DNA मराठी

Congress

harshwardhan sapkal

Harshwardhan Sapkal: महाराष्ट्रात ‘जामतारा’ च्या माध्यमातून कोट्यवधींच्या लूटीचा गोरखधंदा; महाराष्ट्र पोलीस काय करते?

Harshwardhan Sapkal: ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सगळीकडे जोरात सुरु असून ‘जामतारा’ रॅकेट यासाठी कुप्रसिद्ध आहे पण ‘जमतारा’ प्रमाणेच महाराष्ट्रातही अशा बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून जगभरातील नागरिकांना फसवून शेकडो कोटी रुपयांचा गोरखधंदा सुरु आहे, असा गंभीर आरोप करत या प्रकरणात आयपीएस अधिकारी दत्ता कराळे व दोन पोलीस अधिक्षक यांचाही सहभाग असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. या रॅकेटला मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरचा आशिर्वाद असल्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस कॉलसेंटर आणि पैशांची हेराफेरी शक्यच नाही, असेही सपकाळ म्हणाले. गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी आयपीएस अधिकारी व सध्या नाशिकचे डीआयजी दत्ता कराळे यांचे संबंध असल्याचे व्हिडीओ नुकतेच प्रसार माध्यमांमध्ये दिसले, हे दत्ता कराळे व पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील व सोमनाथ घार्गे या दोघांचाही या बोगस कॉल सेंटरच्या रॅकेटशी संबंध असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. सीबीआयने दिनांक ८ ऑगस्ट २०२५ व ११ सप्टेंबर २०२५ रोजी नोंदवलेल्या एफआयआर नुसार नाशिक आणि इगतपुरी येथे छापे टाकून बोगस कॉल सेंटर रॅकेट चालवणाऱ्यांना अटक केली. सीबीआयला इगतपुरीत सुरु असलेल्या बोगस कॉल सेंटरची माहिती मिळाली व कारवाई करण्यात आली पण बोगस कॉल सेंटरचा सुगावा महाराष्ट्र पोलीसांना का लागला नाही? महाराष्ट्र पोलीस काय करत होते? हे प्रश्न उपस्थित होतो. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणाची सीबीआयकडून माहिती घेऊन उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? का नेहमीप्रमाणे ‘क्लीन चिट’ देणार? असा रोकडा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे. यापूर्वी कराळेंसह दोन्ही अधिकारी ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये कार्यरत होते. तेव्हा हे कॉल सेंटर तिथे सुरु होते. पोलिसांनी या कॉलसेंटरव छापा टाकला आणि नंतर संदीप सिंह, विशाल यादव या आरोपींना जुजबी कारवाई करून सोडून दिले. या तिन्ही अधिका-यांची नाशिक परिक्षेत्रात बदली झाल्यावर या आरोपींना हाताशी धरून कॉल सेंटर सुरु करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. विशेष हे म्हणजे हे सर्व आरोपी ठाणे, रायगड आणि पालघर परिसरातील रहिवाशी आहेत. पूर्वी या तिन्ही वरिष्ठ पोलीस अधिका-यांची पदस्थापना याच भागात होती आणि बोगस कॉलसेंटरही याच भागात सुरु होते. सीबीआय मुंबईच्या अॅंटी करप्शन ब्रँचचे अधिक्षक अमित वसावा यांनी ११ सप्टेंबर २०२५ रोजी दाखल केलेल्या एआयआरमधील नोंदीनुसार हे बोगस कॉल सेंटर सुरळीत चालू देण्यासाठी आरोपी गणेश कामनकर आणि त्याच्या भाऊ हे वरिष्ठ अधिका-यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सोने आणि क्रिप्टो करन्सीच्या रुपात लाभ (लाच) देत होते. राज्य सरकारला याची संपूर्ण माहिती असतानाही या अधिका-यांवर अद्याप कारवाई का केली नाही ? याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली. या रॅकेटचा पर्दाफाश करताना भोंदूबाबा अशोक खरात- आयपीएस दत्ता कराळे व बोगस रॅकेटमधून होणारा पैशाचा काळा धंदा या सर्वांची चौकशी होणे गरजेचे आहे. अशोक खरात प्रकरणात जो पैशाचा व्यवहार झाला, तो पैसा कोणाचा? हे बोगस कमाल सेंटर रॅकेट व अशोक खरात यांचे काय लागेबांधे आहेत? या कॉल सेंटरच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा केला का? व तो पैसा कोणाचा? आयपीएस दत्ता कराळे व त्यांचे दोन सहकारी पोलीस अधिक्षक यांची जिथे बदली होते, तिथे तिथे अशाच पद्धतीने बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून गोरखधंदा चालवायचे, या सर्वांची सखोल उच्चस्तरीय चौकशी करून व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही सपकाळ यांनी केली आहे. विधान परिषद निवडणूक..नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार असावा व विधान परिषदेला मविआचा चेहरा उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी करावी अशी काँग्रेस पक्षाची भूमिका होती पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मविआकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. आता विधान परिषदेला जर उद्धव ठाकरे उमेदवारी करणार नसतील तर काँग्रेस पक्षाला उदेवारी द्यावी अशी आमची भूमिका आहे. विधान परिषदेची एक जागा ही काँग्रेसचे नेते राजीव सातव यांची होती, त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती पण त्यांनी राजीनामा दिला, त्या जागेवर काँग्रेसचा उमेदवाराला बिनविरोध निवडून दिले पाहिजे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी बारामतीप्रमाणे संस्कृती व परंपरेचे पालन करावे, असे आवाहन सपकाळ यांनी केले आहे. महिलांना आरक्षण मिळावे ही काँग्रेसचीच भूमिका…महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असल्याचे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे व विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी स्पष्ट केलेले आहेच. मुळात राजकारणात महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाच्या सरकारने घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षण दिले, त्यानंतर सोनियाजी गांधी यांनी हे आरक्षण ५० टक्के करण्याची भूमिका घेतली. महिला आरक्षणाला कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही पण भाजपाने या विधेयकाच्या आडून मतदारसंघ पुनर्रचनेचा कुटील डाव आखला तर त्याला विरोध आहे. महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे, तो मात्र हाणून पाडू, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Harshwardhan Sapkal: महाराष्ट्रात ‘जामतारा’ च्या माध्यमातून कोट्यवधींच्या लूटीचा गोरखधंदा; महाराष्ट्र पोलीस काय करते? Read More »

