DNA मराठी

latest news

abhijit deepke

Abhijit Deepke : CJP राजकीय पक्ष म्हणून नव्हे, तर दबावगट म्हणून काम करणार

Abhijit Deepke : सीजेपी (CJP) च्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर संस्थापक अभिजीत दीपके यांनी महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या सीजेपी निवडणुकीच्या राजकारणात उतरणार नसून लोकांच्या प्रश्नांवर सरकारवर दबाव निर्माण करणारा प्रभावी दबावगट म्हणून काम करेल, असे त्यांनी सांगितले. देशातील युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सध्या सत्तेची नव्हे, तर मजबूत लोकचळवळीची गरज असल्याचे दीपके यांनी नमूद केले. त्यामुळे संघटना आपले आंदोलन आणि जनजागृतीचे काम अधिक व्यापक करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीत संघटनेच्या पुढील वाटचालीवर सविस्तर चर्चा झाली. विविध राज्यांतील कार्यकर्ते आणि समर्थकांकडून आलेल्या सूचनांचा आढावा घेण्यात आला. सध्या राजकीय पक्ष स्थापन करण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणे आणि सरकारला जबाबदार धरणे, यावरच संघटना लक्ष केंद्रित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, भविष्यातील राजकीय पर्याय पूर्णपणे बंद नसल्याचे संकेत देत, योग्य वेळ आल्यास संघटना पुढील निर्णय घेईल, असेही दीपके यांनी स्पष्ट केले. मात्र, सध्या सीजेपीची प्राथमिकता ही लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणे आणि जनआंदोलन अधिक मजबूत करणे हीच राहणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

Abhijit Deepke : CJP राजकीय पक्ष म्हणून नव्हे, तर दबावगट म्हणून काम करणार Read More »

img 20260805 wa0000

Vaishali Nagwade राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष

Vaishali Nagwade : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुपाली चाकणकर यांच्या पदमुक्तीनंतर हे पद रिक्त होते. आज मुंबई येथे पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्या हस्ते नागवडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. वैशाली नागवडे या मूळच्या पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील असून, अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विश्वासू कार्यकर्त्या म्हणून त्यांची पुणे जिल्ह्यात ओळख आहे. यापूर्वी अजित पवार यांनी त्यांच्यावर महानंदा दूध संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवली होती. पुणे ग्रामीण भागात महिला कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन उभारण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. दरम्यान, पक्षातील विविध घडामोडींमध्ये रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेविरोधात अनेकदा भूमिका घेतल्यामुळे वैशाली नागवडे या चर्चेतही राहिल्या होत्या. त्यांच्या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीत नव्या राजकीय समीकरणांना चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Vaishali Nagwade राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष Read More »

sunetra pawar

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांवरील वक्तव्याने राजकीय वाद; राष्ट्रवादी काँग्रेसचा पलटवार

Sunetra Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणात सुनेत्रा पवार यांच्यावरील एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने सुनेत्रा पवार यांचा उल्लेख “गुंगी गुडिया” असा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी महिला नेत्यांबाबत अशा प्रकारची अवमानकारक भाषा वापरणे योग्य नसल्याचे सांगत काँग्रेसवर टीका केली. तसेच, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात विरोधकांकडून याच शब्दांत हिणवले जात होते, याची आठवण करून देत आज काँग्रेसकडून अशाच प्रकारची भाषा वापरली जाणे विरोधाभासी असल्याचे त्यांनी म्हटले. या वक्तव्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांवर टीका करताना सभ्य भाषेचा वापर करावा, अशी अपेक्षाही राष्ट्रवादी काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आली. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा शाब्दिक संघर्षाला सुरुवात झाली आहे.

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांवरील वक्तव्याने राजकीय वाद; राष्ट्रवादी काँग्रेसचा पलटवार Read More »

sunetra pawar dcm

Sunetra Pawar: रात्री अकरापर्यंत बैठका अन् सकाळी सातला रुग्णालयात हजेरी; सुनेत्रा पवार बीडसाठी ‘ॲक्शन मोडमध्ये

