DNA मराठी

latest news

pravin tarde

Pravin Tarde : नसरापूर दुर्घटनेवर प्रवीण तरडे संतप्त; “अशा नराधमांना चेचणारा सिनेमा बनवणार”

Pravin Tarde : नसरापूर दुर्घटनेवर दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची संतप्त प्रतिक्रिया दिली असून येणाऱ्या अशा नराधमांना चेचणारा सिनेमा बनवणार अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना प्रवीण तरडे म्हणाले की, येणाऱ्या काळात अशा नराधमांना चेचण्यासाठी सिनेमा काढणार. मी एक फिल्ममेकर आहे. याबद्दल मी माझी उद्विग्न प्रतिक्रिया दिली होती. त्यावरून मोठा गदारोळ उठला. मी शेवटी माणूसच आहे. महाराष्ट्रातील मुलींच्या वडिलांना विचारा, ती बातमी पाहिल्यानंतर काय झाले असेल. येणाऱ्या काळात मी ‘देऊळ बंद’ या सिनेमाचे 11 भाग करणार आहे. त्यामुळे ‘देऊळ बंद’च्या पुढील एखाद्या भागात अशा नराधमांना चेचण्यासाठी स्वतः स्वामींनाच यावे लागेल. माझ्या सिनेमात कायदा-बियदा असं काही नसेल. कारण जेव्हा स्वामी शिक्षा द्यायला उतरतात, तेव्हा त्यांची शिक्षा भयानक असते. स्वामींनी तो प्रकार पाहिला असेल. त्यामुळे त्या नराधमांना असा मृत्यू येईल की पुन्हा कोणी असे कृत्य करण्याची हिंमत करणार नाही. जे सध्या चाललंय, ते अतिशय भयावह आहे. यानिमित्ताने मुलींच्या आई-वडिलांना आशेचा किरण देण्यासाठी असा चित्रपट बनवेन, ज्यात अशा नराधमांना असे मृत्यू दाखवले जातील की ते पाहून कोणीही असे कृत्य करण्याची हिंमत करणार नाही. ज्याप्रकारे ‘मुळशी पॅटर्न’नंतर शेतकऱ्यांच्या जमिनी धाकदपटशाहीने घेणं बंद झालं, त्याचप्रमाणे ‘मुळशी पॅटर्न’ने शेतकऱ्यांना खडबडून जाग केलं. आता अशा नराधमांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. या विषयाला वाचा फोडण्याचा मी प्रयत्न करेन. ‘देऊळ बंद 2’च्या टीझर प्रदर्शन सोहळ्यात, वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर, अक्कलकोट येथे प्रवीण तरडे यांनी ही भावना व्यक्त केली.

Pravin Tarde : नसरापूर दुर्घटनेवर प्रवीण तरडे संतप्त; “अशा नराधमांना चेचणारा सिनेमा बनवणार” Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke: मोठी बातमी! खासदार लंकेची तब्येत बिघडली; उपचारासाठी पुण्याला रवाना

Nilesh Lanke: अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांची तब्येत अचानक बिघडल्याची माहिती समोर येत असून त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. खासदार निलेश लंके यांची गेल्या दोन-चार दिवसांपासून प्रकृती ही अस्वस्थ होती त्यांच्यावरती नगरमध्येच उपचार सुरू होते मात्र आज त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना तातडीने पुण्याकडे स्थलांतरित करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे खासदार निलेश लंके यांची प्रकृती बाबतची माहिती समजतात लंके समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून अनेक कार्यकर्ते त्यांची प्रकृतीची माहिती घेण्यासाठी पुण्याकडे रवाना होत असल्याचे देखील समजते आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र दिनी खासदार निलेश लंके हे तामिळनाडू येथील जिंजी किल्ला येथे गेले होते. आपला मावळा या संघटनेच्या माध्यमातून शिवरायांचे गड किल्ले यांचे संवर्धन करण्याची मोहीम खासदार निलेश लंके यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. यावेळी स्वतः लंके हे गडकिल्ल्यांची स्वच्छता करतात तसेच व्यस्त जीवनशैलीमुळे त्यांच्या प्रकृती खालवली असल्याचा देखील त्यांचे समर्थक सांगतात.

