DNA मराठी

latest news

donald trump

Donald Trump : इराणच्या ‘पिकॅक्स माउंटन’वर लवकरच हल्ला? ट्रम्प यांचा थेट इशारा

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. इराणमधील अत्यंत सुरक्षित आणि भूमिगत ‘पिकॅक्स माउंटन’ अणुस्थळावर अमेरिका लवकरच हल्ला करू शकते, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी अमेरिकन लष्कर या ठिकाणाला “लवकरच” लक्ष्य करू शकते, असे संकेत दिले. इराणला अण्वस्त्र विकसित करण्यापासून रोखणे हा अमेरिकेच्या लष्करी कारवाईमागील प्रमुख उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पिकॅक्स माउंटन इतके महत्त्वाचे का? ‘पिकॅक्स माउंटन’ हे इराणमधील नतांझ अणुस्थळाजवळील डोंगराळ भागात असलेले अत्यंत मजबूत भूमिगत संकुल आहे. या ठिकाणी खोलवर बोगदे तयार करण्यात आले असून, त्यामुळे पारंपरिक हवाई हल्ल्यांपासून या परिसरातील सुविधा सुरक्षित राहू शकतात. अमेरिका आणि इस्रायली गुप्तचर यंत्रणांना संशय आहे की इराणने आपल्या अणुकार्यक्रमाशी संबंधित संवेदनशील उपकरणे किंवा सेंट्रीफ्यूज या भूमिगत ठिकाणी हलवले असावेत. मात्र, या ठिकाणी नेमके कोणते साहित्य किंवा उपकरणे आहेत, याबाबत पूर्णपणे स्वतंत्र पुष्टी झालेली नाही. संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता पिकॅक्स माउंटनवर अमेरिकेने प्रत्यक्ष हल्ला केल्यास अमेरिका-इराण संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. हे ठिकाण अत्यंत खोलवर असल्याने हल्ल्याचा परिणाम किती होईल, याबाबत लष्करी तज्ज्ञांमध्येही मतभेद आहेत. काही तज्ज्ञांच्या मते, हल्ल्यामुळे प्रवेशमार्ग बाधित होऊ शकतात मात्र भूमिगत मुख्य भाग पूर्णपणे नष्ट करणे आव्हानात्मक ठरू शकते. दरम्यान, इराणच्या अणुकार्यक्रमावरून अमेरिका आणि इराणमधील तणाव कायम असून, पिकॅक्स माउंटनवरील ट्रम्प यांचा ताजा इशारा या संघर्षातील पुढील मोठ्या लष्करी कारवाईचे संकेत मानला जात आहे.

Donald Trump : इराणच्या ‘पिकॅक्स माउंटन’वर लवकरच हल्ला? ट्रम्प यांचा थेट इशारा Read More »

ahilyanagar municipal corporation election

Ahilyanagar News : महापालिका रुग्णालयाच्या आरक्षणावर खासगी हॉस्पिटलची परवानगी शासनाच्या रडारवर

Ahilyanagar News : सावेडीतील महापालिका रुग्णालयासाठी विकास आराखड्यात आरक्षित असलेल्या जागेवर खासगी रुग्णालयाला विकास व बांधकाम परवानगी देण्यात आल्याचे प्रकरण आता नगरविकास विभागाच्या वरिष्ठ स्तरावरील परीक्षणाखाली आले आहे. सामाजिक कार्यकर्ते शेख शाकीर यांनी प्रधान सचिवांकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर शासनाने नगररचना संचालकांसह संबंधित वरिष्ठ कार्यालयांकडून स्वयंस्पष्ट अभिप्राय, सविस्तर अहवाल आणि विकास योजनेचा भाग नकाशा मागविला आहे. मौजे सावेडी येथील सर्वे नं. 9/2/1B/2 व सर्वे नं. 12/4/12/5B मधील जागा विकास आराखड्यात ‘EP-43 Municipal Hospital Reservation’ म्हणून महापालिका रुग्णालयासाठी आरक्षित आहे. मात्र, याच जागेवर खासगी रुग्णालयासाठी भूखंड एकत्रीकरण, विकास परवानगी व बांधकाम परवानगीची प्रक्रिया करण्यात आल्याचा आक्षेप आहे. सावेडी परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती वाढलेली असून सार्वजनिक रुग्णालयाची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत महापालिका रुग्णालयासाठी आरक्षित जागेवर खासगी रुग्णालयाला परवानगी दिल्याने भविष्यात महापालिकेचे स्वतःचे रुग्णालय उभारण्याच्या मूळ उद्देशालाच अडथळा निर्माण होऊ शकतो, असा मुद्दा शासनाकडे मांडण्यात आला आहे. या परवानगी प्रक्रियेत महानगरपालिकेत शासनाकडून नियुक्त तत्कालीन सहाय्यक संचालक नगररचना श्रीमती स्नेहल यादव यांचा अभिप्राय व मान्यता न घेताच प्रस्ताव पुढे नेण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच संबंधित रुग्णालयासाठी संचालक, महाराष्ट्र अग्निशमन सेवा यांच्याकडून आवश्यक Fire NOC न घेता महापालिकेच्या अग्निशमन अधीक्षकांची NOC ग्राह्य धरून पुढील परवानगी देण्यात आल्याची बाबही शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. या प्रकरणी शेख यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे स्वतंत्र तक्रार केली होती. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी 22 जुलै 2026 रोजी प्रधान सचिव, नगरविकास विभाग यांना पत्र पाठवून, भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने चौकशी आवश्यक असल्यास विभागाला प्राधिकृत करण्याची विनंती केली होती. मात्र, नगरविकास विभागाने 31 जुलै 2026 रोजी हे प्रकरण तपासणी व नियमानुसार कार्यवाहीसाठी पुन्हा अहिल्यानगर महानगरपालिका आयुक्तांकडे पाठविल्याने शेख यांनी प्रधान सचिवांकडे लेखी आक्षेप घेतला. “ज्या प्रशासनाच्या परवानगी प्रक्रियेची तक्रार आहे, त्याच प्रशासनाकडे चौकशी देणे निष्पक्ष चौकशीच्या तत्त्वाशी विसंगत आहे,” असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. या आक्षेपानंतर शासनाने प्रकरणाची व्याप्ती वाढवत आयुक्त मनापा. संचालक नगररचना, ; सहसंचालक, नगररचना,  सहाय्यक संचालक, नगररचना, यांच्याकडून अहवाल व अभिप्राय मागविला आहे. शासनास सादर होणाऱ्या अहवालात EP-43 चे महापालिका रुग्णालय आरक्षण अस्तित्वात असताना खासगी रुग्णालयाला परवानगी कोणत्या आधारावर देण्यात आली, आरक्षण बदल अथवा रद्द करण्याचा सक्षम आदेश आहे का, शासन नियुक्त नगररचना अधिकाऱ्याची मान्यता का घेण्यात आली नाही आणि महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालकांची NOC नसताना महापालिकेची NOC कोणत्या अधिकारात ग्राह्य धरण्यात आली, या बाबींवर खुलासा अपेक्षित आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगररचनाकार वैभव जोशी आणि आयुक्त यशवंत डांगे यांच्या प्रशासकीय कार्यकाळात ही परवानगी प्रक्रिया झाल्याने संबंधित निर्णयांची स्वतंत्र व वरिष्ठ स्तरावर चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे सावेडीतील EP-43 प्रकरण आता केवळ एका बांधकाम परवानगीपुरते मर्यादित राहिले नसून सार्वजनिक आरोग्यासाठी राखीव जमीन, नगररचना प्रक्रियेची वैधानिकता, अग्निसुरक्षा मंजुरी आणि प्रशासकीय जबाबदारी या सर्वच मुद्द्यांवर शासनाच्या परीक्षणाखाली आले आहे.