vijay wadettiwar

Vijay Wadettiwar: शेतकरी कर्जमाफी फसवा फसवी, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा

Vijay Wadettiwar: सरकारने घोषित केलेली कर्जमाफी ही एक बनवाबनवी आहे. सरकार शेतकऱ्यांना भुलवत आहे,पण जोपर्यंत 7/12 कोरा होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा खऱ्या अर्थाने फायदा होणार नाही, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात केली. प्रसार माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, सध्याच्या कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांचे उर्वरित कर्ज कायम राहणार आहे.त्यामुळे त्यांना भविष्यात नवीन कर्ज मिळणे कठीण होईल. पीकविमा योजनेतून केवळ विमा कंपन्यांचे भले होत असून शेतकरी आजही मदतीपासून वंचित आहे.त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचा 7/12 कोरा केला पाहिजे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या फोडाफोडीला ऊत आला असून, राजकारणात कोणतीही नीतिमत्ता उरलेली नाही. कोणाला तरी आधी डोक्यावर घ्यायचे आणि नंतर पायाखाली तुडवायचे ही आता एक फॅशन झाली आहे, अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी फोडाफोडीचे राजकारणावर प्रतिक्रिया देताना टीका केली. राज्यातील सत्ताधारी गोटात सर्व काही आलबेल नसल्याचे सांगत वडेट्टीवार म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तेत असूनही अस्वस्थ आहेत, त्यांचे मंत्रीही अस्वस्थ आहेत. राज्याला कर्जबाजारी करून हे सत्तेचे खेळ सुरू आहेत,जनतेच्या प्रश्नांकडे बघायला वेळ नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली. मुंबई महापालिकेतील नगरसेवक निधीच्या मुद्द्यावरून वडेट्टीवार यांनी सरकारवर पक्षपातीपणाचा आरोप केला. राजकारण हे निवडणुकीपुरते मर्यादित असले पाहिजे. विकास निधी देताना मात्र सर्वांना समान न्याय मिळणे अपेक्षित आहे. मात्र, सध्याचे सरकार विरोधकांच्या नगरसेवकांना निधी न देता लोकशाहीची घातक पद्धत रुजवत आहे,असे ते म्हणाले. राज्यात लव्ह जिहादच्या मुद्द्यावर फाशीची मागणी करणारे सत्ताधारी पक्षाचे नेते महिला शोषणाच्या प्रकरणांवर गप्प का? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. चांगल्या घरातील महिलांचे शोषण होत असताना सरकारमधील लोकांचे तोंड शिवले आहे का? असा टोला लगावत त्यांनी हे सर्व मतांच्या राजकारणाचे धंदे असल्याची टीका केली.

