DNA मराठी

राजकीय

Maratha Reservation : 14 फेब्रुवारीला महाराष्ट्र बंद आंदोलन! सकल मराठा समाजाची घोषणा

Maratha Reservation: गेल्या महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती. मात्र या घोषणेची कायद्यात रूपांतर करावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सूरू केला आहे. या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाने 14 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र बंद आंदोलनाची घोषणा केली आहे.  यासाठी आज संघटनेकडून अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले आहे.   या निवेदनात म्हटले आहे की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 10 फेब्रुवारी 2024 रोजी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.  सर्व सामान्य मराठा समाज आज आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढून सरकारला आरक्षणाची मागणी करत आहे. सरकारला वेळ देऊन सुद्धा सरकार वेळ काढूपणा करत आहे. उ‌द्या जर जरांगे पाटील यांच्या जीवाचे काही बरे-वाईट झाले तर, महाराष्ट्रात उद्रेक होईल याची सरकारने गांभीर्याने दाखल घ्यावी. तरी जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा म्हणून सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून अहमदनगर शहरासह संपूर्ण जिल्हा बंद पुकारण्यात येत आहे.

Maratha Reservation : 14 फेब्रुवारीला महाराष्ट्र बंद आंदोलन! सकल मराठा समाजाची घोषणा Read More »

Ahmednagar News: पाण्यापासून कुणीही वंचित राहणार नाही, तयार होणार टंचाई नियोजनाचा आराखडा : विखे पाटील

Ahmednagar News:  अहमदनगर जिल्ह्यात पाण्यापासून कुणी वंचित राहता कामा नये तसेच टंचाई नियोजना संदर्भातील सर्वे कामे तातडीने पुर्ण करा, असे निर्देश जिह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.  जिल्हा टंचाई निवारण नियोजन संदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षेखाली शासकीय निवासस्थान मुंबई येथे आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.  अहमदनगर जिल्ह्यातील टंचाई नियोजन बैठक दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित  करण्यात आली होती. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, यांच्यासह दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे माजी मंत्री आमदार श्री.बबनराव पाचपुते, आमदार प्रा.राम शिंदे आ.श्रीमती मोनिकताई राजळे, आमदार श्री. लहू कानडे, आमदार श्री. प्राजक्त तनपुरे अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  पालकमंत्र्यांनी येणाऱ्या टंचाई काळात जिल्ह्यातील पाणीसाठा, जनावरांचा चारा, विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याचा सविस्तर आढावा घेत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सुचना आणि तक्रारी ऐकुन घेत त्यांचे निसरन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा इतर अधिकाऱ्यांना दिले. तसेच तातडीने टंचाई निवारण आराखडा करण्यासाठी सांगितले.  पालकमंत्र्यांनी सांगितले की, टंचाई काळात पाण्याचे नियोजन नीट करण्यात यावे तसेच पाण्याचा अपव्यय  टाळावा, शहर तसेच ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना आखाव्यात, ज्या भागात पाण्याची कमतरता जाणवत आहे. त्या ठिकाणी तातडीने टॅंकरने पाणी पुरवठा वाढवावा, तसेच ग्रामीण भागात जिथे टॅंकरने पाणी पुरवठा करणे शक्य नाही त्या ठिकाणी बैलगाड्यांच्या सहाय्याने  पाणी पोहोचवण्याची व्यवस्था करावी.  प्रभावीत गावात पाण्यासाठी पाणी संचय टाक्या उभारण्यात याव्यात. नवीन पाणी पुरवठा योजना राबविताना कार्यरत असलेला पुरवठा प्रभावित होणार नाही याची काळजी घ्यावी. जिल्ह्यात पाण्यापासून कुणी वंचित राहू नये, त्यासाठी शहरी तथा ग्रामीण भागातील पाणी साठ्याची पाहणी करून त्याचे येणाऱ्या उन्हाळ्यासाठी नियोजन करावे असे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.  टंचाई निवारण संदर्भात आवश्यक असेलल्या सर्व शासकीय परवानग्या, निविदा प्रक्रिया तातडीने पुर्ण करून टंचाई निवारण आराखडा पुर्ण करावा त्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी शासनाकडे मागणी करावी. या सर्व प्रक्रिया तातडीने पार पाडून नागिराकंना दिलासा द्यावा असे पालकमंत्री म्हणाले.  या बैठकीत जिल्ह्यात जनावरांसाठी चारा आणि पाणी कमी पडणार नाही यांनी याची सुद्धा काळजी प्रशासनाने घ्यावी. त्याच बरोबर सततचा पाऊस, गारपिठ आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा सुद्धा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला आणि शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. बैठकीत उपस्थित असलेले खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी भोसपुरी 16 गावांच्या पाणी पुरवठा योजना पार्थर्डी, शेवगाव येथील पाणी पुरवठ्याच्या बाबत प्रश्न उपस्थित करून तातडीने या गावातील पाण्याची समस्या मार्गी लावण्याची सूचना बैठकीत केली.

