DNA मराठी

हायलाईट

raj thackeray

Raj Thackeray on Ashok Kharat : कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? अशोक खरात प्रकरणात राज ठाकरे स्पष्टच म्हणाले

Raj Thackeray on Ashok Kharat : संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात प्रकरणात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया देत या सगळ्याचा महाराष्ट्राच्या समाजमनावर काय परिणाम होतोय याचा विचार आतातरी होणार आहे का ? असा प्रश्न विचारला आहे. या प्रकरणात राज ठाकरे म्हणाले की, अशोक खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून, शब्दशः गरगरल्यासारखं झालं. अवघ्या काही दिवसांपूर्वी १९ मार्च २०२६ ला आमच्या पक्षाच्या गुढी पाडवा मेळाव्यातून, महाराष्ट्राला किती सशक्त परंपरा लाभली आहे आणि या महाराष्ट्राने किती अद्वितीय माणसं या देशाला दिली आहेत याचं सादरीकरण केलं होतं. त्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते संत गाडगेबाबांपर्यंतचा ते अगदी आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे या सगळ्यांनी मराठी मनाची कशी मशागत केली हे दाखवलं होतं. आणि त्याच महाराष्ट्रात जेंव्हा अशोक खरातसारखा नीच माणूस, राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो तेंव्हा खरंच, ‘कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र’ हा प्रश्न पडतो.  ज्या महाराष्ट्रात राज्यकर्ते संताचा आशीर्वाद घ्यायचे, जिथे लोकमान्य टिळकांसारखे नेते भगवद्गीतेचा अर्थ लावणारा ‘गीतारहस्य’ सारखा ग्रंथ लिहायचे, ज्या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांसारखे नेते आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यात संवाद असायचा, त्या महाराष्ट्रातले नेते तर्काला तिलांजली देऊन कुठलं तरी अजब ‘तीर्थ’ प्राशन करण्यासाठी अशोक खरातसारख्याच्या भजनी लागतात हे भीषण आहे.  महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा आणि एकूणच विवेकाचा आवाज उठवला जायचा आणि त्यामुळेच डिसेंबर २०१३ ला महाराष्ट्र विधानसभेत अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पारित झालं होतं. त्यावेळेस ज्या आमदारांनी हे विधेयक पारित केलं असेल त्यातले अनेक जण आजदेखील आमदार असतील आणि त्यातले अनेक जणं या प्रकरणात अडकले असतील. हा किती दुर्दैवी विरोधाभास आहे आणि महाराष्ट्राचं किती अधःपतन झालं आहे याचं हे द्योतक आहे.  हा खरात स्त्रियांचं शोषण करतोय, ते झालं तरी चालेल, पण त्याच्या बदल्यात कुठल्यातरी शक्तीने तो आपलं भलं करेल असा अजब विश्वास आणि यासाठी लागणारा कोडगेपणा हे दोन्ही या राज्यात कुठून आला आहे हेच कळत नाही. आधी आमदार खासदारकीची तिकिटं मिळवण्याची धडपड. मग जिंकून येण्यासाठी वाट्टेल ते, मग मंत्रिपद. ते नाही मिळालं तर सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात भरण्यासाठी आणि शक्यतो निष्ठा विकण्यासाठीची धडपड. मग त्यातून मंत्रिपद मिळालं की झालं, मग पुन्हा ते टिकाव म्हणून धडपड. आणि सत्ताधारी रोज नवीन कोणाला तरी आत घेतच असतात तो जर आला तर माझं काय याची घोर चिंता. यातच महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय भावविश्व अडकलं आहे. आणि या असल्या पोकळ चिंतांमध्ये हे इतके गुंतले आहेत की खरात काय किंवा अजून कोणी आलं आणि त्याने चमत्काराची खात्री दिली की त्याच्या भजनी लागायला हे मोकळे. त्यात हल्ली महाराष्ट्रात काही अधिकारी हे मंत्र्यांचे सगळ्या प्रकारचे सल्लागार आणि नियोजनकार झाले आहेत. त्या अधिकाऱ्यांना पण कसंही करून सत्तेला चिकटून रहायचं आहे.  या सगळ्याचा महाराष्ट्राच्या समाजमनावर काय परिणाम होतोय याचा विचार आतातरी होणार आहे का ? माध्यमं सध्या खरात प्रकरणाचा रोज पाठपुरावा करत आहेत हे चांगलं आहे पण म्हणून त्यांनी जनतेला पुन्हा एकदा आपण कोण होतो याचं दर्शन घडवायला हवं असं मला मनापासून वाटतं.  गुढी पाडव्याच्या मेळाव्यातून मी हा महाराष्ट्र कोणी घडवला आहे याचं दर्शन मुद्दामून करवलं होतं, ती माझी समज काय आहे हे दाखवण्यासाठी नाही. तर आत्ताच्या तरुण पिढीला हे कळावं म्हणून. माझ्यापरीने हे काम मी करत राहणार आहेच.  पण महाराष्ट्रातील जनतेने विचार करावा. हे असले लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देणार आहात. महाराष्ट्रातील गावागावांत आजही कीर्तनं होतात, ज्ञानेश्वरीचं पठण होतं, आजही या राज्यात तर्काचा आवाज मोठा आहे. पण जर तुम्ही या असल्या नाठाळांना आपले नेते मानणार असाल तर महाराष्ट्राचं काही खरं नाही हे नक्की.  राज्याचे मुख्यंमत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की, हे प्रकरण आम्हीच शोधून काढलं आणि याचा तपास सुरु केला आहे. जर तुम्हाला याचं श्रेय द्यायचं असेल तर मग हे प्रकरण घडत होतं आणि तुमच्या घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशयाची सुई फिरत आहे, तेंव्हा हे सगळं घडत असताना याचा कुठेच सुगावा का लागला नाही म्हणून दोषी धरायचं ? माझ्या तर कानावर असं पण येतंय की कोणाच्या तरी महत्वकांक्षांचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जात आहे. याचा अर्थ असा की एकदा का समोरच्याने शरणागती पत्करली आणि काही काळ तरी कुरघोड्या थांबवल्या की हे सगळं प्रकरण बासनात गुंडाळलं जाईल. माझी माध्यमांना विनंती आहे की तुम्ही या असल्या धोबीपछाड राजकारणाचा भाग होऊ नका. या असल्या बुवाबाबांना शोधून काढा. त्यांची कृत्य उघडकीस आणा. इतकंच नाही तर खरातला कठोर शिक्षा होईपर्यंत हे प्रकरण शांत होऊ देऊ नका.

