DNA मराठी

राजकीय

anna hajare

Anna Hajare : मुख्य माहिती आयुक्तांसोबतची बैठक निष्फळ; अण्णा हजारे आंदोलनावर ठाम

Anna Hajare : माहितीचा अधिकार कायद्यातील दुरूस्तीविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन हजारे यांच्यासोबत चर्चा केली. मात्र, या चर्चेतून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे हजारे उपोषणावर ठाम असल्याचे सांगण्यात आले. तर दुसरीकडे आपण सरकारचे प्रतिनिधी म्हणून नव्हे तर आयोगाच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी आणि हजारे यांचे आशिर्वाद घेण्यासाठी आलो होतो, असे पांडे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. या कायद्याच्या नियमावलीत सरकारने काही बदल केले आहेत. ते बदल अन्यायकारक असल्याचे सांगत हजारे यांनी या विरोधात 5 जुलैपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य आयुक्त पांडे, पुणे विभागाचे माहिती आयुक्त मकरंद रानडे, छत्रपती संभाजीनगर विभागीय माहिती आयुक्त प्रकाश इंदलकर आज बुधवारी राळेगणसिद्धीमध्ये आले होते. त्यांनी हजारे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी हजारे यांचे कायदेशीर सल्लागार अॅड. श्याम आसावा, दादा पटारे, दत्ता आवारी उपस्थित होते. आयुक्त पांडे यांच्याकडे हजारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकांना न विचारता परस्पर दुरूस्ती करणे चुकीचे आहे. त्यामुळे सरकारने तातडीने यासंबंधी समिती नियुक्त करावी, समितीच्या सूचना घेऊन त्यानुसार बदल करावेत, तोपर्यंत या तरतुदी स्थगित ठेवाव्यात अशी मागणी केली. यावर या भावना सरकारला कऴविण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. बैठकीत काहीही तोडगा निघाला नसल्याने हजारे आंदोलनावर ठाम असल्याचे सांगण्यात आले. आता सरकार पुढे काय भूमिका घेणार, पुढील चर्चा करण्यासाठी कोण येणार, याकडे लक्ष लागले आहे.

Anna Hajare : मुख्य माहिती आयुक्तांसोबतची बैठक निष्फळ; अण्णा हजारे आंदोलनावर ठाम Read More »

shivsena mp

Shivsena MP: ‘त्या’ 6 खासदारांना दिल्लीतही पोलीस संरक्षण

Shivsena MP : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा खासदारांना आता दिल्लीतही पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांचा या खासदारांच्या निवासस्थानी बंदोबस्त तैनात करण्यात आला असून निवासस्थानांच्या परिसरात नो एंट्रीचे फलक लावण्यात आले आहेत. पक्षांतरानंतर संजय देशमुख (यवतमाळ), संजय जाधव (परभणी), संजय दिना पाटील (मुंबई उत्तर-पूर्व), नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली), ओमराजे निंबाळकर (धाराशिव) आणि भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी) या सहा खासदारांविरोधात महाराष्ट्रात आंदोलने सुरू झाली होती. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने त्यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था दिली. त्यानुसार महाराष्ट्रात असताना त्यांना महाराष्ट्र पोलिसांचा बंदोबस्त होता. आता या खासदारांची दिल्लीतील सुरक्षा लक्षात घेता त्यांना दिल्ली पोलिसांचे संरक्षण पुरविण्यात आले आहे. निवासस्थानाच्या बाहेर नो एंट्रीचे फलक लावण्यात आले आहेत. खासदारांच्या परवानगीशिवाय कोणालाही आत सोडले जात नाही.

Shivsena MP: ‘त्या’ 6 खासदारांना दिल्लीतही पोलीस संरक्षण Read More »

img 20260624 wa0000

Maratha Reservation: मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक; घेतला मोठा निर्णय

