DNA मराठी

राजकीय

sanjay shirsat

Sanjay Shirsat on Uddhav Thackeray : ‘लाज, लज्जा, शरम’ या गोष्टी उद्धव ठाकरेंनी बोलू नये

Sanjay Shirsat on Uddhav Thackeray: ‘लाज, लज्जा, शरम’ या गोष्टी उद्धव ठाकरेंनी बोलू नयेत. अडीच वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी काय केले, हे जनतेने पाहिले आहे अशी टीका संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना केली. ‘तुमसे ना हो पा येगा’ या कार्यक्रमात बोलताना शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याचे तसेच राज्यात दुष्काळ घोषित करण्याची मागणी केली होती. यावर आज माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारने पूर्वतयारी केली आहे. सर्व यंत्रणांनी आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. केंद्राची मदत घेताना त्यासाठी ठराविक तारीख आणि निकष पाळावे लागतात. सरकारला मदत जाहीर करण्यात कोणतीही अडचण नाही. मात्र, ती तात्पुरती मदत ठरेल. केंद्राकडून भरीव मदत मिळाली तर शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल असं संजय शिरसाट म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘लाज, लज्जा, शरम’ या गोष्टी उद्धव ठाकरेंनी बोलू नयेत. अडीच वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी काय केले, हे जनतेने पाहिले आहे. कुठलेही डायलॉग मारू नका. काल आंदोलन केले, त्याला पाठिंबा देण्यासाठी किती लोक आले, हेही पाहिले. आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे सर्व निर्णय घेऊ. तर यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याकडून करण्यात आलेल्या दुष्काळ मागणीवर देखील प्रतिक्रिया दिली. शरद पवार साहेबांनी जी मागणी केली आहे, तीच मागणी गेल्या कॅबिनेट बैठकीत आम्ही सर्व मंत्र्यांनी केली आहे. कॅबिनेटमध्ये यावर सविस्तर चर्चा झाली असून, मुख्यमंत्र्यांनी उपाययोजनांबाबत माहिती दिली आहे. यंत्रणा कामाला लागली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर मराठवाडा आणि विदर्भात भीषण दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. मात्र, सरकार लवकरच दुष्काळ जाहीर करेल, असे वातावरण आहे. सरकार या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहत आहे.

Sanjay Shirsat on Uddhav Thackeray : ‘लाज, लज्जा, शरम’ या गोष्टी उद्धव ठाकरेंनी बोलू नये Read More »

uddhav thackeray

Uddhav Thackeray on Disha Salian : दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; CBI तपासावर ठाकरे कुटुंबाची भूमिका काय?

