DNA मराठी

ताज्या बातम्या

पहलगाम दहशतवादी हल्ला, भारताने तोडला सिंधू पाणी करार; पाकिस्तानवर काय होणार परिणाम?

Pahalgam Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत पाकिस्तानसोबत सुरू असणारा सिंधू पाणी करार तोडला आहे. सिंधू पाणी करार भारत आणि पाकिस्तानमध्ये 1960 मध्ये झाला होता ज्या अंतर्गत ज्याअंतर्गत सिंधू खोऱ्यातील सहा नद्यांचे पाणी – रावी, बियास, सतलज, सिंधू, झेलम आणि चिनाब – वाटण्यात आले होते. मात्र आता करारा भारताने तोडल्याने याचा पाकिस्तानवर मोठा परिणाम होणार आहे. सिंधू पाणी करार का स्थगित? जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ला पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ ने केला होता, जो लष्कर-ए-तैयबाचा एक भाग आहे. हल्ल्यानंतर, भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षेबाबत मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आणि सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला. सिंधू पाणी कराराचा इतिहास 1960 मध्ये जागतिक बँकेच्या हमीसह सिंधू पाणी करारावर स्वाक्षरी झाली. या करारानुसार, भारताला पूर्वेकडील नद्या – रावी, बियास आणि सतलज – मिळाल्या तर पाकिस्तानला पश्चिमेकडील नद्या – सिंधू, झेलम आणि चिनाब – मिळाल्या. दोन्ही देशांमधील पाणी वाद सोडवण्याच्या उद्देशाने हा करार करण्यात आला होता आणि त्याला एक दुर्मिळ राजनैतिक सहकार्य म्हणून पाहिले जात होते. या करारानंतरही भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अनेक पटींनी वाढला, परंतु या कराराने कधीही पाण्याच्या वादांना युद्धाचे कारण बनू दिले नाही. पाकिस्तानला होणारा पाणीपुरवठा आता लगेच बंद होईल का? भारताने सिंधू पाणी करार स्थगित केला असला तरी त्याचा पाकिस्तानवर तात्काळ परिणाम होणार नाही. सिंधू नदीचे पाणी वाचवण्यासाठी सध्या भारतात पुरेशा पायाभूत सुविधा नाहीत. तरीसुद्धा, या निर्णयाचा पाकिस्तानच्या शेती आणि जलविद्युत प्रकल्पांवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. पाकिस्तानची अर्थव्यवस्था सिंधू आणि तिच्या उपनद्यांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे आणि या नद्यांमधील पाण्यातील कोणत्याही कपातीचा परिणाम पाकिस्तानच्या अन्नसुरक्षा आणि वीजपुरवठ्यावर होऊ शकतो. सिंधू पाणी करार स्थगित केल्याने पाकिस्तानवर काय परिणाम होईल? सिंधू पाणी करार स्थगित केल्याने पाकिस्तानचे कृषी आणि जलविद्युत प्रकल्प धोक्यात येऊ शकतात. पाकिस्तानच्या बहुतेक जलविद्युत संरचना आणि प्रमुख शहरे या नद्यांच्या पाण्यावर अवलंबून आहेत. पाणीपुरवठ्यात कोणताही अडथळा आल्यास पाकिस्तानमध्ये अंधारकोठडीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. याशिवाय लाखो शेतकऱ्यांचे जीवनमानही धोक्यात येऊ शकते. पाकिस्तानकडे 90 दिवसांचा वेळ सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर भारताने पाकिस्तानला चर्चेसाठी 90 दिवसांची मुदत दिली आहे. तथापि, पाकिस्तानसाठी सर्वात मोठा प्रश्न हा असेल की तो दहशतवादाविरुद्ध ठोस कारवाई करेल का आणि भारतावरील दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करेल का. हे पाऊल पाकिस्तानसाठी महत्त्वाचे ठरेल, कारण त्याचा थेट परिणाम सिंधू पाणी करारावर होईल. भारताच्या या पावलामुळे पाकिस्तानला पुन्हा एकदा आपल्या भूमिकेवर विचार करण्यास भाग पाडले आहे. पाकिस्तान आता हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित करण्याचा प्रयत्न करू शकतो, परंतु भारताने स्पष्ट केले आहे की जर पाकिस्तान दहशतवादाबाबत गंभीर नसेल तर परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होऊ शकते.

