DNA मराठी

Congress

harshwardhan sapkal

Harshwardhan Sapkal: मतदार यादीत घोळ करणारे आगामी काळात जेलमध्ये जाणार

Harshwardhan Sapkal: भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने वोटचोरी करून महाराष्ट्रात सत्ता मिळवली. बिहार आणि बंगालमध्येही मतदारांची नावे वगळून भाजपने विजय मिळवला. मतदार यादी पुनरिक्षणाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. लोकशाहीची हत्या करणाऱ्या आणि मतदार यादीत घोळ करणाऱ्यांना आगामी काळात जेलमध्ये जावे लागेल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. निवडणूक आयोगामार्फत राज्यात राबविण्यात येत असलेल्या मतदार यादी पुनरिक्षण (SIR) मोहिमेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची अत्यंत महत्त्वपूर्ण राज्यस्तरीय बैठक आज टिळक भवन, दादर येथे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात व नसीम खान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस गुरुदीप सप्पल, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, ॲड. यशोमती ठाकूर, आ. अमित देशमुख, आ. डॉ. विश्वजीत कदम, काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्या खा. प्रणिती शिंदे, माजी मंत्री रणजित कांबळे, राजेंद्र मुळक, खासदार शोभा बच्छाव, खासदार बळवंत वानखेडे, खासदार प्रतिभा धानोरकर, खासदार रविंद्र चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, प्रदेश काँग्रेसचे संघटन सरचिटणीस ॲड. गणेश पाटील, प्रदेश सरचिटणीस अभिजीत सपकाळ यांच्यासह प्रमुख नेते खासदार, आमदार व BLA1 उपस्थित होते. मतदार यादीतील कथित गैरप्रकार, वोटचोरी आणि SIR संदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. बैठकीच्या सुरुवातीला केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मिळवलेल्या विजयाबद्दल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अभिनंदनाचा तसेच केरळचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी गृहमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल व सर्व नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचे अभिनंदन करणारा ठराव मांडण्यात आला एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने SIR मोहिमेबाबत सुरु केलेल्या मोहिमेच्या लोगोचे सर्व प्रमुख्य नेत्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. बैठकीदरम्यान अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस गुरुदीप सप्पल, सतेज ऊर्फ बंटी पाटील, आशुतोष शिर्के, निमिष साने यांनीही SIR मोहिमेच्या अनुषंगाने सादरीकरण आणि मार्गदर्शन केले. बूथस्तरावरील संघटन मजबूत करण्याबरोबरच प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले. आगामी काळात राज्यभर जनजागृती मोहीम राबवून मतदारांचे अधिकार अबाधित राखण्यासाठी काँग्रेस पक्ष आक्रमकपणे मैदानात उतरणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की,सपकाळ यांनी सांगितले की, SIR मोहिमेअंतर्गत BLA-1 संदर्भातील विशेष कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली असून संपूर्ण राज्यात बूथस्तरावर सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांची टीम तसेच राज्यातील अनुभवी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना निवडणूक प्रक्रिया, मतदार यादी पडताळणी, हरकती व दुरुस्त्या यासंदर्भात सविस्तर प्रशिक्षण दिले. प्रत्येक मतदाराचे संरक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष सज्ज असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने SIR मोहिमेसाठी विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची या समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून अभिजीत सपकाळ हे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. राज्यभरातील जिल्हा व तालुका स्तरावरील यंत्रणेशी समन्वय साधून मतदार यादी पडताळणी मोहिमेला गती देण्याचे काम समितीमार्फत करण्यात येणार आहे. आगामी विधान परिषद निवडणुकांबाबत बोलताना ते म्हणाले की, “राज्यात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मित्रपक्षांशी सकारात्मक चर्चा सुरू असून लवकरच निर्णय जाहीर केला जाईल.राज्यात निर्माण झालेल्या पेट्रोल-डिझेल टंचाईच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री आणि राज्य सरकारवर निशाणा साधताना सपकाळ म्हणाले, “पेट्रोल डिझेल टंचाईबाबत मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे ते गझनी झाले आहेत हे पुन्हा सिद्ध झाले आहे. जनतेला भेडसावणाऱ्या गंभीर प्रश्नांकडे सरकारचे कोणतेही लक्ष नाही. आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना सपकाळ यांनी भाजपवर समाजात तेढ निर्माण करण्याचा आरोप केला. ते म्हणाले, “जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. भाजप मराठा, ओबीसी, धनगर आणि इतर सर्व समाजघटकांना भाजप महायुती फसवत आहे. जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण करून राजकीय फायदा करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर दिलेले आश्वासन आणि त्यानंतर उधळलेला गुलाल महाराष्ट्राने पाहिला. मात्र प्रत्यक्षात आरक्षणाबाबत सरकारने काय केले याचे उत्तर त्यांनी द्यावे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, प्रकाश मेहतांपासून तानाजी सावंतांपर्यंत या सरकारमध्ये शंभरहून अधिक घोटाळे झाले आहेत. मात्र सरकार स्वतःच्या लोकांवर कोणतीही कारवाई करत नाही. निष्पक्ष आणि प्रामाणिक चौकशी झाली तर सरकारमध्ये सहभागी असलेले अनेकजण गजाआड जातील. वडेट्टीवार यांनी शेतकरी प्रश्नावर सरकारला धारेवर धरत म्हटले की, हे सरकार पूर्णपणे शेतकरीविरोधी आहे. कर्जमाफीसाठी आवश्यक असलेली रक्कम भरण्याची ताकद शेतकऱ्यांकडे राहिलेली नाही. ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होत असताना सरकार केवळ घोषणाबाजी करत आहे. ते पुढे म्हणाले, राष्ट्रभक्तीच्या नावाखाली धार्मिक आणि जातीय विभाजन निर्माण करून देशाला लुटण्याचा उद्योग भाजपने सुरू केला आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी भावनिक मुद्दे पुढे केले जात आहेत.

