DNA मराठी

Parth Pawar

devendra fadnavis

Devendra Fadnavis: मंत्र्यांच्या निर्णयावर आता मुख्यमंत्र्यांचा ‘अंकुश’; CM फडणवीसांना विशेष अधिकार, जाणून घ्या नेमकं काय बदललं?

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या प्रशासन आणि सरकारच्या निर्णयप्रक्रियेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. एखाद्या मंत्र्याने घेतलेला निर्णय व्यापक जनहिताच्या दृष्टीने योग्य नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाटल्यास त्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचा अधिकार आता मुख्यमंत्र्यांना मिळाला आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडून नवीन शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे मंत्र्यांच्या विभागीय निर्णयांवर मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण अधिक मजबूत होणार आहे. मुख्यमंत्र्यांना नेमका कोणता अधिकार? नव्या तरतुदीनुसार, एखाद्या मंत्र्याने आपल्या विभागाशी संबंधित निर्णय घेतला आणि तो निर्णय राज्याच्या व्यापक जनहिताच्या विरोधात असल्याचे मुख्यमंत्र्यांना वाटले, तर मुख्यमंत्री त्या निर्णयात हस्तक्षेप करू शकतात. गरज भासल्यास संबंधित निर्णय बदलणे, रद्द करणे किंवा त्यावर पुनर्विचार करण्याचे निर्देश देणे शक्य होणार आहे. त्यामुळे एखाद्या विभागातील निर्णय हा केवळ संबंधित मंत्र्याच्या पातळीवर अंतिम राहणार नाही. मोठ्या सार्वजनिक हिताचा मुद्दा असल्यास मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेऊ शकतील. मंत्र्यांचे अधिकार संपणार का? या निर्णयाचा अर्थ मंत्र्यांचे विभागीय अधिकार संपुष्टात येणार असा नाही. प्रत्येक मंत्री आपल्या खात्याचे कामकाज पाहणार असून, संबंधित विषयांवर निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरूच राहणार आहे. मात्र, एखाद्या निर्णयाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर जनतेवर होणार असेल किंवा तो सरकारच्या व्यापक धोरणाशी विसंगत असल्याचे मुख्यमंत्र्यांना वाटत असेल, तर त्या निर्णयावर मुख्यमंत्री हस्तक्षेप करू शकतील. त्यामुळे मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यातील निर्णयप्रक्रियेत मुख्यमंत्र्यांची भूमिका अधिक प्रभावी होणार आहे. कॅबिनेटच्या मंजुरीशिवाय हस्तक्षेप शक्य या निर्णयातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांना प्रत्येक वेळी स्वतंत्रपणे मंत्रिमंडळाची पूर्वमंजुरी घेण्याची गरज नसल्याचे वृत्त आहे. म्हणजेच एखाद्या मंत्र्याच्या निर्णयाबाबत जनहिताचा प्रश्न निर्माण झाल्यास मुख्यमंत्री थेट हस्तक्षेप करू शकतात. यामुळे निर्णयप्रक्रियेत एखादा महत्त्वाचा विषय रखडल्यास त्यावर मुख्यमंत्री पातळीवर तातडीने निर्णय घेण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. निर्णयप्रक्रिया अधिक केंद्रीकृत होणार? या बदलामुळे महाराष्ट्र सरकारच्या निर्णयप्रक्रियेत मुख्यमंत्रिपदाचे महत्त्व आणखी वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत विविध विभागांचे मंत्री आपापल्या खात्याशी संबंधित निर्णय घेत होते. मात्र, आता व्यापक जनहिताचा मुद्दा पुढे करून मुख्यमंत्री त्या निर्णयांवर थेट नियंत्रण ठेवू शकतील. सरकारच्या दृष्टीने पाहिल्यास यामुळे विविध विभागांमध्ये समन्वय वाढवणे, धोरणांमध्ये एकसंधता ठेवणे आणि महत्त्वाचे निर्णय जलदगतीने घेणे शक्य होऊ शकते. दुसरीकडे, अधिकारांचे केंद्रीकरण कितपत योग्य आहे, यावर प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप कोणत्या परिस्थितीत? प्रत्येक मंत्र्याचा प्रत्येक निर्णय मुख्यमंत्री बदलतील, असा या निर्णयाचा सरळ अर्थ नाही. ‘व्यापक जनहित’ हा या अधिकाराचा महत्त्वाचा आधार आहे. म्हणजेच एखादा निर्णय राज्याच्या मोठ्या जनसमूहावर परिणाम करणारा असेल, सरकारच्या व्यापक धोरणाशी संबंधित असेल किंवा त्यातून सार्वजनिक हिताला बाधा येत असल्याचे मुख्यमंत्र्यांना वाटत असेल, तर मुख्यमंत्री त्या निर्णयाची दखल घेऊ शकतात. त्यामुळे या अधिकाराचा प्रत्यक्ष वापर कोणत्या प्रकरणांमध्ये आणि कोणत्या पद्धतीने केला जातो, हे आगामी काळात महत्त्वाचे ठरणार आहे. प्रशासनात काय परिणाम होऊ शकतो? या बदलामुळे मंत्र्यांच्या विभागांमध्ये घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर मुख्यमंत्री कार्यालयाची नजर अधिक प्रभावी होऊ शकते. विशेषतः दोन विभागांमध्ये एखाद्या विषयावर मतभेद असल्यास किंवा एखाद्या निर्णयाचा राज्यव्यापी परिणाम होणार असल्यास मुख्यमंत्री मध्यस्थी करू शकतील. यामुळे सरकारच्या निर्णयांना एकसंध दिशा देण्यास मदत होऊ शकते, असा सरकारचा दृष्टिकोन असू शकतो. मात्र, दुसरीकडे प्रत्येक विभागाला स्वतंत्रपणे काम करण्याचे स्वातंत्र्य आणि मंत्र्यांची जबाबदारी यावरही या बदलाचा परिणाम होऊ शकतो. राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांच्या निर्णयावर हस्तक्षेपाचा अधिकार मिळाल्याने या निर्णयाचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्री यांच्यात एखाद्या निर्णयावर मतभेद निर्माण झाल्यास अंतिम निर्णयाची दिशा आता अधिक स्पष्टपणे मुख्यमंत्री पातळीवर जाऊ शकते. विरोधकांकडून या अधिकाराच्या केंद्रीकरणावर प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. तर सरकारकडून जनहित, प्रशासनातील समन्वय आणि निर्णयप्रक्रियेला गती देण्यासाठी हा बदल आवश्यक असल्याचे सांगितले जाऊ शकते.

