DNA मराठी

राजकीय

dilip walse patil

Dilip Walse Patil : कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकार सकारात्मक; दिलीप वळसे पाटील

Dilip Walse Patil :राज्यात सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, त्यांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत, राज्याचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी आंदोलक आणि शेतकऱ्यांना जाहीर चर्चेचे खुले आमंत्रण दिले आहे. सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असून, सुधारणांसाठी आंदोलकांशी चर्चा करण्याची आपली पूर्ण तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आंदोलन संपवून आंदोलक आपल्याकडे आले, तर त्यांचे आदरातिथ्य करायला आपल्याला नक्कीच आवडेल, असे सांगत वळसे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांमध्ये योग्य त्या सुधारणा नक्कीच करता येऊ शकतात, असा विश्वास व्यक्त केला. अगदी त्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी बोलावले, तरीही मनात कोणताही पूर्वग्रह न ठेवता शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला तिथे येण्यास आपण तयार असल्याचे सांगत, या प्रयत्नांमध्ये आपला कोणताही स्वार्थ नसून शेतकऱ्यांचे हित हाच एकमेव उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कांदा उत्पादक आणि साखर उद्योगाच्या अडचणींवर केंद्र पातळीवरून वेगाने हालचाली सुरू असल्याची महत्त्वपूर्ण माहिती देताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी, गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तामामा भरणे, पणन मंत्री जयकुमार रावल, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासह केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान आणि पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित होते. या बैठकीत छगन भुजबळ, दादा भुसे, जयकुमार रावल आणि स्वतः दिलीप वळसे पाटील यांनी कांदा प्रश्ना संदर्भातील सद्यस्थिती आणि दाहकता केंद्राच्या निदर्शनास आणून दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या संपूर्ण विषयावर अत्यंत गांभीर्याने लक्ष दिले असून, येत्या पुढील १० दिवसांत या संदर्भात योग्य तो सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन राज्य सरकारला दिले आहे. या आश्वासनाच्या अनुषंगाने आपण स्वतः केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयाशी सातत्याने संपर्क ठेवून असून, या संपूर्ण प्रक्रियेचा नियमित पाठपुरावा घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.कांदा उत्पादकांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार यांची भेट घेणार असल्याची घोषणाही दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी केली. या आगामी भेटीदरम्यान, वळसे पाटील हे शरद पवार यांना दिल्लीतील उच्चस्तरीय बैठकीतील सविस्तर चर्चेची माहिती देणार असून, केंद्र सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आणि तातडीने दिलासा मिळावा, यासाठी पवार साहेबांनी देखील त्यांच्या पातळीवर केंद्र सरकारकडे वजन वापरावे आणि हा विषय लावून धरावा, अशी विनंती ते या भेटीत करणार आहेत. हवामान खात्याच्या अंदाजाचा दाखला देत दिलीप वळसे पाटील यांनी आगामी काळातील नैसर्गिक व आर्थिक आव्हानांकडेही लक्ष वेधले. येत्या वर्षात ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पावसाची संभाव्यता कमी असून साधारणतः ९० टक्केच पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, शेतकरी बांधवांनी ऊस, कांदा किंवा इतर नगदी पिकांचे नियोजन करताना या सर्व हवामान बदलांचा अत्यंत गांभीर्याने विचार केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. यासोबतच आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या जागतिक युद्धाचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर होत असून यामुळे महागाई आणि आर्थिक मंदीचे सावट निर्माण होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. मात्र, जेव्हा जेव्हा देशात आर्थिक मंदी येते, तेव्हा कृषी क्षेत्रच देशाच्या आर्थिक विकासाला खरा हातभार लावून देशाला सावरू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेवटी बोलताना, शेतकरी राजा स्वतः परिस्थिती जाणत असल्याने त्याला सल्ला देण्याची गरज नाही, परंतु शेतकरी हितासाठी केंद्र आणि राज्य सरकारने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांच्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आणि प्रयत्नशील आहोत, असे सांगत आंदोलकांनी सकारात्मक चर्चेचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन वळसे पाटील यांनी केले.