Harshwardhan Sapkal: मतदार यादीत घोळ करणारे आगामी काळात जेलमध्ये जाणार Read More »

Vijay Wadettiwar: डिझेलचा तुडवडा आणि खतांच्या कमतरतेमुळे शेतकरी उध्वस्त

Vijay Wadettiwar: देशात गेल्या दहा वर्षांत अनेक पेपर फुटले त्यातही नीट सारख्या परीक्षांचे पेपर फुटत असतील आणि सिस्टममधील लोकच त्यात सामील असतील, तर याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना थोडी जरी लाज आणि नैतिकता असती, तर त्यांनी आतापर्यंत आपल्या पदाचा राजीनामा दिला असता अशी घणाघाती टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही हीच मागणी केली असून, या संवेदनशील पदावर बसलेल्या मंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची कोणतीही काळजी नसल्याचे यातून सिद्ध होत असल्याचे ते म्हणाले. या प्रकरणात मोटेगावकर किंवा अमित देशमुख यांच्या जुन्या विधानाचा आधार घेऊन सरकार स्वतःचे दोष लपवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका ही वडेट्टीवार यांनी केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून सरकार त्यांना जाणीवपूर्वक उद्ध्वस्त करत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी दोनदा कर्जमाफीची घोषणा केली, मात्र अद्याप कोणताही स्पष्ट शासन निर्णय निघालेला नाही. राज्यात डिझेल-पेट्रोलचा निर्माण झालेला तुटवडा आणि आगामी काळात केवळ 25% खते उपलब्ध होतील, असे केंद्रीय मंत्र्यांचे सांगणे चिंताजनक आहे. डिझेलअभावी शेतीची मशागत आणि नांगरणी कशी होणार? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. सिस्टमविरोधात संताप व्यक्त करणाऱ्या तरुणांचे X (ट्विटर) हँडल्स बंद करून सरकार आपली भीती लपवत आहे. तरुणांना हिंदू-मुस्लिम किंवा भारत-पाकिस्तानच्या मुद्द्यांपेक्षा रोजगार हवा आहे.पण सर्वोच्च पदावर बसलेली व्यक्ती जेव्हा तरुणांना कॉकरोच म्हणते, तेव्हा तरुणांच्या मनातील राग उफाळून येणे स्वाभाविक आहे. सरकारचा एकूण कारभार हा पूर्णपणे तरुण विरोधी असून तो राग आता व्यक्त होत आहे अस वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar: डिझेलचा तुडवडा आणि खतांच्या कमतरतेमुळे शेतकरी उध्वस्त Read More »

cockroach janata party

Cockroach Janata Party : भाजपला मागे टाकत, ‘कॉकरोच जनता पार्टी’ने इंटरनेटवर रचला इतिहास; 4 दिवसात 9 दशलक्ष फॉलोअर्स

