DNA मराठी

latest news

election

Nevasa Election : ‘ज्ञानेश्वर’च्या निवडणुकीसाठी 103 उमेदवारी अर्ज दाखल; आज शेवटचा दिवस

Nevasa Election : नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सातव्या दिवशी सोमवारी (ता. १) ७७ उमेदवारांचे ८१ अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी देविदास घोडेचोर यांनी दिली. २९ मे अखेर एकूण २२ अर्ज दाखल झाले होते. काल अखेर एकूण दाखल उमेदवारी अर्जाची संख्या १०३ झाली आहे. गटनिहाय दाखल अर्ज शेवगाव गट – राम आसराजी लांडे, सिद्धार्थ शिवाजीराव दसपुते, मच्छिंद्र विठ्ठल कुटे, राजेंद्र रावसाहेब ढमढेरे, लक्ष्मण गंगाराम टाकळकर, धनंजय आबासाहेब देशमुख, संतोष शंकरराव पावसे, पंडित रामभाऊ भोसले. शहरटाकळी गट – नरेंद्र मारुतराव घुले (२ अर्ज), कुकाणा गट- गोरक्षनाथ सुखदेव नवले, उध्दव श्रीपती नवले, दत्तात्रय त्रिंबक काळे, बाबासाहेब कुंडलिक गव्हाणे, अशोक जगन्नाथ मंडलिक, सुमनबाई दत्तात्रय काळे, जगन्नाथ रामकृष्ण साबळे, चंदू लक्ष्मण फुलारी, विठ्ठल पांडुरंग अभंग, अमोल विठ्ठल अभंग, भारतराव रामकृष्ण साबळे. अर्जुन बाजीराव नवले (२ अर्ज), विजय ज्ञानदेव भागवत, दादासाहेब नानासाहेब वाबळे, संदीप काकासाहेब देशमुख. नेवासा गट – विक्रम साहेबराव चौधरी, जगदीश बाळासाहेब चौधरी, बाळासाहेब सखाराम साळुंके, अरुण बबनराव देशमुख, दादासाहेब गोरक्षनाथ गंडाळ. वडाळा बहिरोबा गट – भाऊसाहेब सोन्याबापू कांगुणे, अशोक कारभारी काळे, जनार्दन रामभाऊ कदम, प्रसाद जनार्दन पटारे, कोंडीराम मारुती कोलते, झुंबर अंबादास शेळके (२ अर्ज), कारभारी मोहन चेडे, कचरदास धनराज गुंदेचा, अभिषेक जनार्दन पटारे, शिवाजी राजधर कोलते. ढोरजळगाव गट- मच्छिंद्र सूर्यभान म्हस्के, भानुदास नारायण काळे, सदाशिव आबाजी आरगडे, निवृत्ती चिमाजी दातीर, देविदास आसाराम पाटेकर, मंगलाबाई देविदास पाटेकर, रेवणनाथ जगन्नाथ काळे. उत्पादक/बिगर उत्पादक सहकारी संस्था मतदारसंघ – गणेश भानुदास चावरे. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ – भास्कर उत्तम शिंदे, मच्छिंद्र विठ्ठल शिंदे, शंकर संभाजी भारस्कर. महिला राखीव – विजया कल्याणराव म्हस्के, सुमनबाई दत्तात्रय काळे, इंदूबाई बलभीम गव्हाणे, मंगलाबाई देविदास पाटेकर. इतर मागासवर्ग प्रतिनिधी – विजया कल्याणराव म्हस्के, जनार्धन राधाकिसन भागवत, दत्तात्रय त्रिंबक काळे, सिध्दार्थ शिवाजीराव दसपुते, अशोक जगन्नाथ मंडलिक, चंदू लक्ष्मण फुलारी, अमोल विठ्ठल अभंग, विठ्ठल पांडुरंग अभंग, अरुण अशोक गरड, अरुण बबन देशमुख, प्रसाद जनार्धन पटारे, कुसुम दत्तात्रय काळे, अर्जुन बाजीराव नवले, अर्जुन बाजीराव नवले, विजय ज्ञानदेव भागवत, अभिषेक जनार्धन पटारे. विमुक्त जाती – भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी मतदार संघ – रामनाथ गहिनीनाथ गोल्हार, किसन बाबुराव यादव, तुकाराम विनायक मिसाळ, सदाशिव आबाजी आरगडे.

