DNA मराठी

DNA Marathi News

img 20250721 wa0003

Honey Trap : ओ बुलाती है मगर जाने का नही, ‘हनी ट्रॅप’ प्रकरण गाजतंय, पण तक्रारच नाही; पोलिस हतबल

Honey Trap : नाशिक शहरात सध्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या ‘हनी ट्रॅप’ प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ‘ती’ बुलावत होती, आणि तो गेला… मग सुरू झाला ब्लॅकमेलचा खेळ! सुरुवातीला तीन कोटी, नंतर थेट दहा कोटी रुपयांची मागणी झाली. अखेर प्रकरणाची वात खुलली, पण दोन्ही बाजूंनी लेखी तक्रार नाही. पोलिस मात्र संभ्रमात. मिळालेल्या माहितीनुसार, महसूल विभागातील अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यास सापळ्यात अडकवून, त्याच्याकडून प्रथम तीन कोटी रुपये उकळण्यात आले. पण हे पुरेसे न वाटल्याने पुन्हा दहा कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. अधिकाऱ्याने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर ‘ती’ महिला थेट पोलिस ठाण्यात पोहोचली. सुरुवातीला तोंडी तक्रार करण्यात आली, त्यानंतर काही दिवसांनी लेखी तक्रारीसाठी ती पुन्हा आली. दरम्यान, संबंधित अधिकारी याच काळात ठाणे येथे गेले असताना त्यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याचे समजते. तिथेच त्यांनी संबंधित महिलेविरोधात तक्रार दिली. पण काही दिवसांतच दोघांनीही परस्पर समजुतीने तक्रारी मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पोलिस यंत्रणा संभ्रमात आहे. कोणतीही अधिकृत तक्रार नसल्याने पुढील कायदेशीर कारवाई करणे कठीण ठरत आहे. या प्रकरणात काही बड्या नावांचा समावेश असल्याचीही कुजबुज सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी नाशिकमधील एका हॉटेलमध्ये तपास करून त्या हॉटेलची खोली सील करण्यात आली, अशी चर्चा रंगली होती. मात्र, नाशिक पोलिसांनी याचा अधिकृत इन्कार केला आहे. सध्या त्या मजल्यावर प्रवेश बंद करण्यात आला असून, परिसरात संशयाचे वातावरण आहे. प्रकरणाचा पुढचा रंग काय घेईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण सध्या तरी ‘हनी ट्रॅप’च्या गूढ गर्तेत प्रशासनही अडकले आहे, हे निश्चित.

Honey Trap : ओ बुलाती है मगर जाने का नही, ‘हनी ट्रॅप’ प्रकरण गाजतंय, पण तक्रारच नाही; पोलिस हतबल Read More »

eknath shinde

Eknath Shinde On Uddhav Thackeray: ठाकरेंची तीन वर्षे शिव्या-शाप देण्यात गेली; एकनाथ शिंदेंचा थेट वार

Eknath Shinde On Uddhav Thackeray: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विधिमंडळच्या मान्सून अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून माझ्या नावाने शिव्या आणि शाप दिले जात आहेत. मी काही छेडत नाही, पण एकदा छेडलं तर मग मीही सोडत नाही, अशा इशारा एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना दिला. एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीलाच टोला लगावत म्हटले की, पावसात जसं बेडूक उगवतात तसा रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पाहिला आहे. तिन्ही वर्षांपासून माझ्यावर शिव्या-शाप आणि आरोपच सुरु आहेत. ‘चल मेरे भाई, हात जोडता हूँ’ हे गाणं आठवतंय,” असा टोलाही त्यांनी लगावला. विश्वासघात केल्याची टीका शिंदेंनी आठवण करून दिली की, 2014 मध्ये मुंबईचं महापौरपद फडणवीसांनी अर्ध्या तासात शिवसेनेला दिलं होतं. पण नंतर जेव्हा वेळ आली तेव्हा फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांचे फोनही उचलले नाहीत, असा आरोप करत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर विश्वासघात केल्याची टीका केली. मी कुणाचं ताट घेत नाही. आम्ही एक भाकर चार जण वाटून खाणारे लोक आहोत. मी ‘सोन्याचा चमचा’ कुणाला उद्देशून म्हटलं नाही. कोव्हिड काळात कोणी रुग्णांचे घास घेतले हे लोकांनी पाहिलंय. उद्धव ठाकरे यांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत शिंदे म्हणाले, या सगळ्यांना केमिकल लोचा झालाय का काय? एकीकडे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना शिव्या, दुसरीकडे फडणवीस यांना बुके. इतका द्वेष का? आपल्या भूमिकेवर ठाम राहात शिंदे म्हणाले, मी छेडत नाही पण कोणी छेडलं तर सोडतही नाही. सत्तेसाठी आम्ही कधीही तडजोड केली नाही, आणि करणारही नाही.