Raj Thackeray on Ashok Kharat : कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? अशोक खरात प्रकरणात राज ठाकरे स्पष्टच म्हणाले Read More »

prakash ambedkar

Prakash Ambedkar : ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक’, हा कायदा संविधानाच्या तत्त्वांचे उल्लंघन करणारा ; प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar : ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक, २०२६’वर कडक शब्दात टीका करत हा कायदा संविधानाच्या तत्त्वांचे उल्लंघन करणारा असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर यासंदर्भात प्रतिक्रिया नोंदवली. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, धार्मिक धर्मांतरांना आळा घालण्यासाठी प्रस्तावित केलेले हे विधेयक कायदेशीर कसोटीवर टिकणार नाही. भारतीय संविधानाने नागरिकांना धर्मस्वातंत्र्य आणि विवाहाचे मूलभूत अधिकार दिले असून, कोणत्याही कारणाने या अधिकारांवर मर्यादा आणणारा कायदा घटनाबाह्य ठरू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, देशातील इतर काही राज्यांमध्येही अशाच प्रकारचे कायदे मंजूर करण्यात आले असून, ते सध्या न्यायालयीन आव्हानांना सामोरे जात आहेत. हे प्रकरण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही या विधेयकाच्या वैधतेबाबत प्रश्न निर्माण होणार, असे ते म्हणाले. राज्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष कडे बहुमत असल्यामुळे हे विधेयक विधानसभेत आणि विधानपरिषदेत मंजूर होऊ शकते, मात्र त्याची घटनात्मक वैधता हा अधिक महत्त्वाचा मुद्दा असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकरांनी नमूद केले. या कायद्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप करत त्यांनी म्हटले की, समाजाचे हिंदू-मुस्लिम किंवा हिंदू-ख्रिश्चन असे ध्रुवीकरण करून मतदारसंघ मजबूत करण्याचा हा प्रयत्न आहे. तसेच, जबरदस्तीने धर्मांतराच्या घटनांसाठी विद्यमान कायदे पुरेसे असल्याचे सांगत, नव्या कडक कायद्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ॲड. प्रकाश आंबेडकरांनी पुढे म्हणाले की, या विधेयकाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप धार्मिक ध्रुवीकरणाला चालना देत आहेत. दरम्यान, राज्य सरकारकडून या विधेयकाचे उद्दिष्ट जबरदस्तीचे धर्मांतर आणि कथित ‘लव्ह जिहाद’ रोखणे असे सांगितले जात असले, तरी विरोधकांकडून त्याच्या घटनात्मक वैधतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Prakash Ambedkar : ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक’, हा कायदा संविधानाच्या तत्त्वांचे उल्लंघन करणारा ; प्रकाश आंबेडकर Read More »

