DNA मराठी

Ahilyanagar

img 20250727 wa0005

Ahilyanagar News : “बनावट कागद… खऱ्या आयुष्याची राख”

Ahilyanagar News : – बनावट दस्तऐवज तयार करणे, खोटी प्रमाणपत्रे सादर करणे, बनावट आधारकार्ड वापरणे ही केवळ फसवणूक नव्हे, तर समाजाच्या मूलभूत विश्वासावर केलेली गद्दारी आहे. विशेषतः अहिल्यानगरसारख्या जिल्ह्यात या प्रकारांना सध्या उघडपणे खतपाणी घातले जात आहे. कारण एकच कारवाईचा अभाव आणि प्रशासनाचा ढिसाळपणा. आपल्याकडे आधारकार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय दस्तऐवज आहे. त्याचा वापर ओळख, बँकिंग, जमिनीच्या व्यवहारात, रेशन, शिक्षण, नोकरी यासाठी होतो. पण आज बनावट आधारकार्ड सहज बाजारात मिळतात. एखाद्याने बनावट आधार वापरून दुसऱ्याच्या जमिनीवर खरेदीखत केले, ताबा घेतला, आणि मूळ मालकाने विरोध केला, तर उत्तर मिळते “तुम्ही कोर्टात जा.” विशेष म्हणजे आता फक्त बनावट प्रमाणपत्रे, खरेदीखत किंवा आधार कार्ड पुरेसे राहिलेले नाही, तर थेट बनावट शासकीय निर्णय (GR) तयार होऊन त्यावर कोट्यवधींचा निधी वळता केला जातो. हे GR कागदोपत्री अधिकृत भासत असल्यामुळे अनेक खात्यांमधून निधी वितरितही होतो. परंतु जेव्हा वास्तव समोर येतं, तेव्हा फक्त एखाद- दुसरा गुन्हा दाखल होतो आणि त्यानंतर सारं शांत. कुणालाच शिक्षा नाही, कुणाला चौकशी नाही. कारण प्रत्येकजण कुणाच्या ना कुणाच्या संगनमतात सामील असतो. या खेळात हारते ती फक्त जनता जी कर भरते, मत देते, पण न्याय मात्र मिळत नाही. हे उत्तर म्हणजे सामान्य नागरिकाच्या वेदनेची थट्टा आहे. अहिल्यानगर जिल्हा परिषदेमध्ये बनावट अपंग प्रमाणपत्रांच्या आधारे बदल्या मिळाल्याची प्रकरणे उघडकीस आली. फक्त एक प्रकरणात गुन्हा दाखल झाला, त्यापुढे मात्र सर्व काही ‘जैसे थे’. याच जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातही बनावट अपंग प्रमाणपत्रे आढळली, पण पुन्हा त्यावरही कारवाई ‘नाही’. याचा अर्थ स्पष्ट आहे. बनावट उद्योग थांबवण्याची सरकारची इच्छाशक्तीच नाही. बनावट दस्ताऐवजांचा सर्वात मोठा बळी ठरतो, तो सर्वसामान्य नागरिक. ज्याने प्रामाणिकपणे जमिन खरेदी केली, त्याला एक दिवस कळते की दुसऱ्याच नावाने त्याचे खरेदीखत झाले आहे. कारण बनावट आधार. त्याच्या आयुष्याचा पाया हादरतो. नोकरी मिळवण्यासाठी बनावट जात प्रमाणपत्र, बनावट डिग्री, बनावट अनुभव दाखवणारे पुढे जातात, आणि योग्य पात्र उमेदवार मागे राहतो. शासकीय अधिकारी म्हणतात अपील करा. मंत्री सांगतात “मी बघतो.” पण सामान्य माणसाला हे ‘बघणे’ जन्मभर पुरते. या देशात खरे व चुकीचे ठरवण्याची गती इतकी संथ का आहे? लोकशाही जर सर्वसामान्यांच्या मतावर चालते, तर ही लोकशाही त्यांच्यासाठी काम का करत नाही? आता वेळ आली आहे की बनावट दस्त तयार करणाऱ्यांविरोधात फक्त गुन्हे दाखल करून शांत बसण्यापेक्षा कठोर कारवाई व्हावी. त्यासाठी कायद्यात दुरुस्ती हवी, कारवाईला वेळमर्यादा हवी आणि दोषींना उघडपणे शिक्षा झाली पाहिजे. अन्यथा ‘बनावट’ हेच खरे होईल, आणि खरं असलेले कायमच भरकटत राहील. खोटेपणावर उभी राहिलेली व्यवस्था लोकशाही नव्हे, ती अराजकतेची पायवाट आहे. ती थांबवायची असेल तर आता निदान प्रामाणिकपणाचा आवाज ऐकला गेला पाहिजे.

