DNA मराठी

राजकीय

satyajeet tambe

Satyajeet Tambe : शिक्षण विभागाचा बोगस कारभार खपवून घेतला जाणार नाही – आमदार सत्यजीत तांबे

Satyajeet Tambe : राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये सुरू असलेल्या अंधाधुंदी, गोंधळ आणि प्रशासकीय कामकाजाविरोधात आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त यांना पत्र दिले. उत्तर महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर झाल्याचं नमूद करत तात्काळ ठोस उपाययोजना न झाल्यास २५ मे २०२६ पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला. पत्रात नमूद केलेल्या माहितीनुसार नाशिक पदवीधर मतदार संघातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक व अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये शिक्षण क्षेत्रातील परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. शिक्षक, विद्यार्थी, पालक, संस्थाचालक आणि प्रशासन यांच्यात परस्पर अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण यंत्रणा दिशाहीन झाल्याचे चित्र आहे. एसीआयटी चौकशीच्या नावाखाली लहानसहान कामेही प्रलंबित ठेवली जात असून प्रशासनाकडून केवळ तात्पुरत्या उपाययोजना केल्या जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. याशिवाय शिक्षण विभागातील अनेक प्रश्न हे आर्थिक नसून दैनंदिन प्रशासकीय कामकाजाशी संबंधित असतानाही वारंवार अर्थसंकल्पाचे कारण पुढे केले जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत शिक्षकांवर जनगणना, मतदार नोंदणी, बीएलओसारख्या विविध शासकीय कामांचा अतिरिक्त भार टाकला जात असल्यामुळे त्यांच्या अध्यापनाच्या मुख्य कार्यावर परिणाम होत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणापेक्षा अहवाल, लेखापरीक्षण आणि पूरक कामांवर अधिक भर दिला जात असल्याची बाबही चिंताजनक असल्याचे स्पष्ट केले. आमदार तांबे यांच्या मागण्यांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेचा सखोल आढावा -या दरम्यान आमदार तांबे यांनी मुख्य शिक्षण आयुक्तांकडे तात्काळ अंतर्गत बैठक घेऊन सर्व प्रश्नांचा सखोल आढावा घेण्याची मागणी केली आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा शिक्षण अधिकारी, उपसंचालक, शिक्षक संघटना, संस्थाचालक, विद्यार्थी व पालक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पुणे येथे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संयुक्त बैठक आयोजित करून प्रलंबित प्रश्नांवर ठोस व दीर्घकालीन निर्णय घ्यावेत अशी मागणी देखील केली आहे. २५ मे पासून शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन -या सर्व शैक्षणिक विषयांवर ठोस निर्णय न झाल्यास २५ मे २०२६ पासून मुख्य शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल आणि प्रश्न निकाली निघेपर्यंत ते सुरूच राहील असा इशारा देखील आमदार तांबे यांनी दिला आहे. आंदोलन हे माझ्यासाठी नवीन नाही – आ.तांबेसत्यजीत तांबेंसाठी आंदोलन हे नवीन नाही वयाच्या 18 वर्षापासून विविध चळवळींत सक्रिय सहभाग ठेवत त्यांनी वारंवार शिक्षणाच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात आवाज उठवला आहे, जुनी पेन्शन योजना असो, विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळून देणे असो यांसह विविध प्रश्नांचा शासनाकडे पाठपुरावा केला आहे. अधिवेशनात देखील शैक्षणिक प्रश्नांवर आमदार तांबे यांनी आक्रमक भूमिका घेऊन वेळोवेळी प्रश्न सोडवले आहेत.

