DNA मराठी

राजकीय

bala nandgaonkar

Bala Nandgaonkar : राजकारणातील पक्षांतर जनतेला मान्य नाही; बाळा नांदगावकरांचे वक्तव्य

Bala Nandgaonkar : राजकारणातील पक्षांतर जनतेला मान्य नाही असे वक्तव्य मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. माध्यमांशी बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले की, देशाच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, ते सामान्य माणसांना आवडणारे नाही. पश्चिम बंगालमध्येही तेच झाले, महाराष्ट्रातही तसेच झाले. आम आदमी पक्षामध्येही असे प्रकार झाले. लोकांनी ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिले, ज्या पक्षाकडे पाहून मतदान केले, त्या मतांचा सन्मान राखला जात नाही. त्यामुळे हा लोकांचाही अपमान आहे.दुर्दैवाने राजकारणाबाबत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की जाणारे आहेत म्हणून घेणारे तयार आहेत.त्यामुळे पक्ष सोडून जाणाऱ्या मंडळींनीही स्वतः विचार केला पाहिजे की आपण काय करत आहोत. शेवटी जनता सर्व काही पाहत असते.-लोकांचा ईव्हीएम मशीनवरील विश्वास उडत चालला आहे.-त्यामुळे जाणाऱ्यांनाही असे वाटते की ईव्हीएम असल्यामुळे काही अडचण नाही. लोकांच्या मतांचा सन्मान राखला जात नाही. त्यामुळे आम्ही सरकारलाही आणि विरोधी पक्षांनाही बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.-विरोधी पक्षांनाही आम्ही सांगितले होते की, जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकावा. सरकारला जर एवढा आत्मविश्वास असेल की जनता आमच्या विचारधारेला आणि कामांना मतदान करते, तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यास काय अडचण आहे? त्यामुळे लोकांच्या मनातील शंका दूर होतील असं बाळा नांदगावकर म्हणाले. NDA ची ताकद वाढवण्यासाठी भाजपचे प्रयत्न तर एनडीएवर बोलताना जर एखादा नेता पक्षात येणार असेल, तर त्याच्यासोबत त्याच्या विचारांचे लोकही येणारच. त्याला कोणतेही नाव दिले तरी त्याचा फारसा अर्थ नाही.1967 मध्ये हरियाणामध्ये ‘आयाराम-गयाराम’ संस्कृतीचा जन्म झाला होता.तेथील एका आमदाराने अवघ्या नऊ तासांत तीन पक्ष बदलले होते.त्यानंतर पक्षांतरबंदीचा कायदा आला. मात्र त्यावरील वाद आणि निर्णय आजही सुरू आहेत.कायदा असला तरी त्याचे पालन होत नाही. न्यायालय तातडीने निर्णय देत नाही आणि अध्यक्षांकडे गेल्यानंतरही निर्णय होण्यास वेळ लागतो.त्यामुळे या सर्व बाबींचा काही जणांकडून फायदा घेतला जात आहे असं बाळा नांदगावकर म्हणाले.

Bala Nandgaonkar : राजकारणातील पक्षांतर जनतेला मान्य नाही; बाळा नांदगावकरांचे वक्तव्य Read More »

eknath shinde

Eknath Shinde : नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीची ताकद प्रदर्शन; नगरसेवकांच्या भेटीसाठी भिवंडीत एकनाथ शिंदे

Eknath Shinde : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या समर्थनार्थ नाशिक जिल्ह्यातील बहुतांश नगरसेवकांना भिवंडी तालुक्यातील अंजूर येथील साया गार्डन रिसॉर्टमध्ये मुक्कामासाठी ठेवण्यात आले होते. मतदानावेळी कोणताही दगाफटका होऊ नये आणि सर्व नगरसेवक एकत्र राहावेत यासाठी ही खबरदारी घेण्यात आली होती. मतदानाच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन यांनी रिसॉर्टमध्ये जाऊन नगरसेवकांची भेट घेतली. यावेळी मतदान प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नाशिकसह सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला. यावेळी मंत्री गिरीश महाजन, रवींद्र फाटक यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन नाशिककडे रवाना झाले. तर नगरसेवकही उत्साहाच्या वातावरणात बसमधून नाशिकच्या दिशेने रवाना झाले.

