DNA मराठी

latest news

rain

IMD Rain Alert: पुढील तीन दिवस राज्यात धो धो पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

IMD Rain Alert: पुढील तीन दिवस राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता असल्याने काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची आणि गारपिटीची शक्यता आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि काही कोकण भागात हवामानाचा परिणाम अधिक जाणवू शकतो. वादळी वाऱ्याचा वेग 30 ते 60 किमी प्रति तास पर्यंत जाण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये गारपीटीचा धोका अधिक आहे. नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, पुणे, सोलापूर, सातारा, सांगलीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. तर नंदुरबार, धुळे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदियासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. कृषी विभागाकडून आवाहन • मेघगर्जना व पावसाची शक्यता लक्षात घेऊन काढणी झालेल्या पिकांचे सुरक्षित साठवण करावे. • शेतात ठेवलेले उत्पादन ताडपत्रीने झाकून ठेवावे. • वादळी वाऱ्याच्या शक्यतेमुळे शेतातील हलकी संरचना व शेती उपकरणे सुरक्षित ठेवावीत. • शेतामध्ये पावसाचे पाणी साचणार नाही यासाठी तात्काळ निचऱ्याची व्यवस्था करावी. पाणी साचल्यास मुळकुज व बुरशीजन्य रोग वाढू शकतात. सध्या राज्यातील अनेक भागात गहू,मक्का, रबी ज्वारी ही पिके काढणीच्या अवस्थेत आहेत. • काढणी केलेले उत्पादन पावसापासून संरक्षित ठिकाणी ठेवावे. • पुढील 24 तासांत काढणीस तयार असलेली पिके तातडीने काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. • शेतात मळणीसाठी ठेवलेले धान्य ताडपत्री किंवा प्लास्टिक आच्छादनाखाली ठेवावे. • ज्वारी पीक पिकलेल्या अवस्थेत असून पाऊस व वादळी वाऱ्यामुळे ज्वारीचे ताटे पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे कणसे खराब होऊन ज्वारीचे नुकसान होऊ शकते, म्हणून काढणी केलेली ज्वारी सुरक्षित ठिकाणी ठेवावी आणि शक्य नसल्यास पॉलिथिन पेपरने झाकून संरक्षण करावे.

IMD Rain Alert: पुढील तीन दिवस राज्यात धो धो पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी Read More »

Petrol Price: अहिल्यानगर जिल्ह्यात सुट्या पेट्रोल – डिझेल विक्रीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Petrol Price : – समाजमाध्यमांवर पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्याबाबत पसरत असलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केले आहेत. पेट्रोलियम नियम २००२ मधील तरतुदींचा आधार घेत काढण्यात आलेले हे आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत. या नव्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात उघड्यावर म्हणजे कॅन, बाटली किंवा डब्यात पेट्रोल आणि डिझेल देण्यावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांनी पेट्रोल आणि डिझेल केवळ वाहनांच्या इंधन टाकीतच भरावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत पेट्रोल किंवा डिझेलची खुल्या स्वरूपात म्हणजेच प्लास्टिक बाटली, कॅन, डबा किंवा इतर कोणत्याही भांड्यात विक्री करू नये, अशी सक्त मनाई करण्यात आली आहे. यासोबतच प्रशासनाने सर्व पेट्रोल पंप परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवणे आणि इंधन विक्रीच्या नोंदी नियमितपणे ठेवणे बंधनकारक केले आहे. या आदेशाचे काटेकोर पालन करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित पेट्रोल पंप मालक आणि व्यवस्थापक यांची राहील. जे कोणी या नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर ‘पेट्रोलियम नियम २००२’, ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३’ तसेच ‘आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५’ मधील तरतुदींनुसार दंडात्मक आणि फौजदारी स्वरूपाची कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. याशिवाय, सर्व पेट्रोलियम कंपन्यांच्या व्यवस्थापकांना जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर इंधनाचा पुरेसा साठा राहील याची दक्षता घेण्याचे निर्देशही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

Petrol Price: अहिल्यानगर जिल्ह्यात सुट्या पेट्रोल – डिझेल विक्रीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश Read More »

acid attack

Sangamner News : ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडितेला आर्थिक साहाय्य मंजूर

Sangamner News : संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे ११ वर्षीय मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याच्या घटनेच्या अनुषंगाने “पीडितांना नुकसानभरपाई देण्याबाबत योजना, २०२२” अंतर्गत पीडितेला ३ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय कदम यांनी दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे यांच्या निर्देशानुसार दिनांक १८ मार्च २०२६ रोजी संबंधित समितीची तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पीडितेच्या आईच्या बँक खात्यात तात्काळ १ लाख रुपयांची आर्थिक मदत जमा करण्यात आली. त्यानंतर दिनांक २४ मार्च २०२६ रोजी समितीची पुढील बैठक घेण्यात आली. या बैठकीत परिवीक्षा अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या गृह चौकशी अहवालाचे परीक्षण करून पीडितेच्या आईच्या खात्यात अतिरिक्त २ लाख रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली. अशा प्रकारे या प्रकरणात पीडितेला एकूण ३ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य मंजूर करून वितरित करण्यात आले.

