DNA मराठी

राजकीय

devendra fadnavis

Marathi language : मराठी ज्ञान अनिवार्यतेकडे सरकारचा मोठा निर्णय; वाहनचालकांसाठी नियम 4, 78 व 85 मध्ये होणार बदल

Marathi language : राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी सुसंवाद साधण्यासाठी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करत महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ४, ७८ आणि ८५ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, त्याअंतर्गत वाहनचालकांसाठी मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान (‘वर्किंग नॉलेज’) अनिवार्य करण्याची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. राज्याच्या परिवहन आयुक्तांनी यासंदर्भातील प्रस्ताव गृह विभागाकडे सादर केला असून, त्यानुसार मसुदा अधिसूचना काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रस्तावित बदलांनुसार, सार्वजनिक सेवा वाहन चालविण्याची परवानगी देताना अर्जदाराच्या चारित्र्य व पार्श्वभूमीबरोबरच मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान तपासण्याचा अधिकार परवाना प्राधिकरणाला देण्यात येणार आहे. नवीन तरतुदीनुसार, सार्वजनिक सेवा वाहन चालविण्याची परवानगी (Authorization) देताना मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान तपासले जाणार आहे. मीटर असलेल्या मोटार कॅब वाहनांसाठी परवान्यांच्या अतिरिक्त अटींमध्ये मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात येणार आहे. विशेषतः ऑटो रिक्षा व टॅक्सी (मोटार कॅब) चालकांच्या परवाना नूतनीकरणाच्या वेळी मराठीचे ज्ञान दाखवणे बंधनकारक असेल. यामुळे राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधणे अधिक सुलभ होणार आहे. हरकती व सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू या मसुदा नियमांवर नागरिक, संघटना तसेच संबंधित घटकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत प्राप्त होणाऱ्या सर्व सूचनांचा शासनाकडून विचार करण्यात येणार आहे. सुसंवादातून सेवा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न या निर्णयामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत स्थानिक भाषेला प्राधान्य मिळणार असून, प्रवाशांना अधिक सुलभ व स्नेही सेवा मिळेल, अशी अपेक्षा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे.

Marathi language : मराठी ज्ञान अनिवार्यतेकडे सरकारचा मोठा निर्णय; वाहनचालकांसाठी नियम 4, 78 व 85 मध्ये होणार बदल Read More »

Vijay Wadettiwar: प्रकाशक प्रकाश आंबी यांना सुरक्षा द्या, विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Vijay Wadettiwar: सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रकाश आंबी यांना दिलेली जीवे मारण्याची धमकी अत्यंत निंदनीय असून, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालेले थेट आक्रमण आहे. याप्रकरणी आमदार गायकवाड यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. या संदर्भात वडेट्टीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली भूमिका मांडली आहे. आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रकाश आंबी यांना अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत “तुझाही गोविंद पानसरे करतो” अशी धमकी दिली आहे. ही धमकी केवळ एका व्यक्तीला नसून महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेला दिलेले आव्हान आहे. आमदार गायकवाड यांनी प्रकाशक आंबी यांना आई बहिणीवरून शिव्या दिल्या. लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे गुंडगिरीची भाषा वापरणे हे लोकशाहीला घातक आहे. अशा आमदारांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या करणाऱ्या प्रवृत्तींचे समर्थन करणारी भाषा आमदार वापरत असतील, तर राज्यात कायद्याचे राज्य आहे की जंगलराज असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. पानसरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशक श्री. प्रकाश आंबी हे सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुरोगामी आणि प्रगत विचार समाजात पोहोचवण्याचे कार्य करत आहेत. त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, शासनाने त्यांना तातडीने पोलीस संरक्षण पुरवावे. महाराष्ट्रात विचारवंतांच्या हत्यांचा इतिहास असताना, एका आमदाराने जाहीरपणे हत्येची धमकी देणे ही चिंतेची बाब आहे. या प्रकरणाची ऑडियो क्लिप व्हायरल होऊनही शासन गप्प का? गृहखात्याने तत्काळ गुन्हा दाखल करून कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

Vijay Wadettiwar: प्रकाशक प्रकाश आंबी यांना सुरक्षा द्या, विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र Read More »

