DNA मराठी

राजकीय

img 20260606 wa0004

Maharashtra Politics: हिंदू धोक्यात की प्रश्न विचारण्याची क्षमता?

Maharashtra Politics : “६०० वर्षे मुघलांचे राज्य होते, १५० वर्षे इंग्रजांचे राज्य होते, ७० वर्षे काँग्रेसचे सरकार होते मग हिंदू समाजाला धोका नेमका गेल्या काही वर्षांतच कसा निर्माण झाला?” हा प्रश्न सोशल मीडियावर वारंवार फिरताना दिसतो. या प्रश्नाचे उत्तर राजकीय भूमिकेनुसार बदलू शकते परंतु त्यामागील मूलभूत प्रश्न मात्र अधिक गंभीर आहे. तो म्हणजे, धर्म खरोखर धोक्यात आहे की धोक्याची भावना राजकीयदृष्ट्या निर्माण केली जात आहे? भारतातील हिंदू समाज हा जगातील सर्वात मोठा धार्मिक समुदाय आहे. हजारो वर्षांची सांस्कृतिक परंपरा, असंख्य श्रद्धास्थाने, विविध तत्त्वज्ञान, भाषा आणि सामाजिक रचना यांचा हा समाज आहे. अशा समाजाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे, असे मानण्यासाठी अत्यंत गंभीर आणि व्यापक स्वरूपाचे पुरावे आवश्यक असतात. परंतु सार्वजनिक चर्चेत अनेकदा भावनांचा आवाज तथ्यांपेक्षा मोठा असतो. लोकशाहीत प्रत्येक राजकीय पक्षाला आपली विचारधारा मांडण्याचा अधिकार आहे. मात्र गेल्या काही दशकांत धर्म हा केवळ श्रद्धेचा विषय न राहता निवडणुकीतील प्रभावी राजकीय साधन बनला आहे. पूर्वी विकास, रोजगार, शेती, शिक्षण किंवा आरोग्य यांवर केंद्रित असलेले राजकारण आता ओळख, अस्मिता आणि धार्मिक ध्रुवीकरणाभोवती फिरताना दिसते. कारण भीती ही आश्वासनांपेक्षा अधिक प्रभावी राजकीय प्रेरणा ठरते. यामुळेच आज गावोगावी “धर्मरक्षक”, “हिंदुत्ववादी नेता”, “समाजरक्षक” अशा उपाध्या घेऊन अनेक जण पुढे येताना दिसतात. प्रश्न असा आहे की, जर हिंदू समाज खरोखरच इतका शक्तिशाली, व्यापक आणि ऐतिहासिकदृष्ट्या टिकाऊ असेल, तर त्याच्या रक्षणासाठी इतक्या नव्या रक्षकांची अचानक गरज का भासावी? धर्माच्या रक्षणाची चिंता अधिक आहे की धर्माच्या नावावर राजकीय नेतृत्व निर्माण करण्याची? लोकशाहीत मतभेद हे स्वाभाविक असतात. एखाद्या नागरिकाने एखाद्या पक्षाला मतदान केले नाही, एखाद्या नेत्याच्या विचारांशी सहमत झाला नाही किंवा एखाद्या धोरणावर टीका केली, म्हणून तो धर्मविरोधी ठरत नाही. राजकीय असहमती आणि धार्मिक वैर यांच्यातील सीमारेषा जाणीवपूर्वक पुसली गेली, तर लोकशाहीची सर्वात मोठी हानी होते. कारण मग प्रत्येक प्रश्न धर्माच्या चष्म्यातून पाहिला जाऊ लागतो. धर्म हा श्रद्धेचा विषय आहे मतदान हा राजकीय अधिकार आहे. या दोन्ही गोष्टी एकमेकांशी कायमस्वरूपी जोडण्याचा प्रयत्न झाला, तर नागरिकत्वाची संकल्पनाच कमकुवत होते. एखाद्या व्यक्तीचे राजकीय मत वेगळे असू शकते, पण त्यामुळे तो आपल्या धर्माचा शत्रू ठरत नाही. त्याचप्रमाणे एखाद्या समुदायाच्या काही व्यक्तींच्या कृतींवरून संपूर्ण समुदायाला दोषी ठरवणे हेही लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे. भारतीय समाजाने मुघल राजवट, ब्रिटिश सत्ताकाळ, फाळणी, आणीबाणी, दंगली आणि अनेक राजकीय उलथापालथी अनुभवल्या आहेत. तरीही समाज टिकून राहिला, कारण त्याची ताकद केवळ धर्मात नव्हे तर सहअस्तित्वात होती. त्यामुळे आज जर कोणता धोका असेल, तर तो धर्मापेक्षा संवाद हरवण्याचा, प्रश्न विचारण्याची सवय कमी होण्याचा आणि नागरिकांना सतत भीतीच्या मानसिकतेत ठेवण्याचा आहे. धर्म वाचवण्यापेक्षा लोकशाही जपणे अधिक महत्त्वाचे आहे. कारण लोकशाही मजबूत असेल, तर प्रत्येक धर्म सुरक्षित राहू शकतो. पण लोकशाहीच कमकुवत झाली, तर कोणताही धर्म, कोणतीही विचारधारा किंवा कोणताही समुदाय स्वतःला पूर्णपणे सुरक्षित समजू शकत नाही. म्हणून आजचा खरा प्रश्न “हिंदू धोक्यात आहे का?” हा नाही. खरा प्रश्न असा आहे की, आपण धर्माच्या नावावर भीती विकणाऱ्यांवर अधिक विश्वास ठेवणार आहोत की लोकशाहीच्या मूल्यांवर?

