DNA मराठी

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंना शरद पवारांचा जाहीर पाठिंबा; 5 तारखेच्या मोर्चात सहभागी होणार

Sharad Pawar: मराठीच्या समर्थनार्थ पुकारलेल्या ५ जुलै रोजीच्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दर्शविला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी एक पत्र ट्विट करत भूमिका स्पष्ट केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आपल्या पत्रात म्हटले आहेत की, महाराष्ट्राहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा महाराष्ट्रासाठी आणि जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा राष्ट्रासाठी पक्षीय भेदाभेद बाजूला सारून उभं राहणं हेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचं स्पष्ट धोरण आहे असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) याअंतर्गत त्रिभाषा सूत्राचं समीकरण पुढे करत इयत्ता पहिलीपासून शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा बंधनकारक करण्याचे योजिले आहे. ह्याविरोधात महाराष्ट्रात मराठी भाषिकांमध्ये टोकाचं जनमत तयार होत आहे. अनेक विद्यार्थी, पालक, शिक्षणतज्ञ, भाषातज्ञ अशा सर्व मान्यवरांनी त्रिभाषा सूत्र इयत्ता पहिलीपासून राबविण्यास विविधं आक्षेप नोंदविले आहेत. पण कुणालाही न जुमानता राज्य सरकार ‘हिंदी सक्ती’साठी हट्ट धरून बसलं आहे असे ते म्हणाले. खरं तर, महाराष्ट्राच्या जनमानसाचा कानोसा घेतलात तर जाणवतं की, कुणाचाही विविधं भाषा शिकण्याला किंबहुना हिंदी भाषेलाही विरोध नाही, पण इयत्ता पहिलीपासूनच प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावं असा आग्रह आहे, जो योग्य आहे. आणि, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्ष म्हणून आमचीही हीच भूमिका आहे असे स्पष्ट करताना त्यांनी शैक्षणिक धोरणाच्या त्रिभाषा सूत्राआडून मातृभाषेला डावलण्यासाठी प्रयत्न होत असतील तर मराठी माणूस एकदिलाने त्याचा विरोध करणार, ह्याची सत्ताधाऱ्यांनी नोंद घ्यावी असा इशाराही दिला. महाराष्ट्र सरकारच्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020)’ अंतर्गत त्रिभाषा सूत्रान्वये केल्या जाणाऱ्या हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी येत्या शनिवारी, ५ जुलै २०२५ रोजी तमाम मराठीजनांकडून मुंबईत एक मोर्चा पुकारण्यात आला आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचा ह्या मोर्चाला संपूर्ण पाठिंबा आहे. महाराष्ट्राहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा महाराष्ट्रासाठी आणि जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा राष्ट्रासाठी पक्षीय भेदाभेद बाजूला सारून उभं राहणं हेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचं स्पष्ट धोरण आहे. म्हणूनच, मी पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधींना, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन करत आहे की, येत्या ५ जुलैच्या मोर्चात प्रचंड संख्येने आवर्जून सहभागी व्हा असे आवाहन त्यांनी केले आहे.

ठाकरे बंधूंना शरद पवारांचा जाहीर पाठिंबा; 5 तारखेच्या मोर्चात सहभागी होणार Read More »

Ahilyanagar News : जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Ahilyanagar News : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २८ जून ते ११ जुलै २०२५, रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदर आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, मिरवणुका किंवा प्रेतयात्रांवरील जमावास लागू राहणार नाही. तसेच पोलीस अधिकारी, कामावर असलेले शासकीय अधिकारी व कर्मचारी, तसेच सभा अथवा मिरवणुका काढण्यासाठी रीतसर परवानगी घेतलेल्या व्यक्तींनाही हा आदेश लागू होणार नाही. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Ahilyanagar News : जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी Read More »