Devendra Fadnavis : एल-निनोचा प्रभाव लक्षात घेऊन पाणी जपून वापरा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis: राज्यातील विविध धरणांमध्ये सुमारे ६५३.६३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १०१.७७ टीएमसी पाणीसाठा अधिकचा आहे. गतवर्षी हा साठा ५५१.८६ टीएमसी होता. मात्र यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पाऊसाच्या अनियमतेतमुळे पुढील वर्षी टंचाईचा मुकाबला करता यावा, यासाठी पाणी जपून वापरा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी सादरीकरणाद्वारे राज्यातील सर्व धरणांतील पाणीसाठा आणि एल-निनो प्रभावामुळे संभाव्य परिणामांची माहिती दिली. एल-निनोच्या प्रभावामुळे पाणीसाठ्यात २०१४ मध्ये १२ टक्के तर २०१५ मध्ये सुमारे १४ टक्के घट झाली होती. त्यामुळे दोन्ही वर्षी पाणीटंचाई निर्माण झाली होती. १५ ऑक्टोबर २०१४ रोजी ८७२ टीएमसी तर याच दिवशी २०१५ ला ६२५ टीएमसी पाणीसाठा होता. त्या तुलनेत २०२५ मध्ये १५ ऑक्टोबरला १३३०.९७ टीएमसी पाणीसाठा होता. हा पाणीसाठा २१ एप्रिल २०२६ रोजी ६५३.६३ टीएमसी आहे. गतवर्षीच्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे १०१.७७ टीएससी पाणीसाठा अधिकचा आहे. यावर राज्यातील पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करून ऑगस्ट २०२६ अखेर पिण्यासाठी पाणी उपलब्ध राहण्याच्या दृष्टीने काटकसरीच्या उपायोजनांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.त्यासोबतच एल-निनोच्या प्रभावामुळे या वर्षी पाऊस कमी होण्याची शक्यता असल्याने पुढील वर्षी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे या दृष्टीने आतापासून पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी केले. महसूल विभागनिहाय पाणीसाठा (कंसात धरण संख्या) यंदाचा उपयुक्त पाणीसाठा, गतवर्षीचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये)नागपूर – (३८७) ८०.७९, ६३.४०,अमरावती – (२७६) ७३.७२, ६५.१३.छत्रपती संभाजीनगर – (९२९) १२९.३७, ९७.०९.नाशिक – (५३९) १०१.९६, ८९.२८.पुणे – (७२४) २०६.५५, १७४.०४.कोकण – (१७३) ६१.२४, ६२.९२.एकूण – (३०२८) ६५३.६३, ५५१.८६. राज्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा : यंदाचा उपयुक्त पाणीसाठा, गतवर्षीचा पाणीसाठा (टिएमसीमध्ये) या क्रमाने -कोयना : ३३.६२, ३६.७६ . जायकवाडी : ४२.०३, ३४.४४. उजनी : १३.३९, (०) पेंच प्रकल्प समूह : २६.५७, २६.३५. इसापूर : २१.४५, १७.८२. भातसा : १५.७०, १४.९१. गोसीखुर्द : १४.३१, ५.९३. खडकवासला धरण समूह : ११.३२, ९.८२. मुळा : ९.५४, १०.५३. अप्पर वर्धा : १०.२१, ९.५३. अप्पर वैतरणा : ६.५२, ५.९५, भंडारदरा : ५.२५, ६.०४ टिएमसी.

Devendra Fadnavis : एल-निनोचा प्रभाव लक्षात घेऊन पाणी जपून वापरा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

Devendra Fadnavis: महिला आरक्षण मिळेल तेव्हाच ही लढाई संपेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा

Devendra Fadnavis: विरोधकांच्या मेंदूमध्ये नारी शक्ती संपवण्याची संकल्पना असल्याने महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधकांचा संविधानविरोधी चेहरा उघडा पाडला आहे. मात्र हे विधेयक पडले म्हणजे महिला आरक्षण थांबले असे होणार नाही. महिलांनी मैदानात उतरण्याची हीच वेळ आहे. जोवर संसदेत 33 टक्के खासदार आणि राज्याच्या विधानसभेत 33 टक्के आमदार बसवू त्याचदिवशी ही लढाई संपवू, अशा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपातर्फे वरळी येथे काढण्यात आलेल्या जन आक्रोश महिला संमेलनात दिला. लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला विरोधी पक्षांनी विरोध केल्याच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या या जन आक्रोश महिला संमेलनात जमलेल्या हजारो महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांचा तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी राहुल गांधी तसेच काँग्रेस नेतृत्वासह महाविकास आघाडी नेत्यांच्याविरोधात संताप व्यक्त करत हजारो महिलांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, भाजपा प्रदेश महिला अध्यक्ष चित्रा वाघ, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. अमित साटम, महापौर रितू तावडे यांच्यासह अनेक मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते.आजच्या विराट मोर्चामुळे ज्या ज्या लोकांनी नारी शक्तीला विरोध केला त्यांची झोप उडाल्याशिवाय राहणार नाही. महिलांचे अधिकार पायदळी तुडवून ज्यांनी ढोलताशे वाजवले त्यांना इशारा देण्याचे काम या आक्रोश मोर्चाने केले आहे. आज सुरुवात झाली आहे. जोपर्यंत संसदेत मातृशक्तीला स्थान मिळणार नाही तोवर हा लढा सुरू राहील, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की 1996 सालापासून महिलांना आरक्षण देण्याचा विचार होता. अटलजीं त्यादृष्टीने प्रयत्नही केले होते. मात्र कॉँग्रेसची निती ही महिला आरक्षणाला विरोध करण्याची होती. त्यामुळे कॉँग्रेसने यादृष्टीने कधीच प्रयत्न केले नाहीत. नंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 33 टक्के आरक्षण आणण्याचा निर्णय घेतला.मात्र या देशातील नारी शक्ती जागृत झाली तर कुठेतरी आपली दुकानदारी बंद होईल. सामान्य जनता मुख्य प्रवाहात आली तर आपली लेकीसूनांचे काय होईल याची कल्पना असल्याने विरोधकांनी या विधेयकाला विरोध केला. पण आता आग लावली नाही तर विरोधक प्रत्येकवेळी महिलांचा आवाज दाबत राहतील. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जागृती करावी लागेल. एक कोटी महिलांच्या सह्या करून त्या राहुल गांधी यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या थोबाडावर माराव्या लागतील, असे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी भाजपा महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनीही नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध केल्याबद्दल संताप व्यक्त केला. मी वेदनेने बोलत आहे. महिला आरक्षणाच्या विधेयकाला विरोध करून विरोधकांनी विधेयकाचा नव्हे तर महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला आहे. प्रत्येक भाषणात गोंडस नावे घ्यायची आणि वेळ येताच हात मागे घ्यायचे काम केल्याने विरोधकांचा महिलाविरोधी मानसिकतेचा चेहरा उघडा पडला असल्याची जोरदार टीका चित्रा वाघ यांनी केली. आपण कित्येक वर्षे केवळ मतदान करत राहिलो. आपल्याला 50 टक्के आरक्षणाची गरज आहे हे माननीय मोदीजींनी ओळखले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर मोदीजींनी तसा विचार केला. मग विरोधकांच्या पोटात का दुखले? हीच तुमची महिला सक्षमीकरणाची व्याख्या आहे का? महिला केवळ वोट बँक म्हणून वापर करण्यासाठी आहेत का? असे सवाल त्यांनी उपस्थित केले.

Devendra Fadnavis: महिला आरक्षण मिळेल तेव्हाच ही लढाई संपेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा Read More »

madhuri misal

Nashik TCS Case: नाशिकनंतर आता पुण्याच्या आयटी कंपनीतही खळबळ; मंत्री माधुरी मिसाळ यांचं पोलीस आयुक्तांना पत्र

Nashik TCS Case : नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता पुण्यातील आयटी हब असलेल्या हिंजवडी परिसरातही अशाच प्रकारच्या संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडीतील एका नामवंत बहुराष्ट्रीय कंपनीच्या कार्यालयातील पुरुष विश्रांती कक्षाबाबत (Resting Rooms) गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काही विशिष्ट गटाकडून या कक्षाचा वापर नियमितपणे धार्मिक विधींसाठी केला जात असल्याचे समजते. धक्कादायक बाब म्हणजे, या विधींच्या वेळी इतर कर्मचाऱ्यांना त्या कक्षात प्रवेश नाकारला जातो, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हक्कांवर गदा येत असून कार्यालयीन शिस्तीचा भंग होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यास सांगितले आहे. “विश्रांती कक्षाच्या वापराबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची सत्यता तपासणे आवश्यक आहे. ही बाब अत्यंत संवेदनशील असून, यामुळे कार्यस्थळावरील वातावरणावर परिणाम होऊ शकतो,” असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर भर या पत्रात विशेषतः महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्यांशी गोपनीयतेने संवाद साधून, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव, छळ किंवा असुविधा लादली जात आहे का, याची शहानिशा करण्याचे निर्देश मिसाळ यांनी दिले आहेत. या प्रकरणावर बोलताना माधुरी मिसाळ म्हणाल्या, “पुण्यातील आयटी कंपनीत विश्रांती कक्षाचा वापर विशिष्ट कार्यासाठी करून इतरांना प्रवेश नाकारला जाणे ही बाब चिंताजनक आहे. कार्यस्थळी कोणत्याही प्रकारचा भेदभाव, बळजबरी किंवा नियमांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत.”

