DNA मराठी

Maharashtra Politics

काँग्रेसला धक्का, माजी आमदार कुणाल पाटील भाजपात दाखल

Kunal Patil : धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुणाल पाटील व त्यांच्या समर्थकांचे स्वागत केले. धुळ्याचे पालक मंत्री जयकुमार रावल, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आ. राम भदाणे, आ. अनुप अग्रवाल, आ. मंगेश चव्हाण, आ. राहुल कुल, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी आदी यावेळी उपस्थित होते. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, कुणाल पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता कुणाल पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांच्या प्रयत्नांना भाजपा संघटनेकडून संपूर्ण साथ मिळेल, असेही बावनकुळे यांनी सांगितले. तर रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, कुणाल पाटील यांनी ज्या विश्वासाने भाजपामध्ये प्रवेश केला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. धुळे जिल्हा पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की, कुणाल पाटील यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढली आहे. कुणाल पाटील यांनी सांगितले की, गेली सुमारे 75 वर्षे माझे कुटुंब काँग्रेस बरोबर आहे. खानदेश भागाच्या विकासासाठीच अनेक वर्षांचा काँग्रेसबरोबरचा संबंध तोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय आपण घेतला. भारतीय जनता पार्टीचे सरकार केंद्रात आणि राज्यात आल्यापासून खानदेशचे विकासाचे मनमाड – इंदूर अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या सरकारकडून विकासाच्या बाबतीत भेदभाव केला जात नाही, असा अनुभव आहे. आगामी काळात भारतीय जनता पार्टीची ताकद धुळे जिल्ह्यात वाढविण्यासाठी ताकदीने प्रयत्न करू, असेही कुणाल पाटील यांनी सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यशवंत खैरनार, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश गर्दे, धुळे तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष लहू पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विशाल सैंदाणे, बाजीराव हिरामण पाटील, योगेश पाटील, भगवान गर्दे, पंढरीनाथ पाटील, शकील अहमद, उबाठा उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, विलास चौधरी, ललित माळी, हरिष माळी, डॉ. भरत राजपूत आदींनी यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

काँग्रेसला धक्का, माजी आमदार कुणाल पाटील भाजपात दाखल Read More »

शरद पवार गटाला मोठा धक्का, माजी आमदार विजय भांबळे अजित पवार गटात

Ajit Pawar: पुढील काही दिवसात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे मात्र त्यापूर्वी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार विजय भांबळे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. शरदचंद्र पवार गटाचे जिंतूरचे माजी आमदार विजय भांबळे यांनी यावेळी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याशिवाय गडचिरोली, चंद्रपूर, अहिल्यानगर, परभणी, नागपूर, हिंगोली, या जिल्हयातील महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषदेतील विविध पक्षातील पदाधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक आणि आमदार सना मलिक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मानखुर्द – शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील सपाच्या महिला व पुरुष पदाधिकारी यांनीही मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला सर्वांना सोबत घेऊन महिला, युवक, युवती यांना संधी द्यायची आहे असे सांगतानाच अजित पवार यांनी यापुढे गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार असे चार दिवस पक्षाला देणार असल्याचे जाहीर केले. पक्षात येणाऱ्या लोकांचा नक्कीच मानसन्मान राखला जाईल असेही अजित पवार यावेळी म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम,पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार सना मलिक, आमदार राजेश विटेकर,आमदार राजू नवघरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश पदाधिकारी सुरेखा ठाकरे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर,आमदार डॉ. किरण लहामटे, प्रदेश प्रवक्त्या वैशाली नागवडे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

शरद पवार गटाला मोठा धक्का, माजी आमदार विजय भांबळे अजित पवार गटात Read More »

अँडव्हान्स आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना होणार फायदा, मिळणार 15% सुट

