DNA मराठी

राजकीय

india uae energy deal

India UAE Energy Deal: भारत आणि UAE ‘महा-करार’; आता, देशात कायम राहणार 3 कोटी बॅरल्स कच्च्या तेलाचा साठा

India UAE Energy Deal: जगभरात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडत असताना भारताने संयुक्त अरब अमिराती सोबत मोठा करार केला आहे. अबुधाबीच्या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान मोदी आणि संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी एका ऐतिहासिक करारावर शिक्कामोर्तब केले आहे. हा करार संकटकाळात भारतासाठी एक अत्यंत महत्त्वाची जीवनवाहिनी ठरणार आहे. काय आहे हा 3 कोटी बॅरल्सचा करार? या करारानुसार, UAE ची सरकारी मालकीची तेल कंपनी असलेल्या ‘ADNOC’ कडून भारताच्या ‘सामरिक पेट्रोलियम साठ्यांमध्ये’ (Strategic Petroleum Reserves – SPR) साठवल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाचे प्रमाण वाढवून 3 कोटी बॅरल्सपर्यंत नेले जाईल. भारताने आपल्या सुरक्षित साठवणूक सुविधांची क्षमता वाढवण्यासाठी भारताने UAE सोबत हातमिळवणी केली आहे. भविष्यात उद्भवणाऱ्या संघर्षांमुळे जर तेलाच्या पुरवठ्यात व्यत्यय आला, तर आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारताकडे देशांतर्गतच पुरेसा तेलाचा साठा उपलब्ध असेल. हा करार अशा वेळी करण्यात आला आहे, जेव्हा ओमान आणि इराण यांच्या दरम्यान स्थित असलेल्या आणि जगातील तेलाच्या वाहतुकीसाठी सर्वात महत्त्वाचा मार्ग मानल्या जाणाऱ्या ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’मध्ये (Strait of Hormuz) तणाव शिगेला पोहोचला आहे. जहाजांची वाहतूक कोणत्याही अडथळ्याविना सुरू राहणे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत आवश्यक आहे, असे भारत आणि UAE या दोन्ही देशांनी ठामपणे नमूद केले आहे. जागतिक तेलाच्या पुरवठ्यात कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी, या सागरी मार्गाची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या आपल्या कटिबद्धतेचा दोन्ही देशांनी पुनरुच्चार केला आहे. वायू पुरवठ्यावरही चर्चा ऊर्जा क्षेत्रातील ही भागीदारी केवळ कच्च्या तेलापुरतीच मर्यादित नाही. ‘इंडियन ऑइल’ आणि ‘ADNOC’ यांच्या दरम्यान ‘द्रवरूप पेट्रोलियम वायू’च्या (LPG) पुरवठ्यासाठी एका नवीन दीर्घकालीन करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, भारत आता देशांतर्गत ‘सामरिक वायू साठे’ (Strategic Gas Reserves) उभारण्याच्या प्रकल्पावर सक्रियपणे काम करत आहे. या प्रकल्पासाठी UAE कडून भारताला तांत्रिक सहाय्य पुरवले जाईल. भविष्यात ‘द्रवरूप नैसर्गिक वायू’चा (LNG) पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा, यासाठी एक सर्वसमावेशक आराखडा देखील तयार करण्यात आला आहे. भारताची ऊर्जा सुरक्षा अबाधित राखण्याच्या दृष्टीने, UAE हा एक अत्यंत महत्त्वाचा भागीदार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टपणे नमूद केले आहे. जागतिक तेलाच्या किमती 100 डॉलर्सचा टप्पा ओलांडून गगनाला भिडत असताना आणि भारतीय रुपयाचे अवमूल्यन होत असताना, हा ऐतिहासिक करार भारताला महत्त्वपूर्ण आर्थिक स्थैर्य आणि लवचिकता प्रदान करेल.