Vijay Wadettiwar: शेतकरी कर्जमाफी फसवा फसवी, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा Read More »

election

Election Commission: ईव्हीएमची तपासणी आणि छाननी करण्याचा आदेश ऐतिहासिक, मुंबईत होणार तपासणी

Election Commission: भारताच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच, मुंबई उच्च न्यायालयाने ईव्हीएमची (EVMs) तपासणी आणि छाननी करण्यास परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांनी हा आदेश दिला आहे. या प्रकरणातील याचिकाकर्ते हे काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य आणि माजी मंत्री नसीम खान आहेत तर प्रतिवादी दिलीप लांडे आहेत. २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, शिंदेसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांनी, मुंबई उपनगर जिल्ह्यातील चांदिवली मतदारसंघातून नसीम खान यांचा पराभव केला. खान यांनी निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यासंदर्भात बोलताना नसीम खान म्हणाले की, भारताच्या इतिहासात आतापर्यंत असे कधीही घडलेले नाही की, निवडणुका पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाने (ECI) उमेदवार आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत EVM ची तपासणी किंवा तपासणी मोहीम राबवली असेल. “हा एक ऐतिहासिक आदेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एप्रिल २०२४ मधील निकालाचा संदर्भ देत नसीम खान म्हणाले की, “या निकालानुसार, निकालांच्या घोषणेनंतर प्रत्येक विधानसभा मतदार संघातील ५ टक्के ईव्हीएममधील म्हणजेच कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि VVPAT मधील ‘बर्न झालेली मेमरी’ (burnt memory) किंवा मायक्रोकंट्रोलरची तपासणी व पडताळणी ईव्हीएम उत्पादकांच्या अभियंत्यांच्या एका पथकाद्वारे केली जाईल.” मुंबई उपनगर जिल्ह्याच्या उप-निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नसीम खान यांना पाठवलेल्या पत्रानुसार, EVM उत्पादक कंपनी असलेल्या ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बंगळुरू’ यांच्यामार्फत १६ आणि १७ एप्रिल रोजी मुंबईत केवळ ‘निदान चाचणी’ (diagnostic check) करण्यास परवानगी दिली जाईल. काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांना त्यांच्या संबंधित मतदारसंघांमध्ये EVM आणि ‘व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल’ (VVPAT) युनिट्सची पडताळणी करून घेण्यास सांगितले होते.काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘INDIA’ विरोधी आघाडीतील सुमारे दोन डझन उमेदवारांनी EVM च्या विश्वासार्हतेबाबत चिंता व्यक्त केली होती.