Maratha Reservation : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गाप्रमाणे शैक्षणिक व इतर सवलती देण्याबाबत ५ जून २०२६ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागांनी तात्काळ अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश जलसंपदा  मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. विधान भवनात मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्षतेखाली  मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत मराठा आरक्षणाशी संबंधित विविध प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यात आला आणि झालेल्या निर्णयाप्रमाणे अमंलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीस मंत्री मंडळातील जलसंपदा मंत्री गिरीष महाजन,शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे,सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, माहीती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार,मदत व पुनर्वसन मकरंद जाधव,सहकार मंत्री बाबासाहेब पाटील,वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,रोजगार व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्हास्तरावर मराठा समाजाच्या अडचणी आणि शंकांचे निरसन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरावर तातडीने हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात यावी,तालुका आणि जिल्हा स्तरावर प्राप्त होणारी निवेदने व मागण्यांचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या थेट देखरेखी खाली वर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू करावी. स्थानिक पातळीवरील मागण्यांचे तात्काळ निराकरण करण्यात यावे, तसेच ज्या मागण्या/निवेदने राज्य शासनाशी संबंधित आहेत, ती आवश्यकते नुसार तात्काळ शासनाकडे सादर करावीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत  घेण्यात आला. जिल्हा व तालुकास्तरीय तक्रार निवारण प्रक्रियेचा प्रत्येक आठवड्याला सविस्तर आढावा घेऊन कार्यवाही करावी आणि त्याबाबतचा प्रगती अहवाल दर आठवड्याला राज्य शासनास सादर करावा, असे निर्देश मंत्रिमंडळ उपसमितीने प्रशासनाला दिले आहेत. राज्य सरकारने ५ जून २०२६ रोजीच्या काढलेल्या शासन निर्णयानुसार मराठा समाजातील किती विद्यार्थ्यांना आतापर्यंत या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे, याची सविस्तर आकडेवारी संबंधित विभागाने पुढील बैठकीत अनिवार्यपणे सादर करावी, असे निर्देश मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीत अधिकार्यांना दिले असून, मराठा आरक्षणाच्या उपसमितीची बैठक आता नियमितपणे घेतली जाणार आहे. चालू अधिवेशन कालावधी संपल्यानंतर, राज्य मंत्रिमंडळाच्या (कॅबिनेट) बैठकीनंतर या उपसमितीची बैठक घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. मराठा समाजाच्या विविध योजना आणि आरक्षणाशी संबंधित बाबींचा पाठपुरावा करण्यासाठी एक स्वतंत्र ‘मराठा कक्ष’ तात्काळ कार्यरत करण्यात यावा, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. न्यायमुर्ती शिंदे समितीच्या कामकाजाला गती देण्यासाठी त्यांना स्वतंत्र कार्यालयीन जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा निर्णय तात्काळ घेण्यात यावा, अशा सूचनाही संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

Maratha Reservation: मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक; घेतला मोठा निर्णय Read More »

gangadhar kalkute

Gangadhar Kalkute : “लक्ष्मण हाकेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; बुद्धी भ्रष्ट झाली” ; गंगाधर काळकुटे यांचा हल्लाबोल

Gangadhar Kalkute : बीडमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी कुणबी दाखल्यांच्या मुद्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. कुणबी दाखले रद्द करण्याची आणि कथित चुकीचे दाखले देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी लक्ष्मण हाके यांनी केली होती. यावर आता मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काळकुटे यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर टीका करत, त्यांना “मराठा द्वेषाची कावीळ झाली असून मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे,” असा घणाघात केला. तसेच बीडमधील मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेण्याचा सल्लाही त्यांनी हाके यांना दिला. मराठा समाजाविरोधात सातत्याने भूमिका घेत असल्याचा आरोप करत काळकुटे यांनी हाके यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यासोबतच, कुणबी दाखल्यांच्या प्रश्नावर मराठा समाज संविधानिक आणि रस्त्यावरची दोन्ही प्रकारची लढाई लढण्यास तयार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे कुणबी दाखल्यांच्या मुद्द्यावरून राज्यातील मराठा-ओबीसी वाद पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Gangadhar Kalkute : “लक्ष्मण हाकेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; बुद्धी भ्रष्ट झाली” ; गंगाधर काळकुटे यांचा हल्लाबोल Read More »

ankush kakade

Ankush Kakade : ‘पवार साहेबांच्या पक्षाचे ऑपरेशन करण्याइतका सर्जन अजून जन्माला नाही’ राष्ट्रवादीच्या खासदारांबाबतच्या चर्चांना अंकुश काकडेंचा पूर्णविराम