Ahmednagar News: पाण्यापासून कुणीही वंचित राहणार नाही, तयार होणार टंचाई नियोजनाचा आराखडा : विखे पाटील Read More »

Sujay Vikhe News: गाव चलो अभियानांतर्गत खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी वाळकीत केला मुक्काम!

Sujay Vikhe News : गाव चलो अभियानांतर्गत अहमदनगर जिल्ह्याचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर तालुक्यातील वाळकी गावात मुक्काम करून गावातील  नागरिकांशी मनमोकळेपणाने संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले.  आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 उमेदवारांना विजयी करण्याचा संकल्प केला असून त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भाजपने ‘गाव चलो अभियान’ हाती घेतले आहे.  या अभियानाच्या माध्यमातून खासदार सुजय विखे यांनी दिवसभरात गावातील शैक्षणिक संस्थांना भेट देऊन येथील विद्यार्थ्यांशी एका शिक्षकाच्या भूमिकेतून चर्चा केली आणि योग्य ते मार्गदर्शन केले. त्याचबरोबर धार्मिक स्थळांना देखील भेटी देऊन मनोभावे दर्शन घेतले.  तसेच महिला बचत गट, शेतकरी वर्ग आणि युवा वर्गाशी मनमोकळेपणाने संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. तसेच त्यांच्या या भेट दौऱ्याच्या अनुषंगाने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत नागरिकांचा उत्साह द्विगुणित केला.  यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या जास्तीत जास्त योजनांचा लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नागरिकांना केले. या विविध लोकोपयोगी योजनांपासून जे अद्यापही वंचित असतील अशा सर्व लोकांनी या योजनांचा लाभ घ्यावा या अनुषंगाने मार्गदर्शन करून विविध योजनांची माहिती डॉ. सुजय विखे पाटील यांनी ग्रामस्थांना दिली. लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या या गाव चलो अभियानाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारने राबवलेल्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न व योग्य मार्गदर्शन खा. विखे पाटील यांनी यावेळी केले. तसेच विविध लोकोपयोगी योजनांपासून जे अद्यापही वंचित असतील अशा सर्व लोकांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.  तसेच घरोघरी जाऊन केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या योजनेच्या पुस्तिका लोकांना वाटप केल्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात झालेल्या कामांबाबत माहिती दिली आणि नागरिकांच्या अडी अडचणी देखील जाणून घेतल्या.  दरम्यान या दिवसभराच्या कार्यक्रमात त्यांनी धर्मनाथ शैक्षणिक संस्थेत भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांची संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची योग्य ती उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. प्रश्नोत्तराच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील पाच वर्षाच्या कालखंडात व कोविडच्या काळात जे काही प्रशंसनीय काम करून या संकटकाळात मदत केली ती अविस्मरणीय आहे. इतर देशांवर अवलंबून न राहता स्वतःच्या देशात लस तयार करण्याचा एक चांगला निर्णय नरेंद्र मोदी यांनी घेतला आणि त्याचा सर्व नागरिकांना फायदा झाला अशी माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच राजकारणावरती विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले असता यावर उत्तर देताना खासदार विखे पाटील यांनी सांगितले की, शिक्षणाचा फायदा मला एक सुशिक्षित राजकारणी बनण्यासाठी झाला. जो व्यक्ती योग्य शिक्षण घेतो आणि तो व्यक्ती जर राजकारणात सक्रिय असला तर तो चांगल्या पद्धतीने लोकांची कामे करतो असे स्पष्ट करून विकासाच्या निकषावर लोकप्रतिनिधींना निवडले पाहिजे. आपल्यासारखे विद्यार्थी व सुशिक्षित लोक या समाजामध्ये बदल घडवू शकतात व घडवतात.  