Election Commission: ईव्हीएमची तपासणी आणि छाननी करण्याचा आदेश ऐतिहासिक, मुंबईत होणार तपासणी Read More »

prakash ambedkar

Prakash Ambedkar : ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक’, हा कायदा संविधानाच्या तत्त्वांचे उल्लंघन करणारा ; प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar : ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक, २०२६’वर कडक शब्दात टीका करत हा कायदा संविधानाच्या तत्त्वांचे उल्लंघन करणारा असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर यासंदर्भात प्रतिक्रिया नोंदवली. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, धार्मिक धर्मांतरांना आळा घालण्यासाठी प्रस्तावित केलेले हे विधेयक कायदेशीर कसोटीवर टिकणार नाही. भारतीय संविधानाने नागरिकांना धर्मस्वातंत्र्य आणि विवाहाचे मूलभूत अधिकार दिले असून, कोणत्याही कारणाने या अधिकारांवर मर्यादा आणणारा कायदा घटनाबाह्य ठरू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, देशातील इतर काही राज्यांमध्येही अशाच प्रकारचे कायदे मंजूर करण्यात आले असून, ते सध्या न्यायालयीन आव्हानांना सामोरे जात आहेत. हे प्रकरण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही या विधेयकाच्या वैधतेबाबत प्रश्न निर्माण होणार, असे ते म्हणाले. राज्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष कडे बहुमत असल्यामुळे हे विधेयक विधानसभेत आणि विधानपरिषदेत मंजूर होऊ शकते, मात्र त्याची घटनात्मक वैधता हा अधिक महत्त्वाचा मुद्दा असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकरांनी नमूद केले. या कायद्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप करत त्यांनी म्हटले की, समाजाचे हिंदू-मुस्लिम किंवा हिंदू-ख्रिश्चन असे ध्रुवीकरण करून मतदारसंघ मजबूत करण्याचा हा प्रयत्न आहे. तसेच, जबरदस्तीने धर्मांतराच्या घटनांसाठी विद्यमान कायदे पुरेसे असल्याचे सांगत, नव्या कडक कायद्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ॲड. प्रकाश आंबेडकरांनी पुढे म्हणाले की, या विधेयकाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप धार्मिक ध्रुवीकरणाला चालना देत आहेत. दरम्यान, राज्य सरकारकडून या विधेयकाचे उद्दिष्ट जबरदस्तीचे धर्मांतर आणि कथित ‘लव्ह जिहाद’ रोखणे असे सांगितले जात असले, तरी विरोधकांकडून त्याच्या घटनात्मक वैधतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Prakash Ambedkar : ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक’, हा कायदा संविधानाच्या तत्त्वांचे उल्लंघन करणारा ; प्रकाश आंबेडकर Read More »

Vijay Wadettiwar on Ashok Kharat : चाकणकर यांचा राजीनामा झाला पण अनेक मोठ्या माशांवर कारवाई नाही

Vijay Wadettiwar on Ashok Kharat : महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या अत्यंत संतापजनक आणि अशोभनीय घटनांवरून हे स्पष्ट होत आहे की, सत्तेत बसलेल्या महायुती सरकारला जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे राहिलेले नाही. रूपाली चाकणकर यांचा राजीनामा आणि खरात प्रकरणातून समोर आलेली मंत्र्यांची भोंदूगिरी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला लागलेला काळिमा आहे असं काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार म्हणाले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची बसलेल्या रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्रातील महिलांना न्याय मिळवून देणे अपेक्षित होते पण त्यांनीच एका भोंदू बाबाचे मानसिक गुलामगिरी पत्करली ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. ज्योतिष आणि अनिष्ट प्रथांवर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्ती महिलांना काय न्याय देणार?त्यांचा राजीनामा हा केवळ दिखावा नसून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, असं वडेट्टीवार नागपुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले. लिंगपिसाट खरात याच्या संपर्कात आलेल्या सर्व ‘नवरत्नांचा’ आणि मंत्र्यांचा CDR तपासला पाहिजे. खरातकडे असलेली अफाट संपत्ती आणि त्याला मंत्र्यांनी दिलेला राजाश्रय पाहता, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. पोलिसांवर दबाव टाकून मोठे मासे वाचवण्याचे षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केला. एकीकडे खरातसारख्या व्यक्तीचे पाय धुतले जात आहे, तर दुसरीकडे कीर्तनकारांकडून अल्पवयीन मुलींवर अत्याचार होत आहेत. धर्माच्या नावाखाली सुरू असलेला हा अधर्म थांबवण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली पाहिजे असं वडेट्टीवार म्हणाले. अरविंद शिंदे या काँग्रेसच्या नेत्यांनी चाकणकर प्रकरणी व्यक्त केलेली भूमिका ही त्यांची वैयक्तिक आहे पक्षाची नाही असं ही वडेट्टीवार यांनी यावेळी स्पष्ट केले. सातारा येथील निवडणुकीत बहुमत असतानाही शंभूराजे देसाई पालकमंत्री असताना त्यांच्याच सहकाऱ्यांना पळवून नेण्यात आले.यात मंत्री जखमी झाले. भाजप सत्तेसाठी कोणत्या थराला जात आहे आणि ट्रिपल इंजिन सरकारमधील इंजिन कोणत्या दिशेने जात आहे हे यावरून स्पष्ट होत आहे. मित्र पक्षातील मंत्री निधीवरून नाराज आहेत आणि एकमेकांची जिरवण्याच्या नादात जनतेचे नुकसान महायुती सरकार करत असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.