Dilip Walse Patil : कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकार सकारात्मक; दिलीप वळसे पाटील Read More »

Maharashtra Reservation: मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसदारांना मिळणार नोकरी

Maharashtra Reservation: मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसदारांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) मध्ये नोकरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने घेतला आहे. अंतरवाली सराटी येथील आंदोलनादरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता या निर्णयातून झाली असल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मराठा आरक्षण आणि इतर विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये मृत आंदोलकांच्या वारसदारांना नोकरी देण्याच्या मागणीचाही समावेश होता. या मागणीसंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने तातडीने शासन आदेश जारी करून मराठा आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांची पडताळणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी उपोषण सोडताना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मृत आंदोलकांच्या वारसदारांना एमआयडीसीमध्ये नोकरी देण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. यापूर्वी मृत आंदोलकांच्या वारसदारांना परिवहन महामंडळात समाविष्ट करून घेण्याचे ठरले होते. मात्र, काही वारसदारांची अपेक्षा एमआयडीसी किंवा महावितरण कंपनीमध्ये नोकरी मिळावी अशी होती. त्यानुसार एमआयडीसीमध्ये मृत व्यक्तींच्या वारसदारांना समाविष्ट करून घेण्याची प्रशासकीय कार्यवाही वेगाने पूर्ण करण्यात आली असून, एमआयडीसीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एमआयडीसीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानंतर सामान्य प्रशासन विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून मृत आंदोलकांच्या पात्र वारसदारांची पडताळणी करून त्यांना तातडीने प्रमाणपत्र देण्याच्या सूचना दिल्या आहेत. अचूक आणि योग्य शहानिशा करून प्रमाणपत्र निर्गमित करण्याची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी, असे निर्देशही देण्यात आल्याची माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली. “अंतरवाली सराटी येथील आंदोलनादरम्यान संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार करत आहे. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत महायुती सरकार संवेदनशील असून यापूर्वीही सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. भविष्यातही समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.

Maharashtra Reservation: मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसदारांना मिळणार नोकरी Read More »

Radhakrishnan Vikhe Patil: शासकीय कार्यालये लोणीकडे स्थलांतर करण्याचा निर्णय अन् मंत्री विखेंविरोधात कर्मचाऱ्यांचा नाराजीचा सूर

