सा, शुल्क व सहाय्यक अनुदान निर्धारित करताना लोकसंख्या आधारभूत घटक असेल. त्याकरिता आयोग सन 2011 च्या जनगणनेतील लोकसंख्येची आकडेवारी विचारात घेईल.

Maharashtra Government: राज्य अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स ; 364 पदांना मंत्रिमंडळाची मंजुरी Read More »

Pratap Sarnaik : व्यापार आणि प्रवासी दळणवळण यांचा सुंदर मिलाफ म्हणजे गुजरात बसपोर्ट; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Pratap Sarnaik : बसस्थानक हे त्या शहराचे मध्यवर्ती ठिकाण असते. किंबहुना, ते अशा मोक्याच्या ठिकाणी असते की जिथे व्यापार- उदीम विकसित होत असतो, हे ओळखून गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसस्थानक परिसरामध्ये व्यावसायिक वापरासाठी ” व्यापारी संकुल ” आणि त्यामधून येणाऱ्या महसूलाद्वारे प्रवाशांसाठी अत्याधुनिक सोयी – सुविधा युक्त असलेले ” बसपोर्ट ” निर्माण करून एक प्रकारे व्यापार आणि प्रवासी दळणवळणचा सुंदर मिलाफ असल्याचे मत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले. ते गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसपोर्ट प्रकल्पाची माहिती घेताना बोलत होते. त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे प्रभारी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार, नितीन मैद (महाव्यवस्थापक वाहतूक) व नंदकुमार कोलारकर (महाव्यवस्थापक यंत्र ) दिनेश महाजन (महाव्यवस्थापक बांधकाम) हे अधिकारी देखील दौऱ्यात सहभागी होत आहेत. या दौऱ्याच्या दरम्यान गुजरात राज्याचे परिवहन मंत्री हर्ष संघवी यांच्यासोबत देखील मंत्री सरनाईक यांची बैठक झाली . या बैठकीत दोन्ही राज्यांच्या परिवहन सेवेसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एम. नागार्जन यांनी शिष्टमंडळाला त्यांच्या परिवहन सेवेची माहिती दिली. त्यामध्ये गुजरात परिवहन महामंडळ मार्फत चालवण्यात येणारी एकात्मिक नियंत्रण प्रणाली अत्यंत चांगली असुन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये देखील अशा प्रकारची सुविधा असणे गरजेचे आहे. असे मत मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले. यावेळी गुजरात मधील अहमदाबाद व वडोदरा येथील बसपोर्टची पाहणी मंत्री सरनाईक व त्यांच्या शिष्ठमंडाळाने केली. यावेळी बसस्थानकावरील वेगवेगळ्या सोयी-सुविधा कशाप्रकारे प्रवाशांना दिल्या जातात, याबद्दलची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळात दिली. विशेष करून तेथील प्रशासनाने बसस्थानकावर थोडेशा विश्रांतीसाठी थांबणाऱ्या प्रवाशांना ” प्रवासी विश्रांतीगृह ” कमी किंमतीमध्ये बस स्थानकावर उपलब्ध करून दिले आहेत, त्याचे कौतुक मंत्री सरनाईक यांनी केले .तसेच गुजरात परिवहन महामंडळाच्या अत्याधुनिक बसेसची पाहणी देखील त्यांनी यावेळी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करताना सांगितले होते की, इतर राज्यात ज्या चांगल्या गोष्टी घडत आहेत, त्यांना भेट देऊन त्या आपल्या राज्यात कशा अमलात आणता येतील याचा अभ्यास करावा, जेणेकरून विविध ठिकाणच्या नाविन्यपूर्ण योजना आपल्या राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होतील. याचाच एक भाग म्हणून गुजरात राज्य मार्ग परिवहन सेवेमार्फत चालवल्या जाणाऱ्या बसपोर्ट प्रकल्पाची माहिती घेणे, तसेच त्यांच्या प्रादेशिक परिवहन व्यवस्थापनाचा अभ्यास करणे, त्याबरोबर त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी राबवत असलेल्या प्रोत्साहन योजना जाणून घेण्यासाठी या दौऱ्याची आखणी केली होती. इतर राज्यातील परिवहन सेवांचा अभ्यास करून त्यांच्या चांगल्या कल्पना आपल्या एसटी महामंडळामध्ये राबवणे शक्य आहे का? याची देखील चाचपणी या दौऱ्याच्या निमित्ताने केली आहे.