Sunetra Pawar: गुरुवारी रात्री अकरा वाजेपर्यंत प्रशासनाशी विकासकामांचा आढावा, लोकप्रतिनिधींसोबत चर्चा, नागरिकांच्या अडचणी… आणि अवघ्या काही तासांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी सकाळी सात वाजता उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात दाखल झाल्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘ॲक्शन मोड’ने त्यांनी खऱ्या अर्थाने बीडचे पालकत्व स्वीकारल्याची भावना बीडकरांनी व्यक्त केली. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांनी स्वतःहून बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारले होते. त्यानंतर ज्या झपाट्याने त्यांनी विकासकामांना गती दिली, मोठ्या निधीला मंजुरी मिळवून दिली आणि प्रशासनाला कामाला लावले, त्यामुळे बीडकरांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्यांच्या अकाली निधनानंतर हा विकासाचा वेग कायम राहील का, सुरू असलेल्या कामांचे काय होईल, अशी चिंता बीडकरांच्या मनात होती. मात्र सुनेत्रा अजित पवार यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्याने त्या चर्चांना नवी दिशा मिळाली आहे. गुरुवारी सलग बैठका घेऊन रात्री जवळपास अकरा वाजेपर्यंत विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी नागरिकांच्या अडचणीही ऐकून घेतल्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी सात वाजता जिल्हा रुग्णालयात पोहोचून आरोग्य सेवांची पाहणी, सुरू असलेल्या कामांचा आढावा आणि अधिकाऱ्यांना दिलेल्या स्पष्ट सूचनांतून त्यांनी कामालाच सर्वोच्च प्राधान्य असल्याचा संदेश दिला. बीडच्या विकासाचा धागा तुटू दिला जाणार नाही. सुनेत्रा पवार यांनी केवळ पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारलेली नाही, तर ती कृतीशील आणि परिणामकारक पद्धतीने पार पाडण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या कामाच्या झपाट्यामुळे बीडकरांच्या अपेक्षांना पुन्हा नवी पालवी फुटल्याचे बोलले जात आहे. अजितदादा पवार यांनी दाखवून दिलेल्या विकासाच्या वाटेवर आता सुनेत्रा पवार त्याच तळमळीने पुढे जात असल्याचे चित्र या दोन दिवसांच्या दौऱ्यातून स्पष्टपणे समोर आले. त्यामुळे बीडच्या विकासाला पुन्हा वेग मिळेल, अशी आशा जिल्ह्यातील नागरिकांकडून व्यक्त होताना दिसत आहे.

Sunetra Pawar: रात्री अकरापर्यंत बैठका अन् सकाळी सातला रुग्णालयात हजेरी; सुनेत्रा पवार बीडसाठी ‘ॲक्शन मोडमध्ये Read More »

Income Sources : फक्त पगारावर अवलंबून राहू नका! ‘या’ चार मार्गांनी तयार करा अतिरिक्त उत्पन्न

Income Sources : देशात वाढती महागाई, बदलती आर्थिक परिस्थिती आणि भविष्यातील आर्थिक गरजा लक्षात घेता केवळ मासिक पगारावर अवलंबून राहणे आता अनेकांना पुरेसे ठरत नाही. नोकरी असली तरी अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण केल्यास आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होते. यामुळे आकस्मिक खर्च भागवणे, बचत वाढवणे आणि भविष्यासाठी भक्कम आर्थिक नियोजन करणे सोपे होते. आर्थिक तज्ज्ञही उत्पन्नाचे एकापेक्षा अधिक स्रोत असावेत, असा सल्ला देतात. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय मानला जातो. नियमित आणि शिस्तबद्ध गुंतवणूक केल्यास कालांतराने चांगला परतावा मिळू शकतो. मात्र, गुंतवणुकीपूर्वी जोखीम समजून घेणे आणि आपल्या आर्थिक उद्दिष्टांनुसार निर्णय घेणे आवश्यक आहे. भाडे उत्पन्नाचा पर्याय घर, फ्लॅट, दुकान किंवा इतर मालमत्ता असल्यास ती भाड्याने देऊन दरमहा नियमित उत्पन्न मिळवता येते. मालमत्तेचे योग्य व्यवस्थापन केल्यास हा उत्पन्नाचा स्थिर आणि विश्वासार्ह स्रोत ठरू शकतो. फ्रीलान्सिंग आणि ऑनलाइन काम डिजिटल युगात नोकरीसोबतच अतिरिक्त कमाई करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. लेखन, ग्राफिक डिझाइन, व्हिडिओ एडिटिंग, वेब डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग, ऑनलाइन क्लास, कंटेंट क्रिएशन किंवा सोशल मीडिया व्यवस्थापन यांसारख्या कौशल्यांच्या माध्यमातून घरी बसूनही उत्पन्न मिळवता येते. आपल्या वेळेनुसार हे काम करता येत असल्याने अनेक जण हा पर्याय स्वीकारत आहेत. लहान व्यवसाय सुरू करा घरगुती उद्योग, ऑनलाइन व्यवसाय, खाद्यपदार्थ विक्री, हस्तकला, कपड्यांचा व्यवसाय किंवा इतर छोट्या उद्योगातूनही अतिरिक्त उत्पन्न मिळवता येते. सुरुवातीला कमी भांडवलात व्यवसाय सुरू करून अनुभव आणि ग्राहकसंख्या वाढल्यानंतर त्याचा विस्तार करता येतो. आर्थिक सुरक्षिततेसाठी ठरू शकते फायदेशीर एका उत्पन्नाच्या स्रोतावर अवलंबून राहिल्यास नोकरी गमावणे किंवा उत्पन्न कमी होणे यासारख्या परिस्थितीत आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. मात्र, उत्पन्नाचे अनेक स्रोत असल्यास अशा संकटांचा परिणाम कमी होतो. अतिरिक्त कमाईमुळे बचत वाढवणे, गुंतवणूक करणे आणि निवृत्तीनंतरची आर्थिक तयारी करणेही सोपे होते. तज्ज्ञांच्या मते, प्रत्येकाने आपल्या कौशल्यांचा, वेळेचा आणि उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून उत्पन्नाचे पर्यायी स्रोत तयार करण्याचा प्रयत्न करावा. यामुळे आर्थिक स्वावलंबन वाढते आणि भविष्यातील आर्थिक उद्दिष्टे अधिक सहजपणे पूर्ण करता येतात.