निवडणूक आयोगाकडून 345 नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू

Election Commission : भारत निवडणूक आयोगाने (ECI) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली, निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंग संधू आणि डॉ.विवेक जोशी यांच्या उपस्थितीत 345 नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची (Registered Unrecognized Political Parties – RUPPs) नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हे पक्ष 2019 पासून सहा वर्षांत एकाही निवडणुकीत सहभागी झालेले नाहीत आणि त्यांचे कार्यालय देशात कुठेही अस्तित्वात नाही, असे आढळले आहे. सध्या आयोगाकडे नोंदणीकृत 2800 हून अधिक नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष आहेत. त्यापैकी अनेक पक्षांनी RUPP म्हणून नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या अटी पूर्ण केलेल्या नाहीत. त्यामुळे आयोगाने देशव्यापी पडताळणी मोहीम हाती घेतली असून त्यात सध्या 345 पक्षांची निवड झाली आहे. या पक्षांना अन्यायकारकपणे नोंदणी रद्द होऊ नये यासाठी संबंधित राज्यांच्या/केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना (CEOs) या पक्षांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर या पक्षांना त्यांच्या बाजूने आपली भूमिका मांडण्यासाठी सुनावणीची संधी दिली जाईल. अंतिम निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे. देशातील राजकीय पक्षांची नोंदणी ही लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 29अ अंतर्गत केली जाते. एकदा पक्ष नोंदणीकृत झाला की, त्याला करसवलतीसह अनेक सवलती आणि सुविधा मिळतात. हा संपूर्ण उपक्रम राजकीय व्यवस्थेचे शुद्धीकरण करण्याच्या उद्देशाने राबवला जात आहे. 2019 नंतर एकाही लोकसभा, विधानसभा किंवा पोटनिवडणुकीत भाग न घेणारे आणि प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेले पक्ष यामध्ये समाविष्ट आहेत. 345 पक्ष हे पहिल्या टप्प्यात निवडण्यात आले असून हा उपक्रम पुढेही सुरू राहणार आहे, असे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.

निवडणूक आयोगाकडून 345 नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू Read More »

raj – uddhav

मोठी बातमी! हिंदी सक्तीविरोधात राज-उद्धव एकत्र?

Raj Thackeray: राज्यातील राजकारणातील एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली आहे. खासदार संजय राऊत ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघणार आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा फोटो शेअर केल्याने हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील शाळांत हिंदी सक्ती विरोधात मनसेकडून 5 जुलै रोजी भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात सर्व राजकीय पक्ष सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे देखील या मोर्चात राज ठाकरे यांच्यासोबत सहभागी होणार असल्याचे संकेत खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिंदी सक्ती वरून राजकारण तापले असून मनसेसोबत इतर विरोधी पक्ष महायुती सरकारवर जोरदार टीका करत निर्णय मागे घेण्याची मागणी करत आहे. विद्यार्थ्यांना पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असून या निर्णयावरून विरोधक सरकारवर निशाणा साधत आहे.

मोठी बातमी! हिंदी सक्तीविरोधात राज-उद्धव एकत्र? Read More »