Radhakrishnan Vikhe Patil: गोदावरी, मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अनेक कार्यालयांच्या मुख्यालयात बदल करण्याचा आदेश निघाला आहे. गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळाचे कामकाज गतिमान करण्यासाठी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महामंडळाच्या कार्यालयांचे स्थलांतर करून आस्थापनांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अहिल्यानगर पाटबंधारे विभागाचे मुख्यालय आता अहिल्यानगरऐवजी लोणी तर मुळा पाटबंधारे विभागाचे मुख्यालय अहिल्यानगर ऐवजी राहुरी असणार आहे. मात्र या निर्णयाला मोठा विरोध होत आहे परंतु आता कार्यालय स्थलांतर विरोधात दाखल याचिका छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. जलसंपदा विभागातील प्रशासकीय रचना बदलत गोदावरी खोरे महामंडळातील मुख्य अभियंत्याचे कार्यालय छत्रपती संभाजीनगरहून नांदेड येथे हलविण्यात आले आहे. तर नांदेड येथील उर्ध्वपैनगंगा प्रकल्प क्र. १ आणि क्र. ३ ही दोन कार्यालयांचे मुख्यालय थेट अहिल्यानगरमधील लोणी येथे हलविण्यात आले आहेत. उपअभियंत्याचे हे कार्यालय लोणीमध्ये हलिवण्यात कोणते प्रशासकीय हीत आहेत, असा प्रश्न आता विचारला जात आहे. अहिल्यानगर हे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांचा प्रभावक्षेत्र असल्याने हे बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जलसंपदा कार्यालयांच्या स्थलांतराच्या निर्णयावर उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अंतर्गत असलेल्या कार्यालय स्थलांतराच्या निर्णयाविरोधात छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्यात आली असून, जलसंपदा विभागाच्या धोरणात्मक निर्णयावर उच्‍च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून कृष्णा व गोदावरी पाटबंधारे महामंडळाने प्रदेश, मंडळ आणि विभाग स्तरावरील कार्यालयांच्या पुनर्रचनेचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. सिंचन प्रशासन गतिमान आणि लोकाभिमुख व्हावे, तसेच या निर्णयाचा लाभ शेतकरी, नागरिक आणि लोकप्रतिनिधींना व्हावा, हीच यामागची भूमिका होती. सिंचनविषयक कामांसाठी लोकप्रतिनिधी, शेतकरी व नागरिकांना कार्यालये जवळ तसेच धरण लाभक्षेत्रात असावीत, या उद्देशाने महामंडळाच्या २७ मे २०२६ रोजीच्या बैठकीत हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. मात्र, जलसंपदा विभागाच्या निर्णयाविरोधात रौफ नवजा पटेल यांनी संभाजीनगर उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने सदर याचिका खारीज केली आहे. न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान माननीय न्यायालयाने पक्षकाराला “सदरचे काम हे प्रशासकीय आहे, मात्र समाजमाध्यमांतून प्रसारित झालेली कागदपत्रे घेऊन न्यायालयात याचिका दाखल केली आहे”, असे म्हटले. तसेच सदरचे प्रकरण दाखल करताना पक्षकाराने कोणताही अभ्यास किंवा कागदपत्रांचे संशोधन केलेले नाही, असे अभिप्राय नोंदवले. याचसोबत, “विभागाच्या मंत्र्यांना प्रतिवादी का केले?” असा प्रश्नही केला. सदर याचिकेचे कामकाज चालू ठेवण्यासाठी २० लाख रुपये भरावे किंवा याचिका मागे घ्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आणि यासाठी १५ मिनिटांचा कालावधी दिला होता. त्यावर पक्षकाराने याचिका मागे घेत असल्याचे न्यायालयासमोर सांगितले. कार्यालय स्थलांतर करण्याचा महामंडळाचा निर्णय असून, राज्यातील नदीजोड प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी तसेच जलसंपदा विभागाच्या योजनांच्या व निर्णयांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी घेतलेला हा धोरणात्मक निर्णय असल्याचे निरीक्षण न्यायालयाने याचिका फेटाळताना नोंदवले. राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ जी. पी. गिरासे, गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या वतीने सीनियर कौन्सिल विनायक होन आणि विधिज्ञ सुभाष तांबे यांनी बाजू मांडली. महामंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी १ जूनपासून सुरू झाली आहे. अनेक वरिष्ठ अधिकारी त्यांच्या नेमणुकीच्या कार्यालयांत हजर झाले. मात्र, तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनांच्या वतीने विभागाच्या निर्णयाविरोधात आंदोलने सुरू करण्यात आली होती. आजच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे आता सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणी हजर होणे क्रमप्राप्त होणार आहे. अंबादास दानवेंनी व्यक्त केला संताप गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयांची झालेली फेरफेक म्हणजे निव्वळ ‘तुघलकी कारभार’! नांदेडचं ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाशी संबंधित कार्यालय थेट अहिल्यानगरच्या लोणीला हलवणं हा कोणता भूगोल? असा सवाल अंबादास दानवे यांनी केला. तसेच सरकारने हे नकाशे नक्की कोणत्या शतकातले पाहून निर्णय घेतलेत? मराठवाड्याला मनस्ताप देणारा हा निर्णय त्वरित मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जा! असा इशारा देखील दानवे यांनी दिला.

Radhakrishnan Vikhe Patil: शासकीय कार्यालये लोणीकडे स्थलांतर करण्याचा निर्णय अन् मंत्री विखेंविरोधात कर्मचाऱ्यांचा नाराजीचा सूर Read More »

election

Pathardi News : ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत 19 जागांसाठी 25 अर्ज दाखल