India UAE Energy Deal: भारत आणि UAE ‘महा-करार’; आता, देशात कायम राहणार 3 कोटी बॅरल्स कच्च्या तेलाचा साठा Read More »

img 20260515 wa0014

Parner News : पारनेरचा वाळूधंदा, हप्तेखोरी, प्रशासनाची मौनसंमती आणि ‘ती’ लाला गाडी…

Parner News : पारनेर तालुक्यात अवैध वाळूउपसा, बिनधास्त वसुली आणि स्थानिक पातळीवरील ‘हप्ते संस्कृती’ यांचा उघडपणे सुरू असलेला खेळ आता सामान्य नागरिकांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेला आहे. दिवसा ढवळ्या नंबर नसलेल्या तथाकथित ‘लाला गाड्या’, त्यामध्ये फिरणारे चार-पाच जण आणि प्रत्येक ठिकाणी सुरू असलेली उघड वसुली ही केवळ अफवा नाही तर नागरिकांच्या रोजच्या अनुभवाचा भाग बनली आहे. प्रश्न केवळ अवैध वाळूउपशाचा नाही प्रश्न आहे तो प्रशासनाच्या भूमिकेचा. इतक्या उघडपणे धंदे सुरू असताना संबंधित यंत्रणांना याची माहिती नाही, असे म्हणणे म्हणजे जनतेच्या बुद्धीची थट्टा ठरेल. नदीपात्रातून वाळू उपसली जाते, वाहतूक होते, वसुलीचे जाळे रात्रंदिवस कार्यरत असते, आणि तरीही कारवाईचा मागमूस दिसत नाही. यातून मौनसंमतीचा संशय अधिक गडद होतो. स्थानिकांमध्ये एकच चर्चा ऐकू येते फक्त साहेब आणि पाच दादा जोरात. ही चर्चा जर जनमानसात इतकी ठळक असेल, तर प्रशासनाने ती गंभीरतेने घेणे आवश्यक आहे. काही मोजक्या लोकांच्या छत्रछायेखाली अवैध धंदे फोफावत असतील, तर तो लोकशाहीसाठी धोक्याचा इशारा आहे. शासनाची भीती संपून ‘व्यवस्था’ ही काहींच्या ताब्यात गेल्याची भावना निर्माण होणे, हे अधिक चिंताजनक आहे. हप्त्याची रक्कम वाढल्याच्या तक्रारीही आता उघडपणे पुढे येत आहेत. म्हणजेच अवैध धंद्याचा विस्तार इतका वाढला आहे की त्याचे आर्थिक गणितही बदलले आहे. सामान्य नागरिक, छोटे व्यावसायिक, वाहनचालक सर्वच या व्यवस्थेच्या छायेत जगत आहेत. कायद्याचे राज्य कुठे आहे, हा प्रश्न ते विचारत आहेत. याहून गंभीर बाब म्हणजे, या सर्वामुळे प्रशासनावरील विश्वास ढासळत चालला आहे. नागरिकांना न्याय मिळेल, तक्रार केल्यास दखल घेतली जाईल, ही भावना नष्ट होत असेल तर लोकशाहीचा पाया कमकुवत होतो. पारनेरमध्ये आज गरज आहे ती दिखाऊ कारवाईची नाही, तर मूळावर घाव घालणाऱ्या कठोर निर्णयांची. अवैध वाळूउपसा, बेकायदेशीर वसुली, नंबर नसलेल्या गाड्या, आणि त्यामागील राजकीय-प्रशासकीय संरक्षण याचा संपूर्ण तपास झाला पाहिजे. जबाबदार कोण, याची नावे समोर आली पाहिजेत. जनतेचा संयम हा प्रशासनासाठी परवाना नसतो. तो संपला, तर रस्त्यावरचा संताप अनिवार्य ठरतो. पारनेरमध्ये आज तोच टप्पा जवळ येताना दिसतो आहे. शासनाने अजूनही डोळेझाक केली, तर प्रश्न केवळ वाळूचा राहणार नाही, तो विश्वासघाताचा ठरेल.