भारतासोबत मोठी डील करणार, होणार फायदा; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Donald Trump on India: भारतासोबत मोठी डील होणार असल्याचे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहे. अमेरिका आता काही मोठे व्यापार करार करणार आहे आणि त्यात भारतासोबतचा करार देखील समाविष्ट आहे. असं ट्रम्प म्हणाले. “बिग ब्युटीफुल बिल” या त्यांच्या कार्यक्रमात बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “आम्ही चीनसोबत करार केला आहे आणि आता पुढचा मोठा करार भारतासोबत होऊ शकतो.” ट्रम्प पुढे म्हणाले, “प्रत्येकजण अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराचा भाग होऊ इच्छितो. परंतु आम्ही सर्वांशी व्यवहार करणार नाही. आम्ही काही मोठे करार करणार आहोत. आम्ही भारतासाठी दरवाजे उघडणार आहोत.” भारतासाठी दरवाजे उघडतील अमेरिका आणि चीनमधील दीर्घ व्यापार युद्धानंतर करार झाला असताना हे विधान आले आहे. अमेरिका आता भारतासोबतही आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसते. चीनसोबत कोणता करार झाला? ट्रम्प यांनी चीनसोबतच्या कराराची संपूर्ण माहिती दिली नसली तरी, व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले की हा करार चीनमधून अमेरिकेत दुर्मिळ पृथ्वी घटकांची वाहतूक जलद करण्याबद्दल आहे. अमेरिका या दुर्मिळ धातूंसाठी मोठ्या प्रमाणात चीनवर अवलंबून आहे आणि आता त्यांचा पुरवठा सुरक्षित करू इच्छित आहे. अमेरिका-भारत व्यापार कराराची पार्श्वभूमी अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी आधीच सांगितले आहे की भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार अंतिम टप्प्यात आहे. त्यांनी म्हटले होते की, “आम्ही खूप जवळ आलो आहोत आणि लवकरच एक मजबूत व्यापार भागीदारीची घोषणा केली जाऊ शकते.” भारत आणि अमेरिका दोघेही आता एकमेकांसाठी धोरणात्मक भागीदार बनले आहेत, विशेषतः चीनच्या वाढत्या प्रभावामुळे. या कराराद्वारे, भारताला अमेरिकन बाजारपेठेत अधिक प्रवेश मिळू शकतो आणि अमेरिकेला भारतासारख्या मोठ्या ग्राहक देशात आपला व्यापार वाढवण्याची संधी देखील मिळेल.

भारतासोबत मोठी डील करणार, होणार फायदा; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा Read More »