Pathardi News : वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत १९ संचालक पदांच्या जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेच्या एक दिवस अगोदरपर्यंत २५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २ जून आहे. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष तथा माजी आमदार आप्पासाहेब राजळे, उपाध्यक्ष रामकिसन काकडे यांच्यासह विद्यमान संचालक मंडळातील आमदार मोनिका राजळे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, उद्धव वाघ, सुभाष ताठे, श्रीकांत मिसाळ, रावसाहेब सातपुते, अनिल फलके, बाबासाहेब किलबिले, सुभाष बुधवंत, शरद अकोलकर, यशवंतराव गवळी, कुशिनाथ बर्डे, सिंधुबाई जायभाये तसेच स्वीकृत संचालक नारायण काकडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय संचालक मंडळात नव्याने प्रवेश करण्यासाठी प्रदीप पाटील, संदीप लोखंडे आणि बापूसाहेब पाटेकर यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरत उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. माजी आमदार आप्पासाहेब राजळे, राहुल राजळे, सुभाष ताठे, बापूसाहेब पाटेकर या चार उमेदवारांनी वेगवेगळ्या मतदारसंघांतून प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहेत. तर आमदार मोनिका राजळे वेगवेगळ्या मतदार संघातून तीन अर्ज दाखल केले आहे. आहे. १९ व्यक्तींनी २५ अर्ज दाखल केले आहे. दरम्यान, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नसल्याने या जागेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मंगळवारी (२ जून) अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवस अखेर आलेले अर्ज व त्यानंतर अंतिम छाननी आणि अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २६ मे ते २ जून या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहेत. नामनिर्देशन पत्रांची छाननी ३ जून रोजी होणार असून अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १८ जूनपर्यंत आहे. अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून चिन्हांचे वाटप १९ जून रोजी करण्यात येणार आहे. आवश्यक असल्यास २६ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल, तर २७ जून रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया तहसील कार्यालय, पाथर्डी येथे नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली पार पडणार आहे. अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आज (मंगळवारी) असल्याने उमेदवारी अर्जाच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Pathardi News : ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत 19 जागांसाठी 25 अर्ज दाखल Read More »

election

Nevasa Election : ‘ज्ञानेश्वर’च्या निवडणुकीसाठी 103 उमेदवारी अर्ज दाखल; आज शेवटचा दिवस

Nevasa Election : नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सातव्या दिवशी सोमवारी (ता. १) ७७ उमेदवारांचे ८१ अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी देविदास घोडेचोर यांनी दिली. २९ मे अखेर एकूण २२ अर्ज दाखल झाले होते. काल अखेर एकूण दाखल उमेदवारी अर्जाची संख्या १०३ झाली आहे. गटनिहाय दाखल अर्ज शेवगाव गट – राम आसराजी लांडे, सिद्धार्थ शिवाजीराव दसपुते, मच्छिंद्र विठ्ठल कुटे, राजेंद्र रावसाहेब ढमढेरे, लक्ष्मण गंगाराम टाकळकर, धनंजय आबासाहेब देशमुख, संतोष शंकरराव पावसे, पंडित रामभाऊ भोसले. शहरटाकळी गट – नरेंद्र मारुतराव घुले (२ अर्ज), कुकाणा गट- गोरक्षनाथ सुखदेव नवले, उध्दव श्रीपती नवले, दत्तात्रय त्रिंबक काळे, बाबासाहेब कुंडलिक गव्हाणे, अशोक जगन्नाथ मंडलिक, सुमनबाई दत्तात्रय काळे, जगन्नाथ रामकृष्ण साबळे, चंदू लक्ष्मण फुलारी, विठ्ठल पांडुरंग अभंग, अमोल विठ्ठल अभंग, भारतराव रामकृष्ण साबळे. अर्जुन बाजीराव नवले (२ अर्ज), विजय ज्ञानदेव भागवत, दादासाहेब नानासाहेब वाबळे, संदीप काकासाहेब देशमुख. नेवासा गट – विक्रम साहेबराव चौधरी, जगदीश बाळासाहेब चौधरी, बाळासाहेब सखाराम साळुंके, अरुण बबनराव देशमुख, दादासाहेब गोरक्षनाथ गंडाळ. वडाळा बहिरोबा गट – भाऊसाहेब सोन्याबापू कांगुणे, अशोक कारभारी काळे, जनार्दन रामभाऊ कदम, प्रसाद जनार्दन पटारे, कोंडीराम मारुती कोलते, झुंबर अंबादास शेळके (२ अर्ज), कारभारी मोहन चेडे, कचरदास धनराज गुंदेचा, अभिषेक जनार्दन पटारे, शिवाजी राजधर कोलते. ढोरजळगाव गट- मच्छिंद्र सूर्यभान म्हस्के, भानुदास नारायण काळे, सदाशिव आबाजी आरगडे, निवृत्ती चिमाजी दातीर, देविदास आसाराम पाटेकर, मंगलाबाई देविदास पाटेकर, रेवणनाथ जगन्नाथ काळे. उत्पादक/बिगर उत्पादक सहकारी संस्था मतदारसंघ – गणेश भानुदास चावरे. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ – भास्कर उत्तम शिंदे, मच्छिंद्र विठ्ठल शिंदे, शंकर संभाजी भारस्कर. महिला राखीव – विजया कल्याणराव म्हस्के, सुमनबाई दत्तात्रय काळे, इंदूबाई बलभीम गव्हाणे, मंगलाबाई देविदास पाटेकर. इतर मागासवर्ग प्रतिनिधी – विजया कल्याणराव म्हस्के, जनार्धन राधाकिसन भागवत, दत्तात्रय त्रिंबक काळे, सिध्दार्थ शिवाजीराव दसपुते, अशोक जगन्नाथ मंडलिक, चंदू लक्ष्मण फुलारी, अमोल विठ्ठल अभंग, विठ्ठल पांडुरंग अभंग, अरुण अशोक गरड, अरुण बबन देशमुख, प्रसाद जनार्धन पटारे, कुसुम दत्तात्रय काळे, अर्जुन बाजीराव नवले, अर्जुन बाजीराव नवले, विजय ज्ञानदेव भागवत, अभिषेक जनार्धन पटारे. विमुक्त जाती – भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी मतदार संघ – रामनाथ गहिनीनाथ गोल्हार, किसन बाबुराव यादव, तुकाराम विनायक मिसाळ, सदाशिव आबाजी आरगडे.