Eknath Shinde : नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीची ताकद प्रदर्शन; नगरसेवकांच्या भेटीसाठी भिवंडीत एकनाथ शिंदे Read More »

maharashtra government

Maharashtra Government: सामान्य प्रशासन विभागाचे विभाजनमाहिती व जनसंपर्क, राजशिष्टाचार दोन स्वतंत्र विभाग

Maharashtra Government: सामान्य प्रशासन विभागातून माहिती व जनसंपर्क आणि राजशिष्टाचार असे दोन स्वतंत्र विभाग नव्याने निर्माण करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. गत मंत्रिमंडळ बैठकीचे इतिवृत्त कायम करताना हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता राज्याच्या ३३ प्रशासकीय विभागांच्या विभाजन- समावेशनानंतर आता स्वतंत्र असे ४६ विभाग अस्तित्वात येणार आहेत. सध्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय सामान्य प्रशासन विभागातंर्गत कार्यरत आहे. राज्य शासनाच्या प्रचार, प्रसिद्ध आणि जनसंपर्कासाठी कार्यरत या महासंचालनालयाची सात विभागीय कार्यालये आहेत. शिवाय उपराजधानी नागपूर येथे संचालक कार्यालय देखील आहे. देशाच्या राजधानीत नवी दिल्ली येथे, तसेच गोवा राज्यात पणजी येथे महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माध्यमातून देखील शासनाच्या जनसंपर्काचे काम केले जाते. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा माहिती कार्यालयांच्या माध्यमातून शासनाच्या योजना व विकास कामांसह, लोकोपयोगी उपक्रमांसाठी जाणीव जागृतीसह, प्रसिद्धीचे कामकाज चालते. महासंचालनालय मुख्यालय तसेच या सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून आपत्त्कालिन परिस्थिती, ते सण – उत्सव आणि तातडीच्या परिस्थितीत शासकीय – प्रशासकीय यंत्रणेसह, माध्यम आणि नागरिकांसाठी संपर्क – संवादासाठी कार्यरत असते. स्वतंत्र विभाग निर्मितीमुळे निर्णय प्रक्रीयेत आणि कामकाजात गतीमानता येणार आहे. मुंबईतील मंत्रालयांतील विविध विभागांच्या कामकाजात सुसूत्रता यावी दृष्टीने गत मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय विभागांच्या पुनर्रचनेच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार ३३ विभागांची पुनर्रचना करून, ४५ विभाग करण्यास मान्यता देण्यात आली होती. आता त्यांची संख्या ४६ झाली आहे. या विभागांच्या पुनर्रचना आणि विभाजन- समावेशनामुळे एकंदर कामकाजात सुसूत्रता येणार आहे. तसेच निर्णय प्रक्रीया गतीने राबविता येणे शक्य होणार आहे. सुधारित निर्णयानुसार अस्तित्वात असलेल्या विभागांचे विभाजन करून, निर्माण होणारे नवीन विभाग पुढीलप्रमाणे – कृषि व पदुम विभागाचे विभाजन करुन कृषि विभाग आणि पदुम विभाग असे दोन स्वतंत्र विभाग. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे विभाजन स्वतंत्र सहकार विभाग, पणन विभाग आणि वस्त्रोद्योग विभाग असे तीन स्वतंत्र विभाग. सामान्य प्रशासन विभागातून राजशिष्टाचार व माहिती व जनसंपर्क हे दोन उप विभाग वेगळे करुन राजशिष्टाचार विभाग व माहिती व जनसंपर्क विभाग असे दोन स्वतंत्र विभाग. गृह विभागातून स्वतंत्र परिवहन विभाग. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाचे विभाजन करुन उद्योग व खनिकर्म विभाग, ऊर्जा विभाग आणि कामगार विभाग असे तीन स्वतंत्र विभाग. महसूल व वन विभागाचे विभाजन करुन महसूल विभाग, मदत व पुनर्वसन विभाग आणि वन विभाग असे तीन स्वतंत्र विभाग. पूर्वी “भूसंपादन” हा विषय वन विभागाकडे होता. आता तो महसूल विभागाकडे राहील. तद्वतच “नोंदणी व मुद्रांक शुल्क” हा विषय पूर्वीप्रमाणे महसूल विभागाकडेच राहील. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे विभाजन करुन शालेय शिक्षण विभाग आणि क्रीडा विभाग असे दोन स्वतंत्र विभाग. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे विभाजन करुन सांस्कृतिक कार्य विभाग आणि पर्यटन विभागा असे दोन स्वतंत्र विभाग. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे विभाजन करुन स्वतंत्र अन्न व औषध प्रशासन विभाग. तसेच नियोजन विभागातून रोजगार हमी योजना विभाग वगळून त्याचा समावेश मृद व जलसंधारण विभागामध्ये करण्यात येणार.