Uddhav Thackeray on Disha Salian : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) FIR दाखल केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर CBI ने या प्रकरणाचा तपास हाती घेतला असून, त्यानंतर ठाकरे कुटुंबातील नेत्यांची नावे चर्चेत आली आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. दिशा सालियन यांच्या मृत्यूला सहा वर्षांहून अधिक काळ उलटल्यानंतर या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, CBI ने दाखल केलेल्या FIR मध्ये एखाद्या व्यक्तीचे नाव किंवा तिच्या भूमिकेचा तपास करण्याचा उल्लेख असणे म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी ठरली आहे, असा अर्थ होत नाही. मुंबई उच्च न्यायालयानेही तपासादरम्यान पुरेसे साहित्य समोर येईपर्यंत कोणालाही आरोपी मानू नये, असे निर्देश दिले आहेत. सहा वर्षांनंतर प्रकरणाला नवे वळण दिशा सालियन यांचा 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. त्यावेळी मुंबई पोलिसांनी या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून केली होती. मात्र, दिशा यांच्या वडिलांनी या तपासावर प्रश्न उपस्थित करत प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली. यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले. न्यायालयाने 2 सप्टेंबर 2026 रोजी CBI ला या प्रकरणाचा तपास करण्याचे आणि FIR दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार 14 सप्टेंबर रोजी CBI ने FIR दाखल केली. ठाकरे कुटुंबातील नावांमुळे राजकीय चर्चा CBI च्या FIR नंतर दिशा सालियन यांच्या वडिलांच्या जबाबातील काही नावे चर्चेत आली. यामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नावांचाही उल्लेख झाल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर मनोरंजन क्षेत्रातील काही व्यक्तींच्या भूमिकेचीही चौकशी केली जाणार आहे. मात्र, उपलब्ध वृत्तांनुसार CBI च्या FIR मध्ये संबंधित व्यक्तींना थेट आरोपी म्हणून घोषित करण्यात आलेले नाही. त्यांची भूमिका तपासण्याची गरज असल्याच्या अनुषंगाने नावे समोर आली आहेत. त्यामुळे तपास पूर्ण होण्यापूर्वी कोणत्याही व्यक्तीवर दोष निश्चित करणे योग्य ठरणार नाही. आदित्य ठाकरेंनी आरोप फेटाळले दरम्यान, या प्रकरणावर आदित्य ठाकरेंनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी दिशा सालियन यांना आपण कधीही भेटलो नसल्याचे किंवा त्यांच्याशी आपली ओळख नसल्याचे म्हटले आहे. आपले नाव गेल्या सहा वर्षांपासून या प्रकरणाशी जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. हा प्रयत्न राजकीय हेतू, वैयक्तिक द्वेष आणि प्रतिमा खराब करण्याच्या उद्देशाने होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच माध्यमांमधील चर्चांपेक्षा अधिकृत तपासातून सत्य समोर यावे आणि तपासात राजकीय हस्तक्षेप होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष CBI च्या कारवाईनंतर आता उद्धव ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. कारण या प्रकरणातील वडिलांच्या जबाबात तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव आल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा राजकीय परिणामही पाहायला मिळत आहे. दरम्यान, शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना हा अत्यंत संवेदनशील विषय असल्याचे म्हटले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास झाला होता आणि त्या तपासात आदित्य ठाकरे यांचा संबंध नसल्याचे सांगण्यात आले होते. आता CBI कडून नव्याने तपास सुरू झाल्याने या दोन्ही तपासांतील निष्कर्षांची तुलना होणार आहे. दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरण दिशा सालियन या दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या माजी मॅनेजर होत्या. दिशा यांच्या मृत्यूनंतर अवघ्या सहा दिवसांनी, 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूत यांचा मृत्यू झाला होता. दोन्ही घटनांमध्ये काही संबंध असल्याचे दावे गेल्या काही वर्षांत सोशल मीडिया आणि राजकीय चर्चांमध्ये केले गेले. मात्र, अशा दाव्यांना अधिकृत तपासाचा निष्कर्ष मानता येत नाही. CBI च्या नव्या तपासात दिशा यांच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती काय होती, याचा तपास केला जाणार आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग CBI च्या FIR मुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. सत्ताधारी पक्षांकडून जुन्या तपासावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, तर ठाकरे गटाकडून या प्रकरणाचा राजकीय वापर होत असल्याचे आरोप केले जात आहेत. दरम्यान, दिशा सालियन यांच्या कुटुंबीयांनी न्यायालयीन मार्गाने नव्या तपासाची मागणी केली आहे. त्यामुळे एका बाजूला कुटुंबीयांना तपासातून सत्य समोर येण्याची अपेक्षा आहे, तर दुसरीकडे या प्रकरणाचा राजकीय वादही वाढताना दिसत आहे.

Uddhav Thackeray on Disha Salian : दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; CBI तपासावर ठाकरे कुटुंबाची भूमिका काय? Read More »

sunetra pawar

Sunetra Pawar: बीड-पुणे रेल्वेला हिरवा झेंडा; सुनेत्रा पवारांचा भाषण अन् अजितदादांची आठवण

Sunetra Pawar: मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील नागरिकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरला. बीड आणि पुणे यांना थेट रेल्वेसेवेने जोडण्याचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात आले आहे. उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीड-पुणे थेट रेल्वेसेवेचा शुभारंभ करण्यात आला. रेल्वेला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही गाडी बीडहून पुण्याच्या दिशेने रवाना झाली. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर बीडमधून पुण्यासाठी थेट रेल्वे धावल्याने जिल्ह्यातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. यापूर्वी बीड-अहिल्यानगर रेल्वे सुरू झाली होती. आता पुण्याशी थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाल्याने बीडच्या प्रवाशांसाठी आणखी एक महत्त्वाचा पर्याय निर्माण झाला आहे. अजित पवारांच्या शब्दाची सुनेत्रा पवारांनी करून दिली आठवण बीड-पुणे रेल्वेसेवेच्या शुभारंभावेळी सुनेत्रा पवार यांनी दिवंगत अजित पवार यांच्या प्रयत्नांचा विशेष उल्लेख केला. गेल्या वर्षी 17 सप्टेंबर 2025 रोजी बीड-अहिल्यानगर रेल्वेसेवा सुरू झाली होती. त्यावेळी अजित पवार यांनी पुढील वर्षी बीडहून थेट पुण्याला जाता येईल, असा शब्द दिला होता, अशी आठवण सुनेत्रा पवार यांनी सांगितली. गेल्या वर्षी बीड-अहिल्यानगर रेल्वे सुरू झाल्यानंतर आता अगदी एका वर्षाने बीड-पुणे रेल्वे सुरू झाली आहे. त्यामुळे अजित पवारांनी दिलेला शब्द पूर्ण करण्याचे भाग्य आपल्याला मिळाले, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. त्यांनी या रेल्वे प्रकल्पामागे अजित पवारांचे प्रयत्न आणि सरकारकडून मिळालेला निधी महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. बीडकरांचा पुणे, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राशी संपर्क सुकर बीड जिल्ह्यातील नागरिकांना पुणे, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी यापूर्वी विविध मार्गांचा वापर करावा लागत होता. थेट रेल्वेसेवा सुरू झाल्याने या भागातील प्रवाशांना मोठी सुविधा मिळणार आहे. पुणे हे शिक्षण, रोजगार, उद्योग आणि व्यापाराचे मोठे केंद्र असल्याने बीडमधील विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि विविध कामांसाठी पुण्याकडे जाणाऱ्या नागरिकांना या रेल्वेचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. उपलब्ध माहितीनुसार, पुणे-बीड प्रवासाचा कालावधी सुमारे सात तासांचा असेल. रेल्वे बोर्डाने या सेवेचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. बीड आणि पुणे यांच्यातील थेट रेल्वे संपर्कामुळे केवळ प्रवाशांचीच सोय होणार नाही, तर व्यापार आणि व्यवसायालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