Ahilyanagar News : महापालिका रुग्णालयाच्या आरक्षणावर खासगी हॉस्पिटलची परवानगी शासनाच्या रडारवर Read More »

maharashtra sir

Maharashtra SIR : महाराष्ट्रात खळबळ, SIR नंतर 2 कोटी 6 लाखांहून अधिक मतदार ड्राफ्ट यादीतून गायब; पुढे काय?

Maharashtra SIR : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण अर्थात Special Intensive Revision (SIR) प्रक्रियेनंतर राज्याची सुधारित प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत तब्बल 2 कोटी 6 लाख 88 हजार 487 मतदारांची नावे समाविष्ट झालेली नाहीत. त्यामुळे राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रात SIR प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी एकूण 9 कोटी 78 लाख 54 हजार 49 मतदार नोंदणीकृत होते. मात्र, 31 ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीत 7 कोटी 71 लाख 65 हजार 562 मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच आधीच्या मतदारसंख्येच्या तुलनेत तब्बल 21.14 टक्के मतदार प्रारूप यादीत दिसत नाहीत. प्रारूप मतदार यादीत कोणाचा समावेश? नवीन प्रारूप मतदार यादीमध्ये एकूण 7.71 कोटींहून अधिक मतदारांचा समावेश आहे. पुरुष मतदार: 3 कोटी 95 लाख 89 हजार 905 महिला मतदार: 3 कोटी 75 लाख 72 हजार 570 तृतीयपंथी मतदार: 3 हजार 87 या आकडेवारीवरून प्रारूप मतदार यादीतील पुरुष आणि महिला मतदारांची संख्या जवळपास समान असल्याचे दिसून येते. तब्बल 2.06 कोटी नावे का राहिली बाहेर? निवडणूक यंत्रणेच्या माहितीनुसार, SIR प्रक्रियेदरम्यान काही मतदारांचे गणना अर्ज अर्थात Enumeration Forms जमा होऊ शकले नाहीत. अशा मतदारांचा प्रारूप यादीत समावेश करण्यात आलेला नाही. यामध्ये काही मतदार सापडले नाहीत, काहींचा मृत्यू झाला आहे किंवा काही मतदारांनी आपले निवासस्थान बदलले आहे, अशी कारणे समोर आली आहेत. त्यामुळे प्रारूप यादीत नाव नसणे म्हणजे संबंधित व्यक्तीचे नाव कायमस्वरूपी मतदार यादीतून रद्द झाले आहे, असा थेट अर्थ होत नाही. दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने स्वतंत्र संधी दिली आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे परिसरात मोठी घट SIR प्रक्रियेमुळे मोठ्या शहरांमध्ये मतदारसंख्येत लक्षणीय घट झाल्याचे दिसून येत आहे. विशेषतः मुंबई, ठाणे आणि पुणे यांसारख्या मोठ्या शहरी भागांमध्ये स्थलांतर, मृत्यू, मतदारांचा पत्ता बदलणे आणि गणना अर्ज उपलब्ध न होणे यांसारख्या कारणांचा परिणाम झाल्याचे वृत्त आहे. मुंबईतच सुमारे 36 लाख मतदारांची नावे प्रारूप यादीत दिसत नसल्याचे अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील मतदारांनी आपले नाव नव्या यादीत आहे की नाही, हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. नाव यादीत नसेल तर काय करायचे? प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर मतदारांना आपले नाव तपासण्याची आणि आवश्यक असल्यास दावा किंवा हरकत दाखल करण्याची संधी देण्यात आली आहे. 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. त्यामुळे ज्या पात्र मतदाराचे नाव प्रारूप यादीत नाही, त्यांनी ही मुदत चुकवू नये. नाव, पत्ता किंवा इतर तपशीलात काही चूक असल्यासही या कालावधीत दुरुस्तीची प्रक्रिया करता येणार आहे. निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पात्र असलेल्या नागरिकांनी सर्वप्रथम आपले नाव प्रारूप मतदार यादीत आहे का, हे तपासावे. नाव नसल्यास संबंधित अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांसह दावा दाखल करणे गरजेचे आहे. पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांसाठीही संधी SIR प्रक्रियेनंतर तयार करण्यात आलेली ही प्रारूप यादी केवळ जुन्या मतदारांच्या नावांच्या तपासणीपुरती मर्यादित नाही. पात्र असलेल्या पहिल्यांदा मतदान करणाऱ्या नागरिकांनाही 30 सप्टेंबरपर्यंत मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे 18 वर्षे पूर्ण झालेल्या किंवा मतदानासाठी पात्र असलेल्या नव्या मतदारांनीही आपली नोंदणी तपासणे महत्त्वाचे आहे. अंतिम मतदार यादी कधी जाहीर होणार? सध्या जाहीर झालेली यादी ही प्रारूप मतदार यादी आहे. त्यामुळे 2.06 कोटी मतदारांची नावे कायमस्वरूपी वगळण्यात आली आहेत, असे समजणे योग्य ठरणार नाही. दावे आणि हरकतींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांची छाननी करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. उपलब्ध माहितीनुसार 4 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील मतदार यादीत एकाच वेळी 2 कोटींपेक्षा जास्त नावे प्रारूप यादीत न आल्याने या प्रक्रियेला राजकीय महत्त्वही प्राप्त झाले आहे. विरोधकांकडून या मोठ्या संख्येवर प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे, तर निवडणूक यंत्रणेकडून SIRचा उद्देश मतदार यादी अद्ययावत करणे आणि पात्र-अयोग्य मतदारांची नोंद अचूक करणे हा असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता पुढील एक महिना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. दावे आणि हरकती दाखल झाल्यानंतर किती नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट होतात आणि अंतिम यादीत मतदारसंख्या किती राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तुमचं नाव मतदार यादीत आहे का? SIRनंतर मोठ्या प्रमाणावर नावे प्रारूप यादीत दिसत नसल्याने प्रत्येक पात्र मतदाराने आपले नाव तपासणे आवश्यक आहे. नाव नसल्यास 30 सप्टेंबर 2026 पूर्वी दावा दाखल करून नाव पुन्हा समाविष्ट करून घेण्याची संधी उपलब्ध आहे. अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे.