Devendra Fadnavis: मंत्र्यांच्या निर्णयावर आता मुख्यमंत्र्यांचा ‘अंकुश’; CM फडणवीसांना विशेष अधिकार, जाणून घ्या नेमकं काय बदललं? Read More »

sunetra pawar dcm

Sunetra Pawar: रेवती सुळे यांच्या रिसेप्शनला सुनेत्रा पवार अनुपस्थित; कारण काय?

Sunetra Pawar: खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या दिल्लीतील लग्नाच्या रिसेप्शनला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अनुपस्थित राहिल्याने राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे या कार्यक्रमाला पार्थ पवार आणि जय पवार उपस्थित होते. त्यामुळे सुनेत्रा पवार नेमक्या का गैरहजर राहिल्या? याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू झाले होते. रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाहानंतर सोमवारी दिल्लीत रिसेप्शनचा भव्य कार्यक्रम पार पडला. हा सोहळा राजकीयदृष्ट्या विशेष चर्चेचा ठरला. देशातील अनेक प्रमुख राजकीय नेत्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. पवार कुटुंबातीलही अनेक सदस्य या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पार्थ आणि जय पवार उपस्थित, पण सुनेत्रा पवार गैरहजर रिसेप्शनमध्ये पार्थ पवार आणि जय पवार दोघेही उपस्थित होते. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या अनुपस्थितीने विशेष लक्ष वेधून घेतले. सुनेत्रा पवार सोमवारी दिवसभर पुण्यात होत्या आणि त्यानंतर रात्री उशिरा मुंबईत दाखल झाल्या. त्यामुळे त्या दिल्लीला का गेल्या नाहीत, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातही चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यांच्या गैरहजेरीमागे कोणतेही राजकीय कारण असल्याचे स्पष्ट झालेले नाही. अनिल पाटील यांनी दिलं स्पष्टीकरण या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री अनिल पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुनेत्रा पवार यांचे काही कार्यक्रम आधीपासूनच निश्चित होते. त्यामुळे रेवती सुळे यांच्या रिसेप्शनला त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत. अनिल पाटील यांनी विशेषतः सांगितले की, या अनुपस्थितीचा वेगळा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. रेवती सुळे यांच्या लग्नाच्या मुख्य कार्यक्रमाला सुनेत्रा पवार पूर्णवेळ उपस्थित होत्या. कुटुंबातील इतर कार्यक्रमांमध्येही त्या सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे लग्नाला उपस्थित राहिल्यानंतर रिसेप्शनलाही उपस्थित राहणे बंधनकारक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Sunetra Pawar: रेवती सुळे यांच्या रिसेप्शनला सुनेत्रा पवार अनुपस्थित; कारण काय? Read More »

parth pawar

Parth Pawar: पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यात वाद होण्याचा प्रश्नच येत नाही

