Dhananjay Munde : “आम्ही दोघे बहीण-भाऊ मंत्री होऊ शकलो नाही”; धनंजय मुंडेंची भावनिक खंत
Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील सिरसाळा येथे लोकनेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या राजकीय प्रवासाविषयी बोलताना मंत्रिपदावर भाष्य केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वाचा गौरव करताना त्यांनी त्यांच्या कार्याचा उल्लेख केला. धनंजय मुंडे म्हणाले की, 1972 च्या भीषण दुष्काळाच्या काळात वसंतराव नाईक यांनी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो नागरिकांना मोठा आधार दिला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्राने संकटाचा सामना केला, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी नाईक कुटुंबावर जगदंबेचा आशीर्वाद असल्याचे सांगत माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक, मनोहर नाईक आणि इंद्रनील नाईक यांच्या राजकीय वाटचालीचाही गौरव केला. स्वतःच्या राजकीय आयुष्याचा उल्लेख करताना धनंजय मुंडे यांनी भावनिक शब्दांत खंत व्यक्त केली. “आम्ही दोघे बहीण-भाऊ मंत्री होऊ शकलो नाही. आम्हा दोघांपैकी एकाला मात्र घरी बसावं लागलं,” असे ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी पंकजा मुंडे आणि स्वतःचे समाजाशी असलेले नाते अतूट असल्याचे सांगितले. “मैदान में हारा हुआ इंसान फिर जीत सकता है, लेकिन अपनों का साथ निभाने वाला कभी हारता नहीं,” असे म्हणत त्यांनी उपस्थितांशी भावनिक संवाद साधला. धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्याची कार्यक्रमस्थळी उपस्थितांमध्ये चर्चा रंगली.
Dhananjay Munde : “आम्ही दोघे बहीण-भाऊ मंत्री होऊ शकलो नाही”; धनंजय मुंडेंची भावनिक खंत Read More »