Maharashtra SIR : महाराष्ट्रात खळबळ, SIR नंतर 2 कोटी 6 लाखांहून अधिक मतदार ड्राफ्ट यादीतून गायब; पुढे काय? Read More »

img 20260831 wa0003

Fire Safety Drill : कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अग्निशमन आपत्ती प्रात्यक्षिक सरावाचे आयोजन

Fire Safety Drill : डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या कॉलेज ऑफ नर्सिंग, अहिल्यानगर येथे समुदाय आरोग्य परिचर्या विभागाच्या वतीने बी.एस्सी. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी अग्निशमन आपत्ती प्रात्यक्षिक सराव (Fire Disaster Mock Drill) आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे, तसेच आपत्कालीन परिस्थिती आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या प्रात्यक्षिक सरावामुळे विद्यार्थ्यांना आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने, प्रभावीपणे आणि सुरक्षितपणे प्रतिसाद देण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. विद्यार्थ्यांची आपत्कालीन परिस्थितीतील तयारी, आत्मविश्वास आणि व्यावसायिक क्षमता वाढविण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आपत्ती किंवा आपत्कालीन परिस्थिती कोणत्याही वेळी उद्भवू शकते. अशा वेळी रुग्णांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, तातडीने प्राथमिक उपचार देणे, सुरक्षित स्थलांतर करणे, आपत्कालीन पथकांशी समन्वय साधणे आणि आवश्यक वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे, यामध्ये परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता प्रत्यक्ष कृतीवर आधारित प्रशिक्षण देण्यात आले. प्रात्यक्षिक सरावादरम्यान विद्यार्थ्यांना अग्निसुरक्षेची मूलभूत तत्त्वे, आपत्कालीन प्रतिसाद, सुरक्षित स्थलांतर प्रक्रिया आणि आपत्ती व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने अलार्म देणे, संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देणे, नागरिक व रुग्णांचे सुरक्षित स्थलांतर करणे, घाबरून न जाता शांतपणे परिस्थिती हाताळणे आणि बाधित व्यक्तींना तातडीने प्राथमिक उपचार देणे, याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. या मॉक ड्रिलमध्ये बाधित व्यक्तींना रुग्णवाहिकेद्वारे सुरक्षितपणे रुग्णालयात हलविणे आणि रुग्णालयात आवश्यक आपत्कालीन उपचार उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेचाही समावेश करण्यात आला. सुरुवातीच्या आपत्कालीन प्रतिसादापासून सुरक्षित स्थलांतर, रुग्णवाहिकेद्वारे वाहतूक आणि आपत्कालीन वैद्यकीय उपचारापर्यंतच्या विविध टप्प्यांचा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर उपचार तसेच विविध विभागांमधील प्रभावी समन्वयाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजले. विद्यार्थ्यांनी या प्रात्यक्षिक सरावात उत्स्फूर्त सहभाग घेत आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित विविध कौशल्यांचे प्रदर्शन केले. या उपक्रमातून संघभावना, प्रभावी संवाद, नेतृत्वगुण, तत्पर निर्णयक्षमता तसेच आरोग्यसेवा कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी आणि सहाय्यक पथकांमधील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित झाले. या प्रात्यक्षिकामुळे विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत स्वतःची तसेच रुग्णांची सुरक्षितता कशी राखावी, संभाव्य धोके कसे ओळखावेत आणि परिस्थितीला नियोजनबद्ध पद्धतीने कसा प्रतिसाद द्यावा, याबाबत आत्मविश्वास मिळाला. सैद्धांतिक ज्ञान आणि प्रत्यक्ष कृती यांच्यातील दुवा निर्माण करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. या अग्निशमन आपत्ती प्रात्यक्षिक सरावाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. प्रा. डॉ. अभिजित दिवटे, संचालक (वैद्यकीय) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. सतीश मोरे, वैद्यकीय अधीक्षक, डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल; डॉ. मयुरी वाळुंज, कॅज्युअल्टी ऑफिसर (अपघात व आपत्कालीन विभाग अधिकारी) आणि श्री. आंबोरे, सुरक्षा अधिकारी यांचे सहकार्य व मोलाच्या योगदानाबद्दल विशेष आभार व्यक्त करण्यात आले. हा कार्यक्रम प्रा. डॉ. प्रतिभा चांदेकर, प्राचार्य आणि प्रा. डॉ. योगिता औताडे, उपप्राचार्य तथा विभागप्रमुख, समुदाय आरोग्य परिचर्या विभाग यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला. सर्व विभागप्रमुख, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि सहकार्यामुळे विद्यार्थ्यांनी या महत्त्वपूर्ण उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. अग्निशमन आपत्ती प्रात्यक्षिकाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. अमोल टेमकर, प्रा. अमित कडू, सहयोगी प्राध्यापक निलेश म्हस्के, राहुल कडू, विशाल पुलाटे आणि श्री. प्रशांत अम्ब्रीत यांनी मॉक ड्रिलचे प्रभावी समन्वय व आयोजन केले. अग्निशमन आपत्ती प्रात्यक्षिक सराव हा बी.एस्सी. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि अनुभवसमृद्ध उपक्रम ठरला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अग्निसुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थितीतील प्रतिसाद याबाबत जागरूकता वाढली. त्याचबरोबर अशा परिस्थितीत आवश्यक असणारी व्यावहारिक कौशल्ये, आत्मविश्वास, जबाबदारीची भावना आणि व्यावसायिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत झाली. भविष्यातील परिचारिका म्हणून विद्यार्थ्यांना आपत्कालीन व आपत्तीजन्य परिस्थितीत सक्षमपणे कार्य करता यावे आणि रुग्ण तसेच समाजाच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी योगदान देता यावे, यासाठी प्रत्यक्ष अनुभवावर आधारित प्रशिक्षण उपक्रमांचे आयोजन महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यावसायिक विकासासोबतच गुणवत्तापूर्ण आणि सुरक्षित आरोग्यसेवा देण्यासाठी महाविद्यालयाची ही वचनबद्धता निश्चितच कौतुकास्पद आहे.