Ahilyanagar News : “बनावट कागद… खऱ्या आयुष्याची राख” Read More »

img 20250723 wa0003

कृषिमंत्री Manikrao Kokate यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक

Manikrao Kokate : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधक करत आहे. तर दुसरीकडे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या वतीने अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करुन ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जुगारी कृषिमंत्री हटावच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात शहर जिल्हा कार्याध्यक्ष अनिकेत कराळे, ज्येष्ठ नेते किसनराव लोटके, अशोक बाबर, प्रकाश पोटे, अथर खान, गौरव नरवडे, फरीन शेख, रुकैय्या शेख, अल्तमश जरीवाला, समीर पठाण, सरपंच शरद पवार, फय्याज तांबोली, अनिस शेख, आरिफ पटेल, जावेद शेख आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी यापूर्वी अनेकवेळा वादग्रस्त विधाने केलेली आहेत. शेतकऱ्यांबद्दल अर्वाच्च भाषेत उद्गार काढून त्यांचा अपमान देखील केलेला आहे. पंचनामा करण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश देतानाची अरेरावी, कर्जमाफी वरील वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या विरोधात संतापाची लाट आहे. एका कृषिमंत्रीने शेतकरी वर्गाविषयी अपशब्द वापरणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारे आहे. असं जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके म्हणाले. तर नुकतेच कृषिमंत्री कोकाटे विधान परिषदेत अधिवेश सुरु असताना चक्क मोबाईलवर रम्मीचा जुगार खेळताना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचे भावना दुखावल्या गेल्या असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

कृषिमंत्री Manikrao Kokate यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक Read More »

adulterated milk

adulterated milk “आरोग्याशी खेळ, सत्तेची ढाल – दोषींना संरक्षण कोण देतं?”  

