Mumbai Rain: शुक्रवार रात्रीपासून मुंबई व उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले असून वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम झाला आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी रेड अलर्ट, तर ठाण्यासाठी 16 व 17 ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
दरम्यान, विक्रोळीतील पार्कसाईट परिसरात शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास दरड कोसळल्याची दुर्घटना घडली. मिश्रा कुटुंबाच्या घरावर दरड कोसळून सुरेश मिश्रा आणि शालू मिश्रा या बाप-लेकीचा मृत्यू झाला. इतर चार जण जखमी असून त्यांच्यावर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर अग्निशमन दल व महापालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले होतें.
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील काही दिवस मुंबई, कोकण व विदर्भात मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे. महापालिकेकडून नागरिकांना आवश्यकता नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या दादर, चुनाभट्टी, कुर्ला व विद्याविहार स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. पावसाचा जोर वाढल्यास रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दादर परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.