Fire Safety Drill : कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अग्निशमन आपत्ती प्रात्यक्षिक सरावाचे आयोजन Read More »

sushma andhare

Sushma Andhare : ‘महिला सक्षमीकरणाच्या पदावरून पब-बारचा व्यवसाय?’ सुषमा अंधारेंची रुपाली चाकणकरांवर टीका

Sushma Andhare : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी माजी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षांचे नाव पब-बारच्या व्यवसायाशी जोडले जात असेल, तर हा नैतिक अधिकाराचा गंभीर प्रश्न असल्याचे अंधारे यांनी म्हटले आहे. अमरावतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी विविध मुद्द्यांवर सरकार आणि संबंधित व्यक्तींवर टीका केली. रुपाली चाकणकर यांच्या कथित हॉटेल-पब-बार व्यवसायाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी प्रत्येकाला रोजगार करण्याचा अधिकार असल्याचे मान्य केले. पब किंवा बारचा व्यवसाय करणे हा कायद्याच्या चौकटीतील व्यवसाय असेल तर त्याला कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असलेल्या व्यक्तीचे नाव बारच्या मालकीण म्हणून चर्चेत येत असेल, तर नैतिकतेच्या दृष्टीने हा प्रश्न निर्माण होतो, असे अंधारे यांनी म्हटले. महिला आयोग ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि महिलांवरील अन्यायाविरोधात काम करणारी संस्था आहे. त्यामुळे या पदावर असलेल्या व्यक्तीबाबत अशा प्रकारच्या चर्चा होणे गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांवरील लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये नाव येण्यापासून ते पब-बार व्यवसायापर्यंतच्या मुद्द्यांचा संदर्भ देत अंधारे यांनी चाकणकरांवर निशाणा साधला. या प्रकरणावरून त्यांनी महिला आयोगाच्या कामकाजाबाबतही प्रश्न उपस्थित केले. रुग्णालयातील घटनेवरून सरकारवर सवाल अमरावतीतील रुग्णालयातील घटनेवरूनही सुषमा अंधारे यांनी सरकारला धारेवर धरले. २०२२ मध्ये याच रुग्णालयात अशाच प्रकारची घटना घडली होती. त्या घटनेचा चौकशी अहवाल अद्याप समोर आलेला नाही, असा दावा त्यांनी केला. रुग्णालयातील विविध कामांसाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी निधीसाठी पाठपुरावा केला होता. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून रुग्णालयाला निधी उपलब्ध करून दिला जातो. या समितीचे प्रमुख पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत. मात्र, रुग्णालयासाठी निधी उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असल्याचा आरोप अंधारे यांनी केला. याच मुद्द्यावरून त्यांनी नवनीत राणा यांच्या हनुमान गढीच्या विकासासाठी देण्यात आलेल्या निधीचा संदर्भ देत सरकारला प्रश्न विचारला. रुग्णालयासाठी निधी उपलब्ध नाही, असे सांगितले जाते; मग हनुमान गढीसाठी १२१ कोटी रुपये कसे उपलब्ध झाले?, असा सवाल त्यांनी केला. हनुमान गढीवर मोठ्या संख्येने नागरिक येत असल्याबाबत पोलिसांनी दिलेल्या अहवालावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. चुकीचा अहवाल देणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. लहान मुलांच्या जीवाशी संबंधित प्रकरण असल्याने हा विषय गंभीरपणे हाताळण्याची गरज असल्याचे अंधारे यांनी सांगितले. औषध निरीक्षक भरती रद्द केल्याचे स्वागत औषध निरीक्षक भरती प्रक्रियेत पेपरफुटीचा आरोप झाल्यानंतर सरकारने भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे सुषमा अंधारे यांनी स्वागत केले. मात्र, केवळ परीक्षा रद्द करून प्रश्न सुटणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पेपर फुटला कसा? पेपर फोडणारे कोण होते? त्यांना कधी अटक केली जाणार? असे प्रश्न त्यांनी सरकारला विचारले. पेपरफुटीमागील व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. याशिवाय ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी मेहनत घेतली आणि ज्यांची वयोमर्यादा पुढील भरतीच्या वेळी संपणार आहे, त्यांच्या भवितव्याचे काय, असा सवालही अंधारे यांनी उपस्थित केला. पेपरफुटीची जबाबदारी सरकारची असल्याने संबंधित उमेदवारांना न्याय देण्यासाठी सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. बाळांना वाचवणाऱ्या परिचारिकांचा सन्मान करा अमरावतीतील रुग्णालयात घडलेल्या घटनेच्या वेळी बाळांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या परिचारिकांचे अंधारे यांनी कौतुक केले. संकटाच्या काळात या परिचारिकांनी दाखवलेले धैर्य महत्त्वाचे असल्याचे सांगत, त्यांना सरकारी सेवेत कायम करण्यात यावे, पुरस्कार देण्यात यावा आणि शौर्यपदकाने सन्मानित करावे, अशी मागणी त्यांनी केली. रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्था, निधी आणि प्रशासनाच्या कामकाजाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचेही अंधारे यांनी सांगितले. एकूणच, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर केलेली टीका, अमरावतीतील रुग्णालयाच्या निधीचा मुद्दा आणि औषध निरीक्षक भरतीतील पेपरफुटी या तीनही विषयांवरून सुषमा अंधारे यांनी सरकारला लक्ष्य केले. या सर्व प्रकरणांमध्ये सरकारने केवळ घोषणा न करता चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि संबंधितांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

Sushma Andhare : ‘महिला सक्षमीकरणाच्या पदावरून पब-बारचा व्यवसाय?’ सुषमा अंधारेंची रुपाली चाकणकरांवर टीका Read More »