उंदीर मारण्याच्या मोहिमेची चौकशी करा, आशिष शेलार यांचे आदेश

Ashish Shelar: गेल्या सहा महिन्यात मुंबईत 2 लाख 50 हजार उंदरांचा खात्मा केल्याचे महापालिका सांगत असली तरी ही बाब अत्यंत संशयास्पद असून गेल्या तीन महिन्यातील मोहीमेची चौकशी करा, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी महापालिका प्रशासनाला दिले. मुंबईत वाढत असलेले डेंग्यू मलेरियाचे रुग्ण आणि त्याबाबतच्या उपाययोजना याबाबतची आढावा बैठक मंत्रालयात आशिष शेलार यांनी घेतली. या बैठकीला महापालिका अतिरिक्त आयुक्त बिपिन शर्मा, अमित सैनी, अभिजीत बांगर महापालिका कार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शहा तसेच सरकारच्या आरोग्य अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते मुंबईत मलेरियाचे 1 जून ते 21 जून या कालावधीत 554 रुग्ण आढळून आले असून डेंग्यूचे 71 तर चिकनगुनियाचे 6, लेप्टोस्पायरसिस 24, गॅस्ट्रो 620 रुग्ण आढळून आले आहेत 2024 जानेवारी ते मे या कालखंडात मलेरियाचे 1612 रुग्ण आढळले होते तर यावर्षी 1973 रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूचे 338 रुग्ण मागील वर्षी आढळून आले होते तर जानेवारी ते मे 2025 या कालखंडात 347 रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे महापालिकेने 1 जून ते 21 जून 2025 या कालखंडामध्ये सहा लाख 39 हजार 430 घरांचे सर्वेक्षण केले असून एकूण 30 लाख 56 हजार 528 लोकांचे सर्वेक्षण केल्याचे महापालिकेने सांगितले. एकूण 1 लाख 2 हजार 243 रक्त नमुने गोळा केले असून लेप्टो संशयित रुग्णांची संख्या 62,484 आहे तर यासाठी 37 शिबिरे घेण्यात आली असून विविध कार्यालयाच्या ठिकाणी जाऊन 5,108 ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती दिली. तर गॅस्ट्रोसाठी वितरित केलेल्या ओआरएस गोळ्यांची एकूण संख्या 21,429 असून पाण्याच्या जंतू करण्यासाठी क्लोरीन टॅब चे वितरणाची संख्या 11, 086 आहे 1 जून ते 21 जून या कालावधीत ह्या उपायोजना करण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. तसेच मलेरिया नियंत्रणासाठी 17 हजार 82 इमारतींची तपासणी केली केल्याची माहिती दिली. डास मारण्यासाठी 35 हजार 911 इमारतींच्या परिसरात धूर फवारणी करण्यात आली असून 5 लाख 58 हजार 261 झोपडपट्टी विभागात फवारणी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या उपायोजना करूनही रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे येत्या कालखंडामध्ये या सर्व उपाययोजना 25 टक्क्यांनी वाढवा असे निर्देश मंत्री शेलार यांनी अधिकाऱ्यांना दिले. महापालिकेने गेल्या सहा महिन्यात 2 लाख 50 हजार उंदरांचा खात्मा केला तर एक जून ते 21 जून या कालखंडामध्ये विषारी गोळ्या वापरून मारलेल्या मूळकांची संख्या 1741 तर पिंजरे लावून पकडलेल्या मोक्षकांची संख्या 2015 आहे. 17 वॉर्ड मध्ये 17 संस्था हे काम करतात तर पिंजरा लावून मुषक पकडण्याचे काम महापालिकेचे कर्मचारी करतात ही सर्व आकडेवारी एकूणच संशयास्पद असून उंदीर किती मारले? कुठे टाकले ? किती विभागात ती कारवाई करण्यात आली ? याचे चित्रीकरण करण्यात आले होते का ? या सर्वांची तीन महिन्याची चौकशी करण्यात यावी गेली अनेक वर्ष महापालिकेत नगरसेवक, विधान परिषदेत आमदार आणि तीन टर्म विधानसभेचा आमदार म्हणून मुंबईत काम करत असून ही आपल्याला अशा प्रकारचे उंदीर कधी मारल्याचे निदर्शनास आलेले नाही. पिंजरा कुठे लावला असे कधी पाहण्यात आलेले नाही. त्यामुळे हे सर्वच प्रकरण संशयास्पद असून याची चौकशी करून अहवाल सादर करा असे निर्देश मंत्री शेलार यांनी यावेळी अतिरिक्त आयुक्तांना दिले.

उंदीर मारण्याच्या मोहिमेची चौकशी करा, आशिष शेलार यांचे आदेश Read More »

मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा.., हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

Harshwardhan Sapkal : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरोपानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा अशी मागणी केली आहे. ते टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीतील मतचोरीसंदर्भात ट्वीट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात ८ टक्के मतदार वाढले हे आरटीआयमधून उघड झाले आहे. फडणवीसांविरोधात निवडणूक लढलेले काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुडदे पाटील यांनी ही माहिती मागविली आहे. विशिष्ट मोबाईल नंबरवरून अनेक मतदारांची नोंद केल्याचेही स्पष्ट झालेले आहे. याची शहानिशा करावी असे निवडणूक आयोगाने सांगितले पण शहानिशा केलेली नाही. गुडदे पाटील यांनी न्यायालयात दोन याचिकाही दाखल केलेल्या आहेत. फडणवीस यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेला नाहीत. या मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करावी व चौकशी होईपर्यंत त्यांनी पदावरून दूर रहावे असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. सरकारी जाहिरातीत राजमुद्रा गायब करून सेंगोल कसा? भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आज आणीबाणी संदर्भात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत जाहिरातबाजी केली आहे. सरकारी जाहिरातीतून राजमुद्रा गायब असून सेंगोल दाखवला आहे. सेंगोल कशाचे प्रतिक आहे, हे वेगळे सांगायला नको. भाजपाला लोकशाही व संविधान संपवून गोलवलकर यांचे ‘बंच ऑफ थॉट’ लागू करायचे आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.. काँग्रेस मुख्यपत्र शिदोरीचा आणीबाणी विशेष अंक काँग्रेस पक्षाचे मुख्यपत्र जनमानसाची शिदोरी या मासिकाचा आणीबाणी विशेष अंक काढला आहे. या अंकात इंदिराजी गांधी, पुपुल जयकर, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, दैनिक सामनाचे संपादक व खा. संजय राऊत यांच्यासह अनेक ज्येष्ठ लेखकांनी लेख लिहिले आहेत. या अंकातून आणीबाणी संदर्भातील सत्य लोकांसमोर आणले जाणार असून भाजपच्या खोट्या प्रचाराला चोख उत्तर मिळेल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. चांदीच्या ताटात पाहुणचार.. संसद व विधिमंडळ अंदाज समितीतील लोकांनी पाच हजार रुपयांचे शाही भोजन, ५५० रुपये भाड्याच्या चांदीच्या ताटात पाहुणचार झोडला तो धुळे विश्रामगृहातील खोली क्रमांक १०२ मध्ये सापडलेल्या अंदाज समितीच्या पैशातून होता का, असा प्रश्न विचारून अंदाज समितीच्या तमाशाचा हा दुसरा वग आहे. शाही पाहुणचार झोडून काटकसर कशी करायची, हे समितीने सांगितले असावे. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला, लाडक्या बहिणीला २१०० रुपये देण्यास पैसे नाहीत आणि मेजवाणी झोडण्यासाठी मात्र पैसे आहेत, असेही सपकाळ म्हणाले.

मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा.., हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी Read More »

आणीबाणीत संविधानाचा गळा घोटल्याबद्दल काँग्रेस माफी मागणार का ?भाजप नेते रविशंकर प्रसाद

Ravi Shankar Prasad : आणीबाणीत सर्व देशाचा तुरुंग बनवून विरोधी कार्यकर्त्यांचा छळ केल्याबद्दल, जबरदस्तीने नसबंदी शस्त्रक्रिया करुन सामान्य जनतेवर अत्याचार केल्याबद्दल काँग्रेस नेते माफी मागणार का, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री खा. रविशंकर प्रसाद यांनी केला. आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खा. प्रसाद बोलत होते. मुंबई भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते भाई गिरकर, आ. अमित साटम, मुंबई भाजपा कोषाध्यक्ष किरीट भन्साळी, प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते. यावेळी खा. प्रसाद म्हणाले की, आणीबाणीत दीड लाख लोकांना देशभर अटक करण्यात आली होती. जनसंघ, समाजवादी अशा सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक करण्यात आली. लोकनायक जयप्रकाश नारायण यांना अटक करून हरयाणात तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्याच तुरुंगात मोरारजीभाई देसाई यांनाही ठेवण्यात आले होते. मात्र या दोघांना भेटण्याची परवानगी नाकारली गेली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना, जनसंघाच्या कार्यकर्त्यांचा तुरुंगात शारीरिक छळ करण्यात आला होता . यावेळी खा. प्रसाद यांनी आणीबाणीत झालेल्या अत्याचारांचा पाढा वाचला. खा. प्रसाद म्हणाले की, आणीबाणी काळात 253 पत्रकारांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी 110 पत्रकारांना मिसा खाली तर 110 जणांना संरक्षणविषयक कायद्यानुसार अटक करण्यात आली. 33 जणांना अन्य गंभीर गुन्ह्याखाली अटक करण्यात आली. अनेक ज्येष्ठ संपादकांनाही अटक करण्यात आली होती. 52 विदेशी पत्रकारांची मान्यता रद्द करण्यात आली. ख्यातनाम पत्रकार मार्क टली सह 29 विदेशी पत्रकारांना भारतात प्रवेश करण्यास बंदी घातली गेली. वृत्तपत्रांवर प्रसिद्धी पूर्व निर्बंध (प्री सेन्सॉर शिप) घालण्यात आले. सरकारी अधिकाऱ्यांना नसबंदीचे उद्दिष्ट ठरवून दिले जात असे. 60 लाख लोकांची जबरदस्तीने नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली. अनेकांचा विवाह झाला नसताना त्यांची नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली, असेही खा. प्रसाद यांनी नमूद केले. या अत्याचाराबद्दल काँग्रेस नेत्यांनी आजवर माफी मागितली नाही, असेही खा. प्रसाद यांनी सांगितले.