Eknath Shinde On Uddhav Thackeray: ठाकरेंची तीन वर्षे शिव्या-शाप देण्यात गेली; एकनाथ शिंदेंचा थेट वार Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis : राज्याच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट, पावसाळी अधिवेशनात 16 विधेयके मंजूर

Devendra Fadnavis : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकासह महत्त्वाची 16 विधेयके मंजूर करण्यात आली. तसेच अंतिम आठवडा प्रस्तावावरील उत्तरामध्ये महाराष्ट्राच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट केली आहे. सर्व निर्णय सामान्य जनतेच्या हितासाठी घेतले गेले असून, विकासाला वेग देण्याचे काम अधिवेशनात झाले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत अधिवेशनातील कामकाजाची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, यंदा राज्यात 90 टक्के पावसाची नोंद झाली असून, काही भागांत पूरपरिस्थितीही उद्भवली आहे. अशा ठिकाणी एनडीआरएफ व एसडीआरएफच्या माध्यमातून मदत पोहोचवण्यात आली असून, नुकसानग्रस्तांसाठी पंचनामे सुरू झाले आहेत. ज्या ठिकाणी पंचनामे पूर्ण झाले तेथे निधी वितरण करण्यात येत आहे. राज्यातील मोठ्या धरणांमध्ये 67 टक्के पाणीसाठा झाला आहे. यंदाचा खरीप हंगाम समाधानकारक ठरेल, असे ते म्हणाले. अधिवेशनात एकूण 16 विधेयके मंजूर करण्यात आली. त्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमाती आयोगांना वैधानिक दर्जा देणारी विधेयके, महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक, गौण खनिकर्म प्राधिकरण विधेयक, त्र्यंबकेश्वर-नाशिक कुंभमेळा प्राधिकरण विधेयक आणि मकोका कायद्यात अंमलपदार्थांचा समावेशासंबंधातील सुधारणा अशा अनेक महत्त्वाच्या विधेयकांचा समावेश होता. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा लोकशाही मार्गाने तयार केला असून, कोणालाही थेट अटक करण्याचा अधिकार यामध्ये नाही. संस्थांवर बंदी घालण्यासाठी न्यायालयीन समितीची परवानगी आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुरवणी मागण्यांतून मेट्रो प्रकल्प, महानगरपालिका, जिल्हा परिषद, तसेच पिण्याचे पाणी, महात्मा फुले जन आरोग्य योजना, शिष्यवृत्ती योजना यांना भरघोस निधी वितरित करण्यात आला आहे. दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या भत्त्यांमध्ये 1500 रुपयांवरून 2500 रुपये करण्यात आला असून, शिक्षक टप्पा अनुदान देखील जाहीर करण्यात आले. तसेच अनुकंपा धोरणात सुधारणा करण्यात आली आहे. पशुसंवर्धन क्षेत्राला कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय या अधिवेशनात घेण्यात आला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. विधीमंडळाच्या आवारात काल घडलेली घटना दुर्देवी असून अशी घटना यानंतर घडू नये, यासाठी विधानसभा अध्यक्षांनी दखल घेतली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Devendra Fadnavis : राज्याच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट, पावसाळी अधिवेशनात 16 विधेयके मंजूर Read More »

jaykumar rawal

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरव्यवहार प्रकरणात चौकशी होणार, मंत्री Jaykumar Rawal यांची घोषणा