Ankush Kakade : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील खासदारांबाबत सुरू असलेल्या चर्चांवर पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. पक्षाचे सर्व आठ खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास ठेवून काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. खासदारांच्या नाराजीच्या किंवा पक्षांतराच्या चर्चा निराधार असल्याचे स्पष्ट करत 2029 मध्ये पुन्हा जनतेसमोर जायचे असल्याने सर्वजण पक्षाशी एकनिष्ठ असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच कोणत्याही कामानिमित्त नेते एकमेकांना भेटू शकतात, त्यातून वेगळे अर्थ काढण्याचे कारण नसल्याचे त्यांनी नमूद केले. शरद पवार यांना त्यांच्या खासदारांबाबत कोणतीही अस्वस्थता नसल्याचे सांगत पक्ष फोडण्याच्या चर्चांवरही त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

Ankush Kakade : ‘पवार साहेबांच्या पक्षाचे ऑपरेशन करण्याइतका सर्जन अजून जन्माला नाही’ राष्ट्रवादीच्या खासदारांबाबतच्या चर्चांना अंकुश काकडेंचा पूर्णविराम Read More »

img 20260620 wa0004

Amol Khatal : ज्या ठिकाणी खासदार वाकचौरे यांना विरोध होईल, त्या ठिकाणी मी ढाल बनून उभा राहीन, आमदार खताळ

Amol Khatal : शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत सहभागी झाले या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी त्यांचा निषेध केला त्याच ठिकाणी आपण शिवसेना स्थापना दिवस साजरा करू. तसेच ज्या ठिकाणी खासदार वाकचौरे यांना विरोध होईल, त्या ठिकाणी मी त्यांची ढाल बनून उभा राहीन अस वक्तव्य आमदार अमोल खताळ यांनी केले. शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व सामान्य शिवसैनिकांना न्याय देण्याचे काम करत आहेत. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे करत सल्याचे गौरवोद्गार आमदार अमोल खताळ पाटील यांनी काढले. संगमनेर येथील बसस्थानक येथे शिवसेना स्थापनादिनाच्या निमित्त संगमनेर शिवसेना महायुतीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना आ. खताळ म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींवर मतदारसंघाचा विकास कामे करण्याची मोठी जबाबदारी असते. विकासकामांना गती देण्यासाठी अनेकदा कठोर निर्णय घ्यावे लागतात. जनतेच्या हितासाठी आणि मतदारसंघाच्या प्रगतीसाठी सत्तेसोबत राहून विकासाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असल्याचे आमदार खताळे यांनी सांगितले ऑपरेशन टायगर बाबत भाष्य करताना आमदार यांनी विरोधकांवर टीका करताना म्हणाले , तुमच्यासोबत असलेले तुमचे सहा खासदार जर तुम्हाला सोडून गेले असतील, तर त्यामागे काही ना काही कारण असणारच. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी आपले खासदार आपल्याला का सोडून गेले याचे आत्मपरीक्षण करावे असा सल्ला आमदार अमोल खताळ यांनी दिला. शिवसेना स्थापना दिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमा तून संगमनेर तालुक्यात शिवसेना संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच आगामी काळात पक्षवाढीसह जनतेच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले.

Amol Khatal : ज्या ठिकाणी खासदार वाकचौरे यांना विरोध होईल, त्या ठिकाणी मी ढाल बनून उभा राहीन, आमदार खताळ Read More »

bala nandgaonkar

Bala Nandgaonkar : राजकारणातील पक्षांतर जनतेला मान्य नाही; बाळा नांदगावकरांचे वक्तव्य