Manoj Jarange Patil

Manoj Jarange : मुंबई आंदोलनावरुन मनोज जरांगे पाटील आक्रमक; सरकारला थेट इशारा

Manoj Jarange : मुंबईतील आंदोलनांवर निर्बंध घालण्याच्या राज्यसरकारच्या निर्णयावरून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. दक्षिण मुंबईतील आझाद मैदान वगळता इतर ठिकाणी आंदोलन, धरणे किंवा मोर्चा काढण्यास निर्बंध घालण्याच्या निर्णयाला त्यांनी तीव्र विरोध केला आहे. मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने येणार असल्यानेच सरकारने हे नवे नियम लागू केल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात. मागण्या मान्य झाल्या तर मुंबईत आंदोलन करण्याची वेळच येणार नाही. मात्र, मागण्या प्रलंबित ठेवून आंदोलनाला परवानगी नाकारली, तरी आपला आंदोलनाचा निर्धार कायम राहील, असा स्पष्ट इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. मुंबईतील आंदोलनांसाठी सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी करताना जरांगे पाटील यांनी आपण कायद्याचा सन्मान करत असल्याचे स्पष्ट केले. आंदोलनासाठी प्रशासनाकडे परवानगीचा अर्ज करण्यात आला आहे. त्यामुळे सरकारने परवानगी द्यावी; मात्र परवानगी दिली नाही तरी आंदोलनापासून माघार घेतली जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. सरकारवर निशाणा साधताना जरांगे पाटील यांनी, जनतेनेआणि विशेषतः मराठा समाजाने सरकारला सत्तेवर बसवले, पण आता त्याच समाजाला मुंबईत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला. मुंबईतील आंदोलनांवर निर्बंध घालण्यामागे मराठा समाजाच्या संभाव्य आंदोलनाचीच भीती असल्याचेही त्यांनी म्हटले. मुंबईतील नागरिकांनी आंदोलनाच्या काळात काही दिवस सहकार्य करावे, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले. मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य केल्या, तर मुंबईत येण्याची गरजच भासणार नाही. मात्र, मागण्या मान्य न झाल्यास मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईत दाखल होईल, असा इशारा त्यांनी दिला. “मराठे मुंबईत जाणार आहेत, त्यामुळे मुद्दामून सरकारने हे केलं. यात झाकून ठेवण्यासारखं काहीच नाही… आम्ही कायद्याचा सन्मान करतो. आम्ही तुम्हाला परवानगीचा अर्ज दिला आहे. तुम्ही परवानगी द्या, नाहीतर नका देऊ.” दरम्यान, २९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे आंदोलन करण्यात येणार असल्याचे जरांगे पाटील यांनी पुन्हा स्पष्ट केले. या आंदोलनानंतर मुंबईतील आंदोलनाची तारीख निश्चित केली जाईल, असे त्यांनी सांगितले. मुंबई आंदोलनाची तारीख जाहीर झाल्यानंतर मराठा समाजाने तयारीत राहावे, वाहनांना किक मारून मुंबईच्या दिशेने निघावे आणि आंदोलनात विजय मिळवूनच परत यायचे, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. फडणवीस सरकारने दादागिरी करू नये, असा थेट इशारा देत जरांगे पाटील यांनी आझाद मैदानासह मुंबईतील विविध ठिकाणी आंदोलन करण्याची भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे आगामी काळात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा आणि आंदोलनाची वेळ येऊ नये, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली आहे. दुसरीकडे, मुंबईतील कायदा सुव्यवस्था आणि आंदोलनांवरील निर्बंधांचा मुद्दा आता पुन्हा चर्चेत आला असून, २९ ऑगस्टच्या अंतरवाली सराटी येथील आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Manoj Jarange : मुंबई आंदोलनावरुन मनोज जरांगे पाटील आक्रमक; सरकारला थेट इशारा Read More »

sugar

Sugar Prices: साखरेचे दर वाढले; ऊसाच्या साखरेला स्वस्त पर्याय कोणता?

Sugar Prices: साखरेच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर परिणाम होऊ लागला आहे. चहा, मिठाई आणि विविध खाद्यपदार्थांसाठी साखरेचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने दरवाढीची झळ थेट ग्राहकांना बसत आहे. अशा परिस्थितीत ऊसाशिवाय इतर कोणत्या स्रोतांपासून साखर किंवा गोड पदार्थ तयार होऊ शकतात, याकडेही लक्ष वेधले जात आहे. ऊस हा जगातील साखरेचा प्रमुख स्रोत असला, तरी शुगर बीटपासूनही मोठ्या प्रमाणावर साखर तयार केली जाते. युरोप आणि अमेरिकेत बीटपासून साखर उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. बीटपासून तयार होणाऱ्या रिफाइंड साखरेतील सुक्रोजचे प्रमाण ऊसाच्या साखरेच्या जवळपास असल्याने चव आणि वापराच्या दृष्टीने दोन्हीमध्ये फारसा फरक जाणवत नाही. याशिवाय गोड ज्वारीपासूनही गोड सिरप तयार केला जातो. या ज्वारीच्या देठात असलेल्या गोड रसापासून सिरप तयार करता येतो. काही प्रक्रियांच्या माध्यमातून त्यापासून साखरेचे दाणेही तयार करता येतात. मात्र, भारतात या पद्धतीने होणारे उत्पादन ऊसाच्या तुलनेत अत्यल्प आहे. खजूर हा देखील गोड पदार्थांचा एक स्रोत आहे. खजुरापासून डेट शुगर आणि डेट सिरप तयार केले जातात. नैसर्गिक गोडवा असल्याने त्यांचा विविध खाद्यपदार्थांमध्ये वापर होतो. मात्र, उत्पादन मर्यादित असल्याने हे पदार्थ सामान्य साखरेपेक्षा महाग असतात. नारळाच्या फुलांच्या रसापासून कोकोनट शुगर तयार केली जाते. रस आटवून तयार होणाऱ्या या साखरेचा रंग किंचित तपकिरी असून त्याला कॅरॅमलसारखी चव असते. मात्र, किंमत जास्त असल्याने ती सर्वसामान्य साखरेचा स्वस्त पर्याय ठरत नाही. तसेच ताडाच्या रसापासून पाम शुगर तयार केली जाते. भारतातील काही भागांसह आशियातील अनेक देशांमध्ये तिचा पारंपरिक वापर आहे. ही साखर ऊसाच्या साखरेपेक्षा महाग असली तरी कोकोनट शुगरच्या तुलनेत तुलनेने स्वस्त पडते. मका आणि कसावा यांच्यापासूनही गोड पदार्थ तयार केले जातात. मक्यातील स्टार्चवर प्रक्रिया करून ग्लुकोज सिरप आणि हाय-फ्रक्टोज कॉर्न सिरप तयार केला जातो. बिस्किटे, सॉफ्ट ड्रिंक्स आणि विविध पॅकेज्ड खाद्यपदार्थांमध्ये या स्वीटनर्सचा वापर केला जातो. कसावा किंवा टॅपिओकामधील स्टार्चवर प्रक्रिया करूनही ग्लुकोज आणि इतर स्वीटनर्स तयार करता येतात. दरम्यान, मेपलच्या झाडाच्या रसापासून तयार होणारा मेपल सिरप हा देखील लोकप्रिय गोड पदार्थ आहे. कॅनडा आणि अमेरिकेतील थंड प्रदेशात त्याचे उत्पादन होते. मात्र, किंमत अधिक असल्याने भारतीय घरांमध्ये तो नियमित वापरासाठी साखरेचा व्यवहार्य पर्याय नाही.

