DNA मराठी

BJP

Vijay Wadettiwar 1

Vijay Wadettiwar: हा अर्थसंकल्प म्हणजे आज लग्न लावले असून अपत्य 2047 मध्ये होईल विजय वडेट्टीवारांची सडकून टीका

Vijay Wadettiwar: विधानसभेत सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प म्हणजे केवळ शब्दांचा आणि आकड्यांचा मारा होता, यातून जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे, अशी टीका विधानसभेचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. महाराष्ट्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे आज लग्न लावले असून अपत्य 2047 मध्ये होईल, या शब्दांत वडेट्टीवार यांनी टोला लगावला. या अर्थसंकल्पातील मुख्य त्रुटींवर बोट ठेवताना विजय वडेट्टीवार यांनी हा अर्थसंकल्प संपूर्ण महाराष्ट्राचा नसून केवळ मुंबई आणि MMR क्षेत्रासाठी असल्यासारखा वाटतो. पुणे, ठाणे आणि मुंबईतील प्रकल्पांवरच सर्व भर देण्यात आला असून उर्वरित महाराष्ट्र वाऱ्यावर सोडला आहे. ग्रामीण भागातील जनतेसाठी, विशेषतः नंदुरबारसारख्या दुर्गम जिल्ह्यांसाठी या बजेटमध्ये कोणतीही ठोस तरतूद नाही. सिंचन, शिक्षण आणि आरोग्य याबाबत स्पष्टता नाही, अस वडेट्टीवार म्हणाले. २०१४ मध्ये जेव्हा काँग्रेसने सत्ता सोडली, तेव्हा राज्यावर २ लाख ९० हजार कोटींचे कर्ज होते, पण आज हे कर्ज वाढले आहे.हे सरकार महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटत आहे. राज्य भिकारी होण्याच्या मार्गावर असून आर्थिक ताळमेळ पूर्णपणे कोलमडला आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची घोषणा याही वेळी करण्यात आलेली नाही. मागील वर्षीच्या घोषणांची अंमलबजावणी अद्याप कागदावरच असून शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. या अर्थसंकल्पातून केवळ कंत्राटदार आणि उद्योगपतींची भरभराट होणार आहे. प्रचंड कमिशन खाऊन सरकार स्वतःला मजबूत करत आहे,असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. सरकारच्या या धोरणावर उपरोधिक टिप्पणी करताना वडेट्टीवार म्हणाले, तुम्हारी बातों में ऐसे उलझे की सच समझ ना आया, चमकते विज्ञापनों में मेरा पिछड़ा गाँव नजर ना आया!

Vijay Wadettiwar: हा अर्थसंकल्प म्हणजे आज लग्न लावले असून अपत्य 2047 मध्ये होईल विजय वडेट्टीवारांची सडकून टीका Read More »