Nashik TCS Case: नाशिकनंतर आता पुण्याच्या आयटी कंपनीतही खळबळ; मंत्री माधुरी मिसाळ यांचं पोलीस आयुक्तांना पत्र Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis on Woman Reservation : एक कोटी महिलांच्या सह्या घेणार; महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis on Woman Reservation : लोकसभेत महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर सत्ताधारी भाजपकडून काँग्रेससह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर जोरदार निशाण साधला. या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जर महिलांच्या अधिकाराची भ्रूणहत्या होत असेल तर त्याच्या विरुद्ध लोकशाहीमध्ये जन्मताच रेटा ज्या दिवशी लक्षात येईल की आता महिलांना आपण तोंड दाखवू शकत नाही. महिलांना उत्तर देऊ शकत नाही. त्या दिवशी ही सर्व पक्ष वाटणीवर येतील आणि महिला आरक्षण विधेयकाला हे मान्यता देतील आणि म्हणून आम्ही महायुतीतले सगळे पक्ष आपापल्या परीने यासंदर्भात जन्मत एकत्रित करण्याचे काम करू महिलांना संघटित करण्याचे काम करू महाराष्ट्रातलं एक कोटी महिलांच्या सह्या या मी गोळा करणार आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर दुसरीकडे या पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एखादा किती खोटं बोलू शकतो याच जर ऑलिंपिक स्पर्धा घेतलं तर मी तुम्हाला सांगतो राहुल गांधीं यांना मेडल मिळते असते. संविधानाने जे सांगितलं ते करण्याचा प्रयत्न कर म्हणजे आपण जर कॉन्स्टिट्यूशन ज्यावेळेस आपलं संविधान तयार झालं त्या संविधान सभेच्या डिबेट जर बघितल्या तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि आग्रही होते पण त्या काळामध्ये कदाचित तो विषय इतका ऐरणीवर आला नाही किंवा अशा पद्धतीचा आरक्षण करावं असा विषय आला नाही पण त्यांनी त्याही काळात चिंता व्यक्त केली होती. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार त्यांनी संविधान सभेमध्ये व्यक्त केले आहे. त्याला अनुरूप असलेला कायदा आल्यानंतर तो कायदा पाडायचा आणि संविधान जिंकला म्हणायचं खरं म्हणजे संविधानात संविधान करांच्या विचारांवरील एक प्रकारे काँग्रेसने घाला घातलेला आहे आणि महिलांना तर निश्चितपणे मागे टाकण्याचे काम त्यांनी केलंय त्यामुळे मी राहुल गांधींनी माफी मागावी असं कधी म्हणणार नाही कारण ते मागणारच मला माहिती आहे. त्यांना महिलांचा अपमान करणं समाजातल्या इतर घटकांचा अपमान करण्याचा छंद आहे त्याच्यामुळे ते काही माफी मागतील खरं म्हणजे त्यांनी तर साष्टांग दंडवत धरून माफी मागितली पाहिजे.

Devendra Fadnavis on Woman Reservation : एक कोटी महिलांच्या सह्या घेणार; महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा Read More »

satyajeet tambe

Satyajeet Tambe : शिक्षण विभागाचा बोगस कारभार खपवून घेतला जाणार नाही – आमदार सत्यजीत तांबे

