DNA मराठी

latest news

Ahmednagar News: न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे कृषी विद्यापीठाची भरती प्रक्रीया पूर्ण करा:-ना. विखे पाटील

Ahmednagar News:  राहूरी येथील कृषी विद्यापीठासाठी संपादीत केलेल्या जमिनीमुळे बाधीत झालेल्या प्रकल्पग्रस्तांना राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठा दिलासा दिला आहे. अनेक वर्षापासून त्यांच्या भरतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबई मंत्रालय दालनात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासवेत विशेष बैठक बोलावत त्यांनी भरतीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनांचे पालन करून भरती प्रकिया ठराविक कालावधीत पुर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.  मंगळवारी राहुरी कृषी विद्यापीठासाठी संपादित केलेल्या जमिनीतील उर्वरित प्रकल्पग्रस्तांच्या भरती बाबत बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी  कृषी मंत्री श्री. धनंजय मुंडे, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. अनुप कुमार, कृषी परिषदेचे महासंचालक श्री. रावसाहेब भांगडे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  या बैठकीत राहुरी येथील प्रकल्पाच्या भरतीच्या बाबत सखोल चर्चा करून, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार नियमानुसार भरती प्रक्रिया तातडीने राबविण्यात यावी आणि प्रकल्पग्रस्तांना दिलासा देण्यात यावा अशा सुचना महसूल मंत्री विखे पाटील यांनी दिल्या. मदत व पुनर्वसन, कृषी आणि महसूल विभागाने तत्परतेने ठराविक कालावधीमध्ये भरती प्रक्रिया राबवून ही भरती पूर्ण करावी असे विखे पाटील म्हणाले.  प्रकल्पग्रस्तांना आपली सहानभुती असून ह्या प्रकरणी शासनाकडून कोणतीही दिरंगाई न करता, कमीत कमी वेळेत ही भरती पूर्ण करावी असे कृषी मंत्री श्री. धनंजय मुंडे यांनी सांगितले. यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला असल्याने प्रकल्पग्रस्तांनी समाधान व्यक्त केले.

Ahmednagar News: न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे कृषी विद्यापीठाची भरती प्रक्रीया पूर्ण करा:-ना. विखे पाटील Read More »

Ahmednagar News:  नगर, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील रस्त्यांना कोट्यावधींचा निधी मंजूर..

Ahmednagar News: केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी अंतर्गत पारनेर तालुक्यासाठी १७ कोटी व नगर तालुक्यासाठी २३ कोटी तसेच श्रीगोंदा तालुक्यासाठी ६० कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असलेले भारतीय जनता पार्टीचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी अंतर्गत पारनेर, श्रीगोंदा आणि नगर तालुक्याच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यावेळी खासदार सुजय विखे यांनी स्पष्ट केले की, हे यश माझ्यासह आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आहे. या सर्वांसमवेत केलेल्या पाठपुराव्यामुळे सदरील भरीव निधी मंजूर झाला असल्याचे मत सुजय विखेंनी मांडले. यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील रस्ते विकासासाठी आमदार बबनराव पाचपुते आणि माझ्या प्रयत्नांतून ६० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या निधीतून काष्टी – खरातवाडी – पेडगावर रस्ता प्रजिमा – ६४ (गौते वस्ती-पेडगाव) आणि चिंबळा – वांगदरी – काष्टी – शिपळकरवाडी कौठा प्रजिमा – ०३ ते अजनुज खरातवाडी रस्ता प्रजिमा – २३७ (वांगदरी-काष्टी) या रस्त्यांचे काम होणार आहे.  तसेच नगर तालुक्यातील रस्ते विकासासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले आणि माझ्या प्रयत्नांतून २३ कोटी रुपये मंजूर झाले असून या निधीपैकी निंबळक – चास – खंडाळा – वाळुंज – नारायणडोह – पिंपळगाव उज्जैनी – पोखर्डी रस्ता प्रजिमा – १ (कापूरवाडी-पोखर्डी) साठी १५ कोटी रुपये तर टाकळी काझी – भातोडी ते बीड रस्ता प्ररामा – १६ (टाकळी काझी -भातोडी -मदडगाव हद्द) करिता ०८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या रस्त्यांच्या कामांना देखील झळाळी मिळाली आहे.  यासोबतच पारनेर तालुक्यातील रस्ते विकासासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि माझ्या प्रयत्नांतून १७ कोटी रुपये मंजूर झाले असून या निधीतून रामा ६९ ते वडनेर हवेली – राळेगण सिद्धी रोड प्रजिमा – २१८ रस्ता (वडनेर हवेली ते गटेवाडी) करिता १० कोटी रुपये तर राहाता – लोहारे – मांडवे – पारनेर – श्रीगोंदा रस्ता रामा – ६७ (कुंभारवाडी -सोबळेवाडी, पारनेर, पानोली -राळेगण सिद्धी) साठी ०७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून या रस्त्यांचे काम देखील मार्गी लागणार आहे. अशी माहिती यावेळी खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली. या रस्त्यांना गती मिळाल्याने निश्चितच जिल्ह्याच्या विकासात भर पडणार असून जनतेच्या हितासाठी आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही अखंड कार्यरत राहू असे मत देखील यावेळी खासदार विखेंनी व्यक्त केले.

