Anjali Damania : राज्यात महसूल वाढवण्यासाठी महायुती सरकारकडून नवीन वाईन शॉप परवाने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून राज्य सरकारवर टीका करताना दिसत आहे.
राज्यात नवीन वाईन शॉप परवाने देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी यासाठी नवीन धोरण आणले आहे. मात्र, या धोरणातून निवडक नेत्यांचाच फायदा होत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर राज्य सरकारवर टीका होत आहे.
भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) या तीन पक्षांमधील अवघ्या 12 नेत्यांच्या कंपन्यांकडे तब्बल 96 परवाने जाणार आहेत. त्यापैकी भाजपच्या 5 नेत्यांकडे 40 परवाने, तर दोन्ही राष्ट्रवादी गटातील 7 नेत्यांकडे तब्बल 56 परवाने जाणार आहेत.
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे. “हे शासन निधीसाठी आहे की नेत्यांना गडगंज करण्यासाठी?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दमानिया यांनी यावरून सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.