Jaykumar Rawal : नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत केली. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी या प्रकरणात गंभीर स्वरूपाचे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. त्यानंतर याप्रकरणी कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. या विशेष तपास पथकाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, नागपूर असतील. जिल्हा पोलीस अधीक्षक, नागपूर हे सदस्य तर विभागीय सहनिबंधक, छत्रपती संभाजीनगर हे सदस्य सचिव असणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती, नागपूरच्या कामकाजाची सखोल चौकशी करणे, पी. एल. खंडागळे समितीने यापूर्वी सादर केलेल्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर महसुली हानीची जबाबदारी निश्चित करणे. सन 2017 मध्ये एल. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीतील गाळे वाटपातील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती, त्यांनी अहवाल बाजार समितीकडे सादरही केला होता त्या अहवालातील निष्कर्षानुसार तत्कालीन व विद्यमान संचालक मंडळातील सदस्यांनी तसेच नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील अधिकारी / कर्मचारी यांनी भ्रष्टाचार केला आहे का? याची चौकशी करणे. तथ्य असल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे काम समिती करणार आहे. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहाराचे पडताळणी करण्याकरीता एसआयटीला विशेष अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. या विशेष तपास पथकाने 30 दिवसांच्या आत आपला अहवाल शासनास करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरव्यवहार प्रकरणात चौकशी होणार, मंत्री Jaykumar Rawal यांची घोषणा Read More »

pratap sarnaik

Pratap Sarnaik : पत्रकारांच्या एसटी प्रवास सवलतीत सुधारणा होणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Pratap Sarnaik : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (रा.प. महामंडळ) बसेसमधून प्रवास करणाऱ्या पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत लवकरच सुधारणा केली जाणार आहे. तसेच काही नवीन सवलती लागू करण्याचा प्रस्तावही शासन पातळीवर विचाराधीन असून, याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. विधान भवनात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ पदाधिकाऱ्यांसोबत अधिस्वीकृती संदर्भातील बैठकीत ते बोलत होते. यावेळी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष दिलीप सपाटे आणि पदाधिकारी उपस्थित होते. सद्यस्थितीत अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना साध्या, निमआराम व शिवशाही (आसनी/शयनयान) बसप्रकारामध्ये 100% प्रवास भाड्याची सवलत मिळते. मात्र, या सवलतीवर 8,000 किमीची मर्यादा आहे. ही मर्यादा रद्द करण्याची मागणी वारंवार होत असून, ती मंजूर करण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असल्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. तसेच पत्रकारांना एसटीच्या सर्व बसेस मधून मोफत प्रवास करण्याची सवलत अनुज्ञेय करावी असे मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केली असल्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले. यामुळे पत्रकारांना जिल्हा व तालुका पातळीवर देखील सेवा देता येईल.

Pratap Sarnaik : पत्रकारांच्या एसटी प्रवास सवलतीत सुधारणा होणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक Read More »

raj thackeray

कोणाच्या हातात दिला महाराष्ट्र? आमदार पडळकर आव्हाड प्रकरणात Raj Thackeray स्पष्टच बोलले