Sangamner News : ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडितेला आर्थिक साहाय्य मंजूर Read More »

IMD Rain Alert: 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पाऊस

IMD Rain Alert : 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील नाकारता येत नाही. सध्याच्या अंदाजानुसार 18 ते 20 मार्च दरम्यान या हवामान घडामोडींची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

IMD Rain Alert: 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पाऊस Read More »

sunil tatkare

Sunil Tatkare: दिवंगत अजित पवारांच्या आवाजात खोटी, दिशाभूल करणारी ऑडिओ, व्हिडिओ क्लिप; कडक कारवाई करणार; सुनिल तटकरेंचा इशारा

Sunil Tatkare: काही स्वार्थी व्यक्ती राजकीय आणि सामाजिक हेतू साध्य करण्यासाठी दिवंगत अजित पवारांच्या आवाजात खोटी, दिशाभूल करणारी विधाने पसरवत आहेत. हे कृत्य अत्यंत गंभीर आणि दंडनीय गुन्हा असून संबंधित व्यक्तींनी अशा एआय उत्पन्न बनावट व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप्सचे वितरण त्वरित थांबवावे अन्यथा त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात दादांबद्दल आदर, प्रेम आणि विश्वासाची भावना आहे. त्या भावनेचा गैरफायदा घेऊन, लोकांमध्ये आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा हा घातक प्रयत्न आहे. मृत नेत्याची प्रतिमा अशा प्रकारे वापरणे हे अत्यंत नीच आणि निंदनीय कृत्य आहे. गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी सायबर कायदे आणि इतर लागू कायद्यांनुसार खटले दाखल करण्यास पक्ष वचनबद्ध आहे असेही सुनिल तटकरे यांनी म्हटले आहे. दरम्यान अशा कोणत्याही संशयास्पद ऑडिओ किंवा व्हिडिओ क्लिप फॉरवर्ड करू नयेत, असे आवाहन सुनिल तटकरे यांनी केले आहे. दिवंगत अजित पवार हे महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाने खोटा प्रचार करणे हे सामाजिक हितासाठी हानिकारक आहे आणि लोकशाही मूल्यांवर आघात करणारे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा सर्व कृत्यांचा तीव्र निषेध करतो आणि जबाबदार असलेल्यांनी या कृती तात्काळ थांबवाव्यात अशी मागणीही सुनिल तटकरे यांनी केली आहे.

Sunil Tatkare: दिवंगत अजित पवारांच्या आवाजात खोटी, दिशाभूल करणारी ऑडिओ, व्हिडिओ क्लिप; कडक कारवाई करणार; सुनिल तटकरेंचा इशारा Read More »