Nilesh Lanke: मोठी बातमी! खासदार लंकेची तब्येत बिघडली; उपचारासाठी पुण्याला रवाना Read More »

child marriages

Ahilyanagar News: एकाच दिवसात 9 बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश

Ahilyanagar News : महिला व बालविकास विभागाच्या सतर्कतेमुळे जिल्ह्यात एका दिवसात एकूण ९ बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. या कारवाईमुळे बालविवाह प्रतिबंधाबाबत प्रशासनाची सजगता अधोरेखित झाली आहे. ३ मे २०२६ रोजी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई प्रभावीपणे राबविण्यात आली. या कारवाईत नगर शहरात ३, अकोल्यात १, राहुरीत १, श्रीगोंद्यात १, पाथर्डीत १, नेवाशात १ आणि नगर तालुक्यात १ असे एकूण ९ बालविवाह थांबविण्यात आले.या मोहिमेत पोलीस यंत्रणा, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, अंगणवाडी सेविका, मुख्यसेविका, जिल्हा बालसंरक्षण कक्ष तसेच चाइल्ड हेल्पलाइन कक्ष यांचा सक्रिय सहभाग राहिला. सर्व यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय साधून ही कारवाई करण्यात आली. नागरिकांनीही अशा घटनांची माहिती तत्काळ प्रशासनाला द्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Ahilyanagar News: एकाच दिवसात 9 बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश Read More »

1st may

May 1 Rule Changes : 1 मे पासून होणार हे 6 मोठे बदल; जाणून घ्या सर्वकाही….

May 1 Rule Changes : उद्यापासून १ मे २०२६ पासून सामान्य नागरिकाचे वित्त, बँकिंग आणि गुंतवणुकीवर परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. नवीन महिन्याच्या सुरुवातीसोबतच, बँक खाती, विमा योजना, क्रेडिट कार्ड्स, ऑनलाइन गेमिंग आणि कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेवर परिणाम करणारे बदल लागू होण्याची शक्यता आहे. चला तर मग, १ मे पासून नक्की कोणते नियम बदलणार आहेत, यावर एक नजर टाकूया. ऑनलाइन गेमिंगसाठी अधिक कडक नियम: १ मे पासून, ऑनलाइन गेमिंग उद्योग एका नवीन नियामक चौकटीअंतर्गत कार्यरत होईल. केंद्र सरकारने ‘ऑनलाइन गेमिंग ऑथॉरिटी ऑफ इंडिया’ (Online Gaming Authority of India) स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. ‘ऑनलाइन गेमिंग नियमन कायदा-२०२५’ (Online Gaming Regulation Act-2025) अंतर्गत, गेमिंग कंपन्यांना आता मानकांच्या एका नवीन संचाचे पालन करणे अनिवार्य असेल. या संदर्भात एक दिलासादायक बाब म्हणजे, गेम प्रमाणपत्राचा (Game Certification) वैधता कालावधी ५ वर्षांवरून वाढवून १० वर्षे करण्यात आला आहे. PMJJBY आणि PMSBY चे हप्ते (Premiums) वजा होणार ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’ (PMJJBY) आणि ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ (PMSBY) यांचे वार्षिक हप्ते (Premiums) मे महिन्यात बँक खात्यातून आपोआप वजा (Auto-debit) केले जाणार आहेत. बँक खात्यांमधून अनुक्रमे ४३६ आणि २० इतकी रक्कम वजा केली जाऊ शकते. ज्या खातेदारांनी या योजनांचे सदस्यत्व घेतले आहे, त्यांना त्यांच्या खात्यांमध्ये पुरेशी शिल्लक असल्याची खात्री करण्याचा सल्ला दिला जातो. एलपीजी सिलिंडर्स महाग होण्याची शक्यता एलपीजी गॅस सिलिंडर्सच्या किमतींचा दर महिन्याच्या पहिल्या दिवशी आढावा घेतला जातो. या पार्श्वभूमीवर, १ मे रोजी घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडर्सच्या किमतींमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींवरील दबाव आणि पुरवठ्याशी संबंधित परिस्थितीमुळे, गॅसच्या किमती वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. SBI कार्ड ग्राहकांना धक्का SBI कार्ड १ मे पासून आपल्या ‘विलंब शुल्क’ (Late Payment Fees) दरांमध्ये सुधारणा करणार आहे. आता ग्राहकांना अगदी लहान थकीत रकमेवरही शुल्क भरावे लागू शकते. याव्यतिरिक्त, काही विशिष्ट कार्ड्सवरील वार्षिक शुल्क माफ करण्याच्या अटींमध्येही बदल करण्यात आले आहेत. e-KYC अद्ययावत करणे अनिवार्य बँक ग्राहकांसाठी त्यांचे e-KYC तपशील अद्ययावत करण्याची अंतिम मुदत १ मे आहे. ज्या खात्यांची KYC माहिती अपूर्ण आहे, अशा खात्यांवरील व्यवहार स्थगित करण्यासारखी कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे, कोणत्याही गैरसोयीपासून वाचण्यासाठी ग्राहकांनी त्यांच्या बँकेची शाखा, नेट बँकिंग किंवा मोबाईल ॲपद्वारे त्यांचे तपशील त्वरित अपडेट करावेत. PF काढण्याबाबत चर्चांना उधाण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (PF) संदर्भात सध्या चर्चा सुरू आहेत; ज्यानुसार भविष्यात एटीएम (ATM) आणि UPI द्वारे PF ची रक्कम काढण्याची सुविधा सुरू केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तथापि, या संदर्भात सरकारकडून किंवा EPFO ​​कडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