Maharashtra Politics: हिंदू धोक्यात की प्रश्न विचारण्याची क्षमता? Read More »

Manoj Jarange Patil: मराठा समाजासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर मनोज जरांगे यांचे मोठे वक्तव्य

Manoj Jarange Patil : मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांचे स्वागत करत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे तसेच आमदार प्रसाद लाड यांचे मनापासून आभार मानले आहेत. जरांगे म्हणाले की, मराठा समाजाच्या विविध मागण्यांची अंमलबजावणी करून समाजाला न्याय देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे आणि प्रसाद लाड यांनी यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याचे त्यांनी नमूद केले. ओबीसी समाजाप्रमाणेच मराठा समाजालाही विविध शासकीय सवलती, सारथी संस्थेअंतर्गत योजना तसेच महामंडळाच्या काही बंद पडलेल्या योजना आणि अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्याचा शासन निर्णय घेण्यात आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आंदोलनादरम्यान बलिदान गेलेल्या कुटुंबांच्या प्रश्नालाही सरकारने गांभीर्याने हाताळल्याचे सांगत, या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विखे यांनी विशेष पुढाकार घेतल्याचे जरांगे यांनी म्हटले. “मराठा समाजाच्या मागण्यांना प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत नेण्यासाठी सरकारच्या वतीने विखे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस, विखे, प्रसाद लाड आणि संपूर्ण सरकारचे मी मनापासून आभार मानतो,” असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

Manoj Jarange Patil: मराठा समाजासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर मनोज जरांगे यांचे मोठे वक्तव्य Read More »

utkarsha rupavate

Utkarsha Rupavate : विधानपरिषद बिनविरोध! धुळफेक बंद करा…छुपा पाठींब्यावरून रूपवतेंचा आघाडीवर हल्लाबोल

Utkarsha Rupavate : विधान परिषदेची निवडणुकीत बिनविरोध पॅटर्न महाराष्ट्रात राबवला जात आहे. 17 विधानपरिषद जागांचा उमेदवारी माघारी घेण्याचा शेवटच्या दिवशी 17 पैकी 8 जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतली. असे करून भाजपला मदत करण्याचे पूणपणे महाविकास आघाडीने काम केले असा आरोप करत वंचितच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी बोलताना रूपवते म्हणाल्या, इतरांना भाजपची बी टीम म्हणतात काँग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरद पवार या पक्षांनी आणि नेत्यांनी भाजपची ए टीम म्हणून काम करण्याला सुरुवात केलेली आहे. महाविकास आघाडीने लोकांच्या डोळ्यात धूळ फेकणे बंद करून सरळ ते भाजपला मदत करत आहे हे मान्य करावे अशा शब्दात उत्कर्षा रूपवते यांनी आघाडीवर जोरदार निशाणा साधला.

Utkarsha Rupavate : विधानपरिषद बिनविरोध! धुळफेक बंद करा…छुपा पाठींब्यावरून रूपवतेंचा आघाडीवर हल्लाबोल Read More »

img 20260605 wa0017

Ahilyanagar Politics: बिनविरोध ते मागचे राजकारण; पडद्यामागे नेमकं घडलं काय?