Cockroach Janata Party : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर Cockroach Janata Party (CJP) ची जोरदार चर्चा सुरू आहे. या पक्षाने आता सोशल मीडियावर भाजपला मागे टाकत नवीन इतिहास रचला आहे. पक्षाने सोशल मीडिया मोहिमेने 90 लाखांहून अधिक (9 दशलक्ष) फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे. इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत या मोहिमेने जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या ‘भारतीय जनता पक्ष’ (BJP) लाही मागे टाकले आहे. अवघ्या चार दिवसांत भाजपला टाकले मागे 21 मे रोजीच्या आकडेवारीनुसार, भाजपच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर (@bjp4india) सुमारे 87 लाख (8.7 दशलक्ष) फॉलोअर्स होते तर केवळ चार दिवस जुन्या असलेल्या ‘Cockroach Janata Party’ ने 90 लाखांचा (9 दशलक्ष) टप्पा केव्हाच ओलांडला आहे. सध्या या यादीत काँग्रेस पक्षाचे हँडल (@incindia) अव्वल स्थानी असून त्याचे सुमारे 1.32 कोटी (13.2 दशलक्ष) फॉलोअर्स आहेत, तर ‘आम आदमी पक्षा’चे (AAP) सुमारे 19 लाख (1.9 दशलक्ष) फॉलोअर्स आहेत. भाजपने आतापर्यंत 18000 हून अधिक पोस्ट शेअर केल्या आहेत तर CJP ने केवळ 54 पोस्ट्सच्या माध्यमातूनच हा टप्पा गाठला आहे. डिजिटल विश्वात, अलीकडच्या काळातील सर्वात मोठी राजकीय मोहीम म्हणून या CJP चे कौतुक केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी एका न्यायालयीन सुनावणीदरम्यान केलेल्या कथित वादग्रस्त टिप्पणीच्या विरोधात निषेध नोंदवण्यासाठी तरुणांनी ही मोहीम सुरू केली आहे. या सोशल मीडिया खात्याच्या ‘बायो’मध्ये (Bio) स्वतःचे वर्णन करताना असे म्हटले आहे की, हे “तरुणांचे, तरुणांनी चालवलेले आणि तरुणांसाठी असलेले एक राजकीय व्यासपीठ” आहे. हे व्यासपीठ केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून काम करत नाही तर देशातील तरुण वर्ग बेरोजगारी, प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटना (Paper leaks) आणि राजकीय उत्तरदायित्व यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर आपला संताप व्यक्त करण्यासाठी या माध्यमाचा वापर करत आहे.

Cockroach Janata Party : भाजपला मागे टाकत, ‘कॉकरोच जनता पार्टी’ने इंटरनेटवर रचला इतिहास; 4 दिवसात 9 दशलक्ष फॉलोअर्स Read More »

