DNA मराठी

Mumbai Rain

rain

IMD Rain Alert: पुढील तीन दिवस राज्यात धो धो पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

IMD Rain Alert: पुढील तीन दिवस राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता असल्याने काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची आणि गारपिटीची शक्यता आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि काही कोकण भागात हवामानाचा परिणाम अधिक जाणवू शकतो. वादळी वाऱ्याचा वेग 30 ते 60 किमी प्रति तास पर्यंत जाण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये गारपीटीचा धोका अधिक आहे. नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, पुणे, सोलापूर, सातारा, सांगलीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. तर नंदुरबार, धुळे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदियासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. कृषी विभागाकडून आवाहन • मेघगर्जना व पावसाची शक्यता लक्षात घेऊन काढणी झालेल्या पिकांचे सुरक्षित साठवण करावे. • शेतात ठेवलेले उत्पादन ताडपत्रीने झाकून ठेवावे. • वादळी वाऱ्याच्या शक्यतेमुळे शेतातील हलकी संरचना व शेती उपकरणे सुरक्षित ठेवावीत. • शेतामध्ये पावसाचे पाणी साचणार नाही यासाठी तात्काळ निचऱ्याची व्यवस्था करावी. पाणी साचल्यास मुळकुज व बुरशीजन्य रोग वाढू शकतात. सध्या राज्यातील अनेक भागात गहू,मक्का, रबी ज्वारी ही पिके काढणीच्या अवस्थेत आहेत. • काढणी केलेले उत्पादन पावसापासून संरक्षित ठिकाणी ठेवावे. • पुढील 24 तासांत काढणीस तयार असलेली पिके तातडीने काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. • शेतात मळणीसाठी ठेवलेले धान्य ताडपत्री किंवा प्लास्टिक आच्छादनाखाली ठेवावे. • ज्वारी पीक पिकलेल्या अवस्थेत असून पाऊस व वादळी वाऱ्यामुळे ज्वारीचे ताटे पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे कणसे खराब होऊन ज्वारीचे नुकसान होऊ शकते, म्हणून काढणी केलेली ज्वारी सुरक्षित ठिकाणी ठेवावी आणि शक्य नसल्यास पॉलिथिन पेपरने झाकून संरक्षण करावे.

IMD Rain Alert: पुढील तीन दिवस राज्यात धो धो पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी Read More »

Rain

IMD Rain Alert: आज नगर जिल्ह्यात धो धो पाऊस, हवामान खात्याचा यलो अलर्ट; नगरकरांना दक्षतेचे आवाहन

IMD Rain Alert – अहिल्यानगरसह राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून आज १९ ऑगस्ट रोजी देखील नगर जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याने जिल्ह्यासाठी “यलो अलर्ट” जारी करण्यात आला असून नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आज जिल्ह्यात वीजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज वर्तविला आहे. भिमा नदी (दौंड पूल) -३०४४ क्युसेक, सीना नदी (सीना धरण) २६९ क्युसेकने विसर्ग सुरु आहे. पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस झाल्यास भिमा, प्रवरा, गोदावरी, घोड, सीना तसेच मुळा धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे नद्यांची पाणीपातळी वाढू शकते. मुळा नदीपात्रातील कोतूळ येथून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना पुढील दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे मेघगर्जना, वीजा किंवा वादळी वाऱ्याच्या वेळी झाडाखाली किंवा त्याजवळ थांबू नये, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. वादळादरम्यान विद्युत उपकरणे वापरू नयेत व वीजेच्या सुवाहक भागांपासून दूर राहावे. मोकळे मैदान, टॉवर, विद्युत खांब, धातूची कुंपणे, लटकणाऱ्या केबल्स यांपासून दूर राहावे. जाहिरात फलकांच्या आसपास थांबू नये. मोकळ्या जागी असल्यास गुडघ्यावर बसून डोके व कान झाकावे. धरण व नदी परिसरात पर्यटनासाठी जाऊ नये, पाण्यात उतरू नये व धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. नदी, ओढा, नाले काठावरील नागरिकांनी पाणीपातळी वाढल्यास त्वरित सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, पाण्यावरून वाहणारे पूल ओलांडू नयेत. मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये थांबू नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलनाची शक्यता असल्याने डोंगरपायथ्याशी राहणाऱ्यांनी वेळीच स्थलांतर करावे, घाटरस्त्याने प्रवास टाळावा. शेतीमाल व जनावरांचे संरक्षण करण्यासाठी योग्य नियोजन करावे. आपत्कालीन परिस्थितीत नजीकच्या पोलीस ठाणे किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. जिल्हा नियंत्रण कक्ष – दूरध्वनी क्रमांक १०७७ (टोल फ्री), ०२४१-२३२३८४४, २३५६९४० उपलब्ध आहेत.

IMD Rain Alert: आज नगर जिल्ह्यात धो धो पाऊस, हवामान खात्याचा यलो अलर्ट; नगरकरांना दक्षतेचे आवाहन Read More »

landslide

Mumbai Rain: मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस; दरड कोसळून बाप-लेकीचा मृत्यू; अनेक जखमी

Mumbai Rain: शुक्रवार रात्रीपासून मुंबई व उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले असून वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम झाला आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी रेड अलर्ट, तर ठाण्यासाठी 16 व 17 ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, विक्रोळीतील पार्कसाईट परिसरात शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास दरड कोसळल्याची दुर्घटना घडली. मिश्रा कुटुंबाच्या घरावर दरड कोसळून सुरेश मिश्रा आणि शालू मिश्रा या बाप-लेकीचा मृत्यू झाला. इतर चार जण जखमी असून त्यांच्यावर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर अग्निशमन दल व महापालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले होतें. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील काही दिवस मुंबई, कोकण व विदर्भात मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे. महापालिकेकडून नागरिकांना आवश्यकता नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या दादर, चुनाभट्टी, कुर्ला व विद्याविहार स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. पावसाचा जोर वाढल्यास रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दादर परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Mumbai Rain: मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस; दरड कोसळून बाप-लेकीचा मृत्यू; अनेक जखमी Read More »