पहलगाम दहशतवादी हल्ला, भारताने तोडला सिंधू पाणी करार; पाकिस्तानवर काय होणार परिणाम? Read More »

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचा व्हिडिओ पोस्ट करत रोहिणी खडसेंचा हल्लाबोल

Rohini Khadse: पहलगाम येथे झालेला अतिरेकी हल्ल्याबाबत काल संध्याकाळी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत संपन्न झाली. पण या हल्ल्याबाबत देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री यांनी अजून माध्यमांसमोर येऊन भूमिका मांडली नाही अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी मांडली आहे. प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी स्व. मनमोहनसिंग यांचा व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे की, काल परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची पत्रकार परिषद पाहताना एक गोष्ट जाणवली. पहलगाम येथे झालेला हल्ला हा कोणत्या धर्मावर झालेला हल्ला नसून आपल्या देशावर झालेला हल्ला आहे. या हल्ल्यात भारताचे अनेक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत, इतका मोठा हा हल्ला होता. पण प्रसार माध्यमांशी बोलताना न देशाचे पंतप्रधान दिसले, न देशाचे गृहमंत्री दिसले अशी खंत त्यांनी व्यक्त केली. अशा वेळी भारताचे माजी पंतप्रधान स्व.  मनमोहनसिंग यांची 26/11 हल्ल्याच्या वेळची पत्रकार परिषद आठवली असंही त्या म्हणाल्या.

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचा व्हिडिओ पोस्ट करत रोहिणी खडसेंचा हल्लाबोल Read More »

निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा – हर्षवर्धन सपकाळ

Harshwardhan Sapkal: जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करत काँग्रेस पक्षाने दादरमध्ये मोर्चा काढला. हा पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी हल्ला असून हा हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांवर कठोर कारवाई करत दहशतवादाचा कायमचा बिमोड करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे पहलगाम हल्ल्यातील मृतांना दोन मिनिटे मौन राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व त्यानंतर मोर्चा काढण्यात आला. पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय अशा घोषणा देत शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथे केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पहलगाम हल्ल्याप्रकरणी सरकारने सर्व पक्षीय बैठक घेऊन एकमुखी निर्णय घ्यावा, अशा प्रकारचा कोणताही दहशतवादी हल्ला खपवून घेतला जाणार नाही हा संदेश यातून गेला पहिजे. या कठीण प्रसंगी आपण सर्व भारतीयांनी एकत्र येऊन या हल्ल्याचा निषेध केला पाहिजे, असेही सपकाळ म्हणाले. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, पहलगाममधील अतिरेकी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला, यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. एवढा मोठा हल्ला होत असताना गुप्तचर  विभागाला याची माहिती मिळाली नाही का? हे सुरक्षा यंत्रणेचे अपयश आहे. पर्यटकांच्या आजूबाजूला कोणतीच सुरक्षा यंत्रणा नव्हती, सरकार काय करत होते, याचे उत्तर दिले पाहिजे आणि  अतिरेक्यांचा बिमोड केला पाहिजे असे वडेट्टीवार म्हणाले. या मोर्चात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी खासदार हुसेन दलवाई, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, प्रदेश सरचिटणीस रमेश शेट्टी, श्रीरंग बरगे, प्रदेश सचिव झिशान अहमद, आनंद सिंह, धनराज राठोड यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा – हर्षवर्धन सपकाळ Read More »

मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू

Pahalgam Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये 6 महाराष्ट्रातील असल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झाला आहे . तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झालेत.

मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू Read More »

मत्स्यव्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा; मच्छिमार, मत्स्यसंवर्धकांना मिळणार पाणी, वीज सारख्या सुविधा

Maharashtra Cabinet: राज्यातील मच्छिमार,मत्स्यसंवर्धक व मत्स्यकास्तकारांना कृषी क्षेत्राप्रमाणेच पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मत्स्यव्यसायातील प्रक्रिया उद्योग वगळता अन्य घटकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि मत्स्य उत्पादनात वाढ साधण्यासाठी राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक आणि मत्स्यकास्तकारांना कृषी क्षेत्रासारख्या पायाभूत सुविधा आणि सवलती दिल्या जाणार आहेत. महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य असून, शेतीसह पशुपालन, मत्स्यपालन, फळभाजी उत्पादन यांसारख्या क्षेत्रांवर ग्रामीण अर्थव्यवस्था टिकून आहे. विशेषतः देशाला परकीय चलन मिळवून देणाऱ्या आणि प्रथिनयुक्त अन्नाची गरज भागवणाऱ्या मत्स्य व्यवसायाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. राज्याला 720 किलोमीटर लांबीचा प्रदीर्घ समुद्र किनारा लाभला आहे. तसेच भुजल क्षेत्रामध्ये पाटबंधारे विभागाचे जलाशय, तलाव, जिल्हा परिषदांचे तलाव, मालगुजारी तलावांसह 4 लाख हेक्टरवर ही जलसंपत्ती आहे. तसेच अडीच लाखांहून अधिक शेततळी आहेत. यामुळे आता राज्यात पारंपरिक मासेमारीपेक्षा शास्त्रोक्त मत्स्यपालनावर भर दिला जात असून, राज्यात मत्स्यबीज संचयन आणि पिंजरा संवर्धन यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढू लागला आहे. कृषी क्षेत्राशी साधर्म्य असूनही मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा नसल्याने मच्छिमार व मत्स्यपालकांना वीज सवलत, कर्ज, विमा आणि उपकरणांवरील अनुदान या सुविधा मिळत नव्हत्या. मात्र, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार आणि कर्नाटकसारख्या राज्यांनी या क्षेत्राला कृषी दर्जा दिल्यामुळे त्यांच्या मत्स्य उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्य शासनाने या पार्श्वभूमीवर महत्त्वाची पावले उचलली असून, कृषी दराने वीजपुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँक कर्ज सुविधा, अल्प दरात विमा संरक्षण तसेच सौर ऊर्जा योजनेचा लाभ यांसारख्या सवलती मत्स्यशेतकऱ्यांना मिळणार आहेत. परिणामी, ग्रामीण भागात रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार असून, मत्स्य उत्पादनात भरीव वाढ होण्याची अपेक्षा आहे.

मत्स्यव्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा; मच्छिमार, मत्स्यसंवर्धकांना मिळणार पाणी, वीज सारख्या सुविधा Read More »

सांगलीत चार माजी आमदारांचा प्रवेश अन् भेदभाव करणार नाही , अजित पवार असं का म्हणाले?