Pratap Sarnaik : व्यापार आणि प्रवासी दळणवळण यांचा सुंदर मिलाफ म्हणजे गुजरात बसपोर्ट; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक Read More »

कर्मचाऱ्यांनो EPFO शी संबंधित ‘हे’ काम 15 फेब्रुवारीपूर्वी करा, नाहीतर होणार नुकसान

EPFO Update: जर तुम्ही देखील आतापर्यंत बँक खाते आणि युनिव्हर्सल अकाउंट नंबर आधार कार्डशी लिंक केले नसेल तर तुमच्यासाठी ईपीएफओने शेवटची तारीख 15 फेब्रुवारी निश्चित केली आहे. या पूर्वी अंतिम तारीख 15 जानेवारी होती. आता कर्मचाऱ्यांना EPAO शी संबंधित हे काम कोणत्याही परिस्थितीत 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावे लागेल, अन्यथा त्यांच्या समस्या नंतर वाढू शकतात. ईपीएफओ सदस्यांसाठी यूएएन क्रमांक खूप महत्त्वाचा आहे. जर ते सक्रिय ठेवले नाही तर पीएफ खात्याशी संबंधित काम अडकू शकते. हा 12 अंकी क्रमांक आहे. जे नेहमीच सारखेच राहते. कर्मचाऱ्यांची एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेत बदली झाली तरीही नंबर तोच राहतो. पीएफ खाते हस्तांतरित करता येते. कर्मचारी त्यांचे ईपीएफओशी संबंधित काम ऑनलाइन पूर्ण करू शकतात. जसे की पीएफ खाते व्यवस्थापित करणे, स्टेटमेंट तपासणे, स्टेटमेंट डाउनलोड करणे, पैसे ट्रान्सफर करणे किंवा ऑनलाइन अॅडव्हान्ससाठी अर्ज करणे इ. यासोबतच, कर्मचारी त्यांचे आधार आणि इतर माहिती देखील अपडेट करू शकतात. तुमचा UAN आधार कार्डशी लिंक करण्याचे मार्ग कर्मचारी UAN आणि आधार दोन प्रकारे लिंक करू शकतात. सर्वप्रथम EPFO ​​च्या अधिकृत वेबसाइट https://unifiedportal-mem.epfindia.gov.in वर जा. यानंतर e-KYC पोर्टलवर क्लिक करा. आता UAN आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका. यानंतर Get OTP वर क्लिक करा. नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी एंटर करा. आता तुमचा आधार क्रमांक टाकल्यानंतर आणि सबमिट केल्यानंतर, आधार लिंक होईल. उमंग अ‍ॅपद्वारेसर्वप्रथम तुमच्या मोबाईल फोनवर उमंग अॅप डाउनलोड आणि इन्स्टॉल करा. आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरने लॉगिन करा. यानंतर EPFO ​​सेवेच्या पर्यायावर जा. आता आधार साइडिंगच्या पर्यायावर क्लिक करा. UAN नंबर टाकल्यानंतर, OTP टाका. नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी एंटर करा. जर आधारला UAN क्रमांकाशी लिंक करण्यात काही अडचण येत असेल तर EPFO ​​हेल्पलाइनवर कॉल करून मदत घेता येईल.

कर्मचाऱ्यांनो EPFO शी संबंधित ‘हे’ काम 15 फेब्रुवारीपूर्वी करा, नाहीतर होणार नुकसान Read More »

Narhari Zirwal : अन्न पदार्थांच्या गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य -अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

Narhari Zirwal : समाजातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ, उत्तम दर्जाचे व निर्भेळ अन्न उपलब्ध व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून अन्न पदार्थांच्या गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे शिवांजली कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उदघाटन झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग, बाळासाहेब मूरकुटे, रंगनाथ पवार, डॉ.बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते. मंत्री झिरवाळ म्हणाले, नागरिकांना स्वच्छ, निर्भेळ अन्न प्राप्त होणे हा त्यांचा अधिकार आहे. दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ केल्याच्या अनेक घटना घडतात. अशा घटना होऊ नयेत यासाठी कठोर उपाययोजना करत अन्न व औषध विभागाच्या माध्यमातून सामान्यांना निर्भेळ अन्न पदार्थ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, पाटील परिवाराने शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचीद्वारे खुली करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. शिक्षणदानाच्या त्यांच्या या पुण्याच्या कार्यात त्यांना भविष्यकाळात आवश्यक असलेली सर्वोतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाहीही झिरवाळ यांनी दिली. यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमास पदाधिकारी, विविध वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.