Maharashtra Government: सामान्य प्रशासन विभागाचे विभाजनमाहिती व जनसंपर्क, राजशिष्टाचार दोन स्वतंत्र विभाग Read More »

मोठी बातमी; 22 जूनपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन; ‘या’ दिवशी होणार शेवट

Maharashtra Assembly Session: राज्याचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. विधानभवन येथे आयोजित विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाचे नियोजन आणि कार्यक्रमाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह आमदार सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर, नाना पटोले, जयंत पाटील, डॉ. नीलम गोऱ्हे, अनिल परब, प्रसाद लाड, हेमंत पाटील, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सतेज पाटील, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या अधिवेशनात विरोधक वाढत्या महागाईवरून, राज्यातील कायदा सुव्यवस्था, गुन्हेगारी, महिला सुरक्षा आणि इतर मुद्यांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याचे चिन्हे आहे.

मोठी बातमी; 22 जूनपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन; ‘या’ दिवशी होणार शेवट Read More »

Pune News: पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांचा तिढा अखेर सुटला

Pune News : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील भाजपच्या स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा अनेक दिवसांपासून सुरू असलेला तिढा अखेर सुटला आहे. प्रदेश नेतृत्वाने सात स्वीकृत नगरसदस्यांची यादी अंतिम केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. आज (दि. १५ जून) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत (GB) या नियुक्त्यांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. भाजपकडून युवा चेहरा गिरीश देशमुख, माजी महापौर उषा संजोग वाघेरे, माजी नगरसेविका सुजाता पालांडे, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, रावेत येथील दीपक भोंडवे, माजी नगरसेविका विनया तापकीर आणि सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग साने यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते. दरम्यान, भाजपची यादी अंतिम झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्वीकृत सदस्य नियुक्तीचाही मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रवादीकडून माजी नगरसेविका सीमा सावळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप आणि पक्षाचे प्रवक्ते फझल शेख यांच्या नावांचा प्रस्ताव प्रलंबित होता. गेल्या काही महिन्यांपासून स्वीकृत सदस्य नियुक्तीचा विषय अनेकदा महासभेत तहकूब करण्यात आला होता. मात्र, भाजपकडील अंतर्गत चर्चा आणि प्रदेश नेतृत्वाच्या अंतिम निर्णयानंतर आता या नियुक्ती प्रक्रियेला गती मिळाली असून उद्याच्या महासभेत सर्व प्रस्तावांना मंजुरी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिकेतील स्वीकृत सदस्य नियुक्तीच्या या प्रक्रियेमुळे आगामी राजकीय समीकरणांनाही वेग येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Pune News: पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांचा तिढा अखेर सुटला Read More »

