DNA मराठी

राजकीय

sunetra pawar

Sunetra Pawar: गुप्त बैठकीवरून राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांनी तटकरे यांना विचारला जाब

Sunetra Pawar : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल पटेल यांनी भेट घेतल्याने राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत नाराजी उघड झाल्याची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या बैठकीची माहिती आपल्याला देण्यात आली नव्हती, याबाबत सुनेत्रा पवार यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त करत जाब विचारल्याचे वृत्त आहे. माहितीनुसार, या बैठकीला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित होते. मात्र, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वातील काही महत्त्वाच्या व्यक्तींना या बैठकीची पूर्वकल्पना नसल्याने पक्षात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. या घडामोडीनंतर सुनेत्रा पवार यांनी थेट तटकरे यांच्याकडे याबाबत स्पष्टीकरण मागितल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सुनील तटकरे यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देताना कोणताही वाद नसल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, हा केवळ गैरसमज असून बैठकीबाबत कोणताही गुप्त अजेंडा नव्हता. प्रफुल्ल पटेल यांनी त्यांना ‘देवगिरी’ येथे बोलावले होते आणि त्यानंतर पुढील घडामोडी झाल्या, असे त्यांनी स्पष्ट केले. अलीकडील काही दिवसांत सुनेत्रा पवार यांच्या पक्षाध्यक्षपदाच्या निवडीवरूनही पक्षात मतभेद समोर आले होते. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सार्वजनिकरीत्या पक्षात कोणतीही फूट नसल्याचा दावा केला असला, तरी या नव्या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संवाद आणि समन्वयावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Sunetra Pawar: गुप्त बैठकीवरून राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांनी तटकरे यांना विचारला जाब Read More »

raj thackeray

Raj Thackeray: आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाही हा भाजपला माज; सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राज ठाकरेंचा पाठिंबा