Sunetra Pawar: बीड-पुणे रेल्वेला हिरवा झेंडा; सुनेत्रा पवारांचा भाषण अन् अजितदादांची आठवण Read More »

ladki bahin yojana

Maharashtra Government : मोठी बातमी! लाडकी बहिणसह 25 लोककल्याणकारी योजनांचे मूल्यांकन होणार

Maharashtra Government: शासनाच्या निर्णय प्रक्रियेत आणखी गुणवत्तापूर्ण सुधारणा घडवून आणण्यासाठी “महाराष्ट्र तांत्रिक सहाय्यता कक्ष (महा-टॅक)” स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या सहाय्यता कक्षाद्वारे शासनाच्या २५ प्रमुख धोरणांचे विश्लेषण आणि २५ प्रमुख लोककल्याणकारी योजनांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत नागरिकांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी विविध धोरणे व योजना राबविण्यात येतात. यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक निधी खर्च होतो. मात्र केवळ निधीचा विनियोग आणि भौतिक उद्दिष्टांची पूर्तता याआधारे योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जातो. मात्र यावरून योजनेची परिणामकारकता निश्चित करता येत नाही. यासाठी महाराष्ट्र तांत्रिक सहाय्यता कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या योजना किंवा धोरणाच्या अंमलबजावणीनंतर फलनिष्पत्ती तपासली जाते. यामुळे धोरण योजनांच्या अंमलबजावणी दरम्यान होणाऱ्या चुका सुधारता येत नाहीत. अंमलबजावणी दरम्यानच समांतरपणे मूल्यांकन करता आले तर अंमलबजावणीतील त्रुटी सुधारणा करणे शक्य होईल. यासाठी राज्य शासनाच्या २५ प्रमुख धोरणांचे विश्लेषण आणि २५ लोककल्याणकारी योजनांचे मूल्यांकन केले जाणार आहे. यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, मुंबई आणि सेंट्रल फॉर रिसर्च इन स्कीम्स ॲण्ड पॉलिसीज् यांनी एकत्रित दिलेल्या प्रस्तावानुसार महाराष्ट्र तांत्रिक सहाय्यता कक्ष (महा-टॅक) स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. महा-टॅक चे संनियंत्रण मुख्यमंत्री कार्यालयाद्वारे केले जाईल. तसेच मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सूकाणू स्थापन करण्यात येणार आहे. महा-टॅक स्थापनेचे उद्देश राज्यातील २५ प्रमुख धोरणांचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करणे. संबंधित विभाग, उद्योग, अंमलबजावणी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था व लाभार्थी यासारख्या भागधारकांशी सल्लामसलत करणे. ज्या धोरणांना स्वतंत्र सक्षम अंमलबजावणी आराखडा (Empowered implementation architecture) आवश्यक आहे, त्यांच्यासाठी अभियान (मिशन) प्रस्तावित करणे. पंचवीस प्रमुख योजनांचे दर तिमाही स्वतंत्र समांतर मूल्यमापन (Concurrent Evaluation) करणे. लाभार्थ्यांपर्यंत योजनांचे लाभ वेळेत, पूर्णपणे व योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचले जातात का याची योजनेबाबतच्या मार्गदर्शक सूचना, शासन निर्णय, निधी प्रवाह व खरेदी नियमांचे पालन तपासणे. खर्चाची गुणवत्ता, घटक खर्च, अपूर्ण/निरुपयोगी मालमत्ता व फलनिष्पत्ती यांचे परीक्षण करणे. योजनांमधील अभिसरणाच्या (Convergence) संधी शोधणे. संयुक्त राष्ट्र संघाच्या ७६ शाश्वत विकास ध्येयांच्या (SDGs) निर्देशांकाशी जोडलेल्या योजनांच्या परिणामांचे स्वतंत्रपणे मोजमाप करणे. मुख्यमंत्री कार्यालय व संबंधित विभागांना मूल्यांकनावर आधारित तिमाही-निर्णय सहाय्यक अहवाल उपलब्ध करून देणे. लाईव्ह डॅशबोर्ड, शिफारंशीचा पाठपुरावा आणि कायमस्वरुपी विदा सामुग्री (Data Infrastructure) विकसित करणे. विश्लेषण करण्यात येणारी धोरणे महाराष्ट्र उद्योग, गुंतवणूक व सेवा धोरण, महाराष्ट्र जागतिक क्षमता केंद्र धोरण, महाराष्ट्र अँनिमेशन, व्हिज्युअल इफेक्टस, गेमिंग कॉमिक्स एक्सटेंन्ड रिअँलिटी धोरण, महाराष्ट्र रत्ने व आभूषणे धोरण, महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण, महाराष्ट्र लॉजिस्टिक्स धोरण, महाराष्ट्र थर्स्ट सेक्टर धोरण, माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण, महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण, महाराष्ट्र हरित एकात्मिक डेटा केंद्र धोरण, महाराष्ट्राचे अवकाश व संरक्षण उत्पादन धोरण, महाराष्ट्र ईलेक्ट्रॉनिक्स धोरण, महाराष्ट्र ईलेक्ट्रीक वाहन धोरण, महाराष्ट्र सागरी विकास धोरण, महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता व नाविन्यता धोरण, सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे शासकीय औद्योगिक प्रशिक्षन संस्थांचे अद्ययावतीकरण धोरण, महाराष्ट्र कृषि निर्यात धोरण, महाराष्ट्र कृषि कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण, महाराष्ट्र एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण, महाराष्ट्र पर्यटन धोरण, महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण धोरण, महाराष्ट्र हरित हायड्रोजन धोरण, मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना २.०. महाराष्ट्र राज्याचे चौथे महिला धोरण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०ची महाराष्ट्रात अमंलबजावणी आराखडा. या धोरणांसाठी तेरा शक्तीप्रदत्त समिती स्थापन करण्यात येतील. या समितींमुळे समान गुंतवणूकदारांसाठी जमीन, ऊर्जा, लॉजिस्टिक्स, मनुष्यबळ यासाठी आवश्यक अशी इकोसिस्टिम निर्माण करता येणार आहे. समांतर मूल्यांकनात केंद्र पुरस्कृत 18 आणि राज्याच्या 7 योजनांचा समावेश मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना, प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण, मनरेगा / VB-GRAM G, जल जीवन मिशन, आयुष्मान भारत – महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री फसल बीमा योजना, महाडीबीटी – मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, अटल शहरी परिवर्तन व नवनिर्माण योजना (AMRUT),प्रधानमंत्री आवास योजना -शहरी, राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोनती अभियान + महाराष्ट्र ग्रामीण, जीवन्नोनती अभियान – उमेद अभियान, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, समग्र शिक्षा अभियान, पीएम-पोषण, आयुष्मान आरोग्य मंदिर, नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना (POCRA), पीएम- स्वनिधी, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, स्वामित्व, धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान / PM-JANMAN, जलयुक्त शिवार अभियान २.०, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, राज्य क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम / NTEP, पोलीस दलाचे आधुनिकीकरण. या सर्व धोरणांचे विश्लेषण व योजनांचे मूल्यांकन करण्यासाठी महा-टॅकच्या एक वर्षाच्या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली.