Satyajeet Tambe : शिक्षण विभागाचा बोगस कारभार खपवून घेतला जाणार नाही – आमदार सत्यजीत तांबे Read More »

chhagan bhujbal

Chhagan Bhujbal: भाजपला विधान परिषदेत जास्त जागा मिळणार – छगन भुजबळ

Chhagan Bhujbal: विधानसभेतील पक्षीय बलाबल अनुसार विधान परिषद निवडणुकीत जागा मिळतील. त्यानुसार भाजपची ताकद जास्त असल्याने त्यांना जास्त जागा मिळतील. राष्ट्रवादीला एक जागा मिळेल. उमेदवार जेते पक्ष ठरवतील, असे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलिनीकरणाबाबत त्यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सांगितले की, पक्ष विलिनीकरण या विषयावर अशी काहीही चर्चा आमच्या बरोबर झालेली नाही. दोन्ही बाजूने सांगण्यात आले आहे की, यावर पुढे चर्चा होणार नाही. रोहित पवार यांच्या सुनेत्रा पवार काकी असल्याने ते प्रचार करत आहेत. त्याच्या पक्षाने उमेदवार दिला नाही म्हणजे पाठिंबाच दिलेला आहे. ही चांगली गोष्ट आहे, अशी कोपरखळीही त्यांनी मारली. इंधन तुटवड्याबाबत मंत्री भुजबळ म्हणाले, इंधन तुटवड्याचा प्रश्न हा केवळ नगरपूरता मर्यादित नाही. हा जागतिक प्रश्न आहे. यावर पंतप्रधान व केंद्रीय मंत्री उपाययोजना करत आहेत. त्यामुळे जगात निर्माण झाली तेवढी भीषण परिस्थिती भारतात निर्माण झालेली नाही. उच्च न्यायालयाच्या सांगण्यानुसार रॉकेल विक्री बंद करण्यात आली होती. मात्र, जागतिक परिस्थिती पाहता सरकारने पुन्हा रॉकेल विक्री सुरू केली आहे. मात्र, रॉकेल वितरणाची साखळी तुटलेली आहे. पुन्हा ही साखळी निर्माण करणे अवघड जात आहे. ज्यांच्याकडे रॉकेल विक्रीचे जुने परवाने आहेत, त्या परवान्यांचे नुतनीकरण झाले असे समजा आणि रॉकेल विक्री करायला सुरुवात करा, असे आदेश दिले आहेत. रॉकेलचा पुरवठा आपल्याकडे पुरेसा आहे. रॉकेल वापरण्यासाठीची साधने पुन्हा वापरात आणण्याची समस्या लवकरच सुटेल, असे मत मंत्री भुजबळ यांनी व्यक्त केले. जगात परिस्थिती केव्हाही बदले अशी स्थिती आहे. आमच्याकडे तीन हजार लीटर पेक्षाही जास्त रॉकेलचा कोट आहे. त्यानुसार त्यांना रॉकेल पाहिजे त्या प्रमाणे देऊ. जे एलपीजी घेत नाहीत, ज्यांना एलपीजी परवडत नाही, त्यांना रॉकेल देण्यात येईल. केंद्रीय पेट्रोलीयम मंत्रालयाकडे साठा आहे त्यांच्याकडे वितरण व्यवस्था नाही म्हणून त्यांनी वितरणासाठी राज्य सरकारकडे रॉकेलचा साठा दिला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. टीसीएस ही जगातील मोठी उत्तम कंपनी आहे. त्या कंपनीतील प्रकाराबाबत पोलीस तपास करून कारवाई करत आहेत. महाराष्ट्र सरकारला कोणताही प्रकल्प राबवायचा असल्यास टाटांची कंपनी असल्याने विश्वासाने काम दिले जाते. या कंपनीत खालच्या पातळीवर काय होते हे वरच्या पातळीवर आपल्याला कळत नाही. त्यामुळे टीसीएस कंपनीला बदनाम करणे योग्य होणार नाही. पोलीस कारवाई करत आहेत. कंपनीनेही दिलगिरी व्यक्त केली आहे. या कंपन्या देशाबाहेर जाणार नाहीत यासाठी सर्वांनी लक्ष दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. महिला आरक्षणा बाबत मी मागील २५ ते ३० वर्षांपासून ऐकतो आहे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी महिला सक्षमीकरणाचे काम केले. राजकारणातही महिला पुढे येत असतील आणि त्यांना आरक्षण मिळत असेल तर ही उत्तम गोष्ट आहे. महाराष्ट्रात जिजामाता, ताराराणी, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी, सावित्रीबाई फुले अशा अनेक महिला महाराष्ट्रात होऊन गेल्या ज्यांनी देशात नाव गाजविले. नगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदांमध्ये जसे आपण महिलांना राजकारणा पुढे आणले तसे विधानसभा, लोकसभेत सुद्धा महिलांचे नेतृत्व यावे या निर्णयाचे स्वागत करायला हवे, असे त्यांनी सांगितले.