img 20260614 wa0003

Ram Shinde: लेखी गहिवरल्या… जावई भारावले…

चौंडीचे धोंडे जेवण सभापती प्रा. शिंदेयांना देऊन गेले भरभरून कौतुक Ram Shinde : आई-वडील, भाऊ व जुन्या मैत्रिणी भेटल्याने लेकी खूष होत्या…यानिमित्ताने सर्वांशी सुख-दुःखाचा संवाद झाल्याने त्या गहिवरल्या तर, आख्या गावाने आपला सन्मान केल्याच्या आनंदाने जावई भारावले…ठिकाण होते- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी व निमित्त होते- अधिक मासानिमित्त विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आयोजित केलेल्या धोंडे जेवण सोहळ्याचे. एखाद्या गावाने गावच्या लेक-जावयांसाठी धोंडे जेवणाचा सोहळा आयोजित करण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असल्याने तिचे आयोजन करणारे सभापती प्रा. शिंदे राज्यभरातील 700 वर लेक-जावयांकडून कौतुक मिळवून गेले. आमच्या आयुष्यातील हा अविस्मरणीय सोहळा ठरला असे गौरवोद्गारही व्यक्त करून गेले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301 वी जयंती व अधिक मास यानिमित्त सभापती प्रा. शिंदे यांच्या पुढाकाराने चोंडी ग्रामस्थांनी लेक-जावयांचा सन्मान सोहळा आज रविवारी (14 जून) आयोजित केला होता. कर्जत-जामखेड व अहिल्यानगर शहर व जिल्ह्यातून तसेच पुणे, बारामती, करमाळा, मुंबई अशा अनेक ठिकाणाहून सर्व जाती धर्माचे लेक- जावई आले होते. 700 वर जावई, तेवढ्याच लेकी, त्यांची मुले-मुली व अन्य कुटुंबिय मिळून साडेतीन ते चार हजार जणांचे अनोखे गेट-टुगेदर या निमित्ताने रंगले. या सर्वांसाठी तब्बल 100 किलो पुरण, त्याच्या पोळ्या, पुरणाचा धोंडा, त्यावर साजूक तूप समवेत दूध गुळवणी, कटाची आमटी, भात, भजी, पापड, कुरडई असा जेवणाचा मेनू होता. गावातील महिलांनी यापैकी बहुतांश पुरणपोळ्या लाटल्या. तृप्तीचा ढेकर देत नंतर सर्वांनी आवर्जून प्रा. शिंदे यांची भेट घेऊन त्यांचे मनापासून कौतुक केले. जंगी निघाली मिरवणूक या अनोख्या सोहळ्यासाठी आलेल्या जावयांना फेटा बांधून व त्यांच्या कपाळी गंधाक्षता लावून औक्षण करण्यात आले. सभापती प्रा. शिंदे यांच्या पत्नी व जामखेड पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. आशाताई शिंदे यांच्यासह गावातील महिलांनी जावई मंडळींचे स्वागत केले. त्यानंतर त्यांची अहिल्यादेवी यांनी स्थापन केलेल्या अहिल्येश्वर महादेव मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. वैजापूर येथील प्रसिद्ध चौऊश ब्रॉस बँड पथकाने सादर केलेल्या जुन्या-नव्या गाण्यांच्या मेजवानीत व फटाक्यांच्या आतषबाजीत निघालेल्या या मिरवणुकीत लेकीबाळींच्या फुगड्या रंगल्या. ब्रँड पथकाद्वारे लाडाचा जावई आला सासरला, परदेशीया ये सच है पिया, नवरी नटली, राम जी की निकली सवारी, झिंग झिंग झिंगाट अशा गाण्यांसह शिवछत्रपतींचा पोवाडा व महाराष्ट्र गीतांचे सादरीकरण दाद मिळवून गेले. यावेळी काही जावयांनी आपल्या मंडळीला (पत्नी) उचलून घेत नृत्योत्सव रंगवला. महादेव मंदिर परिसरात व पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारक परिसरात सर्वांचे एकत्रित छायाचित्र घेतले गेले. यावेळी व्हिडिओ रेकॉर्डिंग, रील, सेल्फी असे फोटोसेशनही रंगले. महिलांचे डोळे पाणावले यानिमित्त झालेल्या सन्मान सोहळ्यात बोलताना अनेक महिलांचे डोळे पाणावले. आम्ही अहिल्यादेवींच्या माहेर गावच्या लेकी असल्याचे सासरी अभिमानाने सांगतो, तो आमचा अभिमान आज लाडका भाऊ रामभाऊ यांच्यामुळे द्विगुणीत झाला. जुन्या मैत्रिणी भेटल्या, त्यांच्याशी गप्पा झाल्या, अधिक मासानिमित्त आईला भेटून तिची ओटी भरता आली आणि गावाने आमच्या ह्यांचा (पती) केलेला सन्मान आमचा आनंद वाढवून गेला, अशा भावना यावेळी महिलांनी व्यक्त केल्या. लताबाई गावडे-देवकर, उषा लोखंडे, शार्दुल निंबाळकर, सुरेखा उबाळे व अन्य महिलांना बोलताना गहिवरून आले. जावई मंडळीही भारावून गेले होते. त्यांच्यावतीने भावना व्यक्त करताना नाना करंजुले म्हणाले, चौंडीचा दाजी म्हणून आमच्या गावात आम्हाला कौतुक मिळतेच. मात्र आज चौंडीने केलेला सन्मान आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरला. भावाचे कर्तव्य केले : प्रा. शिंदे यावेळी बोलताना सभापती प्रा. शिंदे यांनी गावच्या लेकींचा भाऊ असल्याच्या भावनेतून हा धोंडे सन्मान सोहळा केला असल्याचे सांगितले. गावच्या लेकींनी माहेर व सासरची नाती जपल्याचा आनंद आहे. दोन्ही कुटुंबे सांभाळताना चोंडीचा लौकिक वाढवला आहे. सभापती पदाच्या माध्यमातून सुमारे 5 हजार कोटीची अनेक विकास कामे करून चोंडीचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले त्यांचे जन्मगाव चौंडी हे जगाच्या नकाशावर आगळेवेगळे गाव करण्याचा प्रयत्न आहे. गावच्या लेक-जावयांनी कुटुंबीय व मित्रमंडळींसह नियमितपणे चोंडीला येऊन या गावच्या विकासात सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. या सोहळ्यास गावातील माजी सरपंच व मान्यवर मंडळी उपस्थित होते. अशोक देवकर, अभिमन्यू सोनवणे, पांडुरंग उबाळे, बाबासाहेब सोनवणे, भाऊसाहेब उदमले, शशिकांत देवकर, गुलाब शेख, रवींद्र जगदाळे, सतीश लहामटे, दत्ता शिंदे, शिवाजी देवकर आदींसह गावातील युवकांनी या सोहळ्यासाठी परिश्रम घेतले. जावयांना पसंतीनुसार पॅन्ट शर्ट, पायजमा, धोतर व लेकींनाही पाच वार, सहा वार, नऊवार व काठ पदरी साड्या त्यांच्या पसंतीनुसार भेट म्हणून दिल्या गेल्या. बत्तासे व अनारसे समवेत तांब्याचे दीपदानही अधिक मासानिमित्त दिले गेले. जिल्ह्यात पहिल्यांदाच आयोजित हा वेगळा सोहळा संस्मरणीय ठरला. रेव्ह पार्टी करणाऱ्यांना धोंड्याचे महत्त्व काय? सभापती प्रा. शिंदे यांनी आयोजित केलेल्या धोंडे जेवण सोहळ्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी टीका केली होती. लेक-जावयांना रोजगाराची गरज आहे, धोंडे जेवणाची नाही असे भाष्य त्यांनी केले होते. त्यावर प्रतिउत्तर देताना सभापती प्रा. शिंदे म्हणाले, रेव्ह पार्टी करणाऱ्यांना धोंडे जेवणाचे महत्त्व काय समजणार अशा सूचक शब्दात त्यांनी खडसे यांच्यासह अन्य विरोधकांना टोला लगावला.