Satyajeet Tambe : राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये सुरू असलेल्या अंधाधुंदी, गोंधळ आणि प्रशासकीय कामकाजाविरोधात आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त यांना पत्र दिले. उत्तर महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर झाल्याचं नमूद करत तात्काळ ठोस उपाययोजना न झाल्यास २५ मे २०२६ पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला. पत्रात नमूद केलेल्या माहितीनुसार नाशिक पदवीधर मतदार संघातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक व अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये शिक्षण क्षेत्रातील परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. शिक्षक, विद्यार्थी, पालक, संस्थाचालक आणि प्रशासन यांच्यात परस्पर अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण यंत्रणा दिशाहीन झाल्याचे चित्र आहे. एसीआयटी चौकशीच्या नावाखाली लहानसहान कामेही प्रलंबित ठेवली जात असून प्रशासनाकडून केवळ तात्पुरत्या उपाययोजना केल्या जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. याशिवाय शिक्षण विभागातील अनेक प्रश्न हे आर्थिक नसून दैनंदिन प्रशासकीय कामकाजाशी संबंधित असतानाही वारंवार अर्थसंकल्पाचे कारण पुढे केले जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत शिक्षकांवर जनगणना, मतदार नोंदणी, बीएलओसारख्या विविध शासकीय कामांचा अतिरिक्त भार टाकला जात असल्यामुळे त्यांच्या अध्यापनाच्या मुख्य कार्यावर परिणाम होत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणापेक्षा अहवाल, लेखापरीक्षण आणि पूरक कामांवर अधिक भर दिला जात असल्याची बाबही चिंताजनक असल्याचे स्पष्ट केले. आमदार तांबे यांच्या मागण्यांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेचा सखोल आढावा -या दरम्यान आमदार तांबे यांनी मुख्य शिक्षण आयुक्तांकडे तात्काळ अंतर्गत बैठक घेऊन सर्व प्रश्नांचा सखोल आढावा घेण्याची मागणी केली आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा शिक्षण अधिकारी, उपसंचालक, शिक्षक संघटना, संस्थाचालक, विद्यार्थी व पालक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पुणे येथे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संयुक्त बैठक आयोजित करून प्रलंबित प्रश्नांवर ठोस व दीर्घकालीन निर्णय घ्यावेत अशी मागणी देखील केली आहे. २५ मे पासून शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन -या सर्व शैक्षणिक विषयांवर ठोस निर्णय न झाल्यास २५ मे २०२६ पासून मुख्य शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल आणि प्रश्न निकाली निघेपर्यंत ते सुरूच राहील असा इशारा देखील आमदार तांबे यांनी दिला आहे. आंदोलन हे माझ्यासाठी नवीन नाही – आ.तांबेसत्यजीत तांबेंसाठी आंदोलन हे नवीन नाही वयाच्या 18 वर्षापासून विविध चळवळींत सक्रिय सहभाग ठेवत त्यांनी वारंवार शिक्षणाच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात आवाज उठवला आहे, जुनी पेन्शन योजना असो, विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळून देणे असो यांसह विविध प्रश्नांचा शासनाकडे पाठपुरावा केला आहे. अधिवेशनात देखील शैक्षणिक प्रश्नांवर आमदार तांबे यांनी आक्रमक भूमिका घेऊन वेळोवेळी प्रश्न सोडवले आहेत.

Satyajeet Tambe : शिक्षण विभागाचा बोगस कारभार खपवून घेतला जाणार नाही – आमदार सत्यजीत तांबे Read More »