img 20260519 wa0072

Ahilyanagar Politics: नगरच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल

Ahilyanagar Politics: अहिल्यानगरच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आणि चार वर्षांपासून गोठलेले राजकारण पुन्हा एकदा तापू लागले आहे. ही केवळ एक निवडणूक नाही तर जिल्ह्यातील बदलत्या राजकीय शक्तिसंतुलनाची पहिली मोठी चाचणी ठरणार आहे. विशेष म्हणजे, पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेली ही जागा आता भाजपच्या वाढलेल्या संख्याबळामुळे महायुतीत कोणाच्या वाट्याला जाणार, हा खरा कुतूहलाचा विषय बनला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकराज असल्याने आणि अनेक संस्था अस्तित्वात नसल्याने ही जागा तब्बल चार वर्षे रिक्त राहिली. तरीही निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली, यामागे राजकीय अंकगणित स्पष्ट दिसते. ५५९ पैकी ९६ जागा रिक्त असल्या, तरी उर्वरित मतदाररचना भाजपसाठी अनुकूल असल्याचे वास्तव नाकारता येत नाही. महापालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये भाजपने मागील काही वर्षांत निर्माण केलेले वर्चस्व आता विधान परिषद निवडणुकीत कसोटीवर लागणार आहे. नगर जिल्ह्याच्या या मतदारसंघाचा इतिहासही तितकाच रंगतदार राहिला आहे. एका मताने दिग्गजांचा पराभव, मिठाईच्या बॉक्समधून उमेदवारीची चाहूल, मतदारांच्या ‘भावा’भोवती फिरणारे राजकारण या साऱ्यांनी या निवडणुकीला नेहमीच वेगळे स्थान मिळवून दिले. मर्यादित मतदारसंख्या असल्यामुळे येथे राजकीय गणिताइतकेच वैयक्तिक संबंध आणि स्थानिक प्रभाव महत्त्वाचा ठरतो. त्यामुळेच ही निवडणूक पक्षनिष्ठेपेक्षा सत्तासमीकरणांची अधिक असते. यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट स्वतंत्रपणे राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहेत. दुसरीकडे भाजपकडे जिल्ह्यात स्पष्ट संख्याबळ आहे. त्यामुळे “ही जागा भाजपलाच मिळावी” असा सूर पक्षातील निष्ठावंतांकडून उमटू लागला आहे. महायुतीतील जागावाटपात भाजप आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे, अजित पवार गटाकडून चंद्रशेखर घुले यांची इच्छा लपून राहिलेली नाही. तर राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्राजक्त तनपुरे यांचे नावही चर्चेत आहे. तनपुरे यांनी घेतलेली ‘मवाळ’ भूमिका आणि त्याबदल्यात मिळालेल्या आश्वासनांच्या चर्चा आता या निवडणुकीच्या केंद्रस्थानी येतील. ते भाजपकडे झुकतात की अजित पवार गटाकडे, यावर अनेक समीकरणे बदलू शकतात. महाविकास आघाडीच्या दृष्टीने मात्र ही निवडणूक आव्हानात्मक आहे. काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट यांचे संख्याबळ मर्यादित असल्याने विजयासाठी त्यांना केवळ राजकीय चातुर्य आणि मतविभाजनावर अवलंबून राहावे लागेल. अशा वेळी ‘क्रॉस वोटिंग’ आणि अंतर्गत नाराजी हे घटक निर्णायक ठरू शकतात. नगर जिल्ह्याच्या राजकारणात ही निवडणूक केवळ एक जागा भरणारी प्रक्रिया नाही; तर आगामी जिल्हा परिषद, पालिका आणि विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम आहे. भाजपला आपले वर्चस्व अधिक मजबूत करायचे आहे, तर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. त्यामुळे पुढील काही आठवड्यांत नगरचे राजकारण अधिक चुरशीचे, अधिक वैयक्तिक आणि अधिक अनपेक्षित वळणे घेणार, हे निश्चित.

Ahilyanagar Politics: नगरच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल Read More »

petrol

Petrol Diesel Price : पेट्रोल आणि डिझेल 10 रुपयांनी महागणार; 2-3 आठवड्यांत होणार वाढ?

Petrol Diesel Price : शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली. तेल विपणन कंपन्यांनी प्रत्येकी ₹३ ची दरवाढ लागू केली. तर आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. प्राप्त माहितीनुसार, पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीचे दर प्रत्येकी ₹१० ने वाढवले जाऊ शकतात. तेल विपणन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलची ही दरवाढ पुढील दोन ते तीन आठवड्यांच्या कालावधीत लागू करू शकतात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील वाढ, घरगुती एलपीजी सिलिंडर्सच्या वाढलेल्या किमती आणि दुधाच्या दरात वारंवार झालेली वाढ यामुळे, आगामी महिन्यांत किरकोळ महागाई (Retail Inflation) ०.४२ टक्क्यांपर्यंत वाढू शकते. अर्थतज्ज्ञांनी असा अंदाज व्यक्त केला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रत्येकी ₹१० ने वाढणार (पुढील दरवाढ) ‘एमके ग्लोबल’ने (Emkay Global) आपल्या अहवालात नमूद केले आहे की, सध्याचा तोटा भरून काढण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रत्येकी ₹१० ने वाढवले जाऊ शकतात. या अहवालानुसार, ही दरवाढ एकतर एकाच वेळी (एकगठ्ठा) लागू केली जाऊ शकते किंवा दोन ते तीन आठवड्यांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने अंमलात आणली जाऊ शकते. प्रति लिटर ₹१७-१८ चा तोटा (पेट्रोल-डिझेलवरील तोटा) अहवालानुसार, तेल विपणन कंपन्यांना सध्या इंधनाच्या प्रत्येक लिटरमागे ₹१७ ते ₹१८ इतका तोटा सहन करावा लागत आहे. मार्च महिन्यात सरकारने उत्पादन शुल्कात (Excise Duty) प्रत्येकी ₹१० ची कपात केली असूनही, ही परिस्थिती उद्भवली आहे. विशेष म्हणजे, इंधनाच्या दरात सुधारणा (किंमत बदल) न केल्यामुळे, तेल कंपन्यांना या तिमाहीत ₹५७,००० कोटी ते ₹५८,००० कोटींपर्यंतच्या तोट्याचा सामना करावा लागू शकतो. सध्याचे दर काय आहेत? (कच्च्या तेलाचे दर) कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे तेल विपणन कंपन्यांवरील दबाव अधिकच वाढला आहे. युद्धाची परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी, कच्च्या तेलाचे दर साधारणपणे $७० प्रति बॅरलच्या आसपास होते; मात्र, आता त्यांनी $१०० प्रति बॅरलचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या काही काळापासून, तेलाचे दर $१०० च्या पातळीच्या वरच स्थिर आहेत. अमूल आणि मदर डेअरीकडून दुधाच्या दरात वाढ इंधनाच्या किमतीत अलीकडे झालेली वाढ होण्यापूर्वीच, मदर डेअरी आणि अमूल या कंपन्यांनी दुधाचे दर वाढवले होते. या कंपन्यांनी दुधाच्या दरात प्रत्येकी ₹२ प्रति लिटर इतकी वाढ लागू केली होती. परिणामी, स्थानिक दूध डेअऱ्याही या कंपन्यांचे अनुकरण करून नजीकच्या काळात दुधाचे दर वाढवू शकतात. सामान्य माणसावरील बोजा वाढत आहे