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल अपेक्षितच होता. भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे बिनविरोध निवडून आले. निकालात धक्का नव्हता परंतु त्या निकालापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया मात्र अनेक प्रश्न उपस्थित करणारी ठरली. सामान्यतः बिनविरोध निवडणूक म्हणजे राजकीय सहमती, विकासाच्या मुद्यांवरील एकमत किंवा अनावश्यक संघर्ष टाळण्याचा प्रयत्न असे मानले जाते. मात्र अहिल्यानगरात घडलेला घटनाक्रम वेगळेच वास्तव समोर आणतो. येथे बिनविरोध निवडीपेक्षा ती घडवून आणण्यासाठी वापरले गेलेले राजकीय व्यवस्थापन, स्थानिक नेतृत्वाची धडपड, राज्यस्तरीय हस्तक्षेपाची चर्चा आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत निर्माण झालेली उत्सुकता अधिक चर्चेचा विषय ठरली. या निवडणुकीकडे केवळ एका विधान परिषद जागेच्या चौकटीत पाहून चालणार नाही. त्यामागे गेल्या काही वर्षांत बदललेले जिल्ह्याचे राजकीय चित्र आहे. प्राजक्त तनपुरे हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) विचारसरणीशी जोडले गेलेले नेतृत्व. राहुरी विधानसभा मतदारसंघात त्यांनी स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली. विधानसभा निवडणुकीच्या काळात बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये त्यांनी घेतलेली भूमिका आणि त्यानंतर विधान परिषदेसाठी त्यांची झालेली निवड ही केवळ व्यक्तीची राजकीय प्रगती नाही ती राज्यातील बदलत्या सत्तासमीकरणांची अभिव्यक्ती आहे. महायुतीसाठी तनपुरे यांना विधान परिषदेत पाठवणे ही राजकीय विश्वासार्हतेची बाब बनली होती. दिलेला शब्द पाळण्याचा संदेश त्यातून जाणार होता. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यापेक्षा बिनविरोध जिंकणे अधिक महत्त्वाचे मानले जात होते. कारण बिनविरोध निवड म्हणजे संघटनात्मक ताकद, विरोधकांवरील प्रभाव आणि राजकीय व्यवस्थापनाचे प्रदर्शन. म्हणूनच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत अनेक स्तरांवर हालचाली सुरू होत्या. प्रारंभी सर्व काही नियोजनाप्रमाणे घडत असल्याचे चित्र होते. अपक्ष उमेदवार करण ससाणे यांनी माघार घेतली. इतर उमेदवारांनीही अर्ज मागे घेतले. दुपारपर्यंत निवडणूक बिनविरोध होणार, याबद्दल कोणालाही शंका उरली नव्हती मात्र दत्तात्रय पानसरे यांनी संपूर्ण समीकरण बदलले. राजकारणात अनेकदा एखाद्या व्यक्तीचे राजकीय वजन तिच्या पदावरून नव्हे, तर योग्य वेळी निर्माण केलेल्या अडचणीवरून मोजले जाते. पानसरे यांच्या भूमिकेने हेच दाखवून दिले. त्यांच्या वतीने माघारीचा अर्ज दाखल झाला पण काही वेळातच त्यांनी त्या अर्जालाच आव्हान दिले. प्राधिकृत पत्रावरील स्वाक्षरी बनावट असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या दिला. आत्मदहनाचा इशाराही दिला. यानंतर केवळ निवडणूक प्रक्रियाच नव्हे, तर संपूर्ण राजकीय व्यवस्थापनच प्रश्नांकित झाले. या घटनेतून पहिला धडा मिळतो तो स्थानिक नेतृत्वाच्या मर्यादांचा. जिल्ह्यातील प्रभावशाली नेते, मंत्री, आमदार आणि संघटनात्मक ताकद असूनही दुपारनंतरचा पेच तात्काळ सोडवता आला नाही. अनेक चर्चांनंतरही पानसरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. स्थानिक पातळीवरील सर्व प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे विषय राज्यस्तरावर पोहोचल्याची चर्चा सुरू झाली. या चर्चांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपाचाही उल्लेख झाला. या चर्चांची अधिकृत पुष्टी नसली तरी त्यातून एक वास्तव अधोरेखित होते. महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णय प्रक्रियेचे केंद्रीकरण वाढत चालले आहे. पूर्वी जिल्ह्यातील प्रश्न जिल्ह्यात