Narhari Zirwal : अन्न पदार्थांच्या गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य -अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ Read More »

Maharashtra Government: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सर्व वाहनांसाठी फास्ट टॅग अनिवार्य

Maharashtra Government: राज्यातील चार चाकी वाहन धारकांना 01 एप्रिल पासून फास्ट टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. 1 एप्रिल 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. या निर्णयामुळे वाहतूक कोंडी टळून इंधनाची आणि वेळेची देखील बचत होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. फास्ट टॅग कार्यरत नसेल तर वाहन धारकाला पथकर शुल्काच्या दुप्पट शुल्क भरावे लागेल. त्याचप्रमाणे रोख रक्कम, स्मार्ट कार्ड, क्रेडिट डेबिट कार्ड किंवा कोड किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे पथकर शुल्क भरायचे असेल तरी देखील दुप्पट पथकर शुल्क भरावे लागेल. अशी माहिती देखील सरकारकडून देण्यात आली आहे. एमएसआरडीसीच्या अखत्यारीत 50 टोलनाके असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यात 23 टोल नाके आहेत. या नाक्यांवर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Maharashtra Government: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सर्व वाहनांसाठी फास्ट टॅग अनिवार्य Read More »

Maharashtra Government: आर्थिक व सामाजिक उद्दिष्टे पूर्ण करणार, विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांच्याकडून प्रशासकीय कामकाजाचा आढावा

Maharashtra Government: जिल्हा विकास आराखड्याबाबत जिल्हा वार्षिक योजनेतील राखीव निधीचा विनियोग करताना विविध योजनांचे अभिसरण करून आर्थिक व सामाजिक उद्दिष्टे पूर्ण करण्यावर भर द्यावा आणि विकास आराखड्यात रोजगार निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांवर भर द्यावा, अशा सूचना नाशिक विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरिकर, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसामुद्रे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ.गेडाम यांनी जिल्हा विकास आराखड्याच्या नियोजनाबाबत आढावा घेतला. ते म्हणाले, जिल्ह्याच्या विकासाला चालना देणाऱ्या कामांचा प्राधान्याने विचार व्हावा. विविध योजनांच्या अभिसरणाद्वारे विकासाचे नियोजित उद्दिष्ट पूर्ण होईल आणि त्या भागातील नागरिकांना त्याचा लाभ मिळेल याचा विचार विकास आराखड्यात असावा. त्यासाठी प्राधान्याच्या विशिष्ट विकास प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करून त्यासाठी आवश्यक सुविधा उभाराव्यात. विविध शासकीय,अशासकीय संस्थांची मदत घेऊन कृषी आणि दुग्ध व्यवसाय आधारित क्लस्टरमधून निर्यात करण्याबाबत शक्यतांचा विचार व्हावा. अशा क्लस्टरच्या विकासासाठी अपेक्षित सुविधा उभारण्यावर भर द्यावा. एखाद्या क्षेत्राचा विकास करताना त्यासाठी आवश्यक अत्याधुनिक सुविधांचा विकास करण्याकडे अधिक लक्ष द्यावे. जिल्ह्यातील पर्यटन विकासाचा विचार करताना तेथील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर द्यावा. ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून बचत गटाच्या महिलांना टुरिस्ट गाईडचे प्रशिक्षण देण्यात यावे, असेही डॉ.गेडाम म्हणाले. डॉ.गेडाम यांनी यावेळी जिल्ह्यातील जलसंधारण कामांचा आढावा घेतला. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गाव जल परिपूर्ण करण्यासाठी पुढील 30 वर्षाचे नियोजन करा, त्यासाठी सूक्ष्म नियोजनावर भर द्यावा. गावाच्या पाण्याची गरज लक्षात घेण्यासोबत नदी किंवा नाला प्रवाहितही राहील याचाही विचार करावा, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सादरीकरणाद्वारे जिल्हा विकास आराखड्याबाबत माहिती दिली. जिल्ह्यातील विकासाचे सूक्ष्म नियोजन करण्यात येऊन प्राधान्याने गायसामुद्रे यांनी जलसंधारण योजनांचा आढावा सादर केला. यावेळी जिल्हा विकास आराखडा, जलयुक्त शिवार योजना , गाळमुक्त धारण गाळयुक्त शिवार, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, अमृत सरोवर अभियान आदी योजनांचा आढावा घेण्यात आला.

Maharashtra Government: आर्थिक व सामाजिक उद्दिष्टे पूर्ण करणार, विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांच्याकडून प्रशासकीय कामकाजाचा आढावा Read More »