Nevasa Election : ‘ज्ञानेश्वर’च्या निवडणुकीसाठी 103 उमेदवारी अर्ज दाखल; आज शेवटचा दिवस Read More »

Vijay Wadettiwar: डिझेलचा तुडवडा आणि खतांच्या कमतरतेमुळे शेतकरी उध्वस्त

Vijay Wadettiwar: देशात गेल्या दहा वर्षांत अनेक पेपर फुटले त्यातही नीट सारख्या परीक्षांचे पेपर फुटत असतील आणि सिस्टममधील लोकच त्यात सामील असतील, तर याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना थोडी जरी लाज आणि नैतिकता असती, तर त्यांनी आतापर्यंत आपल्या पदाचा राजीनामा दिला असता अशी घणाघाती टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही हीच मागणी केली असून, या संवेदनशील पदावर बसलेल्या मंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची कोणतीही काळजी नसल्याचे यातून सिद्ध होत असल्याचे ते म्हणाले. या प्रकरणात मोटेगावकर किंवा अमित देशमुख यांच्या जुन्या विधानाचा आधार घेऊन सरकार स्वतःचे दोष लपवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका ही वडेट्टीवार यांनी केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून सरकार त्यांना जाणीवपूर्वक उद्ध्वस्त करत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी दोनदा कर्जमाफीची घोषणा केली, मात्र अद्याप कोणताही स्पष्ट शासन निर्णय निघालेला नाही. राज्यात डिझेल-पेट्रोलचा निर्माण झालेला तुटवडा आणि आगामी काळात केवळ 25% खते उपलब्ध होतील, असे केंद्रीय मंत्र्यांचे सांगणे चिंताजनक आहे. डिझेलअभावी शेतीची मशागत आणि नांगरणी कशी होणार? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. सिस्टमविरोधात संताप व्यक्त करणाऱ्या तरुणांचे X (ट्विटर) हँडल्स बंद करून सरकार आपली भीती लपवत आहे. तरुणांना हिंदू-मुस्लिम किंवा भारत-पाकिस्तानच्या मुद्द्यांपेक्षा रोजगार हवा आहे.पण सर्वोच्च पदावर बसलेली व्यक्ती जेव्हा तरुणांना कॉकरोच म्हणते, तेव्हा तरुणांच्या मनातील राग उफाळून येणे स्वाभाविक आहे. सरकारचा एकूण कारभार हा पूर्णपणे तरुण विरोधी असून तो राग आता व्यक्त होत आहे अस वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar: डिझेलचा तुडवडा आणि खतांच्या कमतरतेमुळे शेतकरी उध्वस्त Read More »

iea report

IEA Report: भारताकडे किती दिवसांचा तेलाचा साठा शिल्लक? IEA च्या अहवालामुळे चिंता वाढली