Parner News : पारनेरचा वाळूधंदा, हप्तेखोरी, प्रशासनाची मौनसंमती आणि ‘ती’ लाला गाडी… Read More »

Sharad Pawar On PM Modi : अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होणार, मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar on PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथे बोलताना देशातील नागरिकांना पुढील एका वर्षासाठी सोने खरेदी टाळण्याचे तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या बचतीसाठी जास्तीत जास्त वर्क फ्रॉर्म होम आणि विदेशी प्रवास टाळण्याचे आवाहन केल्याने देशात सध्या खळबळ उडाली आहे. विरोधक मोदी यांच्या या आहवानानंतर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे. तर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांनी देखील यावर भाष्य करत प्रधानमंत्र्यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्व पक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय-प्रक्रिया राबविण्याचा सल्ला दिला आहे. शरद पवार यांनी एक्सवर म्हटले आहे की, मध्यपूर्वेतील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या. त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब निश्चितच काळजी निर्माण करणारी आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रधानमंत्र्यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्व पक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय-प्रक्रिया राबविणे देशहितासाठी अत्यंत आवश्यक आहे. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने अधिक संवेदनशीलता आणि व्यापक सल्लामसलत यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. यासोबतच प्रधानमंत्र्यांनी देशातील नामवंत अर्थतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि संबंधित तज्ज्ञांची तातडीने बैठक बोलावून परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा. पुढील धोरणांबाबत व्यापक विचारविनिमय करावा. देशातील जनतेमध्ये विश्वास आणि स्थैर्य निर्माण करणे, यालाच सद्यस्थितीत सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, अशी आमची ठाम भूमिका आहे असं शरद पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. नरेंद्र मोदींनी देशाला कोणती आवाहनं केली? पुढील एका वर्षासाठी सोन्याची खरेदी टाळा वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा नैसर्गिक शेतीचा अवलंब करा परदेश प्रवास टाळा खाद्यतेलाचा वापर कमी करा

Sharad Pawar On PM Modi : अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होणार, मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया Read More »

oplus 131072

Nilesh Lanke: खासदार निलेश लंके चर्चेत; भोंदूबाबा नानासाहेब विरकरचा आशीर्वाद घेतानाचे फोटो व्हायरल

Nilesh Lanke: नाशिक जिल्ह्यात खरात प्रकरण अजूनही ताजेच असताना, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातून रविवारी एक धक्कादायक घटना समोर आली. माढा तालुक्यातील आहेगाव येथे दरबार भरवणारा कथित भोंदूबाबा नानासाहेब विरकर उर्फ गुरु माऊली महाराज आणि त्याच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. भोंदूगिरी, फसवणूक आणि आर्थिक लुबाडणुकीसह विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे भोंदूबाबा नानासाहेब विरकर आणि अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुरु माऊली महाराज हा आहेगाव येथील स्वतःच्या पाच एकर जागेत एसी दरबार भरवत होता. दरबारात आलेल्या भक्तांनी फक्त नाव सांगितल्यानंतर त्यांच्या बँक खात्याचा क्रमांक आणि खात्यातील शिल्लक रक्कम अचूक सांगत असल्याचा दावा केला जात होता. त्यामुळे अनेक भाविक त्याच्याकडे आकर्षित होत होते.दरम्यान, खासदार निलेश लंके आणि त्यांच्या पत्नी राणी लंके यांचे या गुरुमाऊलीसोबतचे काही जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेषतः या भोंदू बाबाचा आशीर्वाद घेताना निलेश लंके दिसत आहे. राणी लंके जिल्हा परिषद सदस्य असताना गुरुमाऊली भक्त परिवाराने त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याचा फोटो देखील समोर आला आहे. तसेच एका फोटोमध्ये खासदार निलेश लंके यांनी गुरुमाऊलीला शाल घालून सन्मान केल्याचे दिसत आहे. खासदार निलेश लंके यांच्या सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये “करेक्ट नियोजन, परफेक्ट कार्यक्रम” अशी कॅप्शन देत गुरुमाऊलीचा आशीर्वाद मिळाल्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे आता या फोटो आणि पोस्टवरून विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक स्तरावर गुरुमाऊलीबाबत अनेक दावे केले जात होते. बंगालमध्ये सात-आठ वर्षे राहून त्याने “काळी विद्या” शिकल्याची चर्चा होती. तसेच तो स्वतःला हनुमानाचा अवतार असल्याचे सांगत असल्याचाही दावा केला जात आहे.राजकारणात विजय मिळवून देण्याची क्षमता असल्याचे तो सांगत असल्याने, 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्याचा काही प्रभाव होता का, अशा चर्चाही आता सुरू झाल्या आहेत. मात्र, या सर्व दाव्यांना अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. पोलिस तपासानंतरच सत्य स्पष्ट होणार सध्या पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून, आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरीच्या आरोपांची चौकशी सुरू आहे.

