Ahilyanagar News : बोल्हेगाव (अहिल्यानगर) येथील जमीन क्रमांक 34/3 च्या विक्री व्यवहारात कृषीच्या आडून अकृषिक जमीन विकण्याचा प्रकार समोर आला आहे. हा केवळ जमिनीचा व्यवहार नसून सत्ताधारी वरदहस्त आणि स्थानिक प्रशासनातील हलगर्जीपणा यांचा थेट पुरावा म्हणावा लागेल.
मिलिंद बाबासाहेब कोरडे यांनी संबंधित व्यवहारात फसवणुकीचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यावर तहसील कार्यालयाने नियमांची पुस्तके उघडून विविध शाखांना अहवाल मागवले कुळकायदा संकलन, गौणखनिज विभाग, महसूल खाते… सर्वांनी आपले कर्तव्य निभावल्याचे दाखवत पत्रव्यवहारांचा ढिगारा तयार केला. पण थेट कारवाई शून्य.
विशेष म्हणजे, ड्रेनेज, रस्ते, गटारीसाठी वापरलेल्या गौणखनिजांची चलने सादर करण्यास सांगण्यात आलेले असतानाही संबंधितांनी ती सादर केली नाहीत. तलाठ्यांमार्फत नोटीस बजावली गेली, तरीही दुर्लक्ष. महाखनिज प्रणालीवरही परवानगी नोंदली गेल्याचा ग ना बाबद नोंदी आढळून येत नाही. हे सर्व घडत असतानाही प्रशासन ‘बघ्याची भूमिका’ घेत आहे.
खरा प्रश्न असा आहे की, जेव्हा स्पष्ट पुरावे, अहवाल आणि नियमभंग समोर आहे, तेव्हा कारवाई टाळण्यामागे नेमकं कोण आहे? स्थानिक पातळीवरील काही कर्मचाऱ्यांना ‘सिस्टिम’चा आधार वाटतो कारण त्यांच्या पाठिशी उभे असतात वरिष्ठ अधिकारी वा राजकीय हात. इथेही तसाच प्रकार घडत असल्याची चर्चा आहे.
लोकांनी कायद्याचा आधार घेतला, पण कायदा प्रशासनाच्या फाईलमधून बाहेरच पडलेला नाही. हे चित्र धोक्याचं आहे. कारण जेव्हा कायदा दुर्लक्षित होतो, तेव्हा लोकशाही कमकुवत होते.