DNA मराठी

latest news

cabinet meeting

Maharashtra Cabinet Decision: कारखान्यातील दैनंदिन कामाच्या तासांची मर्यादा 9 तासांवरून 12 तासांपर्यंत होणार; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Maharashtra Cabinet Decision : कारखाने अधिनियम १९४८ आणि महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या कृती दलाने सुचविलेल्या सुधारणानुसार कारखाने अधिनियम १९४८ मध्ये विविध सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, त्रिपुरा यासारख्या राज्यांनी हे बदल आधीच केलेले आहेत. या सुधारणांमुळे जास्त मागणी असलेल्या वेळेस किंवा कामगारांच्या कमतरतेमध्ये कोणत्याही व्यत्ययाशिवाय उद्योगांचे कामकाज चालू राहू शकते. कामगारांना योग्य वेतन संरक्षणासह कायदेशीररित्या अतिरिक्त उत्पन्न मिळेल. कारखान्यातील दैनंदिन कामाच्या तासांची मर्यादा ९ तासांवरून १२ तासांपर्यंत होणार आहे. कारखान्यातील विश्रांतीसाठी सुट्टीचा कालावधी ५ तासानंतर ३० मिनिटे याऐवजी ६ तासापर्यंत ३० मिनिटे असा करण्यात आला आहे. आठवड्याच्या कामाचा कार्याचा विस्तार कालावधी साडेदहा तासावरुन १२ तास करण्यात आला आहे. अतिकालिक कामाच्या तासाची मर्यादा ११५ तास प्रति तिमाही यावरुन १४४ तास प्रति तिमाही अशी करण्यात येणार आहे. अर्थात अतिकालिक कामासाठी कामगारांची लेखी संमती घेणे आवश्यक असेल, अशी कठोर तरतूद सुद्धा त्यात आहे. याचबरोबर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवा शर्तींचे विनियमन) अधिनियम २०१७ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. ही सुधारणा २० आणि त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थापनांना लागू राहील. या सुधारणांनुसार दैनंदिन कामाचे तास ९ वरुन १० करणे, त्यास अनुसरुन विश्रांतीच्या सुट्टीच्या कालावधीत बदल करणे, तातडीचे काम सोपविलेल्या कर्मचाऱ्यांचे कार्यकालयोजन साडेदहा तासांवरून १२ तास करणे, अतिकालिक कामाचा कालावधी १२५ तासांवरुन १४४ तास करणे इत्यादी सुधारणांस मान्यता देण्यात आली.

Maharashtra Cabinet Decision: कारखान्यातील दैनंदिन कामाच्या तासांची मर्यादा 9 तासांवरून 12 तासांपर्यंत होणार; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय Read More »

cabinet meeting

Maharashtra Cabinet Decisions : कर्करोगावर सवलतीच्या दरात उपचार होणार, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Maharashtra Cabinet Decisions : टाटा मेमोरिअल सेंटर एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्राच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात तांबाटी (ता. खालापूर) येथे शंभर खाटांचे रुग्णालय उभारणार आहे. या रुग्णालयासाठी दिलेल्या १० हेक्टर जमिनीच्या भाडेपट्टा करारवरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.   रुग्णालयातील १०० खाटांपैकी १२ टक्के खाटा समाजातील गरीब, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, शासकीय कर्मचारी या गटातील रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात याव्यात. तसेच शासकीय योजनेनुसार कर्करोगावर सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून द्यावेत. रुग्णासोबतच्या एका व्यक्तीस अत्यल्प दरामध्ये रहिवासी सेवा उपलब्ध करुन देण्यात यावी, अशा अटींसह या रुग्णालयाला मुद्रांक शुल्कात सवलत देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. तर दुसरीकडे कोल्हापूर येथील सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लिमिटेड या संस्थेस कोल्हापूरमधील कसबा करवीर येथील अडीच हेक्टर जमीन महिलांची सहकारी औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या संस्थेच्या स्थापनेतून महिला उद्योजक निर्माण होणार आहेत. तसेच रोजगार संधीही उपलब्ध होणार आहेत. हा उद्देश लक्षात घेता जाहीर लिलावाशिवाय ही शासकीय जमीन रेडी रेकनरनुसार येणारी रक्कम आकारून भोगवटादार वर्ग-२ म्हणून देण्यात येणार आहे. त्यासाठी यापूर्वीच निश्चित केलेल्या धोरणानुसार काही अटी व शर्ती घालण्यात आल्या आहेत.  