Sugar Prices: साखरेचे दर वाढले; ऊसाच्या साखरेला स्वस्त पर्याय कोणता? Read More »

breakfast tips

Breakfast Tips : सकाळी उठल्यानंतर ‘या’ 3 स्वस्त पदार्थांचा आहारात करा समावेश; पचनालाही मिळेल फायदा

Breakfast Tips : दिवसाची सुरुवात आपण कशा पद्धतीने करतो, याचा परिणाम आपल्या दिवसभराच्या आहारावर आणि ऊर्जेवर होऊ शकतो. अनेक जण सकाळचा नाश्ता टाळतात किंवा उठल्यानंतर लगेच चहा-बिस्किटांवर भागवतात. मात्र शरीराला दिवसाच्या सुरुवातीलाच योग्य पोषण मिळणे महत्त्वाचे आहे. यासाठी महागडे ड्रायफ्रूट किंवा महागडी हेल्थ फूड उत्पादने घेण्याची गरज नाही. घरात सहज उपलब्ध होणारे आणि तुलनेने स्वस्त पदार्थही सकाळच्या आहाराचा चांगला भाग ठरू शकतात. पौष्टिक आहारात फळे, भाज्या, कडधान्ये, संपूर्ण धान्य आणि प्रथिनांचे स्रोत यांचा समावेश केल्याने पचनक्रिया आणि एकूण आरोग्यासाठी आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होते. फायबरयुक्त पदार्थ आहाराचा महत्त्वाचा भाग मानले जातात. भिजवलेले शेंगदाणे ठरू शकतात स्वस्त पर्याय शेंगदाणे हा सर्वसामान्यांच्या घरात सहज मिळणारा आणि तुलनेने स्वस्त पदार्थ आहे. त्यामध्ये प्रथिने, फायबर आणि चांगल्या प्रकारचे फॅट्स आढळतात. त्यामुळे सकाळच्या आहारात मर्यादित प्रमाणात शेंगदाण्यांचा समावेश केल्यास पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटण्यास मदत होऊ शकते. काही जण शेंगदाणे रात्री पाण्यात भिजवून सकाळी खातात. भिजवलेले शेंगदाणे खाण्याची ही पद्धत अनेक घरांमध्ये पारंपरिक आहे. मात्र प्रत्येक व्यक्तीची पचनशक्ती वेगळी असते. शेंगदाणे खाल्ल्यानंतर गॅस, पोटफुगी किंवा अस्वस्थता जाणवत असेल, तर त्याचे सेवन कमी करणे किंवा टाळणे योग्य ठरू शकते. शेंगदाण्याची अॅलर्जी असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. केळी : सहज उपलब्ध आणि पटकन खाता येणारे फळ केळी हे स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारे फळ आहे. त्यामध्ये कार्बोहायड्रेट्ससह पोटॅशियम आणि इतर पोषक घटक असतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात केळ्याचा समावेश करणे हा सोपा पर्याय ठरू शकतो. विशेषतः सकाळी वेळ कमी असणाऱ्या व्यक्तींसाठी एक फळ खाणे हा जड नाश्त्यापेक्षा सोपा पर्याय असू शकतो. मात्र फक्त केळे खाऊन पूर्ण नाश्ता झाल्याचे मानणे योग्य नाही. अधिक संतुलित आहारासाठी केळ्यासोबत दूध, दही, शेंगदाणे किंवा इतर प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करता येतो. फळे खाण्यासाठी ठरावीक एकच वेळ असते किंवा ती फक्त रिकाम्या पोटीच खाल्ली पाहिजेत, असा ठोस वैज्ञानिक नियम नाही. व्यक्तीच्या आहारपद्धती आणि आरोग्याच्या गरजेनुसार फळांचे सेवन करता येते. भिजवलेल्या मनुका : गोड चवीसोबत फायबर मनुका हा आणखी एक सहज उपलब्ध होणारा पदार्थ आहे. त्यामध्ये नैसर्गिक साखर आणि काही प्रमाणात फायबर तसेच विविध सूक्ष्म पोषक घटक असतात. काही लोक रात्री मनुका पाण्यात भिजवून सकाळी खातात. भिजवलेल्या मनुकांचा समावेश संतुलित आहाराचा एक भाग म्हणून करता येतो. मात्र मनुका नैसर्गिकरीत्या गोड असल्याने त्याचे प्रमाणही लक्षात घेणे गरजेचे आहे. विशेषतः रक्तातील साखरेशी संबंधित समस्या असलेल्या व्यक्तींनी आपल्या आहारातील एकूण कार्बोहायड्रेट आणि साखरेचे प्रमाण लक्षात घेऊन आहार ठरवावा. सकाळचा नाश्ता का महत्त्वाचा? रात्रभराच्या उपवासानंतर सकाळचा आहार शरीराला ऊर्जा आणि पोषक घटक देण्याचे काम करतो. मात्र नाश्ता म्हणजे केवळ पोट भरणे नव्हे. त्यामध्ये प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा संतुलित समावेश असणे अधिक महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, फक्त चहा आणि बिस्किटांऐवजी पोहे, उपमा, अंडी, दही, फळे, कडधान्ये किंवा शेंगदाणे यांसारखे पदार्थ आहारात समाविष्ट करता येतात. अशा आहारामुळे शरीराला विविध प्रकारचे पोषक घटक मिळतात. पचन सुधारण्यासाठी फक्त एक पदार्थ पुरेसा नाही सकाळी एखादा विशिष्ट पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया पूर्णपणे सुधारते किंवा दिवसभर थकवा जाणवत नाही, असा दावा करणे योग्य नाही. पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी संपूर्ण आहारपद्धती, पुरेसे पाणी, नियमित शारीरिक हालचाल आणि योग्य झोप यांनाही तितकेच महत्त्व आहे. फायबरयुक्त पदार्थ जसे की फळे, भाज्या, डाळी आणि संपूर्ण धान्य आहारात असणे पचनासाठी उपयुक्त ठरते. पुरेसे पाणी पिणे आणि नियमित शारीरिक हालचाल करणेही महत्त्वाचे आहे. सकाळी काय टाळावे? सकाळची सुरुवात अतिप्रमाणात साखर, तेलकट पदार्थ किंवा अत्यंत प्रक्रिया केलेल्या पदार्थांनी करण्याची सवय टाळणे चांगले. जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ काही व्यक्तींमध्ये अॅसिडिटी, अपचन किंवा पोटफुगी वाढवू शकतात. त्याऐवजी घरच्या घरी तयार केलेला संतुलित नाश्ता घेणे अधिक योग्य ठरू शकते. नाश्ता किती आणि कोणता असावा हे व्यक्तीचे वय, शारीरिक हालचाल, कामाचे स्वरूप आणि आरोग्याच्या गरजांनुसार बदलते. दिवसभर उत्साही राहण्यासाठी या गोष्टीही महत्त्वाच्या फक्त सकाळी एखादा पदार्थ खाल्ल्याने दिवसभर ऊर्जा टिकत नाही. त्यासाठी दिवसभर संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. पुरेसे पाणी पिणे, वेळेवर जेवणे आणि दीर्घकाळ एकाच जागी बसून न राहता नियमित हालचाल करणे याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.यासोबतच रात्रीची पुरेशी आणि नियमित झोपही दिवसभरातील ऊर्जा आणि एकाग्रतेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कोणाला विशेष काळजी घ्यावी? शेंगदाणे किंवा इतर पदार्थांची अॅलर्जी असणाऱ्या व्यक्तींनी ते पदार्थ खाणे टाळावे. तसेच मधुमेह, किडनीचे आजार, पचनाशी संबंधित दीर्घकालीन समस्या किंवा इतर वैद्यकीय स्थिती असल्यास आहारात मोठा बदल करण्यापूर्वी डॉक्टर किंवा नोंदणीकृत आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

