Sakalai Lift Irrigation Scheme : साकळाई उपसा सिंचन योजनेला मंजुरी; मुख्यमंत्र्यांची घोषणा, हिवरे झरे परिसरात जल्लोष
Sakalai Lift Irrigation Scheme : अहिल्यानगर व श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेला अखेर राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृत घोषणा केली आहे. तब्बल हजार कोटींहून अधिक निधीच्या या योजनेमुळे दुष्काळी पट्ट्यातील हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या योजनेला मंजुरी मिळाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश आले असून त्यांनी शासन पातळीवर पाठपुरावा करून ही योजना मार्गी लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच मा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्र व राज्य पातळीवर सातत्याने पाठपुरावा करत प्रश्नाची गांभीर्याने मांडणी केली. स्थानिक कृती समितीने अनेक वर्षे सातत्याने संघर्ष करून, आंदोलने, बैठका व निवेदने देत हा विषय जिवंत ठेवला होता. अखेर शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याने कृती समिती व ग्रामस्थांच्या मेहनतीला यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर हिवरे झरे येथे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त जल्लोष साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर, गुलाल उधळून आनंद व्यक्त करण्यात आला. “साकळाई योजना मंजूर झालीच पाहिजे” अशी अनेक वर्षे लढा देणाऱ्या ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. या योजनेमुळे परिसरातील शेतीला शाश्वत पाणी उपलब्ध होऊन शेती उत्पादनात वाढ होणार असून शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. या वेळी कृती समितीचे अध्यक्ष ह.भ.प. बाबा महाराज झेंडे, नारायणराव रोडे, सोमनाथ घाडगे, सुरेश काटे, बबनराव वाळके, रोहिदास उदमले, तुकाराम काळे, आकाश लंके, विनोद सोनवणे, गणेश झेंडे, प्रमोद पवार, पांडुरंग झेंडे, नवनाथ आनंदकर, रामभाऊ वाळके, भाऊसाहेब चोबे, अक्षय खेंगट, भाऊसाहेब निमसे, रामदास सर झेंडे, चिखलीचे सरपंच भैय्या कदम, मा. श्री बापूसाहेब गाडेकर, माळ सरपंच राजेंद्र झेंडे, कोरेगावचे सरपंच बाबासाहेब विधाटे, राजाराम घुटे, सोन्याबापू वाणी, प्रतापराव नलगे तसेच पंचायत समितीचे माजी सभापती पुरुषोत्तम भैय्या लगड आदी मान्यवर उपस्थित होते. साकळाई उपसा सिंचन योजना प्रत्यक्षात आल्यानंतर परिसरातील पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात कमी होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली ही योजना आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर असल्याने नागरिकांमध्ये आशावाद निर्माण झाला आहे.









