DNA मराठी

BJP

ram shinde

Ram Shinde: तातडीने पंचनामे करून मदत उपलब्ध करून द्या; राम शिंदेंनी केली अतिवृष्टीग्रस्त कर्जत व जामखेडमधील भागांची पाहणी

Ram Shinde: अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कर्जत तालुक्यातील नागलवाडी, नागपूर, सितपूर, निंबोडी, तरडगाव, मलठण व जामखेड तालुक्यातील चौंडी या गावांना विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मुसळधार पावसामुळे शेती, चारा, जनावरांचे गोठे, रस्ते, पूल, बंधारे व पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्या आहेत. जिल्हा परिषद शाळांवर व घरांवरील छप्पर उडून गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण तसेच ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. चौंडी येथील शिल्पसृष्टीच्या बुरुजाला पाणी लागले असून चौंडी पुलावर ७ ते ८ फूट पाणी आल्याचेही या पाहणीत निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर महसूल, कृषी व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना दोन दिवसांत पंचनामे करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाकडे सादर करण्याचे निर्देश सभापतींनी दिले. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, प्रभावित कुटुंबांना अन्न, पाणी व वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी तसेच पायाभूत सुविधांची दुरुस्ती व पुनर्बांधणी तातडीने सुरू करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. ग्रामस्थांना संवाद साधताना शिंदे म्हणाले, “ही आपत्ती ग्रामस्थांना एकट्याने लढायची नाही. शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून एकही शेतकरी वा ग्रामस्थ मदतीपासून वंचित राहणार नाही. शासनस्तरावर आवश्यक ती मदत मिळविण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे.” “ग्रामस्थांनी संयम राखावा, एकमेकांना सहकार्य करावे व प्रशासनाशी समन्वय ठेवून परिस्थितीचा सामना करावा”, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपविभागीय अधिकारी नितीन पाटील यांच्यासह महसूल, कृषी, वन व जलसंधारण विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच कर्जत व जामखेड तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Ram Shinde: तातडीने पंचनामे करून मदत उपलब्ध करून द्या; राम शिंदेंनी केली अतिवृष्टीग्रस्त कर्जत व जामखेडमधील भागांची पाहणी Read More »

satara crime

Satara Crime: धक्कादायक तरुणावर पूर्ववैमनस्यातून गोळीबार; हल्लेखोर मोटरसायकलवरून पसार

Satara Crime: शिरवळ (ता. खंडाळा) येथे पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर गोळ्या झाडून त्याच्या हत्येचा प्रयत्न झाला. एक गोळी हाताला चाटून गेल्याने रियाज उर्फ मिन्या इकबाल शेख (रा. शिरवळ, ता. खंडाळा) हा जखमी झाला आहे. मंगळवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहासमोरील मुख्य रस्त्यावर ही थरारक घटना घडली असून गोळीबाराचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हल्लेखोर मोटरसायकलवरून पसार शिरवळच्या विश्रामगृहासमोरील मुख्य रस्त्यावर रियाज शेख हा मित्रासोबत बोलत असताना दोघेजण मोटरसायकलवरून आले. त्यापैकी एकाने पिस्तुलातून रियाजवर दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी उजव्या हाताला लागून तो जखमी झाला. या थरारानंतर मुख्य रस्त्यावर पळापळ झाली. त्याचा फायदा घेऊन दोन्ही हल्लेखोर मोटरसायकलवरून पसार झाले. गोळीबाराचा थरार सीसीटीव्हीत कैद गोळीबाराचा हा थरार एका सीसीटीव्हीत कैद झाला असून त्यामध्ये हल्लेखोर स्पष्टपणे दिसत आहेत. ही घटना पूर्ववैमन्यातून झाल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. गोळीबाराची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, शिरवळचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. गोळीबारामुळे मुख्य रस्त्यावर पळापळ शिरवळच्या मुख्य रस्त्यावर सायंकाळी झालेल्या गोळीबारानंतर नागरिकांची पळापळ झाली. गोळीबाराच्या घटनेवेळी शालेय विद्यार्थी घरी जात होते. त्याचचवेळी हा थरार घडला. सुदैवाने विद्यार्थी अथवा नागरिकांना गोळी लागली नाही. मात्र कायदा, सुव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करण्याची वेळ शिरवळकरांवर आली आहे. संशयित आरोपींची नावे कळली, तपास पथके रवाना झाली आहेत. पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली असून हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. दरम्यान, या हल्ल्याच्या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचाही शिरवळ पोलीस तपास करत आहेत. जखमी तरुणाचा जबाब घेतला आहे. हल्लेखोरांना लवकरच जेरबंद करण्यात यश येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिली.