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लडाखचे पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. लोकशाही व्यवस्थेत शांततापूर्ण आंदोलन करण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार असून, मतभिन्नता व्यक्त करणाऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. राज ठाकरे यांनी सामाजिक माध्यमावरील पोस्टद्वारे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा हा आजचा 19 वा दिवस. त्यांच्या तब्येतीच्या ज्या बातम्या ऐकू येत आहेत किंवा जी दृश्य खासकरून सोशल मीडियावर दिसत आहेत ती निश्चितच काळजीत टाकणारी आहेत. हे म्हणायला प्रचंड वाईट वाटतंय की सरकारने सोनम वांगचुक यांचा आणि पर्यायाने या देशातील आंदोलनाची म्हणून एक जागा आहे तिचा बळीच घ्यायचा ठरवला आहे. हे सरकार जिथे श्रीरामाच्या तिजोरीला लुटलं जात असताना शांतपणे बघू शकते तिथे त्यांना नागरिकांच्या आंदोलनांने काय फरक पडणार ? ज्या संस्थांनी निष्पक्ष वागायला हवं त्यांनाच स्वतःच्या ताब्यात घेतलं आहे. निवडणुका हव्या तशा मॅनेज करून घेतल्या जात आहेत. त्यासाठी अतिप्रचंड पैसा खर्च केला जात आहे. तो कुठून आला असा प्रश्न बहुसंख्य माध्यमं विचारत नाहीयेत. उलट हीच बहुसंख्य माध्यमं त्यांच्या अदृश्य बॉसच्या सांगण्यावरून सत्ताधाऱ्यांच्या पक्षातील स्वकीयांची आणि विरोधकांना कसं बदनाम करता येईल यांत व्यस्त आहेत. आणि जी माध्यमं बोलत आहेत त्यांना आणि त्यांच्या मालकांच्या डोक्यावर एक टांगती तलवार फिरत आहे. त्यामुळे एका चांगल्या मुद्द्यासाठी उभ्या केलेल्या आंदोलनाला चिरडणं, आंदोलनकर्त्याच्या शरीराचे हाल करणं हे सरकारला सहज सोपं आहे. सोनम वांगचुक यांच्याबद्दल एकेकाळी भारतीय जनता पक्षाला आस्था होती. अर्थात भारतीय जनता पक्षाचं एक बरं असतं की त्यांच्या सोयीचा असेपर्यंत त्यांना तो माणूस प्रिय असतो. सोनम वांगचुक यांना 2018 साली री-इन्व्हेस्ट कॉन्फरन्सला बोलावून त्यांच्याकडून अपारंपरिक ऊर्जा इत्यादींबद्दल ऐकून घेऊन त्यांचं कौतुक पण केलं होतं. अर्थात तेंव्हा आम्ही किती अपारंपरिक उर्जेला महत्व देतो हे दाखवायचं होतं म्हणून सोनम वांगचुक चालले. पुढे लडाख हा स्वतंत्र प्रदेश घोषित झाल्यावर वांगचुक यांना पण भाजपचं कौतुक वाटलं. पण पुढे वांगचुक यांच्या लक्षात आलं की यांचे हेतू अजिबात स्वच्छ नाहीत. लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळायला हवा, लडाखमध्ये दोन लोकसभा मतदारसंघ हवेत, तिथल्या लोकांच्या जमिनीवरचा हक्क राखला गेला पाहिजे या मागण्या वांगचुक यांनी केल्या, त्यासाठी उपोषण, आंदोलनं केली पण सरकारने काहीही केलं नाही. त्यांना आश्वस्त केलं आणि पुढे कृती काहीच नाही. कारण हेतू जे दाखवले जातात तसे कधीच नसतात. आज वांगचुक यांची मागणी नीट परीक्षेचा झालेला गोंधळ आणि तो ज्या व्यक्तीमुळे झाला त्या मंत्र्याची हकालपट्टी करा आणि या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा हीच आहे. यात काहीच वावगं नाही. भाजपच्या सत्तेच्या काळात सर्वत्र परीक्षांमध्ये घोळ होत आलेत. मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्यापासून ते नीटच्या परीक्षांचे पेपर्स फुटणे ते अगदी आत्ता शिक्षकांच्या परीक्षांचे पेपर्स फुटण्यापर्यंत. हे सगळं यांच्या काळात का होतं आणि ते झाल्यावर हे इतके निर्ढावल्यासारखे का वागतात याचं उत्तर सोपं आहे. ते म्हणजे हाताशी सगळ्या यंत्रणांना धरून आलेली अमर्याद सत्ता. निवडणुकांत अनेक उद्योग करून ओढून आणलेलं यश हे लोकांच्या मूकसंमतीचं द्योतक म्हणून दाखवायचं आणि आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत हा एक वेगळाच माज सध्या भाजपला आला आहे. आणि मी भाजप अशा अर्थाने म्हणतोय की त्यांच्या घटक पक्षांना स्वतंत्र अस्तित्वच नाहीये, त्यांना दिल्लीतूनच चालवलं जात आहे. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की जरा या प्रश्नात लक्ष घाला. NEET परीक्षांचा विषय आणि त्यातला गोंधळ हा काही सोपा विषय नाही. या परीक्षेतील घोळाने लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागली आहे. आणि हे आत्ताच घडलं आहे असं नाही याच्या आधी पण असे प्रकार घडले आहेत. आणि हा विषय राजकीय नाहीये. हा विषय सामाजिक आहे. NEET परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी, त्यांचे पालक हे ज्या त्रासातून गेले, जो मनस्ताप झाला त्याच्याशी संबंधित हा विषय आहे. आणि यात भारतीय जनता पक्षाचे समर्थक, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते या सगळ्यांनाच त्रास झालेला असणार. त्यामुळे आंदोलनाकडे राजकीय नजरेतून केंद्रातील सत्ताधारी पाहत आहेत, तेच मुळात त्यांच्या लघुदृष्टीचं लक्षण आहे.