Vijay Wadettiwar on Ashok Kharat : चाकणकर यांचा राजीनामा झाला पण अनेक मोठ्या माशांवर कारवाई नाही Read More »

rahuri by election

Rahuri By Election: राहुरी पोटनिवडणुकीत उमेदवारीवर संभ्रम; बिनविरोध निवडीच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले

Rahuri By Election : स्वर्गीय माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली असून, निवडणूक जाहीर होताच मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणूक बिनविरोध करण्याबाबत चर्चा सुरू असली तरी उमेदवार कोण असणार याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने राजकीय अनिश्चितता कायम आहे. स्वर्गीय कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय वारशाचा प्रश्न पुढे आला असून, त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी द्यावी अशी भावना समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. या संदर्भात खासदार सुजय विखे यांनीही पक्षश्रेष्ठींसमोर स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना मांडल्याचे सांगितले जाते. दरम्यान, अक्षय कर्डिले यांनी मतदारसंघात संपर्क दौरे सुरू केले असून वडिलांनी केलेल्या विकासकामांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र दुसरीकडे राजकीय चर्चांना वेगळे वळण मिळताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून बदललेल्या राजकीय भूमिकेमुळे माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे यांच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा रंगली आहे. त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांमुळे राहुरीतील राजकीय समीकरणांबाबत तर्कवितर्क वाढले आहेत. राहुरी मतदारसंघावर विखे घराण्याचा प्रभाव लक्षात घेता माजी खासदार सुजय विखे तसेच त्यांच्या पत्नी धनश्री विखे यांच्या नावांचीदेखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याची चर्चा असून, त्यानुसार कर्डिले यांनी जनसंपर्क वाढविल्याचे दिसून येते. दरम्यान, आणखी एका राजकीय सूत्रानुसार माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना विधानसभा निवडणुकीत बिनविरोध निवडून देण्याचा आणि अक्षय कर्डिले यांना विधान परिषदेत संधी देण्याचा पर्याय चर्चेत असल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसल्याने या चर्चा अद्याप राजकीय पातळीवरील अंदाजांपुरत्याच मर्यादित आहेत. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहानुभूती, स्थानिक नेतृत्व आणि पक्षीय गणिते यांचा तिढा निर्माण झाला असून अंतिम निर्णयाकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच राहुरीतील राजकीय चित्र स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.

Rahuri By Election: राहुरी पोटनिवडणुकीत उमेदवारीवर संभ्रम; बिनविरोध निवडीच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले Read More »

Vijay Wadettiwar: स्वच्छ महाराष्ट्र अभियानात 12 हजार कोटींचा महाघोटाळा, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