Nevasa Election : ‘ज्ञानेश्वर’च्या निवडणुकीसाठी 103 उमेदवारी अर्ज दाखल; आज शेवटचा दिवस Read More »

rani lanke

Rani Lanke: विधान परिषदेचे बिगुल! राणी लंके विधानपरिषद लढवणार; अर्ज दाखल करणार?

Rani Lanke: महाराष्ट्र विधान परिषद अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने खासदार निलेश लंके यांच्या पत्नी तथा तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके ह्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे उत्तर जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांनी दिली आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राणी लंके या आता विधान परिषदेत आपलं नशीब आजमावत आहे. विधान परिषद निवडणुकीचे बिगल वाजले असून अनेक इच्छुकांकडून जोरदार मोर्चे बांधणी देखील सुरू आहे यातच राष्ट्रवादीच्या असलेल्या या जागेवर भाजपने दावा केला असून राष्ट्रवादीतून भाजपमध्ये नुकत्याच प्रवेश केलेले प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यातच आता महाविकास आघाडी देखील आपले उमेदवार घेऊन या निवडणुकीत सज्ज झाली आहे. ससाने दीप चव्हाणसह लंके विधान परिषदेच्या मैदानात श्रीरामपूर मधून करण ससाने यांच्यासह नुकतेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये काँग्रेसचे नगर शहर अध्यक्ष दीप चव्हाण यांना देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या राणी लंके यादेखील उद्या म्हणजे सोमवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती संदीप वर्पे यांनी दिली. आमदार जगताप यांचे बंधू देखील इच्छुक महायुतीकडून विधान परिषदेची उमेदवारी राष्ट्रवादी मधून नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले प्राजक्त तनपुरे यांना दिले जाणार असल्याचे खात्रीलायक माहिती आहे मात्र राष्ट्रवादीच्या या जागेवरती आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप हे देखील जागा लढवण्यास इच्छुक आहे तसेच त्यांनी अर्ज देखील घेऊन गेले आहेत यामुळे महायुतीमध्ये देखील उमेदवारीवरून धसपूस पाहायला मिळते. अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे तुल्यबळ हे मतदार स्वरूपात जास्त आहे यातच तनपुरे यांच्या बाजीप्रवेशाने तनपुरे यांचा जनसेवा पॅनलचे मत देखील भाजपला मिळणार असून आता आमदार सत्यजित कदम यांच्या संगमनेर सेवा समिती चे नगरसेवक काय भूमिका घेणार तसेच तांबे काय निर्णय घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Rani Lanke: विधान परिषदेचे बिगुल! राणी लंके विधानपरिषद लढवणार; अर्ज दाखल करणार? Read More »

img 20260530 wa0004

Rajesh Tope :  टोपेंची संभाव्य एक्झिट : राष्ट्रवादीसमोरील नवा प्रश्न?