Raj Thackeray: विधानभवन परिसरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याने एकच खळबळ उडाली असून आता या प्रकरणावरून राजकारण देखील तापायला सुरुवात झाली आहे. काल रात्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांसमोर ठिय्या आंदोलन करत आरोपींवर कारवाईची मागणी केली आहे. तर आता या प्रकरणात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया देत काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. राज ठाकरे म्हणाले की, काल विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली. ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडला, ‘ काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची ?’ सत्ता हे साधन असावं साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे वाट्टेल त्या लोकांना पक्षात घ्यायचं, त्या लोकांचा वापर इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेरेबाजी करण्यासाठी करायचा आणि पुन्हा राजकीय साधनशुचितेच्या गोष्टी बोलायच्या हा भंपकपणा आता तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आला असेल असं मी मानतो. मी तर मराठी जनतेलाच विचारेन, ‘कोणाच्या हातात दिला आहेत महाराष्ट्र?’ एका दिवसाचा खर्च दीड ते दोन कोटी रुपये मराठी भाषेसाठी, मराठी माणसाच्या अपमानासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हात उचलला तर त्याच्यावर, आमच्या पक्षावर तुटून पडणारे आता कुठे लपून बसलेत? जेंव्हा मराठी भाषेला किंवा मराठी माणसाच्या गळ्याला कोणी नख लावायचा प्रयत्न केला तर माझा महाराष्ट्र सैनिक त्या व्यक्तीला दणका देतो याचा मला अभिमान आहे कारण ते कृत्य हे व्यक्तिगत हेव्यादाव्यातून येत नाही तर ते माझ्या भाषेसाठी आणि माझ्या मराठी माणसासाठी असतं. माझ्या दिवंगत आमदाराने पण विधानभवनात एका मुजोर आमदाराला दणका दिला होता, तो व्यक्तिगत द्वेषातून नव्हता तर मराठीला कमी लेखायचा प्रयत्न केला होता म्हणून. पण यांचं काय? अचूक आकडेवारी जरी माझ्याकडे नसली तरी, एका जुन्या अंदाजानुसार अधिवेशनाच्या एका दिवसाचा खर्च हा किमान दीड ते दोन कोटी रुपये असतो. हे पैसे तुमच्या व्यक्तिगत शेरेबाजीसाठी वाया घालवायचे? असं राज ठाकरे म्हणाले. पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात इतके प्रश्न प्रलंबीत आहेत, राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, कंत्राटदारांची देणी रखडली आहेत, जिल्ह्यांना विकास निधी मिळत नाहीये. सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्रीच प्रश्न विचारत आहेत की अधिवेशन ही औपचारिकता उरली आहे का? या सगळ्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून माध्यमांना खाद्य पुरवण्यासाठी या उथळ गोष्टी घडू दिल्या जात आहेत? आज अशा लोकांना जर माफ केलं गेलं तर यापुढे हे प्रमाण मानून भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही. माध्यमांमध्ये जे काही थोडे सूज्ञ आवाज उरलेत त्यांना विनंती आहे की या भंपक प्रकारणांच्यात तुम्हाला कितीही गुंतवायचा प्रयत्न झाला तरी त्यात अडकू नका आणि सरकारला पण माझं आव्हान आहे की जर थोडी जरी साधनशुचिता शिल्लक असेल तर तुमच्या स्वतःच्या लोकांवर पण कारवाई करून दाखवा. जर ती तुम्हाला करायची नसेल तर हरकत नाही, मग मात्र मुजोर मराठी द्वेष्ट्याना माझे महाराष्ट्र सैनिक हात सोडून सरळ करतील तेंव्हा आम्हाला अक्कल शिकवू नका. असं देखील राज ठाकरे म्हणाले.

कोणाच्या हातात दिला महाराष्ट्र? आमदार पडळकर आव्हाड प्रकरणात Raj Thackeray स्पष्टच बोलले Read More »

jitendra awhad

Jitendra Awhad यांचा पोलिसांच्या गाडीसमोर कार्यकर्त्यांसह ठिय्या; विधान भवनात रात्री घडलं काय?

Jitendra Awhad : विधानभवन परिसरात काल दुपारी झालेल्या राड्याचे पडसाद रात्रभर उमटले. आमदार जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याला पोलिसांनी रात्री 12 वाजता विधानभवनात अटक केली. मात्र, ही गोष्ट जितेंद्र आव्हाड यांना कळताच ते तात्काळ विधानभवन परिसरात पोहोचले आणि पोलिसांच्या गाडीसमोर कार्यकर्त्यांसह ठिय्या दिला. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आमदार रोहित पवार देखील दाखल झाले. जितेंद्र आव्हाड ठिय्या आंदोलनावर ठाम असताना पोलिसांनी दीड वाजता आंदोलकांची धरपकड केली. जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवून ठेवली, पोलिसांनी आव्हाडांना गाडी खालून खेचत बाहेर काढले आणि नितीन देशमुख यांना पोलीस घेऊन गेले. या वेळी आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मकोकाचा आरोपी पसार होतो, जो मार खातो त्यांना पोलीस घेऊन जातात. विधानसभा अध्यक्षांनी शब्द दिला होता नितीनला सोडणार. मात्र, त्यांनी शब्द फिरवला, आम्हाला फसवलं. रात्री 1 वाजता या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आमदार रोहित पवार हे दाखल झाले. असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. तर दुसरीकडे रोहित पवार यांनी देखील या प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आम्ही नितीन देशमुखला पाठिंबा देतो. विधिमंडळात आव्हाड यांच्यावर हल्ला करायला मकोकाचे 4 माणसं तुम्ही घेऊन येतात. इथे बॉस अध्यक्ष आहेत, त्यांनी दिलेला शब्द जर ते पळत नसतील तर ही लोकशाहीची चेष्टा होत आहे. यांचा हा माज उतरवावं लागेल नाहीतर हे एवढे पुढे जातील , तुमच्या जमिनी घेतील आणि तुमच्या आया बहिणीला हात लावतील अशा विचारसरणीचे काही नेते आहेत. असं रोहित पवार म्हणाले. यानंतर जितेंद्र आव्हाड, रोहित पवार तसेच राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते हे मारिन ड्राइव्ह पोलीस स्टेशनला गेले, मात्र तिथे नितीन देशमुख हे नव्हते. पोलिसांनी आव्हाडांना सांगितले नितीन देशमुख यांना आझाद मैदान पोलीस स्टेशनला ठेवण्यात आलय. जितेंद्र आव्हाड, रोहित पवार हे पोलीस स्टेशनला पोहचले. मात्र, तिथेही नितीन देशमुख नसल्याने कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. आव्हाड यांना कळले की नितीन देशमुख यांना मेडिकलसाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलय. त्यानंतर आव्हाड, पवार कार्यकर्यांसह रुग्णालयात पोहोचले आणि नितीन देशमुख यांची भेट घेत त्यांची विचारपूस केली.

