DNA मराठी

Manoj Jarange

laxman hake

Laxman Hake : मनोज जरांगेंच्या लाल गोधडीवर लक्ष्मण हाकेंचा सवाल; ‘त्या’ गोधडीमागे नेमकं दडलंय काय?

Laxman Hake : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला असून, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली आहे. जरांगे यांच्या उपोषणासाठी वापरल्या जाणाऱ्या लाल गोधडीचा संदर्भ देत हाके यांनी सवाल उपस्थित केला आहे. प्रत्येक उपोषणावेळी तीच लाल गोधडी का वापरली जाते, त्यामागे नेमकं काय आहे, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस सुरू असताना लक्ष्मण हाके यांनी हे वक्तव्य केले. जरांगे यांनी मराठा समाजाला मुंबईत पोहोचण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी लक्ष्मण हाके यांनी मुंबईच्या दिशेने ‘महा एल्गार मोर्चा’ सुरू केला आहे. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असली तरी आपण मुंबईकडे जाणारच, अशी भूमिका हाके यांनी घेतली आहे. ‘प्रत्येक उपोषणाला तीच लाल गोधडी का?’ मनोज जरांगे यांच्या उपोषणाबाबत बोलताना लक्ष्मण हाके यांनी त्यांच्या उपोषणाच्या पद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जरांगे प्रत्येक वेळी उपोषणासाठी त्याच लाल गोधडीचा वापर करतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘प्रत्येक उपोषणाला ती लाल गोधडीच का लागते? त्या गोधडीमागे नेमकं काय दडलं आहे?’ असा सवाल हाके यांनी उपस्थित केला. जरांगे यांच्या उपोषणाची आणि त्यामागील प्रक्रियेची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. रक्त आणि लघवीच्या तपासण्यांचा दाखला लक्ष्मण हाके यांनी पुढे आरोग्य तपासण्यांचाही मुद्दा उपस्थित केला. उपोषण करणाऱ्या व्यक्तीच्या रक्त आणि लघवीच्या तपासण्यांमधून शरीरातील ग्लुकोजसह विविध बाबी स्पष्ट होतात, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे जरांगे यांच्या उपोषणादरम्यान झालेल्या वैद्यकीय तपासण्यांचे अहवालही तपासले पाहिजेत, असा दावा हाके यांनी केला मात्र, या संदर्भात जरांगे यांच्या आरोग्य तपासण्यांमध्ये गैरप्रकार झाल्याची कोणतीही स्वतंत्र पुष्टी या वृत्तात करण्यात आलेली नाही. हाके यांनी उपलब्ध असल्याचे सांगितलेल्या सरकारी आणि आरोग्य विभागाच्या अहवालांच्या आधारे चौकशीची मागणी केली आहे. ‘उपोषणासारख्या प्रभावी आंदोलनाला बदनाम केले’ उपोषण हे महात्मा गांधींच्या काळापासून लोकशाहीतील प्रभावी आंदोलनाचे साधन राहिले आहे. मात्र, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पद्धतीमुळे उपोषणाच्या या संकल्पनेची बदनामी होत असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. जरांगे यांच्या आंदोलनात उपोषणाची भूमिका आणि प्रत्यक्ष परिस्थिती याबाबत प्रश्न उपस्थित करत हाके यांनी त्यांच्या आंदोलनावर टीका केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षाला पुन्हा राजकीय धार मिळण्याची शक्यता आहे. हाकेंचा मुंबईकडे पायी मोर्चा दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी मुंबईच्या दिशेने मोर्चा सुरू केला आहे. पहिल्या दिवशी त्यांनी सुमारे १५ किलोमीटर अंतर पायी पार केल्याचे सांगितले. पुढेही शक्य तितके अंतर चालत जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मोर्चाला पोलिसांची परवानगी नसली तरी आपण आंदोलन थांबवणार नाही, अशी भूमिका हाके यांनी घेतली आहे. आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबईच्या दिशेने जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आझाद मैदानात परवानगी घेऊन आंदोलन करण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘ही सामाजिक न्यायाची आणि प्रतिनिधित्वाची लढाई’ आपण कोणत्याही आमदार, खासदार किंवा मंत्र्यांच्या पाठबळावर आंदोलन करत नसल्याचे सांगत हाके यांनी आपल्या भूमिकेचा सामाजिक न्यायाच्या मुद्द्याशी संबंध जोडला. ओबीसी, भटक्या-विमुक्त आणि प्रभावी राजकीय प्रतिनिधित्व नसलेल्या घटकांच्या हक्कांसाठी आपण आवाज उठवत असल्याचे त्यांनी म्हटले. मोठ्या संख्येने लोक एकत्र आणण्याची क्षमता नसल्यामुळे एखाद्या समाजाचे आरक्षण धोक्यात आणता येणार नाही, असा युक्तिवादही हाके यांनी केला. आरक्षणाचा मूळ उद्देशच सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या मागे राहिलेल्या घटकांना संधी आणि प्रतिनिधित्व देणे हा असल्याचे ते म्हणाले.

