Ahilyanagar Accident : वाळुंज बायपास परिसरात रविवारी दुपारी सुमारे चारच्या सुमारास एसटी बस आणि वऱ्हाडाची स्कूल बस यांच्यात भीषण अपघात झाला. भरधाव वेगात येणाऱ्या एसटी बसने स्कूल बसला जोराची धडक दिल्याने २०ते २१ जण जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वऱ्हाड चिंचोडी पाटील येथील नागरिक लग्न समारंभ आटोपून परत येत असताना वाळुंज उड्डाणपुलाखाली हा अपघात घडला. धडकेचा आवाज इतका जोरदार होता की परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्वतः पुढाकार घेत चार जखमींना आपल्या वाहनातून जवळील खाजगी रुग्णालयात दाखल केले. उर्वरित पाच जखमींना ॲम्ब्युलन्सद्वारे उपचारासाठी हलविण्यात आले.
स्थानिक नागरिक आणि मदतकार्यकर्त्यांनी जखमींना बाहेर काढून तातडीने मदत केली. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.