IEA Report: वाढता जागतिक तणाव आणि पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संकटाचा परिणाम देशात आता थेट सामान्य नागरिकांच्या खिशावर जाणवू लागला आहे. तेलाच्या साठ्यांबाबत एक गंभीर इशारा देताना, ‘आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने’ (IEA) असे नमूद केले आहे की, जगातील व्यावसायिक तेलाचे साठे वेगाने कमी होत आहेत. परिस्थिती अशा टप्प्यावर पोहोचली आहे की, अनेक देशांकडे आता केवळ काही आठवडे पुरेल इतकाच तेलाचा साठा शिल्लक आहे. दरम्यान, भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असून, या प्रवृत्तीमुळे जनतेची चिंता अधिकच वाढली आहे. पॅरिसमध्ये आयोजित G-7 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीदरम्यान बोलताना, आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेचे प्रमुख फातिह बिरोल यांनी सांगितले की, ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ (Strait of Hormuz) भागात वाढलेला तणाव आणि युद्धसदृश परिस्थितीचा जागतिक तेल पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला आहे. बिरोल यांच्या मते, परिस्थिती स्थिर करण्याच्या उद्देशाने दररोज आपत्कालीन साठ्यांमधून (emergency reserves) सुमारे 25 लाख बॅरल्स तेल बाजारात सोडले जात आहे. त्यांनी स्पष्टपणे इशारा दिला की हे साठे अमर्याद नाहीत जर हे संकट दीर्घकाळापर्यंत कायम राहिले, तर जगाला गंभीर ऊर्जा संकटाचा सामना करावा लागू शकतो. दोन महिन्यांत तेलाचे साठे विक्रमी नीचांकी पातळीवर संस्थेच्या अहवालानुसार, मार्च आणि एप्रिल या महिन्यांमध्ये जागतिक तेलाच्या साठ्यांमध्ये मोठी घट नोंदवली गेली. अवघ्या दोन महिन्यांतच तेलाचे साठे सुमारे 24 कोटी 60 लाख बॅरल्सने कमी झाले आहेत. तज्ञांचे असे मानणे आहे की, पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या अस्थिरतेमुळे, नजीकच्या भविष्यात तेलाची मागणी आणि पुरवठा यांमधील तफावत आणखी वाढू शकते. परिस्थितीमध्ये लवकर सुधारणा न झाल्यास, तेलाच्या किमतींमध्ये आणखी वाढ होऊ शकते, असा इशारा IEA ने यापूर्वीच दिला होता. भारताकडे तेलाचा किती साठा उपलब्ध? तेलाच्या संकटाबाबत वाढत्या चिंतांच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी नुकतेच असे आश्वासन दिले की, भारताकडे सध्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. सरकारच्या माहितीनुसार, देशाकडे कच्च्या तेलाचा (crude oil) सुरक्षित साठा उपलब्ध असून तो सुमारे 60 दिवस पुरेल इतका आहे. याव्यतिरिक्त, सुमारे 60 दिवस पुरेल इतका LNG (द्रवरूप नैसर्गिक वायू) आणि 45 दिवस पुरेल इतका LPG (द्रवरूप पेट्रोलियम वायू) यांचा साठाही उपलब्ध आहे. सरकारने हे देखील मान्य केले आहे की, जर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने उच्च पातळीवर राहिल्या, तर त्याचा सरकारी तेल कंपन्यांवर प्रचंड आर्थिक दबाव येऊ शकतो. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ मंगळवारी, पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या दरात प्रति लिटर 90 पैशांची वाढ करण्यात आली. एकाच आठवड्यात तेल कंपन्यांनी इंधनाचे दर वाढवण्याची ही दुसरी वेळ आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये, पेट्रोलचा दर वाढून तो अंदाजे ₹98.64 प्रति लिटर झाला आहे तर डिझेलही महाग होऊन ₹91.58 प्रति लिटरवर पोहोचले आहे. मुंबई, कोलकाता आणि चेन्नई यांसारख्या प्रमुख शहरांमध्येही इंधनाच्या दरात वाढ नोंदवली गेली आहे. कोलकातामध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली, जिथे पेट्रोलचे दर ₹110 प्रति लिटरच्या जवळ पोहोचले आहेत आणि डिझेलचा दर ₹96.07 प्रति लिटर झाला आहे. दरम्यान, मुंबईमध्ये पेट्रोलचा दर आता ₹107.59 प्रति लिटर आणि डिझेलचा दर ₹94.08 प्रति लिटर झाला आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर ₹104.49 प्रति लिटरवर पोहोचला आहे, तर डिझेलचा दर ₹96.11 प्रति लिटर इतका आहे.