Ahmednagar News:  नगर, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील रस्त्यांना कोट्यावधींचा निधी मंजूर.. Read More »

Ahmednagar News: महिला उपासिका शिबिरासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहा :- आयु अरुण भोंगळे

Ahmednagar News: शेवगाव तालुक्यातील रावताळे कुरुडगाव ( भिमवाडी ) येथे सोमवार दि. १२ रोजी भारतीय बौद्ध महासभा अहमदनगर दक्षिण विभाग अंतर्गत तालुक्यातील श्रद्धावान उपासक, उपासिका, माजी श्रामनेर, बौद्धाचार्य यांच्या सहकार्याने महिला उपासिका शिबिर आयोजित करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रावताळे कुरुडगाव ग्राम शाखेचे अध्यक्ष सुधाकर निळ होते.  बैठकीमध्ये शिबिराच्या आयोजन संबंधी सविस्तर चर्चा झाली. भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अरुण भोंगळे यांनी शिबिरासंबंधी मार्गदर्शन केले. याप्रसंगी महासचिव बाळासाहेब गजभिव, बौद्धाचार्य तथा जिल्हा संघटक विजय हुसळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.  यावेळी बाळासाहेब नीळ, सिद्धार्थ सोनवणे, रवींद्र निळ, माजी श्रामनेर विनोद घाडगे, माजी श्रामनेर निवृत्ती नीळ, आजिनाथ निळ, रोहिदास निळ, प्रतीक नीळ, अलका निळ, आकांक्षा नीळ, वंदना नीळ इत्यादी श्रद्धावान उपासक-उपासिका या बैठकीसाठी उपस्थित होते.  तसेच येणाऱ्या दि. २८ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत शिबिराचे आयोजन करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. त्यासाठी परवानगी व केंद्रीय शिक्षिकेच्या मागणीचे पत्र जिल्हा शाखेकडे पाठविण्यात आले तसेच या शिबिराचा शेवगाव तालुक्यातील महिलांनी जास्तीत जास्त या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष तथा केंद्रीय शिक्षक अरुण भोंगळे यांनी केले आहे.

Ahmednagar News: महिला उपासिका शिबिरासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहा :- आयु अरुण भोंगळे Read More »

Sujay Vikhe News: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहे: खा. डॉ. सुजय विखे पाटील