Breakfast Tips : सकाळी उठल्यानंतर ‘या’ 3 स्वस्त पदार्थांचा आहारात करा समावेश; पचनालाही मिळेल फायदा Read More »

sim card

New SIM Rules: नवीन SIM कार्ड घ्यायचे आहे? आधी ‘हे’ नियम जाणून घ्या

New SIM Rules:   नवीन SIM कार्ड घेण्यापूर्वी आता तुमच्या नावावर आधीपासून किती मोबाईल कनेक्शन सुरू आहेत, याची माहितीअसणे गरजेचे आहे. बनावट कागदपत्रांद्वारे SIM कार्ड घेणे, मोबाईल कनेक्शनचा गैरवापर आणि सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी दूरसंचार विभागाने (DoT) मोबाईल कनेक्शनबाबत नियम कडक केले आहेत. त्यामुळे ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त SIM कार्ड तुमच्या नावावर असतील, तर नवीन कनेक्शन मिळण्यात अडचण येऊ शकते. एका व्यक्तीच्या नावावर किती SIM कार्ड असू शकतात? दूरसंचार विभागाच्या नियमानुसार, भारतातील सामान्य नागरिकाच्या नावावर जास्तीत जास्त 9 मोबाईल कनेक्शन असू शकतात. ही मर्यादा एखाद्या एका कंपनीपुरती मर्यादित नाही. म्हणजेच तुमच्याकडे Jio, Airtel, Vi, BSNL किंवा इतर कंपन्यांचे SIM कार्ड असले तरी सर्व सक्रिय कनेक्शन एकत्र मोजले जातात.  उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीच्या नावावर Airtel चे 3, Jioचे 3 आणि Viचे 3 नंबर असतील, तर एकूण 9 कनेक्शन पूर्ण झाले असे समजले जाईल. अशा परिस्थितीत दहावे SIM कार्ड घेण्यासाठी अर्ज केल्यास नवीन कनेक्शन मिळणार नाही. या राज्यांमध्ये मर्यादा 6 SIMची असम, जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये ही मर्यादा आणखी कमी आहे. या भागातील ग्राहकाच्या नावावर जास्तीत जास्त 6 मोबाईल कनेक्शन ठेवता येतात. त्यामुळे या भागातील एखाद्या ग्राहकाकडे आधीच 6 सक्रिय नंबर असतील, तर नवीन SIM कार्ड घेता येणार नाही.  नवीन SIM घेण्यापूर्वी कंपन्या काय तपासणार? नवीन SIM कार्डसाठी अर्ज केल्यानंतर संबंधित टेलिकॉम कंपनी ग्राहकाच्या नावावर आधीपासून किती मोबाईल कनेक्शन आहेत, याची पडताळणी करेल. जर ग्राहकाने निर्धारित मर्यादा आधीच पूर्ण केली असेल, तर अतिरिक्त मोबाईल कनेक्शन देण्यास नकार दिला जाऊ शकतो.  या प्रक्रियेचा उद्देश केवळ SIMची संख्या नियंत्रित करणे नाही, तर एका व्यक्तीच्या ओळखपत्राचा वापर करून मोठ्या प्रमाणावर SIM कार्ड घेऊन त्यांचा गैरवापर होऊ नये, हा देखील आहे. तुमच्या नावावर किती SIM आहेत हे कसे तपासाल? तुमच्या नावावर सध्या किती मोबाईल नंबर सक्रिय आहेत, हे घरबसल्या तपासता येते. यासाठी केंद्र सरकारच्या संचार साथी (Sanchar Saathi) पोर्टलवर उपलब्ध असलेल्या ‘Know Mobile Connections in Your Name’ या सुविधेचा वापर करता येतो. ही सुविधा TAFCOP म्हणूनही ओळखली जाते. दूरसंचार विभागाच्या अधिकृत पोर्टलवर या सुविधेद्वारे तुमच्या नावावर जारी झालेल्या मोबाईल कनेक्शनची माहिती पाहता येते.  संचार साथीच्या अधिकृत पोर्टलवर तपासा यासाठी सामान्यतः तुमचा चालू मोबाईल नंबर, कॅप्चा आणि OTPच्या माध्यमातून पडताळणी करावी लागते. त्यानंतर तुमच्या नावावर नोंद असलेल्या मोबाईल कनेक्शनची माहिती स्क्रीनवर दिसते.  अनोळखी नंबर तुमच्या नावावर असेल तर? समजा, तुम्ही संचार साथी पोर्टलवर तुमच्या नावावर असलेल्या मोबाईल नंबरची यादी तपासली आणि त्यात असा नंबर आढळला जो तुम्ही कधी घेतलाच नाही. अशा वेळी ही बाब दुर्लक्षित करू नका. संबंधित नंबरबाबत पोर्टलवरून रिपोर्ट करता येतो. तसेच तुम्ही वापरत नसलेले किंवा आता आवश्यक नसलेले कनेक्शनही तपासून त्याबाबत योग्य पर्याय निवडता येतो. दूरसंचार विभागाच्या प्रक्रियेनुसार संशयास्पद कनेक्शनची पुन्हा पडताळणी केली जाऊ शकते आणि पडताळणी अयशस्वी झाल्यास ते कनेक्शन बंद केले जाऊ शकते.  जुना नंबर बंद केला असेल तर काय? अनेक लोक जुना मोबाईल नंबर वापरणे बंद करतात आणि नवीन नंबर घेतात. मात्र जुना नंबर अधिकृतपणे बंद किंवा निष्क्रिय झाला आहे की नाही, याची खात्री न केल्यास तुमच्या नावावर सक्रिय कनेक्शनची संख्या वाढू शकते. त्यामुळे नवीन SIM घेण्यापूर्वी जुन्या नंबरची स्थिती तपासणे फायदेशीर ठरते. विशेषतः अनेक वर्षांपासून वापरत नसलेले नंबर तुमच्या नावावर आहेत का, हे संचार साथीच्या माध्यमातून तपासता येते. सरकारने हे नियम कडक का केले? मोबाईल SIM कार्डचा वापर आता फक्त फोन कॉलसाठी होत नाही. बँकिंग, UPI, सोशल मीडिया, ई-कॉमर्स, OTP आणि अनेक डिजिटल सेवांसाठी मोबाईल नंबरचा वापर केला जातो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या नावावर अनधिकृत SIM कार्ड सक्रिय असणे गंभीर ठरू शकते. दूरसंचार विभागाने बनावट कागदपत्रांवर घेतलेल्या मोबाईल कनेक्शनविरोधातही मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे. विभागाच्या माहितीनुसार, बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतलेल्या संशयित मोबाईल कनेक्शनचे विश्लेषण करून लाखो कनेक्शन डिस्कनेक्ट करण्यात आले आहेत.