May 1 Rule Changes : 1 मे पासून होणार हे 6 मोठे बदल; जाणून घ्या सर्वकाही…. Read More »

img 20260428 wa0002

Sharad Pawar: मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र येणार पण सुनेत्रा पवार राहणार गैरहजर; कारण काय?

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांनी आज पुण्यातील मोदी बागेत पवार कुटुंबासाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी शरद पवार यांच्याकडून बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्यसभा खासदार पार्थ पवार, आमदार रोहित पवार, जय पवार आणि योगेंद्र पवार यांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे या स्नेहभोजनादरम्यान पवार कुटुंब काही महत्वाचे निर्णय घेणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे एकीकडे या स्नेहभोजनासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येत असताना राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनिता पवार या स्नेहभोजनाला गैरहजर राहणार आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे सुनेत्रा पवार पुण्यात मोदी बाग स्नेहभोजनाचा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता कमी असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांना स्नेहभोजनाचा कार्यक्रमाला उपस्थित राहता येत नसल्यामुळे काल रात्री उशिरा खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांची मुलगी रेवती सुळे यांनी सुनेत्रा पवार यांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान पार्थ पवार देखील उपस्थित होते. आज होणाऱ्या स्नेहभोजन कार्यक्रमादरम्यान पुन्हा एकदा राष्ट्रवादी विलीनीकरणावर चर्चा होणार का याबाबत देखील सध्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत असल्याने आज होणाऱ्या स्नेहभोजन कार्यक्रमावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

Sharad Pawar: मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र येणार पण सुनेत्रा पवार राहणार गैरहजर; कारण काय? Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke: शनि शिंगणापूर येथे शनिदेव ‘बंदिस्त’ प्रकरणी स्पष्टीकरणाची मागणी; खासदार लंकेंनी वेधले प्रशासनाचे लक्ष

Nilesh Lanke : जगप्रसिद्ध शनि शिंगणापूर येथे अलीकडेच सुरक्षा व्यवस्थेच्या नावाखाली शनिदेवाच्या मूर्तीभोवती लोखंडी संरचना उभारण्यात आल्याची बाब निदर्शनास आली असून, याबाबत खासदार नीलेश लंके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खासदार लंके यांनी शनिवारी मध्यरात्री मंदिराला भेट दिली असता, पारंपरिक स्वरूपात उघड्यावर असलेली शनिदेवाची शिळा लोखंडी दरवाज्यांमधून बंदिस्त केल्याचे आढळले. शिंगणापूर हे “देव आहे पण देऊळ नाही, घरं आहेत पण दरवाजे नाहीत” या वैशिष्ट्यपूर्ण परंपरेमुळे देश-विदेशात ओळखले जाते. अशा ठिकाणी श्रद्धेच्या केंद्रस्थानी असलेल्या देवतेला बंदिस्त करणे ही भाविकांच्या भावना दुखावणारी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या संदर्भात मंदिर प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात येणार असून, अशा प्रकारच्या निर्णयामागील कारणे स्पष्ट करण्याची मागणी करण्यात येत आहे. सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी सीसीटीव्ही, दर्शन व्यवस्थापन यांसारखे उपाय स्वीकारार्ह असले तरी, परंपरेला धक्का पोहोचवणारे बदल टाळावेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, शिंगणापूरची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आणि धार्मिक अस्मिता अबाधित राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, भविष्यात अशा प्रकारचे निर्णय घेताना स्थानिक भाविक व परंपरा यांचा आदर राखावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याप्रकरणी लवकरच अधिकृत पत्रव्यवहार करून प्रशासनाकडून सविस्तर स्पष्टीकरण मागविण्यात येणार असल्याची माहितीही खासदार लंके यांनी दिली.