Income Sources : फक्त पगारावर अवलंबून राहू नका! ‘या’ चार मार्गांनी तयार करा अतिरिक्त उत्पन्न Read More »

narendracharya maharaj

Ram Mandir Theft : राम मंदिर चोरीप्रकरणी नरेंद्राचार्य महाराजांची मोठी मागणी; मंदिरे आचार्यांच्या ताब्यात द्यावीत

Ram Mandir Theft : राम मंदिरातील चोरीच्या घटनेवर जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचे म्हटले आहे. ही घटना अत्यंत निंदनीय असल्याचे सांगत त्यांनी हिंदूंची मंदिरे शासनाऐवजी अधिकृत शंकराचार्य, रामानंदाचार्य, वल्लभाचार्य आदी आचार्यांच्या समितीच्या ताब्यात देण्याची मागणी केली. नरेंद्राचार्य महाराज म्हणाले की, मंदिरांचे व्यवस्थापन आणि धार्मिक परंपरा जपण्याचे आवश्यक प्रशिक्षण शासनाकडे नाही. त्यामुळे मंदिरांचे संचालन आचार्यांच्या समितीकडे दिल्यास धार्मिक परंपरा आणि मंदिरांची पवित्रता अधिक प्रभावीपणे जपली जाईल. राम मंदिर चोरीप्रकरणी सरकारने तत्पर कारवाई करत आरोपींना अटक केली असली, तरी या घटनेमुळे भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून त्याची भरपाई होऊ शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना नरेंद्राचार्य महाराज यांनी सरकारने उचललेले पाऊल योग्य असल्याचे सांगितले. मात्र, केवळ राजीनामा देऊन प्रश्न सुटणार नाही. भविष्यात पेपरफुटीसारख्या घटना रोखण्यासाठी कठोर आणि प्रभावी कायदा करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Ram Mandir Theft : राम मंदिर चोरीप्रकरणी नरेंद्राचार्य महाराजांची मोठी मागणी; मंदिरे आचार्यांच्या ताब्यात द्यावीत Read More »

shrirampur crime

Shrirampur Crime: धर्माच्या नावावर गुन्हेगारीचे संरक्षण?