Vijay Wadettiwar 1

Vijay Wadettiwar on Ashok Kharat : चाकणकर यांचा राजीनामा झाला पण अनेक मोठ्या माशांवर कारवाई नाही

Vijay Wadettiwar on Ashok Kharat : महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या अत्यंत संतापजनक आणि अशोभनीय घटनांवरून हे स्पष्ट होत आहे की, सत्तेत बसलेल्या महायुती सरकारला जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे राहिलेले नाही. रूपाली चाकणकर यांचा राजीनामा आणि खरात प्रकरणातून समोर आलेली मंत्र्यांची भोंदूगिरी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला लागलेला काळिमा आहे असं काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार म्हणाले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची बसलेल्या रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्रातील महिलांना न्याय मिळवून देणे अपेक्षित होते पण त्यांनीच एका भोंदू बाबाचे मानसिक गुलामगिरी पत्करली ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. ज्योतिष आणि अनिष्ट प्रथांवर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्ती महिलांना काय न्याय देणार?त्यांचा राजीनामा हा केवळ दिखावा नसून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, असं वडेट्टीवार नागपुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले. लिंगपिसाट खरात याच्या संपर्कात आलेल्या सर्व ‘नवरत्नांचा’ आणि मंत्र्यांचा CDR तपासला पाहिजे. खरातकडे असलेली अफाट संपत्ती आणि त्याला मंत्र्यांनी दिलेला राजाश्रय पाहता, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. पोलिसांवर दबाव टाकून मोठे मासे वाचवण्याचे षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केला. एकीकडे खरातसारख्या व्यक्तीचे पाय धुतले जात आहे, तर दुसरीकडे कीर्तनकारांकडून अल्पवयीन मुलींवर अत्याचार होत आहेत. धर्माच्या नावाखाली सुरू असलेला हा अधर्म थांबवण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली पाहिजे असं वडेट्टीवार म्हणाले. अरविंद शिंदे या काँग्रेसच्या नेत्यांनी चाकणकर प्रकरणी व्यक्त केलेली भूमिका ही त्यांची वैयक्तिक आहे पक्षाची नाही असं ही वडेट्टीवार यांनी यावेळी स्पष्ट केले. सातारा येथील निवडणुकीत बहुमत असतानाही शंभूराजे देसाई पालकमंत्री असताना त्यांच्याच सहकाऱ्यांना पळवून नेण्यात आले.यात मंत्री जखमी झाले. भाजप सत्तेसाठी कोणत्या थराला जात आहे आणि ट्रिपल इंजिन सरकारमधील इंजिन कोणत्या दिशेने जात आहे हे यावरून स्पष्ट होत आहे. मित्र पक्षातील मंत्री निधीवरून नाराज आहेत आणि एकमेकांची जिरवण्याच्या नादात जनतेचे नुकसान महायुती सरकार करत असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.