Satara Crime: धक्कादायक तरुणावर पूर्ववैमनस्यातून गोळीबार; हल्लेखोर मोटरसायकलवरून पसार Read More »

Harshwardhan Sapkal

Harshwardhan Sapkal: देवेंद्र फडणवीसांच्या चमकोगिरीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान: हर्षवर्धन सपकाळ

Harshwardhan Sapkal: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवाभाऊचे बिरुद लावून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जागोजागी पोस्टर लावले आहेत. पण हे पोस्टर लावताना त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे याचे भान ठेवून पोस्टर योग्य जागी तरी लावयला हवीत पण प्रभादेवी रेल्वे स्टेशनच्या गल्लीत लावलेल्या पोस्टरच्या खाली कचरा, घाण, अस्वच्छता दिसत असून लोक त्या पोस्टरवर थुंकत आहेत. स्वतःच्या चमकोगिरीमुळे महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा अपमान होत आहे,असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले आहे की, देवेंद्र फडणवीस, तुमच्या प्रसिद्धीच्या हव्यासापायी महाराजांचा असा अवमान का केला जात आहे? जिथे लोक थुंकतात, कचरा टाकतात, तिथे पोस्टर लावून महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? हे मुद्दाम केले गेले आहे का? असा प्रश्न विचारून रा. स्व. संघ व भाजपच्या नेत्यांनी सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यापद्धतीने जाणीवपूर्वक अपमान केला ते पाहता हे मुद्दाम केले गेले असेल अशी शक्यता नाकारता येत नाही. सपकाळ पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत, त्यांच्या प्रतिमेला कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ लावणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. महाराष्ट्र व शिवप्रेमी जनता हा अपमान कदापी सहन करणार नाही. स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी जनतेची जाहीर माफी मागावी, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Harshwardhan Sapkal: देवेंद्र फडणवीसांच्या चमकोगिरीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान: हर्षवर्धन सपकाळ Read More »

crime

Odisha Crime: व्हिडिओ बनवला अन् पैशांची मागणी; 19 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार, 3 जणांना अटक

Odisha Crime : ओडिशाच्या पुरी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समुद्रकिनाऱ्याजवळ एका 19 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. बलात्काराच्या संदर्भात तीन जणांना अटक करण्यात आली आहे आणि या घटनेत सहभागी असलेल्या इतरांचा शोध सुरू आहे. ही घटना दुपारी ब्रह्मगिरी पोलिस स्टेशन परिसरातील बलिहरचंडी मंदिराजवळ घडली जेव्हा मुलगी आणि तिचा पुरुष साथीदार काही वेळ घालवण्यासाठी मंदिराजवळील एका ठिकाणी गेले होते. व्हिडिओ बनवला आणि पैसे मागितले स्थानिक तरुणांच्या एका गटाने दोघांचे फोटो काढले आणि त्यांचे व्हिडिओ बनवले आणि त्यांच्याकडून पैसे मागितले. पुरीचे पोलिस अधीक्षक (एसपी) प्रतीक सिंह यांनी पीडितेने ब्रह्मगिरी पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या एफआयआरचा हवाला देत सांगितले की, जेव्हा तिने (पीडितेने) पैसे देण्यास नकार दिला तेव्हा गटातील दोन पुरुषांनी विद्यार्थिनीवर बलात्कार केला. पोलिसांनी सांगितले की, गटातील इतर सदस्यांनी सामूहिक बलात्कारापूर्वी पीडितेच्या पुरुष साथीदाराचे हात बांधले होते. त्यांनी सांगितले की, ही घटना शनिवारी घडली असली तरी, लैंगिक अत्याचाराच्या धक्क्यातून सावरल्यानंतर पीडितेने सोमवारी संध्याकाळी एफआयआर दाखल केला. एसपींनी सांगितले की, महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. ही घटना 15 जून रोजी गंजम जिल्ह्यातील गोपाळपूर समुद्रकिनाऱ्यावर घडलेल्या दुसऱ्या बलात्काराच्या घटनेसारखीच आहे. त्या सामूहिक बलात्काराप्रकरणी दहा जणांना अटक करण्यात आली आहे.

Odisha Crime: व्हिडिओ बनवला अन् पैशांची मागणी; 19 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार, 3 जणांना अटक Read More »

atul londhe

राजुरा मतदारसंघातील मतचोरी प्रकरणी एका महिन्यात कारवाई करा अन्यथा…, अतुल लोंढेंचा इशारा