लहान बालकांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या आरोग्याशी त्याचा थेट संबंध आहे. आणि अशा मूलभूत अन्नघटकामध्ये स्टार्च, साबण, सिंथेटिक रसायने आणि पावडर मिसळून विक्रीस टाकले जाणे, हा केवळ अप्रामाणिक व्यवसाय नाही, तर तो उघडपणे हत्या करण्यासारखा गुन्हा आहे. adulterated milk – Ahilyanagar News : पाथर्डी तालुक्यातील दूध संकलन केंद्रांमध्ये सुरू असलेला भेसळीचा उद्योग आणि त्यामागे असलेला राजकीय वरदहस्त हा केवळ एक स्थानिक गैरप्रकार नाही, तर ही आपल्या व्यवस्थेतील खोलवर रुजलेल्या अनास्थेची आणि नैतिक दिवाळखोरीची स्पष्ट साक्ष आहे. दूधासारखा नितळ आणि पवित्र मानला जाणारा अन्नघटक जर विषारी बनवून बाजारात विकला जात असेल, तर हे केवळ एक आर्थिक घोटाळा नाही, तर मानवी आरोग्यावर, विशेषतः बालकांवर केलेले अक्षम्य अपराध आहे. धायतडकवाडी येथील संत वामनभाऊ दूध संकलन केंद्राच्या नावाने चालवला जाणारा हा बनावट व्यवहार केवळ भेसळीतच मर्यादित नाही. येथे शासनाच्या दूध पूरक प्रोत्साहन योजनेंतर्गत लाखो रुपयांचे अनुदान उचलून, प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेली दुधाळ जनावरे दाखवून शासनाची फसवणूक झाली आहे. हे प्रकरण ज्या पद्धतीने उघडकीस आले, त्यावरून स्पष्ट होते की, यामागे एक संगनमत आहे आणि याला स्थानिक मोठ्या राजकारण्यांचे संरक्षण लाभले आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले असतानाही संबंधित अधिकाऱ्यांना ‘कारवाई करू नका’ असा आदेश स्थानिक मोठ्या नेत्याने दिला. ही घटना लोकशाहीसाठी आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेसाठी गंभीर इशारा आहे. प्रशासन जर एखाद्या मंत्र्याच्या किंवा स्थानिक नेत्याच्या दबावाखाली काम करत असेल, तर मग सामान्य जनतेचा काय? दूध हा आपल्या घराघरात दररोज वापरला जाणारा अत्यावश्यक घटक. लहान बालकांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या आरोग्याशी त्याचा थेट संबंध आहे. आणि अशा मूलभूत अन्नघटकामध्ये स्टार्च, साबण, सिंथेटिक रसायने आणि पावडर मिसळून विक्रीस टाकले जाणे, हा केवळ अप्रामाणिक व्यवसाय नाही, तर तो उघडपणे हत्या करण्यासारखा गुन्हा आहे. या प्रकरणात अमोल सखाराम धायतडक यांच्यावर झालेल्या तक्रारीनुसार, त्यांच्याकडे प्रत्यक्षात कोणतीही दुधाळ जनावरे नसताना, त्यांनी बनावट संकलन केंद्राच्या नावाखाली व्यवसाय उभा करून जनतेला विषारी दूध विकले आहे. हे दूध म्हणजे एका अर्थाने विषाचे घोट होते जे आपण आपल्या मुलांच्या हातात दिले. प्रश्न इतकाच आहे ही माहिती सरकारदरबारी पोहोचल्यावर खरोखर दोषींवर कारवाई होईल का? की या प्रकरणाची फाईलसुद्धा राजकीय दबावात गारद होईल? कारण ही केवळ एक घटनेची नव्हे, तर व्यवस्थेच्या भ्रष्ट पायाभरणीची कथा आहे. हा प्रकार आरोग्याच्या आणि नैतिकतेच्या दोन्ही आघाड्यांवर गंभीर धोका आहे. आज पाथर्डी, उद्या कोण? जर या विषारी धंद्यांना वेळेत आवर घातला नाही, तर शासन आणि प्रशासनाची विश्वासार्हता पार खिळखिळी होईल. दूधभेसळीप्रकरणी केवळ पोलिस चौकशी नव्हे, तर अन्न व औषध प्रशासन, दुग्धविकास विभाग, आणि लोकायुक्त यांची संयुक्त समिती नेमून सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.शेवटी, दूध विकण्याचा व्यवसाय म्हणजे सेवा आणि ती सेवा विषारी बनवणाऱ्यांसाठी कारागृह हेच योग्य ठिकाण आहे. आणि या सर्व प्रक्रियेला राजकीय वरदहस्त असेल, तर मग समाजानेच निर्धार करून, अशा नेत्यांना जनादेशातून दूर ठेवायला हवे.

adulterated milk “आरोग्याशी खेळ, सत्तेची ढाल – दोषींना संरक्षण कोण देतं?”   Read More »

Police

मोठी बातमी! नगर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Ahilyanagar News : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २७ जुलै २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदर आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, मिरवणुका किंवा प्रेतयात्रांवरील जमावास लागू राहणार नाही. तसेच पोलीस अधिकारी, कामावर असलेले शासकीय अधिकारी व कर्मचारी, तसेच सभा अथवा मिरवणुका काढण्यासाठी रीतसर परवानगी घेतलेल्या व्यक्तींनाही हा आदेश लागू होणार नाही. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मोठी बातमी! नगर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी Read More »

img 20250712 wa0012

Sawedi land Scam सावेडी भूखंड घोटाळ्यात नवे वळण; तालुकास्तरावरील विक्रीसाठी हालचाली