new chapter in the power struggle within the nationalist party

Sharad Pawar: वारसा, घाई आणि भीती : राष्ट्रवादीतील सत्तासंघर्षाचा नवा अध्याय

Sharad Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली. स्पष्टवक्तेपणा, निर्णयक्षमता आणि प्रशासनावरची पकड यामुळे ‘दादा’ हे केवळ एक व्यक्तिनाम न राहता एक राजकीय प्रवाह बनले होते. मात्र त्यांच्या पार्थिवाचे विसर्जन होण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये जी घाई सुरू झाली, ती केवळ अस्वस्थ करणारीच नव्हे तर अनेक प्रश्न उपस्थित करणारी ठरते. स्वर्गीय अजित पवार यांच्या जाण्यानंतर अवघ्या काही तासांत पक्षाची सूत्रे हातात घेण्याची धडपड सुरू झाली. प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ हे चार नेते अचानक केंद्रस्थानी आले. प्रश्न असा की, इतक्या वेगाने निर्णय घेण्याची गरज नेमकी कुणाला आणि का भासली? शोक, आत्मपरीक्षण आणि संघटनात्मक संवाद याऐवजी सत्तेची घाई दिसणे, हेच या साऱ्या प्रक्रियेचे भयावह वास्तव आहे. खरे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पुन्हा एकत्र यावेत, ही इच्छा शरद पवार आणि अजित पवार या दोघांचीही होती. त्या दिशेने प्रयत्नही झाले होते. मात्र शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली जाण्यास या चौघांचा ठाम विरोध होता, हे आता उघडपणे समोर येत आहे. मग प्रश्न उरतो हा विरोध राजकीय मतभेदांचा होता की वैयक्तिक भीतीतून जन्मलेला? आज सुमित्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्याकडे पक्षाची राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही जाऊ शकते. अजित पवार यांचा कणखरपणा, निर्णयातील ठामपणा आणि संघर्ष करण्याची वृत्ती सुमित्रा पवार यांच्यात कितपत उतरते, हे येणारा काळच ठरवेल. मात्र एवढे निश्चित की त्यांच्यासमोरचा रस्ता सोपा नाही. या साऱ्या घडामोडींमध्ये सर्वाधिक गोंधळात टाकणारा मुद्दा म्हणजे या चार नेत्यांना नेमकी कसली भीती वाटते? अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊ नयेत यासाठी पडद्यामागे प्रयत्न झाले, भाजपाचा हात धरला गेला, हेही आता लपून राहिलेले नाही. दादांचा निर्णय मात्र वेगळा होता. पक्ष स्वबळावर उभा राहावा, हीच त्यांची भूमिका होती. आज मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटात नेतृत्वाचा ठोस चेहरा दिसत नाही. उलट पक्ष ‘कोणी चालवत आहे’ यापेक्षा ‘कोणाच्या दबावाखाली चालतो आहे’ असा प्रश्न अधिक ठळकपणे समोर येतो. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ या चौघांवरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामुळे भाजपाच्या राजकीय चौकटीबाहेर जाण्याची त्यांची क्षमता मर्यादित आहे. परिणामी, हा पक्ष स्वतंत्र राजकीय भूमिका घेण्याऐवजी भाजपाच्या छायेत चालेल, अशी भीती वाटणे साहजिक आहे. दरम्यान, सुमित्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री शपथविधीची माहिती शरद पवार यांना नव्हती, असा त्यांचा दावा आहे. हे खरे असेल तर दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या एकत्र येण्याच्या शक्यतेवर सध्या तरी पडदा पडतो. संवादाऐवजी अविश्वास, समन्वयाऐवजी सत्तासंघर्ष आणि वारशाऐवजी स्वार्थ अशी ही सध्याची स्थिती आहे. अजित पवार यांचा राजकीय वारसा केवळ पदांनी जिवंत राहत नाही;तो मूल्यांमधून, निर्णयांमधून आणि स्वाभिमानातून पुढे जातो. तो वारसा टिकवायचा असेल तर घाई नव्हे, धैर्य लागेल. अन्यथा, राष्ट्रवादीतील ही घडामोड इतिहासात एका संधीच्या अपव्यय म्हणूनच नोंदली जाईल.

Sharad Pawar: वारसा, घाई आणि भीती : राष्ट्रवादीतील सत्तासंघर्षाचा नवा अध्याय Read More »

mangalprabhat lodha

Mangalprabhat Lodha : KEM च्या नावातील ‘एडवर्ड स्मारक’ उल्लेख काढा; मंत्री लोढांचे आदेश