Sujay Vikhe News: स्वयंरोजगारातून व आर्थिक दृष्टीकोनातून महिलांचे सक्षमीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी महिलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने काम करत असल्याचे खासदार सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले. खासदार विखे म्हणाले, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन विभागाच्या वतीने बचत गटातील महिलांना फूड प्रोसेसिंग व स्टॉल वाटप करण्यात आले आणि या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देत आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले. पालकमंत्र्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध करून दिला आहे. कनगर (ता.राहुरी) येथील आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या दरम्यान प्राथमिक स्वरूपात महिला बचत गटांना धनादेश, स्टॉल तसेच फूड प्रोसेसिंग साहित्याचे वितरण करण्यात करण्यात आले.  महिला व बालविकास विभाग आणि ग्रामविकास व जलसंधारण विभाग नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ व उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत प्रतिभा लोकसंचित साधन केंद्र व तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष राहुरी अंतर्गत आणि ग्रामीण स्वंयरोजगार निर्मिती अंतर्गत स्वंयरोजगार विक्रीकेंद्र, फूड प्रोसेसिंग युनिट, औजार बँक, गटातील महिलांना बँक कर्ज वितरण सोहळा खासदार डॉ. सुजयविखे पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते आज या ठिकाणी संपन्न झाला. दीड दोन वर्षांपूर्वी आलेल्या महायुती सरकारच्या माध्यमातून आपण प्रामाणिक आणि नैतिकतेने तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात कामाचा सपाटा सुरू केला आहे.  आजपर्यंत जिल्हा नियोजन विभागाच्या माध्यमातून 500 बचत गटांना स्वयंरोजगारासाठी विविध साहित्यांची उपलब्धता करून देण्यात आली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून महिलांना सक्षम करण्यासाठी अनेक उपक्रम आज जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत व सदरील उपक्रमांच्या अंतर्गत विविध बचत गटांच्या माध्यमातून प्रत्यक्षात कामे देखील चालू आहेत. यातून अनेक रोजगाराच्या संधी महिलांना उपलब्ध होत आहेत याचे विशेष समाधान वाटते असे मत सुजय विखेंनी यावेळी मांडले. या अगोदर अनेक पालकमंत्री झाले, पण नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे पहिले असे पालकमंत्री आहेत की ज्यांच्या प्रयत्नांनी डीपीडीसीच्या माध्यमातून पैशाचा वापर महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच त्यांना रोजगार मिळवण्यासाठी करण्यात आला. विशेष बाब म्हणजे सुमारे 500 गटातील महिलांना दहा लाख रुपयांचे साहित्य वाटप होत आहे. ही वाटचाल अशीच सुरू राहील आणि पुढील पाच वर्षात संधी भेटल्यास महिलांना अनेक रोजगार उपलब्ध करून देण्याची ग्वाही खासदार विखे यांनी दिली.  तसेच महिलांना कांदा ड्रायर उपलब्ध करून देणार व सडका कांदा घरपोच देऊन त्याचे प्रोसिजर करून तोच कांदा आपण परत घेऊ. अशा पद्धतीने प्रत्येक बचत गटातील महिलांना महिना दहा ते बारा हजार रुपये कमाई चालू होईल असे देखील मत त्यांनी मांडले. यासोबतच निळवंडेच्या पाण्यापासून गावांच्या रस्त्यापर्यंत दिलेल्या शब्द देखील आम्ही पूर्ण केला असल्याचे मत डॉ. सुजय विखे पाटील यांनी मांडले.

Sujay Vikhe News: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहे: खा. डॉ. सुजय विखे पाटील Read More »

Ahmednagar News: कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई, गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या 04 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील झेंडीगेट परिसरामध्ये कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई करत गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या 04 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून एकूण 20,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  कोतवाली पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना झेंडीगेट परिसरात गोवंशीय जनावरांची कत्तल चालु असुन कत्तलीकरीता काही गौवंशीय जनावरे आणल्याची माहीती मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून दराडे यांनी रात्रगस्त पेट्रोलिंगचे अधिकारी, अंमलदार यांना नमुद ठिकाणी पंचासह जावुन छापा टाकुन कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशावरून पोलिसांनी 02.15 च्या सुमारास छापा टाकुन कारवाई केली. पोलीसांनी पंचासमक्ष तीन मालवाहु गाड्या, दोन लोखंडी सत्तुर, 12 गौवंशीय जनावरे व 3 म्हैसवर्गीय जनावरे, अंदाजे 600 किलो गोवंशीय जनावराचे मांस असा एकुन 20,55,000 रु किं.चा मुद्देमाल जप्त करुन ताब्यात घेतला.  या प्रकरणात पोलिसांनी 1) अरबाज खलील शेख, वय 23 वर्षे, रा. कोठला, अहमदनगर, 2) फैजल अस्लम शेख, वय 20 वर्षे, रा. बेपारी मोहल्ला, झेंडीगेट, अहमदनगर, 3) सलीम शब्बीर कुरेशी, 4) फैजान अब्दुल कुरेशी, रा. झेंडीगेट, अहमदनगर यांचेविरुध्द पो.कॉ. सुरज कदम यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये भा.दं.वि.कलम 269, महा. प्राणी रक्षा अधि सन 1995 चे सुधारीत सन 2015 चे कलम 5 (अ), 5 (क ), 9, 9(अ), तसेच प्राण्यांना क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध करणेबाबत अधि. 1960 चे कलम 11, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 119 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचा तपास पोना/ए पी इनामदार हे करीत आहेत.