Sawedi land Scam पारनेर येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन खरेदी-विक्रीचा व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिक अधिकाऱ्यांनी यास स्पष्ट नकार दिला Sawedi Land Scam : सावेडी येथील कोट्यवधींचा वादग्रस्त भूखंड घोटाळा प्रकरण आता गंभीर वळणावर येऊन ठेपला आहे. सह दुय्यम निबंधक, अहिल्यानगर कार्यालयात खरेदी-विक्री थांबवण्याचे प्रशासनाने पत्र दिल्यानंतर, आता काही मंडळींनी तालुकास्तरावरील कार्यालयांमार्फत व्यवहार करण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील संबंधितांनी पारनेर येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन खरेदी-विक्रीचा व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिक अधिकाऱ्यांनी यास स्पष्ट नकार दिला. कुठल्याही परिस्थितीत हा व्यवहार पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे, सावेडीमधील सर्वे नं. २४५/ब १ (०.७२ हेक्टर) व २४५/ब २ (०.६३ हेक्टर) या एकूण १ हेक्टर ३५ आर क्षेत्रफळाच्या भूखंडावर गेल्या ३५ वर्षांत कोणताही अधिकृत व्यवहार झालेला नाही. मात्र सध्या याच जमिनीवर मोठा व्यवहार करण्याचा अट्टहास सुरू असून, संबंधितांच्या वतीने महसूल विभागावर दबाव आणण्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. याच पार्श्वभूमीवर नगरचे प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल चौकशी सुरू असून, मंडळ अधिकारी शैलेजा देवकते यांच्याकडे वस्तु निष्ठा अहवाल मागवण्यात आला आहे. तसेच वादी-प्रतिवादींना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. या जमिनीचे कोणतेही व्यवहार चौकशी पूर्ण होईपर्यंत थांबवावेत, अशा असे पत्र दक्षिण-१, उत्तर-२ आणि अहिल्यानगर-३ या सह दुय्यम निबंधकांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, पोलीस यंत्रणेकडेही या प्रकरणात तक्रार दाखल झाली असून, या संदर्भात पुढील तपास सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तालुकास्तरावरील इतर नोंदणी कार्यालयांतून व्यवहार करण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे, यापुढील काळात पोलीस आणि महसूल यंत्रणांची भूमिका काय राहते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Sawedi land Scam सावेडी भूखंड घोटाळ्यात नवे वळण; तालुकास्तरावरील विक्रीसाठी हालचाली Read More »

Devendra Fadnavis 835x1024

भिंगार स्वतंत्र नगरपालिका होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis: भिंगार, कामठी, खडकी आणि देवळाली कटकमंडळ स्वतंत्र नगरपालिका होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या कटकमंडळाचा महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थात समावेश झाल्याने नागरीसुविधा तसेच इतर विकास होण्यास मदत होणार आहे असल्याचे मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी बैठकीत सांगितले. विधानभवन येथे राज्यातील कटक मंडळांचे नगरपालिका,महापालिका क्षेत्रात विलिनीकरणाबाबत बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ,इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधान परिषद सदस्य सिद्धार्थ शिरोळे,सरोज अहिरे,संग्राम जगताप,सुनिल कांबळे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के.एच.गोविंदराज, मुख्यमंत्री यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, व्ही सी द्वारे केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचे सहसचिव, जिल्हाधिकारी पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक,छत्रपती संभाजीगर,अहिल्यानगर, पुणे दक्षिण कमांडचे संचालक संबंधित महानगरपालिकांचे आयुक्त, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक संबंधित नगर परिषदांचे मुख्याधिकारी,पुणे, खडकी, देवळाली, छत्रपती संभाजी नगर,कामठी, अहिल्यानगर,देहू रोड कटक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस म्हणाले की, गेली अनेक वर्षे कटकमंडळ परिसरातील विकास कामांसाठी स्थानिक ठिकाणी मागणी होत असल्यामुळे केंद्र शासनाने नागरी भाग शेजारच्या महापालिका,नगरपालिकांमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात पुणे,खडकी,देवळाली, छत्रपती संभाजी नगर,कामठी, अहिल्यानगर, देहू रोड येथे छावणी क्षेत्र आहे.प्रत्येक छावणीसाठी स्वतंत्र परिस्थिती आहे हे लक्षात घेवून काही ठिकाणी थेट महापालिकेत समावेश करणे व काही ठिकाणी नवीन नगरपालिका स्थापन करावी लागणार आहे. या कटकमंडळातील कर, वीज, पाणी आर्थिक प्रकरणे,कर्मचारी यांचे हस्तांतरण ही सर्व प्रकरण केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे करण्यात यावीत. या कटकमंडळाचा महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थात समावेश झाल्याने नागरीसुविधा तसेच इतर विकास होण्यास मदत होणार आहे असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. जिल्हा नियोजन मधून कटकमंडळांच्या विकासासाठी निधी देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पुणे, खडकी, देवळाली,छत्रपती संभाजी नगर,कामठी,अहिल्यानगर या कटकमंडळाचा समावेश झाल्याने जिल्हा नियोजन मधून या परिसराचा विकास करण्यासाठी शासनाकडून मदत करण्यात येईल.संबधित समाविष्ट नगरपालिका आणि महानगरपालिकांनी त्यासाठी प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करावेत अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

भिंगार स्वतंत्र नगरपालिका होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा Read More »