Nilesh Lanke: शनि शिंगणापूर येथे शनिदेव ‘बंदिस्त’ प्रकरणी स्पष्टीकरणाची मागणी; खासदार लंकेंनी वेधले प्रशासनाचे लक्ष Read More »

Kalpana Raje Bhosale : NCERT मधून महाराष्ट्राचा नकाशा गायब; राजमाता कल्पना राजे भोसले संतप्त

Kalpana Raje Bhosale :  राजमाता कल्पना राजे भोसले यांनी एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमातून महाराष्ट्राचा नकाशा गायब झाल्याच्या मुद्द्यावर तीव्र संताप व्यक्त करत कडक इशारा दिला आहे. एनसीईआरटीच्या पुस्तकातून महाराष्ट्राचा नकाशा वगळण्यात आल्याची बाब अत्यंत गंभीर असून, हा प्रकार कदापिही सहन केला जाणार नाही, असा सज्जड इशारा त्यांनी दिला. “जोपर्यंत पृथ्वीवर सूर्य-चंद्र आहेत, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव आणि महाराष्ट्राचा अभिमान कायम राहील. महाराष्ट्राचा नकाशा पुसण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. याच पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यम प्रतिनिधींनाही या मुद्द्यावर आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे. या संपूर्ण प्रकरणाला महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असल्याचेही राजमाता कल्पना राजे भोसले यांनी स्पष्ट केले.

Kalpana Raje Bhosale : NCERT मधून महाराष्ट्राचा नकाशा गायब; राजमाता कल्पना राजे भोसले संतप्त Read More »

devendra fadnavis

Marathi language : मराठी ज्ञान अनिवार्यतेकडे सरकारचा मोठा निर्णय; वाहनचालकांसाठी नियम 4, 78 व 85 मध्ये होणार बदल

Marathi language : राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी सुसंवाद साधण्यासाठी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करत महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ४, ७८ आणि ८५ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, त्याअंतर्गत वाहनचालकांसाठी मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान (‘वर्किंग नॉलेज’) अनिवार्य करण्याची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. राज्याच्या परिवहन आयुक्तांनी यासंदर्भातील प्रस्ताव गृह विभागाकडे सादर केला असून, त्यानुसार मसुदा अधिसूचना काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रस्तावित बदलांनुसार, सार्वजनिक सेवा वाहन चालविण्याची परवानगी देताना अर्जदाराच्या चारित्र्य व पार्श्वभूमीबरोबरच मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान तपासण्याचा अधिकार परवाना प्राधिकरणाला देण्यात येणार आहे. नवीन तरतुदीनुसार, सार्वजनिक सेवा वाहन चालविण्याची परवानगी (Authorization) देताना मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान तपासले जाणार आहे. मीटर असलेल्या मोटार कॅब वाहनांसाठी परवान्यांच्या अतिरिक्त अटींमध्ये मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात येणार आहे. विशेषतः ऑटो रिक्षा व टॅक्सी (मोटार कॅब) चालकांच्या परवाना नूतनीकरणाच्या वेळी मराठीचे ज्ञान दाखवणे बंधनकारक असेल. यामुळे राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधणे अधिक सुलभ होणार आहे. हरकती व सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू या मसुदा नियमांवर नागरिक, संघटना तसेच संबंधित घटकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत प्राप्त होणाऱ्या सर्व सूचनांचा शासनाकडून विचार करण्यात येणार आहे. सुसंवादातून सेवा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न या निर्णयामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत स्थानिक भाषेला प्राधान्य मिळणार असून, प्रवाशांना अधिक सुलभ व स्नेही सेवा मिळेल, अशी अपेक्षा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे.

Marathi language : मराठी ज्ञान अनिवार्यतेकडे सरकारचा मोठा निर्णय; वाहनचालकांसाठी नियम 4, 78 व 85 मध्ये होणार बदल Read More »

donald trump

Donald Trump: अमेरिका भारताला देणार 1 लाख कोटींचा परतावा देणार; जाणून घ्या नेमकं कारण काय?