Maharashtra Cabinet Decisions : कर्करोगावर सवलतीच्या दरात उपचार होणार, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय Read More »

mahesh landge

गोरक्षण म्हणजे चिंचोका खेळणं नव्हे! आमदार Mahesh Landge यांनी अजित पवारांना अप्रत्यक्षपणे सुनावले

MLA Mahesh Landge : गोरक्षक धर्माचे रक्षण करीत आहे. गोमातेच्या संवर्धनासाठी काम करीत आहेत. गोरक्षकांवर खोटे केस करण्याचा प्रयत्न कुणी केला. तर आम्ही कदापि सहन करणार नाही. गोरक्षण करणे म्हणजे चिंचोका खेळणं नाही. चुकीच्या पद्धतीने काही लोक प्रशासनासमोर गोरक्षकांबाबत मांडणी करीत आहेत. त्यांनी एकदा गोवंश कत्तलीसाठी घेवून जाणाऱ्या गाडीचा पाठलाग करावा, म्हणजे गोरक्षण काय आहे, हे तुम्हाला समजेल, अशी खणखणीत भूमिका भाजपा आमदार महेश लांडगे यांनी मांडली. इंदापूर येथे वीर सरदार मालोजीराजे भोसले यांची गढी आणि समाधी येथील अतिक्रमण हटवण्याबाबत सकल हिंदू समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित हिंदूत्ववादी जनसमुदायाला संबोधित करताना आमदार लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे सुनावले आहे. तीन दिवसांपूर्वी कुरेशी समाजातील प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यावेळी गोरक्षकांबाबत चुकीची मांडणी केली. त्यावर अजित पवार यांनी ‘‘गोरक्षकांना आवर घाला…’’ अशा सूचना पोलिस प्रशासनाला केल्या. याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे हिंदुत्ववादी संस्था, संघटना आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजाची सूर आहे. हिंदूत्ववादी सरकार असतानाही गोरक्षकांवर बंदी घालण्याची भूमिका घेतली जात आहे, अशी खंत गोरक्षकांमधून व्यक्त होत होती. दरम्यान, इंदापूरच्या मोर्चामध्ये आमदार लांडगे यांनी ‘‘गोरक्षण म्हणजे चिंचोका खेळणं नव्हे..’’ असे वक्तव्य केल्यामुळे गोसंवर्धन आणि गोरक्षकांच्या मुद्यावरुन दोन ‘दादा’ पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे आमने-सामने आले आहेत, असे चित्र आहे. एखादा जिहादी, कोणी कुरेशी जातो आणि सांगतो..‘‘गोरक्षक आमचे नुकसान करतात’’. त्यांना काय अडचण आहे. जुन्नरमधील बेकायदेशीर कत्तलखाने आम्ही बंद केले आहेत. गोमातेचे आम्ही रक्षण करणार आहोत. गोरक्षकांवर बंदी घालण्याची भाषा कोणी करु नये. गोरक्षण, लव्ह जिहाद, लॅन्ड जिहाद, धर्मांतर खपवून घेणार नाही. भाजपा महायुती हिंदूत्ववादी सरकार आहे. गोरक्षकांनी घाबरण्याचे कारण नाही. असं देखील यावेळी भाजप आमदार महेश लांडगे म्हणाले.

गोरक्षण म्हणजे चिंचोका खेळणं नव्हे! आमदार Mahesh Landge यांनी अजित पवारांना अप्रत्यक्षपणे सुनावले Read More »

balasaheb thorat

Balasaheb Thorat : तुमचे योगदान काय, तुम्ही आठ महिन्यात चारी केली का ? बाळासाहेब थोरात यांचा परखड सवाल

