DNA मराठी

latest news

devendra fadnavis

Devendra Fadnavis: आज दुपारनंतर वेगवान वाऱ्यांचा इशारा; घराबाहेर पडू नका : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : राज्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, दुपारनंतर अनेक भागांत ताशी ७० ते ८० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, अत्यावश्यक कारण असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच अनावश्यक प्रवास टाळावा. विशेषतः तरुणांनी धबधबे, पर्यटनस्थळे किंवा नदीकाठच्या भागात जाणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्य सरकारने संभाव्य पूर आणि दरडग्रस्त भागांमध्ये आवश्यक ती पूर्वतयारी केली असून, धोकादायक ठिकाणांवरील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, जिल्हा प्रशासन आणि इतर सर्व यंत्रणा सतर्क असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबई–पुणे मार्गावरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अशा घटनांमुळे काही ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली असून अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षित मार्गाने बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यातील नागरिकांनी हवामान विभाग आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Devendra Fadnavis: आज दुपारनंतर वेगवान वाऱ्यांचा इशारा; घराबाहेर पडू नका : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

marathi actresshigh profile sex racket case

Marathi Actress : हाय-प्रोफाईल देहव्यापार प्रकरणात धक्कादायक खुलासा; दोन अभिनेत्रींची सुटका, मेकअप आर्टिस्ट अटकेत

Marathi Actress: गिरगावातील हाय-प्रोफाईल देहव्यापार रॅकेट प्रकरणात आता नवीन खुलासा झाल्याने एकच खळबळ उडाली आली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मानवी तस्करीविरोधी पथकाने गिरगावातील एका आलिशान हॉटेलवर छापा टाकत या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. पोलिसांनी या कारवाईत मराठी चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्रींसह आणखी एका अभिनेत्रीची सुटका केली आहे. तर या प्रकरणातील प्रमुख संशयित मेकअप आर्टिस्टला देखील अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी एका पोलिसाला बनावट ग्राहक म्हणून हॉटेलमध्ये पाठविण्यात आले होते. व्यवहार निश्चित झाल्याची खात्री होताच पथकाने तातडीने छापा टाकून दोन्ही महिलांची सुटका केली. प्राथमिक तपासात आरोपी मेकअप आर्टिस्टने मनोरंजन क्षेत्रातील ओळखींचा गैरवापर करून महिलांना या रॅकेटमध्ये ओढल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सुटका करण्यात आलेल्या महिलांपैकी एक मराठी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री असून, दुसरी अभिनेत्री हिंदी आणि बंगाली चित्रपटांमध्ये लहान भूमिका करत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी त्यांची ओळख गोपनीय ठेवली आहे. या प्रकरणात आर्थिक व्यवहार, रॅकेटचे इतर सदस्य, तसेच संबंधित हॉटेल व्यवस्थापनाची भूमिका याचाही तपास सुरू आहे. या रॅकेटमागे आणखी काही व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, तपासानंतर आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Marathi Actress : हाय-प्रोफाईल देहव्यापार प्रकरणात धक्कादायक खुलासा; दोन अभिनेत्रींची सुटका, मेकअप आर्टिस्ट अटकेत Read More »

student

MHT-CET : CET Cell कडून इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; 12 जुलैपर्यंत करता येणार नोंदणी