Maharashtra Government : मोठी बातमी! लाडकी बहिणसह 25 लोककल्याणकारी योजनांचे मूल्यांकन होणार Read More »

supriya sule

Supriya Sule on Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात CBI ची FIR; सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘आश्चर्य वाटतंय…’

Supriya Sule on Disha Salian Case : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची माजी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाला तब्बल सहा वर्षांनंतर पुन्हा एकदा वेगळे वळण मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) दिशा सालियन मृत्यू प्रकरणात FIR दाखल केली आहे. या कारवाईनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातही आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. दिशा सालियन यांच्या मृत्यूची घटना जून 2020 मध्ये घडली होती. त्यानंतर या प्रकरणाची दीर्घकाळ चर्चा झाली. आता CBI कडे तपास गेल्यानंतर प्रकरण पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. सुप्रिया सुळेंना नेमकं आश्चर्य कशाचं? CBI ने FIR दाखल केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी या घडामोडीवर प्रतिक्रिया दिली. या प्रकरणात यापूर्वी तपास करण्यात आला होता आणि त्यानंतर आता पुन्हा CBI मार्फत FIR दाखल होत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. एखाद्या प्रकरणात आधी तपास करून ते बंद करण्यात आले असेल, तर पुन्हा त्याच प्रकरणात नव्याने FIR आणि तपास का सुरू झाला, हा प्रश्न उपस्थित होतो, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच सुळे यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या वापराबाबतही प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणामागे राजकीय हेतू असण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. मात्र, तपासातून सत्य समोर आले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. दिशा सालियन प्रकरण पुन्हा चर्चेत का? दिशा सालियन या मनोरंजन क्षेत्रात मॅनेजर म्हणून काम करत होत्या. 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीवरून पडून त्यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी या घटनेची नोंद अपघाती मृत्यू म्हणून करण्यात आली होती. दिशा यांच्या मृत्यूनंतर अवघ्या काही दिवसांनी, 14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचा मृत्यू झाला होता.दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी मुलीच्या मृत्यूबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या तक्रारी आणि आरोपांच्या पार्श्वभूमीवर प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी पुढे आली. या प्रकरणात FIR दाखल करण्यात विलंब झाल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयानेही प्रश्न उपस्थित केले होते. अखेर न्यायालयाच्या निर्देशानंतर तपास CBI कडे देण्याचा मार्ग मोकळा झाला आणि आता केंद्रीय तपास यंत्रणेने FIR नोंदवली आहे. FIR मध्ये कोणकोणाची नावे चर्चेत? CBI च्या ताज्या कारवाईनंतर या प्रकरणात काही राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींची नावे चर्चेत आली आहेत. त्यात शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांच्यासह काही अन्य व्यक्तींच्या नावांचा उल्लेख विविध वृत्तांमध्ये करण्यात आला आहे.