Balasaheb Thorat : दुष्काळी भागाला पाणी मिळावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून आपण निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. कालव्यांच्या वरच्या बाजूला पाणी मिळावे हा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. स्वातंत्र्यसैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या मदतीने भोजापुर चारी तयार केली. पाणी देण्यासाठी आपण सातत्यपूर्ण काम केले. यावर्षी मे महिन्यातच चांगला पाऊस झाल्याने निसर्गाची कृपा झाली. तयार असलेली चारी आणि चांगला झालेला पाऊस यामुळे पाणी आले असल्याचा आनंद आहे. मात्र तुमचे या चारीमध्ये योगदान काय असा सवाल माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्री विखे पाटील यांना विचारला आहे. बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, निमोण, नान्नज दुमाला या दुष्काळी परिसराला पाणी मिळावे याकरता 1977 मध्ये संगमनेर व प्रवरा कारखाना यांनी संयुक्त खर्चातून चारी करावी असे ठरले. मात्र प्रवरा कारखान्याने यामधून अंग काढून घेतले. 1994 मध्ये स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात यांच्या पुढाकारातून कारखान्याने त्यावेळेस खर्च करून ही पूर चारी निर्माण केली .1996 मध्ये वटमाई डोंगराजवळ पाणी आले. हे पाणी पुढे तिगाव माथापर्यंत नेता येईल याचा विचार करून तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांनी कारखान्याच्या माध्यमातून ही संकल्पना राबविली. 2006 मध्ये कारखान्याची यंत्रणा व सर्व कामगार यांनी श्रमदान करून तिगाव माथापर्यंत चारी पूर्ण केली. 2 ऑक्टोंबर 2006 मध्ये येथे पाणी पूजन केले. आपण जलसंधारण मंत्री असताना 2008 मध्ये या चारीच्या दुरुस्ती, सेतु पुल, काँक्रीट कामे, व लांबी करता 5 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. त्या माध्यमातून सातत्याने कामे केली. भोजापूरचे पाणी दरवर्षी निमोन पिंपळे नान्नज दुमाला ,पारेगाव बुद्रुक, तळेगाव, तीगाव, वरझडी या गावांकरता मिळावे याकरता पाठपुरावा केला. याचबरोबर ही चारी जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित केली. 2021 मध्ये पुन्हा चारीच्या दुरुस्ती करता 2 कोटी 12 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. अनेक वेळा पिंपळे धरण भरल्यामुळे पारेगाव बुद्रुक चिंचोली गुरव देव कवठ्यापर्यंत पाणी गेले. सुरुवातीला चारीच्या कामासाठी वेळोवेळी आंदोलने केली.कारखाना यंत्रणा व आपण सातत्यपूर्ण काम केले. हे जनतेला माहित आहे. आपण आपणही अनेक वर्ष मंत्री आहात यापूर्वी या चारीच्या कामासाठी कोणते योगदान दिले. या कामांमध्ये आपण एक तरी खडा कधी उचलला का ? असा सवाल विचारताना नवीन लोकप्रतिनिधीला तर ही चारी सुद्धा माहित नव्हती. काम कोणी केले कोणाचे योगदान आहे हे जनतेला माहित आहे. खोट्या भूल थापा आणि सोशल मीडियाचा चुकीचा वापर करून ही भ्रम निर्माण केला जात आहे. यावर्षी निसर्गाची मोठी कृपा झाली. मे आणि जून मध्ये चांगला पाऊस झाल्याने लवकर भोजापुर धरण ओव्हर फ्लो झाले आणि कारखान्याच्या माध्यमातून तयार असलेली भोजापुर आणि निसर्गाची कृपा यामुळे लवकर पाणी आले. याचा सर्वाधिक आपल्याला आनंद आहे. ही चारी मागील आठ महिन्यात झाली का ? असा सवाल करताना या चारीच्या कामात आपले योगदान काय ? असा परखड सवाल बाळासाहेब थोरात यांनी मंत्री राधाकृष्ण विखे व नवीन लोकप्रतिनिधी खताळ यांना विचारला आहे. कितीही भूलथापा द्या लवकर उत्तर देणार आपण दुष्काळी भागाला पाणी मिळावे यासाठी निळवंडे धरण कालवे पूर्ण केले भोजापुरच्या चारीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. पाणी सर्वांना मिळाले पाहिजे यासाठी सातत्यपूर्ण काम आणि प्रयत्न केले. उपेक्षित सर्वांना पाणी मिळाले पाहिजे हा आपला आग्रह आहे. तुम्ही कितीही भूलथापा द्या सर्वांना लवकरच उत्तर देऊ असा इशाराही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

Balasaheb Thorat : तुमचे योगदान काय, तुम्ही आठ महिन्यात चारी केली का ? बाळासाहेब थोरात यांचा परखड सवाल Read More »

modi

PM मोदींनी मोडला माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा विक्रम; केली ‘ही’ मोठी कामगिरी