maharashtra politics

Maharashtra Politics: आधी स्वतःचं आयुष्य घडा…, मगच जात-धर्माच्या लढाया

Maharashtra Politics : आज राज्यात एक विचित्र चित्र दिसत आहे. तरुणांच्या आयुष्याशी संबंधित खरे प्रश्न बाजूला पडत चालले आहेत आणि जात-धर्माच्या नावावर वातावरण तापवण्याचे प्रकार वाढत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट, भाषणांमध्ये आक्रमक शब्द आणि रस्त्यावरचे वाद यात सर्वात जास्त वापर होत आहे तो युवकांच्या भावनांचा. खरं पाहिलं तर आजच्या तरुणासमोरचे प्रश्न वेगळे आहेत. कॉलेजची वाढती फी, शिक्षणासाठी घेतलेली कर्जे, नोकरीची अनिश्चितता, शेतीतून मिळत नसलेले उत्पन्न आणि वाढती महागाई हेच वास्तव आहे. अनेक घरांमध्ये आई-वडील मुलांच्या भविष्यासाठी जीव तोडून मेहनत करत आहेत. पण या प्रश्नांवर मोठं आंदोलन किंवा ठाम चर्चा क्वचितच दिसते. कारण तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवले जाते. जात आणि धर्माच्या नावावर भडकवणे हे आज काही लोकांसाठी राजकीय साधन बनले आहे. भावना पेटल्या की प्रश्न विचारले जात नाहीत आणि हाच काही राजकारण्यांचा फायदा असतो. वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी समाजात विभागणी निर्माण केली जाते. तरुणांना पुढे करून संघर्ष उभा केला जातो, पण त्या संघर्षात भडकावणाऱ्यांची स्वतःची मुलं किंवा कुटुंबीय कधीच दिसत नाहीत. दंगली, भांडणं किंवा आक्रमक आंदोलनांत अडकणारा तरुण मात्र सामान्य घरातून आलेला असतो. एका चुकीच्या क्षणी झालेला गुन्हा संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. पोलिस केस, कोर्टकचेऱ्या, नोकरीच्या संधी संपणे याचा फटका फक्त त्या मुलाला नाही, तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला बसतो. भडकावणाऱ्यांचे काहीच बिघडत नाही; नुकसान होते ते सर्वसामान्यांच्या भविष्याचे. जात आणि धर्माचा अभिमान ठेवणे चुकीचे नाही. पण त्या नावाखाली स्वतःचे आयुष्य धोक्यात घालणे शहाणपणाचे नाही. कारण एक गोष्ट स्पष्ट आहे, तुम्ही सुरक्षित आणि सक्षम असाल तरच तुमची ओळख टिकते. तुम्हीच नसाल तर जात-धर्माचा अर्थ उरत नाही. आज युवकांनी स्वतःला एक साधा प्रश्न विचारायला हवा, आपण कोणासाठी रागावतो आहोत? आपल्या भविष्याकरिता की कोणाच्या राजकीय फायद्यासाठी? जे लोक सतत भडकवतात, त्यांच्या भूतकाळाकडे पाहा; अनेकदा वैयक्तिक स्वार्थातून सुरू झालेल्या गोष्टींना नंतर सामाजिक रंग दिला जातो. हे ओळखण्याची जबाबदारी युवकांचीच आहे. आज गरज आहे ती दिशा बदलण्याची. शिक्षण परवडणारे व्हावे, रोजगार वाढावा, शेतीला योग्य भाव मिळावा, महागाई कमी व्हावी या मुद्द्यांवर तरुणांनी आवाज उठवला तरच खरा बदल घडेल. रागाने नव्हे, तर विचाराने समाज बदलतो. आई-वडील तुमच्यासाठी आयुष्य झिजवत असतात. तुमच्या एका चुकीच्या पावलाने त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त होऊ शकते. त्यामुळे निर्णय घेताना घोषणांपेक्षा घरातील परिस्थिती आठवा. तरुणांनो, भावना ठेवा पण विवेकही ठेवा. राजकारण तुमच्यासाठी असावे; तुम्ही राजकारणासाठी नाही. आधी स्वतःचं आणि कुटुंबाचं आयुष्य घडा… बाकीच्या लढाया नंतरही लढता येतात.

Maharashtra Politics: आधी स्वतःचं आयुष्य घडा…, मगच जात-धर्माच्या लढाया Read More »

mla kashinath date

MLA Kashinath Date : शेतकऱ्यांच्या भावना भडकवून राजकीय खेळी करु नका; आमदार काशिनाथ दाते भडकले