MHT-CET : एमएचटी-सीईटी (MHT-CET) परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (CET Cell) ने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बी.ई., बी.टेक. तसेच पाच वर्षांच्या इंटिग्रेटेड मास्टर ऑफ इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला (CAP) अधिकृत सुरुवात केली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना २ जुलै ते १२ जुलै या कालावधीत ऑनलाइन नोंदणी करता येणार असून, प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रवेश अर्जासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १,३०० रुपये, तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १,००० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांना ३ जुलै ते १३ जुलै या कालावधीत कागदपत्रांची पडताळणी आणि अर्जाची ऑनलाइन पुष्टी (Confirmation) करण्याची संधी असेल. विद्यार्थी ई-स्क्रुटिनी किंवा प्रत्यक्ष स्क्रुटिनी केंद्रात जाऊन कागदपत्रांची पडताळणी करू शकतात. प्रवेश प्रक्रियेतील पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे गुणवत्ता यादी. १५ जुलै रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. या यादीत काही त्रुटी असल्यास विद्यार्थ्यांना १६ ते १८ जुलै दरम्यान हरकती नोंदवता येतील. सर्व हरकतींची छाननी झाल्यानंतर २० जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर पर्याय नोंदणी (Option Form) आणि सीट वाटपाच्या पुढील टप्प्यांचे वेळापत्रक जाहीर होईल. यंदा प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कागदपत्र पडताळणीची सुविधा शनिवार आणि रविवारही सुरू ठेवण्यात आली आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५.३० या वेळेत विद्यार्थी स्क्रुटिनी केंद्रात जाऊन किंवा निवडलेल्या पद्धतीनुसार पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करू शकतील. दरम्यान, यावर्षी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना दोन वेळा सीईटी परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आपले गुण सुधारण्याची संधी मिळवली. आता प्रवेश प्रक्रियेलाही सुरुवात झाल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे आणि पडताळणीची प्रक्रिया शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन सीईटी सेलकडून करण्यात आले आहे.

MHT-CET : CET Cell कडून इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; 12 जुलैपर्यंत करता येणार नोंदणी Read More »

img 20260622 wa0001

Ahilyanagar Crime: नगर पाथर्डी रोडवरील हॉटेल शौर्य येथे तरुणाचा खून; एक जण गंभीर जखमी

Ahilyanagar Crime: अहिल्यानगर शहरातील पाथर्डी रोडवरील महेशनगर परिसरातील हॉटेल शौर्य येथे रविवारी रात्री झालेल्या हल्ल्यात एका तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सागर धोत्रे व त्यांचा सहकारी हॉटेलमध्ये जेवणासाठी बसले असताना त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सागर धोत्रे यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर साईदीप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, जयेश पाटोळे व त्याच्या दोन साथीदारांनी हा हल्ला केल्याच संशयित आरोपी आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलीस उपधीक्षक दिलीप टिपरसे, एपीआय तेजश्री थोरात यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची तपासणी केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, संशयित आरोपी जयेश पाटोळे याला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Ahilyanagar Crime: नगर पाथर्डी रोडवरील हॉटेल शौर्य येथे तरुणाचा खून; एक जण गंभीर जखमी Read More »

Ahilyanagar News : धरणांतील पिण्याचे पाणी 30 सप्टेंबरपर्यंत राखून ठेवणार, पाऊस लांबल्याने मुदत वाढविली

Ahilyanagar News : यावर्षी पावसाला होणार उशीर आणि संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा आदेश दिला आहे. यापूर्वी पिण्याचे पाणी 31 ऑगस्टपर्यंत राखीव ठेवण्यात आले होते. मात्र, बदलती परिस्थिती लक्षात घेता आता पाणी 30 सप्टेंबरपर्यंत राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी विखे पाटील यांनी आज बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. त्यानी सांगितले की, धरण क्षेत्र व अन्य उदभव क्षेत्रातून पाणी उपसा तात्काळ थांबवण्याचे सांगितले आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य आहे. त्यामुळे पाणी पिण्यासाठीच राखून ठेवले जाणार आहे. टंचाई असलेल्या भागात पाण्याचे टँकर वेळापत्रकानुसार गावात जाणार आहेत. त्यांच्यासाठीच्या पाण्याच्या उद्भव परिसरात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. टँकरचे पाणी गावातील विहिरीत टाकले जाणार नाही. तेथील पाणी पुरवठा योजनेत किंवा गावच्या लोकसंख्येनुसार दोन ते पाच हजार लिटर क्षमतेच्या टाक्यांमध्ये पाणी टाकले जाणार आहे. या टाक्यांना कॉक बसवले जाणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पुरेसे पाणी उपलब्ध होईल व ते वायाही जाणार नाही. यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी देण्यात येणार आहे, असेही विखे यांनी स्पष्ट केले. जनावरांसाठी चारा सध्या मुबलक असला तरी पुन्हा सर्वेक्षण करून प्रत्यक्षात किती चारा उपलब्ध होईल याचा अहवाल पाच सहा दिवसात येईल व त्यानुसार नियोजन केले जाईल, असेही विखे यांनी सांगितले.