New SIM Rules: नवीन SIM कार्ड घ्यायचे आहे? आधी ‘हे’ नियम जाणून घ्या Read More »

maruti baleno facelift

Maruti Baleno Facelift सप्टेंबरमध्ये येणार; लूकपासून फीचर्सपर्यंत काय बदलणार?

Maruti Baleno Facelift : प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये लोकप्रिय असलेल्या मारुती सुझुकी बलेनोच्या नव्या फेसलिफ्ट मॉडेलची उत्सुकता आता वाढली आहे. कंपनी 5 सप्टेंबर 2026 रोजी बलेनो फेसलिफ्ट भारतीय बाजारात सादर करण्याची शक्यता आहे. टेस्टिंगदरम्यान या कारचे प्रोटोटाइप अनेकदा रस्त्यावर दिसून आले असून, त्यावरून कारच्या डिझाइन आणि फीचर्समध्ये काही महत्त्वाचे बदल होण्याचे संकेत मिळाले आहेत. समोरच्या डिझाइनमध्ये मोठा बदल नव्या बलेनो फेसलिफ्टमध्ये सर्वाधिक बदल कारच्या फ्रंट प्रोफाइलमध्ये पाहायला मिळू शकतात. टेस्टिंग मॉडेलवरून नवीन ग्रिल, अपडेटेड फ्रंट बंपर आणि नव्या डिझाइनची अलॉय व्हील्स मिळण्याची शक्यता आहे. स्पाय शॉट्सनुसार ग्रिलचा आकार सध्याच्या मॉडेलपेक्षा अधिक स्लीक असू शकतो. हेडलॅम्प आणि बूमरँग-शेप LED DRLs मात्र मोठ्या प्रमाणात कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे. मागील बाजूस फार मोठा बदल अपेक्षित नसला तरी बंपर किंवा लाइटिंगमध्ये किरकोळ अपडेट मिळू शकतात. इंटिरिअरमध्ये मिळू शकतात नवीन सुविधा बलेनो फेसलिफ्टच्या केबिनचा बेसिक डॅशबोर्ड लेआउट सध्याच्या मॉडेलसारखाच राहण्याची शक्यता आहे. मात्र, ग्राहकांना अधिक प्रीमियम अनुभव देण्यासाठी नवीन सीट अपहोल्स्ट्री, अॅम्बियंट लायटिंग आणि सिंगल-पेन सनरूफ यांसारख्या सुविधा जोडल्या जाऊ शकतात. सध्याच्या 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसोबत ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, हेड-अप डिस्प्ले, 360-डिग्री कॅमेरा आणि 6-स्पीकर ऑडिओ सिस्टम यांसारखी उपकरणे पुढेही कायम राहण्याची शक्यता आहे. इंजिनमध्ये मोठा बदल होणार का? सध्या उपलब्ध माहितीनुसार फेसलिफ्टमध्ये पॉवरट्रेनमध्ये मोठा बदल करण्याऐवजी विद्यमान इंजिन पर्याय कायम ठेवण्याची शक्यता अधिक आहे. नव्या बलेनोमध्ये 1.2-लिटर नैसर्गिकरित्या अॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळू शकते. हे इंजिन सुमारे 89.7 PS पॉवर आणि 113 Nm टॉर्क देते. त्यासोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT गिअरबॉक्सचे पर्याय मिळू शकतात. ग्राहकांसाठी CNG व्हेरिएंटही पुढे सुरू राहण्याची शक्यता आहे. काही आधीच्या अहवालांमध्ये टर्बो-पेट्रोल किंवा हायब्रिड पॉवरट्रेनची शक्यता व्यक्त करण्यात आली होती; मात्र सध्याच्या ताज्या रिपोर्ट्समध्ये विद्यमान 1.2-लिटर पेट्रोल आणि CNG सेटअप कायम राहण्याकडे अधिक संकेत आहेत. त्यामुळे अंतिम इंजिन स्पेसिफिकेशनची अधिकृत घोषणा होईपर्यंत या बाबतीत निश्चित निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. किंमत किती असू शकते? सध्याच्या मारुती बलेनोची एक्स-शोरूम किंमत साधारण ₹5.99 लाखांपासून ₹9.17 लाखांपर्यंत आहे. फेसलिफ्टमध्ये डिझाइन आणि फीचर्स वाढल्यामुळे नवीन मॉडेलची किंमत सध्याच्या कारपेक्षा थोडी जास्त ठेवली जाऊ शकते. मात्र, कंपनीने अद्याप अधिकृत किंमत जाहीर केलेली नाही. त्यामुळे अंतिम किंमत आणि व्हेरिएंटनुसार फीचर्स लॉन्चच्या वेळीच स्पष्ट होतील. कोणाशी होणार थेट सामना? नवी बलेनो फेसलिफ्ट भारतीय प्रीमियम हॅचबॅक बाजारात ह्युंदाई i20, टाटा अल्ट्रोज आणि टोयोटा ग्लान्झा यांना टक्कर देईल. विशेषतः सनरूफ, अॅम्बियंट लायटिंग आणि इतर आधुनिक फीचर्सचा समावेश झाल्यास बलेनोला या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध आणखी मजबूत करण्याचा कंपनीचा प्रयत्न असू शकतो. ग्राहकांसाठी काय महत्त्वाचे? बलेनोच्या नव्या फेसलिफ्टमध्ये पूर्णपणे नवीन जनरेशनपेक्षा डिझाइन आणि फीचर्सवर भर देण्यात आल्याचे दिसते. त्यामुळे सध्याची बलेनो आवडणाऱ्या ग्राहकांना परिचित आकार आणि इंजिनसोबत अधिक आधुनिक लूक व काही अतिरिक्त सुविधा मिळू शकतात.

Maruti Baleno Facelift सप्टेंबरमध्ये येणार; लूकपासून फीचर्सपर्यंत काय बदलणार? Read More »