Raj Thackeray: आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाही हा भाजपला माज; सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राज ठाकरेंचा पाठिंबा Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis: ऑपरेशन तुतारी अन् वर्षा बंगल्यावर जयंत पाटील CM फडणवीसांना भेटीला; तासभर चर्चा

Devendra Fadnavis: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हेही उपस्थित होते. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र या भेटीमुळे विविध राजकीय तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. अलीकडेच जयंत पाटील यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर आता फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीमुळे शरद पवार गटाच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीतील काही महत्त्वाच्या घडामोडींवर या बैठकीत चर्चा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनेत्रा पवार यांच्या पक्षाध्यक्षपदाच्या निवडीवरून अंतर्गत मतभेद उघड झाल्याची चर्चा सुरू असतानाच ही बैठक पार पडल्याने तिचे राजकीय महत्त्व अधिक वाढले आहे. मात्र या भेटीचा पक्षांतर्गत वादाशी संबंध नसल्याचे संकेत काही नेत्यांनी दिले असून, कोणताही राजकीय निर्णय किंवा पक्षांतराचा विषय चर्चेत नसल्याचेही सांगितले जात आहे. तरीही या बैठकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणातील संभाव्य समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड म्हणून पाहिले जात आहे.

Devendra Fadnavis: ऑपरेशन तुतारी अन् वर्षा बंगल्यावर जयंत पाटील CM फडणवीसांना भेटीला; तासभर चर्चा Read More »

shrikant shinde

Shrikant Shinde : केंद्रीय मंत्रिमंडळ श्रीकांत शिंदेंना कॅबिनेट तर ओमराजे निंबाळकर राज्यमंत्री?

Shrikant Shinde : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव कॅबिनेट मंत्रिपदासाठी जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यांच्या नावाला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचीही पसंती असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, राज्यमंत्रीपदासाठी शिवसेनेत रस्सीखेच सुरू असून ओमराजे निंबाळकर, संजय जाधव आणि संजय दिना पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. नुकतेच ठाकरे गटातून शिंदे गटात दाखल झालेल्या सहा खासदारांपैकी एका नेत्याला ही संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत होणाऱ्या संभाव्य बैठकीमुळे या चर्चांना अधिक वेग आला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी लवकरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाल्यानंतर पक्षाच्या खासदारांची संख्या १३ वर पोहोचली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वाधिक खासदार असलेला पक्ष म्हणून शिवसेनेचे केंद्रातील राजकीय वजन वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाला अतिरिक्त मंत्रिपदे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार आणि संभाव्य मंत्र्यांच्या नावांबाबत अद्याप केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता दिल्लीतील घडामोडींवर लागल्या आहेत.

Shrikant Shinde : केंद्रीय मंत्रिमंडळ श्रीकांत शिंदेंना कॅबिनेट तर ओमराजे निंबाळकर राज्यमंत्री? Read More »

sujay vikhe

Sujay Vikhe: एकतर्फी कारवाईमुळे प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय… सुजय विखे स्पष्टच बोलले