MLA Kashinath Date : कुकडी डावा कालवा व पिंपळगाव जोगा डावा कालव्याच्या आवर्तनाबाबत काही घटकांकडून जाणीवपूर्वक गैरसमज पसरवून शेतकऱ्यांच्या भावनांना चिथावणी देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची खंत व्यक्त करत आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकरी बांधवांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या पाण्याच्या प्रश्नाला राजकीय रंग देत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा डाव उधळून लावा, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी व ग्रामस्थांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी आमदार दाते सर यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन कुकडी व पिंपळगाव जोगा कालव्याचे आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्या- नंतर मंत्री विखे पाटील यांच्यामार्फत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून कुकडी कालव्याद्वारे 5 मार्च दरम्यान तर 25 फेब्रुवारी ते 1 मार्च च्या दरम्यान पिंपळगाव कालव्यांद्वारे पाणी सोडण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही वेळेत आवर्तन सोडण्यात आले असल्याचे नमूद करत त्यांनी शेतकऱ्यांनी अफवांना बळी न पडता प्रशासनावर विश्वास ठेवावा, असे आवाहन केले. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असून कोणत्याही परिस्थितीत त्यांना न्याय मिळवून देण्याची आपली बांधिलकी कायम राहील, अशी ग्वाहीही आमदार काशिनाथ दाते यांनी दिली. येडगाव धरणातील अपेक्षित पाणीसाठा, तांत्रिक बाबी आणि सर्व लाभक्षेत्रांचा विचार करूनच आवर्तनाचे नियोजन केले जाते. दोन-तीन दिवसांचा विलंब तांत्रिक कारणास्तव होऊ शकतो मात्र 5 मार्चपर्यंत पाणी निश्चितपणे उपलब्ध होईल, यावर कोणीही राजकारण करू नका अस यावेळी आमदार काशिनाथ दाते म्हणाले.

MLA Kashinath Date : शेतकऱ्यांच्या भावना भडकवून राजकीय खेळी करु नका; आमदार काशिनाथ दाते भडकले Read More »

mva

Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकांबाबत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक ; कुणाला मिळणार संधी?

Rajya Sabha Election : आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्यसभा निवडणुकीबाबतचर्चा करण्यात आली. बैठकीनंतर काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधत आघाडीची भूमिका स्पष्ट केली. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने राष्ट्रीय राजकारणाचा विचार करून राज्यसभेची जागा काँग्रेसला मिळावी, असा प्रस्ताव पक्षाच्या वतीने मांडण्यात आला आहे. बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांनी आपली मते मांडली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यासंदर्भात त्यांच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करतील, तर शिवसेनेनेही आपली भूमिका स्पष्ट करतील अस वडेट्टीवार म्हणाले. राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीतील जागावाटपाचा प्रश्न चर्चेने सुटेल असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. आम्ही सर्वजण आपापल्या पक्षश्रेष्ठींशी आणि वरिष्ठ नेत्यांशी पुन्हा चर्चा करू हे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी जागेसाठी आग्रह धरला असला, तरी महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रितपणे ही निवडणूक लढवणार आहोत. तिन्ही पक्षांच्या संमतीनेच उमेदवार निश्चित केला जाईल. राज्यसभा अर्जासाठी 5 मार्चपर्यंत वेळ आहे. त्यामुळे मित्रपक्षांशी सन्मानपूर्वक चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. महाविकास आघाडी एकत्र लढली तर आमचा विजय निश्चित आहे, अस काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. मालेगाव प्रकरणी प्रश्न विचारला असताना विधिमंडळ नेते वडेट्टीवार म्हणाले, धर्माचे पालन रस्त्यावर होऊ नये, परंतु सध्या रमजानचा महिना सुरू आहे आणि रोजाच्या काळात नमाज वेळेवर अदा करणे आवश्यक असते. या प्रकरणाचा विनाकारण वाद केला जात आहे, हे पूर्णपणे राजकारणाने प्रेरित आहे. समाजाला हिंदू-मुस्लिममध्ये विभागण्याचा प्रयत्न केला जात आहे. जे लोक शंकराचार्यांना देखील सोडत नाहीत, ते कोणत्या विचारधारेचे राजकारण करत आहेत हे जनता ओळखून आहे असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.

Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकांबाबत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक ; कुणाला मिळणार संधी? Read More »

whatsapp

मोठी बातमी! 1 मार्चपासून अनेकांचे WhatsApp होणार बंद; जाणून घ्या कारण

WhatsApp New Rules: जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲप वापरण्याच्या काही नियमांमध्ये बदल होणार आहे. 1 मार्चपासून अनेकांना व्हॉट्सॲप वापरता येणार नाही. केंद्र सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, सिम-बाइंडिंग नियमात कोणताही बदल किंवा शिथिलता येणार नाही. हा नियम व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि सिग्नल मेसेजिंग अँप्सना लागू होतो. हा नियम 1 मार्चपासून लागू होईल आणि कंपन्यांना त्याचे पालन करावे लागेल. सरकारच्या मते, व्हॉट्सॲप वापरण्यासाठी वापरला जाणारा नंबर खरा आणि सक्रिय आहे याची पुष्टी करण्यासाठी हे अँप्स सतत सक्रिय सिम कार्डशी जोडलेले असले पाहिजेत. जर सिम काढून टाकले किंवा डिएक्टिव्ह केले तर अ‍ॅपच्या सेवा त्या डिव्हाइसवर कार्य करणार नाहीत. सिम-बाइंडिंग म्हणजे काय? तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट तयार करण्यासाठी वापरलेला मोबाइल नंबर तुमच्या फोनवर सक्रिय राहिला पाहिजे. जर ते सिम तुमच्या फोनमध्ये नसेल किंवा डिएक्टिव्ह केले असेल तर व्हॉट्सॲप योग्यरित्या कार्य करणार नाही. आतापर्यंत, मेसेजिंग अँप्स तुम्ही लॉग इन केल्यानंतर 6-अंकी ओटीपी टाकून सिमची उपस्थिती सतत तपासत नव्हते. नवीन नियम हे बदलण्यासाठी सेट केला आहे. सिम कार्ड आता सक्रिय आणि फोनमध्ये नेहमीच उपस्थित असले पाहिजे. डिजिटल फसवणूक, बनावट नंबरचा गैरवापर आणि सायबर गुन्हे रोखण्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे सरकारने हा बदल केला आहे. जेव्हा प्रत्येक खाते सत्यापित सिमशी जोडले जाईल, तेव्हा फसवणूक आणि बनावट खाते ओळखणे सोपे होईल. 1 मार्च 2026 नंतर कोणतीही सवलत नाही दूरसंचार विभागाने (DoT) 28 नोव्हेंबर 2025 रोजी सिम-बाइंडिंग नियम जारी केला आणि कंपन्यांना तो लागू करण्यासाठी 90 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. याचा अर्थ असा की सर्व मेसेजिंग प्लॅटफॉर्मना 1 मार्च 2026 पर्यंत ही प्रणाली लागू करावी लागेल. सरकारने असेही स्पष्ट केले आहे की सहा तासांचा ऑटो-लॉगआउट नियम वेगवेगळ्या डिव्हाइसवर लॉग इन केलेल्या वेब किंवा डेस्कटॉप खात्यांवर देखील लागू होईल. याचा अर्थ असा की जर तुम्ही संगणक किंवा वेबवर व्हॉट्सॲप वापरत असाल, तर तुम्हाला दर सहा तासांनी QR कोडद्वारे पुन्हा लॉगिन करावे लागेल. सर्वसामान्यांवर होणार परिणाम जर तुमचा नंबर ऍक्टिव्ह असेल आणि तुमच्या फोनमध्ये तेच सिम असेल, तर तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही. तुमचे व्हॉट्सॲप सामान्यपणे कार्य करत राहील. मात्र जर तुम्ही तुमच्या फोनमधून सिम काढला किंवा दुसऱ्या फोनमध्ये घातला तर तुमचे व्हॉट्सॲप तात्पुरते डीएक्टिव्ह होईल. शिवाय, जर तुमचा नंबर बंद झाला (रिचार्ज अयशस्वी झाल्यामुळे), तर व्हॉट्सॲप पुन्हा पडताळणीसाठी विचारू शकते किंवा अगदी बंद देखील करू शकते.