Petrol Diesel Price : पेट्रोल आणि डिझेल 10 रुपयांनी महागणार; 2-3 आठवड्यांत होणार वाढ? Read More »

img 20260514 wa0003

NEET Paper Leak Case : ‘NEET’ पेपरफुटीच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन करा

NEET Paper Leak Case : देशातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली आज फोर्ट परिसरातील राज्याच्या CET सेल कार्यालयासमोर मुंबई युवक काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो युवकांनी सहभाग घेत भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नीट पेपरफुटी प्रकरणी भाजपा सरकारवर टीका करत मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन म्हणाल्या की, “नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे देशभरातील २४ लाख विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या स्वप्नांवर सरकारने बुलडोझर फिरवला आहे. या गंभीर प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. तसेच विद्यार्थ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी.” त्या पुढे म्हणाल्या की, “‘NEET’ पेपरफुटी प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन करण्यात यावी. या प्रश्नपत्रिका फुटीमागील संपूर्ण साखळी भाजपाशी संबंधित लोकांकडून चालवली जात असून, बेकायदेशीर मार्गाने विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त केले जात आहे. आम्ही सर्वजण मिळून या अन्यायाविरोधात लढा देऊ आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देऊ.” झीनत शबरीन यांनी पुढे आरोप केला की, “ज्या NTA महासंचालकांच्या कार्यकाळात २०२४ ची ‘NEET’ परीक्षा प्रश्नपत्रिका फुटली, त्याच व्यक्तीची छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे ‘प्रधान सल्लागार’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका फुटीच्या घोटाळ्यात सहभागी असलेल्या लोकांना भाजप सरकारकडून बक्षीस म्हणून मोठी पदे दिली जात आहेत.” या आंदोलनात मुंबई युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पंकज चौधरी, महासचिव तेजस चांदूरकर, आसिफ खान, गुरमन सिंग, गणेश शेगार, मितेश सोनकर, संतोष यादव, जिल्हाध्यक्ष शेखर जगताप, शिव यादव, अब्दुल समद तसेच विधानसभा अध्यक्ष इम्रान खान, प्रसन्न रांदिवे, आशिष सरोज, अल्तमेश कुरेशी, राहुल पेडणेकर, राज तुरेराव, सचिन, बृजमोहन यादव, सोहेब, मझहर आणि अबुतालिब यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी झाले होते या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

NEET Paper Leak Case : ‘NEET’ पेपरफुटीच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन करा Read More »