Chhagan Bhujbal: भाजपला विधान परिषदेत जास्त जागा मिळणार – छगन भुजबळ Read More »

harshwardhan sapkal

Harshwardhan Sapkal: महाराष्ट्रात ‘जामतारा’ च्या माध्यमातून कोट्यवधींच्या लूटीचा गोरखधंदा; महाराष्ट्र पोलीस काय करते?

Harshwardhan Sapkal: ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सगळीकडे जोरात सुरु असून ‘जामतारा’ रॅकेट यासाठी कुप्रसिद्ध आहे पण ‘जमतारा’ प्रमाणेच महाराष्ट्रातही अशा बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून जगभरातील नागरिकांना फसवून शेकडो कोटी रुपयांचा गोरखधंदा सुरु आहे, असा गंभीर आरोप करत या प्रकरणात आयपीएस अधिकारी दत्ता कराळे व दोन पोलीस अधिक्षक यांचाही सहभाग असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. या रॅकेटला मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरचा आशिर्वाद असल्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस कॉलसेंटर आणि पैशांची हेराफेरी शक्यच नाही, असेही सपकाळ म्हणाले. गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी आयपीएस अधिकारी व सध्या नाशिकचे डीआयजी दत्ता कराळे यांचे संबंध असल्याचे व्हिडीओ नुकतेच प्रसार माध्यमांमध्ये दिसले, हे दत्ता कराळे व पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील व सोमनाथ घार्गे या दोघांचाही या बोगस कॉल सेंटरच्या रॅकेटशी संबंध असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. सीबीआयने दिनांक ८ ऑगस्ट २०२५ व ११ सप्टेंबर २०२५ रोजी नोंदवलेल्या एफआयआर नुसार नाशिक आणि इगतपुरी येथे छापे टाकून बोगस कॉल सेंटर रॅकेट चालवणाऱ्यांना अटक केली. सीबीआयला इगतपुरीत सुरु असलेल्या बोगस कॉल सेंटरची माहिती मिळाली व कारवाई करण्यात आली पण बोगस कॉल सेंटरचा सुगावा महाराष्ट्र पोलीसांना का लागला नाही? महाराष्ट्र पोलीस काय करत होते? हे प्रश्न उपस्थित होतो. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणाची सीबीआयकडून माहिती घेऊन उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? का नेहमीप्रमाणे ‘क्लीन चिट’ देणार? असा रोकडा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे. यापूर्वी कराळेंसह दोन्ही अधिकारी ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये कार्यरत होते. तेव्हा हे कॉल सेंटर तिथे सुरु होते. पोलिसांनी या कॉलसेंटरव छापा टाकला आणि नंतर संदीप सिंह, विशाल यादव या आरोपींना जुजबी कारवाई करून सोडून दिले. या तिन्ही अधिका-यांची नाशिक परिक्षेत्रात बदली झाल्यावर या आरोपींना हाताशी धरून कॉल सेंटर सुरु करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. विशेष हे म्हणजे हे सर्व आरोपी ठाणे, रायगड आणि पालघर परिसरातील रहिवाशी आहेत. पूर्वी या तिन्ही वरिष्ठ पोलीस अधिका-यांची पदस्थापना याच भागात होती आणि बोगस कॉलसेंटरही याच भागात सुरु होते. सीबीआय मुंबईच्या अॅंटी करप्शन ब्रँचचे अधिक्षक अमित वसावा यांनी ११ सप्टेंबर २०२५ रोजी दाखल केलेल्या एआयआरमधील नोंदीनुसार हे बोगस कॉल सेंटर सुरळीत चालू देण्यासाठी आरोपी गणेश कामनकर आणि