Parth Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत पार पडलेल्या बैठकीत राज्याचे मंत्री छगन भुजबळ आणि खासदार पार्थ पवार यांच्या वाद झालं असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र ही केवळ चर्चा असून बैठकीत दोघांमध्ये कुठलाही वाद झाला नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील दिली आहे. मंत्री छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांनी माध्यमांमध्ये आलेल्या बातम्याबाबत योग्य तो खुलासा केला आहे. ज्या बातम्या येत आहेत त्या सुत्रांच्या हवाले येत आहेत. एकतर्फी आणि नकारात्मक बातम्या पार्थ पवार किंवा पक्षाबद्दल दिल्या जात आहेत. मात्र दुसरी बाजू माध्यमांनी समजून घेतली पाहिजे अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी माध्यमांसमोर दिल्ली येथे मांडली. गेले तीन दिवस पार्थदादा पवार आणि राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार या दिल्लीत बैठकीला आहेत. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी बैठका घेत आहेत. मात्र अशी कोणतीही चर्चा झाली नसताना बातमी आली आहे असेही उमेश पाटील म्हणाले. प्रत्येक बातमी तुमची सुत्रांकडून येत आहे. कोणतीही पुराव्याची बातमी लावलेली नाही. त्यामुळे सुत्रांकडून आलेल्या बातम्या तुम्ही लावाव्या का असा सवालही उमेश पाटील यांनी उपस्थित केला आहे. पार्थ पवार यांच्याकडे नवीन जबाबदाऱ्या आल्या आहेत त्यामुळे त्यांना त्या नवीन आहेत. सुत्रांच्या हवाले बातम्या येणे योग्य नाही. आम्हाला कोण टार्गेट करतंय असं आम्हाला वाटत नाही. मात्र खात्री किंवा पुरावा असल्याशिवाय बातम्या लावणं चुकीचं आहे असेही उमेश पाटील म्हणाले.

Parth Pawar: पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यात वाद होण्याचा प्रश्नच येत नाही Read More »

sunetra pawar

Sunetra Pawar: राष्ट्रवादीत अंतर्गत वाद नाहीच…, पक्षाकडून मोठा दावा

Sunetra Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद आणि संघटनात्मक बदलांच्या चर्चांना अखेर पक्षाकडून अधिकृत उत्तर देण्यात आले. पक्षाचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक आणि सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत पक्षातील कोणतेही मोठे बदल झाले नसल्याचा दावा केला. विरोधकांकडून जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात असून पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. अविनाश आदिक म्हणाले की, “अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष असताना मी पक्षाचा राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियमित काम पाहत होतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे काही काळ दिल्ली कार्यालयात जाणे झाले नाही. मात्र, दिल्लीतील पक्ष कार्यालयात प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासाठी वेगळे दालन कधीच नव्हते. पूर्वी जिथे बसायचे, आजही तिथेच बसतील. माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांमुळे पक्ष आणि नेत्यांची विनाकारण बदनामी होत असून याप्रकरणी कायदेशीर कारवाईचा विचार केला जाईल.” तसेच ही पत्रकार परिषद पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार घेण्यात आली आहे. उमेश पाटील यांनीही पक्षातील नेतृत्वाबाबत कोणताही बदल झालेला नसल्याचे स्पष्ट केले. “प्रफुल पटेल आजही राष्ट्रीय कार्यकारिणीत आहेत आणि सुनील तटकरे हेच प्रदेशाध्यक्ष आहेत. निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेली यादी तात्पुरती होती. घाईगडबडीत वकिलाला पत्र द्यायचे असल्याने ती पाठवण्यात आली,” असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी पक्षातील सर्व अधिकार वर्किंग कमिटीकडे असल्याचे सांगत, “लवकरच पक्षाच्या वर्किंग कमिटीची बैठक होणार असून त्यात सर्व विषयांवर चर्चा करून निर्णय घेतले जातील,” असे स्पष्ट केले. तसेच “सर्व अधिकार हे सुनेत्रा पवार यांच्याकडेच आहेत,” असेही त्यांनी नमूद केले. महायुतीतील समन्वयाच्या मुद्द्यावर बोलताना उमेश पाटील यांनी आनंद परांजपे यांच्या पक्षप्रवेशावर नाराजी व्यक्त केली. “महायुतीमध्ये एकमेकांचे पक्ष फोडायचे नाहीत, असे ठरले असतानाही आनंद परांजपे यांचा पक्षप्रवेश करण्यात आला. आता एवढेच सांगतो, आहेत तिथे सुखी राहा,” असा टोला त्यांनी लगावला. पक्षाच्या आर्थिक व्यवहारांबाबत रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरही त्यांनी उपरोधिक प्रतिक्रिया दिली. “पक्षाचा खर्च ब्युटी पार्लरवर झाला की शौचालयावर, हे आम्ही पाहून घेऊ. घरात नवरा-बायको किंवा पालक-मुलांमध्येही खर्चाबाबत प्रश्न विचारले जातात,” असे ते म्हणाले. याच पत्रकार परिषदेत उमेश पाटील यांनी रोहित पवार यांच्याबाबतही मोठा दावा केला. “२०१५-१६ मध्ये रोहित पवार यांनी विधानसभेचे तिकीट मिळावे यासाठी पवार कुटुंबियांवर दबाव टाकला होता. तिकीट न मिळाल्यास भाजपमध्ये जाऊन निवडणूक लढवण्याची त्यांची तयारी होती,” असा गौप्यस्फोट त्यांनी केला. या पत्रकार परिषदेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आणखी चव्हाट्यावर आली असून आगामी वर्किंग कमिटी बैठकीकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Sunetra Pawar: राष्ट्रवादीत अंतर्गत वाद नाहीच…, पक्षाकडून मोठा दावा Read More »