Vijay Wadettiwar on Ashok Kharat : चाकणकर यांचा राजीनामा झाला पण अनेक मोठ्या माशांवर कारवाई नाही Read More »

Crime

Pune Crime: समलैंगिक संबंधांना विरोध अन् 22 वर्षीय तरुणाने दोन अल्पवयीन मुलांची केली हत्या…

Pune Crime: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील दहिवडी गावात १७ मार्चला १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलाची हत्या झाली होती . ही हत्या अक्षय दत्तात्रय मांजरे या २२ वर्षांच्या तरुणाने समलैंगिक संबंधना विरोध केल्याने केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. मात्र या हत्येचा तपस करताना आरोपी अक्षय मांजरेने मागीलवर्षी २१ जूनला अशाचप्रकारे समलैंगिक संबंधांना विरोध केल्याने ११ वर्षांच्या मुलाची देखील हत्या केली होती असं तपासात उघड झालंय. विशेष म्हणजे या दोन्ही हत्या केल्यानंतर आरोपी अक्षय मांजरे हा त्याठिकाणी गर्दीचा भाग म्हणून उभा होता. २१ जून २०२५ ला त्याने समलैंगिक संबंधांना विरोध करणाऱ्या ११ वर्षाच्या मुलाचा डोक्यात दगड घालून खून केला मात्र त्या हत्येचा तपास पोलिसांनी व्यवस्थित केला नाही असा ग्रामस्थांचा आरोप आहे. अक्षय मांजरेवर संशय असल्याने त्याची जुजबी चौकशी करून त्यावेळी त्याला सोडून देण्यात आलं. त्यानंतर १७ मार्च २०२६ ला त्याने पुन्हा १२ वर्षाच्या एका मुलावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याही मुलाने विरोध केल्याने अक्षय मांजरेने त्याचाही डोक्यात दगड घालून खून केला. या दोनाही हत्या करून आपला त्या हत्येनशी कोणताही संबंध नाही हे दाखवण्यासाठी तो तपासासाठी पोलीस घटनास्थळी आल्यानंतर तिथे उपस्थित राहत होता. अखेर पोलिसांनी गावातील अनेकांची कसून चौकशी करायचं ठरवलं त्यावेळी अक्षय मांजरेच्या सांगण्यामध्ये पोलिसांना विसंगती जाणवू लागली आणि या दोन हत्येंचा उलगडा झाला.

Pune Crime: समलैंगिक संबंधांना विरोध अन् 22 वर्षीय तरुणाने दोन अल्पवयीन मुलांची केली हत्या… Read More »

raigad police

Raigad Police : नेरळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; पाण्याच्या टँकरमधून सुरू असलेली दारू तस्करी उधळली

Raigad Police : रायगड जिल्ह्यातील नेरळ पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध दारू तस्करीचा पर्दाफाश केला आहे. पाण्याच्या टँकरच्या आडून सुरू असलेली ही तस्करी उघडकीस आली असून पोलिसांनी टँकरसह कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नेरळ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वारोटे आणि त्यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कर्जत–मुरबाड मार्गावरील वारे गाव परिसरात सापळा रचला. कोकण किनारा हॉटेलसमोर संशयित टँकर अडवून तपासणी केली असता या टँकरमध्ये अवैधरित्या गोवा बनावटीची विदेशी दारू वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. राजस्थानमधील गुडामबेरी येथील रहिवासी लाडूराम खियाराम बिश्नोई हा आरोपी ही दारू गोव्याहून गुजरातकडे नेत असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे, कोणालाही संशय येऊ नये म्हणून पाणी वाहून नेणाऱ्या टँकरचा वापर करण्यात आला होता. बाहेरून टँकर पाण्याचा असल्यासारखा दिसत असला तरी आतमध्ये गुप्त कप्पे तयार करून त्यामध्ये दारूचे बॉक्स लपवण्यात आले होते. तपासणीदरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात विदेशी दारू जप्त केली असून टँकरसह एकूण १ कोटी १ लाख २७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती राहुल गायकवाड (उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत) यांनी दिली.