chhagan bhujbal

Chhagan Bhujbal: भाजपला विधान परिषदेत जास्त जागा मिळणार – छगन भुजबळ

Chhagan Bhujbal: विधानसभेतील पक्षीय बलाबल अनुसार विधान परिषद निवडणुकीत जागा मिळतील. त्यानुसार भाजपची ताकद जास्त असल्याने त्यांना जास्त जागा मिळतील. राष्ट्रवादीला एक जागा मिळेल. उमेदवार जेते पक्ष ठरवतील, असे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलिनीकरणाबाबत त्यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सांगितले की, पक्ष विलिनीकरण या विषयावर अशी काहीही चर्चा आमच्या बरोबर झालेली नाही. दोन्ही बाजूने सांगण्यात आले आहे की, यावर पुढे चर्चा होणार नाही. रोहित पवार यांच्या सुनेत्रा पवार काकी असल्याने ते प्रचार करत आहेत. त्याच्या पक्षाने उमेदवार दिला नाही म्हणजे पाठिंबाच दिलेला आहे. ही चांगली गोष्ट आहे, अशी कोपरखळीही त्यांनी मारली. इंधन तुटवड्याबाबत मंत्री भुजबळ म्हणाले, इंधन तुटवड्याचा प्रश्न हा केवळ नगरपूरता मर्यादित नाही. हा जागतिक प्रश्न आहे. यावर पंतप्रधान व केंद्रीय मंत्री उपाययोजना करत आहेत. त्यामुळे जगात निर्माण झाली तेवढी भीषण परिस्थिती भारतात निर्माण झालेली नाही. उच्च न्यायालयाच्या सांगण्यानुसार रॉकेल विक्री बंद करण्यात आली होती. मात्र, जागतिक परिस्थिती पाहता सरकारने पुन्हा रॉकेल विक्री सुरू केली आहे. मात्र, रॉकेल वितरणाची साखळी तुटलेली आहे. पुन्हा ही साखळी निर्माण करणे अवघड जात आहे. ज्यांच्याकडे रॉकेल विक्रीचे जुने परवाने आहेत, त्या परवान्यांचे नुतनीकरण झाले असे समजा आणि रॉकेल विक्री करायला सुरुवात करा, असे आदेश दिले आहेत. रॉकेलचा पुरवठा आपल्याकडे पुरेसा आहे. रॉकेल वापरण्यासाठीची साधने पुन्हा वापरात आणण्याची समस्या लवकरच सुटेल, असे मत मंत्री भुजबळ यांनी व्यक्त केले. जगात परिस्थिती केव्हाही बदले अशी स्थिती आहे. आमच्याकडे तीन हजार लीटर पेक्षाही जास्त रॉकेलचा कोट आहे. त्यानुसार त्यांना रॉकेल पाहिजे त्या प्रमाणे देऊ. जे एलपीजी घेत नाहीत, ज्यांना एलपीजी परवडत नाही, त्यांना रॉकेल देण्यात येईल. केंद्रीय पेट्रोलीयम मंत्रालयाकडे साठा आहे त्यांच्याकडे वितरण व्यवस्था नाही म्हणून त्यांनी वितरणासाठी राज्य सरकारकडे रॉकेलचा साठा दिला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. टीसीएस ही जगातील मोठी उत्तम कंपनी आहे. त्या कंपनीतील प्रकाराबाबत पोलीस तपास करून कारवाई करत आहेत. महाराष्ट्र सरकारला कोणताही प्रकल्प राबवायचा असल्यास टाटांची कंपनी असल्याने विश्वासाने काम दिले जाते. या कंपनीत खालच्या पातळीवर काय होते हे वरच्या पातळीवर आपल्याला कळत नाही. त्यामुळे टीसीएस कंपनीला बदनाम करणे योग्य होणार नाही. पोलीस कारवाई करत आहेत. कंपनीनेही दिलगिरी व्यक्त केली आहे. या कंपन्या देशाबाहेर जाणार नाहीत यासाठी सर्वांनी लक्ष दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. महिला आरक्षणा बाबत मी मागील २५ ते ३० वर्षांपासून ऐकतो आहे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी महिला सक्षमीकरणाचे काम केले. राजकारणातही महिला पुढे येत असतील आणि त्यांना आरक्षण मिळत असेल तर ही उत्तम गोष्ट आहे. महाराष्ट्रात जिजामाता, ताराराणी, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी, सावित्रीबाई फुले अशा अनेक महिला महाराष्ट्रात होऊन गेल्या ज्यांनी देशात नाव गाजविले. नगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदांमध्ये जसे आपण महिलांना राजकारणा पुढे आणले तसे विधानसभा, लोकसभेत सुद्धा महिलांचे नेतृत्व यावे या निर्णयाचे स्वागत करायला हवे, असे त्यांनी सांगितले.

Chhagan Bhujbal: भाजपला विधान परिषदेत जास्त जागा मिळणार – छगन भुजबळ Read More »

harshwardhan sapkal

Harshwardhan Sapkal: महाराष्ट्रात ‘जामतारा’ च्या माध्यमातून कोट्यवधींच्या लूटीचा गोरखधंदा; महाराष्ट्र पोलीस काय करते?