Ram Shinde: लेखी गहिवरल्या… जावई भारावले… Read More »

shashikant shinde

Shashikant Shinde : ‘राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विलीनीकरण नाहीच’; शशिकांत शिंदेंनी फेटाळल्या चर्चा

Shashikant Shinde : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा तूणमूल काँग्रेस पराभव झाल्याने आता हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा दोघांनी देशातील राजकारणात सुरू झाली आहे. यासाठी ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांनी लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. राज्यातील राजकारणात देखील अनेक चर्चांना उधाण आले आहे. या चर्चांनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा देखील काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे शरदचंद्र पवार पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पूर्णपणे पूर्णविराम दिला आहे. अशा प्रकारच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नसून पक्ष स्वतंत्रपणे आणि अधिक जोमाने पुढे जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “नुकताच पक्षाचा वर्धापन दिन पार पडला असून, आम्ही आगामी लढ्याची रणनीती आणि धोरणे निश्चित केली आहेत. असे असताना विलीनीकरणाच्या अफवा पसरवणे आश्चर्यकारक आहे.” ‘इंडिया’ आघाडीला बळकट करण्यासाठी आणि देशपातळीवर विरोधकांची मजबूत फळी उभारण्यासाठी स्वतः शरद पवार पुढाकार घेत आहेत. दिल्लीत झालेल्या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाचे प्रतिनिधित्व केले असून, भविष्यात ‘इंडिया’ आघाडीच्या माध्यमातूनच भाजपविरोधात एकत्र येऊन लढणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी ठामपणे सांगितले.

Shashikant Shinde : ‘राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विलीनीकरण नाहीच’; शशिकांत शिंदेंनी फेटाळल्या चर्चा Read More »

omraje nimbalkar

Omraje Nimbalkar : धाराशिवमध्ये ठाकरे गटाची बैठक; खासदार ओमराजे निंबाळकरांची दांडी अन् ऑपरेशन टायगरची चर्चा

Omraje Nimbalkar : एकीकडे राज्यात ऑपरेशन टायगर च्या चर्चा सुरू असून शिवसेना ठाकरे गटाचे अनेक खासदार आणि आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे धाराशिवमध्ये ठाकरे गटाच्या बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अनुपस्थितीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे नेते आमदार अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत धाराशिवमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीला आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी उपस्थित होते. मात्र, खासदार ओमराजे निंबाळकर गैरहजर राहिल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या अनुपस्थितीबाबत विचारले असता अंबादास दानवे यांनीही नेमके कारण माहित नसल्याचे सांगितले. “काही काम असेल म्हणून ते आले नसतील. बैठक तर त्यांच्या कार्यालयातच होत आहे,” असे म्हणत दानवे यांनी परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ठाकरे गटाचे सात खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांदरम्यान ही अनुपस्थिती घडल्याने राजकीय वर्तुळात तिची अधिक चर्चा रंगली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार का? याबाबत आता अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आता काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. सध्या सुरू असणाऱ्या चर्चांमुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.