Ahilyanagar News : धरणांतील पिण्याचे पाणी 30 सप्टेंबरपर्यंत राखून ठेवणार, पाऊस लांबल्याने मुदत वाढविली Read More »

bala nandgaonkar

Bala Nandgaonkar : राजकारणातील पक्षांतर जनतेला मान्य नाही; बाळा नांदगावकरांचे वक्तव्य

Bala Nandgaonkar : राजकारणातील पक्षांतर जनतेला मान्य नाही असे वक्तव्य मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. माध्यमांशी बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले की, देशाच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, ते सामान्य माणसांना आवडणारे नाही. पश्चिम बंगालमध्येही तेच झाले, महाराष्ट्रातही तसेच झाले. आम आदमी पक्षामध्येही असे प्रकार झाले. लोकांनी ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिले, ज्या पक्षाकडे पाहून मतदान केले, त्या मतांचा सन्मान राखला जात नाही. त्यामुळे हा लोकांचाही अपमान आहे.दुर्दैवाने राजकारणाबाबत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की जाणारे आहेत म्हणून घेणारे तयार आहेत.त्यामुळे पक्ष सोडून जाणाऱ्या मंडळींनीही स्वतः विचार केला पाहिजे की आपण काय करत आहोत. शेवटी जनता सर्व काही पाहत असते.-लोकांचा ईव्हीएम मशीनवरील विश्वास उडत चालला आहे.-त्यामुळे जाणाऱ्यांनाही असे वाटते की ईव्हीएम असल्यामुळे काही अडचण नाही. लोकांच्या मतांचा सन्मान राखला जात नाही. त्यामुळे आम्ही सरकारलाही आणि विरोधी पक्षांनाही बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.-विरोधी पक्षांनाही आम्ही सांगितले होते की, जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकावा. सरकारला जर एवढा आत्मविश्वास असेल की जनता आमच्या विचारधारेला आणि कामांना मतदान करते, तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यास काय अडचण आहे? त्यामुळे लोकांच्या मनातील शंका दूर होतील असं बाळा नांदगावकर म्हणाले. NDA ची ताकद वाढवण्यासाठी भाजपचे प्रयत्न तर एनडीएवर बोलताना जर एखादा नेता पक्षात येणार असेल, तर त्याच्यासोबत त्याच्या विचारांचे लोकही येणारच. त्याला कोणतेही नाव दिले तरी त्याचा फारसा अर्थ नाही.1967 मध्ये हरियाणामध्ये ‘आयाराम-गयाराम’ संस्कृतीचा जन्म झाला होता.तेथील एका आमदाराने अवघ्या नऊ तासांत तीन पक्ष बदलले होते.त्यानंतर पक्षांतरबंदीचा कायदा आला. मात्र त्यावरील वाद आणि निर्णय आजही सुरू आहेत.कायदा असला तरी त्याचे पालन होत नाही. न्यायालय तातडीने निर्णय देत नाही आणि अध्यक्षांकडे गेल्यानंतरही निर्णय होण्यास वेळ लागतो.त्यामुळे या सर्व बाबींचा काही जणांकडून फायदा घेतला जात आहे असं बाळा नांदगावकर म्हणाले.

Bala Nandgaonkar : राजकारणातील पक्षांतर जनतेला मान्य नाही; बाळा नांदगावकरांचे वक्तव्य Read More »

abdul sattar

Abdul Sattar : जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट; आमदार संजना जाधव आणि समीर सत्तार यांचे अर्ज बाद

Abdul Sattar : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तब्बल 214 अर्ज दाखल झाल्याने अर्ज छाननीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जिल्हा बँकेच्या 21 संचालक पदांसाठी ही निवडणूक होत आहे. सत्ताधारी महायुतीमधून सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. भाजपकडून ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार संजना जाधव, शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेनेकडून पालकमंत्री संजय शिरसाट, तर काँग्रेसकडून खासदार डॉ. कल्याण काळे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. याशिवाय, आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार, पालकमंत्री संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा शिरसाट, दिनेशसिंह परदेशी, जगन्नाथ काळे, खासदार संदीपान भुमरे यांचे पुत्र आमदार विलास भुमरे, आमदार रमेश बोरणारे, आमदार अंबादास दानवे, देवयानी पाटील डोणगावकर, सुहास शिरसाठ, रामराव शेळके आणि अभिजित देशमुख यांच्यासह अनेक दिग्गजांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज बाद होण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेक उमेदवारांनी दोन ते तीन अर्ज दाखल केले होते. त्यामुळे अर्ज छाननीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. कन्नडच्या आमदार संजना जाधव आणि आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांचे अर्ज छाननीदरम्यान बाद करण्यात आले. तसेच आमदार अनुराधा चव्हाण यांचा एक अर्जही बाद झाला. मात्र त्यांनी अन्य जागेसाठी दाखल केलेला दुसरा अर्ज वैध ठरल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. अर्जांमधील तांत्रिक त्रुटींमुळे हे अर्ज बाद झाल्याची माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दोन महत्त्वाच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Abdul Sattar : जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट; आमदार संजना जाधव आणि समीर सत्तार यांचे अर्ज बाद Read More »