parth pawar

Parth Pawar : मुंढवा जमीन प्रकरण; पार्थ पवारांवर पोलीस तपासाची टांगती तलवार कायम

Parth Pawar : मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात खारगे समिती ने आपला ४,३९२ पानांचा विस्तृत अहवाल सादर केला असून राजकीय वर्तुळात नवे वादळ निर्माण झाले आहे . महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पार्थ पवार यांना थेट जबाबदार ठरवले नसले तरी, त्यांच्या कंपनीशी संबंधित व्यवहारावर पोलीस तपासाची टांगती तलवार कायम ठेवली आहे. खारगे समितीने स्पष्ट केले की, चौकशी प्रामुख्याने दिवाणी स्वरूपाच्या बाबींवर (जमीन हस्तांतरण, मुद्रांक शुल्क, अनियमितता) केंद्रित होती. फौजदारी स्वरूपाच्या मुद्द्यांवर भाष्य करणे किंवा चौकशी करणे हे समितीच्या कार्यकक्षेत नव्हते. त्यामुळे समितीने कोणत्याही फौजदारी निष्कर्षापर्यंत जाणे टाळले आहे. मात्र महत्त्वाची टिप्पणी करताना स्पष्ट केले कि,या प्रकरणात आणखी कोणी सामील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्यास, ते देखील घोटाळ्यास जबाबदार धरले जाणार आहे.त्यामुळे खासदार पार्थ पवार यांच्यावर पोलीस कारवाईची टांगती तलवार कायम आहे. समितीने फौजदारी जबाबदारी पूर्णपणे पुणे पोलिसांवर सोपवली आहे. कोरेगाव पार्क परिसरातील मुंढवा येथील सुमारे ४० एकर सरकारी (महार वतन)जमीन बाजारभावाने १,८०० कोटी रुपयांची असताना, मेसर्स अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी कंपनीला अवघ्या ३०० कोटी रुपयांमध्ये (२१ कोटी मुद्रांक शुल्क माफीसह) विकण्याचा प्रयत्न झाला होता. या कंपनीत पार्थ पवार यांचा ९९ टक्के हिस्सा असल्याचे समोर आले. समितीने या व्यवहाराला नियमबाह्य आणि बेकायदेशीर’ ठरवले असून, खरेदी दस्त नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली असून समितीने स्पष्ट नावे घेतली. शीतल तेजवाणी, अशोक गायकवाड व इतर २७१ कुळांच्या वतीने कुलमुखत्यारधारक. – दिग्विजय अमरसिंह पाटील – अमेडिया कंपनीकडून जमीन खरेदी करणारे (पार्थ पवार यांचे चुलत भाऊ/नातेवाईक). – रवींद्र तारू (सहाय्यक उपनिबंधक). – सूर्यकांत येवले (पूर्वीचे पुणे तहसीलदार).वरील चौघांवर दोन गुन्हे दाखल झाले असून, त्यांच्याविरुद्ध बडतर्फीची प्रक्रिया सुरू आहे. बोपोडी जमीन प्रकरणातही येवले यांनी असाच नियमबाह्य आदेश दिल्याचा उल्लेख अहवालात आहे. अमेडिया कंपनीने २१ कोटी मुद्रांक शुल्क भरण्याच्या आदेशाविरुद्ध अपील दाखल केले आहे. समितीने दोन महिन्यांत निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, ही जमीन अद्याप शासकीय आहे. तिचा ताबा भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था (BSI) कडे आहे. सरकारने विहीत प्रक्रिया राबवून ही जमीन कायमस्वरूपी BSI ला देण्याची कारवाई दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे ठरवले आहे. विकास खारगे समितीने पार्थ पवार यांचा थेट उल्लेख करणं टाळला आहे. कारण व्यवहाराच्या दस्तऐवजांवर त्यांची स्वाक्षरी नव्हती. यामुळे विरोधकांकडून ‘क्लिन चीट’ दिल्याची टीका होत असली तरी, वास्तव वेगळे आहे. ९९ टक्के मालकी असलेल्या कंपनीच्या फायद्यात अप्रत्यक्षपणे त्यांचा संबंध येतो. समितीने फौजदारी जबाबदारी पोलिसांकडे ढकलून, सदर प्रकरणात ‘आणखी