सुटत असत. आज मात्र अनेक प्रश्नांची अंतिम उत्तरं मुंबईत किंवा राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वाकडे शोधली जातात. हा बदल केवळ राजकीय नाही; तो संघटनात्मक संस्कृतीत झालेल्या परिवर्तनाचाही भाग आहे. या निवडणुकीतील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रशासनाची भूमिका. निवडणूक प्रक्रियेला विशिष्ट नियम, वेळापत्रक आणि कायदेशीर चौकट असते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी तीन वाजता संपली. त्यानंतरही रात्री साडेआठ वाजेपर्यंत घडामोडी सुरू राहिल्या. यामुळे काही मूलभूत प्रश्न उपस्थित होतात. उमेदवाराच्या हरकतीवर निर्णय घेण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणती प्रक्रिया अवलंबली? प्राधिकृत पत्रावरील स्वाक्षरीबाबत नेमकी पडताळणी कशी करण्यात आली? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, अंतिम निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी इतका कालावधी का लागला? लोकशाही व्यवस्थेत निवडणूक अधिकाऱ्यांवर असलेला विश्वास हा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आधारित असतो. त्यामुळे अशा प्रसंगी केवळ निर्णय नव्हे, तर निर्णयापर्यंत पोहोचण्याचा मार्गही तितकाच महत्त्वाचा असतो. या घटनेतील आणखी एक पैलू दुर्लक्षित करता येणार नाही. दत्तात्रय पानसरे यांच्या उमेदवारी अर्जाचे अनुमोदक एमआयएमचे नगरसेवक शहाबाज सय्यद होते. त्यांच्या माध्यमातून माघारीचा अर्ज दाखल झाला. त्यानंतर प्राधिकृत पत्राच्या वैधतेवर वाद निर्माण झाला. हा संपूर्ण घटनाक्रम पाहता स्थानिक राजकारणातील विविध स्तरांवरील समन्वय आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचे दर्शन घडते. अर्थात, या सर्व नाट्याच्या केंद्रस्थानी असलेल्या प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी हा राजकीय विजय महत्त्वाचा आहे. विधान परिषदेत त्यांचा प्रवेश हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील नवा टप्पा ठरेल. महायुतीने दिलेला शब्द पाळल्याचा संदेश यातून गेला. जिल्ह्यातील सत्तासमीकरणांमध्ये त्यांचे स्थान अधिक मजबूत झाले. परंतु या विजयाचा राजकीय अर्थ केवळ एवढाच नाही. हा विजय राज्यातील बदलत्या राजकीय निष्ठा, नव्या समीकरणांची निर्मिती आणि सत्ताधारी पक्षाच्या विस्तारवादी राजकारणाचाही भाग आहे. मात्र या विजयाच्या उत्सवात काही प्रश्न हरवू नयेत. लोकशाहीमध्ये बिनविरोध निवड हा आदर्श मानला जातो, पण ती बिनविरोधता कशी साध्य झाली, हा प्रश्न तितकाच महत्त्वाचा असतो. जर ती सहमतीतून आली असेल तर ती लोकशाहीची ताकद आहे. पण जर त्यामागे दबाव, समजुती, राजकीय गणिते आणि शेवटच्या क्षणापर्यंत चाललेले तणाव असतील, तर त्याचे वेगळे अर्थ निघतात. अहिल्यानगरच्या या निवडणुकीने एक गोष्ट स्पष्ट केली. आजच्या राजकारणात विजय हा केवळ मतपेटीतून मिळत नाही; तो व्यवस्थापनातून, संपर्कातून, प्रभावातून आणि सत्तेच्या विविध स्तरांवरील समन्वयातूनही मिळतो. प्राजक्त तनपुरे यांचा विजय हा त्या व्यवस्थापनाचा यशस्वी शेवट ठरला. मात्र दत्तात्रय पानसरे यांनी निर्माण केलेल्या पेचामुळे त्या व्यवस्थापनाच्या मर्यादाही उघड झाल्या. अखेरीस निकाल लागला, निवडणूक संपली आणि विजेत्याची घोषणा झाली. पण लोकशाही प्रक्रियेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न अजूनही शिल्लक आहे. बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला, पण तो मार्ग नेमका कसा तयार झाला? त्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याशिवाय या निवडणुकीचा संपूर्ण अर्थ समजणे कठीण आहे. कारण अनेकदा निवडणुकीचा खरा इतिहास निकालात नसतो; तो निकालाच्या आधी घडलेल्या घटनांमध्ये दडलेला असतो.