Supriya Sule on Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात CBI ची FIR; सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘आश्चर्य वाटतंय…’ Read More »

raj thackeray

Raj Thackeray: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते; राज ठाकरेंच्या पोस्टने चर्चेला उधाण

Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी सोशल मीडियावर केलेल्या एका छोट्याशा पोस्टमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राज ठाकरे यांनी अवघ्या दोन ओळींत आपली भूमिका मांडली असून, त्यांच्या या सूचक वक्तव्याचा नेमका रोख कोणाकडे आहे, याबाबत राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये, “कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. तूर्तास एवढेच!”असे म्हटले आहे. मात्र, या पोस्टमध्ये त्यांनी कोणाचेही नाव घेतलेले नाही किंवा कोणत्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ही प्रतिक्रिया दिली आहे, याचे थेट स्पष्टीकरणही केलेले नाही. त्यामुळे राज ठाकरेंच्या या दोन ओळींचा अर्थ लावण्याचा प्रयत्न राजकीय वर्तुळात सुरू आहे. अमित शाहांच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर पोस्ट? दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्रात हिंदी दिवस आणि सहावे अखिल राजभाषा संमेलन पार पडले. या कार्यक्रमात अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या बहुभाषिक स्वरूपाचा उल्लेख केला. महाराष्ट्राच्या भूमीवर मराठीसोबत कोकणी, गुजराती, सिंधी, हिंदी, कन्नड तसेच वारली यांसारख्या अनेक भाषांचा विकास झाला असून त्यांचा सन्मानही केला जात असल्याचे अमित शाह यांनी म्हटले. तसेच, महाराष्ट्रापेक्षा मोठे बहुभाषिक राज्य देशात दुसरे नाही, असेही त्यांनी नमूद केले. अमित शाह यांनी मराठी भाषेबाबतही भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचा उल्लेख केला. त्यामुळे महाराष्ट्रातील भाषा आणि मराठीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकीय चर्चेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची ही पोस्ट आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज ठाकरेंचा रोख नेमका कोणाकडे? राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतलेले नसल्याने त्यांच्या वक्तव्याचा निश्चित अर्थ सांगता येत नाही. मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीशी त्याचा संबंध जोडून विविध तर्क लावले जात आहेत. विशेषतः अमित शाह यांचे महाराष्ट्राच्या बहुभाषिकतेबाबतचे वक्तव्य आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात सुरू असलेली राजकीय चर्चा पाहता, राज ठाकरेंनी त्याच पार्श्वभूमीवर ही सूचक प्रतिक्रिया दिली असावी, अशी चर्चा आहे. मात्र, राज ठाकरे यांनी स्वतः या पोस्टचा संबंध अमित शाह किंवा त्यांच्या विधानाशी असल्याचे स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे हा केवळ राजकीय अंदाज मानला जात आहे. ‘तूर्तास एवढेच’ या शब्दांचीही चर्चा राज ठाकरेंच्या पोस्टमधील ‘तूर्तास एवढेच’ या शब्दांनीही अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. राज ठाकरे अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या विषयावर सूचक भाष्य करतात आणि त्यानंतर त्यावर सविस्तर भूमिका मांडतात. त्यामुळे या पोस्टनंतर राज ठाकरे भविष्यात याच विषयावर अधिक स्पष्टपणे बोलणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राज ठाकरेंच्या पोस्टनंतर सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, पोस्टचा नेमका संदर्भ स्पष्ट होईपर्यंत त्यामागील राजकीय संदेशाबाबत ठाम निष्कर्ष काढणे घाईचे ठरू शकते.