Vijay Wadettiwar: केंद्र सरकारने जनगणनेची घोषणा केली आहे पण त्यात ओबीसीसाठी रकाना नाही.ओबीसी जनगणना होणार अशी घोषणा असताना ओबीसी साठी वेगळा रकाना नाही. ओबीसी लोकसंख्या किती आहे हे स्पष्ट झालं नाही तर त्यांना त्यांचे अधिकार मिळणार कसे? त्यामुळं राज्य सरकारने केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा करावा,पत्रव्यवहार करून जनगणनेत ओबीसींचा वेगळा रकाना करण्याची मागणी करावी अशी भूमिका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. अर्थसंकल्पातील विभागावर चर्चेत सहभागी होताना वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाचे प्रश्न मांडले. ओबीसींची संख्या ५० टक्के असताना महाज्योतीला ३०० कोटी आणि इतर संस्थांनाही ३०० कोटी, हे धोरण अन्यायकारक आहे. पीएचडी विद्यार्थ्यांना देखील पाठ्यवेतन देण्यात आलेलं नाही. ओबीसी विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणाकडे देण्यात येत आहे पण विद्यार्थ्यांची मागणी ऑफलाईन प्रशिक्षणाची आहे.विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी प्रति विद्यार्थी ५० हजार ते १ लाख रुपये खर्च केले जात आहेत, तरीही ८५ टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रशिक्षणाकडे पाठ फिरवली आहे. हा पैसा केवळ संस्था चालवण्यासाठी खर्च होत आहे का? स्वाधार योजनेचे पैसे मिळत नसल्याने वसतिगृहात न राहणाऱ्या मुलांचे प्रचंड हाल होत आहेत असे वडेट्टीवार म्हणाले. तसेच राज्यातील स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत १२ हजार कोटी रुपयांचा प्रचंड मोठा घोटाळा सुरू असून, अधिकारी मंत्र्यांना अंधारात ठेवून सरकारी तिजोरी स्वच्छ करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केला. कचऱ्याचे ढिगारे प्रत्यक्षात आहेत त्यापेक्षा जास्त दाखवून बनावट डीपीआर तयार केले जात आहेत. केवळ ३० टक्के काम करून १०० टक्के बिले लाटली जात असून, अक्कलकोट, लातूर, पाचगणी यांसारख्या शहरांत अधिकाऱ्यांनी चक्क आपल्या नातेवाईकांच्या नावे कंत्राटे घेतल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची SIT चौकशी करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. सामाजिक न्याय विभागातील सिद्धार्थ भंडारी आणि भरत कदम यांसारख्या अधिकाऱ्यांकडून कंत्राटांसाठी टक्केवारीची मागणी केली जात असल्याची तक्रार मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली आहे. विद्यार्थी वसतिगृहाच्या कामांसाठी आगाऊ रक्कम घेऊनही कामे रखडलेली आहेत. असे भ्रष्ट अधिकारी ठेवून सरकार काय सिद्ध करू पाहत आहे? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. चंद्रपूर येथील ब्रह्मपुरी इथे ४५ कोटींचे विपश्यना केंद्र मंजूर असताना त्यासाठी केवळ ५ कोटी मिळाले. यासाठीच प्रलंबित निधी देण्यात यावा. तसेच सांस्कृतिक भवनासाठी ८ कोटींची गरज असताना दोन वर्षे निधी दिलेला नाही असे ही वडेट्टीवार अर्थसंकल्पावरील भाषणात म्हणाले.

Vijay Wadettiwar: स्वच्छ महाराष्ट्र अभियानात 12 हजार कोटींचा महाघोटाळा, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप Read More »

Rohini Khadse: गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा अन्यथा वेळ आली तर …, रोहिणी खडसेंचा सरकारला इशारा

Rohini Khadse : आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाची झळ आता भारतातील सामान्य जनतेलाही बसू लागली आहे. या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. मुंबई – पुणे सारख्या शहरांमध्ये गॅसच्या अभावी हॉटेल्स, खानावळी हळूहळू बंद होत आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी दिली आहे. रोहिणी खडसे म्हणाल्या की, मुंबई – पुणे परिसरात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. तसेच परिस्थिती आटोक्यात आली नाही तर घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण होण्यास सुरुवात होईल. शासनाने यात गांभीर्याने लक्ष घालून तोडगा काढावा, हवं तर केंद्राशी बोलून यावर तोडगा काढावा अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू असा इशारा त्यांनी दिला. तर गेल्या अकरा दिवसांपासून अमेरिका, इस्रायल आणि इराण दरम्यान सुरू असणाऱ्या युद्धाचा फटका मोठ्या प्रमाणात भारताला बसताना दिसत आहे. देशातील अनेक ठिकाणी गॅस पुरवठा विस्कळीत झाला आहे. तर आता या मुद्द्यावरून विरोधक केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहे.