Nilesh Lanke: खासदार निलेश लंके चर्चेत; भोंदूबाबा नानासाहेब विरकरचा आशीर्वाद घेतानाचे फोटो व्हायरल Read More »

raj thackeray

Raj Thackeray on PM Modi: चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?  काटकसरीच्या आवाहनानंतर राज ठाकरे भडकले

Raj Thackeray on PM Modi:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना पुढील एका वर्षासाठी पेट्रोल आणि डिझेल जपून वापरण्याचा सल्ला दिला आहे. तसेच सोने खरेदी टाळा असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यावर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी मोदी यांना पत्र लिहित चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ? असा प्रश्न विचारला आहे. राज ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी तमाम भारतीयांना काटकसर करण्याचं आवाहन केलं. सोनं खरेदी कमी करा किंवा जवळपास थांबवाच, परदेशात गरज नसेल तर जाऊ नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, विजेवर चालणाऱ्या गाड्या जास्त वापरा, वर्कफ्रॉम होमचा पर्याय स्वीकारा इत्यादी इत्यादी. हे सगळं का ? तर, सोनं, पेट्रोल डिझेल हे आयात करावं लागतं आणि त्यात विदेशी गंगाजळी मोठ्या प्रमाणवर खर्च होते. आणि सध्या इराण युद्धामुळे खनिज तेलाचे भाव प्रचंड वाढलेत. बरं, मग स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काही शे गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढत आहेत, स्वतःवर फुलं उधळून घेत आहेत त्याचं काय करणार आहात आपण ? आमच्याकडून चूक झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून, यापुढे माझ्यासकट कोणीही काही असं करणार नाही असं सांगणार आहात का ? चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ? सध्या खनिज तेलाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव हा साधारणपणे ९० ते १०० डॉलर्स प्रति बॅरल असा आहे. हा भाव जगाने या आधी कधी पाहिला नाही असं नाही. २००८ ला पुढे २०११-२०१२ मध्ये अरब स्प्रिंगच्या वेळेस, २०१३-२०१४ च्या काळात ( जेंव्हा भाजपवाले खनिज तेलाच्या किंमती आणि देशाची इभ्रत यावर तावातावाने बोलत होते तो काळ ), पुढे अशीच परिस्थिती २०२२ आणि २०२३ च्या दरम्यान जेंव्हा ओपेकने खनिज तेलाचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा देखील बॅरलचा भाव ९० ते १०० डॉलर्सच्या दरम्यान गेला होता. या घटनांपैकी ३ ते ४ वेळा मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि एकदा तर स्वतः मोदी पंतप्रधान होते. मनमोहन सिंगांनी असं आवाहन केलं नाही की तेंव्हा मोदींनी केलं नाही. मग आत्ताच का ? काटकसर करा हे आवाहन करताना खरं कारण देशाच्या आणि राज्याराज्यांच्या अर्थव्यवस्थेचं जे काही कंबरडं