Jitendra Awhad यांचा पोलिसांच्या गाडीसमोर कार्यकर्त्यांसह ठिय्या; विधान भवनात रात्री घडलं काय? Read More »

sale of uncultivated land as agriculture

बोल्हेगाव जमीन व्यवहारात महसूल यंत्रणेचा गोंधळ! – पुरावे देऊनही कारवाई शून्य

कामगार तलाठी आणि मंडलाधिकारी यांनी संगनमताने बिनशेती जमीन ही शेती असल्याचे चुकीचे नोंदीत दर्शवले. त्यानंतर दस्त क्र. ९१७/२०२४ नुसार ती जमीन विक्रीस काढण्यात आली. यामधून शासनाची महसूल फसवणूक झाल्याचा ठपका कोरडे यांनी ठेवला आहे. Sale of uncultivated land as agriculture – अहिल्यानगर – बोल्हेगाव परिसरातील बिनशेती जमीन शेती म्हणून दाखवून विक्री केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, संबंधित महसूल अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करूनही अजूनपर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे पुणे येथील नागरिक मिलिंद कोरडे यांनी थेट गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे लेखी परवानगी मागितली आहे. दि. ५ जुलै २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केलेल्या लेखी तक्रारीत, कामगार तलाठी संदीप तरटे आणि मंडलाधिकारी दिलीप जायभाय यांनी संगनमताने बिनशेती जमीन ही शेती असल्याचे चुकीचे नोंदीत दर्शवले. त्यानंतर दस्त क्र. ९१७/२०२४ नुसार ती जमीन विक्रीस काढण्यात आली. यामधून शासनाची महसूल फसवणूक झाल्याचा ठपका कोरडे यांनी ठेवला आहे. तक्रार देऊनही प्रशासनाने ना चौकशी केली, ना स्पष्टीकरण दिलं, ना अहवाल दिला! यामुळे प्रकरण दबवले जात असल्याचा थेट आरोप तक्रारदाराने केला आहे. शासनाच्या महसुलाशी खेळ होत असूनही अधिकारी दुर्लक्ष करत आहेत, हे आश्चर्यकारक आहे. “मी सर्व पुरावे दिले आहेत. हे प्रकरण गंभीर असून, महसूल कर्मचाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवले. तरीही कारवाई होत नसेल, तर सामान्य नागरिक काय करू शकतो?” हे प्रकरण केवळ एका जमिनीच्या व्यवहाराचे नाही, तर प्रशासनाच्या ढिसाळपणाचा आणि भ्रष्ट यंत्रणेचा गंभीर नमुना आहे. पुरावे, नावे, तपशील सर्व काही स्पष्ट असूनही प्रशासन गप्प का? शासनाच्या महसुलात गंडा घालणाऱ्यांवर कार्यवाही टाळणं म्हणजे कायद्याला हरवण्यासारखं आहे. बोल्हेगाव प्रकरणात महसूल अधिकाऱ्यांनी नोंदी फेरफार करून शासनाची फसवणूक केल्याचे पुराव्यांसह स्पष्ट होत असतानाही, जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सामान्य नागरिक संतप्त आहेत. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे. अन्यथा प्रशासनातील हा भ्रष्टाचार अधिक बळावेल आणि सत्य बोलणाऱ्यांनाच परवानगी घ्यावी लागते,

बोल्हेगाव जमीन व्यवहारात महसूल यंत्रणेचा गोंधळ! – पुरावे देऊनही कारवाई शून्य Read More »

adulterated milk

adulterated milk “आरोग्याशी खेळ, सत्तेची ढाल – दोषींना संरक्षण कोण देतं?”  