Raj Thackeray: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते; राज ठाकरेंच्या पोस्टने चर्चेला उधाण Read More »

Manoj Jarange Patil

Manoj Jarange: शिंदे-फडणवीसांचा कट शिजलाय, मराठा मोर्चात मला गोळ्या घालायचा डाव; मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक आरोप…

Manoj Jarange: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे  बाईच्या पदराच्या आड लपून काम करत आहे. तुमच्याकडून आमचं काहीही वाकडं होत नाही तुम्ही आमच्या सगळ्या संपत्त्या घ्या.आंदोलन काळातच चौकशा का? बावणकुळया तू सावध राहा.छगण्या (छगन भुजबळ)सांगतो ना,बाई नाराज झाली.बाईच्या ( जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल)माध्यमातून दिसतं ना. शनिवारी आणि रविवारी सुट्टी असतानाही त्यांच्या दबावाखाली अधिकारी काम करत आहेत. गोरगरीबांचे लोक तहसीलदार कार्यालयात गेले की, अधिकारी काम करत नाहीत, तेच अधिकारी आता शनिवार रविवार काम करत आहेत. मी फक्त प्रसाद लाड यांच्यामुळे बावनकुळेला सुट्टी दिली होती पण आता नाही असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उपोषणाच्या सोळाव्या दिवशी पञकारांशी बोलताना म्हणाले. बावनकुळे सर्वकाही करत आहे. नाराजी व्यक्त करण्याची काय गरज आहे, सर्व दिसत आहे. मराठ्यांबद्दल किती व्देश आहे. गरीब जातीचे आंदोलन सुरू आहे. बाईच्या आडून कसा त्रास दिला जात आहे हे दिसत आहे. बावनकुळे कितीही बोलले तरीही काही फरक पडत नाही कितीही वळवळ केली तरी काही परिणाम होणार नाही. आमचे फासेही तुटणारे नाहीत. बावनकुळे तुम्ही सावध राहा. तुमच्या पदाला, पैशाला आणि मैत्रीला लाथ मारतो, आंदोलन थांबत नसल्याचेही मराठा आंदोलक जरांगे यांनी सांगितले. बावनकुळे तू मराठ्यांचे वार बघ, घायाळ होशील.आमचं काहीही होत नाही तू रविवारी गोष्टी घडवून आणतो.आमच्या आंदोलनाला शनिवारी रविवारी परवानगी का नाही.आम्ही आता बारकाईनं लक्ष ठेवणार नागाच्या शेपटावर पाय दिल्यावर आम्ही दम धरून फासा टाकून बाजार उठवतो. बाईच्या पदराआड लपून लढतो.वार करतो ये तू मैदानात ,बघ तुझ्यामुळे मि कशी भाजपची वाट लावतो.बघ भाजपला कसा पाडतो अशा इशारा त्यांनी दिला. 15 सप्टेंबरला मुंबईला निघून 19 सप्टेंबरला मुंबईत आझाद मैदानावर उपोषणाला बसणार. गरीब मराठ्यांची कदर सरकारला नाही. लोकशाही मार्गाने शांततेत उपोषण सुरू होईल, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले. उदय सामंत ते काय म्हणाले मला माहित नाही. गेल्यावर्षी पण गणेशोत्सव होता.तुम्ही वर्षभर काय केलं.?लाड या लढ्यात आल्यापासून पण आम्ही सरकारला वेळ दिला.आजपासून पुन्हा 8 दिवस सरकारकडे वेळ आहे.संधी देऊनही तुम्ही चूक करता.तुम्हाला 3 वर्ष संधी दिली मग मुंबईत घेऊ नका असं तुम्ही कसं म्हणून शकता? सरकारची प्रवृत्ती नीच आहे. श्रीमंत लोक आंदोलनात मदत करतात म्हणून सरकार त्यांना अडकवत आहे. सरकार त्यांना अडचणीत आणणार आहे का? सगळ्या समाजात श्रीमंत लोक असतात ते समाज अडचणीत आल्यानंतर मदत करतात त्यात चुकीचं काय? निवडणूकीत तुम्ही कॉन्ट्रॅक्टर कडून मदत घेत नाही का मग पैसे वाटण्यासाठी कुठून आणता? आंदोलन करायला मदतीचा हात घ्यावाच लागतो. मराठे त्यांच्या बाजूने उभे राहायला हवे. आंदोलन चालवण्यासाठी मराठ्यांची मदत घेतली नाही तर आंदोलन चालवायचं कसं? दोषी नसताना माझ्या जवळच्या लोकांना त्रास दिला जात आहे तरीही मी मागे हटणार नाही.कुठेही चाैकश्या कितीही करा आणि कुठेही चौकशी करा त्यामुळे आंदोलन थांबत नाही. तुम्ही माझ्या जवळच्या सहकाऱ्यांना त्रास देता, ते कोणाला कळत नाही का? असं देखील मनोज जरांगे म्हणाले. चौकशांना शरण येऊन मी घाबरणार नाही.आंदोलनाच्या ठिकाणी मरेन  पण तुमच्या पूढे गुडघे टेकणार नाही. मराठ्यांपुढे मरेन पण तुमची मैत्री नको.घाबरून मंत्र्यांच्या पंगतीला बसणार नाही. सरकार माझी निष्ठा विकत घेऊ शकत नाही,मुंबईला यायचं नाही म्हणून मला त्रास देणं सुरू केलं आहे. मला गोळ्या घालून मारणे हाच पर्याय आता सरकारकडे आहे हिंदुंच्या सणात मुंबईत आला म्हणून गोळ्या घालून मारण्याचा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा कट शिजला असल्याचे मराठा आंदोलक जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange: शिंदे-फडणवीसांचा कट शिजलाय, मराठा मोर्चात मला गोळ्या घालायचा डाव; मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक आरोप… Read More »

sanjay gaikwad

Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय?