मोडून ठेवलं आहे त्याबद्दल पंतप्रधान काहीच बोलत नाहीयेत. बरं जेंव्हा बॅरलचा भाव ६० ते ६५ डॉलर्सच्या आसपास होता तेंव्हा पण तुम्ही चढ्या भावाने आम्हाला पेट्रोल डिझेल विकत होतात त्यावेळेस जे पैसे लोकांकडून घेतले जे काही लाख कोटी रुपये असतील ते कुठे गेले ? त्याचं काय झालं ? ज्या रेवडी संस्कृतीची पंतप्रधानांनी खिल्ली उडवली त्याच रेवड्या मग २०२४ ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक असो की त्यानंतरच्या बिहार, पश्चिम बंगाल निवडणूका असोत की इतर कुठल्याही निवडणुका ‘रेवड्या’ वाटूनच निवडणुका जिंकल्यात. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेने राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीला आणली. महिलांना सक्षम करायचं सोडून त्यांना तुटपुंजे पैसे द्यायचे आणि ते पैसे महागाईच्या रूपाने पुन्हा काढून घ्यायचे. देशाची आणि राज्याची अर्थव्यवस्था जर नाजूक झाली आहे तर या रेवड्या वाटू नका असं पंतप्रधान ठामपणे सांगणार आहेत का ? पेट्रोल, डिझेलच्या वापरात काटकसर करा असं पंतप्रधान सांगतात. ठीक आहे. मग हे आत्ताच का सुचलं ? पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि इतर राज्यांच्या निवडणुकीत प्रचार, रोड शो करताना आणि देशभरातून लाखो माणसं त्या त्या राज्यात नेताना जे कोट्यवधी लिटर्स पेट्रोल, डिझेल वाया गेलं तेंव्हा का नाही सुचलं ? या राज्यांमध्ये जो अफाट पैशाचा खेळ करून मतदान मिळवलं तेंव्हा का नाही सुचलं ? लोकांनी परदेशात जाणं टाळावं असं पंतप्रधान म्हणतात. पण किती टक्के लोकांना परदेशात जाणं आत्ता परवडत आहे ? ज्या वर्गाला परवडू शकतो त्यांना पुढच्या महिन्यात आपली कंपनी आपल्याला कामावर ठेवेल का याची खात्री नाही. विद्यार्थ्यांना परदेशात शिकायला जावंस वाटतं कारण गेल्या १० ते ११ वर्षांत आपण शिक्षणात फार मूलभूत गुंतवणूक पण केली नाही भारतात रहावं असं वाटावं असं वातावरण पण निर्माण केलं नाही. शिक्षणात फक्त हिंदी कशी लादता येईल याकडे सगळं लक्ष लागलेलं. गेले काही महिने विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून अंग काढून घेत आहेत. एक अंदाज असा आहे जवळपास दीड लाख करोड रुपये गेल्या तीन महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतलेत. भारतात विदेशी गुंतवणूक होत नाहीये. पंतप्रधान आणि त्यांचे मुख्यमंत्री फक्त गुंतवणुकीचे करार करतात, त्यासाठी थंड हवेच्या देशांत जातात. बरं तिथे जाऊन भारतीय कंपन्यांसोबत करार करायचे मग त्यासाठी स्वित्झर्लंडला काय जायचं? स्वतः पंतप्रधान आता १५ मे पासून ५ देशांच्या परदेश दौऱ्यावर निघालेत, हे दौरे तुम्ही थांबवा. आणि मग लोकांना आवाहन करा असं राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटलं आहे.