मोठी बातमी! 1 मार्चपासून अनेकांचे WhatsApp होणार बंद; जाणून घ्या कारण Read More »

Manoj Jarange Patil

Manoj Jarange: अंमलबजावणी करा नाहीतर…, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Manoj Jarange : काही दिवसांपूर्वी परभणीच्या सहजपूर जवळील शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासंदर्भात महसूल आणि पोलीस प्रशासनाने गावकऱ्यांचा विरोध असतानाही जमीन मोजणीची प्रक्रिया पूर्ण केली होती. या विरोधामुळे शेतकऱ्यांवर पोलीस बळ वापरल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर शेतकरी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. या उपोषण स्थळाला भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा करत मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, “सरकारने शेतकऱ्यांसोबत चर्चा करून शक्तीपीठ महामार्गाला जमीन द्यायची की नाही हे ठरवावे. आम्ही महसूल मंत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन केले आहे.” अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबतही मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “जर परिवाराचे म्हणणं असेल तर या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. सत्य बाहेर येणे आवश्यक आहे.” मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याबाबतही मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “सरकारने जीआर काढला, पण अधिकारी- कर्मचारी त्याची अंमलबजावणी करत नाहीत. मोठ्या प्रमाणावर अर्ज आले आहेत, परंतु प्रमाणपत्र दिले जात नाही. सरकारने परिपत्रक काढून मराठा कुणबी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर दिली पाहिजेत. तसेच सातारा व औंध गॅझेटची अंमलबजावणी करावी आणि शहीदांच्या कुटुंबीयांच्या नोकऱ्यांचा प्रश्न सुटवावा.” मनोज जरांगे पाटील यांनी इशाराही दिला की, “जून पर्यंत सरकारने काय केले नाही तर आम्ही उपोषणाला बसणार आहोत. मराठा समाजाने भाजपला सत्तेत बसवले आहे, जर सन्मान दिला नाही तर 2029 मध्ये पायउतार करावा लागेल.”

Manoj Jarange: अंमलबजावणी करा नाहीतर…, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा Read More »

Nitesh Rane 1024x875

Nitesh Rane: ‘या’ दिवशी सुरू होणार मुंबई–विजयदुर्ग जलवाहतूक (रो- रो )सेवा ; मंत्री नितेश राणेंची मोठी घोषणा

Nitesh Rane: जलवाहतूक (रो – रो )सेवा सुरू करणे, ही संकल्पना मुळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे.त्यापैकीच मुंबई आणि कोकणाला जल वाहतुकीच्या माध्यमातून जोडणे हा उपक्रम आहे. त्यांच्या या संकल्पनेला खऱ्या अर्थाने १ मार्चपासून पासून सुरुवात होत आहे. भाऊचा धक्का ते विजयदुर्ग असा पहिला टप्पा मुंबई आणि कोकणाला जोडण्याच्या दृष्टिकोनातून सुरू करत आहोत. अशी माहिती मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी विधिमंडळात पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी सांगितले, मुंबई ते विजयदुर्ग हा पहिला मार्ग रो रो सेवेचा असेल.येणाऱ्या काळात मुंबई ते रत्नागिरी, मुंबई ते महाड असे वेगवेगळे मार्ग यामध्ये वाढवणार आहोत असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. या बोट सेवेची संपूर्ण माहिती आणि तिकीट चे दर काय आहेत. याची संपूर्ण माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे. तिकीट बुकिंग देखील मोठ्या प्रमाणावर सुरू झालेले आहे. चांगला प्रतिसाद या तिकीट बुकिंग च्या माध्यमातून रोरो सेवेला मिळत आहे. कोकणात शिमगोत्सव सुरू होणार आहे. या शिमगोत्सवाला कोकणात जाण्यासाठी, सिंधुदुर्ग कोकणची जनता मोठ्या प्रमाणात सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद देत आहे. हे तिकीट बुकिंग च्या माध्यमातून दिसत आहे. अशा पद्धतीचे प्रयत्न रो रो सेवेच्या माध्यमातून मुंबई कोकण किंबहुना मुंबईला अन्य राज्यांबरोबर जोडण्याचे काम आणि पर्यटन रोजगार आणि कृषी क्षेत्राला चालना देण्याचे काम या जलवाहतुकीच्या माध्यमातून होणार आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा विचार आपण करत आहोत.कोकणात जाण्यासाठी जेव्हा साडेचार ते पाच तासात कोकणात जाऊ शकू तेव्हा आपला जास्तीत जास्त वेळ वाचू शकतो.आंबा, काजू, मच्छीमारी व्यवसायाला देखील मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल. पर्यटन आणि रोजगाराला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळणार. रो रो सेवा संदर्भात सुरक्षिततेच्या सर्व परवानगी मिळाल्यानंतरच काही ट्रायल केल्यानंतर हि सेवा सुरू करत आहोत. १ मार्चपासून प्रवासी तिथे जायला सुरुवात करतील. आपण त्या बोटीवर काही डॉक्टर सुद्धा उपलब्ध करून देणार आहोत. जेणेकरून काही लोकांना समुद्र प्रवासाचा होणारा त्रास झाल्यास उपचार मिळेल.पर्यावरण पूरक विकास हाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा हेतू आहे.असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