Shrirampur Crime : समाजात एखादी व्यक्ती धार्मिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक कार्याच्या माध्यमातून लोकप्रिय होत असते. परंतु त्याच व्यक्तीचे नाव वारंवार गंभीर गुन्ह्यांच्या तपासात, आरोपपत्रात किंवा पोलीस कारवाईत समोर येऊ लागले, की समाजाने आणि यंत्रणांनी स्वतःला काही कठोर प्रश्न विचारण्याची वेळ येते. प्रश्न एका व्यक्तीचा नसतो; प्रश्न असतो न्यायव्यवस्थेवरचा विश्वास, कायद्याची अंमलबजावणी आणि समाजाच्या नैतिक भूमिकेचा. अलीकडच्या काळात महाराष्ट्रातील काही भागांमध्ये धर्म, जात किंवा संघटनांच्या नावाने काही व्यक्तींना ‘रक्षक’ म्हणून उभे केले जाते. सोशल मीडियावरील प्रचार, मिरवणुका, वाढदिवसाचे बॅनर आणि समर्थकांच्या घोषणांमधून त्यांची प्रतिमा तयार केली जाते. परंतु जर अशाच व्यक्तींचे नाव वारंवार खून, खंडणी, मारहाण, दरोडे, मोक्का किंवा इतर गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणांत समोर येत असेल, तर समाजाने त्या प्रतिमेकडे चिकित्सक नजरेने पाहिले पाहिजे. कायद्याच्या दृष्टीने प्रत्येक आरोपी निर्दोष मानला जातो, जोपर्यंत न्यायालय दोष सिद्ध करत नाही. ही लोकशाहीची मूलभूत अट आहे. पण याचा अर्थ असा नाही की गंभीर आरोपांकडे समाजाने डोळेझाक करावी. एखाद्या व्यक्तीवर सातत्याने गुन्हे दाखल होत असतील, ती वारंवार अटक होत असेल किंवा संघटित गुन्हेगारीशी तिचे नाव जोडले जात असेल, तर त्या पार्श्वभूमीवर पोलीस, तपास यंत्रणा आणि सरकारी पक्षाची कार्यक्षमता तपासणे आवश्यक ठरते. अशा घटनांमध्ये आणखी एक धोकादायक प्रवृत्ती दिसते. गुन्हेगारीला धार्मिक किंवा सामाजिक ओळखीचे कवच मिळू लागते. समर्थकांचा एक वर्ग व्यक्तीच्या कथित सामाजिक कामांचा उल्लेख करून गंभीर आरोपांकडे दुर्लक्ष करतो. परिणामी, चर्चा व्यक्तीच्या कृत्यांवर न होता धर्म किंवा विचारसरणीच्या समर्थन-विरोधात वळते. हीच समाजासाठी सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे. गुन्हेगाराला धर्म नसतो त्याचा धर्म फक्त गुन्हा असतो. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी व्यक्तीच्या धर्म, जात, राजकीय संबंध किंवा लोकप्रियतेकडे न पाहता समान निकषांवर झाली पाहिजे. अन्यथा कायद्यावरील विश्वास कमी होतो आणि सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढते. आज गरज आहे ती व्यक्तिपूजेपेक्षा संस्थांवर विश्वास ठेवण्याची. पोलीस तपास निष्पक्ष असावा, सरकारी पक्षाने खटले प्रभावीपणे चालवावेत, साक्षीदारांचे संरक्षण व्हावे आणि न्यायालयीन प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी. तितकेच महत्त्वाचे म्हणजे समाजानेही कोणत्याही व्यक्तीचे समर्थन करताना तिच्या सार्वजनिक प्रतिमेबरोबर तिच्या सार्वजनिक उत्तरदायित्वाचाही विचार केला पाहिजे. प्रत्येक मोठ्या गुन्ह्यानंतर आरोपींची नावे चर्चेत येतात; परंतु त्याहून मोठा प्रश्न कायम राहतो गुन्हेगारी इतकी वाढूच कशी दिली जाते? प्रतिबंधात्मक पोलिसिंग, प्रभावी तपास, जलद न्याय आणि सामाजिक जबाबदारी या चारही गोष्टी एकत्र आल्या तरच अशा घटनांवर दीर्घकालीन नियंत्रण मिळवता येईल. लोकशाहीत कोणत्याही व्यक्तीला कायद्यापेक्षा मोठे स्थान नसते. धर्म, समाजकार्य किंवा लोकप्रियता ही न्यायप्रक्रियेची पर्यायी व्यवस्था होऊ शकत नाही. शेवटी टिकतो तो केवळ कायद्याचा अधिकार आणि न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास.