कारण आपल्या भागाचा आर्थिकदृष्ट्या विकास करण्यास लोकप्रतिनिधी सक्षम असला पाहिजे तरच आपल्या भागाचा सर्वांगीण विकास होत असतो. अशा पद्धतीने त्यांनी विद्यार्थ्यांशी सखोल चर्चा करून त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यासोबतच महिला बचत गटांना सुजय विखे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात चेक वाटप केले. महिलांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून त्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम कसे बनविता येईल यासाठी माझे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.   माध्यमांशी बोलताना खा. विखे म्हणाले की, मधल्या काळात हे भावी अमुक-तमुकचे बॅनर्स लागण्याचे फॅड आलेले आहे. यात भावी सरपंच, भावी जिल्हा परिषद सदस्य, भावी खासदार, भावी आमदार, भावी मंत्री, मुख्यमंत्री असे बॅनर्स लागतात. मात्र ज्या ज्या लोकांच्या भावी म्हणून जाहिराती लागल्या आहेत, ते त्या पदापर्यंत पोहोचू शकले नाही असा माझा राजकीय अनुभव आहे. मात्र तरीही अशा भावी लोकांना माझ्या शुभेच्छा असे मार्मिक उत्तर दिले. काँग्रेसच्या थोरातांबद्दलच्या “भावी मुख्यमंत्री” बॅनर्सवर प्रश्न विचारला असला तरी विखे यांनी भावी आमदार, खासदार असाही उल्लेख करत विरोधकांसोबतच पक्षांतर्गत व महायुतीतील इच्छुकांना टोला लगावल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघात अनेकजण भाजपकडून इच्छुक असल्याबद्दल विचारले असता खा.विखे यांनी 2024 ला पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच बनवायचे आहे. त्यामुळे “गाव चलो अभियानातून” केंद्र आणि राज्य सरकारने केलेली विविध विकासकामे, योजना आदी गोष्टी जनतेपर्यंत पोहचण्याचे काम सुरू आहे. युवक, महिला, शेतकरी, उद्योजक आदींचे प्रश्नही यानिमित्ताने समजावून घेत त्याच्या सोडवणुकीवर प्रयत्न केले जात आहेत. या अभियानात पॉम्प्लेटवर केवळ नरेंद्र मोदी यांचाच फोटो आहे. मी खासदार असलो तरी एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. लोकसभेसाठी उमेदवार कोण त्याच्याशी आम्हाला काही घेणं नाही असं स्पष्टपणे खासदार सुजय विखे म्हणाले. राज्यात त्याचबरोबर नगर जिल्ह्यातही गेल्या काही दिवसात ज्याही काही गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडलेल्या आहेत त्या जर पाहिल्या तर त्यामध्ये जरी राजकीय लोकं किंवा त्यांचे कार्यकर्ते दिसून येत असले तरी कुठेतरी हे प्रकार त्यांच्यातील असलेल्या वैयक्तिक भांडणातून झालेल्या असल्याचे दिसून येत आहे. व्यक्तिगत वाद, आपसापसात असलेल्या द्वेष या भावनेतून घडलेले हे सर्व प्रकार आहेत. मात्र असे असले तरीही सरकार आणि पोलीस अशा घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी निश्चितच कार्यवाही करतील.  ज्या घटना घडत आहेत त्या आवरणं आणि त्यावर वेळेवर निर्बंध कसे आणता येतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पोलीस आपल्या पद्धतीने काम करत आहेत. जे काही यंत्रणा आहेत त्यात सुधारणा करण्याची गरज असेल त्यानुसार ती होईल असा विश्वास खा. विखे यांनी व्यक्त केला. दरम्यान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सदरील अभियान हे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच भाजपचे प्रमुख प्रतिनिधी, कार्यकर्ते, जिल्हा अधिकारी, तालुका पदाधिकारी, भाजपा युवा मोर्चा, महिला आघाडी, सर्व सुपरवायझर्स, बूथ प्रमुख यांच्या सहकार्याने व्यवस्थितरीत्या संपन्न झाले असल्याचे मत मांडले.