त्याच्या भाऊ हे वरिष्ठ अधिका-यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सोने आणि क्रिप्टो करन्सीच्या रुपात लाभ (लाच) देत होते. राज्य सरकारला याची संपूर्ण माहिती असतानाही या अधिका-यांवर अद्याप कारवाई का केली नाही ? याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली. या रॅकेटचा पर्दाफाश करताना भोंदूबाबा अशोक खरात- आयपीएस दत्ता कराळे व बोगस रॅकेटमधून होणारा पैशाचा काळा धंदा या सर्वांची चौकशी होणे गरजेचे आहे. अशोक खरात प्रकरणात जो पैशाचा व्यवहार झाला, तो पैसा कोणाचा? हे बोगस कमाल सेंटर रॅकेट व अशोक खरात यांचे काय लागेबांधे आहेत? या कॉल सेंटरच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा केला का? व तो पैसा कोणाचा? आयपीएस दत्ता कराळे व त्यांचे दोन सहकारी पोलीस अधिक्षक यांची जिथे बदली होते, तिथे तिथे अशाच पद्धतीने बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून गोरखधंदा चालवायचे, या सर्वांची सखोल उच्चस्तरीय चौकशी करून व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही सपकाळ यांनी केली आहे. विधान परिषद निवडणूक..नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार असावा व विधान परिषदेला मविआचा चेहरा उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी करावी अशी काँग्रेस पक्षाची भूमिका होती पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मविआकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. आता विधान परिषदेला जर उद्धव ठाकरे उमेदवारी करणार नसतील तर काँग्रेस पक्षाला उदेवारी द्यावी अशी आमची भूमिका आहे. विधान परिषदेची एक जागा ही काँग्रेसचे नेते राजीव सातव यांची होती, त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती पण त्यांनी राजीनामा दिला, त्या जागेवर काँग्रेसचा उमेदवाराला बिनविरोध निवडून दिले पाहिजे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी बारामतीप्रमाणे संस्कृती व परंपरेचे पालन करावे, असे आवाहन सपकाळ यांनी केले आहे. महिलांना आरक्षण मिळावे ही काँग्रेसचीच भूमिका…महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असल्याचे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे व विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी स्पष्ट केलेले आहेच. मुळात राजकारणात महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाच्या सरकारने घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षण दिले, त्यानंतर सोनियाजी गांधी यांनी हे आरक्षण ५० टक्के करण्याची भूमिका घेतली. महिला आरक्षणाला कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही पण भाजपाने या विधेयकाच्या आडून मतदारसंघ पुनर्रचनेचा कुटील डाव आखला तर त्याला विरोध आहे. महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे, तो मात्र हाणून पाडू, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Harshwardhan Sapkal: महाराष्ट्रात ‘जामतारा’ च्या माध्यमातून कोट्यवधींच्या लूटीचा गोरखधंदा; महाराष्ट्र पोलीस काय करते? Read More »