लहान बालकांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या आरोग्याशी त्याचा थेट संबंध आहे. आणि अशा मूलभूत अन्नघटकामध्ये स्टार्च, साबण, सिंथेटिक रसायने आणि पावडर मिसळून विक्रीस टाकले जाणे, हा केवळ अप्रामाणिक व्यवसाय नाही, तर तो उघडपणे हत्या करण्यासारखा गुन्हा आहे. adulterated milk – Ahilyanagar News : पाथर्डी तालुक्यातील दूध संकलन केंद्रांमध्ये सुरू असलेला भेसळीचा उद्योग आणि त्यामागे असलेला राजकीय वरदहस्त हा केवळ एक स्थानिक गैरप्रकार नाही, तर ही आपल्या व्यवस्थेतील खोलवर रुजलेल्या अनास्थेची आणि नैतिक दिवाळखोरीची स्पष्ट साक्ष आहे. दूधासारखा नितळ आणि पवित्र मानला जाणारा अन्नघटक जर विषारी बनवून बाजारात विकला जात असेल, तर हे केवळ एक आर्थिक घोटाळा नाही, तर मानवी आरोग्यावर, विशेषतः बालकांवर केलेले अक्षम्य अपराध आहे. धायतडकवाडी येथील संत वामनभाऊ दूध संकलन केंद्राच्या नावाने चालवला जाणारा हा बनावट व्यवहार केवळ भेसळीतच मर्यादित नाही. येथे शासनाच्या दूध पूरक प्रोत्साहन योजनेंतर्गत लाखो रुपयांचे अनुदान उचलून, प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेली दुधाळ जनावरे दाखवून शासनाची फसवणूक झाली आहे. हे प्रकरण ज्या पद्धतीने उघडकीस आले, त्यावरून स्पष्ट होते की, यामागे एक संगनमत आहे आणि याला स्थानिक मोठ्या राजकारण्यांचे संरक्षण लाभले आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले असतानाही संबंधित अधिकाऱ्यांना ‘कारवाई करू नका’ असा आदेश स्थानिक मोठ्या नेत्याने दिला. ही घटना लोकशाहीसाठी आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेसाठी गंभीर इशारा आहे. प्रशासन जर एखाद्या मंत्र्याच्या किंवा स्थानिक नेत्याच्या दबावाखाली काम करत असेल, तर मग सामान्य जनतेचा काय? दूध हा आपल्या घराघरात दररोज वापरला जाणारा अत्यावश्यक घटक. लहान बालकांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या आरोग्याशी त्याचा थेट संबंध आहे. आणि अशा मूलभूत अन्नघटकामध्ये स्टार्च, साबण, सिंथेटिक रसायने आणि पावडर मिसळून विक्रीस टाकले जाणे, हा केवळ अप्रामाणिक व्यवसाय नाही, तर तो उघडपणे हत्या करण्यासारखा गुन्हा आहे. या प्रकरणात अमोल सखाराम धायतडक यांच्यावर झालेल्या तक्रारीनुसार, त्यांच्याकडे प्रत्यक्षात कोणतीही दुधाळ जनावरे नसताना, त्यांनी बनावट संकलन केंद्राच्या नावाखाली व्यवसाय उभा करून जनतेला विषारी दूध विकले आहे. हे दूध म्हणजे एका अर्थाने विषाचे घोट होते जे आपण आपल्या मुलांच्या हातात दिले. प्रश्न इतकाच आहे ही माहिती सरकारदरबारी पोहोचल्यावर खरोखर दोषींवर कारवाई होईल का? की या प्रकरणाची फाईलसुद्धा राजकीय दबावात गारद होईल? कारण ही केवळ एक घटनेची नव्हे, तर व्यवस्थेच्या भ्रष्ट पायाभरणीची कथा आहे. हा प्रकार आरोग्याच्या आणि नैतिकतेच्या दोन्ही आघाड्यांवर गंभीर धोका आहे. आज पाथर्डी, उद्या कोण? जर या विषारी धंद्यांना वेळेत आवर घातला नाही, तर शासन आणि प्रशासनाची विश्वासार्हता पार खिळखिळी होईल. दूधभेसळीप्रकरणी केवळ पोलिस चौकशी नव्हे, तर अन्न व औषध प्रशासन, दुग्धविकास विभाग, आणि लोकायुक्त यांची संयुक्त समिती नेमून सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.शेवटी, दूध विकण्याचा व्यवसाय म्हणजे सेवा आणि ती सेवा विषारी बनवणाऱ्यांसाठी कारागृह हेच योग्य ठिकाण आहे. आणि या सर्व प्रक्रियेला राजकीय वरदहस्त असेल, तर मग समाजानेच निर्धार करून, अशा नेत्यांना जनादेशातून दूर ठेवायला हवे.

