Manoj Jarange : काही दिवसांपूर्वी परभणीच्या सहजपूर जवळील शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासंदर्भात महसूल आणि पोलीस प्रशासनाने गावकऱ्यांचा विरोध असतानाही जमीन मोजणीची प्रक्रिया पूर्ण केली होती. या विरोधामुळे शेतकऱ्यांवर पोलीस बळ वापरल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर शेतकरी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते.
या उपोषण स्थळाला भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा करत मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, “सरकारने शेतकऱ्यांसोबत चर्चा करून शक्तीपीठ महामार्गाला जमीन द्यायची की नाही हे ठरवावे. आम्ही महसूल मंत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन केले आहे.”
अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबतही मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “जर परिवाराचे म्हणणं असेल तर या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. सत्य बाहेर येणे आवश्यक आहे.”
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याबाबतही मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “सरकारने जीआर काढला, पण अधिकारी- कर्मचारी त्याची अंमलबजावणी करत नाहीत. मोठ्या प्रमाणावर अर्ज आले आहेत, परंतु प्रमाणपत्र दिले जात नाही. सरकारने परिपत्रक काढून मराठा कुणबी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर दिली पाहिजेत. तसेच सातारा व औंध गॅझेटची अंमलबजावणी करावी आणि शहीदांच्या कुटुंबीयांच्या नोकऱ्यांचा प्रश्न सुटवावा.”
मनोज जरांगे पाटील यांनी इशाराही दिला की, “जून पर्यंत सरकारने काय केले नाही तर आम्ही उपोषणाला बसणार आहोत. मराठा समाजाने भाजपला सत्तेत बसवले आहे, जर सन्मान दिला नाही तर 2029 मध्ये पायउतार करावा लागेल.”