Sujay Vikhe News: गाव चलो अभियानांतर्गत खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी वाळकीत केला मुक्काम! Read More »

Ahmednagar News: व्यापारी धिरज जोशी यांच्यावरील हल्ला करणाऱ्या आरोपीना अटक करा – राष्ट्रवादी काँग्रेस 

Ahmednagar News:  अहमदनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांवर गोळीबार, प्राणघातक हल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  अहमदनगर शहरामध्ये गावठी कट्टे, तलवारी अशा प्रकारचे शस्त्रे राजरोसपणे कुठुन उपलब्ध केली जात आहेत. याचा तपास करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगर जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे निवेदनातून केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, आज पर्यंत पुणे,मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये घडणाऱ्या गोळीबार, प्राणघातक हल्ले या सारख्या घटनांचे लोन नगर सारख्या शहरापर्यंत पोहचल्याचे दिसुन येत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असुन नगर सारख्या शहरामध्ये सर्व सामान्यांना आजपर्यंत अशा प्रकारच्या घटना केवळ मोठया महानगरांमध्ये घडल्याचे माहित असे परंतु अशा घटना नगर शहरात मोठ्या प्रमाणात सातत्याने घडू लागल्या आहे. हा फार मोठा चिंतेचा विषय असुन नगरमध्ये गावठी कट्टे, तलवारी अशा प्रकारचे शस्त्रे राजरोसपणे कुठुन उपलब्ध केली जात आहेत. याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे गंभीर गुन्ह्यात बेकायदेशीर शस्त्रे सापडून देखील गुन्हेगार दोन चार दिवसात जामीनावर बाहेर असतात हे पोलीस प्रशासनाचे अपयश असुन गुन्हेगारांवर गंभीर स्वरुपाची कलमे लावुन त्यांच्याविरुध्द योग्य पध्दतीने गुन्हा दाखल झाल्यास अशा प्रकारचे जामीन होणार नाहीत.  गुन्हेगारांना कायदयाचा धाक राहील अशा उपाययोजना पोलसांनी कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केली. नगर शहरातील व्यापारी धिरज जोशी यांच्यावरील हल्ला करणाऱ्या आरोपीना तातडीने अटक करुन कठोर कारवाई करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, प्रा. माणिकराव विधाते, कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष वैभव ढाकणे, युवकचे अध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, युवती अध्यक्ष अंजली आव्हाड, जॉय लोखंडे, सुमित कुलकर्णी, ऋषिकेश ताठे, संजय सपकाळ आदी उपस्थित होते.

Ahmednagar News: व्यापारी धिरज जोशी यांच्यावरील हल्ला करणाऱ्या आरोपीना अटक करा – राष्ट्रवादी काँग्रेस  Read More »

Ashok Chavan : राजकीय तुफान! अशोक चव्हाण यांनी दिला काँग्रेसचा राजीनामा; भाजपमध्ये करणार प्रवेश?