Sujay Vikhe : नगर–मनमाड महामार्गावरील सावळीविहीर जंक्शन येथे सुरू असलेल्या रस्ते व उड्डाणपुलाच्या कामामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी पुढील तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात दूर केली जाईल. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित ठेकेदार, पोलीस प्रशासन आणि परिसरातील ग्रामस्थ यांच्या संयुक्त बैठकीत सविस्तर कृती आराखडा निश्चित करण्यात आला असून, गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू पूर्ण करून वाहतुकीसाठी खुली केली जाईल, अशी माहिती भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. सावळीविहीर येथे नगर–मनमाड महामार्गाचे काम आणि राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम एकाच ठिकाणी सुरू असल्याने वाहतुकीवर दुहेरी ताण आला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. विखे पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नाशिक विभागातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, नगर विभागाचे अधिकारी, संबंधित ठेकेदार, पोलीस प्रशासन तसेच सावळीविहीर, सावळीविहीर बुद्रुक, निमगाव, निगोंज आदी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेतली. तसेच पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध पर्यायी उपायांवर चर्चा करण्यात आली. अवजड वाहनांसाठी स्वतंत्र नियोजन, कामाचा वेग वाढविणे, वाहतुकीचे योग्य नियमन आणि आवश्यक त्या ठिकाणी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी पुढील तीन दिवसांत करण्यात येणार असून, त्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केला. धुळीच्या समस्येबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, रस्त्याच्या भरावावर वारंवार पाणी टाकल्यास तो कोरडा होत नाही आणि त्यावर डांबरीकरण करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत भविष्यात रस्ता खचण्याचा धोका निर्माण होतो. राहुरी परिसरातील काही रस्त्यांवर घाईत काम केल्यामुळे अशा समस्या निर्माण झाल्याचा दाखला देत त्यांनी सांगितले की, दर्जेदार आणि टिकाऊ रस्ता व्हावा यासाठी काही दिवस धुळीचा त्रास सहन करावा लागेल. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे काम कायमस्वरूपी दर्जेदार व्हावे, हीच प्रशासनाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. गुरुपौर्णिमेपूर्वी उड्डाणपुलाच्या शेवटापासून बायपासच्या सुरुवातीपर्यंत रस्त्याची एक बाजू पूर्ण करण्यात येणार असून ती वाहतुकीसाठी खुली केली जाईल. दुसरी बाजू वाहतुकीसाठी मोटरेबल ठेवण्यात येईल. गुरुपौर्णिमेनंतर दुसऱ्या बाजूच्या कामाला गती देण्यात येईल, असा संपूर्ण आराखडा तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. रस्त्याच्या मध्यरेषेपासून १५ मीटरच्या हद्दीत येणारी सर्व अतिक्रमणे दोन दिवसांत स्वेच्छेने हटवावीत, असे आवाहन करत त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, मुदतीनंतर पोलीस प्रशासनाच्या मदतीने कारवाई करून सर्व अतिक्रमणे हटविण्यात येतील. या अतिक्रमणांमध्ये काही मंदिरे, टपऱ्या आणि इतर बांधकामांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. ठेकेदारावर होत असलेल्या टीकेबाबत बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, संबंधित ठेकेदाराची नियुक्ती केंद्र शासनाने केली आहे. तो कोणाचाही नातेवाईक किंवा ओळखीचा व्यक्ती नसून, त्याच्याकडून दर्जेदार काम करून घेणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. कामात त्रुटी आढळल्यास त्या निश्चितपणे दुरुस्त केल्या जातील; मात्र अधिकारी आणि ठेकेदारांशी अरेरावी करून प्रश्न सुटणार नाहीत. उलट ठेकेदाराने काम सोडले तर प्रकल्प आणखी विलंबित होईल, याचाही विचार नागरिकांनी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. “दहा वर्षांपासून या रस्त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. आता प्रत्यक्षात काम सुरू झाले आहे. त्यामुळे संयम ठेवून दर्जेदार काम पूर्ण होऊ देणे गरजेचे आहे. चुका झाल्यास त्या दुरुस्त केल्या जातील, पण विकासकामांना अडथळा निर्माण होणार नाही याचीही सर्वांनी काळजी घ्यावी,” असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी आणखी एक महत्त्वाची बाब अधोरेखित करत सांगितले की, या कामासाठी सुमारे ४० टक्के कमी दराने ठेका स्वीकारणारा ठेकेदार मिळाला आहे. स्थानिक पातळीवर कोणत्याही प्रकारच्या टक्केवारीची मागणी नसल्याने कामाला गती मिळाली आहे. ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होतात, तेथे विकासकामे वर्षानुवर्षे रखडतात, अशी टिप्पणीही त्यांनी केली. दरम्यान, जिल्ह्यात सुरू असलेल्या दूध भेसळविरोधी कारवाईबाबतही डॉ. सुजय विखे पाटील यांनी भूमिका मांडली. भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, या भूमिकेला त्यांनी स्पष्ट पाठिंबा दिला. मात्र, कोणतीही कारवाई करण्यापूर्वी प्रशासनाने सखोल पडताळणी करणे आवश्यक असून, चुकीच्या पंचनाम्यांमुळे किंवा एकतर्फी कारवाईमुळे प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या कारवायांना मिळत असलेल्या प्रसिद्धीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. “यापूर्वीही संबंधित अधिकारी अशा कारवाया करत होते. मात्र, आता अचानक या कारवायांना एवढी प्रसिद्धी का मिळत आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित करत, प्रशासनाने निष्पक्ष, पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केल.

