DNA मराठी

MP Nilesh Lanke

nilesh lanke

Nilesh Lanke: अहिल्यानगर–पुणे रेल्वे डबल लाईनचा डीपीआर पूर्ण…, खासदार नीलेश लंके यांची माहिती

Nilesh Lanke : अहिल्यानगर जिल्ह्याच्या दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अहिल्यानगर–पुणे नवीन दुहेरी (डबल लाईन) रेल्वेमार्गाचा डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) तयार झाला असून, या प्रकल्पाला तातडीने मंजुरी मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू असल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली. केंद्र सरकारच्या पीएम गतीशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनअंतर्गत पुणे–नाशिक रेल्वे कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी विविध टप्प्यांवर काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून १३३ किलोमीटर लांबीचा अहिल्यानगर–पुणे नवीन डबल लाईन रेल्वेमार्ग प्रस्तावित असून, हा मार्ग अहिल्यानगर जिल्ह्यातील भागातून जाणार आहे. या संदर्भात खासदार लंके म्हणाले की, हा प्रकल्प केवळ दोन शहरांमधील अंतर कमी करणारा नसून शेतकरी, विद्यार्थी, कामगार, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात थेट सकारात्मक बदल घडवणारा आहे. डीपीआर तयार होणे ही महत्त्वाची पायरी असून, आता मंजुरी व प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणे आवश्यक आहे. अहिल्यानगर परिसरात यापूर्वीच रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. पुणतांबा –निंबळक दुहेरीकरण पूर्ण, निंबळक–अहिल्यानगर दुहेरीकरण प्रगतीपथावर असून, साईनगर शिर्डी–पुणतांबा दुहेरीकरणाला मंजुरी मिळाल्याने अहिल्यानगर हा पुणे, नाशिक, शिर्डी आणि मराठवाडा मार्गांचा केंद्रबिंदू ठरत आहे. अहिल्यानगर–पुणे डबल लाईन प्रकल्पामुळे शेतमाल वाहतूक सुलभ होईल, उद्योगांना चालना मिळेल, रोजगारनिर्मिती वाढेल आणि धार्मिक पर्यटनालाही लाभ होईल, असेही खासदार लंके यांनी स्पष्ट केले. केंद्र व राज्य शासनातील संबंधित विभागांशी समन्वय साधून हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

Nilesh Lanke: अहिल्यानगर–पुणे रेल्वे डबल लाईनचा डीपीआर पूर्ण…, खासदार नीलेश लंके यांची माहिती Read More »

Nilesh Lanke: नगरच्या राजकारणात नवीन ट्विस्ट, मनपा प्रभाग रचनेवर लंकेंची हरकत; केली मोठी मागणी

Nilesh Lanke : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी नवी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. मात्र आता या प्रभाग रचनेवर खासदार निलेश लंके यांनी हरकत घेत जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे. ३ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप प्रभागांच्या भूसीमांबाबतचे प्राधिकृत प्रकाशन रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. लंके यांनी निवेदनात नमूद केले आहे की, नव्या प्रभाग रचनेत अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय व महिलांसाठी राखीव जागांचा कोणताही तपशील दिलेला नाही. हे भारतीय संविधानाच्या कलम १६, २४३(टी), २४३(एस) तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ५(अ) च्या तरतुदींना सरळ विरोध करणारे आहे. खासदार लंके यांनी आरोप केला की प्रभागांची रचना गुगल मॅपवर वाकड्या-तिकड्या रेषा मारून, गोपनीयतेचा भंग करत व मतदारसंघांची ताटातूट करून करण्यात आली आहे. “राजकीय विरोधकांना संपवण्यासाठीच हा डाव आखण्यात आला आहे,” असा त्यांचा दावा आहे. २०१८ च्या मनपा निवडणुकीत तत्कालीन आयुक्तांनी प्रत्येक प्रभागाचे आरक्षण जाहीर करून नागरिकांच्या हरकती मागवल्या होत्या. मात्र यावेळी त्या प्रक्रियेचे उल्लंघन झाले असून, हरकती दाखल करण्याचा मूलभूत अधिकारही नागरिकांकडून हिरावून घेतल्याचा आरोप लंके यांनी केला. नगर विकास विभागाच्या १० जून २०२५ च्या आदेशातील नैसर्गिक मर्यादा- मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रेल्वे रुळ यांचा विचार न करता ही रचना करण्यात आली आहे, असेही निवेदनात नमूद आहे. त्यामुळे २०१८ प्रमाणेच जुनी प्रभाग रचना कायम ठेवूनच आगामी महानगरपालिका निवडणूक घ्यावी, अशी ठाम मागणी खासदार लंके यांनी केली आहे.

Nilesh Lanke: नगरच्या राजकारणात नवीन ट्विस्ट, मनपा प्रभाग रचनेवर लंकेंची हरकत; केली मोठी मागणी Read More »

भिक्षेकरू मृत्यू प्रकरणामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू; सुजय विखेंचा लंकेंना प्रत्युत्तर

Maharashtra Politics: अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान चार भिक्षेकरूंचा मृत्यू झाल्याच्या घटनेने मोठा राजकीय वाद निर्माण केला आहे. या प्रकरणावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. खासदार निलेश लंके यांनी या मृत्यूंना ‘बालहट्ट’ जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला. त्यांच्या मते, काही जणांच्या हट्टापायी या भिक्षेकरूंना आपला जीव गमवावा लागला. मात्र, त्यांच्या या वक्तव्यावर माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सुजय विखे म्हणाले, “जर खासदार लंके यांना माझ्याविषयी राग असेल, तर त्यांनी सरळ कोर्टात जावं आणि माझ्यावर गुन्हा दाखल करावा. मला त्याबद्दल काहीही हरकत नाही. जे काही झाले, ते सर्व न्यायालयाच्या आदेशानुसारच झाले आहे.” तसेच, त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, “समाज आणि महिलांचे संरक्षण करणे हे माझं कर्तव्य आहे आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत ते करत राहीन. मात्र, या गोष्टीचा सध्याच्या खासदारांशी कधीच संबंध आलेला नाही, त्यामुळे त्यांच्या कडून कुठलीही अपेक्षा नाही.” या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलं असून, मृत्यू झालेल्या भिक्षेकरूंना न्याय मिळावा आणि भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी योग्य चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

भिक्षेकरू मृत्यू प्रकरणामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू; सुजय विखेंचा लंकेंना प्रत्युत्तर Read More »