Land Scam Sawedi 1

Sawedi land Scamसावेडीतील बनावट खरेदीखत प्रकरणावर लेखी तक्रार दाखल – कारवाईची मागणी

land Scam Sawedi :- अहिल्यानगर : सावेडी येथील मौजे सावेडीमधील तब्बल १ हेक्टर ३५ आर क्षेत्रफळाची जमीन खोट्या कागदपत्रांच्या आधारे हडप (land Scam) करण्याचा प्रकार समोर आल्यानंतर अखेर या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. तब्बल ३४ वर्षांपूर्वी घडलेला हा प्रकरण पुन्हा उफाळून आल्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. नागरिकांत संतापाचे वातावरण असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.\ शेख मतिन आलम बशिरुद्दीन यांनी सह जिल्हा निबंधक, मार्केटयार्ड रोड, माळीवाडा, अहिल्यानगर, तसेच दुय्यम निबंधक कार्यालय (अहिल्यानगर १ दक्षिण) यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार सादर केली आहे. शेख यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, दिनांक १५ ऑक्टोबर १९९१ रोजी खोट्या खरेदीखताच्या (Fake purchases) आधारे सदर जमीन पारसमल मश्रीमल शाह (रा. गांधीनगर, गुजरात) यांच्या नावे नोंदवण्यात आली होती. त्यांनी या प्रकरणी तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची आणि मिळकतीवर कोणतीही नवीन नोंदणी होऊ न देण्याची मागणी केली आहे. शेख यांच्या तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे.की, सावेडी येथील सर्व्हे नं. २४५/८/१ (७२ आर) व २४५/ब/२ (६३ आर) अशी मिळकत बनावट खरेदीखतावर नोंदवण्यात आली आहे. यामध्ये गणेश शिवराम पाचार्णे यांच्या नावाने खोटे कुलमुखत्यारपत्र तयार करून जमीन विक्रीचा बनाव करण्यात आला. हे दस्तऐवज दुय्यम निबंधक कार्यालयात क्रमांक छ-४३० व जादा पुस्तक क्र. १, खंड १९६, पृष्ठ २१ ते ३२ नुसार नोंदवण्यात आले होते. शेख यांनी आपल्या तक्रारीत मागणी केली आहे की, या प्रकरणी खोट्या कागदपत्रांवर नोंदणी करणाऱ्यांवर आणि बनावट दस्तऐवज तयार करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाची कठोर कारवाई करावी. तसेच मिळकतीवर पुढील नोंदणीस बंदी घालण्यात यावी, अन्यथा मूळ हक्कधारकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे सावेडी परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शहरातील विविध सामाजिक संघटनांनी आणि स्थानिकांनी प्रशासनाकडे दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर तातडीने कारवाई झाली नाही, तर आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. दरम्यान, निबंधक कार्यालय आणि महसूल प्रशासनानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुढील प्रक्रिया सुरू केल्याचे समजते.

Sawedi land Scamसावेडीतील बनावट खरेदीखत प्रकरणावर लेखी तक्रार दाखल – कारवाईची मागणी Read More »

Sangram Jagtap

नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल

Sangram Jagtap: गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्ववादी भूमिका घेतल्याने आणि एका विशिष्ट धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने नगर शहराचे आमदार संग्राम जगताप राज्यातील राजकारणात चर्चेत आहे. तर दुसरीकडे आता त्यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार संग्राम जगताप यांचे खासगी स्वीय सहाय्यक सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेजद्वारे जीवे मारण्याची धमकी आली आहे. या मेसेजमध्ये “संग्राम को दो दिन के अंदर खत्म करुंगा” असा इशारा देण्यात आला आहे. जीवे मारण्याची धमकी प्रकरणात कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल Read More »

Sawedi Land 1024x566

land Scam Sawedi : सावेडी जमीन नोंदणी प्रकरण : भूमाफिया-प्रशासन साटेलोटाचा नवा नमुना; तेव्हा सातबारा नव्हताच?