Ahmednagar News: कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई, गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या 04 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल Read More »

Ahmednagar News: पाण्यापासून कुणीही वंचित राहणार नाही, तयार होणार टंचाई नियोजनाचा आराखडा : विखे पाटील

Ahmednagar News:  अहमदनगर जिल्ह्यात पाण्यापासून कुणी वंचित राहता कामा नये तसेच टंचाई नियोजना संदर्भातील सर्वे कामे तातडीने पुर्ण करा, असे निर्देश जिह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.  जिल्हा टंचाई निवारण नियोजन संदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षेखाली शासकीय निवासस्थान मुंबई येथे आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.  अहमदनगर जिल्ह्यातील टंचाई नियोजन बैठक दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित  करण्यात आली होती. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, यांच्यासह दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे माजी मंत्री आमदार श्री.बबनराव पाचपुते, आमदार प्रा.राम शिंदे आ.श्रीमती मोनिकताई राजळे, आमदार श्री. लहू कानडे, आमदार श्री. प्राजक्त तनपुरे अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  पालकमंत्र्यांनी येणाऱ्या टंचाई काळात जिल्ह्यातील पाणीसाठा, जनावरांचा चारा, विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याचा सविस्तर आढावा घेत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सुचना आणि तक्रारी ऐकुन घेत त्यांचे निसरन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा इतर अधिकाऱ्यांना दिले. तसेच तातडीने टंचाई निवारण आराखडा करण्यासाठी सांगितले.  पालकमंत्र्यांनी सांगितले की, टंचाई काळात पाण्याचे नियोजन नीट करण्यात यावे तसेच पाण्याचा अपव्यय  टाळावा, शहर तसेच ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना आखाव्यात, ज्या भागात पाण्याची कमतरता जाणवत आहे. त्या ठिकाणी तातडीने टॅंकरने पाणी पुरवठा वाढवावा, तसेच ग्रामीण भागात जिथे टॅंकरने पाणी पुरवठा करणे शक्य नाही त्या ठिकाणी बैलगाड्यांच्या सहाय्याने  पाणी पोहोचवण्याची व्यवस्था करावी.  प्रभावीत गावात पाण्यासाठी पाणी संचय टाक्या उभारण्यात याव्यात. नवीन पाणी पुरवठा योजना राबविताना कार्यरत असलेला पुरवठा प्रभावित होणार नाही याची काळजी घ्यावी. जिल्ह्यात पाण्यापासून कुणी वंचित राहू नये, त्यासाठी शहरी तथा ग्रामीण भागातील पाणी साठ्याची पाहणी करून त्याचे येणाऱ्या उन्हाळ्यासाठी नियोजन करावे असे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.  टंचाई निवारण संदर्भात आवश्यक असेलल्या सर्व शासकीय परवानग्या, निविदा प्रक्रिया तातडीने पुर्ण करून टंचाई निवारण आराखडा पुर्ण करावा त्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी शासनाकडे मागणी करावी. या सर्व प्रक्रिया तातडीने पार पाडून नागिराकंना दिलासा द्यावा असे पालकमंत्री म्हणाले.  या बैठकीत जिल्ह्यात जनावरांसाठी चारा आणि पाणी कमी पडणार नाही यांनी याची सुद्धा काळजी प्रशासनाने घ्यावी. त्याच बरोबर सततचा पाऊस, गारपिठ आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा सुद्धा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला आणि शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. बैठकीत उपस्थित असलेले खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी भोसपुरी 16 गावांच्या पाणी पुरवठा योजना पार्थर्डी, शेवगाव येथील पाणी पुरवठ्याच्या बाबत प्रश्न उपस्थित करून तातडीने या गावातील पाण्याची समस्या मार्गी लावण्याची सूचना बैठकीत केली.

Ahmednagar News: पाण्यापासून कुणीही वंचित राहणार नाही, तयार होणार टंचाई नियोजनाचा आराखडा : विखे पाटील Read More »

Sujay Vikhe News: गाव चलो अभियानांतर्गत खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी वाळकीत केला मुक्काम!