Raigad Police : नेरळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; पाण्याच्या टँकरमधून सुरू असलेली दारू तस्करी उधळली Read More »

Police

Pune Crime: धक्कादायक! हळदीच्या पाकिटांतून गांजाविक्री; दोघांना अटक

Pune Crime : हळदीच्या पाकिटांच्या आडून गांजाची विक्री करणाऱ्या दोन जणांना बाणेर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत एकूण १६ किलो गांजा तसेच परदेशी चलन जप्त करण्यात आले. अभिषेक बोर्से आणि अक्षय बोर्से (रा. पिंपरी-चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघे शहरातील विविध भागांत गांजाची विक्री करत होते. संशय टाळण्यासाठी त्यांनी गांजा हळदीच्या पाकिटांत लपवून ठेवण्याची युक्ती वापरली होती. तसेच दोघे एका खासगी कंपनीत नोकरी करत असल्याचे भासवत होते. बाणेर परिसरात दुचाकीवरून येऊन ते गांजाविक्री करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्यांच्या पिशवीत हळदीची पाकिटे आढळली. तपासणी केल्यावर त्यामध्ये गांजा लपविल्याचे स्पष्ट झाले. या वेळी सुमारे तीन किलो गांजा जप्त करण्यात आला. पुढील चौकशीत आरोपींनी पिंपरी-चिंचवड येथील त्यांच्या घरात आणखी साठा असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी घरावर छापा टाकून १३ किलो गांजा हस्तगत केला. दरम्यान, या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास सुरू करण्यात आला असून गांजा कोठून आणला आणि कोणाला विक्रीसाठी ठेवला होता, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Pune Crime: धक्कादायक! हळदीच्या पाकिटांतून गांजाविक्री; दोघांना अटक Read More »

Election Commission

Rahuri By Election : राहुरी पोटनिवडणुकीसाठी तीन निरीक्षक दाखल

Rahuri By Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणूक २०२६ करिता भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले जनरल, खर्च व पोलीस निरीक्षक १८ मार्च रोजी जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी निवडणूक कामकाजाला सुरुवात केली आहे. नागरिकांच्या माहितीसाठी या निरीक्षकांचा तपशील प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आला आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विश्रामगृहात जनरल निरीक्षक देवानंद रियांग व खर्च निरीक्षक व्ही.ए.टी.व्ही. कुमार दाखल झाले आहेत. नागरिकांना जनरल निरीक्षकांशी ९२०९५१६९९४ व खर्च निरीक्षकांशी ९२०९६०१८३९ या क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे. तसेच पोलीस निरीक्षक रितुराज रवी हे अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृहात दाखल झाले असून त्यांनी कायदा व सुव्यवस्था विषयक कामकाज सुरू केले आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ९२०९६०३३८६ असा आहे. या निरीक्षकांसाठी प्रशासनामार्फत संपर्क अधिकारी, लघुलेखक, लिपिक, पोलीस गार्ड, वाहन व शिपाई आदी व्यवस्था करण्यात आली आहे. नियुक्त संपर्क अधिकारी निरीक्षकांच्या सातत्याने संपर्कात असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासन दक्षता घेत आहे.

Rahuri By Election : राहुरी पोटनिवडणुकीसाठी तीन निरीक्षक दाखल Read More »

pune zilla parishad

Pune Zilla Parishad : पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदी विरधवल कृष्णराव जगदाळे तर उपाध्यक्षपदी विवेक प्रतापराव वळसे पाटील