आणीबाणीत संविधानाचा गळा घोटल्याबद्दल काँग्रेस माफी मागणार का ?भाजप नेते रविशंकर प्रसाद Read More »

आमदार जगताप यांचे गैरसमज दूर करणार; अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट

Ajit Pawar On Sangram Jagtap: आम्ही भाजपसोबत असलो तरही आमचा पक्ष आंबेडकर, शाहू, फुले यांच्या विचारधाराचा असून समाजातील सर्व नागरिकांना एकत्र घेऊन आम्ही काम करणार असं आपल्या प्रत्येक भाषणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणत असतात. मात्र दुसरीकडे त्यांच्या पक्षातील नगर शहराचे आमदार संग्राम जगताप गेल्या काही दिवसांपासून एका विशिष्ट धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत असल्याने अजित पवार यांच्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत आहे. राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एका विशिष्ट धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून प्रसिद्ध मिळवण्याचे काम काही नेतेमंडळी करत आहे. भाजप आमदार आणि मंत्री नितेश राणे यांच्यासह समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी काहींना काही वादग्रस्त वक्तव्य करून नेहमी चर्चेत राहत असतात. तर यामध्ये नगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचा देखील समावेश होत असून एका विशिष्ट धर्माला लक्ष करून जगताप हिंदुत्ववादी राजकणार करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याच प्रकरणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आमदार संग्राम जगताप यांचे गैरसमज दूर करणार असून आमचा पक्ष सर्व धर्मसमभाव प्रमाणे काम करत असून पुढे देखील याच पद्धतीने काम करणार असल्याचे स्पष्ट मत अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना मांडले. त्यामुळे आता येणाऱ्या काळात नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडून वादग्रस्त वक्तव्य थांबणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

आमदार जगताप यांचे गैरसमज दूर करणार; अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट Read More »

लक्ष्मीनगरमध्ये अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा; नागरिकांनी आयुक्तांना दिले निवेदन

Ahilyanagar News : तपोवन रोडवरील लक्ष्मीनगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या त्रासाला कंटाळून परिसरातील रहिवाशांनी महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. या बैठकीस माजी नगरसेवक निखील वारे आणि बाळासाहेब पवार हेही उपस्थित होते. सयाजीराव वाव्हळ, नानासाहेब माळवदे, बंडोपंत ढोले, राजेंद्र डहाळे, संजय कांडेकर, रमेश चौधरी, किरण विरकर, संजय धामने, पोपटराव राठोड, प्रशांत फुगनर, सुरेश बोडखे, भानुदास दातीर, अशोक कोरडे, सुर्यकांत झेंडे आणि पत्रकार साहेबराव कोकणे यांनी नागरिकांचे म्हणणे मांडत सविस्तर चर्चा केली. नागरिकांनी यावेळी स्पष्ट केले की, लक्ष्मीनगरमधील जलवाहिनी ही जुनी व गंजलेली आहे, त्यामुळे पुरेसा दाब मिळत नाही. फेज टू पाण्याकरिता सर्वांनी नियमाप्रमाणे शुल्क भरले असून नवीन नळजोडण्या देखील दिल्या गेल्या आहेत, मात्र अपेक्षित पाणीपुरवठा अद्याप मिळत नाही. यावर आयुक्त यशवंत डांगे यांनी दोन दिवसांत प्रत्यक्ष पाहणी करून परिसरात पुरेशा दाबाने आणि नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत काम लवकर सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

लक्ष्मीनगरमध्ये अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा; नागरिकांनी आयुक्तांना दिले निवेदन Read More »