Mangalprabhat Lodha : मुंबई मधील परळ येथील केईएम (किंग एडवर्ड मेमोरियल) रुग्णालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी रुग्णालयाच्या सामाजिक योगदानाचा गौरव केला. यावेळी केईएम रुग्णालय आणि सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय या नावातील ‘एडवर्ड स्मारक’ हा उल्लेख वगळण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना त्यांनी केली. या वक्तव्यामुळे केईएमच्या नावाबाबत राजकीय वादाला तोंड फुटले आहे. लोढा म्हणाले, “हे नाव ब्रिटिश राजवटीचे आणि गुलामगिरीचे प्रतीक आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाल्यानंतरही इंग्रजांच्या पाऊलखुणा कायम आहेत. मुंबई महापालिकेने याबाबत गांभीर्याने विचार करावा.” कार्यक्रमात त्यांनी रुग्णसेवा अधिक प्रभावी करण्यासाठीही महत्त्वाच्या सूचना केल्या. नागरिकांसाठी स्वतंत्र आरोग्य सुविधा केंद्र, आरोग्य स्वयंसेवकांसाठी बैठक व्यवस्था, विविध शासकीय आरोग्य योजनांची माहिती देणारे मार्गदर्शन केंद्र सुरू करावे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) च्या माध्यमातून देश-विदेशातील वैद्यकीय तज्ज्ञांशी सल्लामसलत करणारे कम्युनिकेशन सेंटर उभारावे, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना सामाजिक सेवेत सक्रिय सहभागी करून घेणे, एनएसएस व एनसीसीच्या माध्यमातून रुग्ण व नातेवाइकांना मदत करणे, डॉक्टरांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन यावर भर द्यावा. शंभर वर्षांच्या प्रवासावर आधारित स्मरणिका तयार करावी आणि कोविडसारख्या संकटातील केईएमच्या योगदानाचे दस्तऐवजीकरण व्हावे, अशी अपेक्षा लोढा यांनी व्यक्त केली. अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी रुग्णसेवेच्या पुढील नियोजनाची माहिती दिली. दरम्यान मंत्री लोढा यांच्या सूचनेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी तीव्र टीका केली. “नाव बदलल्याने संस्थेच्या कार्यपद्धतीत बदल होत नाही. औषधांची कमतरता, आवश्यक यंत्रसामग्री व उपकरणांची गरज किंवा रुग्णालयाच्या सर्वांगीण विकासाबाबत बोलणे अपेक्षित होते. मात्र, यांचा व्यवसाय केवळ धर्माच्या मुद्द्यांपुरताच मर्यादित आहे. अशी भूमिका देशाला मागे घेऊन जाणारी आहे. अहमदाबादचे नाव आधी बदला,” असा उपरोधिक टोला सावंत यांनी लगावला.केईएमच्या काही डॉक्टर, माजी विद्यार्थी आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडूनही या प्रस्तावाला विरोध होत असून, नाव बदलण्यापेक्षा रुग्णालयातील सुविधा, उपकरणे आणि विकासावर लक्ष केंद्रित करण्याची मागणी केली जात आहे. शताब्दी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेली ही चर्चा पुढील काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Mangalprabhat Lodha : KEM च्या नावातील ‘एडवर्ड स्मारक’ उल्लेख काढा; मंत्री लोढांचे आदेश Read More »

delhi high court on abortion

Delhi High Court on Abortion : गर्भपातसाठी पत्नीची घेणार निर्णय; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Delhi High Court on Abortion : दिल्ली उच्च न्यायालयाने महिलांना गर्भपातासाठी पतीची संमती घेणे अनिवार्य नाही असल्याचा मोठा निर्णय दिला आहे. हा निर्णय एका महिलेच्या बाबतीत आला जो तिच्या पतीपासून वेगळी राहत होती आणि 14 आठवड्यांची गर्भधारणा गर्भपात करू इच्छित होती. न्यायाधीश नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, महिलेवर तिच्या इच्छेविरुद्ध गर्भधारणा सुरू ठेवण्यासाठी दबाव आणता येत नाही. असे करणे तिच्या शरीरावरील आणि गोपनीयतेच्या अधिकाराचे गंभीर उल्लंघन आहे. न्यायालयाने मान्य केले की यामुळे महिलेचा मानसिक त्रास वाढतो. विशेषतः जेव्हा वैवाहिक संबंधात संघर्ष असतो तेव्हा महिलेचा स्वतःचा निर्णय सर्वोपरि असतो. उच्च न्यायालयाने असेही स्पष्ट केले की, या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम 312 लागू होत नाही कारण महिलेने तिचा अधिकार वापरला आहे. कायदा काय म्हणतो? न्यायालयाने गर्भपात कायदा (MTP Law) चा उल्लेख केला. या कायद्यात कुठेही पतीची संमती आवश्यक नाही. गर्भपात केल्याबद्दल खटल्याला सामोरे जाण्यापासून रोखणाऱ्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला महिलेने आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने महिलेची याचिका मंजूर केली, ज्यामध्ये असे म्हटले होते की गर्भपातासाठी निर्णय घेण्यात महिलेचा स्वावलंबन सर्वात महत्त्वाचा आहे. हा निर्णय महिलांच्या वैयक्तिक हक्कांना बळकटी देतो. पोटगी प्रकरणात दिलासा तर दुसरीकडे उच्च न्यायालयाने पोटगीशी संबंधित दुसऱ्या एका प्रकरणातही महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने म्हटले आहे की ठोस पुराव्याशिवाय पत्नी कमावते किंवा स्वतःचे पालनपोषण करण्यास सक्षम आहे असे गृहीत धरणे चुकीचे आहे. केवळ पतीच्या दाव्यावर पत्नीला स्वावलंबी मानले जाऊ शकत नाही. या प्रकरणात, महिलेने फक्त 11 वी पर्यंत शिक्षण घेतले होते. अंतरिम पोटगी ठरवताना गृहीतके नव्हे तर पुराव्याची आवश्यकता असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

