DNA मराठी

Nagar district

water issue

Ahilyanagar News: नगर जिल्ह्यातील एवढ्या गावांमध्ये पाणी टंचाई…टँकरद्वारे पाणीपुरवठा

Ahilyanagar News: जिल्ह्यात वाढते तापमान व संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन करत पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन शाखेमार्फत टंचाईग्रस्त भागांचे सूक्ष्म देखरेख करण्यात येत असून, कोणत्याही नागरिकाला पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी यंत्रणा दक्षतेने कार्यरत आहे. दि. २९ एप्रिल २०२६ रोजीच्या अहवालानुसार जिल्ह्यातील एकूण ३४ गावे व १६२ वाड्या-वस्त्यांमध्ये पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली असून सुमारे ६४ हजार ५८६ नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या भागांसाठी एकूण ३० टँकर (४ शासकीय व २६ खासगी) कार्यरत असून संगमनेर, पारनेर व नगर या तालुक्यांमध्ये टंचाईचे प्रमाण अधिक असल्याने तेथे अनुक्रमे १०, १३ व ६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. टँकरच्या खेपांबाबतही समाधानकारक प्रगती नोंदविण्यात आली आहे. मंजूर ९०.९२ खेपांपैकी ८८ खेपा पूर्ण करण्यात आल्या असून हे प्रमाण सुमारे ९६.७९ टक्के आहे. यामुळे टंचाईग्रस्त भागांमध्ये पाणी वेळेत पोहोचत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पाणीटंचाईवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यातील १२ विहिरी व बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले असून त्यापैकी ३ जलस्त्रोत थेट गावांसाठी तर ९ टँकर भरण्यासाठी वापरण्यात येत आहेत. आवश्यकतेनुसार अतिरिक्त खाजगी जलस्त्रोत अधिग्रहित करण्याचे अधिकार संबंधित तहसीलदारांना देण्यात आले आहेत. संभाव्य टंचाईग्रस्त गावांसाठी आगाऊ कृती आराखडा तयार करण्यात आला असून टँकर प्रस्तावांना तात्काळ मंजुरी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ओआरएस व आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना गळती किंवा पाण्याची चोरी होऊ नये यासाठी विशेष भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने व जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले असून, पाणीपुरवठा व्यवस्थापनासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे स्पष्ट केले आहे.

Ahilyanagar News: नगर जिल्ह्यातील एवढ्या गावांमध्ये पाणी टंचाई…टँकरद्वारे पाणीपुरवठा Read More »

img 20260304 wa0006

Sagar Mohalkar : नगर जिल्ह्यात पुन्हा गोळीबार; कुख्यात सागर मोहळकर गंभीर जखमी

Sagar Mohalkar : नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडल्याने जिल्ह्यात अनेक चर्चांना उधाण आले आहे. जामखेड शहरातील न्युरानी कॉलनी येथे बुधवारी सायंकाळी कुख्यात गुंड सागर मोहळकर याच्यावर मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोराने थेट सात राऊंड फायर केल्याची धक्कादायक घटना घडली. यापैकी चार गोळ्या मोहळकरच्या अंगात घुसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली असून त्याची प्रकृती गंभीर आहे. सागर मोहळकर हा नुकताच नाशिक मध्यवर्ती कारागृहातून जामीनावर बाहेर आला होता. त्याच्यावर यापूर्वी 307 सह विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वीच त्याच्या वडिलांनी त्याच्याविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात एनसी दाखल केली होती. मोहळकर हा नशेच्या आहारी गेलेला असून जामखेड परिसरात त्याची दहशत असल्याची चर्चा आहे. गोळीबारानंतर जामखेड पोलिसांनी तात्काळ मोहळकरला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर शहरातील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्याच्या शरीरात चार गोळ्या अडकल्या असून परिस्थिती चिंताजनक आहे. गोळीबार करणारा हल्लेखोर घटनेनंतर पसार झाला आहे. पोलिसांनी परिसर सील करून तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांकडून माहिती घेतली जात आहे. दवाखान्याबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या थरारक गोळीबारामुळे जामखेड पुन्हा एकदा हादरले असून गुन्हेगारीच्या प्रश्नावर पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.

Sagar Mohalkar : नगर जिल्ह्यात पुन्हा गोळीबार; कुख्यात सागर मोहळकर गंभीर जखमी Read More »