Harshwardhan Sapkal: ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सगळीकडे जोरात सुरु असून ‘जामतारा’ रॅकेट यासाठी कुप्रसिद्ध आहे पण ‘जमतारा’ प्रमाणेच महाराष्ट्रातही अशा बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून जगभरातील नागरिकांना फसवून शेकडो कोटी रुपयांचा गोरखधंदा सुरु आहे, असा गंभीर आरोप करत या प्रकरणात आयपीएस अधिकारी दत्ता कराळे व दोन पोलीस अधिक्षक यांचाही सहभाग असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. या रॅकेटला मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरचा आशिर्वाद असल्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस कॉलसेंटर आणि पैशांची हेराफेरी शक्यच नाही, असेही सपकाळ म्हणाले. गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी आयपीएस अधिकारी व सध्या नाशिकचे डीआयजी दत्ता कराळे यांचे संबंध असल्याचे व्हिडीओ नुकतेच प्रसार माध्यमांमध्ये दिसले, हे दत्ता कराळे व पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील व सोमनाथ घार्गे या दोघांचाही या बोगस कॉल सेंटरच्या रॅकेटशी संबंध असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. सीबीआयने दिनांक ८ ऑगस्ट २०२५ व ११ सप्टेंबर २०२५ रोजी नोंदवलेल्या एफआयआर नुसार नाशिक आणि इगतपुरी येथे छापे टाकून बोगस कॉल सेंटर रॅकेट चालवणाऱ्यांना अटक केली. सीबीआयला इगतपुरीत सुरु असलेल्या बोगस कॉल सेंटरची माहिती मिळाली व कारवाई करण्यात आली पण बोगस कॉल सेंटरचा सुगावा महाराष्ट्र पोलीसांना का लागला नाही? महाराष्ट्र पोलीस काय करत होते? हे प्रश्न उपस्थित होतो. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणाची सीबीआयकडून माहिती घेऊन उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? का नेहमीप्रमाणे ‘क्लीन चिट’ देणार? असा रोकडा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे. यापूर्वी कराळेंसह दोन्ही अधिकारी ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये कार्यरत होते. तेव्हा हे कॉल सेंटर तिथे सुरु होते. पोलिसांनी या कॉलसेंटरव छापा टाकला आणि नंतर संदीप सिंह, विशाल यादव या आरोपींना जुजबी कारवाई करून सोडून दिले. या तिन्ही अधिका-यांची नाशिक परिक्षेत्रात बदली झाल्यावर या आरोपींना हाताशी धरून कॉल सेंटर सुरु करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. विशेष हे म्हणजे हे सर्व आरोपी ठाणे, रायगड आणि पालघर परिसरातील रहिवाशी आहेत. पूर्वी या तिन्ही वरिष्ठ पोलीस अधिका-यांची पदस्थापना याच भागात होती आणि बोगस कॉलसेंटरही याच भागात सुरु होते. सीबीआय मुंबईच्या अॅंटी करप्शन ब्रँचचे अधिक्षक अमित वसावा यांनी ११ सप्टेंबर २०२५ रोजी दाखल केलेल्या एआयआरमधील नोंदीनुसार हे बोगस कॉल सेंटर सुरळीत चालू देण्यासाठी आरोपी गणेश कामनकर आणि त्याच्या भाऊ हे वरिष्ठ अधिका-यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सोने आणि क्रिप्टो करन्सीच्या रुपात लाभ (लाच) देत होते. राज्य सरकारला याची संपूर्ण माहिती असतानाही या अधिका-यांवर अद्याप कारवाई का केली नाही ? याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली. या रॅकेटचा पर्दाफाश करताना भोंदूबाबा अशोक खरात- आयपीएस दत्ता कराळे व बोगस रॅकेटमधून होणारा पैशाचा काळा धंदा या सर्वांची चौकशी होणे गरजेचे आहे. अशोक खरात प्रकरणात जो पैशाचा व्यवहार झाला, तो पैसा कोणाचा? हे बोगस कमाल सेंटर रॅकेट व अशोक खरात यांचे काय लागेबांधे आहेत? या कॉल सेंटरच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा केला का? व तो पैसा कोणाचा? आयपीएस दत्ता कराळे व त्यांचे दोन सहकारी पोलीस अधिक्षक यांची जिथे बदली होते, तिथे तिथे अशाच पद्धतीने बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून गोरखधंदा चालवायचे, या सर्वांची सखोल उच्चस्तरीय चौकशी करून व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही सपकाळ यांनी केली आहे. विधान परिषद निवडणूक..नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार असावा व विधान परिषदेला मविआचा चेहरा उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी करावी अशी काँग्रेस पक्षाची भूमिका होती पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मविआकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. आता विधान परिषदेला जर उद्धव ठाकरे उमेदवारी करणार नसतील तर काँग्रेस पक्षाला उदेवारी द्यावी अशी आमची भूमिका आहे. विधान परिषदेची एक जागा ही काँग्रेसचे नेते राजीव सातव यांची होती, त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती पण त्यांनी राजीनामा दिला, त्या जागेवर काँग्रेसचा उमेदवाराला बिनविरोध निवडून दिले पाहिजे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी बारामतीप्रमाणे संस्कृती व परंपरेचे पालन करावे, असे आवाहन सपकाळ यांनी केले आहे. महिलांना आरक्षण मिळावे ही काँग्रेसचीच भूमिका…महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असल्याचे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे व विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी स्पष्ट केलेले आहेच. मुळात राजकारणात महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाच्या सरकारने घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षण दिले, त्यानंतर सोनियाजी गांधी यांनी हे आरक्षण ५० टक्के करण्याची भूमिका घेतली. महिला आरक्षणाला कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही पण भाजपाने या विधेयकाच्या आडून मतदारसंघ पुनर्रचनेचा कुटील डाव आखला तर त्याला विरोध आहे. महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे, तो मात्र हाणून पाडू, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Harshwardhan Sapkal: महाराष्ट्रात ‘जामतारा’ च्या माध्यमातून कोट्यवधींच्या लूटीचा गोरखधंदा; महाराष्ट्र पोलीस काय करते? Read More »