Donald Trump: अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाच्या शुल्क धोरणाबाबत न्यायालयाने फटकारल्यानंतर, भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेने भारतीय वस्तूंवर बेकायदेशीरपणे लादलेले शुल्क (टॅरिफ) आता परत करण्याची शक्यता आहे. या परताव्याची एकूण रक्कम ₹८३,००० कोटी ते ₹१ लाख कोटींच्या दरम्यान असू शकते. ट्रम्प यांच्या शुल्कावर न्यायालयाची स्थगिती आपल्या ‘अमेरिका फर्स्ट’ (America First) धोरणांतर्गत, ट्रम्प प्रशासनाने विविध देशांतून येणाऱ्या वस्तूंवर जड शुल्क लादले होते. हे शुल्क ‘आंतरराष्ट्रीय आणीबाणी आर्थिक अधिकार कायद्या’ (IEEPA) अंतर्गत आकारले गेले होते. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने आणि त्यानंतरच्या अपील न्यायालयांनी हे शुल्क बेकायदेशीर असल्याचे निकाल दिले. न्यायालयाच्या या निकालांनंतर, अमेरिकेने जागतिक स्तरावर एकूण $१६६ अब्ज इतके शुल्क परत करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. अमेरिकेच्या ‘सीमा आणि शुल्क संरक्षण विभागाने’ (CBP) २० एप्रिल २०२६ रोजी ‘CAPE’ नावाचे एक नवीन ऑनलाइन व्यासपीठ सुरू केले आहे, ज्याचा उद्देश परतावा प्रक्रिया वेगवान करणे हा आहे. भारताला परताव्यापोटी किती रक्कम मिळू शकते? ‘ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह’ (GTRI) च्या मते, या परताव्याच्या एकूण रकमेपैकी सुमारे $१० ते $१२ अब्ज (स्थूलमानाने ₹८३,००० कोटी ते ₹१ लाख कोटी) इतकी रक्कम भारतीय वस्तूंशी संबंधित आहे. विशेषतः तीन क्षेत्रांना याचा सर्वाधिक फायदा होण्याची अपेक्षा आहे: वस्त्रोद्योग आणि कपडे: सुमारे $४ अब्ज अभियांत्रिकी वस्तू: सुमारे $४ अब्ज रसायने: सुमारे $२ अब्ज भारतीय निर्यातदारांना कसा फायदा होईल? हा परतावा थेट भारतीय निर्यातदारांना दिला जाणार नाही; परताव्यासाठीचे दावे केवळ अमेरिकेतील आयातदार (खरेदीदार)च दाखल करू शकतात. त्यामुळे, भारतीय निर्यातदारांना त्यांच्या अमेरिकन खरेदीदारांशी चर्चा करावी लागेल. या लाभांचा प्रत्यक्ष फायदा मिळवण्यासाठी तीन मुख्य मार्ग उपलब्ध आहेत: परतावा-वाटप करार एका लेखी कराराद्वारे अशी तरतूद करणे की, परताव्याच्या रकमेचा काही भाग भारतीय पुरवठादाराला दिला जाईल. किंमत समायोजन भविष्यातील ऑर्डर्सवर किंचित कमी दर आकारून, परताव्याच्या लाभाचा अप्रत्यक्षपणे फायदा मिळवणे. प्राधान्य जे अमेरिकन खरेदीदार त्यांना मिळालेल्या परताव्याची रक्कम निर्यातदारांशी वाटून घेतील, त्यांना भविष्यातील ऑर्डर्ससाठी प्राधान्य दिले जाईल. तज्ञांचे मत: ‘ग्रँट थॉर्नटन इंडिया’चे भागीदार सोहराब बारारिया यांनी ‘CAPE’ या व्यासपीठाचे वर्णन एक महत्त्वपूर्ण पाऊल असे केले आहे. त्यांनी नमूद केले की, या उपक्रमामुळे कागदपत्रांचे काम कमी होईल आणि परतावा (Refund) मिळण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होईल. शिवाय, त्यांनी असा सल्ला दिला की, सर्व जुना ऐतिहासिक डेटा वेळेवर तयार आणि प्रमाणित करून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असा विश्वास व्यक्त केला जात आहे की, ही केवळ एक प्रकारची व्यावसायिक सवलत नसून, भारत आणि अमेरिका यांच्यातील आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याची एक उत्तम संधी देखील आहे.

Donald Trump: अमेरिका भारताला देणार 1 लाख कोटींचा परतावा देणार; जाणून घ्या नेमकं कारण काय? Read More »