rupali chakankar

Rupali Chakankar : अशोक खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक,जमीन व्यवहारात आमचा संबंध नाही

Rupali Chakankar : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अडचणीत आलेल्या राज्याचे माजी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट करत या प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात,जमीन व्यवहारात व इतर कोणत्याही दुष्कृत्यात दुरान्वये आमचा संबंध नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय म्हणाल्या रुपाली चाकणकर? महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात आजतागायत अनेकांवर आरोप झाले,त्या आरोपांचे पुरावे माध्यमांनी सबंध महाराष्ट्राला दाखवले व आरोप करणाऱ्यांनीही पुराव्यानिशी आरोप केले.मात्र आज 28 दिवस होत आहेत, माझ्यावर व माझ्या परिवारावर बेछूट व कपोलकल्पित आरोप हे फक्त हेतूपुरस्सर व बदनाम करण्यासाठी होत आहेत, हे वेळोवेळी समोर येत आहे.याबाबतीत आरोप करणाऱ्यांनी ना पुरावे दिले ना प्रसार माध्यमांनी ते मागितले. तसेच, निनावी पत्राबाबत जे कोणी आरोप करणारे आहेत त्यांनी सांगावे की ते पत्र त्यांच्यापर्यंत कसे आले? कोणतीही शहानिशा न करता केवळ आणि केवळ बदनामीचा कुटील डाव साध्य करण्यासाठी, पोलीस प्रशासनाला प्राप्त झालेलं एक निनावी पत्र माध्यमांकडे सुपूर्त करून दिवसभर चर्चासत्र घडवून आणले गेले ,हे घडवून आणण्यामागे कुणाचे “सौजन्य “होते हे समोर आले पाहिजे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनीही ज्या पत्रावर नाव व पत्ता नाही अशा निनावी पत्राला कायदेशीरदृष्ट्या काहीही अर्थ नसल्याने महत्त्व देता येत नाही,हे माध्यमांसमोर येत स्पष्ट केले आहे . तरीही, खोडसाळपणा करण्यासाठी हे पत्र कोणी लिहिले,कोठून आले याची चौकशी झालीच पाहिजे. यानिमित्ताने एक नवा चुकीचा पायंडा पाडला जात आहे.केवळ तर्कवितर्क,अंदाज, सुरस कथा आणि रंजक अफवा यांच्या आधारावर मला व माझ्या परिवाराला मानसिक त्रास दिला जातोय,बदनाम केले जात आहे,हे अत्यंत खेदजनक आहे.मी पहिल्या दिवसापासून माझी ठाम आणि स्पष्टपणाने भूमिका मांडत आले आहे.खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात,जमीन व्यवहारात व इतर कोणत्याही दुष्कृत्यात दुरान्वये आमचा संबंध नाही.शेवटी सत्य प्रखरतेने समोर येईलच,हा माझा दृढ विश्वास आहे. तरीही गेले काही दिवस प्रसारमाध्यमांमधून माझ्याविरोधी एकतर्फी येणाऱ्या बातम्या यावर मी प्रतिक्रिया किंवा कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही कारण SIT व चौकशी करत असलेल्या तपास यंत्रणेला निष्पक्षपणे चौकशी करता यावी हाच हेतू आहे.

Rupali Chakankar : अशोक खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक,जमीन व्यवहारात आमचा संबंध नाही Read More »

women reservation

Women Reservation : लोकसभेत आता 850 खासदार; महिलांना 33% आरक्षण देणारे विधेयक येणार

Women Reservation : लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याच्या तरतुदीला मूर्त स्वरूप देण्यासाठी, गुरुवारी संसदेत एक विधेयक सादर केले जाईल. या विधेयकात संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील (लोकसभा) सदस्यांची सध्याची संख्या ५४३ वरून ८५० पर्यंत वाढवण्याची तरतूद समाविष्ट आहे. मतदारसंघांची पुनर्रचना करण्यासाठी, हे विधेयक २०११ च्या जनगणनेतील आकडेवारीचा आधार घेईल. हे विधेयक संविधानाच्या अनुच्छेद ८१ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडते. लोकसभेतील जागांची संख्या वाढवण्यासाठी घटनादुरुस्ती करणे आवश्यक असेल. 2011 च्या जनगणनेची आकडेवारी उपलब्ध यात असे नमूद केले आहे की, “लोकसभेत राज्यांमधील प्रादेशिक मतदारसंघांतून प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेले ८१५ पेक्षा अधिक सदस्य असणार नाहीत; तसेच केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी, संसदेने कायद्याद्वारे निश्चित केलेल्या पद्धतीनुसार निवडलेले ३५ पेक्षा अधिक सदस्य असणार नाहीत.” या विधेयकानुसार, “लोकसंख्या” या संज्ञेचा अर्थ जनगणनेद्वारे निश्चित करण्यात आलेली ती लोकसंख्या असा आहे, ज्याची संबंधित आकडेवारी यापूर्वीच प्रकाशित करण्यात आली आहे. सध्या, २०११ च्या जनगणनेची आकडेवारी उपलब्ध आहे. विधेयके सादर करण्याची सरकारची योजना ‘महिला आरक्षण कायदा, २०२३’ (नारी शक्ती वंदन अधिनियम) च्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी, सरकारने गुरुवारी लोकसभेत एक घटनादुरुस्ती विधेयक, मतदारसंघांच्या सीमांकनाशी संबंधित कायद्यांचे विधेयक आणि दिल्ली, जम्मू-काश्मीर व पुद्दुचेरी (विधानसभा असलेल्या तीन केंद्रशासित प्रदेशांसाठी) यांसाठी एक स्वतंत्र विधेयक सादर करण्याची योजना आखली आहे. एक-तृतीयांश आरक्षणाची अंमलबजावणी घटनादुरुस्ती विधेयकाच्या मसुद्यात असे नमूद केले आहे: “म्हणूनच, प्रस्तावित विधेयकाचा उद्देश लोकसभा, राज्यांच्या विधानसभा, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये महिलांना (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील महिलांसह) एक-तृतीयांश आरक्षण लागू करणे हा आहे. या आरक्षणाची अंमलबजावणी, नुकत्याच प्रकाशित झालेल्या जनगणनेतील लोकसंख्येच्या आकडेवारीवर आधारित सीमांकन प्रक्रियेद्वारे केली जाईल.”