Ashok Chavan : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.  अशोक चव्हाण यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे  राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून अनेक चर्चांना उधाण आले आहे.  समोर आलेल्या माहितीनुसार चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक आमदार आणि नेतेही बाजू बदलू शकतात.  अशोक चव्हाण हे काँग्रेसवर नाराज असल्याने त्यांनी नाना पटोले यांना पक्षनेतृत्वावरून हटवून स्वत:ला प्रदेश काँग्रेस अध्यक्ष करण्याची ऑफर दिली होती. हा प्रस्ताव काँग्रेस हायकमांडला मान्य नव्हता. काँग्रेस हायकमांडने हे केले नाही, त्यामुळे त्यांनी पक्षाशी संबंध तोडले. दरम्यान, काँग्रेसचे अनेक बडे नेते अशोक चव्हाण यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. एवढेच नाही तर भाजप चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Ashok Chavan : राजकीय तुफान! अशोक चव्हाण यांनी दिला काँग्रेसचा राजीनामा; भाजपमध्ये करणार प्रवेश? Read More »

Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर हत्येनंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये,घेतला ‘हा’ मोठा निर्णय 

Abhishek Ghosalkar :  शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.  उल्हासनगर, ठाण्यातील भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावर झालेल्या गोळीबाराचे प्रकरण अद्याप शांत झालेले नाही तोच आणखी एका राजकीय नेत्याच्या हत्येने राज्यात खळबळ उडाली आहे.  राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.उद्धव गटनेते अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या मॉरिस नोरोन्हा उर्फ मॉरिस भाईनेही आत्महत्या केली आहे. मॉरिस दहिसर-बोरिवली परिसरात एक स्वयंसेवी संस्था चालवत होते. मॉरिस यांना स्थानिक राजकीय वर्तुळात प्रभाव वाढवायचा होता आणि त्यांना नगरसेवकपदाची निवडणूक लढवण्याची इच्छा होती, असे सांगण्यात येत आहे. मॉरिस भाई यांनी अभिषेक घोसाळकर यांना त्यांच्या कार्यालयात बोलावून गुरुवारी रात्री एकत्र फेसबुक लाईव्ह केले. या फेसबुक लाईव्ह दरम्यान मॉरिसने उद्धव गटाच्या नेत्यावर पाच गोळ्या झाडल्या, त्यात त्यांचा मृत्यू झाला. फेसबुक लाईव्ह संपणार असतानाच अभिषेक घोसाळकर निघायला उभा राहिला. त्याचवेळी मॉरिसने त्याच्यावर पाच गोळ्या झाडल्या. त्यानंतर काही वेळातच मॉरिसने स्वत:वर गोळी झाडून घेतली. घटनास्थळावरून एक विदेशी पिस्तूल सापडल्याचे पोलिसांनी सांगितले, मात्र मॉरिसला मुंबई पोलिसांनी कोणताही शस्त्र परवाना दिलेला नाही. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी दोन पथके तयार करण्यात आली आहेत. गेल्या काही महिन्यांत राज्यात गोळीबार आणि खुनाच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधक राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. दहिसर गोळीबार प्रकरणाची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत पोलिसांकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली आहे. शस्त्र परवानाधारक शस्त्रांचा गैरवापर करत असल्याचे अलीकडच्या काही घटनांमध्ये दिसून आले आहे.  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यातही यासंदर्भात चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पोलीस शस्त्र परवानाधारकांना बोलावून त्यांची चौकशी करणार आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, आगामी निवडणुकीत तिकीट मिळविण्यासाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात वर्चस्वाची लढाई सुरू झाल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. त्याचाच परिणाम म्हणजे दहिसर गोळीबाराची घटना.

Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर हत्येनंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये,घेतला ‘हा’ मोठा निर्णय  Read More »

Amit Shah : ‘या’ दिवशी देशात लागू होणार CAA, अमित शाह यांची मोठी घोषणा!