कोणी सामील आहे का’ याबाबत चौकशीचा मार्ग खुला ठेवला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी विधानसभेत हा अहवाल सादर केला असून सरकारने तो स्वीकारला देखील आहे. मात्र आता पोलीस तपास किती सखोल आणि निष्पक्ष होईल? दिग्विजय पाटील यांच्या नंतर तपास पुढे सरकत पार्थ पवार यांच्यापर्यंत तो पोहोचेल का? मुंढवा प्रकरण पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सरकारी जमिनींच्या संरक्षणात यंत्रणेची उदासीनता आणि राजकीय-प्रशासकीय संबंधांचे जाळे उघड करते. सरकारी ‘महार वतन’ जमीन इतक्या स्वस्तात खासगी हाती कशी गेली, याचे उत्तर अद्याप पूर्णपणे मिळालेले नाही. पोलिस तपास, मुद्रांक अपीलाचा निर्णय आणि BSI ला जमीन हस्तांतरण याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. हा अहवाल केवळ प्रशासकीय अपयश दाखवतो की, त्यापलीकडे मोठ्या घोटाळ्याची पाळेमुळे शोधण्याची सुरुवात आहे का हे महत्वाचे असणार आहे.

Parth Pawar : मुंढवा जमीन प्रकरण; पार्थ पवारांवर पोलीस तपासाची टांगती तलवार कायम Read More »

sunetra pawar

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा; राष्ट्रवादीकडून मोठी मागणी

Sunetra Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री कोण होणार याबाबत सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मोठी मागणी केल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. माध्यमांशी बोलताना सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करा अशी मागणी मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली आहे. या मागणीमुळे आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. माध्यमांशी बोलताना मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, दादांनी हा पक्ष रक्ताचं पाणी करून उभा केला. आज तो टिकवायचा असेल तर पवार कुटुंबातील व्यक्तीच पुढे हवी. सुनेत्रा वहिनींना मंत्रिमंडळात स्थान देऊन उपमुख्यमंत्री करणे ही कार्यकर्त्यांची प्रामाणिक भावना आहे. वरिष्ठ नेत्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा. सुनेत्रा पवार सध्या राज्यसभा खासदार आहेत. त्यांना राज्य राजकारणात आणून उपमुख्यमंत्री केल्यास विधानसभा निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांमध्ये मोठी एकजूट आणि भावनिक लाट निर्माण होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर दुसरीकडे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या या मागणीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, नवाब मलिक काय भूमिका घेणार याकडे देखील आता सर्वांचे लक्ष लागून आहे. तर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्यामुळे महायुतीला मिळालेला नवीन वोट बँक टिकवण्यासाठी देखील लवकरात लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा लागणार आहे. तसेच अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि जय पवार राजकारणात एन्ट्री करणार का? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा; राष्ट्रवादीकडून मोठी मागणी Read More »

vijay kumbhar

Vijay Kumbhar : पार्थ पवारांना दिलेली “क्लिन चिट” म्हणजे केवळ विनोद; मुंढवा जमीन प्रकरणात विजय कुंभार भडकले