election

Nevasa Election : ‘ज्ञानेश्वर’च्या निवडणुकीसाठी 103 उमेदवारी अर्ज दाखल; आज शेवटचा दिवस

Nevasa Election : नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सातव्या दिवशी सोमवारी (ता. १) ७७ उमेदवारांचे ८१ अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी देविदास घोडेचोर यांनी दिली. २९ मे अखेर एकूण २२ अर्ज दाखल झाले होते. काल अखेर एकूण दाखल उमेदवारी अर्जाची संख्या १०३ झाली आहे. गटनिहाय दाखल अर्ज शेवगाव गट – राम आसराजी लांडे, सिद्धार्थ शिवाजीराव दसपुते, मच्छिंद्र विठ्ठल कुटे, राजेंद्र रावसाहेब ढमढेरे, लक्ष्मण गंगाराम टाकळकर, धनंजय आबासाहेब देशमुख, संतोष शंकरराव पावसे, पंडित रामभाऊ भोसले. शहरटाकळी गट – नरेंद्र मारुतराव घुले (२ अर्ज), कुकाणा गट- गोरक्षनाथ सुखदेव नवले, उध्दव श्रीपती नवले, दत्तात्रय त्रिंबक काळे, बाबासाहेब कुंडलिक गव्हाणे, अशोक जगन्नाथ मंडलिक, सुमनबाई दत्तात्रय काळे, जगन्नाथ रामकृष्ण साबळे, चंदू लक्ष्मण फुलारी, विठ्ठल पांडुरंग अभंग, अमोल विठ्ठल अभंग, भारतराव रामकृष्ण साबळे. अर्जुन बाजीराव नवले (२ अर्ज), विजय ज्ञानदेव भागवत, दादासाहेब नानासाहेब वाबळे, संदीप काकासाहेब देशमुख. नेवासा गट – विक्रम साहेबराव चौधरी, जगदीश बाळासाहेब चौधरी, बाळासाहेब सखाराम साळुंके, अरुण बबनराव देशमुख, दादासाहेब गोरक्षनाथ गंडाळ. वडाळा बहिरोबा गट – भाऊसाहेब सोन्याबापू कांगुणे, अशोक कारभारी काळे, जनार्दन रामभाऊ कदम, प्रसाद जनार्दन पटारे, कोंडीराम मारुती कोलते, झुंबर अंबादास शेळके (२ अर्ज), कारभारी मोहन चेडे, कचरदास धनराज गुंदेचा, अभिषेक जनार्दन पटारे, शिवाजी राजधर कोलते. ढोरजळगाव गट- मच्छिंद्र सूर्यभान म्हस्के, भानुदास नारायण काळे, सदाशिव आबाजी आरगडे, निवृत्ती चिमाजी दातीर, देविदास आसाराम पाटेकर, मंगलाबाई देविदास पाटेकर, रेवणनाथ जगन्नाथ काळे. उत्पादक/बिगर उत्पादक सहकारी संस्था मतदारसंघ – गणेश भानुदास चावरे. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ – भास्कर उत्तम शिंदे, मच्छिंद्र विठ्ठल शिंदे, शंकर संभाजी भारस्कर. महिला राखीव – विजया कल्याणराव म्हस्के, सुमनबाई दत्तात्रय काळे, इंदूबाई बलभीम गव्हाणे, मंगलाबाई देविदास पाटेकर. इतर मागासवर्ग प्रतिनिधी – विजया कल्याणराव म्हस्के, जनार्धन राधाकिसन भागवत, दत्तात्रय त्रिंबक काळे, सिध्दार्थ शिवाजीराव दसपुते, अशोक जगन्नाथ मंडलिक, चंदू लक्ष्मण फुलारी, अमोल विठ्ठल अभंग, विठ्ठल पांडुरंग अभंग, अरुण अशोक गरड, अरुण बबन देशमुख, प्रसाद जनार्धन पटारे, कुसुम दत्तात्रय काळे, अर्जुन बाजीराव नवले, अर्जुन बाजीराव नवले, विजय ज्ञानदेव भागवत, अभिषेक जनार्धन पटारे. विमुक्त जाती – भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी मतदार संघ – रामनाथ गहिनीनाथ गोल्हार, किसन बाबुराव यादव, तुकाराम विनायक मिसाळ, सदाशिव आबाजी आरगडे.