Laxman Hake : मनोज जरांगेंच्या लाल गोधडीवर लक्ष्मण हाकेंचा सवाल; ‘त्या’ गोधडीमागे नेमकं दडलंय काय? Read More »

manoj jarange

Manoj Jarange: जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण सुरू; मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार नाही, सरकारला इशारा

Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आज सकाळी 10 वाजता आमरण उपोषणाला सुरुवात केली. हे आपले निर्णायक आणि शेवटचे आमरण उपोषण असल्याचे जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. उद्यापासून बोलणे शक्य होणार नाही, त्यामुळे आजच समाजाशी संवाद साधत असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. मराठा समाजाने मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीत दाखल व्हावे आणि आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे प्रमाणपत्रांची मागणी शिंदे समितीला सापडलेल्या 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे तत्काळ कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी जरांगे पाटील यांनी केली. गावागावातील पात्र बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याचे स्पष्ट होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, मात्र अद्याप प्रमाणपत्र मिळालेले नाही, त्यांनी अंतरवाली सराटीत यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच ज्यांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे, पण तो स्वीकारण्यात आलेला नाही, अशांनीही अंतरवालीत यावे, असे त्यांनी सांगितले. कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे, मात्र जात वैधता प्रमाणपत्र मिळालेले नाही, अशांनीही आपापल्या नोंदी घेऊन अंतरवाली सराटीत यावे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. संबंधितांकडून अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्याचे आवाहनही त्यांनी केले. ‘कुणबी प्रमाणपत्र पुरेसे नाही, जात वैधता कशी देणार?’ केवळ कुणबी प्रमाणपत्र देऊन प्रश्न सुटणार नाही, तर जात वैधता प्रमाणपत्र कसे दिले जाणार? याची स्पष्ट माहिती सरकारने द्यावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे, त्यांच्या जात वैधतेचा प्रश्न तातडीने सोडवावा आणि पात्र असलेल्या सर्व प्रकरणांची वैधता करावी, अशी त्यांची भूमिका आहे. हैदराबाद गॅझेटमधील नोंदींच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करावी आणि त्यानंतर जात वैधता कशी केली जाणार, याची स्पष्ट कार्यपद्धती सरकारने जाहीर करावी, असे ते म्हणाले. ‘फक्त प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन मान्य नाही त्याच्या वैधतेबाबतही स्पष्ट अंमलबजावणी हवी,’ असा इशारा त्यांनी दिला. सातारा, कोल्हापूर आणि औंध संस्थांच्या जीआरची मागणी सातारा संस्था, कोल्हापूर संस्था आणि औंध संस्थांबाबतचे जीआर तातडीने काढून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. या संस्थांच्या माध्यमातून मिळणाऱ्या लाभांसाठी जात वैधता कशी केली जाणार, हेही सरकारने स्पष्ट करावे, असे ते म्हणाले. केवळ जीआर काढून पुन्हा समाजाची फसवणूक करू नये. यापूर्वी मागण्या मान्य करण्यात आल्या, मात्र त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. ‘करू, करू’ म्हणता म्हणता 75 वर्षे गेली, अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली. ‘सरकारवर पूर्णपणे भरोसा ठेवू नका’ मराठा समाजाने यापुढे सरकारवर पूर्णपणे भरोसा ठेवणे बंद करावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. ‘आपला पक्ष, आपला नेता कोणीही नाही; या जगात फक्त जात आपली आहे,’ असे ते म्हणाले. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेला लढा आता विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचा दावा त्यांनी केला. ही शेवटची फाईट असून गाफील राहू नका, दगाफटका होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी समाजाला दिला. ‘मी तुमच्या लेकराबाळांसाठी जीव द्यायला तयार’ मराठा समाजाने अंतरवाली सराटीकडे मोठ्या संख्येने धावून यावे, असे भावनिक आवाहन जरांगे पाटील यांनी केले. ‘सगळ्यांनी बाहेर पडा, मी तुमच्या लेकराबाळांसाठी जीव द्यायला तयार आहे,’ असे ते म्हणाले. सलग तीन वर्षे मुलांच्या भविष्यासाठी लढत असल्याचे सांगत त्यांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला त्रास झाल्यानंतर आपण जसे धावून जातो, तसेच अंतरवाली सराटीकडे धावून या, असेही त्यांनी म्हटले. SEBC-EWS मधील नियुक्त्यांवरही ठाम भूमिका SEBC आणि EWSमधून निवड झालेल्यांना नियुक्त्या मिळेपर्यंत आंदोलन थांबवणार नाही, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली. तसेच महामंडळाचे सर्व परतावे देण्याची मागणीही त्यांनी केली. एकूणच, कुणबी प्रमाणपत्रांसोबत जात वैधता, सातारा-कोल्हापूर-औंध संस्थांचे जीआर, SEBC-EWS मधील नियुक्त्या आणि महामंडळाच्या परताव्यांसह विविध मागण्यांवर सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका घेत जरांगे पाटील यांनी आपले उपोषण निर्णायक असल्याचे स्पष्ट केले आहे.