Vijay Kumbhar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार सध्या राज्यातील राजकारणात चर्चेत आहे. पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्यात त्यांचा नाव आल्याने पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी विरोधक करत आहे. तर आता मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना दिलेली “ क्लिन चिट” म्हणजे केवळ विनोद नाही तर ते महाराष्ट्राचं प्रशासन रसातळाला गेल्याचं लक्षण आहे अशी टीका सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे. विजय कुंभार म्हणाले की, मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना दिलेली “ क्लिन चिट” म्हणजे केवळ विनोद नाही तर ते महाराष्ट्राचं प्रशासन रसातळाला गेल्याचं लक्षण आहे. घोटाळ्याची सुरुवात ज्यातून झाली त्या LLP च्या ठरावावर त्यांची स्वतःची सही आहे. – जिल्हा उद्योग केंद्राकडून LOI – करोडोंच्या स्टॅम्प ड्युटीतून सूट – रजिस्ट्रेशनची सर्व प्रक्रिया प्रत्येक कागद त्यांच्या स्वाक्षरीमुळे शक्य झाला आणि तरीही ते “निर्दोष”! ही चौकशी नाही. हे प्रशासनाने राजकारण्यांशी – घराणेशाहीशी केलेलं संगनमत आहे. कागदपत्रांचा मार्ग सुरू होतो आणि संपतो तो पार्थ पवारांवर त्यामुळे क्लिन चिट देणं म्हणजे त्या व्यवहारात थेट सहभागी असणं असं विजय कुंभार यांनी म्हटले आहे.

Vijay Kumbhar : पार्थ पवारांना दिलेली “क्लिन चिट” म्हणजे केवळ विनोद; मुंढवा जमीन प्रकरणात विजय कुंभार भडकले Read More »

Vijay Wadettiwar

Vijay Wadettiwar on Pune land Case : मुंढवा जमीन घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल करा; विजय वडेट्टीवारांची मागणी

Vijay Wadettiwar on Pune land Case :   पुणे मुंढवा येथील कोट्यवधी रुपयांच्या शासकीय जमिनीचा बेकायदेशीर व्यवहार काही निवडक खाजगी व्यक्ती आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने करण्यात आला असून, शासनाच्या मालकीची जमीन हडपण्याचा हा सुनियोजित कट होता.या  गैरव्यवहारात सहभागी असलेल्या सर्व अधिकारी व लाभार्थ्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र लिहून वडेट्टीवर यांनी मागणी केली. या प्रकरणातील गंभीर बाबी म्हणजे २४ ऑक्टोबर १९७३ रोजी ही जमीन ‘वनस्पती सर्वेक्षण विभाग’ यांना वार्षिक रु. १/- भाड्याने १५ वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यात आली होती. नंतर ३१ मार्च २०३८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ३० डिसेंबर २०२४ रोजी  शीतल तेजवानी यांनी कोणताही अधिकृत शासन निर्णय, तहसीलदार किंवा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश नसतानाही, व्याजासह फक्त रु. ११ हजार ही रक्कम ‘जमीन धारकत्व मूल्य’ म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली. अधिकाऱ्यांनी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता ही रक्कम स्वीकारली. २० मे २०२५ रोजी विक्रीपत्र नोंदविण्यात आले. त्यात जमिनीच्या मालकीचा पुरावा, मोबदला बाजार मूल्य, स्टॅम्प ड्युटी याचा कोणताही उल्लेख नाही. सिटीसर्वे मिळकत पत्रिका उपलब्ध असतानाही, केवळ जुन्या ७/१२ उताऱ्यावर आधारित दस्त नोंदविण्यात आला. नोंदणी अधिकारी आणि तहसीलदार यांनी संगनमताने शासकीय जमीन खाजगी व्यक्तीकडे हस्तांतरित करण्याचे गैरकृत्य केले. ०९ जून २०२५ रोजी तहसीलदार सुर्यकांत येवले यांनी कोणताही तपास न करता अमेडिया कंपनीच्या मागणीनुसार BSI ला जागा रिकामी करण्याचे आदेश दिले. याच अधिकाऱ्यावर याआधी बोपोडी येथील प्रकरणात गुन्हा दाखल आहे, अस वडेट्टीवर यांनी पत्रात नमूद केले  आहे. शासकीय जमिनीवर बेकायदा ताबा घेण्यासाठी लाभार्थ्यांना अनुकूल अशी भूमिका तहसीलदाराने घेतली. वतनाच्या जमिनी हस्तांतरित करण्यासंबंधीच्या २०२१ च्या शासन आदेशाचे उल्लंघन करून, शासनाची पूर्वपरवानगी नसतानाही बेकायदेशीरपणे जमीन धारकत्व मूल्य स्वीकारले. इलीजिबीलिटी प्रमाणपत्र न घेता, स्टॅम्प ड्युटी व मूल्यांकन नियम मोडून आणि केवळ लेटर ऑफ इन्टेन्टवर सवलत देऊन बेकायदा दस्त नोंदणी करण्यात आली. लाभार्थी  शीतल तेजवानी आणि अमेडिया कंपनीने खोटे कागदपत्रे आणि चुकीची ओळख वापरून शासकीय जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवर यांनी केला आहे. सगळ्यात महत्वाची बाब, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनाने समिती नेमली,त्यातील काही अधिकारी हेच आधीच्या बेकायदेशीर व्यवहारांमध्ये गुंतलेले आहेत. यामुळे नेमलेली चौकशी निष्पक्ष चौकशी करणार नाही, समिती रद्द करणे आवश्यक आहे. हा केवळ प्रशासकीय गैरव्यवहार नसून, शासनाच्या कोट्यवधी रुपये किमतीच्या मालमत्तेचा नियोजनबद्ध अपहार आहे. त्यामुळे मुंढवा प्रकरणमधील सर्व बेकायदेशीर व्यवहार, आदेश व विक्रीपत्रे तात्काळ रद्द करावीत. सर्व संबंधित अधिकारी आणि लाभार्थी, अमेडिया कंपनी यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंदवण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रात केली. या प्रकरणी वडेट्टीवर यांनी महसूल मंत्री बावनकुळे आणि मुख्य सचिवाना देखील पत्र लिहिले आहे. या प्रकरणातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करून त्यांची विभागीय चौकशी सुरु करावी. गैरव्यवहार झालेली जमीन शासनाच्या ताब्यात घ्यावी. याच अधिकाऱ्यांनी आणखी कोणत्या सरकारी व खाजगी जमिनी बळकावल्या आहेत, याची स्वतंत्र सखोल चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवारा यांनी केली आहे.