Omraje Nimbalkar : धाराशिवमध्ये ठाकरे गटाची बैठक; खासदार ओमराजे निंबाळकरांची दांडी अन् ऑपरेशन टायगरची चर्चा Read More »

parvez ashrafi

Parvez Ashrafi : बेलेश्वर मंदिरात विटंबना करणाऱ्या आरोपीचा धर्म न बघता गुन्हा दाखल करा; MIM ची मागणी

Parvez Ashrafi : बेलेश्वर मंदिरात विटंबना करणाऱ्या आरोपीचा धर्म न बघता गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष परवेझ अशरफी यांनी केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भिंगार येथे जातांना बेलेश्वर मंदिर येथे अनेक भाविक दररोज पूजा अर्चना आणि दर्शनासाठी येत असतात. ८ जुन २०२६ रोजी एक तरुण बूट घालून मंदिरात घुसतो आणि महादेवाच्या पिंडावर स्वतःचा बुटा सहीत पाय ठेवतो. साहेब सदर घटना हि खूप निंदणीय असून समस्त भारतीय समाजा तर्फे आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करत आहे. सदर घटनेत जो आरोपी पकडण्यात आला आहे आपण त्याच्यावर जात किंवा त्याचा धर्म न पाहता गुन्हा दाखल करून त्याची सखोल चौकशी करून कारवाई करावी आणि सर्व हकीकत जनते समोर आणावी असे निवेदन एम आय एम तर्फे जिल्हा पोलिस अधिक्षक यांना देण्यात आले आहे. एमआयएम तर्फे शहरात मागील काही दिवसात घडलेल्या घटना, मुस्लिम समाजा विरोधात करण्यात येणारे षडयंत्र असल्याचे एमआयएम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले. डॉ परवेज अशरफी पुढे म्हणाले की देशात काही दंगलखोर संघटन सातत्याने मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचे हेतूने बुरखा घालून काही कृत्य करतांना पोलिसांनी पकडले आहे. अहमदनगर मध्ये देखील मागील काही दिवसापासून मुस्लीम समाजाला बदनाम करण्याच्या हेतूंनी घटना घडवण्यात आले आहे. गंगा उद्यानात बुरखा परिधान करून नमाज पठन करने आणि आता बेलेश्वर मंदिरात महादेवाची विटंबना करने हे सर्व प्रकार कुठेतरी एक मेकांशी जुडले असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. काही जातीवादी दंगलखोर संघटना नगर शहर आणि जिल्ह्याचा वातावरण खराब करून शांतता भंग करण्याच्या उद्देशाने कट रचत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. काही संघटना विटंबना ही मुस्लीम समाजाच्या लोकांनी केली असल्याचे चित्र तयार करत आहे. पोलिसांनी आरोपीचा नाव आणि त्याची जात धर्म जनते समोर आणावी जेणेकरून अशा घाणेरडा कृत्य करणारयाचा मुस्लिम समाजाशी काही संबंध नाही. ज्या मुळे मुस्लीम समाजाची होणारी बदनामी थांबेल. पोलिसांनी पकडलेल्या आरोपी मागचा सूत्रधार शोधणे शहरत आणि जिल्ह्यात शांतते साठी खूप गरजेचे आहे. पोलिसांनी या तिन्ही घटनेची सखोल चौकशी केल्यास केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे निदर्शनास येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. बेलेश्वर मंदिर घटनेत अद्याप कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेले नसल्याने गुन्हा दाखल न करण्याचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलिस प्रशासन या घटनेकडे कसे बघतात व वागतात याकडे जनतेचे लक्ष लागले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Parvez Ashrafi : बेलेश्वर मंदिरात विटंबना करणाऱ्या आरोपीचा धर्म न बघता गुन्हा दाखल करा; MIM ची मागणी Read More »