Raj Thackeray on PM Modi: चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?  काटकसरीच्या आवाहनानंतर राज ठाकरे भडकले Read More »

varsha gaikwad

Varsha Gaikwad : पंतप्रधानांच्या सल्ल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी गाड्यांचा ताफा सोडून मेट्रो, बेस्ट व लालपरीने प्रवास करावा

Varsha Gaikwad : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अखेर देश संकटात आहे हे कबुल करून स्वतःचे अपयश मान्य केले आहे. १२ वर्षांपासून नरेंद्र मोदींनी देशाला वेठीस धरले आहे. निवडणुका, प्रचार व द्वेष पसरण्यापलिकडे भाजपा व मोदी सरकारने काहीही केलेले नाही. अमेरिका-इराण युद्धाचा फटका देशाला बसणार हे माहित असतानाही मोदी सरकारने कोणतेही नियोजन केले नाही, त्याचा मोठा फटका जनतेला बसत आहे. नरेंद्र मोदींच्या चुकांचे ओझे जनतेने का सहन करायचे? असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी विचारला आहे. नरेंद्र मोदींच्या विधानावर प्रतिक्रिया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, नरेंद्र मोदी स्वतः ८ हजार कोटी रुपयांचे विमान वापरतात, महागड्या वस्तू वापरतात, जनतेच्या पैशावर परदेश वाऱ्या करतात आणि पेट्रोल डिझेल कमी वापरा, सोने वर्षभर खरेदी करू नका, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा असे सल्ले जनतेला देत आहेत. नरेंद्र मोदी यांनी व त्यांच्या मंत्र्यांनीच आधीच काटकसर करण्याची सवय लावावी. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सल्ला प्रमाण मानून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गाड्यांचा ताफा घेऊन फिरण्यापेक्षा मुंबई, पुणे, नागपूर शहरात मेट्रो, सीटी बस व राज्यभरात लालपरीने प्रवास करून इंधन बचतीची सवय लावावी. देशासाठी एवढा त्याग करायला काय हरकत आहे. नरेंद्र मोदींचा सल्ला म्हणजे ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण’, असा आहे. संध्याकाळी जनतेला इंधन बचतीचा उपदेश देऊन दोन तासाने स्वतः मोदीच गाड्यांचा मोठा ताफा घेऊन फिरत होते, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या. सलग १२ वर्षांपासून सत्तेत असतानाही नरेंद्र मोदी यांना देशावर येणाऱ्या संकटासाठी नियोजन करता आले नाही, हे मोदी यांचे मोठे अपयश आहे. जनता आधीच महागाईने पिचलेली आहे, त्यात गॅस, इंधनाच्या संकटाने भर घातली आहे. पेट्रोल-डिझेल हे चैन किंवा उधळपट्टी नाही तर दररोजची गरज झालेली आहे. राहुल गांधी यांनी इराण युद्धाच्यावेळीच संकटाचा इशारा दिला होता पण मोदींच्या हुकुमशाही कारभारामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

Varsha Gaikwad : पंतप्रधानांच्या सल्ल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी गाड्यांचा ताफा सोडून मेट्रो, बेस्ट व लालपरीने प्रवास करावा Read More »

chandrashekhar bawankule

Chandrashekhar Bawankule : ‘लँड टायटलिंग ॲक्ट’ जुलैमध्ये लागू होणार; महाराष्ट्र ठरणार देशातील पहिले राज्य

Chandrashekhar Bawankule : ‘लँड टायटलिंग ॲक्ट’ येत्या जुलै महिन्यात राज्यात लागू होणार असून असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. या कायद्यामुळे राज्यातील १४ कोटी जनतेची मालमत्ता ही निश्चित प्रॉपर्टी म्हणून गणली जाणार असून जगातील कुठल्याही देशात ती कॅश करता येईल, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. बावनकुळे म्हणाले, स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम यांनी शिक्षण क्षेत्रात उभारलेले कार्य हे महाराष्ट्राच्या अभिमानाचे प्रतीक आहे. ‘गल्लीतली शाळा’ ते भारती विद्यापीठाला जागतिक स्तरावर नेण्याचा संकल्प केला आणि तो पूर्ण करून दाखवला. त्यांच्या विचारांचा प्रकाश आज देश-विदेशात पोहोचत आहे. ते म्हणाले, शिक्षणाशिवाय विकसित भारताची संकल्पना पूर्ण होऊ शकत नाही. राज्य शासनाने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण राबवून दीड हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले आहेत. तसेच दीड लाख विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता ( ए. आय)तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात विद्यापीठांनी तंत्रज्ञान आणि ए.आय. स्वीकारणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रांसाठी कोणत्याही स्टॅम्प पेपरची आवश्यकता राहिलेली नसून विविध प्रमाणपत्रे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ अंतर्गत राज्यातील ३० लाख विद्यार्थ्यांपर्यंत आवश्यक कागदपत्रे मोफत पोहोचविण्याची व्यवस्था उभी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान प्रशासन हीच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा असल्याचे सांगत सरकारने समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे, असेही ते म्हणाले. नागपूर येथे भारती विद्यापीठाचा विस्तार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी आवश्यक जागा व शासनस्तरीय सहकार्य देण्याची ग्वाही दिली. तसेच ‘टिटबिट पॉलिसी’च्या माध्यमातून अडचणीत असलेल्या भूखंडांचा मार्ग काढण्याबाबतही सकारात्मक भूमिका मांडली.