Nevasa Election : ‘ज्ञानेश्वर’च्या निवडणुकीसाठी 103 उमेदवारी अर्ज दाखल; आज शेवटचा दिवस Read More »

Vijay Wadettiwar: डिझेलचा तुडवडा आणि खतांच्या कमतरतेमुळे शेतकरी उध्वस्त

Vijay Wadettiwar: देशात गेल्या दहा वर्षांत अनेक पेपर फुटले त्यातही नीट सारख्या परीक्षांचे पेपर फुटत असतील आणि सिस्टममधील लोकच त्यात सामील असतील, तर याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना थोडी जरी लाज आणि नैतिकता असती, तर त्यांनी आतापर्यंत आपल्या पदाचा राजीनामा दिला असता अशी घणाघाती टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही हीच मागणी केली असून, या संवेदनशील पदावर बसलेल्या मंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची कोणतीही काळजी नसल्याचे यातून सिद्ध होत असल्याचे ते म्हणाले. या प्रकरणात मोटेगावकर किंवा अमित देशमुख यांच्या जुन्या विधानाचा आधार घेऊन सरकार स्वतःचे दोष लपवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका ही वडेट्टीवार यांनी केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून सरकार त्यांना जाणीवपूर्वक उद्ध्वस्त करत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी दोनदा कर्जमाफीची घोषणा केली, मात्र अद्याप कोणताही स्पष्ट शासन निर्णय निघालेला नाही. राज्यात डिझेल-पेट्रोलचा निर्माण झालेला तुटवडा आणि आगामी काळात केवळ 25% खते उपलब्ध होतील, असे केंद्रीय मंत्र्यांचे सांगणे चिंताजनक आहे. डिझेलअभावी शेतीची मशागत आणि नांगरणी कशी होणार? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. सिस्टमविरोधात संताप व्यक्त करणाऱ्या तरुणांचे X (ट्विटर) हँडल्स बंद करून सरकार आपली भीती लपवत आहे. तरुणांना हिंदू-मुस्लिम किंवा भारत-पाकिस्तानच्या मुद्द्यांपेक्षा रोजगार हवा आहे.पण सर्वोच्च पदावर बसलेली व्यक्ती जेव्हा तरुणांना कॉकरोच म्हणते, तेव्हा तरुणांच्या मनातील राग उफाळून येणे स्वाभाविक आहे. सरकारचा एकूण कारभार हा पूर्णपणे तरुण विरोधी असून तो राग आता व्यक्त होत आहे अस वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar: डिझेलचा तुडवडा आणि खतांच्या कमतरतेमुळे शेतकरी उध्वस्त Read More »

iea report

IEA Report: भारताकडे किती दिवसांचा तेलाचा साठा शिल्लक? IEA च्या अहवालामुळे चिंता वाढली