Vijay Wadettiwar on Pune land Case : मुंढवा जमीन घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल करा; विजय वडेट्टीवारांची मागणी Read More »

parth pawar

Parth Pawar Land Case : मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; महिनाभरात मुंढवा जमीन प्रकरणी चौकशी अहवाल सादर होणार

Parth Pawar Land Case : पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात अनियमिततेतील आरोपांची चौकशी करण्यासाठी महसूल, मुद्रांक व नोंदणी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची चौकशी समिती सरकारने स्थापन केली. यासंदर्भातील शासन आदेश जारी झाला असून, समितीला एक महिन्यात अहवाल द्यायचा आहे. पुणे शहरातील मुंढवा येथील सर्वे नंबर 88 मधील जमिनीच्या दस्ताच्या खरेदी-विक्री व्यवहार अनियमितता झाल्याचा प्रकार विविध प्रसिद्धी माध्यमांद्वारे समोर आला आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी होणे आवश्यक असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंंद्रशेखर बावनकुळे यांनी समिती स्थापन केली. महसूल, मुद्रांक व नोंदणी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीत पुणे विभागीय आयुक्त, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे जिल्हाधिकारी व मुद्रांक विभागाचे सहसचिव असे पाच सदस्य आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, चौकशी समितीला प्रस्तुत प्रकरणात नेमकी अनियमितता झाली आहे किंवा नाही, याबाबत सखोल चौकशी करणे, अनियमितता झाल्याचे आढळल्यास, त्यासाठी जबाबदार असलेल्या संबंधितांवर जबाबदारी निश्चित करणे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस शासनाकडे करणे, अनियमितता सिद्ध झाल्यास, सदर जमीन तिच्या मूळ स्थितीवर (पूर्वःस्थितीवर) आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुचविणे, तसेच भविष्यात अशा प्रकारची प्रकरणे पुन्हा घडू नयेत, यासाठी ठोस उपाययोजना सुचविण्यास सांगण्यात आले आहे.