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राजकीय प्रवासात आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. २५ जुलै २०२५ रोजी त्यांनी पंतप्रधान म्हणून ४०७८ दिवस पूर्ण केले, ज्यामुळे ते भारताचे दुसरे सर्वात जास्त काळ पंतप्रधान (Prime Minister) राहिले. या कामगिरीसह त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांचा विक्रम मागे टाकला आहे, ज्या ४०७७ दिवस पंतप्रधान होत्या. मोदींनी आतापर्यंत सलग २४ वर्षे प्रशासनात सक्रिय भूमिका बजावली आहे. प्रथम गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे पंतप्रधान म्हणून. ही कामगिरी इतर कोणत्याही भारतीय नेत्यासाठी दुर्मिळ आहे. विशेष म्हणजे ते स्वतंत्र भारतात जन्मलेले (१९४७ नंतर) इतके दीर्घ कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले पंतप्रधान आहेत. इंदिरा गांधींनी २४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७ पर्यंत पंतप्रधानपद भूषवले आणि ४०७७ दिवसांचा कार्यकाळ सांभाळला. आता मोदींनी त्यांना मागे टाकले आहे. सलग सहा प्रमुख निवडणुका जिंकल्या पंतप्रधान मोदी हे आतापर्यंतचे सर्वात जास्त काळ बिगर-काँग्रेसी पंतप्रधान बनले आहेत. सलग सहा प्रमुख निवडणुका जिंकणारे ते भारतातील एकमेव नेते आहेत. २००२, २००७ आणि २०१२ च्या गुजरात विधानसभा निवडणुका आणि २०१४, २०१९ आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुका. तथापि, या यादीत अजूनही पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Nehru)आहेत, ज्यांनी १५ ऑगस्ट १९४७ ते २७ मे १९६४ पर्यंत एकूण ६१२६ दिवस पंतप्रधान राहून एक विक्रम केला. हा विक्रम मोडण्यासाठी मोदींना अजूनही सुमारे २०४८ दिवस या पदावर राहावे लागेल.

PM मोदींनी मोडला माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा विक्रम; केली ‘ही’ मोठी कामगिरी Read More »

img 20250723 wa0001

Pune Crime : पुण्यात मध्यरात्री दहशत…,15 रिक्षा, 3 कार, 2 स्कूल बसची तोडफोड; दोघांवर वार

Pune Crime: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचा आलेख वाढतात दिसत आहे. यामुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह आता उपस्थित होत आहे. यातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील धनकवडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री रिक्षा, कार, स्कूल बससह 20 ते 25 वाहनांची तोडफोड करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार सहकार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनकवडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. केशव कॉम्प्लेक्स, सरस्वती चौक, आणि नवनाथनगर या भागात तीन अज्ञात व्यक्तींनी वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. ही घटना 22 जुलै रोजी रात्री 11.45 ते 1 वाजेच्या दरम्यान घडली आहे. पोलीसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी एकूण 15 ऑटो रिक्षा, 3 कार, 2 शालेय बस, आणि 1 पियाजिओ टेम्पो यांची काचफोड करत मोठे नुकसान केले आहे. हे गुन्हेगार वाहनांच्या रस्त्यावर असलेल्या पार्किंगवर तुफान हाणामारी करत फिरत होते. त्याचवेळी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन नागरिकांना देखील मारहाण करून जखमी करण्यात आले आहे. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सध्या डीबी शाखा आणि स्थानिक पोलीस अधिकारी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Pune Crime : पुण्यात मध्यरात्री दहशत…,15 रिक्षा, 3 कार, 2 स्कूल बसची तोडफोड; दोघांवर वार Read More »

kiran kale

Kiran Kale : मोठी बातमी! महिला अत्याचार प्रकरणी किरण काळेंना अटक

Kiran Kale : अहिल्यानगर शहरातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे यांना महिला अत्याचार प्रकरणी कोतवाली पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. या बाबत कर्जत तालुक्यातील एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार ही कारवाई करण्यात आली. काही दिवसापूर्वी अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर 350 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप करत किरण काळे राज्यातील राजकारणात चर्चेत आले होते. फिर्यादीत म्हटले आहे की, पीडित महिला व तिचा पती यांच्यातील वैवाहिक वाद मिटविण्यासाठी पीडित महिला किरण काळे यांच्या संपर्कात आली होती. महिलाला विश्वासात घेत मदतीचे आश्वासन देत 2023 ते 2024 या दरम्यान काळे यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात वारंवार अत्याचार केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या घटनेबाबत कुणाला काही सांगितले तर जीवे मारू, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार कोतवाली पोलिसांनी किरण काळे याला अटक केली आहे.