IEA Report: भारताकडे किती दिवसांचा तेलाचा साठा शिल्लक? IEA च्या अहवालामुळे चिंता वाढली Read More »

Badlapur Case : बदलापूर प्रकरणातील पीडित ‘निर्भया’ भगिनींच्या 10 वी पर्यंतच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च आता शासनामार्फत

Badlapur Case : बदलापूर (जिल्हा ठाणे) येथील दुर्दैवी घटनेतील दोन्ही अल्पवयीन पीडित मुलींना (निर्भया क्र. १ व निर्भया क्र. २) सामाजिक-शैक्षणिक आधार देण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या दोन्ही मुलींच्या इयत्ता १० वी पर्यंतच्या शैक्षणिक प्रवेश शुल्काचा संपूर्ण खर्च ‘एक वेळची विशेष बाब’ म्हणून पूर्णपणे शासनामार्फत अदा करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या विशेष पुढाकारामुळे हा निर्णय तातडीने मार्गी लागला असून, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच पीडित कुटुंबांना हा मोठा दिलासा मिळाला आहे.तसेच यापुढे अशाच घटनांच्या बाबतीत शासनामार्फत कायमस्वरूपी मदतीबाबत देखील शासन निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचारार्थ आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १४ मे २०२६ रोजी या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केला आहे. माहे ऑगस्ट २०२४ मध्ये बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या या अत्यंत अनुचित घटनेनंतर, पीडित मुलींच्या इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या शैक्षणिक प्रवेशाचा खर्च शासनस्तरावरून करण्यात येणार आहे. यानुसार निर्भया क्र. १ चे इयत्ता १ ली ते इयत्ता १० वी पर्यंतचे संपूर्ण प्रवेश शुल्क शासन भरणार आहे. तसेचनिर्भया क्र. २ चे प्रलंबित असलेले सिनिअर के.जी. चे शुल्क आणि इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतचे सर्व प्रवेश शुल्क शासनामार्फत अदा केले जाणार आहे. हा संपूर्ण खर्च ‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९’ (RTE) अंतर्गत थेट संबंधित शाळांना त्या-त्या शैक्षणिक वर्षामध्ये वर्ग करण्यात येणार आहे. या निर्णयाबाबत बोलताना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले, “बदलापूरची घटना ही अत्यंत दुर्दैवी आणि संपूर्ण समाजाला वेदना देणारी होती. त्या निष्पाप मुलींना केवळ कायदेशीर न्याय मिळवून देणे एवढेच आमचे कर्तव्य नाही, तर त्यांचे भविष्य सुरक्षित करणे ही देखील आमची सामाजिक जबाबदारी आहे. त्यांच्या पालकांवर शिक्षणाचा कोणताही आर्थिक भार पडू नये, यासाठी आम्ही तातडीने हा शासन निर्णय निर्गमित केला आहे. या दोन्ही लेकींनी कोणतीही चिंता न करता आपले शिक्षण पूर्ण करावे, शासन त्यांच्या पाठीशी एका पालकाच्या भूमिकेतून खंबीरपणे उभे आहे.” या प्रक्रियेत पीडित कुटुंबाला कोणत्याही प्रशासकीय त्रासाला सामोरे जावे लागू नये, यासाठी निधी वितरणाची पद्धत अत्यंत सुटसुटीत ठेवली गेली आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे संबंधित प्राथमिक शिक्षणाधिकारी या शुल्काबाबतचा प्रस्ताव शिक्षण संचालक (प्राथमिक), पुणे यांच्याकडे सादर करतील. शिक्षण संचालकांकडून मंजुरी मिळताच हे शुल्क थेट संबंधित शाळांना अदा करण्याची कार्यवाही जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत केली जाईल. राज्य शासनाने घेतलेल्या या संवेदनशील निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, यामुळे पीडित मुलींच्या सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्यासाठी शासनाच्या वतीने एक भक्कम पाया रचला गेला आहे.