Rajesh Tope : राज्यातील राजकारणात सध्या अनेक घडामोडी वेगाने घडत आहेत. पक्षांतराचे वारे इतके वेगाने वाहत आहेत की कालपर्यंत एखाद्या पक्षाचे निष्ठावंत मानले जाणारे नेते आज दुसऱ्या पक्षाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगताना दिसतात. अशाच चर्चांचा केंद्रबिंदू सध्या माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे ठरले आहेत. ते भारतीय जनता पक्षात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. प्रत्यक्षात ते पक्षांतर करणार की नाही, हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल. मात्र केवळ या चर्चेनेही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे. राजेश टोपे हे केवळ जालना जिल्ह्यापुरते मर्यादित नेते नाहीत. राज्याच्या राजकारणात त्यांनी संयमी, अभ्यासू आणि सर्वपक्षीय संबंध जपणारा नेता म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांची संभाव्य एक्झिट ही केवळ एका नेत्याचे पक्षांतर नसून राष्ट्रवादीच्या नेतृत्वासमोरील संघटनात्मक आव्हान म्हणून पाहावी लागेल. अर्थात, राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीही अनेक मोठे धक्के पचवले आहेत. पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी वेगवेगळ्या टप्प्यांवर पक्षाची साथ सोडली. तरीही शरद पवार यांनी नव्याने संघटना उभी केली, कार्यकर्त्यांना एकत्र ठेवले आणि लोकसभा निवडणुकीत उल्लेखनीय यश मिळवून पक्षाचे अस्तित्व केवळ टिकवलेच नाही, तर त्याला नवी ऊर्जा दिली. त्यामुळे एका नेत्याच्या जाण्याने पक्ष संपुष्टात येईल, असे चित्र निश्चितच नाही. तरीही टोपेंच्या बाबतीत प्रश्न वेगळा आहे. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी पक्षाच्या कामकाजात पूर्वीइतका सक्रिय सहभाग घेतला नाही, अशी चर्चा अनेकदा झाली. त्यांच्या नाराजीची कारणे नेमकी काय आहेत, याबाबत मात्र अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. राजकारणात अफवा आणि वास्तव यामधील अंतर अनेकदा मोठे असते. त्यामुळे अंतिम निर्णय होईपर्यंत संयम राखणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीतील फूट पडण्यापूर्वी आणि नंतरच्या अनेक संवेदनशील घडामोडींमध्ये टोपे यांनी तुलनेने संयमी भूमिका घेतली. अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील मतभेद मिटावेत, दोन्ही बाजू पुन्हा एकत्र याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. त्यामुळे ते पक्षाच्या मुख्य संघर्षांपासून काहीसे दूर राहिले, अशी प्रतिमा निर्माण झाली. जर भविष्यात राजेश टोपे यांनी खरोखरच भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, तर तो शरद पवार गटासाठी नक्कीच मोठा धक्का ठरेल. कारण त्यामागे केवळ एका नेत्याचे जाणे नसून मध्यममार्गी आणि स्वीकारार्ह नेतृत्वाची उणीव निर्माण होण्याचा धोका असेल. दुसरीकडे, अशा प्रसंगी शरद पवार यांचे नेतृत्व पुन्हा एकदा कसोटीवर लागेल. गेल्या काही दशकांतील राजकीय अनुभव पाहता संकटातून मार्ग काढण्याची त्यांची क्षमता अनेकदा सिद्ध झाली आहे. सध्या मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे. राजेश टोपे यांच्याविषयी सुरू असलेल्या चर्चांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षासमोरील अंतर्गत अस्वस्थता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. टोपे जातील की राहतील, याचे उत्तर काळ देईल; परंतु त्यांच्यासारख्या स्वीकारार्ह आणि अनुभवी नेत्याला गमावणे हे शरद पवारांच्या पक्षाला सहज परवडणारे नाही, हे तितकेच खरे.

Rajesh Tope :  टोपेंची संभाव्य एक्झिट : राष्ट्रवादीसमोरील नवा प्रश्न? Read More »

mva

Vidhanparishad Election : विधान परिषदेच्या जागांवर मविआ एकमत, काँग्रेस 8, शिवसेना 4 तर एनसीपी 3 जागांवर लढणार