Pune Zilla Parishad : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विरधवल कृष्णराव जगदाळे आणि उपाध्यक्षपदी विवेक प्रतापराव वळसे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी, अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक जिल्हा परिषद यांनी जाहीर केले. जिल्हा परिषदेच्या पाचव्या मजल्यावरील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित जिल्हा परिषदेची विशेष सभा आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूकीच्यावेळी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या समन्वयक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी चारुशिला देशमुख-मोहिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकात वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, भुषण जोशी, जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य, पंचायत समितीचे सभापती आदी उपस्थित उपस्थित होते. डुडी म्हणाले, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६९ चे कलम ४५ (२) आणि महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष आणि उपाध्यक्ष व निवडणूक) नियम १९६२ प्रमाणे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली आहे, असे डुडी म्हणाले. अध्यक्ष पदाकरिता विरधवल कृष्णराव जगदाळे आणि विजयसिंह बाबासाहेब शिंदे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले, त्यापैकी विजयसिंह बाबासाहेब शिंदे यांनी माघार घेतली. तसेच उपाध्यक्ष पदाकरिता विवेक प्रतापराव वळसे पाटील आणि मंगेश गुलाबराव काकडे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. त्यापैकी मंगेश गुलाबराव काकडे यांनी माघार घेतली. त्यामुळे अध्यक्षपदी विरधवल कृष्णराव जगदाळे तर उपाध्यक्षपदी विवेक प्रतापराव वळसे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सुरुवातीला डुडी यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरिता प्राप्त नामनिर्देशन पत्राचे वाचन केले. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरिता प्राप्त सर्व नामनिर्देशन पत्र वैध असल्याचे जाहीर करुन ते मागे घेण्याकरिता १५ मिनीटांचा कालावधी देण्यात आला. सुरुवातीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Pune Zilla Parishad : पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदी विरधवल कृष्णराव जगदाळे तर उपाध्यक्षपदी विवेक प्रतापराव वळसे पाटील Read More »

sushma andhare on ashok kharat case

Sushma Andhare on Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरण, रुपाली चाकणकरांचा उल्लेख करत सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

Sushma Andhare on Ashok Kharat Case : नाशिकच्या अशोक खरात या स्वयंघोषित ज्योतिषाला आज बलात्कार, योन शोषण प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात तपास करत असताना अशोक खरात याच्याकडे तब्बल 58 सेलिब्रिटी आणि हाय प्रोफाईल व्यक्तींचे व्हिडिओ असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार हल्लाबोल केला आहे. कॅप्टन अशोक खरात नावाच्या स्वयंघोषित ज्योतिषाला आज नाशिक पोलिसांनी अटक केली खरात याच्यावर बलात्कार योन शोषण यासारखे आरोप आहेत. पोलिसांनी हस्तगत केलेल्या पेन ड्राईव्ह मधून 58 आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती समोर येत आहे. हे उल्लेखनीय आहे की या स्वयंघोषित ज्योतिषाकडे अनेक राजकीय नेत्यांचा राबता होता. केसरकर, तटकरे, चाकणकर अशी काही राजकीय भक्तांची नावे… अनेक राजकीय नेत्यांनी या ज्योतिषाच्या सांगण्यावर वेगवेगळ्या पूजा करणे, स्वतःच्या हाताची करंगळी कापून घेणे असे अघोरी उद्योग सुद्धा केल्याचे लोक चर्चा करत आहेत. विशेष यापूर्वी सुद्धा अशोक खरात याच्यावर जेव्हा लैंगिक शोषणाचे आरोप एका संस्थेने केले तेव्हा चाकणकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत संबंधित संस्थेकडून दबाव आणून माफीनामा घेतला होता. विशेष; खरात यांनी स्थापन केलेल्या संस्थेवर रूपाली चाकणकर संचालक म्हणून काम करतात. खरात याच्या घरच्या लग्न कार्यामध्ये चाकणकर जातीने आवभगत करताना बघून अनेकांना आश्चर्य वाटले होते. आता आम्हाला शंका नव्हे भीती आहे, पुन्हा एकदा महिला आयोगासारख्या अत्यंत जबाबदार पदाचा दुरुपयोग करत रूपाली चाकणकर यांनी अशा लिंगपिसाट माणसाला मदत केली तर याची जबाबदारी कोण घेणार ? कारण अशा भामट्या ज्योतिष्यासाठी स्वतः छत्री घेऊन चाकणकर उभ्या आहेत. योगायोगाने राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर याच पक्षाच्या नेत्या सुनेत्रा वहिनी विराजित आहेत. महिला म्हणून सुनेत्रा वहिनींच्या मनाला तरी ही गोष्ट पटते का की अशा लिंग पिसाट माणसाला पाठीशी घालणाऱ्या चाकणकरांना या पदावर ठेवावे…? असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

Sushma Andhare on Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरण, रुपाली चाकणकरांचा उल्लेख करत सुषमा अंधारेंचा हल्लाबोल Read More »

1st april

1st April Rules: आयकर कायद्यात बदल अन् शेअर बाजारात गुंतवणूकदारांना धक्का; 1 एप्रिलपासून देशात काय बदलणार?