Shrirampur Crime: धर्माच्या नावावर गुन्हेगारीचे संरक्षण? Read More »

vilas ghule case

Vilas Ghule : विलास घुले प्रकरणाला नवे वळण; उमेश मानेविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल

Vilas Ghule : केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, ज्याला वाचवण्यासाठी विलास घुले यांनी धाव घेतली होती, त्या उमेश मानेविरुद्ध आता अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि धमकावल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घडामोडीमुळे संपूर्ण प्रकरणाचा तपास नव्या दिशेने सुरू झाला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, उमेश माने याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करून त्याचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तो वारंवार तिचे ब्लॅकमेलिंग करत होता. त्रास असह्य झाल्यानंतर महिलेने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीय पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना त्यांना धमकावून परावृत्त करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. महिलेने केलेल्या आरोपानुसार, त्यानंतरही तिचा छळ सुरूच राहिला. विलास घुले आणि उमेश माने हे वारंवार घराजवळ येऊन धमक्या देत होते. अखेर संबंधितांना समजावून सांगण्यासाठी दोन्ही बाजूंची भेट झाली. मात्र, तेथे झालेल्या हाणामारीत विलास घुले यांचा मृत्यू झाला. पीडित महिलेच्या कुटुंबाने हा प्रकार स्वसंरक्षणात घडल्याचा दावा केला आहे. दरम्यान, या प्रकरणात यापूर्वीच अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता उमेश मानेविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने तपासाचे स्वरूप अधिक व्यापक झाले असून, पोलीस सर्व आरोपांची सखोल चौकशी करत आहेत.

Vilas Ghule : विलास घुले प्रकरणाला नवे वळण; उमेश मानेविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल Read More »

spain vs france

Spain vs France : स्पेनचा दमदार विजय; फ्रान्सला पराभूत करत विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश

Spain vs France : फिफा विश्वचषक 2026 च्या पहिल्या उपांत्य फेरीत स्पेनने सर्वांना धक्का देत फ्रान्सवर 2-0 असा दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. अमेरिकेतील आर्लिंग्टन येथे झालेल्या या सामन्यात स्पेनने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत फ्रान्सच्या बलाढ्य संघाला पराभव केले. या विजयासह स्पेनने विश्वचषक जिंकण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. सामन्याच्या 22 व्या मिनिटाला मिकेल ओयारझाबाल याने पेनल्टीवर गोल करत स्पेनला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. युवा स्टार लामिन यामाल याच्यावर झालेल्या फाऊलमुळे स्पेनला ही पेनल्टी मिळाली. त्यानंतर 58 व्या मिनिटाला पेद्रो पोरो याने अप्रतिम गोल करत स्पेनची आघाडी 2-0 अशी भक्कम केली. फ्रान्सकडे किलियन एम्बाप्पे, उस्मान डेंबेले आणि मायकेल ओलिसे यांसारखे आक्रमक खेळाडू असूनही स्पेनच्या भक्कम बचावफळीसमोर त्यांना गोल करण्यात अपयश आले. या स्पर्धेत स्पेनची बचावफळी सात सामन्यांपैकी सहा सामन्यांत अभेद्य राहिली असून, संपूर्ण स्पर्धेत त्यांनी केवळ एकच गोल स्वीकारला आहे. प्रशिक्षकांच्या अचूक रणनीती आणि युवा खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे स्पेनने अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. आता अंतिम फेरीत स्पेनचा सामना इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी होणार आहे. दुसरीकडे, फ्रान्सला आता तिसऱ्या स्थानासाठीचा सामना खेळावा लागणार आहे.

Spain vs France : स्पेनचा दमदार विजय; फ्रान्सला पराभूत करत विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश Read More »

shrikant shinde

Shrikant Shinde : केंद्रीय मंत्रिमंडळ श्रीकांत शिंदेंना कॅबिनेट तर ओमराजे निंबाळकर राज्यमंत्री?

Shrikant Shinde : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव कॅबिनेट मंत्रिपदासाठी जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यांच्या नावाला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचीही पसंती असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, राज्यमंत्रीपदासाठी शिवसेनेत रस्सीखेच सुरू असून ओमराजे निंबाळकर, संजय जाधव आणि संजय दिना पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. नुकतेच ठाकरे गटातून शिंदे गटात दाखल झालेल्या सहा खासदारांपैकी एका नेत्याला ही संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत होणाऱ्या संभाव्य बैठकीमुळे या चर्चांना अधिक वेग आला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी लवकरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाल्यानंतर पक्षाच्या खासदारांची संख्या १३ वर पोहोचली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वाधिक खासदार असलेला पक्ष म्हणून शिवसेनेचे केंद्रातील राजकीय वजन वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाला अतिरिक्त मंत्रिपदे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार आणि संभाव्य मंत्र्यांच्या नावांबाबत अद्याप केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता दिल्लीतील घडामोडींवर लागल्या आहेत.

Shrikant Shinde : केंद्रीय मंत्रिमंडळ श्रीकांत शिंदेंना कॅबिनेट तर ओमराजे निंबाळकर राज्यमंत्री? Read More »