Manoj Jarange: जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण सुरू; मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार नाही, सरकारला इशारा Read More »

Manoj Jarange Patil

Manoj Jarange : मुंबई आंदोलनावरुन मनोज जरांगे पाटील आक्रमक; सरकारला थेट इशारा

Manoj Jarange : मुंबईतील आंदोलनांवर निर्बंध घालण्याच्या राज्यसरकारच्या निर्णयावरून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. दक्षिण मुंबईतील आझाद मैदान वगळता इतर ठिकाणी आंदोलन, धरणे किंवा मोर्चा काढण्यास निर्बंध घालण्याच्या निर्णयाला त्यांनी तीव्र विरोध केला आहे. मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने येणार असल्यानेच सरकारने हे नवे नियम लागू केल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात. मागण्या मान्य झाल्या तर मुंबईत आंदोलन करण्याची वेळच येणार नाही. मात्र, मागण्या प्रलंबित ठेवून आंदोलनाला परवानगी नाकारली, तरी आपला आंदोलनाचा निर्धार कायम राहील, असा स्पष्ट इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. मुंबईतील आंदोलनांसाठी सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी करताना जरांगे पाटील यांनी आपण कायद्याचा सन्मान करत असल्याचे स्पष्ट केले. आंदोलनासाठी प्रशासनाकडे परवानगीचा अर्ज करण्यात आला आहे. त्यामुळे सरकारने परवानगी द्यावी; मात्र परवानगी दिली नाही तरी आंदोलनापासून माघार घेतली जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. सरकारवर निशाणा साधताना जरांगे पाटील यांनी, जनतेनेआणि विशेषतः मराठा समाजाने सरकारला सत्तेवर बसवले, पण आता त्याच समाजाला मुंबईत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला. मुंबईतील आंदोलनांवर निर्बंध घालण्यामागे मराठा समाजाच्या संभाव्य आंदोलनाचीच भीती असल्याचेही त्यांनी म्हटले. मुंबईतील नागरिकांनी आंदोलनाच्या काळात काही दिवस सहकार्य करावे, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले. मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य केल्या, तर मुंबईत येण्याची गरजच भासणार नाही. मात्र, मागण्या मान्य न झाल्यास मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईत दाखल होईल, असा इशारा त्यांनी दिला. “मराठे मुंबईत जाणार आहेत, त्यामुळे मुद्दामून सरकारने हे केलं. यात झाकून ठेवण्यासारखं काहीच नाही… आम्ही कायद्याचा सन्मान करतो. आम्ही तुम्हाला परवानगीचा अर्ज दिला आहे. तुम्ही परवानगी द्या, नाहीतर नका देऊ.” दरम्यान, २९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे आंदोलन करण्यात येणार असल्याचे जरांगे पाटील यांनी पुन्हा स्पष्ट केले. या आंदोलनानंतर मुंबईतील आंदोलनाची तारीख निश्चित