Chandrashekhar Bawankule : ‘लँड टायटलिंग ॲक्ट’ जुलैमध्ये लागू होणार; महाराष्ट्र ठरणार देशातील पहिले राज्य Read More »

shrikant shinde

Shrikant Shinde: जिल्हा परिषद निवडणुका आणि संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय

Shrikant Shinde : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संघटना अधिक मजबूत, सक्षम आणि बूथस्तरापर्यंत प्रभावी करण्यासाठी शिवसेना संसदीय गटनेते तथा कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा विधानसभा निहाय कार्यकर्ता, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी संवाद दौरा १६ मे २०२६ पासून सुरू होत आहे. १६ मे ते १५ जुलै असे तब्बल दोन महिने चालणाऱ्या या व्यापक दौऱ्यात राज्यातील २२ जिल्हे आणि १०० हून अधिक विधानसभा मतदारसंघ खासदार डॉ.श्रीकांत शिंदे पिंजून काढणार आहेत. शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन या दौऱ्याबाबत सविस्तर माहिती दिली. शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ३० मार्च २०२६ रोजी राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे मुंबई आणि ठाणे लोकसभा क्षेत्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नियुक्तीनंतर त्यांनी मुंबई आणि ठाणे परिसरात यशस्वी संवाद दौरे पूर्ण केले असून त्यानंतर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही संघटन बांधणीसाठी दौरे केले होते. विशेष म्हणजे, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्यातील ६५ ते ७० विधानसभा मतदारसंघांचा दौरा करत तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला होता. मोठ्या सभांपेक्षा प्रत्यक्ष भेटींवर भर देत त्यांनी कार्यकर्त्यांकडून सूचना, मते आणि स्थानिक पातळीवरील माहिती जाणून घेत निवडणूक रणनीती आखली होती. पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी अशा संवाद दौऱ्यांना महत्त्वपूर्ण मानले जाते. याच पद्धतीने आता पुन्हा एकदा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे राज्यव्यापी दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी, बूथस्तरावरील पक्षबांधणी, संघटनात्मक रणनीती, तसेच शिवसेनेच्या विविध आघाड्या आणि विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. विशेषतः एसआयआर मोहिमेअंतर्गत बीएलए आणि बूथ प्रमुखांच्या नियुक्त्यांबाबतही सविस्तर चर्चा होणार आहे. या बैठकींमध्ये जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शाखाप्रमुख, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच बूथस्तरावरील शिवसैनिकांशी थेट संवाद साधला जाणार आहे. संघटनात्मक अडचणी, स्थानिक प्रश्न, निवडणुकीतील आव्हाने आणि पुढील नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक वाढवणे, प्रत्येक बूथवर पक्षाची पकड मजबूत करणे आणि तळागाळातील शिवसैनिकांना नव्या उमेदीने सक्रिय करणे, हा या राज्यव्यापी दौऱ्यामागील प्रमुख उद्देश असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. दौरा असा असेल – खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याची सुरुवात उत्तर महाराष्ट्रातून होत असून पहिल्या टप्प्यात मे महिन्यात नाशिक, धुळे, अहिल्यानगर, बीड, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांमध्ये बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जून महिन्यात जळगाव, नंदुरबार, यवतमाळ, वाशिम, नांदेड, हिंगोली, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये संवाद दौरा पार पडणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात जुलै महिन्यात बुलढाणा, जालना, नागपूर, भंडारा, गोंदिया, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे.

Shrikant Shinde: जिल्हा परिषद निवडणुका आणि संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय Read More »

harshwardhan sapkal

Harshwardhan Sapkal: 2002 च्या गुजरात दंगलीप्रमाणे देशभर दंगली घडवण्याचे भाजपाचे षडयंत्र