Sujay Vikhe: एकतर्फी कारवाईमुळे प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय… सुजय विखे स्पष्टच बोलले Read More »

farmers

Devendra Fadnavis: CM फडणवीसांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; 50 हजारांची अट हटवली

Devendra Fadnavis: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाचे समर्थन करताना, “कुठल्याही कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत झाला नाही. मात्र, शेतकरी अडचणीत असेल तर त्याला कर्जमाफी देणे ही सरकारची जबाबदारी आहे,” असे स्पष्ट केले. तसेच, महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांवरील ५० हजार रुपयांची अट हटवण्याचाही निर्णय सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीस म्हणाले की, कर्जमाफी ही कायमस्वरूपी उपाययोजना नसून परिस्थितीची गरज म्हणून ती करावी लागते. “आमचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना सावकारांकडे जाण्याची वेळ येऊ नये, हे आहे. विधानसभा निवडणुकीत आम्ही कर्जमाफीचे आश्वासन दिले होते आणि त्यानुसार ते पूर्ण केले आहे. सध्या कोणतीही निवडणूक नाही, तरीही सरकारने हा निर्णय घेतला आहे,” असे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी सरकारच्या वीज सवलतीचाही उल्लेख केला. “कर्जमाफीव्यतिरिक्त सरकार दरवर्षी सुमारे २५ हजार कोटी रुपयांची वीजमाफी देते. कर्जमाफीचा निर्णय घेण्यापूर्वी सर्व बँकांची बैठक घेऊन आणि संपूर्ण माहितीचा अभ्यास करूनच ही योजना आखण्यात आली आहे,” असे ते म्हणाले. कर्जमाफी योजनेबाबत ३६ लाख शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. “ही योजना ५६ लाख शेतकऱ्यांना सुमारे ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी योजना आहे,” असा दावा त्यांनी केला. फडणवीस यांनी सांगितले की, महायुतीतील आमदारांनी कर्जमाफीतील ५० हजार रुपयांची मर्यादा हटवण्याची मागणी केली होती. सुरुवातीला ही अट काढल्यास सरकारवर ३ ते ४ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडेल, अशी माहिती देण्यात आली होती. तसेच कर्जमाफीची मर्यादा एक लाख रुपये केल्यास सुमारे दोन लाख शेतकरी लाभापासून वंचित राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. “व्यापक हिताचा विचार करून सरकारने अखेर ५० हजार रुपयांची अट हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, २०२६-२७ संदर्भातील अटही वगळण्यात येणार आहे,” असे फडणवीस यांनी जाहीर केले.

Devendra Fadnavis: CM फडणवीसांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; 50 हजारांची अट हटवली Read More »

amol khatal

Amol Khatal : खताळ- तांबेमध्ये वाद; आता विकास कामांच्या श्रेय घेण्यावरून रस्सीखेच