Ahilyanagar Politics: बिनविरोध ते मागचे राजकारण; पडद्यामागे नेमकं घडलं काय? Read More »

AIMIM : दंगल घडवण्याचे उद्देशाने काही दंगलखोर संघटन जिल्ह्यात सक्रिय – डॉ परवेज अशरफी

AIMIM : काही दिवसापूर्वी नगर महानगरपालिका हद्दीतील गंगा उद्यान येथे काही बुरखाधारी व्यक्तींनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल होताच काही जातीवादी संघटना आणि नगरचे लोकप्रतिनिधी यांनी त्या ठिकाणी आंदोलन करून हनुमान चालीसा व हवन आणि वराह पूजा करून शुद्धीकरण केले. सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे अहमदनगर शहर व जिल्ह्यामध्ये वातावरण दूषित होत असल्याचे निदर्शनास आले. परंतु तो व्हिडिओ व्यवस्थित पाहिलं तर त्यात काही टेक्निकल बाबी आढळून आले आहे. सदर बुरखाधारी नमाज पठण ज्या दिशेने करत आहे त्या दिशेने भारतीय मुस्लीम नमाज पठण करत नाही. त्यामुळे भारतात राहणाऱ्या मुस्लिम समाज हा काबा च्या दिशेने म्हणजेच सूर्य अस्त च्या दिशेने नमाज पठण करतो. परंतु सदर बुरखाधारी हे नमाज पठण काबा च्या दिशेने न करता उत्तरेचे दिशेने करत असल्याचे दिसते याच्याच अर्थ सदर बुरखाधारी हे मुस्लिम समाजाचे किंवा इस्लाम धर्माला मानणारे नसावेत. तसेच नमाज पठण करण्याच्या अगोदर वजू करणे म्हणजे योग्यरित हातपाय धुणे अनिवार्य आहे. परंतु गंगा उद्यान मध्ये अशी कोणती सोय नसल्याने त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचे महिला नमाज पठण करणे टाळतील. गंगा उद्यानात वेगवेगळ्या ४ पायाचे जनावर त्या ठिकाणी आढळून येतात आणि घाण करून जातात अशा ठिकाणी मुस्लिम समाजाचे व्यक्तीने नमाज पठण करणे हे शक्य नसल्याने शंका निर्माण होणे साहजिक आहे. भारतामध्ये असे अनेक प्रकार रोज घडत आहे की काही पुरुष बुरखा घालून मंदिराच्या समोर अनावश्यक वातावरण खराब करणाऱ्या गोष्टी करतात आणि पळून जातात यातले काही पकडले गेल्याने लोकांचे लक्षात आले की बुर्खायाचे आत मध्ये महिला नसून पुरुष आहे आणि तेही मुस्लिम समाजाचा नसून इतर समाजाचे आहेत. व्हिडिओ व्हायरल होताच काही जातीवादी संघटना इतके तातडीने उद्यानात आले जसेकाय ते या व्हिडिओची प्रतीक्षा करत होते. येतांना त्यांनी सर्व समग्री सोबत आणली आणि हवन, भजन कीर्तन हनुमान चालीसा आणि वराह पूजा हे सर्व केले. नगरचा लोकप्रतिनिधी आणि जातीवादी संघटना या उद्यानात हजर झाले यावरून असे दिसते की व्हिडिओ काढणे आणि ते त्यांच्या ग्रुप वर टाकणे आणि लगेच संबंधित टोळी हे उद्यानात येऊन धिंगाणा घालणे हे सर्व पूर्ण नियोजित आणि योग्य रीतीने षडयंत्र भाग असल्याचे दिसते. डॉ परवेज अशरफी यांनी प्रशासनाला प्रश्न विचारले की जर नमाज पठण सार्वजनिक ठिकाणी केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो तर त्याच ठिकाणी हनुमान चालीसा, हवन वराह पूजा होत असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल का होत नाही ? निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे की संबंधित बुरखाधारी महिला व पुरुष प्रशासनाने शोधावे व तातडीने अटक करावी. त्याचबरोबर ज्या व्यक्तीने व्हिडिओ काढून व्हायरल केला त्यालाही अटक करून त्याच्याकडून माहिती उपलब्ध करून घ्यावे जेणेकरून हा सर्व षडयंत्र जनतेसमोर येईल. ईदच्या दिवशी माळीवाडा भागात जे घडले त्यात एक बुरखाधारी आढळले परंतु ती महिला की पुरुष हे अद्याप समजले नाही परंतु त्यातही काही त्रुटी असल्याचे प्राथमिक निदर्शनास आले आहे. प्रशासनाने त्याचा योग्य छडा लावल्यास त्या ठिकाणी तो प्रकार एक षड्यंत्र असल्याचे जनते समोर येईल. गंगा उद्यान या प्रकरणाचा योग्य रीतीने तपास करून दोषींवर कारवाई झाली नाही तर या षडयंत्र करणाऱ्या टोळीची हिम्मत वाढेल आणि भविष्यात असे प्रकार सर्रास घडताना आपल्याला दिसेल. याचा नुकसान भारतीय मुस्लिमांना भोगावे लागेल. पोलिस प्रशासनाने या दोन्ही घटनेची योग्य रीतीने तपास केल्यास नक्की अहमदनगर मध्ये चालले षडयंत्र जनतेसमोर येईल अशी खात्री एम आय एम चे जिल्हाध्यक्ष डॉ परवेझ अशरफी यांनी नगरच्या पोलिस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.

AIMIM : दंगल घडवण्याचे उद्देशाने काही दंगलखोर संघटन जिल्ह्यात सक्रिय – डॉ परवेज अशरफी Read More »

img 20260605 wa0009

Amol Khatal : जिल्हा परिषद निवडणुकात सेनेचा भगवा फडकवू…आमदार खताळांनी व्यक्त केला विश्वास

Amol Khatal : संगमनेर तालुक्यातील खांबे गावात काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला असून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे पदाधिकारी आणि शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. ४) सायंकाळी आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार खताळ यांच्या कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात “तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी बोलताना आमदार अमोल खताळ म्हणाले की, गेल्या चाळीस वर्षांत अपेक्षित विकास झाला नाही. मात्र महायुती सरकारच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांत तालुक्यात विविध विकासकामांना गती देण्यात आली असून मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलत आहे. खांबे गावाच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.कार्यक्रमास खांबे ग्रामपंचायतीचे सरपंच रविंद्र दातीर, सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण जोशी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेश काळे, विठ्ठल दातीर, बाबासाहेब दातीर, रामेश्वर शिंदे, दिगंबर दातीर, गबाजी कोरडे, भिकाजी वाघ, प्रेमराज बुधे आदी मान्यवर उपस्थित होते. काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करणारे कार्यकर्ते… पुंजा जोशी, सुखदेव भतांबरे, रावसाहेब भांड, बाबूराव कापडी, बारकू पेकारी, बाबा एकनाथ जोशी, नवनाथ दातीर, एकनाथ दातीर, सुभाष केदार, राजू शेंडगे, बाळासाहेब दातीर, खुशाल वाघ, जनार्दन जोरी, संजय दातीर, ठकाजी दातीर, नामदेव दातीर, ज्ञानेश्वर दातीर, रवी जोरी, सोमनाथ शेंडगे, माणिक जोरी, भाऊसाहेब शेंडगे, सखाराम दातीर, रविराज जोशी, पवन जोशी यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. विकासाच्या जोरावर शिवसेनेची ताकद वाढणार केंद्र व राज्यात महायुतीचे सरकार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यातील विकासकामांना वेग मिळत आहे. खांबे गावातील हा पक्षप्रवेश सोहळा साकूर पठार भागात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविणारा ठरेल. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांत या भागात शिवसेनेचा भगवा निश्चित फडकेल,” असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला. चाळीस वर्षांत न झालेला विकास दीड वर्षांत… खांबे ग्रामपंचायतीचे सरपंच रविंद्र दातीर म्हणाले, “गेल्या ४० वर्षांत गावाचा अपेक्षित विकास झाला नव्हता. मात्र आमदार अमोल खताळ यांनी अवघ्या दीड वर्षांत साडेतीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून अनेक विकासकामे पूर्ण केली आहेत, तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. लवकरच या विकासकामांचे लोकार्पण आणि गावातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिवसेना प्रवेशाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.