Pratap Sarnaik: एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या (150 कि.मी.पेक्षा जास्त) प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पुर्ण तिकीट धारी (सवलतधारक प्रवासी वगळून) प्रवाशांना तिकीट दरात 15 टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. या योजनेची सुरुवात 1 जुलैपासून करण्यात येत आहे. तरी प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे. 1 जुनला एस टी च्या 77 व्या वर्धापन दिन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कमी गर्दीच्या हंगामामध्ये लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांच्या तिकीटामध्ये 15 टक्के सूट देण्यात येईल अशी घोषणा केली होती त्यानुसार ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी 1 जुलैपासून लागू करण्यात येत आहे. अर्थात, ही योजना पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू राहणार आहे. आषाढी एकादशी व गणपती उत्सवात प्रवाशांना लाभ येत्या आषाढी एकादशीला व गणपती उत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. राज्यभरातून पंढरपूर येथे जाणाऱ्या नियमित बसेसचे आरक्षण प्रवाशांनी केल्यास त्यांना त्यांच्या तिकीट दरात 15 टक्के सवलत उद्यापासून (1जुलै) लागू होत आहे. तथापि जादा बसेस साठी ही सवलत लागू असणार नाही. तसेच गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना देखील आगाऊ आरक्षण केल्यानंतर या तिकिटाचा लाभ घेता येऊ शकतो. इ-शिवनेरीच्या प्रवाशांना लाभ मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या प्रतिष्ठित इ-शिवनेरी बसमधील पुर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल. आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनी प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर , public.msrtcors.com या एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा msrtc Bus Reservation या मोबाईल ॲपद्वारे तिकीट आरक्षित केल्यास त्यांना 15% सवलत प्राप्त करता येऊ शकते.

अँडव्हान्स आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना होणार फायदा, मिळणार 15% सुट Read More »

बीड मधील विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणाची घटना काळीमा फासणारी…, आरोपींवर कठोर कारवाई करा

Bajrang Sonawane : बीडमधील विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाची घटना काळीमा फासणारी आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी मी पोलीस अधीक्षकांना देखील बोललो आहे. याच प्रकरणात आमदार धनंजय मुंडे यांनी संदीप क्षीरसागर आरोप केले आहेत परंतु आरोप करणे सोपे आहे. ते सिद्ध होणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली आहे. विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणात असलेल्या आरोपींचा संदीप क्षीरसागर यांची संबंध असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता. त्यानंतर आता बीडमधील राजकारण तापले असून आमदार मुंडे यांनी केलेले आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी फेटाळून लावत सरकार तुमचे आहे. तुम्ही चौकशी लावा आरोप सिद्ध झाले तर आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत असे देखील म्हटले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले असून या प्रकरणात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप केले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आल्याने त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर धनंजय मुंडे राजकारणातून काही दिवसांसाठी गायब झाले होते.

बीड मधील विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणाची घटना काळीमा फासणारी…, आरोपींवर कठोर कारवाई करा Read More »

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांचा अर्ज दाखल

Ravindra Chavan : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदाची विद्यमान कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. युवा मोर्चाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकीय प्रवास सुरु केलेल्या चव्हाण यांना संघटनेच्या कामाचा मोठा अनुभव असल्याने ते प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ताकदीने पार पाडतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टीच्या राज्य परिषदेचे अधिवेशन आज 1 जुलै रोजी वरळी येथे होणार असून या अधिवेशनात प्रदेशाध्यक्षपदाच्या नावाची घोषणा होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या 3 वर्षांत प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अतिशय समर्थपणे पेलली आहे. बावनकुळे यांनी संघटनेच्या केलेल्या बांधणीमुळेच विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, मुंबई भाजपा अध्यक्ष तथा सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, ज्येष्ठ नेते भाई गिरकर, आ. सुनील कांबळे, आ. उमा खापरे, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. चित्रा वाघ आदींनी चव्हाण यांच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केले. केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री व या निवडणुकीसाठीचे निरीक्षक किरेन रिजिजू, राष्ट्रीय सरचिटणीस व प्रदेश प्रभारी खा. अरुण सिंह यांच्याकडे श्री. चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक अधिकारी आ. चैनसुख संचेती हेही यावेळी उपस्थित होते. संघटन पर्वा अंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणीची प्रक्रिया पार पडल्यानंतर पक्षाच्या 80 संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यापाठोपाठ मंडल अध्यक्षांच्या निवडी झाल्या. प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय परिषद व राज्य परिषद सदस्य निवडणुकीचा कार्यक्रम 28 जून रोजी घोषित करण्यात आला. त्यानुसार 30 जुलै रोजी प्रदेशाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली.

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांचा अर्ज दाखल Read More »