Nitesh Rane: ‘या’ दिवशी सुरू होणार मुंबई–विजयदुर्ग जलवाहतूक (रो- रो )सेवा ; मंत्री नितेश राणेंची मोठी घोषणा Read More »

Vijay Wadettiwar

Vijay Wadettiwar: अवकाळी पाऊस, गारपीट झाल्याने शेतकरी संकटात; विजय वडेट्टीवारांनी मांडली शेतकऱ्यांची स्थिती

Vijay Wadettiwar: गेल्या 24 तासांत विदर्भ आणि मराठवाड्यात झालेली गारपीट आणि दुसरीकडे ‘शक्तिपीठ महामार्गा’साठी शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, यावरून काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेत स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची स्थिती मांडली. विदर्भ आणि मराठवाड्यातील नुकसानीचा पाढा वाचताना वडेट्टीवार म्हणाले की नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ तसेच मराठवाड्यातील बीड, लातूर ,नांदेड ,परभणी भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने ज्वारी, गहू, हरभरा ही काढणीला आलेली पिके मातीमोल झाली आहेत. आंबा आणि द्राक्ष बागायतदारांचेही अतोनात नुकसान झाले आहे. हवामान खात्याने सोलापूर, परभणी, नांदेड, धाराशीव भागात पुढील दोन दिवस पावसाचा इशारा दिला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे असं वडेट्टीवार म्हणाले. मागील अतिवृष्टीची मदत अजून मिळालेली नाही, धानाला बोनस जाहीर करून देण्यात आलेला नाही आणि आता पुन्हा संकट आले आहे. सरकारने नियम-निकष बाजूला ठेवून तातडीने रोख मदत द्यावी आणि पंचनाम्यांचे केवळ आदेश न देता प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. एकीकडे अवकाळी पावसाने शेतकरी उध्वस्त होत असताना दुसरीकडे शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या घराघरांवर नोटिसा चिकटवून दहशत निर्माण केली जात आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणी सुरू आहे. सहजपूर-जवळा सारख्या 600 लोकसंख्येच्या गावात 1000 पोलिसांचा फौजफाटा तैनात करून मोजणी प्रक्रिया राबवली जात आहे. हे लोकशाहीला भूषणावह नाही. धाराशीव, सांगली, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी 23 फेब्रुवारीला या प्रकल्पाविरोधात एल्गार पुकारला होता. हा प्रकल्प रद्द करावा, अशी जनभावना असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. एकीकडे अस्मानी संकटामुळे शेतकरी खचला आहे, तर दुसरीकडे सुलतानी संकटाप्रमाणे सरकार पोलीस बळाचा वापर करून त्यांच्या जमिनी हिसकावत आहे. सरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी विधिमंडळ नेते विजय वडेटीवार यांनी केली. विधानसभा अध्यक्ष यांनी याची दखल घेऊन सरकारला निवेदन करण्याचे निर्देश दिले.