rupali chakankar

Rupali Chakankar : अशोक खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक,जमीन व्यवहारात आमचा संबंध नाही

Rupali Chakankar : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अडचणीत आलेल्या राज्याचे माजी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट करत या प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात,जमीन व्यवहारात व इतर कोणत्याही दुष्कृत्यात दुरान्वये आमचा संबंध नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय म्हणाल्या रुपाली चाकणकर? महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात आजतागायत अनेकांवर आरोप झाले,त्या आरोपांचे पुरावे माध्यमांनी सबंध महाराष्ट्राला दाखवले व आरोप करणाऱ्यांनीही पुराव्यानिशी आरोप केले.मात्र आज 28 दिवस होत आहेत, माझ्यावर व माझ्या परिवारावर बेछूट व कपोलकल्पित आरोप हे फक्त हेतूपुरस्सर व बदनाम करण्यासाठी होत आहेत, हे वेळोवेळी समोर येत आहे.याबाबतीत आरोप करणाऱ्यांनी ना पुरावे दिले ना प्रसार माध्यमांनी ते मागितले. तसेच, निनावी पत्राबाबत जे कोणी आरोप करणारे आहेत त्यांनी सांगावे की ते पत्र त्यांच्यापर्यंत कसे आले? कोणतीही शहानिशा न करता केवळ आणि केवळ बदनामीचा कुटील डाव साध्य करण्यासाठी, पोलीस प्रशासनाला प्राप्त झालेलं एक निनावी पत्र माध्यमांकडे सुपूर्त करून दिवसभर चर्चासत्र घडवून आणले गेले ,हे घडवून आणण्यामागे कुणाचे “सौजन्य “होते हे समोर आले पाहिजे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनीही ज्या पत्रावर नाव व पत्ता नाही अशा निनावी पत्राला कायदेशीरदृष्ट्या काहीही अर्थ नसल्याने महत्त्व देता येत नाही,हे माध्यमांसमोर येत स्पष्ट केले आहे . तरीही, खोडसाळपणा करण्यासाठी हे पत्र कोणी लिहिले,कोठून आले याची चौकशी झालीच पाहिजे. यानिमित्ताने एक नवा चुकीचा पायंडा पाडला जात आहे.केवळ तर्कवितर्क,अंदाज, सुरस कथा आणि रंजक अफवा यांच्या आधारावर मला व माझ्या परिवाराला मानसिक त्रास दिला जातोय,बदनाम केले जात आहे,हे अत्यंत खेदजनक आहे.मी पहिल्या दिवसापासून माझी ठाम आणि स्पष्टपणाने भूमिका मांडत आले आहे.खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात,जमीन व्यवहारात व इतर कोणत्याही दुष्कृत्यात दुरान्वये आमचा संबंध नाही.शेवटी सत्य प्रखरतेने समोर येईलच,हा माझा दृढ विश्वास आहे. तरीही गेले काही दिवस प्रसारमाध्यमांमधून माझ्याविरोधी एकतर्फी येणाऱ्या बातम्या यावर मी प्रतिक्रिया किंवा कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही कारण SIT व चौकशी करत असलेल्या तपास यंत्रणेला निष्पक्षपणे चौकशी करता यावी हाच हेतू आहे.

Rupali Chakankar : अशोक खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक,जमीन व्यवहारात आमचा संबंध नाही Read More »