Sharad Pawar On PM Modi : अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होणार, मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar on PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथे बोलताना देशातील नागरिकांना पुढील एका वर्षासाठी सोने खरेदी टाळण्याचे तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या बचतीसाठी जास्तीत जास्त वर्क फ्रॉर्म होम आणि विदेशी प्रवास टाळण्याचे आवाहन केल्याने देशात सध्या खळबळ उडाली आहे. विरोधक मोदी यांच्या या आहवानानंतर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे. तर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांनी देखील यावर भाष्य करत प्रधानमंत्र्यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्व पक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय-प्रक्रिया राबविण्याचा सल्ला दिला आहे. शरद पवार यांनी एक्सवर म्हटले आहे की, मध्यपूर्वेतील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या. त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब निश्चितच काळजी निर्माण करणारी आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रधानमंत्र्यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्व पक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय-प्रक्रिया राबविणे देशहितासाठी अत्यंत आवश्यक आहे. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने अधिक संवेदनशीलता आणि व्यापक सल्लामसलत यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. यासोबतच प्रधानमंत्र्यांनी देशातील नामवंत अर्थतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि संबंधित तज्ज्ञांची तातडीने बैठक बोलावून परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा. पुढील धोरणांबाबत व्यापक विचारविनिमय करावा. देशातील जनतेमध्ये विश्वास आणि स्थैर्य निर्माण करणे, यालाच सद्यस्थितीत सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, अशी आमची ठाम भूमिका आहे असं शरद पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. नरेंद्र मोदींनी देशाला कोणती आवाहनं केली? पुढील एका वर्षासाठी सोन्याची खरेदी टाळा वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा नैसर्गिक शेतीचा अवलंब करा परदेश प्रवास टाळा खाद्यतेलाचा वापर कमी करा

Sharad Pawar On PM Modi : अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होणार, मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis on Police Housing Scheme : मोठी बातमी! राज्यात पोलिसांना घरांसाठी 1768.08 कोटी मंजूर

Devendra Fadnavis on Police Housing Scheme : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करत राज्यातील पोलीस विभागाला मोठा दिलासा दिला आहे. 5459 पोलिसांना घरांसाठी घरबांधणी अग्रीम म्हणून 1768.08 कोटी रुपयांना मंजुरी प्रदान करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडे आलेल्या या प्रस्तावांसाठी ही रक्कम मंजूर करण्यात आली असं त्यांनी सांगितले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर राज्यातील पोलिसांना घर खरेदीसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2014 ते 2019 या काळात मोठ्या संख्येने पोलिसांना घरांसाठी व्याजसवलत अनुदान योजना राबविण्यात आली होती मात्र महाविकास आघाडीच्या काळात ही योजना बंद करण्यात आली होती. महायुतीच्या काळात ही योजना पुन्हा एकदा सुरु करत 5459 पोलिसांना घरांसाठी घरबांधणी अग्रीम म्हणून 1768.08 कोटी रुपयांना मंजुरी प्रदान करण्यात आली असं देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे. नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? एक्सवर पोस्ट देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्याने कार्यरत आपल्या पोलिसांना घरे मिळाली पाहिजे, यासाठी प्रारंभीपासून मी आग्रही राहिलो आहे. त्यामुळेच 2014 ते 2019 या काळात मोठ्या संख्येने पोलिसांना घरांसाठी व्याजसवलत अनुदान योजना राबविण्यात आली. महाविकास आघाडीच्या काळात ती योजना बंद केली गेली होती. नंतर पुन्हा आम्ही ती योजना सुरु केली. आज मला सांगताना आनंद होतो की, आमच्या 5459 पोलिसांना घरांसाठी घरबांधणी अग्रीम म्हणून 1768.08 कोटी रुपयांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडे आलेल्या या प्रस्तावांसाठी ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे. डीजी लोन म्हणजे काय? पोलीस कर्मचाऱ्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने डीजी लोन (DG Loan – गृहबांधणी अग्रिम) योजना पुन्हा एकदा सुरू केली आहे. या योजनेद्वारे पोलिसांना घरांसाठी कमी व्याजदरात कर्ज आणि अनुदान उपलब्ध करून देण्यात येतो. ही एक विशेष गृह कर्ज योजना असल्याने कॉन्स्टेबलपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना पोलिसांच्या गृहनिर्माण व कल्याण महामंडळामार्फत सहजपणे गृहकर्ज उपलब्ध करून देण्यात येतो. पोलिस कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर हक्काचे घर मिळावे आणि सरकारी वसाहतींवरील ताण कमी व्हावा, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील कर्मचारी कॉन्स्टेबल ते निरीक्षक स्तरापर्यंत या योजनेत सर्वांना लाभ मिळणार आहे.