Vijay Wadettiwar: अवकाळी पाऊस, गारपीट झाल्याने शेतकरी संकटात; विजय वडेट्टीवारांनी मांडली शेतकऱ्यांची स्थिती Read More »

sujay vikhe

Sujay Vikhe: सुजय विखे पाटील यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी निवड; अहिल्यानगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण

Sujay Vikhe : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश संघटनात महत्त्वपूर्ण बदल करत भारतीय जनता पक्षने अहिल्यानगर जिल्ह्याचे युवा नेतृत्व आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड जाहीर केली आहे. या निवडीमुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. डॉ. सुजय विखे पाटील हे जिल्ह्यातील सक्रिय, अभ्यासू आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जातात. खासदार म्हणून त्यांनी विविध विकासकामांसाठी पाठपुरावा केला असून युवक आणि ग्रामीण भागातील प्रश्न मांडण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या संघटन कौशल्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली असल्याचे मानले जात आहे. प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे पक्ष संघटना अधिक मजबूत होईल आणि राज्यभरात भाजपची ताकद वाढेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या निवडीमुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात राज्याच्या राजकारणात डॉ. सुजय विखे पाटील यांची भूमिका अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Sujay Vikhe: सुजय विखे पाटील यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी निवड; अहिल्यानगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण Read More »

sujay vikhe

Sujay Vikhe Patil: राज्यसभेची वाटचाल : सुजय विखे पाटील यांची राजकीय पुनर्स्थापना की वारसाहक्काचा विस्तार?