Amol Khatal : जिल्हा परिषद निवडणुकात सेनेचा भगवा फडकवू…आमदार खताळांनी व्यक्त केला विश्वास Read More »

dilip walse patil

Dilip Walse Patil : कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकार सकारात्मक; दिलीप वळसे पाटील

Dilip Walse Patil :राज्यात सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, त्यांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत, राज्याचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी आंदोलक आणि शेतकऱ्यांना जाहीर चर्चेचे खुले आमंत्रण दिले आहे. सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असून, सुधारणांसाठी आंदोलकांशी चर्चा करण्याची आपली पूर्ण तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आंदोलन संपवून आंदोलक आपल्याकडे आले, तर त्यांचे आदरातिथ्य करायला आपल्याला नक्कीच आवडेल, असे सांगत वळसे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांमध्ये योग्य त्या सुधारणा नक्कीच करता येऊ शकतात, असा विश्वास व्यक्त केला. अगदी त्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी बोलावले, तरीही मनात कोणताही पूर्वग्रह न ठेवता शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला तिथे येण्यास आपण तयार असल्याचे सांगत, या प्रयत्नांमध्ये आपला कोणताही स्वार्थ नसून शेतकऱ्यांचे हित हाच एकमेव उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कांदा उत्पादक आणि साखर उद्योगाच्या अडचणींवर केंद्र पातळीवरून वेगाने हालचाली सुरू असल्याची महत्त्वपूर्ण माहिती देताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी, गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तामामा भरणे, पणन मंत्री जयकुमार रावल, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासह केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान आणि पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित होते. या बैठकीत छगन भुजबळ, दादा भुसे, जयकुमार रावल आणि स्वतः दिलीप वळसे पाटील यांनी कांदा प्रश्ना संदर्भातील सद्यस्थिती आणि दाहकता केंद्राच्या निदर्शनास आणून दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या संपूर्ण विषयावर अत्यंत गांभीर्याने लक्ष दिले असून, येत्या पुढील १० दिवसांत या संदर्भात योग्य तो सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन राज्य सरकारला दिले आहे. या आश्वासनाच्या अनुषंगाने आपण स्वतः केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयाशी सातत्याने संपर्क ठेवून असून, या संपूर्ण प्रक्रियेचा नियमित पाठपुरावा घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.कांदा उत्पादकांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार यांची भेट घेणार असल्याची घोषणाही दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी केली. या आगामी भेटीदरम्यान, वळसे पाटील हे शरद पवार यांना दिल्लीतील उच्चस्तरीय बैठकीतील सविस्तर चर्चेची माहिती देणार असून, केंद्र सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आणि तातडीने दिलासा मिळावा, यासाठी पवार साहेबांनी देखील त्यांच्या पातळीवर केंद्र सरकारकडे वजन वापरावे आणि हा विषय लावून धरावा, अशी विनंती ते या भेटीत करणार आहेत. हवामान खात्याच्या अंदाजाचा दाखला देत दिलीप वळसे पाटील यांनी आगामी काळातील नैसर्गिक व आर्थिक आव्हानांकडेही लक्ष वेधले. येत्या वर्षात ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पावसाची संभाव्यता कमी असून साधारणतः ९० टक्केच पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, शेतकरी बांधवांनी ऊस, कांदा किंवा इतर नगदी पिकांचे नियोजन करताना या सर्व हवामान बदलांचा अत्यंत गांभीर्याने विचार केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. यासोबतच आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या जागतिक युद्धाचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर होत असून यामुळे महागाई आणि आर्थिक मंदीचे सावट निर्माण होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. मात्र, जेव्हा जेव्हा देशात आर्थिक मंदी येते, तेव्हा कृषी क्षेत्रच देशाच्या आर्थिक विकासाला खरा हातभार लावून देशाला सावरू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेवटी बोलताना, शेतकरी राजा स्वतः परिस्थिती जाणत असल्याने त्याला सल्ला देण्याची गरज नाही, परंतु शेतकरी हितासाठी केंद्र आणि राज्य सरकारने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांच्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आणि प्रयत्नशील आहोत, असे सांगत आंदोलकांनी सकारात्मक चर्चेचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन वळसे पाटील यांनी केले.