Vidhanparishad Election: राज्यातील १७ जागांसाठी होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे १७ पैकी १५ जागांवर एकमत झाले असून दोन जागांवरही लवकरच निर्णय होईल. काँग्रेस पक्ष चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव-लातूर-बीड या जागा लढवणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्ष पुणे, ठाणे व सांगली-सातारा या ३ जागा आणि शिवसेना (उबाठा) रायगड, जळगाव, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर या ४ जागा लढवत आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. विधान परिषदेच्या जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (श.प.) कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना (उबाठा) नेते खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे, आमदार मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, माजी आमदार मिलिंद अण्णा कांबळे उपस्थित होते. बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, विधान परिषदेच्या निवडणुकीतही सत्ताधारी पक्षाकडून पैशाचा वापर मोठ्या प्रामणावर सुरु आहे. विरोधकांचे नगरसेवक पळवले जात आहेत, ५-५ लाख रुपये ऍडव्हान्स दिले आहेत. बाप बडा ना भैय्या सबसे बडा रुपय्या’ चा खेळ सुरु आहे. सत्ताधारी मित्रपक्षांमध्येही पळवापळवी सुरु आहे. लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकीचा भाजपा महायुतीने घोडेबाजार बनवला आहे. भाजपा महायुतीच्या दंडेलशाहीविरोधात महाविकास आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उभी आहे. विषारी दारुच्या बळीप्रकरणी पोलिसांना निलंबित करा पुण्यात विषारी दारूने १३ जणांचे बळी घेतले आहेत, घटना झाल्यानंतर कारवाईचे आदेश दिले असले तरी ज्या विभागात ही घटना घडली त्या पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलीस उपायुक्त यांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली असून महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था अत्यंत खालावलेली आहे, गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, असेही सपकाळ म्हणाले. विधान परिषद निवडणुकीसाठी निरीक्षकांची नियुक्ती.. विधान परिषदेच्या १७ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने वरिष्ठ नेत्यांच्या निरीक्षक म्हणून नियुक्त्या केल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर मतदारसंघासाठी खासदार प्रणिती शिंदे, सांगली-सातारासाठी माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, पुणेसाठी विधान परिषदेतील गटनते सतेज ऊर्फ बंटी पाटील, उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगरसाठी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, जळगावसाठी खासदार चंद्रकांत हंडोरे, नाशिकसाठी माजी मंत्री के. सी. पाडवी, मराठवाड्यातील नांदेडसाठी खासदार रविंद्र चव्हाण, धाराशिव-लातूर-बीडसाठी माजी मंत्री आमदार अमित देशमुख, परभणी हिंगोलीसाठी खासदार डॉ. कल्याण काळे, छत्रपती संभाजीनगर-जालनासाठी माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, विदर्भातील यवतमाळसाठी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, भंडारा-गोंदियासाठी माजी प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीसाठी विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, अमरावतीसाठी माजी मंत्री यशोमती ठाकूर, नागपूर पोटनिवडणुकीसाठी माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, कोकण विभागातील ठाणे मतदार संघासाठी माजी मंत्री नसिम खान, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी मुझफ्फर हुसेन यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे.

Vidhanparishad Election : विधान परिषदेच्या जागांवर मविआ एकमत, काँग्रेस 8, शिवसेना 4 तर एनसीपी 3 जागांवर लढणार Read More »

parth pawar

Parth Pawar: पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यात वाद होण्याचा प्रश्नच येत नाही

Parth Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत पार पडलेल्या बैठकीत राज्याचे मंत्री छगन भुजबळ आणि खासदार पार्थ पवार यांच्या वाद झालं असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र ही केवळ चर्चा असून बैठकीत दोघांमध्ये कुठलाही वाद झाला नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील दिली आहे. मंत्री छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांनी माध्यमांमध्ये आलेल्या बातम्याबाबत योग्य तो खुलासा केला आहे. ज्या बातम्या येत आहेत त्या सुत्रांच्या हवाले येत आहेत. एकतर्फी आणि नकारात्मक बातम्या पार्थ पवार किंवा पक्षाबद्दल दिल्या जात आहेत. मात्र दुसरी बाजू माध्यमांनी समजून घेतली पाहिजे अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी माध्यमांसमोर दिल्ली येथे मांडली. गेले तीन दिवस पार्थदादा पवार आणि राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार या दिल्लीत बैठकीला आहेत. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी बैठका घेत आहेत. मात्र अशी कोणतीही चर्चा झाली नसताना बातमी आली आहे असेही उमेश पाटील म्हणाले. प्रत्येक बातमी तुमची सुत्रांकडून येत आहे. कोणतीही पुराव्याची बातमी लावलेली नाही. त्यामुळे सुत्रांकडून आलेल्या बातम्या तुम्ही लावाव्या का असा सवालही उमेश पाटील यांनी उपस्थित केला आहे. पार्थ पवार यांच्याकडे नवीन जबाबदाऱ्या आल्या आहेत त्यामुळे त्यांना त्या नवीन आहेत. सुत्रांच्या हवाले बातम्या येणे योग्य नाही. आम्हाला कोण टार्गेट करतंय असं आम्हाला वाटत नाही. मात्र खात्री किंवा पुरावा असल्याशिवाय बातम्या लावणं चुकीचं आहे असेही उमेश पाटील म्हणाले.