Sujay Vikhe Patil: अहिल्यानगरच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत घडलेल्या घडामोडींनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे. पराभव हा राजकीय कारकिर्दीचा शेवट नसतो, तर अनेकदा तो नव्या उभारणीचा प्रारंभ ठरतो. माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या संदर्भात हीच प्रक्रिया सध्या दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर त्यांनी घेतलेली राजकीय पुनर्बांधणीची दिशा आणि आता राज्यसभेच्या संभाव्य उमेदवारीच्या चर्चा, या केवळ वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचा भाग नाहीत; त्या महाराष्ट्राच्या बदलत्या सत्तासमीकरणांचेही प्रतीक आहेत. पराभवानंतरची पुनर्बांधणी : पराभव की संधी? लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर अनेक नेते राजकीय अंधारात जातात. परंतु सुजय विखे पाटील यांनी हा पराभव आत्मपरीक्षणाची संधी मानून संघटनात्मक पातळीवर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. सहकार क्षेत्रातील नेतृत्व स्वीकारून त्यांनी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. सहकार हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा कणा मानला जातो. या क्षेत्रात नेतृत्व मिळवणे म्हणजे केवळ आर्थिक नव्हे, तर सामाजिक आणि राजकीय प्रभावही निर्माण करणे होय. याच काळात विधानसभा निवडणुकांमध्ये आणि स्थानिक राजकारणात त्यांनी घेतलेली सक्रिय भूमिका, विशेषतः संगमनेरमधील राजकीय समीकरणांमध्ये झालेला बदल, यामुळे त्यांच्या नेतृत्वाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले. स्थानिक आमदारांच्या निवडणुकीत आणि महानगरपालिका सत्तास्थापनेत त्यांनी निभावलेली भूमिका, ही त्यांच्या संघटन कौशल्याची चुणूक मानली जाते. राज्यसभा : पराभूत नेत्यांसाठी पुनरागमनाचा मार्ग? भारतीय संसदीय व्यवस्थेत राज्यसभा ही केवळ “वरिष्ठ सभागृह” नसून अनेकदा ती राजकीय पुनरागमनाचे व्यासपीठ ठरते. लोकसभेत पराभव झालेल्या किंवा थेट निवडणूक लढवणे कठीण झालेल्या नेत्यांना राज्यसभेद्वारे संसदेत स्थान दिले जाते. त्यामुळे सुजय विखे पाटील यांच्या संभाव्य राज्यसभा उमेदवारीकडे केवळ वैयक्तिक प्रगती म्हणून पाहणे अपुरे ठरेल. ही एक व्यापक राजकीय रणनीती असू शकते. भाजपसाठी अहिल्यानगर आणि आसपासचा भाग हा परंपरेने काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. या भागात पक्षाची ताकद वाढवण्यात विखे पाटील कुटुंबाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्वाला अशा प्रभावशाली कुटुंबातील नेत्याला राष्ट्रीय पातळीवर संधी देण्याचा विचार आकर्षक वाटणे स्वाभाविक आहे. वारसा आणि नेतृत्व : कौटुंबिक प्रभावाचा प्रश्न सुजय विखे पाटील यांच्या राजकीय प्रवासात त्यांच्या वडिलांचा, राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रभाव नाकारता येणार नाही. सहकार, प्रशासन आणि राज्यकारभारातील त्यांचा अनुभव हा सुजय विखे पाटील यांच्यासाठी मार्गदर्शक ठरला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात कौटुंबिक वारसा ही नवी गोष्ट नाही; शरद पवार, ठाकरे, चव्हाण, मुंडे यांसारख्या अनेक घराण्यांनी ही परंपरा निर्माण केली आहे. मात्र, वारसा हा केवळ प्रवेशद्वार असतो; टिकून राहण्यासाठी वैयक्तिक नेतृत्वगुण आवश्यक असतात. सुजय विखे पाटील यांनी स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्याचा जो प्रयत्न केला आहे, तो त्यांच्या वैयक्तिक क्षमतेचा दाखला मानला जाऊ शकतो. राज्यसभा उमेदवारी : पक्षनिष्ठेचे पारितोषिक की रणनीतिक गरज? राज्यसभेची उमेदवारी ही अनेकदा पक्षनिष्ठा, संघटनात्मक योगदान आणि भविष्यातील राजकीय संभाव्यता या तिन्ही गोष्टींचा संगम असते. भाजपसारख्या पक्षासाठी महाराष्ट्रात मजबूत स्थानिक नेतृत्व निर्माण करणे ही दीर्घकालीन गरज आहे. सुजय विखे पाटील यांची संभाव्य निवड ही या व्यापक रणनीतीचा भाग असू शकते. तथापि, राज्यसभेत जाणे म्हणजे केवळ प्रतिष्ठा नव्हे, तर जबाबदारीही आहे. राष्ट्रीय स्तरावर धोरणनिर्मितीत सहभाग, राज्याच्या प्रश्नांना संसदेत मांडणे आणि मतदारसंघाच्या अपेक्षांचे प्रतिनिधित्व करणे, ही राज्यसभा सदस्याची मूलभूत कर्तव्ये आहेत. पुनरागमन की नव्या पर्वाची सुरुवात? सुजय विखे पाटील यांच्या राज्यसभा संभाव्य उमेदवारीच्या चर्चा या केवळ राजकीय अफवा म्हणून दुर्लक्षित करता येणार नाहीत. त्या महाराष्ट्राच्या राजकारणातील बदलत्या प्रवाहाचे संकेत आहेत. पराभवानंतरही राजकीय सक्रियता कायम ठेवून संघटनात्मक पातळीवर स्वतःला सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न, हा त्यांच्या नेतृत्वाच्या महत्त्वाकांक्षेचा पुरावा आहे. राजकारणात वारसा महत्त्वाचा असतो, पण अंतिम कसोटी ही जनतेचा विश्वास आणि नेतृत्वाची परिणामकारकता यांचीच असते. राज्यसभेचा मार्ग खुला झाला, तर तो सुजय विखे पाटील यांच्यासाठी केवळ पुनरागमन नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवरील नव्या राजकीय पर्वाची सुरुवात ठरू शकतो.

Sujay Vikhe Patil: राज्यसभेची वाटचाल : सुजय विखे पाटील यांची राजकीय पुनर्स्थापना की वारसाहक्काचा विस्तार? Read More »