35 वर्षांनंतर नोंद; सावेडी जमीन प्रकरणामुळे प्रशासनावर संशयाची सावली

Ahilyanagar News : सावेडी परिसरातील तब्बल 35 वर्षांपूर्वीचा जमीन व्यवहार सध्या संशयाच्या भोवर्यात सापडला आहे. सर्वे नंबर 245/ब 1 (0.72 हेक्टर आर) आणि 245/ब 2 (0.63 हेक्टर आर), एकूण 1 हेक्टर 35 आर जमिनीची नोंद इतक्या वर्षांनी तलाठी कार्यालयात झाली असून, त्यामुळे भू-माफिया, शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचार आणि राजकीय वरदहस्ताचे धागेदोरे समोर येत आहेत. ही जमीन मूळत: अब्दुल अजीज डायाभाई (मूळ पत्ता – झेंडीगेट, अहिल्यानगर; सध्या वास्तव्य मुंबई) यांच्या नावावर होती. 15 ऑक्टोबर 1991 रोजी पारसमल मश्रीमल शहा यांना ही जमीन खरेदीखताद्वारे विकली गेली होती. मात्र इतक्या वर्षांनंतर अचानक नोंद घेताना मूळ मालकाला कोणतीही नोटीस दिली न गेल्याने आणि मूळ खरेदीखताची प्रत न तपासता नोंदणी झाल्याने प्रकरणात गंभीर अनियमितता झाल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे बाहेरगावी गेलेल्या किंवा मृत व्यक्तींच्या नावावरील जमिनी हडप करण्याचा डाव अधिकाऱ्यांच्या संगनमताने रचला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यात लाखोंच्या उलाढाली, अधिकाऱ्यांना मिळणारे मोठे आर्थिक फायदे आणि वरून मिळणारे राजकीय संरक्षण यामुळे असे प्रकार सर्रास घडत असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. शासकीय यंत्रणेतील अशा भ्रष्ट कारभाराला लगाम घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे, असा सूर नागरिकांमध्ये उमटत आहे. सावेडी जमीन व्यवहार : 35 वर्षांनंतर नोंदणीचा गोंधळ जमिनीचा तपशील सर्वे नं. : 245/ब 1 (0.72 हेक्टर आर) सर्वे नं. : 245/ब 2 (0.63 हेक्टर आर) एकूण क्षेत्रफळ: 1 हेक्टर 35 आर मूळ मालक : अब्दुल अजीज डायाभाई (सध्या मुंबईत वास्तव्य) खरेदीदार : पारसमल मश्रीमल शहा खरेदीखत दिनांक : 15 ऑक्टोबर 1991 संशयास्पद बाबी तब्बल 35 वर्षांनंतर नोंदणी मूळ मालकास नोटीस न देता नोंद मूळ खरेदीखताची प्रत न तपासता नोंद तलाठी कार्यालयाच्या कारभारावर संशय

35 वर्षांनंतर नोंद; सावेडी जमीन प्रकरणामुळे प्रशासनावर संशयाची सावली Read More »

सरकारची माघार, त्रिभाषा सूत्रासंदर्भात GR रद्द, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

Devendra Fadnavis: राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीपासून मराठी भाषा सक्तीची आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाप्रमाणे त्रिभाषा सूत्राबाबत सांगोपांग अभ्यास करुन तसेच भविष्यात महत्त्वाच्या ठरणाऱ्या अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिटचे महत्त्व विचारात घेऊन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या समितीचा अहवाल येईपर्यंत तृतीय भाषा संदर्भातील काढण्यात आलेले राज्य सरकारचे 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 रोजीचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यावर शासनाचा भर; एकनाथ शिंदे राज्य शासन जनभावनेचा आदर करणारे असून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यावर राज्य शासनाचा भर असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी 3600 कोटी महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनामार्फत लाडकी बहीण योजना राबविली जात आहे. या लाडक्या बहिणींकरिता पुढील हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून आजपासून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

सरकारची माघार, त्रिभाषा सूत्रासंदर्भात GR रद्द, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा Read More »

अहिल्यानगरमध्ये 35 वर्षांनंतर जमिनीचा संशयास्पद व्यवहार नोंद

अहिल्यानगरमध्ये 35 वर्षांनंतर जमिनीचा संशयास्पद व्यवहार नोंद; भूमाफियांना प्रशासनाचा हात?