Dilip Walse Patil : कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकार सकारात्मक; दिलीप वळसे पाटील Read More »

Maharashtra Reservation: मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसदारांना मिळणार नोकरी

Maharashtra Reservation: मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसदारांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) मध्ये नोकरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने घेतला आहे. अंतरवाली सराटी येथील आंदोलनादरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता या निर्णयातून झाली असल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मराठा आरक्षण आणि इतर विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये मृत आंदोलकांच्या वारसदारांना नोकरी देण्याच्या मागणीचाही समावेश होता. या मागणीसंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने तातडीने शासन आदेश जारी करून मराठा आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांची पडताळणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी उपोषण सोडताना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मृत आंदोलकांच्या वारसदारांना एमआयडीसीमध्ये नोकरी देण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. यापूर्वी मृत आंदोलकांच्या वारसदारांना परिवहन महामंडळात समाविष्ट करून घेण्याचे ठरले होते. मात्र, काही वारसदारांची अपेक्षा एमआयडीसी किंवा महावितरण कंपनीमध्ये नोकरी मिळावी अशी होती. त्यानुसार एमआयडीसीमध्ये मृत व्यक्तींच्या वारसदारांना समाविष्ट करून घेण्याची प्रशासकीय कार्यवाही वेगाने पूर्ण करण्यात आली असून, एमआयडीसीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एमआयडीसीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानंतर सामान्य प्रशासन विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून मृत आंदोलकांच्या पात्र वारसदारांची पडताळणी करून त्यांना तातडीने प्रमाणपत्र देण्याच्या सूचना दिल्या आहेत. अचूक आणि योग्य शहानिशा करून प्रमाणपत्र निर्गमित करण्याची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी, असे निर्देशही देण्यात आल्याची माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली. “अंतरवाली सराटी येथील आंदोलनादरम्यान संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार करत आहे. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत महायुती सरकार संवेदनशील असून यापूर्वीही सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. भविष्यातही समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.

Maharashtra Reservation: मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसदारांना मिळणार नोकरी Read More »

Radhakrishnan Vikhe Patil: शासकीय कार्यालये लोणीकडे स्थलांतर करण्याचा निर्णय अन् मंत्री विखेंविरोधात कर्मचाऱ्यांचा नाराजीचा सूर

Radhakrishnan Vikhe Patil: गोदावरी, मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अनेक कार्यालयांच्या मुख्यालयात बदल करण्याचा आदेश निघाला आहे. गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळाचे कामकाज गतिमान करण्यासाठी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महामंडळाच्या कार्यालयांचे स्थलांतर करून आस्थापनांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अहिल्यानगर पाटबंधारे विभागाचे मुख्यालय आता अहिल्यानगरऐवजी लोणी तर मुळा पाटबंधारे विभागाचे मुख्यालय अहिल्यानगर ऐवजी राहुरी असणार आहे. मात्र या निर्णयाला मोठा विरोध होत आहे परंतु आता कार्यालय स्थलांतर विरोधात दाखल याचिका छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. जलसंपदा विभागातील प्रशासकीय रचना बदलत गोदावरी खोरे महामंडळातील मुख्य अभियंत्याचे कार्यालय छत्रपती संभाजीनगरहून नांदेड येथे हलविण्यात आले आहे. तर नांदेड येथील उर्ध्वपैनगंगा प्रकल्प क्र. १ आणि क्र. ३ ही दोन कार्यालयांचे मुख्यालय थेट अहिल्यानगरमधील लोणी येथे हलविण्यात आले आहेत. उपअभियंत्याचे हे कार्यालय लोणीमध्ये हलिवण्यात कोणते प्रशासकीय हीत आहेत, असा प्रश्न आता विचारला जात आहे. अहिल्यानगर हे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांचा प्रभावक्षेत्र असल्याने हे बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जलसंपदा कार्यालयांच्या स्थलांतराच्या निर्णयावर उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अंतर्गत असलेल्या कार्यालय स्थलांतराच्या निर्णयाविरोधात छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्यात आली असून, जलसंपदा विभागाच्या धोरणात्मक निर्णयावर उच्‍च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून कृष्णा व गोदावरी पाटबंधारे महामंडळाने प्रदेश, मंडळ आणि विभाग स्तरावरील कार्यालयांच्या पुनर्रचनेचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. सिंचन प्रशासन गतिमान आणि लोकाभिमुख व्हावे, तसेच या निर्णयाचा लाभ शेतकरी, नागरिक आणि लोकप्रतिनिधींना व्हावा, हीच यामागची भूमिका होती. सिंचनविषयक कामांसाठी लोकप्रतिनिधी, शेतकरी व नागरिकांना कार्यालये जवळ तसेच धरण लाभक्षेत्रात असावीत, या उद्देशाने महामंडळाच्या २७ मे २०२६ रोजीच्या बैठकीत हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. मात्र, जलसंपदा विभागाच्या निर्णयाविरोधात रौफ नवजा पटेल यांनी संभाजीनगर उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने सदर याचिका खारीज केली आहे. न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान माननीय न्यायालयाने पक्षकाराला “सदरचे काम हे प्रशासकीय आहे, मात्र समाजमाध्यमांतून प्रसारित झालेली कागदपत्रे घेऊन न्यायालयात याचिका दाखल केली आहे”, असे म्हटले. तसेच सदरचे प्रकरण दाखल करताना पक्षकाराने कोणताही अभ्यास किंवा कागदपत्रांचे संशोधन केलेले नाही, असे अभिप्राय नोंदवले. याचसोबत, “विभागाच्या मंत्र्यांना प्रतिवादी का केले?” असा प्रश्नही केला. सदर याचिकेचे कामकाज चालू ठेवण्यासाठी २० लाख रुपये भरावे किंवा याचिका मागे घ्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आणि यासाठी १५ मिनिटांचा कालावधी दिला होता. त्यावर पक्षकाराने याचिका मागे घेत असल्याचे न्यायालयासमोर सांगितले. कार्यालय स्थलांतर करण्याचा महामंडळाचा निर्णय असून, राज्यातील नदीजोड प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी तसेच जलसंपदा विभागाच्या योजनांच्या व निर्णयांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी घेतलेला हा धोरणात्मक निर्णय असल्याचे निरीक्षण न्यायालयाने याचिका फेटाळताना नोंदवले. राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ जी. पी. गिरासे, गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या वतीने सीनियर कौन्सिल विनायक होन आणि विधिज्ञ सुभाष तांबे यांनी बाजू मांडली. महामंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी १ जूनपासून सुरू झाली आहे. अनेक वरिष्ठ अधिकारी त्यांच्या नेमणुकीच्या कार्यालयांत हजर झाले. मात्र, तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनांच्या वतीने विभागाच्या निर्णयाविरोधात आंदोलने सुरू करण्यात आली होती. आजच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे आता सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणी हजर होणे क्रमप्राप्त होणार आहे. अंबादास दानवेंनी व्यक्त केला संताप गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयांची झालेली फेरफेक म्हणजे निव्वळ ‘तुघलकी कारभार’! नांदेडचं ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाशी संबंधित कार्यालय थेट अहिल्यानगरच्या लोणीला हलवणं हा कोणता भूगोल? असा सवाल अंबादास दानवे यांनी केला. तसेच सरकारने हे नकाशे नक्की कोणत्या शतकातले पाहून निर्णय घेतलेत? मराठवाड्याला मनस्ताप देणारा हा निर्णय त्वरित मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जा! असा इशारा देखील दानवे यांनी दिला.