Parth Pawar: पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यात वाद होण्याचा प्रश्नच येत नाही Read More »

vivek kolhe

Vivek Kolhe : संयमाला मर्यादा असते, ‘जब भी घायल होता हूं तब घातक होता हूं’; विवेक कोल्हेंचा विखे-पाटलांना थेट इशारा

Vivek Kolhe :  माझा स्वभाव सकारात्मक राजकारण करण्याचा आहे. दुसऱ्याची रेघ पुसण्यापेक्षा आपली रेघ कशी मोठी करता येईल, यावर माझा विश्वास आहे. मात्र, जाणीवपूर्वक कुणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, तर किती संयम ठेवायचा यालाही एक मर्यादा असते. लक्षात ठेवा, ‘जब भी घायल होता हूं तब घातक होता हूं’,” अशा अत्यंत कडक शब्दांत नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हे यांनी विरोधकांना आणि पर्यायाने पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना जाहीर इशारा दिला आहे. राहाता शहरात आयोजित एका सत्कार समारंभादरम्यान सभेत नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हे हे बोलत होते. सर्वपक्षीय उपस्थिती आणि वाढती ताकद या सभेला मिळाली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेल्या कार्यकर्त्यांसह सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती यावेळी होती या सर्वपक्षीय प्रेमाचा उल्लेख करत विवेक कोल्हे म्हणाले की, “अनेक टीका-टिप्पण्या आणि क्रॉस फायरिंग झाली, पण आज मला केवळ टीका करायची नाही. हा जो वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांचा पाठिंबा मिळतो आहे, हीच माझी खरी ताकद आहे ‘गणेश’ कारखान्यावरून विरोधकांना टोला शेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या ‘गणेश’ कारखान्याच्या मुद्द्यावरून त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “दोन-तीन वर्षांनी पुन्हा निवडणुका येतील, तेव्हा लोकशाही मार्गाने सभासदांसमोर जा आणि मते मागा. पण, आता अशा पद्धतीने कायदेशीर अडथळे आणून शेतकऱ्यांची कामधेनू अडचणीत आणू नका,” अशी नम्र विनंती त्यांनी केली. तसेच जर विरोधक ऐकणार नसतील, तर संस्थेच्या हितासाठी रस्त्यावर उतरून आवाज उठवण्याची आपली तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री यांनी लावला छातीवर बिल्ला: आपल्या आमदारकीचा उल्लेख करताना कोल्हे म्हणाले, “मला आमदारकी रूपी जो सातबारा मिळाला आहे, तो बिल्ला खुद्द मुख्यमंत्री यांनीच माझ्या छातीवर लावला आहे त्यामुळे कुणीही काळजी करण्याची गरज नाही. या सातबाऱ्याच्या पोटहिश्श्यामध्ये तुम्ही सर्वसामान्य नागरिक आणि कार्यकर्तेच आहात असे कोल्हे म्हणाले. आधी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यापुरते मर्यादित असलो, तरी आता आपले कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघ हे आहे. यामध्ये राहता आणि लोणी परिसर आवर्जून येतो, याची मला पूर्ण जाणीव आहे. कामासाठी पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे जाण्याची आपली तयारी आहे, मात्र जाणीवपूर्वक जर कुणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला, तर मी भाऊ आणि सहकारी म्हणून खंबीरपणे पाठीशी उभा राहीन,” असा ठाम विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Vivek Kolhe : संयमाला मर्यादा असते, ‘जब भी घायल होता हूं तब घातक होता हूं’; विवेक कोल्हेंचा विखे-पाटलांना थेट इशारा Read More »