Amol Khatal : संगमनेर मध्ये प्रस्थापित बाळासाहेब थोरात यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करून जॉईन केलं ठरलेले अमोल खताळ व थोरात यांचे भाचे असलेले आमदार सत्यजित तांबे यांच्यामध्ये विकास कामावरून रस्सीखेच नेहमीच पाहायला मिळते यातच आता पुन्हा एका कामावरून श्रेयवादाची लढाई दोन्ही आमदारांमध्ये सोशल मीडिया वरती पाहायला मिळते. याला कारण म्हणजे लवकरच संगमनेरला स्वतंत्र आरटीओ कार्यालय मिळणार हे आहे वादाचे कारण… मात्र या कार्यालयासाठी खरा पुढाकार कोणाचा? जे 40 वर्षे झाले नाही ते दीड वर्षात होणार संगमनेर व अकोले तालुक्यातील नागरिकांची परिवहन सेवा संदर्भात वर्षानुवर्षेपासून होणारी गैर्यत दूर व्हावी आणि आरटीओचे संबंधित कामे स्थानिक पातळीवरच व्हावी त्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला व अखेर या प्रामाणिक प्रयत्नांना मोठे यश आले यामुळे लवकरच संगमनेर मध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय साकारणार आहे अशी माहिती अमोल खताळ यांनी आपल्या सोशल मीडिया वरती दिली. तर याबाबत अमोल खताळ यांनी 23 जानेवारी 2025 पासून मंत्री सरनाईक यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा सुरू ठेवला होता त्यानंतर 2025 या वर्षात 20 फेब्रुवारी 21 मार्च 24 मार्च 5 जून तसेच 25 ऑगस्ट रोजी एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेत याबाबत खतांनी पाठपुरावा केला त्यानंतर अखेर एक जुलै 2020 रोजी परिवहन मंत्री सरनाईकांकडून मंजुरी बाबत सूचना देखील देण्यात आल्या अशी माहिती खुद्द खताळ यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर दिली आहे तसेच त्याबाबतचे दस्तावेज देखील त्यांनी सादर केले आहे. पाठपुराव्याला यश आले तांबे यांचा दावा संगमनेर येथे स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व्हावे ही माजी अनेक वर्षांपासून ची सातत्यपूर्ण मागणी आहे संगमनेर अकोले आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची गैरसोय लक्षात घेता नव्याने निश्चित झालेल्या शासनाच्या निकषानुसार संगमनेर येथे स्वतंत्र आरटीओ कार्यालय स्थापन होणे आवश्यक आहे याबाबत मंत्री सरनाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला या मागणीची दखल घेत त्यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या अशी फेसबुक पोस्ट विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे. तांबे यांनी केलेला पाठपुरावा संगमनेरला स्वतंत्र आरटीओ कार्यालय मिळावे यासाठी सत्यजित तांबे यांनी 17 जुलै 2023 रोजी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी केली होती त्यानंतर 24 मार्च 2025 रोजी मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेत याबाबत मागणी लावून धरली तसेच 12 जुलै 2025 पावसाळी अधिवेशनात देखील याबाबतचा मुद्दा त्यांनी सभागृहात उपस्थित केला होता अखेर आपण सुरू ठेवलेल्या पाठपुराव्याला यश आले असून याबाबत मंत्री प्रताप सरनाईक यांनी नवीन आरटीओ कार्यालय साठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिले आहे असे देखील तांबे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. नाशिक पुणे रेल्वे वरून तांबे खताळ भिडले नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेर मार्गे गेली पाहिजे अशी भूमिका तांबे यांनी लावून धरली तसेच खताळ यांनी देखील आपली हीच भूमिका मांडली मात्र हा रेल्वे मार्ग रद्द करण्याचा घाट केंद्र शासनाकडून घेण्यात आल्याचा आरोप तांबे यांनी केला तर केवळ राजकीय विरोध म्हणून या गोष्टीकडं पाहता विकास कामासाठी एकत्र यावे असे आव्हान खताळ यांनी देखील केले दरम्यान नाशिक पुणे रेल्वे मार्गासंदर्भात अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या समवेत आमदारांची बैठक झाली तसेच याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेला मात्र रेल्वे रद्द झाल्या च्या कारणावरून तांबे व खताळ यांच्यामध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप हे सुरूच होते. त्यामुळे टीकाटिपाने असो किंवा विकास कामांचे श्रेय घेणे संगमनेर मध्ये तांबे व खताळ या नव्या राजकीय अध्यायाला सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे.