Ajit Pawar: आपला महाराष्ट्र हा महापुरूषांचा आहे. त्यांच्या विचारांवरच आपल्याला चालायचे आहे असे सांगतानाच मला जे पटते ते काम मी करतो. मी ज्याला शब्द दिला त्याचे काम कधी अपूर्ण ठेवले नाही. आज पक्षात तुम्ही प्रवेश केलात मात्र माझ्याकडून कधी भेदभाव होणार नाही अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. आज एमसीए लॉन्ज वानखेडे स्टेडियम मुंबई येथे सांगली, बीड, यवतमाळ येथील विविध पक्षांच्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. सभासद नोंदणीसाठी काम करा असे आवाहन करतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हाही लागतील. तीन वर्षे निवडणूका झालेल्या नाहीत. त्याचे कारण हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. लवकरच निर्णय व्हावा असा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. निवडणूक झाली तर अनेक घटकातील लोकांना प्रतिनिधीत्व मिळणार आहे. लवकरात लवकर निवडणूका झाल्या तर नव्या चेहऱ्यांना व अनुभवी लोकांना संधी मिळू शकते असेही अजित पवार यावेळी म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत करतानाच माणसाशी नातं जोडणारा आणि शेतकर्‍यांशी नाळ जोडलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असून प्रत्येकांनी पक्ष वाढीसाठी काम करायचे आहे असे सांगतानाच सर्वसामान्यांच्या पाठीशी पक्ष ठाम उभा राहिल असा शब्दही अजित पवार यांनी यावेळी दिला. सांगली आणि सातारा जिल्ह्यातील आठवणी सांगताना अजित पवार यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा ही जोडी सर्वसामान्यांच्या मनावर कशी कोरली गेली होती हे सांगितले. जात-पात धर्म याला फाटा देत आणि जातीय सलोखा राखत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार आपल्या देशाचे काम सुरू आहे. या संविधानावरच आपला देश चालत आहे हेही आवर्जून अजित पवार यांनी स्पष्ट केले. सांगलीसह इतर जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांचा पक्षात झालेला प्रवेश आम्हाला ताकद आणि शक्ती देणारा – सुनिल तटकरे सांगली हा जिल्हा विचारवंतांचा असून या जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांचा पक्षात होत असलेला पक्षप्रवेश आम्हाला ताकद आणि शक्ती देणारा आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. पश्चिम महाराष्ट्रात सहकार चळवळ घडली आणि मोठ्या प्रमाणावर वाढलीही अशा जिल्ह्याच्या पाठीमागे सरकारची ताकद उभी राहिली पाहिजे असा आमचा प्रयत्न असल्याचे सांगतानाच सांगलीच्या एका वेगळ्याच पॅटर्नची ओळख आहे. मात्र आता आपल्याला सांगलीचा नवा पॅटर्न उभा करायचा असून तो तुम्ही उभा कराल असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. सांगली, बीड जिल्ह्यातील प्रदीर्घ अनुभव असलेले राजकीय शिलेदार आज आपल्या पक्षात येत आहेत याचा आनंदही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली सांगली, बीड, ठाणे जिल्ह्यातील कल्याण – डोंबिवली, यवतमाळमधील विविध पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला. सांगली जिल्हयातील शिराळा विधानसभा मतदारसंघातील माजी मंत्री शिवाजीराव नाईक, जत विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विलासराव जगताप, खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष रणधीर नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य तम्मनगौंडा रविपाटील, भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष संग्राम जगताप, युवा मोर्चाचे ग्रामीण माजी अध्यक्ष अनिल सर्जेराव पाटील, निलेश येसगुडे, प्रमोद सावंत, निवृत्ती शिंदे आदींसह शिराळा, खानापूर, पलूस, इस्लामपूर, जत, तासगावमधील असंख्य पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. याशिवाय बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील रमेश आडसकर, अंकुश इंगळे, भारत पिंगळे, सुनिल शिनगारे, निलकंठ भोसले, काकडे गुरुजी, संभाजी इंगळे, लक्ष्मीकांत लाड, केज नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सिताताई बनसोड, गटनेते हरुण इनामदार, नगरसेवक अजहर इनामदार, राजू इनामदार, रेश्मा इनामदार, आशाताई कराड आदींसह असंख्य विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला. याशिवाय कल्याण – डोंबिवलीतील प्रतिक वालिलकर, जय जेपाल, पवन वालिलकर, शालिक पाटील, सचिन पाटील, आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार सना मलिक, आमदार विजयसिंह पंडित, आमदार इद्रीस नायकवडी, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद जलालुद्दीन, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, माजी आमदार संजय दौंड, युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे आदींसह सांगली, बीड, यवतमाळ, कल्याण डोंबिवलीचे जिल्हाध्यक्ष, पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांगलीत चार माजी आमदारांचा प्रवेश अन् भेदभाव करणार नाही , अजित पवार असं का म्हणाले? Read More »