केली जाईल, असे त्यांनी सांगितले. मुंबई आंदोलनाची तारीख जाहीर झाल्यानंतर मराठा समाजाने तयारीत राहावे, वाहनांना किक मारून मुंबईच्या दिशेने निघावे आणि आंदोलनात विजय मिळवूनच परत यायचे, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. फडणवीस सरकारने दादागिरी करू नये, असा थेट इशारा देत जरांगे पाटील यांनी आझाद मैदानासह मुंबईतील विविध ठिकाणी आंदोलन करण्याची भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे आगामी काळात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा आणि आंदोलनाची वेळ येऊ नये, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली आहे. दुसरीकडे, मुंबईतील कायदा सुव्यवस्था आणि आंदोलनांवरील निर्बंधांचा मुद्दा आता पुन्हा चर्चेत आला असून, २९ ऑगस्टच्या अंतरवाली सराटी येथील आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Manoj Jarange : मुंबई आंदोलनावरुन मनोज जरांगे पाटील आक्रमक; सरकारला थेट इशारा Read More »

Manoj Jarange Patil

Manoj Jarange: 28 ऑगस्टपर्यंत चूक दुरुस्त करा, नाहीतर …. मनोज जरंगेंचा इशारा

Manoj Jarange : बावनकुळे यांच्या डोळ्याला पाणी आल्याच्या प्रसंगाचा उल्लेख करत, मनोज जरांगे यांनी मंत्री सिरसाठ यांच्यावर टीका केली. “तुम्ही परळीच्या टोळीच्या नादी लागून हे सगळं केलं. यापुढे त्या टोळीच्या नादी लागू नका,” असा इशारा त्यांनी दिला. “माझ्या समाजाच्या विरोधात कुणी आलं तर मी सोडत नाही,” असे म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सिरसाठ यांनी केलेली चूक माफ केली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. आईचा उल्लेख केल्याबद्दल त्यांनी वेगळी भूमिका मांडली. “तुम्ही तुमच्या आईचं नाव घेतलं. आई ही आई असते. माझ्यावर मराठीचे संस्कार आहेत. त्यामुळे यावेळी तुम्हाला माफ करतो मात्र पुढे अशी चूक झाली तर सोडणार नाही,” असं देखील मनोज जरांगे म्हणाले. रद्द करण्यात आलेले प्रमाणपत्र पुन्हा देण्याची मागणीही त्यांनी केली. “28 ऑगस्टच्या आत तुम्ही केलेली चूक दुरुस्त करा. रद्द केलेले प्रमाणपत्र पुन्हा द्या, अन्यथा सोडणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. “तुम्ही आमच्या मागे लागलात म्हणून आम्ही तुमच्या मागे लागलो,” असे म्हणत त्यांनी यापुढे वैयक्तिक व्यंग किंवा टीका करणार नसल्याचे सांगितले. मात्र, संबंधितांनी केलेली चूक सुधारावी, अशी मागणी त्यांनी केली. या वक्तव्यामुळे बावनकुळे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. संबंधितांकडून या आरोपांवर काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Manoj Jarange: 28 ऑगस्टपर्यंत चूक दुरुस्त करा, नाहीतर …. मनोज जरंगेंचा इशारा Read More »