Kiran Kale : मोठी बातमी! महिला अत्याचार प्रकरणी किरण काळेंना अटक Read More »

land scam 135 crores worth of land in sawedi dna marathi

land scam – सावेडीतील कोटींच्या जमिनीवर भूमाफियांची नजर; बनावट खरेदीखतप्रकरणी राजकीय हस्तक्षेपाचा संशय

सावेडीतील १३५ कोटींच्या बनावट खरेदीखतप्रकरणात “अक्का कोण?” – हा प्रश्न सध्या शहरात चर्चेचा विषय ठरतोय. या “अक्क्या”चं नाव जरी स्पष्टपणे समोर आलं नसलं, तरी अहिल्यानगर –  “अहवाल कधी येणार?” असा सवाल सध्या सावेडी परिसरात गूंजतोय, कारण कोटींच्या बहुमूल्य जमिनीच्या बनावट खरेदीखत प्रकरणात चौकशी झाली तरी अहवालाचं अद्यापही दर्शन नाही. हे प्रकरण आता केवळ दस्तऐवजांपुरतं न राहता, राजकीय व अधिकाऱ्यांच्या संगनमताचं मोठं जाळं असल्याची चर्चा जोरात आहे. मौजे सावेडी येथील तब्बल १ हेक्टर ३५ आर इतकं भरगच्च क्षेत्र असलेली मालमत्ता बनावट कागदपत्रांद्वारे बळकावण्यात आल्याचा संशयित प्रकार उघड झाल्यानं खळबळ उधळी आहे . बाजारभावानुसार सध्या या जमिनीची किंमत अंदाजे कोटी रुपये आहे. ही जमीन कवडीमोल दरात हस्तगत करण्यासाठी भूमाफिया, महसूल यंत्रणेतले काही अधिकारी आणि राजकीय मंडळी एकत्र आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शेख मतिन आलम बशिरुद्दीन (रा. जुना बाजार, भिस्त गल्ली, अहमदनगर) यांनी या संदर्भात दुय्यम निबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली असून, त्यांनी १५ ऑक्टोबर १९९१ रोजी पारसमल मश्रीमल शाह (रा. गांधीनगर, गुजरात) यांच्या नावे बनावट खरेदीखत तयार झाल्याचा आरोप केला आहे. हे खरेदीखत दुय्यम निबंधक, अहिल्यानगर-१ दक्षिण यांच्या कार्यालयात छ-४३० व जादा पुस्तक क्र.१, खंड-१९६, पृष्ठ २१ ते ३२, क्र. छ-४२८ या नोंदीनुसार रजिस्टर करण्यात आले होते. खोट्या कुलमुखत्यारपत्राच्या आधारे गणेश शिवराम पाचार्णे यांच्या नावाने जमीन विकल्याचा संशयित दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात प्रांत अधिकारी सुधीर पाटील यांनी चौकशी सुरु केली आहे त्या नुसार त्यांनी वस्तुनिष्ठ आवहाल मागितला होता. त्यानंतर  या प्रकरणात अप्पर तहसीलदारांकडे सुनावणी झाली असली तरी, त्याचा अहवाल अद्याप वरिष्ठांकडे पोहोचलेला नाही. ही विलंबात्मकता संशयास्पद ठरत असून, एका राजकीय पक्षाच्या नेत्याने दूरध्वनीद्वारे चौकशीत हस्तक्षेप केल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जमिनीवर डोळा ठेवणारे काहीजण सध्या मुंबई-पुण्यातूनच यंत्रणा राबवत आहेत. हे प्रकरण केवळ बनावट दस्तऐवजांपुरते मर्यादित नसून, संपूर्ण नियोजनबद्ध रचनेचा भाग असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत. शेख मतिन यांनी संबंधित सह जिल्हा निबंधक व दुय्यम निबंधक यांच्याकडे अर्ज सादर करून या मालमत्तेवरील सर्व व्यवहार तत्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. बेकायदेशीर दस्तऐवजांची नोंद घेतल्याप्रकरणी जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे. “अक्का कोण?” सावेडीतील १३५ कोटींच्या बनावट खरेदीखतप्रकरणात “अक्का कोण?” – हा प्रश्न सध्या शहरात चर्चेचा विषय ठरतोय. या “अक्क्या”चं नाव जरी स्पष्टपणे समोर आलं नसलं, तरी तयार करण्यात आलेल्या बनावट दस्तऐवजांना संरक्षण देणारा, चौकशीचा अहवाल थांबवणारा आणि महसूल यंत्रणेत दडपशाही करणारा कुणीतरी प्रभावशाली व्यक्ती आहे, हे स्पष्ट दिसतंय. या सगळ्या घडामोडींमुळे सावेडी परिसरात अस्वस्थता वाढली असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. भूमाफिया आणि सत्ताधाऱ्यांच्या सहभागाच्या चर्चांमुळे प्रशासनावरही जनतेचा दबाव वाढत चालला आहे. आता ‘अहवाल’ येतो का, की तोही राजकीय आकसाच्या फाईलखाली गाडला जातो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरत आहे.