Realme P3 Pro भन्नाट फिचर्स अन् 4 हजारांची सूट, जाणून घ्या ऑफर

Realme P3 Pro: जर तुम्ही देखील या महिन्यात कमी किमतीमध्ये तुमच्यासाठी एक बेस्ट फीचर्स आणि पावरफुल बॅटरीसह येणारा नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी रियलमीने एक जबरदस्त फोन लॉन्च केला आहे. ज्याचा फायदा घेत अगदी कमी किमतीमध्ये तुम्ही फोन खरेदी करू शकतात. पी-कार्निव्हल सेल दरम्यान Realme P3 Pro स्मार्टफोनवर 4000 रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. या सेलची सुरुवात आजपासून म्हणजेच 22 एप्रिलपासून सुरू झाली आहे आणि 24 एप्रिलपर्यंत सुरू राहील. या ऑफरमध्ये काय खास आहे? याआधी हा स्मार्टफोन 23,999 रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आला होता. पण आता या सेलमध्ये तुम्हाला ते फक्त 19,999 रुपयांना मिळत आहे, म्हणजेच 4000 रुपयांची थेट सूट. याशिवाय, तुम्हाला एक्सचेंज बोनस देखील मिळू शकतो, जेणेकरून तुम्ही तुमच्या जुन्या स्मार्टफोनमध्ये देवाणघेवाण करून हे डिव्हाइस आणखी स्वस्त किमतीत मिळवू शकता. तुम्ही फ्लिपकार्ट, रियलमीची अधिकृत वेबसाइट आणि त्यांच्या रिटेल स्टोअर्सवरून ही डील घेऊ शकता. Realme P3 Pro फिचर्स या स्मार्टफोनमध्ये 6.83-इंचाचा 1.5K वक्र AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. तसेच स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7s जनरल 3 चिपसेटद्वारे समर्थित आहे, जो तुम्हाला उत्तम कामगिरी आणि जलद मल्टीटास्किंग अनुभव देतो.याशिवाय, यात 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंत स्टोरेज आहे. कॅमेरा आणि बॅटरी यात ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50 एमपीचा मुख्य कॅमेरा सोनी आयएमएक्स 896 सेन्सरसह येतो आणि ओआयएस (ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन) ला सपोर्ट करतो, ज्यामुळे कमी किंवा जास्त प्रकाशात तुमचे फोटो अतिशय तीक्ष्ण आणि स्पष्ट होतात. याशिवाय, यात 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही उत्तम सेल्फी काढू शकता. यात 6000mAh बॅटरी आहे, जी 80W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, म्हणजेच तुम्ही फोन लवकर चार्ज करू शकता आणि बॅटरी बराच काळ वापरू शकता. सेफ्टी फिचर्स Realme P3 Pro स्मार्टफोन 5G कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो, त्यामुळे तुम्ही जलद इंटरनेट स्पीडचा आनंद घेऊ शकता. ड्युअल 4जी व्होल्टे, वाय-फाय, ब्लूटूथ आणि यूएसबी टाइप-सी सारखे कनेक्टिव्हिटी पर्याय देखील यामध्ये उपलब्ध आहेत. सुरक्षेसाठी, त्यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे, जो तुमचे डिव्हाइस आणखी सुरक्षित बनवतो.

Realme P3 Pro भन्नाट फिचर्स अन् 4 हजारांची सूट, जाणून घ्या ऑफर Read More »

श्रीरामपूर शहराचा चेहरामोहरा बदलणार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची ग्वाही