Amol Khatal : खताळ- तांबेमध्ये वाद; आता विकास कामांच्या श्रेय घेण्यावरून रस्सीखेच Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis: ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी राज्य सरकारची कार्यवाही वेगवान

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे ‘ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी, बीड’च्या सभासद व ठेवीदारांसंदर्भात बैठक पार पडली. बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट को. ऑपरेटिव्ह सोसायटीमधील ठेवीदारांना त्यांचे कष्टाचे पैसे तातडीने परत मिळवून देण्याच्या कार्यवाहीला गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ठेवीदारांचे हित जपण्यासाठी महाराष्ट्र गुंतवणूकदार हितसंरक्षण (एमपीआयडी) कायद्यात आवश्यक सुधारणा करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावा. हा कायदा अधिक सक्षम करून त्याअंतर्गत वित्तीय संस्था किंवा बँकांच्या मालमत्ता जप्त करणे आणि त्यांचा लिलाव करणे, ही प्रक्रिया जलद करावी. सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार क्लिष्ट आणि दीर्घकालीन प्रक्रियेला यंत्रणांना सामोरे जावे लागते. या प्रक्रियेत बदल करून, केंद्र शासनाच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या धर्तीवर अशा प्रकरणांतील जप्तीच्या कार्यवाहीसाठी राज्यातही व्यवस्था तयार करावी. यामुळे मालमत्ता जप्ती आणि लिलावाची कारवाई जलद गतीने करणे शक्य होईल. बँकेच्या किंवा संस्थेच्या सर्व मालमत्तांचे अचूक मूल्यांकन करून, ज्या मालमत्तांचे मूल्यांकन सर्वाधिक आहे, त्यांची प्राधान्याने विक्री केली जावी. मूल्यांकनानुसारच मालमत्तांची विक्री करून पारदर्शक पद्धतीने हा निधी थेट गुंतवणूकदारांना दिला जावा. या संपूर्ण प्रकरणाचा तिढा तातडीने सुटण्यासाठी गृह विभागाने अंमलबजावणी संचालनालयासोबत (ईडी) एकत्र बैठक घ्यावी आणि या कायदेशीर व तांत्रिक बाबींवर तातडीने कोणती पावले उचलता येतील, याबाबतची ठोस कार्यपद्धती निश्चित करावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. यावेळी मंत्री बाबासाहेब पाटील, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, आमदार विजयसिंह पंडित व इतर मान्यवर उपस्थित होते.

Devendra Fadnavis: ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी राज्य सरकारची कार्यवाही वेगवान Read More »

moshi incident

Moshi Incident : मोशीच्या दुर्घटनेत अजूनही 8 ते 9 कामगार अडकल्याची भिती, कामगारांच्या हृदयाचे ठोके ऐकण्यासाठी जवानांनी राबवली मोहीम

Moshi Incident : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर बुधवारी दुपारी कचऱ्याचा प्रचंड डोंगर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेनंतर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, गुरुवारी सकाळपर्यंत ९ कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. मात्र, अद्याप ८ ते ९ कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सदर प्रशासकीय इमारत तळमजल्यासह तीन मजली आहे. तळमजल्यावर पार्किंग, पहिल्या मजल्यावर कॅन्टीन आणि दुसऱ्या मजल्यावर कॉन्फरन्स रूम आहे. दुर्घटनेच्या वेळी इमारतीत एकूण २३ कामगार उपस्थित होते. त्यापैकी दुसऱ्या मजल्यावरील पाच कामगारांनी प्रसंगावधान राखत तातडीने बाहेर पडण्यात यश मिळवले. त्यानंतर सुरू झालेल्या बचाव मोहिमेत मध्यरात्री ३ वाजेपर्यंत आणखी ९ कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. दरम्यान, उर्वरित कामगारांचा शोध घेण्यासाठी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने ‘साउंड व्हायब्रेशन टेस्ट’ करण्यात आली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांकडून हृदयाचे ठोके किंवा कोणताही हालचालीचा प्रतिसाद मिळतो का, याची तपासणी करण्यात आली. मात्र, या चाचणीत आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती समोर आली. यानंतर पुढील सलग सहा तास जेसीबीच्या मदतीने इमारतीलगत साचलेला कचरा हटविण्याचे काम सुरू ठेवण्यात आले. गुरुवारी सकाळी सुमारे ८.३० वाजता बचाव पथकाने पहिल्या मजल्याच्या भिंतीला मोठे छिद्र पाडून आत प्रवेश केला. या मार्गाने ९ ते १० जवानांनी थेट कॅन्टीनमध्ये प्रवेश करून शोधमोहीम सुरू केली आहे. अनेक कामगार पहिल्या मजल्यावरील कॅन्टीनमध्ये अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर तळमजल्यावरील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांमध्येही कोणी अडकले आहे का, याची तपासणी सुरू आहे. उर्वरित कामगारांचा शोध घेण्यासाठी बचाव पथके युद्धपातळीवर कार्यरत असून, संपूर्ण परिसरात बचावकार्य वेगाने सुरू आहे.