Sanjay Gaikwad : बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आणि चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांच्यातील वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत श्वेता महाले यांनी ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्यावर ठेका धरला होता. यावर संजय गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना श्वेता महाले यांच्या शरीरयष्टीवरून टीका केली होती. या वक्तव्यावरून सामाजिक कार्यकर्त्या सविता भगवान बेंडवाल यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार संजय गायकवाड यांनी आमदार श्वेता महाले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. या वक्तव्यामुळे महिलेचा अपमान होऊन तिच्या लज्जेला धक्का पोहोचवला जात असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या सविता भगवान बेंडवाल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत बुलढाणा शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७९ अंतर्गत आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या कलमांतर्गत महिलेच्या लज्जेला धक्का पोहोचवणारे शब्द, हावभाव, इशारे किंवा कृती केल्याप्रकरणी कारवाईची तरतूद आहे. विद्याधर महाले यांच्या वाढदिवसाच्या मिरवणुकीत आमदार श्वेता महाले यांनी ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्यावर नृत्य केले होते. त्यावरून संजय गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना त्यांच्या शरीरयष्टीवरून टिप्पणी केली होती. याच वक्तव्यावरून आता पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. दरम्यान, महायुतीतील दोन आमदारांमधील हा वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्याने राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे. या प्रकरणात पक्षश्रेष्ठी हस्तक्षेप करतात का आणि पुढील कारवाई काय होते, याकडे लक्ष लागले आहे.

Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय? Read More »

amruta fadnavis

Amruta Fadnavis: माझे भाऊ सणाचे दिवस लक्षात घेऊन जे काही करतील, ते शांततेनेच करतील

Amruta Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 15 वा दिवस असून आंदोलनाची धग कायम आहे. उपोषणादरम्यान जरांगे पाटील यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने टीका केली आहे. आता जरांगे पाटील मुंबईकडे कूच करण्याच्या तयारीत असल्याने सरकारसमोरील आव्हान पुन्हा वाढले असताना, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अहिल्यानगरमध्ये यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सणाचे दिवस आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की माझे भाऊ सणाचे दिवस लक्षात घेऊन जे काही करतील, ते शांततेनेच करतील असे म्हणत त्यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत शांततेची अपेक्षा व्यक्त केली. राज्य सरकार आरक्षणावर तोडगा काढण्याच्या मार्गावर मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यातील वातावरण तापलेले असताना अमृता फडणवीस यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर मात्र सावध भूमिका घेतली. आरक्षणाचा मुद्दा संवेदनशील आहे. राज्य सरकार त्यावर तोडगा काढण्याच्या मार्गावर आहे. सरकारकडून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. येणाऱ्या दिवसांत यावर मार्ग निघेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारकडून हालचाली सुरू असल्याचा संदेशही त्यांच्या वक्तव्यातून देण्यात आला. मनोज जरांगे माझे भाऊ आहेत काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत विचारण्यात आले असता अमृता फडणवीस यांनी मनोज जरांगे माझे भाऊ आहेत, मी त्यांना जेवणाचे निमंत्रण देते असे म्हटले होते. त्यांच्या या आवाहनावर जरांगे पाटील यांनीही आपल्या खास शैलीत उत्तर देत भाऊ लढाईच्या मैदानात असताना कसा जाणार? मात्र भाऊबीजेला बहिणीकडे नक्की जाणार, असे म्हटले होते. त्यावर आज पुन्हा जरांगेंच्या या उत्तरावरही अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. मी त्यांची वाट पाहणार आहे आणि ते येतील असे सांगत त्यांनी जरांगे पाटील यांना दिलेले जेवणाचे निमंत्रण कायम असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे एका बाजूला आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील आंदोलनाची पुढील दिशा ठरवत असताना दुसरीकडे अमृता फडणवीस यांनी भाऊ या नात्याचा उल्लेख करत संवाद आणि शांततेचा सूर कायम ठेवला आहे.

Amruta Fadnavis: माझे भाऊ सणाचे दिवस लक्षात घेऊन जे काही करतील, ते शांततेनेच करतील Read More »

Vikhe Patil

Maratha Reservation : मराठवाड्याची कुणबी प्रमाणपत्र वाटपात मोठी झेप ; 3 लाख 16 हजारांहून अधिक प्रमाणपत्रे वितरित

