Eknath Shinde: नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन वरून संवाद साधत त्यांना दिलासा दिला. या सर्व पर्यटकांना महाराष्ट्रात सुखरुप आणण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करीत असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी पर्यटकांना दिली.
राज्यातील सुमारे १५० पर्यटक नेपाळ मध्ये अडकले असून त्यातील काहींशी आज रात्री उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी संवाद साधला. नेपाळमधील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या पर्यटकांच्या समूहाशी संवाद साधत त्यांना उपमुख्यमंत्र्यांनी दिलासा दिला.
राज्यातील मुरबाड तालुक्यातील पर्यटक मोठ्या संख्येने अडकले असून त्यांच्याशी देखील शिंदे यांनी मोबाईलवरून संवाद साधला आणि त्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी राज्य शासन केंद्र शासनाच्या मदतीने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.