IEA Report: वाढता जागतिक तणाव आणि पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संकटाचा परिणाम देशात आता थेट सामान्य नागरिकांच्या खिशावर जाणवू लागला आहे. तेलाच्या साठ्यांबाबत एक गंभीर इशारा देताना, ‘आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने’ (IEA) असे नमूद केले आहे की, जगातील व्यावसायिक तेलाचे साठे वेगाने कमी होत आहेत. परिस्थिती अशा टप्प्यावर पोहोचली आहे की, अनेक देशांकडे आता केवळ काही आठवडे पुरेल इतकाच तेलाचा साठा शिल्लक आहे. दरम्यान, भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असून, या प्रवृत्तीमुळे जनतेची चिंता अधिकच वाढली आहे. पॅरिसमध्ये आयोजित G-7 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीदरम्यान बोलताना, आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेचे प्रमुख फातिह बिरोल यांनी सांगितले की, ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ (Strait of Hormuz) भागात वाढलेला तणाव आणि युद्धसदृश परिस्थितीचा जागतिक तेल पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला आहे. बिरोल यांच्या मते, परिस्थिती स्थिर करण्याच्या उद्देशाने दररोज आपत्कालीन साठ्यांमधून (emergency reserves) सुमारे 25 लाख बॅरल्स तेल बाजारात सोडले जात आहे. त्यांनी स्पष्टपणे इशारा दिला की हे साठे अमर्याद नाहीत जर हे संकट दीर्घकाळापर्यंत कायम राहिले, तर जगाला गंभीर ऊर्जा संकटाचा सामना करावा लागू शकतो. दोन महिन्यांत तेलाचे साठे विक्रमी नीचांकी पातळीवर संस्थेच्या अहवालानुसार, मार्च आणि एप्रिल या महिन्यांमध्ये जागतिक तेलाच्या साठ्यांमध्ये मोठी घट नोंदवली गेली. अवघ्या दोन महिन्यांतच तेलाचे साठे सुमारे 24 कोटी 60 लाख बॅरल्सने कमी झाले आहेत. तज्ञांचे असे मानणे आहे की, पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या अस्थिरतेमुळे, नजीकच्या भविष्यात तेलाची मागणी आणि पुरवठा यांमधील तफावत आणखी वाढू शकते. परिस्थितीमध्ये लवकर सुधारणा न झाल्यास, तेलाच्या किमतींमध्ये आणखी वाढ होऊ शकते, असा इशारा IEA ने यापूर्वीच दिला होता. भारताकडे तेलाचा किती साठा उपलब्ध? तेलाच्या संकटाबाबत वाढत्या चिंतांच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी नुकतेच असे आश्वासन दिले की, भारताकडे सध्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. सरकारच्या माहितीनुसार, देशाकडे कच्च्या तेलाचा (crude oil) सुरक्षित साठा उपलब्ध असून तो सुमारे 60 दिवस पुरेल इतका आहे. याव्यतिरिक्त, सुमारे 60 दिवस पुरेल इतका LNG (द्रवरूप नैसर्गिक वायू) आणि 45 दिवस पुरेल इतका LPG (द्रवरूप पेट्रोलियम वायू) यांचा साठाही उपलब्ध आहे. सरकारने हे देखील मान्य केले आहे की, जर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने उच्च पातळीवर राहिल्या, तर त्याचा सरकारी तेल कंपन्यांवर प्रचंड आर्थिक दबाव येऊ शकतो. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ मंगळवारी, पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या दरात प्रति लिटर 90 पैशांची वाढ करण्यात आली. एकाच आठवड्यात तेल कंपन्यांनी इंधनाचे दर वाढवण्याची ही दुसरी वेळ आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये, पेट्रोलचा दर वाढून तो अंदाजे ₹98.64 प्रति लिटर झाला आहे तर डिझेलही महाग होऊन ₹91.58 प्रति लिटरवर पोहोचले आहे. मुंबई, कोलकाता आणि चेन्नई यांसारख्या प्रमुख शहरांमध्येही इंधनाच्या दरात वाढ नोंदवली गेली आहे. कोलकातामध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली, जिथे पेट्रोलचे दर ₹110 प्रति लिटरच्या जवळ पोहोचले आहेत आणि डिझेलचा दर ₹96.07 प्रति लिटर झाला आहे. दरम्यान, मुंबईमध्ये पेट्रोलचा दर आता ₹107.59 प्रति लिटर आणि डिझेलचा दर ₹94.08 प्रति लिटर झाला आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर ₹104.49 प्रति लिटरवर पोहोचला आहे, तर डिझेलचा दर ₹96.11 प्रति लिटर इतका आहे.

IEA Report: भारताकडे किती दिवसांचा तेलाचा साठा शिल्लक? IEA च्या अहवालामुळे चिंता वाढली Read More »