Parth Pawar Land Case : मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; महिनाभरात मुंढवा जमीन प्रकरणी चौकशी अहवाल सादर होणार Read More »

sheetal tejwani

Sheetal Tejwani : कोरेगाव पार्क जमीन प्रकरण : शीतल तेजवानीचा संशयास्पद भूतकाळ समोर…

Sheetal Tejwani : कोरेगाव पार्क परिसरातील सुमारे 40 एकरांचा भूखंड बेकायदेशीररीत्या लाटल्याप्रकरणी अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील यांच्या ‘अमेडिया कंपनी’चे नाव समोर येत आहे. या व्यवहाराबाबत सह जिल्हा निबंधक (वर्ग 1) संतोष अशोक हिंगाणे यांनी बावधन पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, जमीन विक्रेता शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील, तसेच सह दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य व्यक्ती ठरलेली शीतल तेजवानी हिच्याबद्दल आता नव्या आणि चक्रावून टाकणाऱ्या बाबी उघडकीस येत आहेत. प्राप्त माहितीनुसार, संबंधित 40 एकरांचा भूखंड हा मूळतः बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताब्यात होता. सरकारी ताब्यातील ही जमीन सोडवून तिच्या विक्रीसाठी तेजवानीने युक्ती रचल्याचे तपासात समोर आले आहे. तिने मूळ 272 मालकांना शोधून त्यांच्याकडून नाममात्र 10 ते 15 हजार रुपयांच्या मोबदल्यात कधीही रद्द न होणारी पॉवर ऑफ अटर्नी (POA) आपल्या नावावर घेतल्याचे समोर आले आहे. या व्यवहाराचा पाया हाच फसवणुकीवर आधारलेला असल्याचे तपास अधिकाऱ्यांच प्राथमिक निरीक्षण आहे. याच पार्श्वभूमीवर, 2025 साली तेजवानीने ‘अमेडिया कंपनी’च्या भागीदारीबद्दल माहिती मिळवून पुढील आर्थिक गणित आखले, असे सांगितले जाते. या कंपनीत पार्थ पवार यांचा 99 टक्के, तर दिग्विजय पाटील यांचा 1 टक्का हिस्सा आहे. हे गिऱ्हाईक लाभदायक ठरेल, हे लक्षात घेऊन तेजवानीने पुढील व्यवहार रचल्याची चर्चा आहे. मात्र, शीतल तेजवानीचा भूतकाळही संशयास्पद असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिचा पती सागर सूर्यवंशी हा सेवा विकास सहकारी बँक घोटाळ्याचा आरोपी असून, त्याची चौकशीदेखील झाल्याची नोंद आहे. या दाम्पत्यावर तब्बल 100 कोटी रुपयांहून अधिकचे कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. दस्तऐवजनुसार, सागर सूर्यवंशीने ‘रेणुका लॉन्स’च्या नावावर दोन वाहन कर्जे आहेत एक 1.16 कोटी आणि दुसरे 2.24 कोटी रुपये घेतली आहेत. शीतल तेजवानीनेही दोन वाहनांसाठी 4.80 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे नोंदीत आढळते. त्याशिवाय सागर सूर्यवंशीने ‘सागर लॉन्स’च्या नावावर 16.48 कोटींचे कॅश क्रेडिट कर्ज, तर शीतल तेजवानीवर स्वतंत्र 10 कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे समोर आले आहे. तिच्या ‘पॅरामाउंट इन्फ्रा’ या कंपनीवर 5.95 कोटी, तर ‘रेणुका लॉन्स’च्या नावावर आणखी 5.25 कोटींचे कर्ज असल्याने, या दाम्पत्याची एकत्रित थकबाकी कोट्यवधी रुपयांत गेल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, शीतल तेजवानी सध्या कुठे आहे, तिचे कार्यालय कुठे आहे तसेच,ती कुठे कामकाज पाहते, याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र, कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी ही अत्यंत महत्त्वाचे दुवा असल्याने, तिच्या चौकशीमधून अमेडिया कंपनी आणि पार्थ पवार यांच्यातील संबंधांवर नव्या माहितीचा पडदा उघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढे या प्रकरणात काय ट्वीस्ट येतो आणि काय नवीन बाबी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तूर्तास याप्रकरणी पार्थ पवारांच नाव समोर आल्यानंतर कुठल्याही चुकीच्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असं अजित पवारांनी सांगितलं आहे मात्र, प्रत्यक्षात काय होतं हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे.

Sheetal Tejwani : कोरेगाव पार्क जमीन प्रकरण : शीतल तेजवानीचा संशयास्पद भूतकाळ समोर… Read More »