Maratha Reservation: मराठवाड्यात कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र वाटपाच्या प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, शिंदे समिती स्थापनेपासून ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत प्राप्त ३ लाख १७ हजार ५६९ अर्जांपैकी ३ लाख १६ हजार ९७७ कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. प्राप्त अर्जांपैकी सुमारे ९९.८ टक्के अर्जांवर कार्यवाही पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर जात पडताळणीसाठी प्राप्त २१ हजार ५१ प्रकरणांपैकी १६ हजार ११० प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. मराठा समाजाला १० टक्के एसईबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने २०२४ ते २०२६ या तीन वर्षांत २ लाख ९५ हजार ३०५ प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. कुणबी प्रमाणपत्र वाटपात बीड जिल्हा सर्वाधिक पुढे आहे. जिल्ह्यात २ लाख १० हजार ९४१ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी २ लाख १० हजार ९३१ प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये २६ हजार ५४ पैकी २५ हजार ९५८, जालना १८ हजार ७१६ पैकी १८ हजार ६५३, परभणी २० हजार २४५ पैकी २० हजार १९०, हिंगोली १३ हजार ७१३ पैकी १३ हजार ७०७, नांदेड ४ हजार ९१७ पैकी ४ हजार ८९३, लातूर २ हजार ९२४ पैकी २ हजार ८७० व धाराशिवमध्ये २० हजार ५९ पैकी १९ हजार ७७५ प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. मराठवाड्यात प्राप्त अर्जांपैकी फक्त ४४ अर्ज प्रलंबित आहेत. जालना, हिंगोली व बीड जिल्ह्यांत एकही अर्ज प्रलंबित नाही जात पडताळणीच्या प्रक्रियेत मराठवाड्यात प्राप्त २१ हजार ५१ प्रकरणांपैकी १६ हजार ११० प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. यामध्ये बीड जिल्ह्यातील १३ हजार ७७४ पैकी ११ हजार ४३७ प्रकरणांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये १ हजार ३५३ पैकी १ हजार १४२, जालना १ हजार ६६४ पैकी १ हजार १६, परभणी १ हजार २७१ पैकी ८२५, हिंगोली ५६९ पैकी ३८५, नांदेड ४६३ पैकी २७५, लातूर २७८ पैकी १५० व धाराशिवमध्ये १ हजार ६७९ पैकी ८८० प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. मराठा समाजाला देण्यात आलेल्या १० टक्के एसईबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने २०२४ ते २०२६ या तीन वर्षांत मराठवाड्यात एकूण २ लाख ९५ हजार ३०५ प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. २०२४ मध्ये ८० हजार ३८८, २०२५ मध्ये १ लाख ३४ हजार ४६० व २०२६ मध्ये ८० हजार ४५७ प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. यामध्ये २०२५ मध्ये सर्वाधिक प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. तीन वर्षांच्या एकत्रित एसईबीसी प्रमाणपत्र वाटपात छत्रपती संभाजीनगरमध्ये ४७ हजार ८२६, जालना ३५ हजार ९८१, परभणी ३९ हजार ५५८, हिंगोली ९ हजार ५९७, नांदेड ४० हजार ९०१, बीड ४२ हजार ४३, लातूर ४४ हजार ७५० व धाराशिवमध्ये ३४ हजार ६४९ प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. विशेष म्हणजे, १ सप्टेंबर २०२५ ते ७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मराठवाड्यात ७७ हजार ९५६ कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. यामध्ये बीड जिल्ह्याचा वाटा सर्वाधिक ४७ हजार ८०८ इतका आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ६ हजार ३०४, जालना ४ हजार २७८, परभणी ७ हजार ४६५, हिंगोली ५ हजार २८, नांदेड ५९८, लातूर ६६१ व धाराशिवमध्ये ५ हजार ८१४ प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. या प्रक्रियेमागे नागरिकांच्या जुन्या कागदपत्रांचा शोध, नोंदींची पडताळणी, वंशावळीची जुळवाजुळव व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता अशी मोठी कार्यवाही आहे. जुन्या महसुली, शैक्षणिक व इतर अभिलेखांमधील कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दस्तऐवजांची तपासणी करण्यात आली असून, आढळलेल्या नोंदींचे जतन व प्रसिद्धीकरण करण्यात येत आहे. नागरिकांना ही प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, यासाठी जुन्या अभिलेखांमधील कुणबी नोंदी संगणकीकृत करून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच १० ते १७ सप्टेंबरदरम्यान विशेष शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना नोंदी पाहणे, अर्ज करणे व प्रमाणपत्रासंबंधी आवश्यक मार्गदर्शन मिळणार आहे. लाखो अर्जांवरील ही कार्यवाही केवळ प्रशासकीय आकडेवारीपुरती मर्यादित नसून, प्रत्येक नोंदीमागे एका कुटुंबाचा इतिहास, जुन्या कागदपत्रांचा शोध व अनेक वर्षांची प्रतीक्षा आहे. प्रमाणपत्राच्या आधारे नागरिकांना शैक्षणिक, रोजगार व आरक्षणाशी संबंधित संधी उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याने ही प्रक्रिया अनेक कुटुंबांसाठी महत्त्वाची ठरत आहे.

Maratha Reservation : मराठवाड्याची कुणबी प्रमाणपत्र वाटपात मोठी झेप ; 3 लाख 16 हजारांहून अधिक प्रमाणपत्रे वितरित Read More »