Devendra Fadnavis on Police Housing Scheme : मोठी बातमी! राज्यात पोलिसांना घरांसाठी 1768.08 कोटी मंजूर Read More »

raj thackeray

Raj Thackeray on PM Modi: चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?  काटकसरीच्या आवाहनानंतर राज ठाकरे भडकले

Raj Thackeray on PM Modi:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना पुढील एका वर्षासाठी पेट्रोल आणि डिझेल जपून वापरण्याचा सल्ला दिला आहे. तसेच सोने खरेदी टाळा असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यावर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी मोदी यांना पत्र लिहित चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ? असा प्रश्न विचारला आहे. राज ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी तमाम भारतीयांना काटकसर करण्याचं आवाहन केलं. सोनं खरेदी कमी करा किंवा जवळपास थांबवाच, परदेशात गरज नसेल तर जाऊ नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, विजेवर चालणाऱ्या गाड्या जास्त वापरा, वर्कफ्रॉम होमचा पर्याय स्वीकारा इत्यादी इत्यादी. हे सगळं का ? तर, सोनं, पेट्रोल डिझेल हे आयात करावं लागतं आणि त्यात विदेशी गंगाजळी मोठ्या प्रमाणवर खर्च होते. आणि सध्या इराण युद्धामुळे खनिज तेलाचे भाव प्रचंड वाढलेत. बरं, मग स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काही शे गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढत आहेत, स्वतःवर फुलं उधळून घेत आहेत त्याचं काय करणार आहात आपण ? आमच्याकडून चूक झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून, यापुढे माझ्यासकट कोणीही काही असं करणार नाही असं सांगणार आहात का ? चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ? सध्या खनिज तेलाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव हा साधारणपणे ९० ते १०० डॉलर्स प्रति बॅरल असा आहे. हा भाव जगाने या आधी कधी पाहिला नाही असं नाही. २००८ ला पुढे २०११-२०१२ मध्ये अरब स्प्रिंगच्या वेळेस, २०१३-२०१४ च्या काळात ( जेंव्हा भाजपवाले खनिज तेलाच्या किंमती आणि देशाची इभ्रत यावर तावातावाने बोलत होते तो काळ ), पुढे अशीच परिस्थिती २०२२ आणि २०२३ च्या दरम्यान जेंव्हा ओपेकने खनिज तेलाचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा देखील बॅरलचा भाव ९० ते १०० डॉलर्सच्या दरम्यान गेला होता. या घटनांपैकी ३ ते ४ वेळा मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि एकदा तर स्वतः मोदी पंतप्रधान होते. मनमोहन सिंगांनी असं आवाहन केलं नाही की तेंव्हा मोदींनी केलं नाही. मग आत्ताच का ? काटकसर करा हे आवाहन करताना खरं कारण देशाच्या आणि राज्याराज्यांच्या अर्थव्यवस्थेचं जे काही कंबरडं मोडून ठेवलं आहे त्याबद्दल पंतप्रधान काहीच बोलत नाहीयेत. बरं जेंव्हा बॅरलचा भाव ६० ते ६५ डॉलर्सच्या आसपास होता तेंव्हा पण तुम्ही चढ्या भावाने आम्हाला पेट्रोल डिझेल विकत होतात त्यावेळेस जे पैसे लोकांकडून घेतले जे काही लाख कोटी रुपये असतील ते कुठे गेले ? त्याचं काय झालं ? ज्या रेवडी संस्कृतीची पंतप्रधानांनी खिल्ली उडवली त्याच रेवड्या मग २०२४ ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक असो की त्यानंतरच्या बिहार, पश्चिम बंगाल निवडणूका असोत की इतर कुठल्याही निवडणुका ‘रेवड्या’ वाटूनच निवडणुका जिंकल्यात. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेने राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीला आणली. महिलांना सक्षम करायचं सोडून त्यांना तुटपुंजे पैसे द्यायचे आणि ते पैसे महागाईच्या रूपाने पुन्हा काढून घ्यायचे. देशाची आणि राज्याची अर्थव्यवस्था जर नाजूक झाली आहे तर या रेवड्या वाटू नका असं पंतप्रधान ठामपणे सांगणार आहेत का ? पेट्रोल, डिझेलच्या वापरात काटकसर करा असं पंतप्रधान सांगतात. ठीक आहे. मग हे आत्ताच का सुचलं ? पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि इतर राज्यांच्या निवडणुकीत प्रचार, रोड शो करताना आणि देशभरातून लाखो माणसं त्या त्या राज्यात नेताना जे कोट्यवधी लिटर्स पेट्रोल, डिझेल वाया गेलं तेंव्हा का नाही सुचलं ? या राज्यांमध्ये जो अफाट पैशाचा खेळ करून मतदान मिळवलं तेंव्हा का नाही सुचलं ? लोकांनी परदेशात जाणं टाळावं असं पंतप्रधान म्हणतात. पण किती टक्के लोकांना परदेशात जाणं आत्ता परवडत आहे ? ज्या वर्गाला परवडू शकतो त्यांना पुढच्या महिन्यात आपली कंपनी आपल्याला कामावर ठेवेल का याची खात्री नाही. विद्यार्थ्यांना परदेशात शिकायला जावंस वाटतं कारण गेल्या १० ते ११ वर्षांत आपण शिक्षणात फार मूलभूत गुंतवणूक पण केली नाही भारतात रहावं असं वाटावं असं वातावरण पण निर्माण केलं नाही. शिक्षणात फक्त हिंदी कशी लादता येईल याकडे सगळं लक्ष लागलेलं. गेले काही महिने विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून अंग काढून घेत आहेत. एक अंदाज असा आहे जवळपास दीड लाख करोड रुपये गेल्या तीन महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतलेत. भारतात विदेशी गुंतवणूक होत नाहीये. पंतप्रधान आणि त्यांचे मुख्यमंत्री फक्त गुंतवणुकीचे करार करतात, त्यासाठी थंड हवेच्या देशांत जातात. बरं तिथे जाऊन भारतीय कंपन्यांसोबत करार करायचे मग त्यासाठी स्वित्झर्लंडला काय जायचं? स्वतः पंतप्रधान आता १५ मे पासून ५ देशांच्या परदेश दौऱ्यावर निघालेत, हे दौरे तुम्ही थांबवा. आणि मग लोकांना आवाहन करा असं राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटलं आहे.