land Scam Sawedi: अहिल्यानगरच्या सावेडी भागातील सर्व्हे नंबर 245/ब 1 (0.72 हेक्टर आर) व 245/ब 2 (0.63 हेक्टर आर) या एकूण 1 हेक्टर 35 आर क्षेत्रफळाच्या जमिनीची 35 वर्षांनंतर झालेली संशयास्पद नोंदणी सध्या शहरात चर्चेचा आणि संतापाचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे, या नोंदणीसाठी वापरले गेलेले खरेदीखत 1991 मधील असले तरी, त्या वेळी मूळ मालकाच्या नावाने सातबारा उतारा अस्तित्वात नव्हता, असा धक्कादायक दावा पुढे आला आहे. त्यामुळे भूमाफिया आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या साटेलोटाचा नवा प्रकार समोर आल्याची चर्चा रंगली आहे. मूळ मालकाला नोटीस न देता नोंदणी, गंभीर प्रश्नचिन्ह सदर जमीन मूळतः अब्दुल अजीज डायाभाई (पत्ता: झेंडीगेट, अहिल्यानगर; सध्या वास्तव्य: मुंबई) यांच्या मालकीची आहे. 15 ऑक्टोबर 1991 रोजी पारसमल मश्रीमल शहा यांनी ती खरेदी केली असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र, गेली 35 वर्षे ही नोंदणी प्रलंबित असताना अचानकच त्याची नोंद घेतली गेली. विशेष म्हणजे, मूळ मालकाला कोणतीही नोटीस न देता आणि कोणतीही प्रत्यक्ष माहिती न देता नोंदणी केल्याचा आरोप होत आहे. कागदपत्रांची पडताळणी न करता नोंदणीचा आरोप या नोंदणीसाठी मूळ खरेदीखताच्या मूळ प्रतीची पडताळणी न करता नोंद घेण्यात आली, असा गंभीर आरोप स्थानिकांकडून होत आहे. त्यामुळे मृत अथवा परगावी गेलेल्या मालकांच्या जमिनीवर डोळा ठेवणाऱ्या भूमाफियांनी प्रशासनाशी संगनमत करून हा प्रकार घडवून आणला असल्याचा संशय व्यक्त होत आहे. तलाठी कार्यालय, महसूल कर्मचारी, आणि काही राजकीय मंडळींच्या वरदहस्तामुळेच हे शक्य झाल्याची चर्चा नागरिकांत आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकाराने नागरिक संतप्त या प्रकरणामुळे सावेडी परिसरातील शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी या प्रकाराचा निषेध करत दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. “भूमाफिया आणि प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा जनआंदोलन उभारू,” असा इशाराही काही संघटनांनी दिला आहे. कायद्याचे उल्लंघन आणि सुधारणा गरजेच्या या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील नोंदणी प्रक्रियेतील अनेक त्रुटी आणि भ्रष्टाचाराचे जाळे पुन्हा एकदा उजेडात आले आहे. नोंदणी कायद्यानुसार खरेदीखताची आणि सातबाराच्या नोंदींची सखोल तपासणी बंधनकारक आहे. यामध्ये अपूर्णता किंवा फसवणूक आढळल्यास फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून करण्याचा अथवा चौकशीसाठी प्रक्रिया राबविण्याचा अधिकार प्रशासनाकडे आहे. पण या प्रकरणात हे नियम धाब्यावर बसवण्यात आले असल्याचे दिसते. न्यायालयीन चौकशीची मागणी या प्रकरणात दोषींवर त्वरित कारवाई होऊन न्यायालयीन चौकशी व्हावी आणि भूमाफिया व प्रशासनातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा, अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा बसणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.

land Scam Sawedi : सावेडी जमीन नोंदणी प्रकरण : भूमाफिया-प्रशासन साटेलोटाचा नवा नमुना; तेव्हा सातबारा नव्हताच? Read More »

IMG 20250630 WA0003 1024x580

बनावट नोटा प्रकरणी तीन आरोपींना अटक; राहुरी पोलिसांची कारवाई

Ahilyanagar Crime: अहिल्यानगरच्या राहुरी येथे बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड झाले असून बनावट नोटा बनवण्यासाठी लागणारे मशीन आणि इतर साहित्य असा लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. भारतीय चलनाच्या बनावट नोटा घेऊन दोन इसम नगरच्या दिशेने येत असताना सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. याप्रकरणी तिन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पाचशे रुपये चलनाच्या बनावट नोटांचे एकूण 75 बंडल 37 लाख 50 हजार रुपये व दोनशे रुपये चलनाच्या बनावट नोटा एकूण 44 बंडल ज्याची किंमत या आरोपींकडून 8 लाख 80 हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहे. तर नोटा बनवण्याचे साहित्य 18 लाख रुपये असे एकूण तब्बल 70 लाख 73 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे करत आहे. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.

बनावट नोटा प्रकरणी तीन आरोपींना अटक; राहुरी पोलिसांची कारवाई Read More »