Women Reservation : लोकसभेत आता 850 खासदार; महिलांना 33% आरक्षण देणारे विधेयक येणार Read More »

sujay vikhe

Sujay Vikhe: एवढा मोठा त्याग सोपा नाही…, सुजय विखेंकडून तनपुरेंचे कौतुक

Sujay Vikhe: राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक ही स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याला आणि त्यांनी निर्माण केलेल्या विश्वासाला न्याय देण्याची संधी आहे, असे भावनिक प्रतिपादन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले. उंबरे व ब्राम्हणी गणातील कार्यकर्त्यांच्या भव्य बैठकीत बोलताना त्यांनी अक्षय कर्डिले यांना विजयी करण्याचे आवाहन केले. राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे माहितीचे अधिकृत उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारात राहुरी तालुक्यातील उंबरी व ब्राह्मणी गणातील कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम तसेच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेच्या सुरुवातीला डॉ. विखे पाटील यांनी सर्व उपस्थितांच्या वतीने विविध स्तरावर योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. विशेषतः तनपुरे परिवाराच्या भूमिकेचे कौतुक करत ते म्हणाले की, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घेतलेला निर्णय हा माणुसकी, संस्कार आणि राजकीय परिपक्वतेचे उदाहरण आहे. एवढा मोठा त्याग करणे सोपे नसते. तसेच, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी एकत्र येत दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. राजकारणात सर्वसमावेशकता अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही गटाच्या व्यक्तीची अवहेलना न करता एकजुटीने काम करणे हीच खरी ताकद आहे, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक एकत्रितपणे लढवली जात असून, मतदारसंघाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही शेवटची संधी असल्याचेही त्यांनी नमूद केले. आगामी काळात मतदारसंघाची पुनर्रचना होणार असल्याने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी राहुरी तालुक्यातील उबाटा गटाचे तालुकाप्रमुख सचिन म्हसे यांनी डॉ. विखे पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. या प्रवेशामुळे महायुतीची ताकद आणखी वाढले आहे.

Sujay Vikhe: एवढा मोठा त्याग सोपा नाही…, सुजय विखेंकडून तनपुरेंचे कौतुक Read More »

Pune News: भाजप पदाधिकाऱ्यांवर वसुली व धमकीचे आरोप, ऑडिओ क्लिपमुळे खळबळ

Pune News : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात भाजपच्या महिला पदाधिकारी आशा बुचके यांच्यावर वसुली आणि धमकी दिल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. या प्रकरणाची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुचके यांनी एका युवकाला पैशासाठी धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. युवकाला विश्रामगृहात बोलावून अपमानास्पद व धमकीची भाषा वापरल्याचे या ऑडिओत ऐकू येत आहे. यामुळे त्या लोकप्रतिनिधी आहेत की दबाव टाकणाऱ्या टोळीप्रमाणे वागत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तक्रारदार रोशन बिरमल यांनी आरोप केला आहे की, त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट हाऊसमध्ये बोलावून जबरदस्तीने चेक घेण्यात आला. तसेच पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या घटनेमुळे आशा बुचके पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. यापूर्वीही त्यांच्यावर धक्काबुक्कीचे आरोप झाले होते. दरम्यान, या प्रकरणी युवकाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक राजकारणात तणाव निर्माण झाला असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pune News: भाजप पदाधिकाऱ्यांवर वसुली व धमकीचे आरोप, ऑडिओ क्लिपमुळे खळबळ Read More »

vijay wadettiwar

Vijay Wadettiwar: शेतकरी कर्जमाफी फसवा फसवी, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा

Vijay Wadettiwar: सरकारने घोषित केलेली कर्जमाफी ही एक बनवाबनवी आहे. सरकार शेतकऱ्यांना भुलवत आहे,पण जोपर्यंत 7/12 कोरा होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा खऱ्या अर्थाने फायदा होणार नाही, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात केली. प्रसार माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, सध्याच्या कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांचे उर्वरित कर्ज कायम राहणार आहे.त्यामुळे त्यांना भविष्यात नवीन कर्ज मिळणे कठीण होईल. पीकविमा योजनेतून केवळ विमा कंपन्यांचे भले होत असून शेतकरी आजही मदतीपासून वंचित आहे.त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचा 7/12 कोरा केला पाहिजे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या फोडाफोडीला ऊत आला असून, राजकारणात कोणतीही नीतिमत्ता उरलेली नाही. कोणाला तरी आधी डोक्यावर घ्यायचे आणि नंतर पायाखाली तुडवायचे ही आता एक फॅशन झाली आहे, अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी फोडाफोडीचे राजकारणावर प्रतिक्रिया देताना टीका केली. राज्यातील सत्ताधारी गोटात सर्व काही आलबेल नसल्याचे सांगत वडेट्टीवार म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तेत असूनही अस्वस्थ आहेत, त्यांचे मंत्रीही अस्वस्थ आहेत. राज्याला कर्जबाजारी करून हे सत्तेचे खेळ सुरू आहेत,जनतेच्या प्रश्नांकडे बघायला वेळ नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली. मुंबई महापालिकेतील नगरसेवक निधीच्या मुद्द्यावरून वडेट्टीवार यांनी सरकारवर पक्षपातीपणाचा आरोप केला. राजकारण हे निवडणुकीपुरते मर्यादित असले पाहिजे. विकास निधी देताना मात्र सर्वांना समान न्याय मिळणे अपेक्षित आहे. मात्र, सध्याचे सरकार विरोधकांच्या नगरसेवकांना निधी न देता लोकशाहीची घातक पद्धत रुजवत आहे,असे ते म्हणाले. राज्यात लव्ह जिहादच्या मुद्द्यावर फाशीची मागणी करणारे सत्ताधारी पक्षाचे नेते महिला शोषणाच्या प्रकरणांवर गप्प का? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. चांगल्या घरातील महिलांचे शोषण होत असताना सरकारमधील लोकांचे तोंड शिवले आहे का? असा टोला लगावत त्यांनी हे सर्व मतांच्या राजकारणाचे धंदे असल्याची टीका केली.

Vijay Wadettiwar: शेतकरी कर्जमाफी फसवा फसवी, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा Read More »

Ram Shinde: राहुरी व बारामतीसाठी प्रा. शिंदे स्टार प्रचारक; केंद्रीय भाजपने केली नियुक्ती