Raj Thackeray on PM Modi: चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?  काटकसरीच्या आवाहनानंतर राज ठाकरे भडकले Read More »

varsha gaikwad

Varsha Gaikwad : पंतप्रधानांच्या सल्ल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी गाड्यांचा ताफा सोडून मेट्रो, बेस्ट व लालपरीने प्रवास करावा

Varsha Gaikwad : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अखेर देश संकटात आहे हे कबुल करून स्वतःचे अपयश मान्य केले आहे. १२ वर्षांपासून नरेंद्र मोदींनी देशाला वेठीस धरले आहे. निवडणुका, प्रचार व द्वेष पसरण्यापलिकडे भाजपा व मोदी सरकारने काहीही केलेले नाही. अमेरिका-इराण युद्धाचा फटका देशाला बसणार हे माहित असतानाही मोदी सरकारने कोणतेही नियोजन केले नाही, त्याचा मोठा फटका जनतेला बसत आहे. नरेंद्र मोदींच्या चुकांचे ओझे जनतेने का सहन करायचे? असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी विचारला आहे. नरेंद्र मोदींच्या विधानावर प्रतिक्रिया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, नरेंद्र मोदी स्वतः ८ हजार कोटी रुपयांचे विमान वापरतात, महागड्या वस्तू वापरतात, जनतेच्या पैशावर परदेश वाऱ्या करतात आणि पेट्रोल डिझेल कमी वापरा, सोने वर्षभर खरेदी करू नका, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा असे सल्ले जनतेला देत आहेत. नरेंद्र मोदी यांनी व त्यांच्या मंत्र्यांनीच आधीच काटकसर करण्याची सवय लावावी. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सल्ला प्रमाण मानून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गाड्यांचा ताफा घेऊन फिरण्यापेक्षा मुंबई, पुणे, नागपूर शहरात मेट्रो, सीटी बस व राज्यभरात लालपरीने प्रवास करून इंधन बचतीची सवय लावावी. देशासाठी एवढा त्याग करायला काय हरकत आहे. नरेंद्र मोदींचा सल्ला म्हणजे ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण’, असा आहे. संध्याकाळी जनतेला इंधन बचतीचा उपदेश देऊन दोन तासाने स्वतः मोदीच गाड्यांचा मोठा ताफा घेऊन फिरत होते, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या. सलग १२ वर्षांपासून सत्तेत असतानाही नरेंद्र मोदी यांना देशावर येणाऱ्या संकटासाठी नियोजन करता आले नाही, हे मोदी यांचे मोठे अपयश आहे. जनता आधीच महागाईने पिचलेली आहे, त्यात गॅस, इंधनाच्या संकटाने भर घातली आहे. पेट्रोल-डिझेल हे चैन किंवा उधळपट्टी नाही तर दररोजची गरज झालेली आहे. राहुल गांधी यांनी इराण युद्धाच्यावेळीच संकटाचा इशारा दिला होता पण मोदींच्या हुकुमशाही कारभारामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

Varsha Gaikwad : पंतप्रधानांच्या सल्ल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी गाड्यांचा ताफा सोडून मेट्रो, बेस्ट व लालपरीने प्रवास करावा Read More »