Vikhe Patil: येत्या काळात श्रीरामपूर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी, शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करण्यासोबत शहर हरित करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. श्रीरामपूर येथे तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा, जलजीवन मिशन व महावितरण विभागांच्या कामकाजाचा आढावा बैठकीत विखे पाटील बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती सुनंदा नरवाडे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, तहसीलदार मिलिंद वाघ आदी उपस्थित होते. पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, जलजीवन मिशनचे काम करतांना पाण्याचे स्त्रोत शोधल्यानंतर पाईप खरेदी करावी. उन्हापासून पाइप खराब होऊ नयेत यासाठी पाईप बंदीस्त ठिकाणी ठेवावेत. जलजीवन मिशनच्या कामात गुणवत्ता ठेवावी. कामात अनियमितता करणाऱ्या ठेकेदारांवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणीबाबत ग्रामस्थांच्या तक्रारींची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन निकृष्ट कामांची, अनियमितेची चौकशी करण्यात यावी. त्रुटींची दुरूस्ती करून पाणी पुरवठा योजना तात्काळ पूर्ण कराव्यात. ज्या गावांना पाणीपुरवठा योजना सुरू आहेत त्या गावांना टँकरद्वारे पाणी पुरविण्याची गरज पडू नये, असेही त्यांनी सांगितले. महावितरण कामांचा आढावा घेतांना पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे यासाठी मुख्यमंत्री सौर पंप योजनेत येत्या काळात सर्वच शेतकऱ्यांना सोलर पंप देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेत सौर फिडर केंद्रांसाठी जिल्ह्यात 3 हजार एकर शासकीय जमीन देण्यात आली आहे. कुसुम’ आणि ‘मागेल त्याला सोलर पंप’ या योजनेंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ सोलर पंप वितरित करण्यात यावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तालुक्यातील नादुरुस्त उपकेंद्रांची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. जिल्ह्यातील महावितरणच्या प्रलंबित कामांना जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून 40 कोटी रूपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. गावठाण जमीनीवर असलेले घरकुल नियमित करण्याचे शासनाचे धोरण आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यात 20 लाख घरकुले बांधण्यात येणार आहेत. यासर्व घरांना सोलरद्वारे विज दिली जाणार आहे . श्रीरामपूर तालुक्यासाठी जास्तीत जास्त घरकुले मंजूर करण्यात येतील, अशी ग्वाही विखे पाटील यांनी दिली. ग्रामीण पाणीपुरवठा व महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाच्या योजनेत तालुक्यातील गावांमध्ये करण्यात येणाऱ्या कामांच्या प्रगतीचा पालकमंत्र्यांनी गावनिहाय आढावा घेतला. या बैठकीला महसूल, पंचायत समिती, ग्रामीण रस्ते, जलसंधारण अशा विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

श्रीरामपूर शहराचा चेहरामोहरा बदलणार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची ग्वाही Read More »

दरवर्षी 21 एप्रिल दरम्यान रंगणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव

Ashish Shelar: चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाचे पहिले प्रदर्शन 21 एप्रिल 1993 रोजी गिरगाव येथील ऑलिम्पिया थिएटर येथे झाले होते. त्या घटनेला 112 वर्ष पूर्ण झाली आहेत. या दिवसाचे महत्त्व लक्षात घेत दरवर्षी याच काळात आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपताका या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. तसेच, तंत्रज्ञानावरील आव्हानांवर मात करण्यासाठी मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांना राज्य सरकारकडून आर्थिक पाठबळ देण्यात येणार असल्याचेही शेलार यांनी जाहीर केले. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन सोमवारी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांच्या हस्ते मुहूर्ताचा क्लॅप देऊन करण्यात आले. यावेळी चित्रपताका महोत्सवाच्या शीर्षकगीताचे लोकार्पण करण्यात आले. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या रवींद्र नाट्य मंदिर सभागृहामध्ये झालेल्या या भव्य दिव्य सोहळ्याला ज्येष्ठ चित्रपट निर्माते किरण शांताराम, ज्येष्ठ चित्रपटकर्मी जब्बार पटेल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर आणि महोत्सवाचे संचालक पुरुषोत्तम बेर्डे यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांनी आपल्याला कलाकार म्हणून मोठे करणाऱ्या प्रेक्षकांचे आभार मानले. राज्याच्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवात सगळ्या मान्यवरांसमोर आपला सत्कार झाल्याबद्दल त्यांनी आभार मानले. प्रेक्षकांना आनंद मिळेपर्यंत काम करत राहणार, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्याच बरोबर सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासारख्या द्रष्ट्या मंत्र्याच्या मार्गदर्शनाखाली ज्या योजना सुरू होत आहेत, त्याचा मराठी कलाकारांना भविष्यात निश्चित फायदा होणार आहे, असा विश्वासही सराफ यांनी व्यक्त केला. रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे 99’ हा चित्रपट यावेळी महोत्सवाचा उद्घाटनाचा चित्रपट म्हणून दाखवण्यात आला. विशेष सांस्कृतिक कार्यक्रम जुई बेंडखळे यांनी सादर केलेल्या गणेश वंदनेने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यांनतर अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिने ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या गाण्यावर नृत्य सादर केले. प्रसिध्द अभिनेत्री श्रेय बुगडे हिच्या निवेदनात रंगलेल्या या कार्यक्रमात अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने विविध गाण्यांवर नृत्य सादर केले. प्रसिध्द संगीतकार अजय अतुल यांच्या गाण्यावर अभिनेत्री मीरा जोशी यांनी नृत्य सादर केले. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया या गाण्यावर अभिनेत्री अनुष्का सरकटे हिने नृत्य सादर केले. राज्य सरकारची नवोदित कलाकारांसाठी ऑडिशन योजना राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे महोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे नवोदित कलाकारांसाठी ऑडिशन योजना सुरू करण्यात आली असल्याची माहिती यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करणाऱ्या अभिनेता सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी यांनी दिली. पुढचे चार दिवस ही योजना मोफत असून त्यानंतर नाममात्र दरात ही योजना सुरू राहणार आहे. इच्छुक नवोदित कलाकारांनी अकादमी येथे येऊन ऑडिशन द्यायची. या ऑडिशनमधून निर्माते दिग्दर्शक यांना कलाकारांची निवड करता येणार आहे. चित्रपताका महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी 22 एप्रिलला दुपारी 12 वाजता ‘काल आज आणि उद्याचे मराठी चित्रपट – गीत, संगीत, शब्द, सूर आणि तंत्र’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे सूत्रसंचलन संगीतकार कौशल इनामदार करणार आहेत. दुपारी 3 वाजता प्रसिध्द हिंदी चित्रपट दिग्दर्शक हंसल मेहता यांची मुलाखत अभिनेते, गीतकार किशोर कदम घेणार आहेत. सायंकाळी 6 वाजता चित्रपटाचे तंत्र आणि त्यातील सध्याच्या संधी या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादात उज्ज्वल निरगुडकर, पंकज सोनावणे, सुप्रिया पाटणकर सहभागी होणार असून सूत्रसंचलन सौमित्र पोटे करणार आहेत.

दरवर्षी 21 एप्रिल दरम्यान रंगणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव Read More »

Harshwardhan Sapkal: “हर घर नल, हर नल जल… पण पाण्यासाठी नाशिकच्या भगिनी अजूनही जीव धोक्यात घालून विहीरीत उतरतात!”

Harshwardhan Sapkal: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 पर्यंत जलजीवन मिशन अंतर्गत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचवण्याचे आश्वासन दिले होते. ‘हर घर नल, हर नल जल’ ही घोषणा केवळ पोस्टरवरच दिसली, प्रत्यक्षात मात्र अनेक गावांमध्ये परिस्थिती भयावह आहे. अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर केली आहे. 2025 उजाडले. पण आमच्या नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील माता-भगिनींना अजूनही पाण्यासाठी हंडा घेऊन डोंगर-दऱ्या ओलांडाव्या लागतात. एवढंच नाही, तर अनेक ठिकाणी त्या जीव धोक्यात घालून कोरड्या पडलेल्या विहीरीत उतरतात – केवळ एक हंडा पाण्यासाठी हे सरकारचे फक्त अपयशच नाही तर ही संवेदनशून्यतेचे आणि पोकळ घोषणाबाजीचे भीषण वास्तव आहे. असं देखील ते यावेळी म्हणाले. तसेच योजना कागदावरच आहेत, घोषणा सभांमध्ये गाजतात, पण जमिनीवरचं वास्तव आजही पाण्यासाठीची लढाई आहे. अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली.

Harshwardhan Sapkal: “हर घर नल, हर नल जल… पण पाण्यासाठी नाशिकच्या भगिनी अजूनही जीव धोक्यात घालून विहीरीत उतरतात!” Read More »