Rohini Khadse: गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा अन्यथा वेळ आली तर …, रोहिणी खडसेंचा सरकारला इशारा Read More »

harshvardhan sapkal dna

Harshwardhan Sapkal: अर्थसंकल्पात पोकळ घोषणा, गुलाबी स्वप्न दाखवून लाडक्या बहिणींना पुन्हा फसवले; हर्षवर्धन सपकाळ सरकारवर भडकले

Harshwardhan Sapkal: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केवळ मोठे आकडे व पोकळ घोषणा आहेत. सरकारने राज्यावर कर्जाचा डोंगर करून ठेवलेला असून ४० हजार कोटी रुपयांच्या तुटीचा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिवाळखोरीकडे घेऊन जाणारा आहे. अर्थसंकल्पात बुलेट ट्रेन, मेट्रो, भुयारी मार्गांचाच बोलबाला आहे. गाव खेड्यातला गरीब, आदिवासी, कष्टकरी, महिला, बेरोजगार व तरुणांना अर्थसंकल्पात स्थानच नाही. एकंदरीत हा अर्थसंकल्प मोजकी शहरे आणि मोजक्या लोकांसाठीच आहे. सर्वसामान्यांना यातून काहीही मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. अर्थसंकल्पावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, विकसीत महाराष्ट्र २०४७ ची कल्पना व १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था हे दिवास्वप्न आहे. मागील काही वर्षात भाजपा युती सरकार अर्थसंकल्प जाहीर करते व नंतर येणाऱ्या प्रत्येक अधिवेशनात कोट्यवधी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या जातात. आर्थिक पाहणी अहवालातून राज्य दिवाळखोरीकडे जात असल्याचे दिसून आले आहे. राज्यावरील कर्ज व कर्जाची हमी मिळून १२ लाख कोटींच्या आसपास बोजा आहे. कर्जाच्या हप्त्यापोटी ६५ हजार कोटी रुपये द्यावे लागतात. त्यामुळे अर्थसंकल्पातील आकडे व प्रत्यक्ष जमिनीवरची स्थिती यात प्रचंड तफावत आहे. गेल्या अर्थससंकल्पात अनुसुचित जातींच्या योजनांसाठी २२ हजार ६५८ कोटींची तरतूद केली होती पण प्रत्यक्षात ६ हजार २०० कोटी रुपयेच खर्च करण्यात आले. मागासवर्गीय, अल्पसंख्याक, आदिवासी यांच्या योजनांवर अर्थसंकल्पात मोठ मोठे आकडे जाहीर केले जातात पण प्रत्यक्षात ते खर्च केले जात नाहीत. हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, राज्यासमोर सर्वात मोठे संकट बेरोजगारीचे असताना अर्थसंल्पात केवळ ७५ हजार नोकर भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे. आजपर्यंतच्या मेगा भरतीचा भाजपा सरकारचा इतिहास पाहता ही सुद्धा एक फसवी घोषणाच वाटते. लाडकी बहिण योजना बंद होणार नाही असे सांगितले असले तरी २१०० कोटी रुपये देण्याचे आश्वासन अद्याप हवेतच आहे. सरकारने लाडक्या बहिणींची पुन्हा फसवणूक केली आहे. कर्जमाफीची घोषणा केली असली तरी फडणवीस सरकारने आधी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील लाखो शेतकरी आजही कर्जमाफीच्या लाभापासून वंचितच आहेत, हे पाहता आजच्या कर्जमाफीची घोषणा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारी ठरु नये. लबाडाचे आवताण जेवल्याशिवाय खरे नाही असे या सरकारचे वागणे आहे. शेतकरी व कृषी क्षेत्रासाठी काही घोषणा केलेल्या आहेत पण अमेरिकेसोबत केलेल्या व्यापारी करारापुढे आपल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव मिळणे कठीण आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याऐवजी घटण्याचीच भिती जास्त आहे. शेतकरी आत्महत्या थांबवण्यास अर्थसंकल्पातील घोषणा पुरेशा नाहीत. गेल्या वर्षी चांगला पाऊस पडूनही राज्याचे सिंचन क्षेत्र ५६ लाख हेक्टरवरून कमी होऊन ३९ लाख हेक्टरपर्यंत आले आहे. सिंचनासोबतच पेरणीयोग्य क्षेत्रातही घट झाली आहे. यावरून सरकारने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येत आहे. तिसरी मुंबई, चौथी मुंबई, शक्तीपीठ महामार्ग, वाढवण बंदर हे अदानी व अंबानी यांच्या हितासाठी आहे, यातून सामान्य जनतेला काही फायदा होणार नाही. सरकारचे सौरउर्जा धोरणही फसवे आहे, त्यामुळे वीज ग्राहकांवर दिलासा नाही तर प्रति युनिट २६ पैसे अतिरिक्त भार पडणार आहे. स्मार्टमीटरमुळे अगोदरच वीजबिलात प्रचंड वाढ झालेली आहे. दावोसमधून २०२२ ते २०२५ पर्यंत ५० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार झाल्याचा दावा करण्यात आला पण आर्थिक पाहणी अहवालानुसार तर राज्यात फक्त ६ लाख कोटी रुपयांचीच गुंतवणूक आलेली आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Harshwardhan Sapkal: अर्थसंकल्पात पोकळ घोषणा, गुलाबी स्वप्न दाखवून लाडक्या बहिणींना पुन्हा फसवले; हर्षवर्धन सपकाळ सरकारवर भडकले Read More »