Amit Shah : केंद्रीय निवडणूक आयोग येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुका जाहीर करणार आहे मात्र त्यापूर्वीच सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे.  आगामी निवडणुका लक्षात घेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सर्व विरोधी पक्षांना आणि विशेषतः काँग्रेसला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.   आगामी लोकसभा निवडणुकीत एकट्या भाजपाने 370 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा केला आहे यासाठी आता पक्षातील दिग्गज नेत्यांकडून  वातावरण निर्मितीसाठी सर्व बाजूंनी प्रयत्न सुरू आहेत.  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक मोठी घोषणा केली आहे. शाह म्हणाले की, निवडणुकीपूर्वी नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) देशभरात लागू केला जाईल. काय म्हणाले अमित शहा? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका टीव्ही चॅनलच्या समिटमध्ये ही माहिती दिली. येत्या दोन ते तीन महिन्यांत म्हणजेच एप्रिल-मे महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या काही दिवस आधी शाह यांनी दिलेल्या या वक्तव्यावरून अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. अमित शाह म्हणाले, “मी हे स्पष्ट करू इच्छितो की नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) कोणत्याही व्यक्तीचे नागरिकत्व हिरावून घेणार नाही. धार्मिक छळाचा सामना करत असलेल्या पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील अल्पसंख्याकांनाच नागरिकत्व देणे हा त्याचा उद्देश आहे. मुळात काँग्रेसने त्यांना हे वचन दिले होते. विरोधकांवर टीका विरोधक देशातील मुस्लिमांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. ते म्हणाले, “या कायद्याबाबत आमच्या मुस्लिम बांधवांची दिशाभूल केली जात आहे. त्यांना चिथावणी दिली जात आहे. हा कायदा पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्यासाठी आहे.

Amit Shah : ‘या’ दिवशी देशात लागू होणार CAA, अमित शाह यांची मोठी घोषणा! Read More »

Ajit Pawar : मोठी बातमी! ‘या’ दिवशी राष्ट्रवादीत प्रवेश करणार बाबा सिद्दीकी

Ajit Pawar :  महाराष्ट्र काँग्रेसला मोठा झटका देत गुरुवारी काँग्रेसचे दिग्गज नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला.  तर आता समोर आलेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बाबा सिद्दीकी प्रवेश करणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी बाबा सिद्दीकी यांच्या पक्षप्रवेशाची माहिती दिली आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “बाबा सिद्दीकी 10 फेब्रुवारीला संध्याकाळी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.” 11 फेब्रुवारीला आणखी काही लोक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचेही पवार म्हणाले. मुंबईत काँग्रेसला दुहेरी झटका! माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर महिनाभरातच मुंबईतील आणखी एक मोठे नेते सिद्दीकी यांनी काँग्रेसला झटका दिला.  वांद्रे येथे 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोण आहेत बाबा सिद्दीकी? सिद्दीकी हे मुंबईतील वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. 1999 मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. यानंतर 2004 आणि 2009 च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला. 2004 ते 2008 या काळात त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्रीपद भूषवले.  आमदार होण्यापूर्वी ते दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. बाबा सिद्दीकी हे 1992 मध्ये पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेचे (BMC) नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 1997 च्या बीएमसी निवडणुकीतही त्यांना यश मिळाले. राष्ट्रवादीला कसा फायदा होईल? सिद्दीकी हा मुंबईतील काँग्रेसचा प्रमुख अल्पसंख्याक चेहरा होता. वांद्रे, मुंबई आणि आजूबाजूला अल्पसंख्याक समाजातील लोक मोठ्या संख्येने राहतात, ज्यांमध्ये सिद्दीकी यांचा खोलवर प्रभाव आहे. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी सध्या मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथून काँग्रेसचा आमदार आहे. 66 वर्षीय सिद्दिकी म्हणाले की, जीशान स्वतःची राजकीय वाटचाल ठरवतील. सिद्दीकी म्हणाले की, आपण शनिवारी रॅली काढणार असून त्यात नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य सहभागी होणार आहेत.

Ajit Pawar : मोठी बातमी! ‘या’ दिवशी राष्ट्रवादीत प्रवेश करणार बाबा सिद्दीकी Read More »