Badlapur Case : बदलापूर प्रकरणातील पीडित ‘निर्भया’ भगिनींच्या 10 वी पर्यंतच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च आता शासनामार्फत Read More »

pravin tarde

Pravin Tarde : नसरापूर दुर्घटनेवर प्रवीण तरडे संतप्त; “अशा नराधमांना चेचणारा सिनेमा बनवणार”

Pravin Tarde : नसरापूर दुर्घटनेवर दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची संतप्त प्रतिक्रिया दिली असून येणाऱ्या अशा नराधमांना चेचणारा सिनेमा बनवणार अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना प्रवीण तरडे म्हणाले की, येणाऱ्या काळात अशा नराधमांना चेचण्यासाठी सिनेमा काढणार. मी एक फिल्ममेकर आहे. याबद्दल मी माझी उद्विग्न प्रतिक्रिया दिली होती. त्यावरून मोठा गदारोळ उठला. मी शेवटी माणूसच आहे. महाराष्ट्रातील मुलींच्या वडिलांना विचारा, ती बातमी पाहिल्यानंतर काय झाले असेल. येणाऱ्या काळात मी ‘देऊळ बंद’ या सिनेमाचे 11 भाग करणार आहे. त्यामुळे ‘देऊळ बंद’च्या पुढील एखाद्या भागात अशा नराधमांना चेचण्यासाठी स्वतः स्वामींनाच यावे लागेल. माझ्या सिनेमात कायदा-बियदा असं काही नसेल. कारण जेव्हा स्वामी शिक्षा द्यायला उतरतात, तेव्हा त्यांची शिक्षा भयानक असते. स्वामींनी तो प्रकार पाहिला असेल. त्यामुळे त्या नराधमांना असा मृत्यू येईल की पुन्हा कोणी असे कृत्य करण्याची हिंमत करणार नाही. जे सध्या चाललंय, ते अतिशय भयावह आहे. यानिमित्ताने मुलींच्या आई-वडिलांना आशेचा किरण देण्यासाठी असा चित्रपट बनवेन, ज्यात अशा नराधमांना असे मृत्यू दाखवले जातील की ते पाहून कोणीही असे कृत्य करण्याची हिंमत करणार नाही. ज्याप्रकारे ‘मुळशी पॅटर्न’नंतर शेतकऱ्यांच्या जमिनी धाकदपटशाहीने घेणं बंद झालं, त्याचप्रमाणे ‘मुळशी पॅटर्न’ने शेतकऱ्यांना खडबडून जाग केलं. आता अशा नराधमांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. या विषयाला वाचा फोडण्याचा मी प्रयत्न करेन. ‘देऊळ बंद 2’च्या टीझर प्रदर्शन सोहळ्यात, वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर, अक्कलकोट येथे प्रवीण तरडे यांनी ही भावना व्यक्त केली.

Pravin Tarde : नसरापूर दुर्घटनेवर प्रवीण तरडे संतप्त; “अशा नराधमांना चेचणारा सिनेमा बनवणार” Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke: मोठी बातमी! खासदार लंकेची तब्येत बिघडली; उपचारासाठी पुण्याला रवाना

Nilesh Lanke: अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांची तब्येत अचानक बिघडल्याची माहिती समोर येत असून त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. खासदार निलेश लंके यांची गेल्या दोन-चार दिवसांपासून प्रकृती ही अस्वस्थ होती त्यांच्यावरती नगरमध्येच उपचार सुरू होते मात्र आज त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना तातडीने पुण्याकडे स्थलांतरित करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे खासदार निलेश लंके यांची प्रकृती बाबतची माहिती समजतात लंके समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून अनेक कार्यकर्ते त्यांची प्रकृतीची माहिती घेण्यासाठी पुण्याकडे रवाना होत असल्याचे देखील समजते आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र दिनी खासदार निलेश लंके हे तामिळनाडू येथील जिंजी किल्ला येथे गेले होते. आपला मावळा या संघटनेच्या माध्यमातून शिवरायांचे गड किल्ले यांचे संवर्धन करण्याची मोहीम खासदार निलेश लंके यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. यावेळी स्वतः लंके हे गडकिल्ल्यांची स्वच्छता करतात तसेच व्यस्त जीवनशैलीमुळे त्यांच्या प्रकृती खालवली असल्याचा देखील त्यांचे समर्थक सांगतात.