1st April Rules: 1 एप्रिल 2026 पासून देशातील आयकर प्रणालीमध्ये मोठे बदल होणार आहेत. नवीन कायदा, ITR च्या तारखा, TCS-STT दर आणि शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठीही खूप काही बदल होणार आहेत. केंद्र सरकारने 2026 च्या अर्थसंकल्पात आयकर व्यवस्थेत अनेक महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्य करदाते आणि गुंतवणूकदारांवर होणार आहे. चला तर मग पाहूया 1 एप्रिल 2026 पासून लागू होणारे 7 मोठे बदल. नवीन आयकर कायदा लागू सर्वात मोठा बदल म्हणजे आता 1961 चा जुना आयकर कायदा संपणार आहे.त्याऐवजी Income Tax Act 2025 लागू होणार आहे. मात्र दिलासा म्हणजेTax Slabs मध्ये कोणताही बदल नाही. नवीन कायद्याचा उद्देश कर प्रणाली अधिक सोप्या भाषेत आणणे आणि कायदेशीर गुंतागुंत कमी करणे. ITR भरण्याची अंतिम तारीख वाढली सरकारने काही करदात्यांना दिलासा दिलेय. ITR-3 आणि ITR-4 भरण्याची अंतिम तारीख31 जुलै ऐवजी 31 ऑगस्ट करण्यात आली आहेय. पण ITR-1 आणि ITR-2 साठी अंतिम तारीख 31 जुलैच राहील. तसेच Tax Audit ची अंतिम तारीख 31 ऑक्टोबरच कायम राहील. Revised Return साठी जास्त वेळ जर ITR भरताना काही चूक झाली तर? आता Revised Return भरण्यासाठी जास्त वेळ मिळणार आहे. आधी अंतिम तारीख 31 डिसेंबर होती आता ती वाढवून 31 मार्च करण्यात आली आहेय मात्र 31 डिसेंबरनंतर Revised Return भरल्यास अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. TCS दरांमध्ये मोठे बदल सरकारने काही व्यवहारांवरील TCS (Tax Collected at Source) वाढवले आहेत. मद्य विक्रीवर TCS – 1% वरून 2% करण्यात आलाये तर भंगार (Scrap) विक्रीवर – 1% वरून 2% टीसीएस भरावे लागणार आहेय. याचबरोबर कोळसा, लिग्नाइट आणि लोखंड खनिजांवर 2% टीसीएस असणार आहेय. मात्र दिलासा म्हणजे तेंदू पानांवरील TCS 5% वरून 2% करण्यात आलाय. परदेश प्रवास करणाऱ्यांना दिलासा परदेशात फिरायला जाणाऱ्यांसाठी LRS अंतर्गत विदेशी टूर पॅकेजवर TCS आता फक्त 2% असेल.पूर्वी हा कर 5% ते 20% दरम्यान होता. तसेच शिक्षण आणि वैद्यकीय उपचारासाठी परदेशात पाठवलेल्या पैशांवरही TCS 5% वरून 2% करण्यात आलाय. शेअर बाजारातील F&O ट्रेडर्सना धक्का शेअर बाजारात Futures आणि Options मध्ये ट्रेड करणाऱ्यांसाठी खर्च वाढणार आहेय. Futures वर STT 0.02% वरून 0.05% तर Options वर STT0.1% वरून 0.15% यामुळे डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग महाग होणार आहे. Buyback आणि Dividend वर नवीन नियम शेअर बायबॅकवर आता नवीन कर प्रणाली लागू होणार आहेय.1 एप्रिल 2026 पासून Buyback मधील उत्पन्नावर Capital Gains Tax लागेल. पूर्वी ते Dividend मानले जात होते. तसेच Dividend मिळवण्यासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाची 20% वजावट आता मिळणार नाही. याचा अर्थ संपूर्ण Dividend रकमेवर कर भरावा लागेल.

1st April Rules: आयकर कायद्यात बदल अन् शेअर बाजारात गुंतवणूकदारांना धक्का; 1 एप्रिलपासून देशात काय बदलणार? Read More »