Maharashtra Onion Price: सरकारी कांदा खरेदीत पुन्हा घोटाळा होण्याची शक्यता

Maharashtra Onion Price: येणाऱ्या काळात कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा कांद्याचे भाव नियंत्रित करण्यासाठी सरकार खरेदी करत असलेल्या कांदा खरेदीत पुन्हा मोठा घोटाळा होण्याची शक्यता आहे म्हणून सरकारने कांदा खरेदीची पद्धत बदलावी किंवा कांदा खरेदीच रद्द करावी असे निवेदन, स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी केंद्र शासनाला पाठवले आहे. सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्यात कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन, ते नियंत्रित करण्यासाठी सरकारने मूल्य स्थिरीकरण निधी योजने अंतर्गत नाशिक जिल्ह्यात दोन लाख टन कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. १५८०/- रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करण्यात येणार आहे. खरेदीत होणारा भ्रष्टाचार टाळण्यासाठी थेट बाजार समितीत कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार ८ जून पासून कांदा खरेदीस सुरुवात झाली आहे मात्र प्रत्यक्षात कांदा खरेदी होत नाही असे चित्र आहे. सरकारने कांदा खरेदी बाजार समितीतच व्हावी असा निर्णय घेतला असला तरी नाफेड किंवा खरेदी करणारी एजन्सी फक्त बाजार समितीत आपले खरेदी केंद्र सुरू करेल, प्रत्यक्ष लिलावात भाग घेणार नाही. नोंदणी केलेले शेतकरी त्या गाळ्यावर आपला माल घालतील नंतर त्या कांद्याची छाटणी व प्रतवारी करून नाफेडच्या निकषात बसणारा कांदा स्वीकारला जाईल व नाकारलेला कांदा शेतकऱ्याने परत घेऊन जायचा आहे. स्वीकारलेल्या कांद्याला जास्तीत जास्त १५८०/- रु क्विंटल प्रमाणे दर देण्यात येईल. ही सर्व प्रक्रिया अत्यंत किचकट आहे, त्यापेक्षा नाफेडने थेट लिलावात बोली बोलून कांदा खरेदी करावा व नंतर शेतकऱ्याची नोंदणी करून प्रतवारी करावी आणि शेतकऱ्याला पेमेंट करावे. ही सर्व प्रक्रिय सी सी टी व्ही च्या निगरणित व्हावी. सध्याच्या खरेदी प्रक्रियेत मोठा घोटाळा होऊ शकतो. मंगळवार दिनांक ९ जून रोजी केंद्रीय वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून कांद्याच्या साठ्याची माहिती घेतली असता ४५.२६ टन कांदा साठा असल्याचे सांगण्यात आले मात्र त्या दिवशी कुठेही, कोणत्याही बाजार समितीत कांदा खरेदी झालेली नव्हती मग हा कांदा आला कोठून? घोटाळा करण्यात सराईत असलेले व्यापारी, स्वस्तात खरेदी केलेला कांदा नफेडला १५८० रु दराने सरकारला देण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी सर्व बाजार समित्यांमध्ये नाफेडसाठी खरेदी केलेल्या कांद्याची माहिती व वखार महामंडळाकडे जमा झालेल्या साठ्याची माहिती प्रसिद्ध करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. खरेदी करणारी संस्था व नाफेड यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी, प्रत्येक बाजार समितीत, सहकार निबंधक कार्यालय, महसूल विभाग, कृषी विभाग, पणन विभागाचे व बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित ठेवले जाणार आहेत. शासनाला या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा खर्च करावा लागणार आहे. इतके करून ही घोटाळा होणारच आहे. ज्या गुणवत्तेचा कांदा नफेडला अपेक्षित आहे त्या कांद्याला आताच १५८०/रू पेक्षा जास्त दर मिळत आहे. खरी गरज आहे ती कमी गुणवत्तेच्या कांद्याला दर देण्याची. ते जर सरकार करू शकत असेल तर सरकारने कांदा खरेदी करावी अन्यथा सरकारी कांदा खरेदी बंद करावी अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, अनिल घनवट यांनी ग्राहक व्यवहार मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडे केली आहे.

Maharashtra Onion Price: सरकारी कांदा खरेदीत पुन्हा घोटाळा होण्याची शक्यता Read More »