Sangram Jagtap : अट्टल गुन्हेगारांवर धाडसी कारवाईची गरज – आमदार संग्राम जगताप

Sangram Jagtap :  अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यामध्ये काही दिवसापूर्वी वकील दांपत्याचे अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली होती.  यानंतर या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा  काढण्यात आला होता, यात अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप सहभागी झाले होते.  त्यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची भेट घेत जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांवर पोलिसांनी धाडसी कारवाईची करण्याची खरी गरज आहे तसेच वकील दांपत्याच्या हत्येचा खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवावा आणि सरकारी वकील म्हणून ऍड. उज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी केली.  तसेच लवकरच वकिलांचा प्रलंबित असलेला वकील संरक्षण कायदा मंजूर करण्यासाठी अधिवेशनात लेखी स्वरूपाचा प्रश्न उपस्थित करणार असल्याची माहिती दिली.  सराईत गुन्हेगारांवर यापूर्वीच पोलिसांनी कारवाया केल्या असत्या तर अशा स्वरूपाच्या घटना घडल्या नसत्या, समाजविघातक लोकांना कायद्याचा धाक दाखवणे गरजेचे आहे, या घटनेचा निषेध करत वकिलांच्या तीव्र भावना शासन दरबारी मांडणार असून तुम्ही जिल्ह्याचे प्रमुख असून या घटनेचा अहवाल शासनाकडे पाठवावा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली.

Sangram Jagtap : अट्टल गुन्हेगारांवर धाडसी कारवाईची गरज – आमदार संग्राम जगताप Read More »

Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात 2 जण ताब्यात; पोलिसांनी केला मोठा खुलासा

Abhishek Ghosalkar: गुरुवारी रात्री शिवसेना (उद्धव ठाकरे गट ) च्या माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली आहे.  माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरुवारी रात्री फेसबुक लाईव्हदरम्यान 4 गोळ्या झाडण्यात आल्या. धक्कादायक बाब म्हणजे अभिषेकसोबत फेसबुक लाईव्ह करणाऱ्या मॉरिस नोरोन्हाने गोळीबार केला.  मॉरिसने नंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. दरम्यान, याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक घोसाळकर खून प्रकरणात मेहुल पारीख आणि रोहित साहू यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. गोळीबार झाला तेव्हा मेहुलही घटनास्थळी उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. याचा उल्लेख घोसाळकर यांची हत्या करणाऱ्या मॉरिसने फेसबुक लाईव्हदरम्यान केला होता. मॉरिसकडे परवाना नव्हता – पोलीस मुंबईच्या MHB पोलिसांनी घटनास्थळाची सुमारे 7 तास चौकशी केल्यानंतर एक पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे. घटनास्थळावरून सापडलेले पिस्तूल हे विदेशी पिस्तूल असल्याचे पोलिसांनी सांगितले. मॉरिसकडे पिस्तूलचा परवाना नाही. दोघांमध्ये काहीशी वैमनस्य होती आणि त्यामुळेच ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. अभिषेकवर 4 वेळा गोळ्या झाडल्या अभिषेक घोसाळकर हे उद्धव गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत. फेसबुक लाईव्ह संपताच मॉरिसने अभिषेकवर 5 गोळ्या झाडल्या, त्यापैकी चार गोळ्या त्याला लागल्या. अभिषेकला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी मृत आरोपी मॉरिसविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पीएसह 2 कोठडीत दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी आरोपी शूटर मॉरिसचा पीए मेहुल पारीख याला रात्री ताब्यात घेतले आहे. यासोबतच रोहित साहू नावाच्या आणखी एका व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  मॉरिसने अभिषेकवर गोळी झाडून आत्महत्या का केली, याचा तपास गुन्हे शाखा करत आहे. या हत्याकांडाचे कारण काय होते? या प्रकरणाची प्रत्येक बाजूने चौकशी केली जात आहे. मॉरिसचा पीए मेहुलच्या चौकशीत मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. दोन गुन्हे दाखल याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. एक एफआयआर शिवसेना (यूबीटी) नेते अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी आणि दुसरा एडीआर (अपघाती मृत्यू अहवाल) मॉरिसच्या आत्महत्येप्रकरणी नोंदवण्यात आला आहे.  मॉरिस यांच्याविरुद्ध आयपीसी कलम ३०२, शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम ३ आणि २५ आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७ (१) (ए) आणि १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात 2 जण ताब्यात; पोलिसांनी केला मोठा खुलासा Read More »