Bala Nandgaonkar : राजकारणातील पक्षांतर जनतेला मान्य नाही असे वक्तव्य मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. माध्यमांशी बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले की, देशाच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, ते सामान्य माणसांना आवडणारे नाही. पश्चिम बंगालमध्येही तेच झाले, महाराष्ट्रातही तसेच झाले. आम आदमी पक्षामध्येही असे प्रकार झाले. लोकांनी ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिले, ज्या पक्षाकडे पाहून मतदान केले, त्या मतांचा सन्मान राखला जात नाही. त्यामुळे हा लोकांचाही अपमान आहे.दुर्दैवाने राजकारणाबाबत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की जाणारे आहेत म्हणून घेणारे तयार आहेत.त्यामुळे पक्ष सोडून जाणाऱ्या मंडळींनीही स्वतः विचार केला पाहिजे की आपण काय करत आहोत. शेवटी जनता सर्व काही पाहत असते.-लोकांचा ईव्हीएम मशीनवरील विश्वास उडत चालला आहे.-त्यामुळे जाणाऱ्यांनाही असे वाटते की ईव्हीएम असल्यामुळे काही अडचण नाही. लोकांच्या मतांचा सन्मान राखला जात नाही. त्यामुळे आम्ही सरकारलाही आणि विरोधी पक्षांनाही बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.-विरोधी पक्षांनाही आम्ही सांगितले होते की, जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकावा. सरकारला जर एवढा आत्मविश्वास असेल की जनता आमच्या विचारधारेला आणि कामांना मतदान करते, तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यास काय अडचण आहे? त्यामुळे लोकांच्या मनातील शंका दूर होतील असं बाळा नांदगावकर म्हणाले. NDA ची ताकद वाढवण्यासाठी भाजपचे प्रयत्न तर एनडीएवर बोलताना जर एखादा नेता पक्षात येणार असेल, तर त्याच्यासोबत त्याच्या विचारांचे लोकही येणारच. त्याला कोणतेही नाव दिले तरी त्याचा फारसा अर्थ नाही.1967 मध्ये हरियाणामध्ये ‘आयाराम-गयाराम’ संस्कृतीचा जन्म झाला होता.तेथील एका आमदाराने अवघ्या नऊ तासांत तीन पक्ष बदलले होते.त्यानंतर पक्षांतरबंदीचा कायदा आला. मात्र त्यावरील वाद आणि निर्णय आजही सुरू आहेत.कायदा असला तरी त्याचे पालन होत नाही. न्यायालय तातडीने निर्णय देत नाही आणि अध्यक्षांकडे गेल्यानंतरही निर्णय होण्यास वेळ लागतो.त्यामुळे या सर्व बाबींचा काही जणांकडून फायदा घेतला जात आहे असं बाळा नांदगावकर म्हणाले.

Bala Nandgaonkar : राजकारणातील पक्षांतर जनतेला मान्य नाही; बाळा नांदगावकरांचे वक्तव्य Read More »

eknath shinde

Eknath Shinde : नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीची ताकद प्रदर्शन; नगरसेवकांच्या भेटीसाठी भिवंडीत एकनाथ शिंदे

Eknath Shinde : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या समर्थनार्थ नाशिक जिल्ह्यातील बहुतांश नगरसेवकांना भिवंडी तालुक्यातील अंजूर येथील साया गार्डन रिसॉर्टमध्ये मुक्कामासाठी ठेवण्यात आले होते. मतदानावेळी कोणताही दगाफटका होऊ नये आणि सर्व नगरसेवक एकत्र राहावेत यासाठी ही खबरदारी घेण्यात आली होती. मतदानाच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन यांनी रिसॉर्टमध्ये जाऊन नगरसेवकांची भेट घेतली. यावेळी मतदान प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नाशिकसह सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला. यावेळी मंत्री गिरीश महाजन, रवींद्र फाटक यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन नाशिककडे रवाना झाले. तर नगरसेवकही उत्साहाच्या वातावरणात बसमधून नाशिकच्या दिशेने रवाना झाले.

Eknath Shinde : नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीची ताकद प्रदर्शन; नगरसेवकांच्या भेटीसाठी भिवंडीत एकनाथ शिंदे Read More »

maharashtra government

Maharashtra Government: सामान्य प्रशासन विभागाचे विभाजनमाहिती व जनसंपर्क, राजशिष्टाचार दोन स्वतंत्र विभाग