land scam – सावेडीतील कोटींच्या जमिनीवर भूमाफियांची नजर; बनावट खरेदीखतप्रकरणी राजकीय हस्तक्षेपाचा संशय Read More »

img 20250721 wa0003

Honey Trap : ओ बुलाती है मगर जाने का नही, ‘हनी ट्रॅप’ प्रकरण गाजतंय, पण तक्रारच नाही; पोलिस हतबल

Honey Trap : नाशिक शहरात सध्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या ‘हनी ट्रॅप’ प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ‘ती’ बुलावत होती, आणि तो गेला… मग सुरू झाला ब्लॅकमेलचा खेळ! सुरुवातीला तीन कोटी, नंतर थेट दहा कोटी रुपयांची मागणी झाली. अखेर प्रकरणाची वात खुलली, पण दोन्ही बाजूंनी लेखी तक्रार नाही. पोलिस मात्र संभ्रमात. मिळालेल्या माहितीनुसार, महसूल विभागातील अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यास सापळ्यात अडकवून, त्याच्याकडून प्रथम तीन कोटी रुपये उकळण्यात आले. पण हे पुरेसे न वाटल्याने पुन्हा दहा कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. अधिकाऱ्याने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर ‘ती’ महिला थेट पोलिस ठाण्यात पोहोचली. सुरुवातीला तोंडी तक्रार करण्यात आली, त्यानंतर काही दिवसांनी लेखी तक्रारीसाठी ती पुन्हा आली. दरम्यान, संबंधित अधिकारी याच काळात ठाणे येथे गेले असताना त्यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याचे समजते. तिथेच त्यांनी संबंधित महिलेविरोधात तक्रार दिली. पण काही दिवसांतच दोघांनीही परस्पर समजुतीने तक्रारी मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पोलिस यंत्रणा संभ्रमात आहे. कोणतीही अधिकृत तक्रार नसल्याने पुढील कायदेशीर कारवाई करणे कठीण ठरत आहे. या प्रकरणात काही बड्या नावांचा समावेश असल्याचीही कुजबुज सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी नाशिकमधील एका हॉटेलमध्ये तपास करून त्या हॉटेलची खोली सील करण्यात आली, अशी चर्चा रंगली होती. मात्र, नाशिक पोलिसांनी याचा अधिकृत इन्कार केला आहे. सध्या त्या मजल्यावर प्रवेश बंद करण्यात आला असून, परिसरात संशयाचे वातावरण आहे. प्रकरणाचा पुढचा रंग काय घेईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण सध्या तरी ‘हनी ट्रॅप’च्या गूढ गर्तेत प्रशासनही अडकले आहे, हे निश्चित.