अहिल्यानगरमध्ये 35 वर्षांनंतर जमिनीचा संशयास्पद व्यवहार नोंद; भूमाफियांना प्रशासनाचा हात? land Scam Sawedi :- अहिल्यानगर – सध्या राज्यात अहमदनगर मधील शहरी भागातील जमिनींचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत त्यातच झटपट आणि कमी काळात श्रीमंत होण्याची स्पर्धा जोरात सुरू आहे जे नागरिक हयात नाहीत किंवा पूर्वी शहर सोडून निघून गेले अशा अशा नागरिकांच्या जमिनी आणि प्लॉट शोधून अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्या जमिनीचे बनावट खरेदीखत करायचं आणि ती चढ्या भावाने विकायची हा धंद्या सध्या अहिल्यानगर मध्ये जोरात सुरू आहे, अहिल्यानगर (सावेडी) (land Scam Sawedi) येथील सर्वे नंबर 245/ब 1 (क्षेत्रफळ 0.72 हेक्टर आर) व 245/ब 2 (क्षेत्रफळ 0.63 हेक्टर आर), एकूण 1 हेक्टर 35 आर जमिनीचा 35 वर्षांपूर्वीचा खरेदी व्यवहार तब्बल तीन दशकांनंतर सावेडी तलाठी कार्यालयात नोंदवला गेल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. मूळ मालक अब्दुल अजीज डायाभाई (मूळ पत्ता झेंडीगेट, अहिल्यानगर; सध्या वास्तव्य – मुंबई) यांनी 15 ऑक्टोबर 1991 रोजी पारसमल मश्रीमल शहा यांना विकलेली जमीन एवढ्या दीर्घ काळानंतर शासकीय नोंदवहीत दाखल होणं संशयाचे धुके गडद करत आहे.या प्रकरणात भूमाफियांना शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचाराचा आणि राजकीय वरदहस्ताचा आधार मिळाल्याची जोरदार चर्चा आहे. एवढ्या वर्षांनंतर नोंद घेताना मूळ मालकाला कोणतीही नोटीस न देता नोंद प्रक्रिया पूर्ण करण्यात आली, खरेदीखताची मूळ प्रत तपासण्यात आली नाही, यामुळे नोंदवह्यांची शुद्धता आणि शासकीय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. *भूमाफियांचे संगनमताने?बाहेरगावी वास्तव्यास असलेल्या किंवा मृत व्यक्तींच्या नावावरील जमिनीवर खोटे दस्तऐवज तयार करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमीन हडप करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. अशा प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना मिळणारा मोठा आर्थिक फायदा, वरिष्ठांचे मूक समर्थन आणि काही राजकीय लोकांचा आशीर्वाद असल्याने हे घोटाळे बेधडक सुरू आहेत, असा आरोप केला जात आहे.उच्चस्तरीय चौकशीची मागणीया संशयास्पद व्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि शासकीय यंत्रणेत पसरलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालावा, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. अहिल्यानगर परिसरात भूमाफियांचे वाढते धाडस आणि प्रशासनातील संदिग्ध भूमिका यामुळे जनतेत तीव्र संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणामुळे भूमी नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता आणि शासकीय यंत्रणेच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अहिल्यानगरमध्ये 35 वर्षांनंतर जमिनीचा संशयास्पद व्यवहार नोंद; भूमाफियांना प्रशासनाचा हात? Read More »

ठाकरे बंधूंना शरद पवारांचा जाहीर पाठिंबा; 5 तारखेच्या मोर्चात सहभागी होणार

Sharad Pawar: मराठीच्या समर्थनार्थ पुकारलेल्या ५ जुलै रोजीच्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दर्शविला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी एक पत्र ट्विट करत भूमिका स्पष्ट केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आपल्या पत्रात म्हटले आहेत की, महाराष्ट्राहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा महाराष्ट्रासाठी आणि जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा राष्ट्रासाठी पक्षीय भेदाभेद बाजूला सारून उभं राहणं हेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचं स्पष्ट धोरण आहे असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) याअंतर्गत त्रिभाषा सूत्राचं समीकरण पुढे करत इयत्ता पहिलीपासून शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा बंधनकारक करण्याचे योजिले आहे. ह्याविरोधात महाराष्ट्रात मराठी भाषिकांमध्ये टोकाचं जनमत तयार होत आहे. अनेक विद्यार्थी, पालक, शिक्षणतज्ञ, भाषातज्ञ अशा सर्व मान्यवरांनी त्रिभाषा सूत्र इयत्ता पहिलीपासून राबविण्यास विविधं आक्षेप नोंदविले आहेत. पण कुणालाही न जुमानता राज्य सरकार ‘हिंदी सक्ती’साठी हट्ट धरून बसलं आहे असे ते म्हणाले. खरं तर, महाराष्ट्राच्या जनमानसाचा कानोसा घेतलात तर जाणवतं की, कुणाचाही विविधं भाषा शिकण्याला किंबहुना हिंदी भाषेलाही विरोध नाही, पण इयत्ता पहिलीपासूनच प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावं असा आग्रह आहे, जो योग्य आहे. आणि, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्ष म्हणून आमचीही हीच भूमिका आहे असे स्पष्ट करताना त्यांनी शैक्षणिक धोरणाच्या त्रिभाषा सूत्राआडून मातृभाषेला डावलण्यासाठी प्रयत्न होत असतील तर मराठी माणूस एकदिलाने त्याचा विरोध करणार, ह्याची सत्ताधाऱ्यांनी नोंद घ्यावी असा इशाराही दिला. महाराष्ट्र सरकारच्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020)’ अंतर्गत त्रिभाषा सूत्रान्वये केल्या जाणाऱ्या हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी येत्या शनिवारी, ५ जुलै २०२५ रोजी तमाम मराठीजनांकडून मुंबईत एक मोर्चा पुकारण्यात आला आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचा ह्या मोर्चाला संपूर्ण पाठिंबा आहे. महाराष्ट्राहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा महाराष्ट्रासाठी आणि जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा राष्ट्रासाठी पक्षीय भेदाभेद बाजूला सारून उभं राहणं हेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचं स्पष्ट धोरण आहे. म्हणूनच, मी पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधींना, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन करत आहे की, येत्या ५ जुलैच्या मोर्चात प्रचंड संख्येने आवर्जून सहभागी व्हा असे आवाहन त्यांनी केले आहे.