mva

Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकांबाबत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक ; कुणाला मिळणार संधी?

Rajya Sabha Election : आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्यसभा निवडणुकीबाबतचर्चा करण्यात आली. बैठकीनंतर काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधत आघाडीची भूमिका स्पष्ट केली. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने राष्ट्रीय राजकारणाचा विचार करून राज्यसभेची जागा काँग्रेसला मिळावी, असा प्रस्ताव पक्षाच्या वतीने मांडण्यात आला आहे. बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांनी आपली मते मांडली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यासंदर्भात त्यांच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करतील, तर शिवसेनेनेही आपली भूमिका स्पष्ट करतील अस वडेट्टीवार म्हणाले. राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीतील जागावाटपाचा प्रश्न चर्चेने सुटेल असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. आम्ही सर्वजण आपापल्या पक्षश्रेष्ठींशी आणि वरिष्ठ नेत्यांशी पुन्हा चर्चा करू हे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी जागेसाठी आग्रह धरला असला, तरी महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रितपणे ही निवडणूक लढवणार आहोत. तिन्ही पक्षांच्या संमतीनेच उमेदवार निश्चित केला जाईल. राज्यसभा अर्जासाठी 5 मार्चपर्यंत वेळ आहे. त्यामुळे मित्रपक्षांशी सन्मानपूर्वक चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. महाविकास आघाडी एकत्र लढली तर आमचा विजय निश्चित आहे, अस काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. मालेगाव प्रकरणी प्रश्न विचारला असताना विधिमंडळ नेते वडेट्टीवार म्हणाले, धर्माचे पालन रस्त्यावर होऊ नये, परंतु सध्या रमजानचा महिना सुरू आहे आणि रोजाच्या काळात नमाज वेळेवर अदा करणे आवश्यक असते. या प्रकरणाचा विनाकारण वाद केला जात आहे, हे पूर्णपणे राजकारणाने प्रेरित आहे. समाजाला हिंदू-मुस्लिममध्ये विभागण्याचा प्रयत्न केला जात आहे. जे लोक शंकराचार्यांना देखील सोडत नाहीत, ते कोणत्या विचारधारेचे राजकारण करत आहेत हे जनता ओळखून आहे असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.

Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकांबाबत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक ; कुणाला मिळणार संधी? Read More »