Sujay Vikhe News : गाव चलो अभियानांतर्गत अहमदनगर जिल्ह्याचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर तालुक्यातील वाळकी गावात मुक्काम करून गावातील  नागरिकांशी मनमोकळेपणाने संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले.  आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 उमेदवारांना विजयी करण्याचा संकल्प केला असून त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भाजपने ‘गाव चलो अभियान’ हाती घेतले आहे.  या अभियानाच्या माध्यमातून खासदार सुजय विखे यांनी दिवसभरात गावातील शैक्षणिक संस्थांना भेट देऊन येथील विद्यार्थ्यांशी एका शिक्षकाच्या भूमिकेतून चर्चा केली आणि योग्य ते मार्गदर्शन केले. त्याचबरोबर धार्मिक स्थळांना देखील भेटी देऊन मनोभावे दर्शन घेतले.  तसेच महिला बचत गट, शेतकरी वर्ग आणि युवा वर्गाशी मनमोकळेपणाने संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. तसेच त्यांच्या या भेट दौऱ्याच्या अनुषंगाने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत नागरिकांचा उत्साह द्विगुणित केला.  यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या जास्तीत जास्त योजनांचा लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नागरिकांना केले. या विविध लोकोपयोगी योजनांपासून जे अद्यापही वंचित असतील अशा सर्व लोकांनी या योजनांचा लाभ घ्यावा या अनुषंगाने मार्गदर्शन करून विविध योजनांची माहिती डॉ. सुजय विखे पाटील यांनी ग्रामस्थांना दिली. लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या या गाव चलो अभियानाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारने राबवलेल्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न व योग्य मार्गदर्शन खा. विखे पाटील यांनी यावेळी केले. तसेच विविध लोकोपयोगी योजनांपासून जे अद्यापही वंचित असतील अशा सर्व लोकांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.  तसेच घरोघरी जाऊन केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या योजनेच्या पुस्तिका लोकांना वाटप केल्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात झालेल्या कामांबाबत माहिती दिली आणि नागरिकांच्या अडी अडचणी देखील जाणून घेतल्या.  दरम्यान या दिवसभराच्या कार्यक्रमात त्यांनी धर्मनाथ शैक्षणिक संस्थेत भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांची संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची योग्य ती उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. प्रश्नोत्तराच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील पाच वर्षाच्या कालखंडात व कोविडच्या काळात जे काही प्रशंसनीय काम करून या संकटकाळात मदत केली ती अविस्मरणीय आहे. इतर देशांवर अवलंबून न राहता स्वतःच्या देशात लस तयार करण्याचा एक चांगला निर्णय नरेंद्र मोदी यांनी घेतला आणि त्याचा सर्व नागरिकांना फायदा झाला अशी माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच राजकारणावरती विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले असता यावर उत्तर देताना खासदार विखे पाटील यांनी सांगितले की, शिक्षणाचा फायदा मला एक सुशिक्षित राजकारणी बनण्यासाठी झाला. जो व्यक्ती योग्य शिक्षण घेतो आणि तो व्यक्ती जर राजकारणात सक्रिय असला तर तो चांगल्या पद्धतीने लोकांची कामे करतो असे स्पष्ट करून विकासाच्या निकषावर लोकप्रतिनिधींना निवडले पाहिजे. आपल्यासारखे विद्यार्थी व सुशिक्षित लोक या समाजामध्ये बदल घडवू शकतात व घडवतात.  कारण आपल्या भागाचा आर्थिकदृष्ट्या विकास करण्यास लोकप्रतिनिधी सक्षम असला पाहिजे तरच आपल्या भागाचा सर्वांगीण विकास होत असतो. अशा पद्धतीने त्यांनी विद्यार्थ्यांशी सखोल चर्चा करून त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यासोबतच महिला बचत गटांना सुजय विखे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात चेक वाटप केले. महिलांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून त्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम कसे बनविता येईल यासाठी माझे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.   माध्यमांशी बोलताना खा. विखे म्हणाले की, मधल्या काळात हे भावी अमुक-तमुकचे बॅनर्स लागण्याचे फॅड आलेले आहे. यात भावी सरपंच, भावी जिल्हा परिषद सदस्य, भावी खासदार, भावी आमदार, भावी मंत्री, मुख्यमंत्री असे बॅनर्स लागतात. मात्र ज्या ज्या लोकांच्या भावी म्हणून जाहिराती लागल्या आहेत, ते त्या पदापर्यंत पोहोचू शकले नाही असा माझा राजकीय अनुभव आहे. मात्र तरीही अशा भावी लोकांना माझ्या शुभेच्छा असे मार्मिक उत्तर दिले. काँग्रेसच्या थोरातांबद्दलच्या “भावी मुख्यमंत्री” बॅनर्सवर प्रश्न विचारला असला तरी विखे यांनी भावी आमदार, खासदार असाही उल्लेख करत विरोधकांसोबतच पक्षांतर्गत व महायुतीतील इच्छुकांना टोला लगावल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघात अनेकजण भाजपकडून इच्छुक असल्याबद्दल विचारले असता खा.विखे यांनी 2024 ला पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच बनवायचे आहे. त्यामुळे “गाव चलो अभियानातून” केंद्र आणि राज्य सरकारने केलेली विविध विकासकामे, योजना आदी गोष्टी जनतेपर्यंत पोहचण्याचे काम सुरू आहे. युवक, महिला, शेतकरी, उद्योजक आदींचे प्रश्नही यानिमित्ताने समजावून घेत त्याच्या सोडवणुकीवर प्रयत्न केले जात आहेत. या अभियानात पॉम्प्लेटवर केवळ नरेंद्र मोदी यांचाच फोटो आहे. मी खासदार असलो तरी एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. लोकसभेसाठी उमेदवार कोण त्याच्याशी आम्हाला काही घेणं नाही असं स्पष्टपणे खासदार सुजय विखे म्हणाले. राज्यात त्याचबरोबर नगर जिल्ह्यातही गेल्या काही दिवसात ज्याही काही गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडलेल्या आहेत त्या जर पाहिल्या तर त्यामध्ये जरी राजकीय लोकं किंवा त्यांचे कार्यकर्ते दिसून येत असले तरी कुठेतरी हे प्रकार त्यांच्यातील असलेल्या वैयक्तिक भांडणातून झालेल्या असल्याचे दिसून येत आहे. व्यक्तिगत वाद, आपसापसात असलेल्या द्वेष या भावनेतून घडलेले हे सर्व प्रकार आहेत. मात्र असे असले तरीही सरकार आणि पोलीस अशा घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी निश्चितच कार्यवाही करतील.  ज्या घटना घडत आहेत त्या आवरणं आणि त्यावर वेळेवर निर्बंध कसे आणता येतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पोलीस आपल्या पद्धतीने काम करत आहेत. जे काही यंत्रणा आहेत त्यात सुधारणा करण्याची गरज असेल त्यानुसार ती होईल असा विश्वास खा. विखे यांनी व्यक्त केला. दरम्यान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सदरील अभियान हे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच भाजपचे प्रमुख प्रतिनिधी, कार्यकर्ते, जिल्हा अधिकारी, तालुका पदाधिकारी, भाजपा युवा मोर्चा, महिला आघाडी, सर्व सुपरवायझर्स, बूथ प्रमुख यांच्या सहकार्याने व्यवस्थितरीत्या संपन्न झाले असल्याचे मत मांडले.