Manoj Jarange Patil Photo

Manoj Jarange Patil : मराठा समाज पुन्हा मुंबईकडे ? मनोज जरांगेंचे मोठे वक्तव्य

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज पुन्हा एकदा मुंबईकडे जाण्याचा विचार करत असल्याचे म्हटले आहे. मुंबईतच आंदोलन करण्याबाबत समाजामध्ये चर्चा सुरू असून, आगामी काळात मुंबईकडे मोठ्या संख्येने मराठा आंदोलक येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. मुंबईतच आंदोलन करण्याचा विचार यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजामध्ये पुन्हा मुंबईला जाण्याची चर्चा सुरू आहे. मुंबईत जाऊन आंदोलन करण्याचा निर्णय होऊ शकतो. तसेच समाजातील अनेकजण मुंबईतच आंदोलन करण्याच्या भूमिकेवर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आंदोलनासाठी आपण कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा मोठ्या प्रमाणावर उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राबाहेरूनही आंदोलक येणार? जरांगे पाटील यांच्या वक्तव्याचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे महाराष्ट्राबाहेरील भागांतूनही मराठा समाजाचे लोक मुंबईकडे येऊ शकतात, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुरत, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, बडोदा तसेच गोव्याच्या समुद्रमार्गातूनही काही लोक मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंदोलनाचा विस्तार केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता व्यापक स्वरूप घेऊ शकतो, असा संकेत त्यांच्या वक्तव्यातून मिळतो. नेमकी मागणी काय? मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या काही वर्षांपासून आंदोलन करत आहेत. विशेषतः मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र आणि त्यातून ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा, हा त्यांच्या आंदोलनातील प्रमुख मुद्दा राहिला आहे. कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरूनही जरांगे यांनी अलीकडे सरकारला इशारा दिला आहे. कुणबी नोंदी रद्द होऊ देणार नसल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी मुंबईत मोठ्या प्रमाणावर आंदोलन झाले आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा मुंबईकडे जाण्याचे संकेत दिल्याने सरकारसमोर मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

Manoj Jarange Patil : मराठा समाज पुन्हा मुंबईकडे ? मनोज जरांगेंचे मोठे वक्तव्य Read More »

img 20260624 wa0000

Maratha Reservation: मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक; घेतला मोठा निर्णय