adulterated milk “आरोग्याशी खेळ, सत्तेची ढाल – दोषींना संरक्षण कोण देतं?”   Read More »

leopard 2025 vadgav gupata dna marathi

दिवसाढवळ्या तीन बिबट्यांचे उघड मळ्यामध्ये वावरणे; वनविभागाच्या दुर्लक्षामुळे गावात भीतीचे वातावरण

विशेष म्हणजे हे बिबटे केवळ रात्रीच नव्हे, तर उजाड दिवसा देखील शेतांत, रस्त्यांवर व घरांच्या आजूबाजूला फिरताना दिसत आहेत. या घटनांचे मोबाईल व्हिडीओ व छायाचित्रे गावकऱ्यांनी चित्रीत केली असून, Three leopards exposed – अहिल्यानगर : नगर तालुक्यातील वडगाव येथील उघड मळा परिसरात सलग तीन बिबट्यांचे दिवसा दर्शन झाल्यामुळे संपूर्ण गावात भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरातील शेतकऱ्यांचा हंगामी शेतीचा काळ सुरू असून, दिवसा बिनधास्त वावरणाऱ्या बिबट्यांमुळे शेतकऱ्यांचे शेतात जाणेच कठीण झाले आहे. या परिस्थितीमुळे ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून उघड मळा परिसरात बिबट्यांचे मुक्त संचार सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. विशेष म्हणजे हे बिबटे केवळ रात्रीच नव्हे, तर उजाड दिवसा देखील शेतांत, रस्त्यांवर व घरांच्या आजूबाजूला फिरताना दिसत आहेत. या घटनांचे मोबाईल व्हिडीओ व छायाचित्रे गावकऱ्यांनी चित्रीत केली असून, ती सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत. video पहा…. वनविभागाचे अजब उत्तर या प्रकाराबाबत वनविभागाशी वारंवार संपर्क साधूनही काहीच ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. “मी पिंजरा देतो, तुम्ही बोकड्या आणि ट्रॅक्टर लावून पिंजरा लावा,” असे उत्तर वनअधिकाऱ्यांनी दिले असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. हे उत्तर ऐकून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वनविभागाच्या निष्काळजी आणि असंवेदनशील वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया शेतकरी राम पवार म्हणाले, “शेतीचा मोसम सुरू आहे. शेतीत राबणं गरजेचं असताना जर दिवसाढवळ्या बिबटे फिरत असतील, तर आम्ही शेतात कसं उतरायचं? जीव मुठीत धरून काम करायचं का?” त्यांच्या या उद्गारांमधून शेतकऱ्यांची असहायता आणि संताप स्पष्टपणे दिसून येतो. गावकऱ्यांनी यापूर्वीही या भागात बिबट्यांचे अस्तित्व असल्याबाबत तक्रारी केल्या होत्या, मात्र वनविभागाने दुर्लक्ष केल्याचा पुनरुच्चार यावेळीही झाला आहे. बिबट्यांचा बंदोबस्त तातडीने करावा ग्रामस्थांनी मागणी केली आहे की, तात्काळ पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, गस्त वाढवावी आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करावी. अन्यथा जर बिबट्यांचा हल्ला झाला तर त्याची पूर्ण जबाबदारी वनविभागाची राहील, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. स्थानिक प्रशासनाने आणि वनविभागाने यास गांभीर्याने न पाहिल्यास, भविष्यात कोणतीही जीवितहानी झाली, तर ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकतात, अशी शक्यताही व्यक्त होत आहे.

दिवसाढवळ्या तीन बिबट्यांचे उघड मळ्यामध्ये वावरणे; वनविभागाच्या दुर्लक्षामुळे गावात भीतीचे वातावरण Read More »