Sujay Vikhe News: गाव चलो अभियानांतर्गत खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी वाळकीत केला मुक्काम! Read More »

Ahmednagar News: व्यापारी धिरज जोशी यांच्यावरील हल्ला करणाऱ्या आरोपीना अटक करा – राष्ट्रवादी काँग्रेस 

Ahmednagar News:  अहमदनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांवर गोळीबार, प्राणघातक हल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  अहमदनगर शहरामध्ये गावठी कट्टे, तलवारी अशा प्रकारचे शस्त्रे राजरोसपणे कुठुन उपलब्ध केली जात आहेत. याचा तपास करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगर जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे निवेदनातून केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, आज पर्यंत पुणे,मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये घडणाऱ्या गोळीबार, प्राणघातक हल्ले या सारख्या घटनांचे लोन नगर सारख्या शहरापर्यंत पोहचल्याचे दिसुन येत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असुन नगर सारख्या शहरामध्ये सर्व सामान्यांना आजपर्यंत अशा प्रकारच्या घटना केवळ मोठया महानगरांमध्ये घडल्याचे माहित असे परंतु अशा घटना नगर शहरात मोठ्या प्रमाणात सातत्याने घडू लागल्या आहे. हा फार मोठा चिंतेचा विषय असुन नगरमध्ये गावठी कट्टे, तलवारी अशा प्रकारचे शस्त्रे राजरोसपणे कुठुन उपलब्ध केली जात आहेत. याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे गंभीर गुन्ह्यात बेकायदेशीर शस्त्रे सापडून देखील गुन्हेगार दोन चार दिवसात जामीनावर बाहेर असतात हे पोलीस प्रशासनाचे अपयश असुन गुन्हेगारांवर गंभीर स्वरुपाची कलमे लावुन त्यांच्याविरुध्द योग्य पध्दतीने गुन्हा दाखल झाल्यास अशा प्रकारचे जामीन होणार नाहीत.  गुन्हेगारांना कायदयाचा धाक राहील अशा उपाययोजना पोलसांनी कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केली. नगर शहरातील व्यापारी धिरज जोशी यांच्यावरील हल्ला करणाऱ्या आरोपीना तातडीने अटक करुन कठोर कारवाई करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, प्रा. माणिकराव विधाते, कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष वैभव ढाकणे, युवकचे अध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, युवती अध्यक्ष अंजली आव्हाड, जॉय लोखंडे, सुमित कुलकर्णी, ऋषिकेश ताठे, संजय सपकाळ आदी उपस्थित होते.