Maharashtra Government: सामान्य प्रशासन विभागातून माहिती व जनसंपर्क आणि राजशिष्टाचार असे दोन स्वतंत्र विभाग नव्याने निर्माण करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. गत मंत्रिमंडळ बैठकीचे इतिवृत्त कायम करताना हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता राज्याच्या ३३ प्रशासकीय विभागांच्या विभाजन- समावेशनानंतर आता स्वतंत्र असे ४६ विभाग अस्तित्वात येणार आहेत. सध्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय सामान्य प्रशासन विभागातंर्गत कार्यरत आहे. राज्य शासनाच्या प्रचार, प्रसिद्ध आणि जनसंपर्कासाठी कार्यरत या महासंचालनालयाची सात विभागीय कार्यालये आहेत. शिवाय उपराजधानी नागपूर येथे संचालक कार्यालय देखील आहे. देशाच्या राजधानीत नवी दिल्ली येथे, तसेच गोवा राज्यात पणजी येथे महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माध्यमातून देखील शासनाच्या जनसंपर्काचे काम केले जाते. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा माहिती कार्यालयांच्या माध्यमातून शासनाच्या योजना व विकास कामांसह, लोकोपयोगी उपक्रमांसाठी जाणीव जागृतीसह, प्रसिद्धीचे कामकाज चालते. महासंचालनालय मुख्यालय तसेच या सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून आपत्त्कालिन परिस्थिती, ते सण – उत्सव आणि तातडीच्या परिस्थितीत शासकीय – प्रशासकीय यंत्रणेसह, माध्यम आणि नागरिकांसाठी संपर्क – संवादासाठी कार्यरत असते. स्वतंत्र विभाग निर्मितीमुळे निर्णय प्रक्रीयेत आणि कामकाजात गतीमानता येणार आहे. मुंबईतील मंत्रालयांतील विविध विभागांच्या कामकाजात सुसूत्रता यावी दृष्टीने गत मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय विभागांच्या पुनर्रचनेच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार ३३ विभागांची पुनर्रचना करून, ४५ विभाग करण्यास मान्यता देण्यात आली होती. आता त्यांची संख्या ४६ झाली आहे. या विभागांच्या पुनर्रचना आणि विभाजन- समावेशनामुळे एकंदर कामकाजात सुसूत्रता येणार आहे. तसेच निर्णय प्रक्रीया गतीने राबविता येणे शक्य होणार आहे. सुधारित निर्णयानुसार अस्तित्वात असलेल्या विभागांचे विभाजन करून, निर्माण होणारे नवीन विभाग पुढीलप्रमाणे – कृषि व पदुम विभागाचे विभाजन करुन कृषि विभाग आणि पदुम विभाग असे दोन स्वतंत्र विभाग. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे विभाजन स्वतंत्र सहकार विभाग, पणन विभाग आणि वस्त्रोद्योग विभाग असे तीन स्वतंत्र विभाग. सामान्य प्रशासन विभागातून राजशिष्टाचार व माहिती व जनसंपर्क हे दोन उप विभाग वेगळे करुन राजशिष्टाचार विभाग व माहिती व जनसंपर्क विभाग असे दोन स्वतंत्र विभाग. गृह विभागातून स्वतंत्र परिवहन विभाग. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाचे विभाजन करुन उद्योग व खनिकर्म विभाग, ऊर्जा विभाग आणि कामगार विभाग असे तीन स्वतंत्र विभाग. महसूल व वन विभागाचे विभाजन करुन महसूल विभाग, मदत व पुनर्वसन विभाग आणि वन विभाग असे तीन स्वतंत्र विभाग. पूर्वी “भूसंपादन” हा विषय वन विभागाकडे होता. आता तो महसूल विभागाकडे राहील. तद्वतच “नोंदणी व मुद्रांक शुल्क” हा विषय पूर्वीप्रमाणे महसूल विभागाकडेच राहील. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे विभाजन करुन शालेय शिक्षण विभाग आणि क्रीडा विभाग असे दोन स्वतंत्र विभाग. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे विभाजन करुन सांस्कृतिक कार्य विभाग आणि पर्यटन विभागा असे दोन स्वतंत्र विभाग. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे विभाजन करुन स्वतंत्र अन्न व औषध प्रशासन विभाग. तसेच नियोजन विभागातून रोजगार हमी योजना विभाग वगळून त्याचा समावेश मृद व जलसंधारण विभागामध्ये करण्यात येणार.

Maharashtra Government: सामान्य प्रशासन विभागाचे विभाजनमाहिती व जनसंपर्क, राजशिष्टाचार दोन स्वतंत्र विभाग Read More »

मोठी बातमी; 22 जूनपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन; ‘या’ दिवशी होणार शेवट

Maharashtra Assembly Session: राज्याचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. विधानभवन येथे आयोजित विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाचे नियोजन आणि कार्यक्रमाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह आमदार सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर, नाना पटोले, जयंत पाटील, डॉ. नीलम गोऱ्हे, अनिल परब, प्रसाद लाड, हेमंत पाटील, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सतेज पाटील, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या अधिवेशनात विरोधक वाढत्या महागाईवरून, राज्यातील कायदा सुव्यवस्था, गुन्हेगारी, महिला सुरक्षा आणि इतर मुद्यांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याचे चिन्हे आहे.

मोठी बातमी; 22 जूनपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन; ‘या’ दिवशी होणार शेवट Read More »