Harshwardhan Sapkal: देशात दंगली घडवून आणण्याचे कारस्थान भारतीय जनता पक्षाकडून सुरु आहे, त्यासाठी प्रशिक्षण हाती घेतल्याची माहिती आहे. पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालापासूनच धार्मिक तेढ निर्माण करण्याची प्रक्रिया सुरु केलेली आहे. २००२ मध्ये गुजरातमध्ये जशा दंगली घडवून आणल्या होत्या, त्याच पद्धतीने देशभर दंगली करुन २०२९ च्या निवडणुका जिंकायच्या हे षडयंत्र आधीपासूनच रचले असून विधानसभा निवडणुकीनंतर सुरु झालेल्या दंगली या त्याचे पहिले पाऊल आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल, आसामसह पाच राज्यातील निवडणुकीत हिंदू मुस्लीम द्वेष वाढवणारा अजेंडा चालवला, त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही कारण जनगणनेनंतर जानेवारी २०२८ मध्ये डिलिमिटेशनची प्रक्रिया सुरु होणार आहे. डिलिमिटेशनसाठी सुप्रीम कोर्टातील कोणत्या निवृत्त न्यायाधिशाला डिलिमिटेशन कमिटीत घ्यायचे हे सुनिश्चित झालेले आहे. डिलिमिटेशन नंतरचा मतदार संघाचा नकाशाही तयार झालेला आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले आहे. तामिळनाडूतील राजकीय घडामोडींवर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, तामिळनाडूत निवडणुकीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीत जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय हा स्थानिक नेते, प्रभारी यांनी सर्वांशी विचारविनिमय करुनच पक्षश्रेष्ठींनी घेतलेला आहे. टीव्हीके पक्षाबरोबर निवडणुकीपूर्वीच आघाडी करावी अशी स्थानिक नेते व कार्यकर्त्यांची मागणी होती, त्यावेळीच तसा निर्णय घेतला असता तर काँग्रेस पक्षाचे जास्त आमदारही निवडून आले असते पण लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लढा देणाऱ्या पक्षाबरोबर आघाडी करण्यास काँग्रेस कटिबद्ध आहे, असेही सपकाळ म्हणाले. मुंबई महानगरपालिकेने संडास बांधण्यात भ्रष्टाचार केल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सपकाळ म्हणाले की, भ्रष्टाचारासाठी भाजपाला संडासची जागाही कमी पडत आहे. याआधी सुलभ शौचालयात भाजपाने भ्रष्टाचार केला होता. मोहित कंभोज यांना मलिदा आणि कार्यकर्त्यांना मात्र संडासची जागा, असा टोलाही सपकाळ यांनी लगावला.

Harshwardhan Sapkal: 2002 च्या गुजरात दंगलीप्रमाणे देशभर दंगली घडवण्याचे भाजपाचे षडयंत्र Read More »

uday samant

Uday Samant : अहिल्यानगर शिवसेनेची अख्खी कार्यकारणी बरखास्त; मंत्री सामंतांचा मोठा निर्णय

Uday Samant : अहिल्यानगर जिल्ह्याची शिवसेना कार्यकारणी बरखास्त करण्यात आली असून विद्यमान जिल्हाप्रमुखांना प्रभारी म्हणून काम पाहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. जिल्ह्यातील शिवसेना पक्षाचे थंडावलेले काम पाहता सामंत यांनी हे बदल केले असून येणाऱ्या काळात पक्ष मजबुती व बळकटीकरणासाठी पावले उचलले जातील असं सामंत म्हणाले. मंत्री उदय सामंत हे नगर जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी संगमनेर, श्रीरामपूर आणि नेवासा या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला. या बैठकीला माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार बनवतात मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे यांच्यासह नगर जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाची सुरू असलेली शिथिल वाटचाल यावर मंत्री सामंत यांनी नाराजी व्यक्त करत अहिल्यानगर जिल्ह्यातील पक्षाची कार्यकारणी बरखास्त करून केवळ जिल्हाप्रमुख नितीन अवताडे हे प्रभारी म्हणून काम पाहतील असे स्पष्ट आदेश दिले आहे. नव्याने संघटन बांधणी होईपर्यंत अवतडे हेच काम पाहतील दरम्यान आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका व संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मोठे राजकीय बदल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Uday Samant : अहिल्यानगर शिवसेनेची अख्खी कार्यकारणी बरखास्त; मंत्री सामंतांचा मोठा निर्णय Read More »