Ahmednagar News: व्यापारी धिरज जोशी यांच्यावरील हल्ला करणाऱ्या आरोपीना अटक करा – राष्ट्रवादी काँग्रेस  Read More »

Weather Update: राज्यात हवामान पुन्हा खराब, थंडीही वाढली! पुढील 24 तासात ‘या’ भागात मुसळधार पाऊस

Weather Update : पुन्हा एकदा राज्यात थंडीमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात बदल झाल्याने काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे तर काही भागात थंडीमध्ये वाढ पाहायला मिळत आहे.   विदर्भ आणि मराठवाड्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाने झोडपले आहे. विशेषत: विदर्भात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्यानंतर आज मुंबई, पुण्यासह राज्यभरात थंडी वाढली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने सोमवारपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध भागात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.  IMD ने आज विदर्भातील बहुतांश भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या काळात परिसरात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह गारपीट व पाऊस पडण्याची शक्यता आहे.  हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भात 51 ते 75 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचा अधिक परिणाम पूर्व विदर्भावर होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह गारपीट झाल्याचे वृत्त आहे. यावेळी ढगांचा गडगडाटही ऐकू आला. नागपूर जिल्ह्याच्या पूर्व भागापासून चंद्रपूर आणि वर्धापर्यंत रात्रीच्या वेळी जोरदार गडगडाट झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील नागपूर, यवतमाळ, वर्धा आणि अमरावतीमध्ये गारपिटीसह पावसामुळे कापसासह अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. वर्धा जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे कापूस, गहू, हरभरा, कबुतराची पिके नष्ट झाली आहेत. महसूल अधिकारी लवकरच पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतील.

Weather Update: राज्यात हवामान पुन्हा खराब, थंडीही वाढली! पुढील 24 तासात ‘या’ भागात मुसळधार पाऊस Read More »

Pune News  :  पुण्यातील कंपनीत भीषण स्फोट, 2 ठार, 6 जखमी, परिसरात खळबळ

Pune News :  पुण्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. आळंदी-मरकल रोडवरील सोलू गावात एका खासगी कंपनीत भीषण स्फोट झाला.  या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, कंपनी घरे आणि दुकाने असलेल्या निवासी भागाजवळ आहे. त्यामुळे कंपनीत भीषण स्फोट झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली. विजेच्या ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र नंतर तपासात समोर आले की, ट्रान्सफॉर्मरचा प्रथम स्फोट झाला नसून, बंद कंपनीत ठेवलेल्या केमिकलमुळे आग पसरली. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील सोलू गावात असलेल्या स्पेसिफिक अलॉयज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळाली.  माहिती मिळताच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका आणि आळंदी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुरुवातीला बंद पडलेल्या मेटल युनिटजवळील इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन आग आवारात पसरली असल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. हा पॉवर ट्रान्सफॉर्मर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड (MSEDCL) चा आहे. मात्र ट्रान्सफॉर्मरमध्ये स्फोट झाला नसल्याचे पोलिस व महावितरणने स्पष्ट केले. कंपनीच्या आवारात स्फोट झाल्यामुळे आग ट्रान्सफॉर्मरसह इतर ठिकाणी पसरल्याचे तपासात समोर आले आहे. या अपघातात आठ जण भाजले, त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. या अपघातात अनेक जनावरे जखमीही झाली आहेत. जखमींना उपचारासाठी पुणे शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोट कशामुळे झाला आणि कोणत्या चुका झाल्या याचा तपास स्थानिक पोलीस करत आहेत.

Pune News  :  पुण्यातील कंपनीत भीषण स्फोट, 2 ठार, 6 जखमी, परिसरात खळबळ Read More »