Maratha Reservation : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गाप्रमाणे शैक्षणिक व इतर सवलती देण्याबाबत ५ जून २०२६ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागांनी तात्काळ अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश जलसंपदा  मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. विधान भवनात मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्षतेखाली  मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत मराठा आरक्षणाशी संबंधित विविध प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यात आला आणि झालेल्या निर्णयाप्रमाणे अमंलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीस मंत्री मंडळातील जलसंपदा मंत्री गिरीष महाजन,शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे,सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, माहीती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार,मदत व पुनर्वसन मकरंद जाधव,सहकार मंत्री बाबासाहेब पाटील,वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,रोजगार व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्हास्तरावर मराठा समाजाच्या अडचणी आणि शंकांचे निरसन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरावर तातडीने हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात यावी,तालुका आणि जिल्हा स्तरावर प्राप्त होणारी निवेदने व मागण्यांचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या थेट देखरेखी खाली वर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू करावी. स्थानिक पातळीवरील मागण्यांचे तात्काळ निराकरण करण्यात यावे, तसेच ज्या मागण्या/निवेदने राज्य शासनाशी संबंधित आहेत, ती आवश्यकते नुसार तात्काळ शासनाकडे सादर करावीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत  घेण्यात आला. जिल्हा व तालुकास्तरीय तक्रार निवारण प्रक्रियेचा प्रत्येक आठवड्याला सविस्तर आढावा घेऊन कार्यवाही करावी आणि त्याबाबतचा प्रगती अहवाल दर आठवड्याला राज्य शासनास सादर करावा, असे निर्देश मंत्रिमंडळ उपसमितीने प्रशासनाला दिले आहेत. राज्य सरकारने ५ जून २०२६ रोजीच्या काढलेल्या शासन निर्णयानुसार मराठा समाजातील किती विद्यार्थ्यांना आतापर्यंत या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे, याची सविस्तर आकडेवारी संबंधित विभागाने पुढील बैठकीत अनिवार्यपणे सादर करावी, असे निर्देश मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीत अधिकार्यांना दिले असून, मराठा आरक्षणाच्या उपसमितीची बैठक आता नियमितपणे घेतली जाणार आहे. चालू अधिवेशन कालावधी संपल्यानंतर, राज्य मंत्रिमंडळाच्या (कॅबिनेट) बैठकीनंतर या उपसमितीची बैठक घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. मराठा समाजाच्या विविध योजना आणि आरक्षणाशी संबंधित बाबींचा पाठपुरावा करण्यासाठी एक स्वतंत्र ‘मराठा कक्ष’ तात्काळ कार्यरत करण्यात यावा, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. न्यायमुर्ती शिंदे समितीच्या कामकाजाला गती देण्यासाठी त्यांना स्वतंत्र कार्यालयीन जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा निर्णय तात्काळ घेण्यात यावा, अशा सूचनाही संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

Maratha Reservation: मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक; घेतला मोठा निर्णय Read More »

gangadhar kalkute

Gangadhar Kalkute : “लक्ष्मण हाकेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; बुद्धी भ्रष्ट झाली” ; गंगाधर काळकुटे यांचा हल्लाबोल

Gangadhar Kalkute : बीडमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी कुणबी दाखल्यांच्या मुद्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. कुणबी दाखले रद्द करण्याची आणि कथित चुकीचे दाखले देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी लक्ष्मण हाके यांनी केली होती. यावर आता मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काळकुटे यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर टीका करत, त्यांना “मराठा द्वेषाची कावीळ झाली असून मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे,” असा घणाघात केला. तसेच बीडमधील मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेण्याचा सल्लाही त्यांनी हाके यांना दिला. मराठा समाजाविरोधात सातत्याने भूमिका घेत असल्याचा आरोप करत काळकुटे यांनी हाके यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यासोबतच, कुणबी दाखल्यांच्या प्रश्नावर मराठा समाज संविधानिक आणि रस्त्यावरची दोन्ही प्रकारची लढाई लढण्यास तयार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे कुणबी दाखल्यांच्या मुद्द्यावरून राज्यातील मराठा-ओबीसी वाद पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Gangadhar Kalkute : “लक्ष्मण हाकेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; बुद्धी भ्रष्ट झाली” ; गंगाधर काळकुटे यांचा हल्लाबोल Read More »

Manoj Jarange Patil Photo

Manoj Jarange Patil: मराठा समाजासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर मनोज जरांगे यांचे मोठे वक्तव्य

Manoj Jarange Patil : मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांचे स्वागत करत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे तसेच आमदार प्रसाद लाड यांचे मनापासून आभार मानले आहेत. जरांगे म्हणाले की, मराठा समाजाच्या विविध मागण्यांची अंमलबजावणी करून समाजाला न्याय देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे आणि प्रसाद लाड यांनी यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याचे त्यांनी नमूद केले. ओबीसी समाजाप्रमाणेच मराठा समाजालाही विविध शासकीय सवलती, सारथी संस्थेअंतर्गत योजना तसेच महामंडळाच्या काही बंद पडलेल्या योजना आणि अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्याचा शासन निर्णय घेण्यात आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आंदोलनादरम्यान बलिदान गेलेल्या कुटुंबांच्या प्रश्नालाही सरकारने गांभीर्याने हाताळल्याचे सांगत, या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विखे यांनी विशेष पुढाकार घेतल्याचे जरांगे यांनी म्हटले. “मराठा समाजाच्या मागण्यांना प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत नेण्यासाठी सरकारच्या वतीने विखे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस, विखे, प्रसाद लाड आणि संपूर्ण सरकारचे मी मनापासून आभार मानतो,” असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