Radhakrishnan Vikhe Patil: शासकीय कार्यालये लोणीकडे स्थलांतर करण्याचा निर्णय अन् मंत्री विखेंविरोधात कर्मचाऱ्यांचा नाराजीचा सूर Read More »

election

Pathardi News : ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत 19 जागांसाठी 25 अर्ज दाखल

Pathardi News : वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत १९ संचालक पदांच्या जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेच्या एक दिवस अगोदरपर्यंत २५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २ जून आहे. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष तथा माजी आमदार आप्पासाहेब राजळे, उपाध्यक्ष रामकिसन काकडे यांच्यासह विद्यमान संचालक मंडळातील आमदार मोनिका राजळे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, उद्धव वाघ, सुभाष ताठे, श्रीकांत मिसाळ, रावसाहेब सातपुते, अनिल फलके, बाबासाहेब किलबिले, सुभाष बुधवंत, शरद अकोलकर, यशवंतराव गवळी, कुशिनाथ बर्डे, सिंधुबाई जायभाये तसेच स्वीकृत संचालक नारायण काकडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय संचालक मंडळात नव्याने प्रवेश करण्यासाठी प्रदीप पाटील, संदीप लोखंडे आणि बापूसाहेब पाटेकर यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरत उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. माजी आमदार आप्पासाहेब राजळे, राहुल राजळे, सुभाष ताठे, बापूसाहेब पाटेकर या चार उमेदवारांनी वेगवेगळ्या मतदारसंघांतून प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहेत. तर आमदार मोनिका राजळे वेगवेगळ्या मतदार संघातून तीन अर्ज दाखल केले आहे. आहे. १९ व्यक्तींनी २५ अर्ज दाखल केले आहे. दरम्यान, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नसल्याने या जागेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मंगळवारी (२ जून) अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवस अखेर आलेले अर्ज व त्यानंतर अंतिम छाननी आणि अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २६ मे ते २ जून या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहेत. नामनिर्देशन पत्रांची छाननी ३ जून रोजी होणार असून अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १८ जूनपर्यंत आहे. अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून चिन्हांचे वाटप १९ जून रोजी करण्यात येणार आहे. आवश्यक असल्यास २६ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल, तर २७ जून रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया तहसील कार्यालय, पाथर्डी येथे नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली पार पडणार आहे. अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आज (मंगळवारी) असल्याने उमेदवारी अर्जाच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Pathardi News : ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत 19 जागांसाठी 25 अर्ज दाखल Read More »