Nilesh Lanke: मोठी बातमी! खासदार लंकेची तब्येत बिघडली; उपचारासाठी पुण्याला रवाना Read More »

child marriages

Ahilyanagar News: एकाच दिवसात 9 बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश

Ahilyanagar News : महिला व बालविकास विभागाच्या सतर्कतेमुळे जिल्ह्यात एका दिवसात एकूण ९ बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. या कारवाईमुळे बालविवाह प्रतिबंधाबाबत प्रशासनाची सजगता अधोरेखित झाली आहे. ३ मे २०२६ रोजी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई प्रभावीपणे राबविण्यात आली. या कारवाईत नगर शहरात ३, अकोल्यात १, राहुरीत १, श्रीगोंद्यात १, पाथर्डीत १, नेवाशात १ आणि नगर तालुक्यात १ असे एकूण ९ बालविवाह थांबविण्यात आले.या मोहिमेत पोलीस यंत्रणा, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, अंगणवाडी सेविका, मुख्यसेविका, जिल्हा बालसंरक्षण कक्ष तसेच चाइल्ड हेल्पलाइन कक्ष यांचा सक्रिय सहभाग राहिला. सर्व यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय साधून ही कारवाई करण्यात आली. नागरिकांनीही अशा घटनांची माहिती तत्काळ प्रशासनाला द्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Ahilyanagar News: एकाच दिवसात 9 बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश Read More »

1st may

May 1 Rule Changes : 1 मे पासून होणार हे 6 मोठे बदल; जाणून घ्या सर्वकाही….