Honey Trap : ओ बुलाती है मगर जाने का नही, ‘हनी ट्रॅप’ प्रकरण गाजतंय, पण तक्रारच नाही; पोलिस हतबल Read More »

‘माझा महाराष्ट्र कुठे चाललाय

Padalkar Awhad विधानभवनात गोंधळाचे राजकारण: लोकशाहीचा अपमान

Padalkar Awhad :- नागपूर :- महाराष्ट्र विधिमंडळ हे राज्याच्या लोकशाही व्यवस्थेचे सर्वोच्च मंदिर. या मंदिरात जनतेच्या प्रश्नांवर गंभीरपणे चर्चा होणे अपेक्षित असते. मात्र १७–१८ जुलै रोजी जे काही घडले ते या संस्थेच्या लोकशाहीला कलंक ठरावे असेच आहे. भाजपचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद गट) (NCP) चे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यातील वैयक्तिक राजकीय वैर विधानभवनाच्या चार भिंतींमध्ये दारुण राड्याचे कारण ठरले. समर्थकांनी एकमेकांवर शिवीगाळ आणि धक्काबुक्कीसारखे प्रकार करत लोकशाहीच्या सर्वोच्च संस्थेच्या प्रतिष्ठेचा विध्वंस केला. हे प्रकरण केवळ राजकीय असभ्यता नसून ती राज्यकारभाराच्या गंभीरतेवरच गदा आणणारी घटना आहे. या घटनांमुळे विधानसभेचे कामकाज काही काळासाठी थांबवावे लागले. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी घेतलेला निर्णय — आता केवळ आमदार, आमदारांचे वैयक्तिक सहाय्यक, विधान परिषद सदस्य आणि अधिकृत शासकीय अधिकारी यांनाच विधानभवनात प्रवेश असेल — हा आवश्यक असला, तरी लोकशाही प्रक्रियेमधील खुलेपणावर प्रश्न उपस्थित करणारा ठरतो. लोकशाहीत वाद होणं सहाजिक आहे, पण तो वाद संवादाच्या चौकटीतच होणं अपेक्षित असतं. ‘मी कोणत्या पक्षाचा’ हे सांगण्यापेक्षा ‘मी जनतेचा प्रतिनिधी’ या भूमिकेचा विसर गेल्यानेच अशा घटना घडत आहेत. ही केवळ पक्षीय कुरघोडी नव्हे, तर जनतेच्या विश्वासाला तडा देणारी राजकीय बेशिस्त आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे,(Eknath Shinde)  आणि विरोधी पक्षनेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मिळून अशा घटना रोखण्यासाठी आचारसंहिता आखावी. केवळ व्यक्तिकेंद्रित राजकारणाने विधिमंडळाचा अपमान होतो, आणि या अपमानाचे दुष्परिणाम सर्वसामान्य जनतेवर उमटतात. तर ‘माझा महाराष्ट्र कुठे चाललाय? राज्य विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हाणामारी झाली, आणि त्या गोंधळात सहभागी असलेल्यांपैकी काही जणांवर आधीपासूनच गंभीर गुन्हे दाखल असल्याचं समोर येतं. अशा व्यक्तींना राजकीय नेत्यांकडून खुलेआम पाठींबा दिला जातो, त्यांच्यासह विधानभवनात किंवा सभागृह परिसरात वावरण्याची मुभा दिली जाते — हे लोकशाहीच्या अंगावर काटा आणणारे चित्र आहे. जर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना आमदारांचे समर्थन लाभत असेल आणि तेच लोक मारहाणीच्या घटनांमध्ये सक्रिय असतील, तर ‘माझा महाराष्ट्र कुठे चाललाय?’ हा प्रश्न प्रत्येक जागरूक नागरिकाच्या मनात उमटल्याशिवाय राहत नाही. हे दृश्य सामान्य माणसाच्या दृष्टीने नुसते चिंताजनकच नाही, तर भविष्याबद्दल असुरक्षिततेची जाणीव निर्माण करणारे आहे. जर विधिमंडळात गुन्हेगारांचा ठसा उमटू लागला, तर कायदा आणि सुव्यवस्थेची व्याख्याच मोडीत निघेल. मग रस्त्यावर न्याय मागणाऱ्या सामान्य नागरिकासाठी कोणता दरवाजा उरेल? शेवटी एकच प्रश्न राहतो: जर विधिमंडळातच कायदा-संविधानाची पायमल्ली होत असेल, तर रस्त्यावर सामान्य नागरिकाकडून काय अपेक्षा ठेवायची? राजकारणाला पुन्हा शिस्त, संवाद आणि शिष्टाचार या मार्गावर आणणं ही सध्याची काळाची गरज आहे. नाहीतर जनता मतदान करताना ‘नेते नाही, तर नाटके’ या शब्दातच आपला उद्वेग व्यक्त करेल.

Padalkar Awhad विधानभवनात गोंधळाचे राजकारण: लोकशाहीचा अपमान Read More »