Manoj Jarange Patil: मराठा समाजासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर मनोज जरांगे यांचे मोठे वक्तव्य Read More »

Maratha Reservation 1

Maharashtra Reservation: मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसदारांना मिळणार नोकरी

Maharashtra Reservation: मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसदारांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) मध्ये नोकरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने घेतला आहे. अंतरवाली सराटी येथील आंदोलनादरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता या निर्णयातून झाली असल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मराठा आरक्षण आणि इतर विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये मृत आंदोलकांच्या वारसदारांना नोकरी देण्याच्या मागणीचाही समावेश होता. या मागणीसंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने तातडीने शासन आदेश जारी करून मराठा आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांची पडताळणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी उपोषण सोडताना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मृत आंदोलकांच्या वारसदारांना एमआयडीसीमध्ये नोकरी देण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. यापूर्वी मृत आंदोलकांच्या वारसदारांना परिवहन महामंडळात समाविष्ट करून घेण्याचे ठरले होते. मात्र, काही वारसदारांची अपेक्षा एमआयडीसी किंवा महावितरण कंपनीमध्ये नोकरी मिळावी अशी होती. त्यानुसार एमआयडीसीमध्ये मृत व्यक्तींच्या वारसदारांना समाविष्ट करून घेण्याची प्रशासकीय कार्यवाही वेगाने पूर्ण करण्यात आली असून, एमआयडीसीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एमआयडीसीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानंतर सामान्य प्रशासन विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून मृत आंदोलकांच्या पात्र वारसदारांची पडताळणी करून त्यांना तातडीने प्रमाणपत्र देण्याच्या सूचना दिल्या आहेत. अचूक आणि योग्य शहानिशा करून प्रमाणपत्र निर्गमित करण्याची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी, असे निर्देशही देण्यात आल्याची माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली. “अंतरवाली सराटी येथील आंदोलनादरम्यान संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार करत आहे. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत महायुती सरकार संवेदनशील असून यापूर्वीही सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. भविष्यातही समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.

Maharashtra Reservation: मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसदारांना मिळणार नोकरी Read More »

Manoj Jarange Patil

Manoj Jarange: गुन्हे मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरणार मनोज जरांगे यांचा सरकारला इशार

Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे सरसकट मागे घेण्याचा शब्द सरकारने दिला असून, तो पाळलाच पाहिजे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे. जालना येथे बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे मांडली.“सरकारने दिलेला शब्द पाळावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच, “आतापर्यंत आंदोलन करून ८५० पेक्षा जास्त गुन्हे मागे घ्यायला लावले आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत, “ते शब्दापासून बदलले तरी मी बदलणार नाही,” असे जरांगे म्हणाले. राहिलेल्या गुन्ह्यांबाबत विभागीय समितीचा अहवाल सरकारकडे जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “आरक्षण मिळवणारच आणि उर्वरित गुन्हेही मागे घ्यायला लावणार,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.मराठा आरक्षण उपसमितीवरही त्यांनी टीका करत, समाजाला अवमानकारक वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला. उपसमिती बरखास्त करण्याची मागणी करत, “मराठा समाजाच्या मागण्यांना न्याय देणे ही समितीची जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले.याशिवाय, कुणबी आणि मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणीही त्यांनी केली.

Manoj Jarange: गुन्हे मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरणार मनोज जरांगे यांचा सरकारला इशार Read More »