May 1 Rule Changes : उद्यापासून १ मे २०२६ पासून सामान्य नागरिकाचे वित्त, बँकिंग आणि गुंतवणुकीवर परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. नवीन महिन्याच्या सुरुवातीसोबतच, बँक खाती, विमा योजना, क्रेडिट कार्ड्स, ऑनलाइन गेमिंग आणि कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेवर परिणाम करणारे बदल लागू होण्याची शक्यता आहे. चला तर मग, १ मे पासून नक्की कोणते नियम बदलणार आहेत, यावर एक नजर टाकूया. ऑनलाइन गेमिंगसाठी अधिक कडक नियम: १ मे पासून, ऑनलाइन गेमिंग उद्योग एका नवीन नियामक चौकटीअंतर्गत कार्यरत होईल. केंद्र सरकारने ‘ऑनलाइन गेमिंग ऑथॉरिटी ऑफ इंडिया’ (Online Gaming Authority of India) स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. ‘ऑनलाइन गेमिंग नियमन कायदा-२०२५’ (Online Gaming Regulation Act-2025) अंतर्गत, गेमिंग कंपन्यांना आता मानकांच्या एका नवीन संचाचे पालन करणे अनिवार्य असेल. या संदर्भात एक दिलासादायक बाब म्हणजे, गेम प्रमाणपत्राचा (Game Certification) वैधता कालावधी ५ वर्षांवरून वाढवून १० वर्षे करण्यात आला आहे. PMJJBY आणि PMSBY चे हप्ते (Premiums) वजा होणार ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’ (PMJJBY) आणि ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ (PMSBY) यांचे वार्षिक हप्ते (Premiums) मे महिन्यात बँक खात्यातून आपोआप वजा (Auto-debit) केले जाणार आहेत. बँक खात्यांमधून अनुक्रमे ४३६ आणि २० इतकी रक्कम वजा केली जाऊ शकते. ज्या खातेदारांनी या योजनांचे सदस्यत्व घेतले आहे, त्यांना त्यांच्या खात्यांमध्ये पुरेशी शिल्लक असल्याची खात्री करण्याचा सल्ला दिला जातो. एलपीजी सिलिंडर्स महाग होण्याची शक्यता एलपीजी गॅस सिलिंडर्सच्या किमतींचा दर महिन्याच्या पहिल्या दिवशी आढावा घेतला जातो. या पार्श्वभूमीवर, १ मे रोजी घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडर्सच्या किमतींमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींवरील दबाव आणि पुरवठ्याशी संबंधित परिस्थितीमुळे, गॅसच्या किमती वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. SBI कार्ड ग्राहकांना धक्का SBI कार्ड १ मे पासून आपल्या ‘विलंब शुल्क’ (Late Payment Fees) दरांमध्ये सुधारणा करणार आहे. आता ग्राहकांना अगदी लहान थकीत रकमेवरही शुल्क भरावे लागू शकते. याव्यतिरिक्त, काही विशिष्ट कार्ड्सवरील वार्षिक शुल्क माफ करण्याच्या अटींमध्येही बदल करण्यात आले आहेत. e-KYC अद्ययावत करणे अनिवार्य बँक ग्राहकांसाठी त्यांचे e-KYC तपशील अद्ययावत करण्याची अंतिम मुदत १ मे आहे. ज्या खात्यांची KYC माहिती अपूर्ण आहे, अशा खात्यांवरील व्यवहार स्थगित करण्यासारखी कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे, कोणत्याही गैरसोयीपासून वाचण्यासाठी ग्राहकांनी त्यांच्या बँकेची शाखा, नेट बँकिंग किंवा मोबाईल ॲपद्वारे त्यांचे तपशील त्वरित अपडेट करावेत. PF काढण्याबाबत चर्चांना उधाण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (PF) संदर्भात सध्या चर्चा सुरू आहेत; ज्यानुसार भविष्यात एटीएम (ATM) आणि UPI द्वारे PF ची रक्कम काढण्याची सुविधा सुरू केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तथापि, या संदर्भात सरकारकडून किंवा EPFO ​​कडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

May 1 Rule Changes : 1 मे पासून होणार हे 6 मोठे बदल; जाणून घ्या सर्वकाही…. Read More »

img 20260428 wa0002

Sharad Pawar: मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र येणार पण सुनेत्रा पवार राहणार गैरहजर; कारण काय?

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांनी आज पुण्यातील मोदी बागेत पवार कुटुंबासाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी शरद पवार यांच्याकडून बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्यसभा खासदार पार्थ पवार, आमदार रोहित पवार, जय पवार आणि योगेंद्र पवार यांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे या स्नेहभोजनादरम्यान पवार कुटुंब काही महत्वाचे निर्णय घेणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे एकीकडे या स्नेहभोजनासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येत असताना राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनिता पवार या स्नेहभोजनाला गैरहजर राहणार आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे सुनेत्रा पवार पुण्यात मोदी बाग स्नेहभोजनाचा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता कमी असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांना स्नेहभोजनाचा कार्यक्रमाला उपस्थित राहता येत नसल्यामुळे काल रात्री उशिरा खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांची मुलगी रेवती सुळे यांनी सुनेत्रा पवार यांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान पार्थ पवार देखील उपस्थित होते. आज होणाऱ्या स्नेहभोजन कार्यक्रमादरम्यान पुन्हा एकदा राष्ट्रवादी विलीनीकरणावर चर्चा होणार का याबाबत देखील सध्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत असल्याने आज होणाऱ्या स्नेहभोजन कार्यक्रमावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

Sharad Pawar: मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र येणार पण सुनेत्रा पवार राहणार गैरहजर; कारण काय? Read More »