Ram Shinde: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी व पुणे जिल्ह्यातील बारामती या विधानसभा मतदार संघांच्या पोटनिवडणुकीसाठी केंद्रीय भाजपने 40जणांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचाही समावेश आहे. त्यांनी राहुरी मतदार संघातील भाजपचे उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या उमेदवारी दाखल करण्याच्या वेळी आवर्जून उपस्थित राहून प्रचाराला सुरुवात केली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी आमदार दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती व राहुरी विधानसभा मतदार संघात येत्या 23 एप्रिलला पोटनिवडणूक होत आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अजित राष्ट्रवादीने व राहुरीमध्ये शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी केंद्रीय व प्रदेश भाजपने तब्बल 40 स्टार प्रचारकांची फळी मैदानात उतरवली आहे. भाजपाच्या केंद्रीय कार्यालयाकडून ही यादी निवडणूक आयोगाकडे अधिकृतरित्या सादर करण्यात आली आहे. यात अहिल्यानगर जिल्ह्यातून विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यासह अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या आमदार मोनिका राजळे व नगरचे भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे केंद्रीय व राज्यातील मंत्रीही या स्टार प्रचारकांमध्ये आहेत. सभापती प्रा. राम शिंदे यांनी यापूर्वी तेलंगणा, गोवा, मध्य प्रदेश, राजस्थान व कर्नाटक या राज्यांमधील निवडणुकीमध्ये स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. या राज्यांमधील महत्त्वाच्या मतदारसंघात त्यांनी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार व प्रसार केला होता. आता राहुरी व बारामती मतदार संघातील महायुतीच्या प्रचारात ते सक्रिय सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे प्रा. राम शिंदे यांना स्टार प्रचारक म्हणून संधी देत भाजपाने त्यांच्या राजकीय वजनाला अधोरेखित केले आहे. बारामती व राहुरी या दोन्ही मतदारसंघांकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे. भाजपने या निवडणुकीसाठी राज्यातील आणि केंद्रातील प्रभावी नेत्यांची फळी मैदानात उतरवून प्रचार मोहीम आक्रमक करण्याचे संकेत दिले आहेत. विशेषतः बारामतीसारख्या प्रतिष्ठेच्या लढतीत पक्षाने संपूर्ण ताकदीनिशी झोकून देण्याची रणनीती आखली आहे. राहुरी मतदारसंघातही स्थानिक मुद्द्यांबरोबरच राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा प्रचार मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे.

Ram Shinde: राहुरी व बारामतीसाठी प्रा. शिंदे स्टार प्रचारक; केंद्रीय भाजपने केली नियुक्ती Read More »

samarjeetsinh ghatge

Samarjeetsinh Ghatge : समरजितसिंह घाटगे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

Samarjeetsinh Ghatge : कागल येथील राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) पक्षाचे नेते आणि शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, त्यांचे पुत्र राजे अखिलेश सिंह, राजे विरेंद्रसिंह घाटगे, पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा पाटील, उपनगराध्यक्ष जयंत रावण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खा.धनंजय महाडिक, राजवर्धन नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रकाश आवाडे, भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले की, समरजितसिंह घाटगे यांच्या प्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची ताकद आणखी वाढणार आहे. भाजपाची विचारधारा गावखेड्यात नेण्यासाठी पोषक वातावरण आहे. घाटगे यांच्या नेतृत्वाखाली यापुढील काळात सर्वांनी एकदिलाने काम करायचे आहे. ज्या विश्वासाने त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे त्याला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली. यावेळी समरजितसिंह घाटगे म्हणाले की यापुढे पक्ष सांगेल त्यानुसार चालायचे असे आम्ही ठरवले आहे. पक्षाकडून जी काही जबाबदारी सोपवली जाईल ती पार पाडण्यासाठी आम्ही जोमाने काम करून पक्षाची विचारधारा गावागावात, घराघरात पोहचवू. यावेळी जिल्हा परिषद सदस्या शिवानी विजयसिंह भोसले, पंचायत समिती सदस्य अनिलकुमार हेगडे, रंजना बापू अस्वले, नगरसेवक दीपक मगर, सभापती शिक्षण समिती अरुण गुरव, महिला बालकल्याण समिती सौ. सारिका बारड, नगरसेविका साधना विष्णू पाटील, नगरसेवक सुशांत कालेकर, उमेश सावंत, बाळासाहेब माळी, मेघा गजानन माने, आनंदा पसारे, विजय राजगिरे, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कृष्णात पाटील, हमिदवाडा साखर कारखान्याचे संचालक कैलाश जाधव, सरपंच संभाजी फराकटे यांनीही भाजपात प्रवेश केला.

Samarjeetsinh Ghatge : समरजितसिंह घाटगे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश Read More »