ठाकरे बंधूंना शरद पवारांचा जाहीर पाठिंबा; 5 तारखेच्या मोर्चात सहभागी होणार Read More »

जवखेडे खालसा येथील पीर बाबा रमजान दर्गाला संरक्षण द्या, मुस्लिम समाजाची मागणी

Ahilyanagar News : पाथर्डी तालुक्यातील मौजे जवखेडे खालसा येथे 25 व 26 जून रोजी पीर बाबा रमजान दर्गा उर्फ कान्हुबा येथे बेकायदेशीरपणे काही विघ्नसंतोषी लोक एकत्र येऊन धार्मिक द्वेष पसरविण्याच्या उद्देशाने गैरकृत्य करणार असल्याने त्यांना रोखण्याची मागणी जवखेडे खालसा मधील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. दर्गात येऊन मुजावर यांना धमकावून आरती करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावणार नाही व कोणतीही विपरीत घटना घडणार नाही, यासाठी प्रशासनाने योग्य भूमिका घेण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. पाथर्डी तालुक्यातील मौजे जवखेडे खालसा येथे पीर बाबा रमजान उर्फ कान्हुबा दर्गा आहे. या दर्गाच्या दिवा बत्तीसाठी मुस्लिम समाजाला पिढ्यानपिढ्या दीडशे वर्षापासून इनामी जमिनी मिळालेली आहे. शासनाच्या गॅजेटमध्ये देखील तसा उल्लेख असून, ॲलिनेशन रजिस्टरला याबाबतची नोंद आहे. परंतु गावातील काही विघ्नसंतोषी व गावाबाहेरील जातीवादी संघटनेचे लोक यामध्ये राजकारण करून तीन वर्षापासून दर्गावर येऊन दमबाजी करण्याचा प्रयत्न करीत आहे. समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून, मुस्लिम समाजातील मुजावर यांना सदर दर्गातून शिवीगाळ करून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक गुरुवारी सकाळी दर्गावर येऊन आरती करण्याच्या उद्देशाने मुस्लिम समाजाचे मुजावर यांना दमबाजी करुन दर्गा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. गावात मुस्लिम समाज अल्प असून, त्यांच्यात भीतीपूर्ण वातावरण निर्माण करण्यात येत आहे. दर्गावर असलेला हिरवा झेंडा काढून, मजारवर भगवी चादर टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आला आहे. या दर्गावर कधीही आरती झालेली नसून, दर्गावर आरती करण्याच्या उद्देशाने चिथावणी देऊन जमाव जमविण्याचा प्रयत्न सुरु आहे. 19 जून रोजी दर्गातील मुजावर यांना मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दोन्ही समाजाची बैठक घेतली, मात्र मुस्लिम समाजावर दबाव टाकण्यात येत आहे. जातीय द्वेष पसरविण्यासाठी युवकांचे माथी भडकविण्याचे काम सुरु आहे. प्रशासन देखील यासंदर्भात सहकार्य करत नसून, विघ्नसंतोषी लोक दर्गाचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. 25 व 26 जून रोजी पीर बाबा रमजान दर्गा येथे जमाव जमवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. यासाठी विघ्नसंतोषी लोकांना गैरकृत्य करण्यापासून रोखण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी भैय्या शेख, शाहिद पठाण, डॉ परवेज अशरफी, फिरोज शेख, हुसेन शेख, शफिक शेख, शाकीर शेख, असिफ शेख, इरफान शेख, अन्वर शेख, आदींसह गावातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जवखेडे खालसा येथील पीर बाबा रमजान दर्गाला संरक्षण द्या, मुस्लिम समाजाची मागणी Read More »