Delhi High Court on Abortion : गर्भपातसाठी पत्नीची घेणार निर्णय; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय Read More »

img 20260107 wa0041

Pune Crime: पुण्यात पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या; एका लॉजमध्ये विष पिऊन संपवले जीवन

Pune Crime : पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका लॉज मध्ये एका पोलिस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सूरज मराठे असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते सांगली पोलिस दलात तासगाव येथे कार्यरत होते. अवघ्या 25 वर्षाचे असताना मराठे यांची सहायक पोलिस निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. पुणे जिल्ह्यातील देहू याठिकाणी त्यांचे कुटुंबीय वास्तव्यास आहे. सांगली पोलिस दलात कार्यरत असल्याने त्यांनी गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने सुट्टी टाकली होती. त्यांना गुडघ्याच्या त्रास असल्याने ते पुणे शहरात उपचारासाठी येत असत. यंदा सुद्धा पुण्यात उपचारासाठी आलेल्या मराठे यांनी सुट्टी टाकली होती. पुण्यात आल्यावर उपचारासाठी गेल्यावर ते पुन्हा लॉजवर आले आणि त्यांनी त्यांच्या आजाराला कंटाळून आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट मिळून आलेली आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Pune Crime: पुण्यात पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या; एका लॉजमध्ये विष पिऊन संपवले जीवन Read More »

agniveer

Agniveer New Rules : अग्निवीरांसाठी नवीन नियम! तोपर्यंत लग्न करता येणार नाही

Agniveer New Rules : अग्निवीर योजनेअंतर्गत भारतीय सैन्यात पर्मनंट होण्याचा स्वप्न पाहणाऱ्या अग्नीवीरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता अग्निवीरसाठी नवीन नियम लागू करण्यात आला आहे. या नवीन नियमानुसार आता अग्निवीरांना लग्नासाठी अट घालण्यात आली आहे. पर्मनंट सैनिक बनण्याची इच्छा असलेले अग्निवीराला सैन्यात पर्मनंट नियुक्ती मिळेपर्यंत लग्न करू शकत नाहीत. जर अग्निवीर या प्रक्रियेदरम्यान किंवा पर्मनंट सैनिक होण्यापूर्वी लग्न करत असेल तर त्यांना पर्मनंट सेवेसाठी अपात्र ठरवले जाईल. तसेच असे अग्निवीर पर्मनंट सेवेसाठी अर्ज करू शकणार नाहीत किंवा निवड प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार नाहीत असा नवीन नियम लागू करण्यात आला आहे. नवीन नियमानुसार, अग्निवीर भारतीय सैन्यात पर्मनंट सैनिक म्हणून नियुक्त झाल्यानंतरच लग्न करू शकतात. चार वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर, अग्निवीरांना संपूर्ण पुष्टीकरण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे चार ते सहा महिने वाट पहावी लागेल. अग्निवीर योजना 2022 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत भरती झालेली पहिली तुकडी आता त्यांची चार वर्षांची सेवा पूर्ण करत आहे. अग्निवीरांच्या 2022 च्या तुकडीतील सेवा कालावधी जून आणि जुलै 2026 च्या सुमारास संपेल असा अंदाज आहे. पहिल्या तुकडीमध्ये अंदाजे 20,000 तरुण होते, जे आता निवृत्त होत आहेत. या अग्निवीरांपैकी सुमारे 25 टक्के लोकांना भारतीय सैन्यात कायमस्वरूपी सैनिक होण्याची संधी मिळेल. निवड शारीरिक तंदुरुस्ती, लेखी परीक्षा आणि इतर निकषांवर आधारित असेल. निवड प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्ता आणि कामगिरीवर आधारित असेल. यशस्वी अग्निवीरांना सैन्यात पर्मनंट सेवा दिली जाईल. वृत्तांनुसार, लष्कराने असे म्हटले आहे की जर अग्निवीर या कालावधीत लग्न करत असेल तर त्यांना पर्मनंट सेवेच्या शर्यतीतून अपात्र ठरवले जाईल. अशा उमेदवाराचा अर्ज त्यांच्या पात्रतेकडे दुर्लक्ष करून स्वीकारला जाणार नाही. म्हणून, अग्निवीरांना हा नियम गांभीर्याने समजून घेण्याचा आणि त्याचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Agniveer New Rules : अग्निवीरांसाठी नवीन नियम! तोपर्यंत लग्न करता येणार नाही Read More »