Moshi Incident : मोशीच्या दुर्घटनेत अजूनही 8 ते 9 कामगार अडकल्याची भिती, कामगारांच्या हृदयाचे ठोके ऐकण्यासाठी जवानांनी राबवली मोहीम Read More »

sujay vikhe

Sujay Vikhe : गणेश कारखान्याची निवडणूक लढविणार नाही अन्…, सुजय विखे काय म्हणाले?

Sujay Vikhe : गणेश सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट घोषणा केली की, आम्ही गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पुन्हा लढविणार नाही. आमचे कार्यकर्तेही ती निवडणूक लढवणार नाहीत. कारखाना तुमचाच आहे.मात्र, गणेश कारखान्याशी संबंधित न्यायालयीन वादाबाबत भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले आमची लढाई कोणत्याही व्यक्ती विरोधात अथवा कोणतीही संस्था बंद पाडण्यासाठी नाही. कर आमची लढाई प्रवरा कारखाना सभासदांचे हक्काच्या पैशांसाठी आहे. ते पैसे ना. राधाकृष्ण विखे पाटील किवा डॉ सुजय विखे पाटील यांचे नाहीत, तर प्रवरा कारखान्याचे सभासदांचे आहेत. सभासदांनी उभे केलेल्या त्या पैशांचे संरक्षण करण्यासाठीच आम्ही न्यायालयीन लढाई लढत आहोत. राहाता येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राहाता व गणेश परिसरातील भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ऊस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऊस प्रश्नावर विरोधकांना प्रत्युत्तर देताना डॉ. विखे म्हणाले, ऊस कोणत्या कारखान्याला द्यायचा, हा निर्णय शेतकऱ्यांचा आहे. गणेश कारखाना आम्ही चालवत असताना इतर कारखान्यांनी आमच्या कार्यक्षेत्रातील ऊस पळविला होता. मग आता आमच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या इच्छेनुसार ऊस देण्यास विरोध का?असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, त्यांचा कोणत्याही व्यक्तीशी वैयक्तिक वाद नाही. कोपरगावमध्ये दोन आमदार झाले, त्याचा आनंदच आहे. त्यांनी विकासाची कामे करावीत. विरोधकांच्या भाषणांवर वेळ घालवण्यापेक्षा विकासाचे मुद्द्यांवर चर्चा करावी,असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.राहाता शहराच्या विकासाबाबत विश्वास व्यक्त करताना डॉ. विखे म्हणाले, आजचे राहाता आणि दोन वर्षांनंतरचे राहाता शहर यात मोठा फरक दिसेल.शहराचा विकासात्मक चेहरामोहरा बदलून जाईल. विकासकामांवरच आमचा भर राहणार आहे. भाजपच्या संघटन शक्तीवर विश्वास व्यक्त करत ते म्हणाले जोपर्यंत कार्यकर्ते प्रामाणिक आहेत, तोपर्यंत भारतीय जनता पक्ष आणि विखे पाटील यांच्या नेतृत्वाला कोणताही धक्का लागू शकत नाही.” शेवटी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन करत विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यात वेळ घालवू नका. आपले राजकारण विकास, प्रगती आणि लोकांच्या विश्वासावर उभे आहे. शांत राहा आणि विकासाची कामे करत राहा.असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

Sujay Vikhe : गणेश कारखान्याची निवडणूक लढविणार नाही अन्…, सुजय विखे काय म्हणाले? Read More »