Atul Londhe : भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने हातात हात घालून मतचोरी केल्याचे एकाएका मतदार संघातील घोटाळे काँग्रेस पक्ष उघड करत आहे. राहुल गांधी यांनी महादेवपुरा मतदारसंघातील मतचोरीचा पर्दाफाश करून भाजपा व आयोगाच्या भ्रष्ट युती पुढे आणली आहे. महादेवपुराप्रमाणे मतचोरीचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातही झाला असून याप्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आला आहे पण ११ महिने झाले तरी अद्याप यावर कोणतीच कारवाई होत नाही. या मतचोरी प्रकरणी पुढील एका महिन्यात कारवाई करावी अन्यथा काँग्रेस पक्ष न्यायालयात दाद मागेल, असा इशारा काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे. गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मतचोरीची माहिती देताना काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे पुढे म्हणाले की, लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या ५ महिन्यांच्या कालावधीत राजुरा मतदारसंघात ५५ हजार मतदारांची वाढ करण्यात आली. राजुरा मतदारसंघात १ ऑक्टोबर २०२४ ते १५ ऑक्टोबर २०२४ दरम्यान ११ हजार ६६७ ऑनलाईन बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. यासंदर्भात काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांनी रितसर तक्रार दाखल केल्यानंतर ६८५३ मते डिलिट करण्यात आली. याप्रकरणी एफआयआर ही दाखल करण्यात आला आहे. पण पुढे काहीच कारवाई केलेली नाही. ही ऑनलाईन बोगस मतदार नोंदणी करण्यात आली त्याचे IP address, email id आणि मोबाईल नंबर ची माहिती द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे पण आजपर्यंत ती देण्यात आलेली नाही. ही माहिती दिल्यास चोर कोण, हे उघड होईल म्हणून पोलीस व प्रशासन माहिती देत नाही. अतुल लोंढे पुढे म्हणाले की, राजुरा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवाराकडे ६१ लाख रुपये व निवडणूक साहित्य सापडले. निवडणूक आयोगाच्या FST पथकाने ही कारवाई केली आहे, गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. पण आजपर्यंत यावरही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. मतचोरी प्रकरणी काँग्रेस उमेदवार सुभाष धोटे यांनी निवडणूक आयोग, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्याकडे वारंवार निवेदन देऊनही कारवाई संदर्भात काहीच हालचाल केली जात नाही. मतचोरी प्रकरणी काँग्रेस जनतेच्या न्यायालयात लढा देत आहेच पण न्यायालयातही लढा देऊ, असे अतुल लोंढे म्हणाले. चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राजुरा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष धोटे यांनीही यावेळी मतचोरीप्रकरणाची सविस्तर माहिती दिली.

राजुरा मतदारसंघातील मतचोरी प्रकरणी एका महिन्यात कारवाई करा अन्यथा…, अतुल लोंढेंचा इशारा Read More »

Rohit Pawar

तुम्ही सांगा तिथे मी येतो…, मराठा आरक्षण जीआरवरून विखे पाटलांवर रोहित पवार भडकले

Rohit Pawar On Maratha Reservation: राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुपली आहे. मराठा आरक्षणासाठी जीआर जारी केल्याने विरोधक राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करत मराठा समाजाची फसवणूक केली असल्याची टीका करत आहे. तर दुसरीकडे जीआरवर युक्तिवाद करायचा असेल तर तुम्ही मला कुठेही बोलवा सगळी माहिती घेऊन मी तुमच्याकडे येतो व मी युक्तिवाद करायला तयार आहे तुम्ही देखील जो जीआर काढलेला आहे तो कसा टिकणार तसेच सर्व समाजाला कशा पद्धतीने तुम्ही न्याय दिला आणि उद्या जाऊन जर यावर कोर्टात चॅलेंज झाला तर आरक्षणाच्या जीआर ला अडचण येणार नाही याची शाश्वती तुम्ही देणार का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांना विचारला आहे. माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की,सर्व मित्र पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे महायुतीने जर एखादा जीआर काढला असेल तर त्याला पाठिंबा सर्व मित्र पक्षांनी द्यायला पाहिजे सर्व मंत्र्यांनी, आमदारांनी देखील पाठिंबा दिला पाहिजे मात्र सध्या मुख्यमंत्री आरक्षणासंदर्भाचे क्रेडिट घेण्यासाठी दुसऱ्या मित्र पक्षाला विश्वासात घेता येत नाही घेता येत हे आम्हाला सांगता येणार नाही अशा शब्दात एक प्रकारे रोहित पवार यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुतीमध्ये असलेले नाराजी नाट्य ही चव्हाट्यावर आणली. तसेच पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले मराठा आरक्षणाचे उपस्थितीमध्ये अनेक इतर मंत्री देखील होते तसेच महाजन हे देखील ओबीसीचे नेते त्या ठिकाणी होते ज्यावेळेस जरांगे यांचे उपोषण सोडण्यात आले त्यावेळेस ओबीसीचे जयकुमार गोरे हे देखील मंचावर उपस्थित होते तर मराठा नेते ओबीसी नेते हे एकत्र बसून देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये जीआर काढला असेल यावर कोणीही आक्षेप घेतला नसेल तर लोकांचेही असे मत झाले असेल सर्व मान्य हा जीआर आहे हे सगळं असं असताना काही मंत्री काही नेते नाराजी व्यक्त करत असतील तर याला काय म्हणायचे असं देखील यावेळी रोहित पवार म्हणाले. तसेच येणाऱ्या काळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे त्या डोळ्यासमोर ठेवून हा वाद पेटलेलाच ठेवायचा म्हणून पुन्हा एकदा मराठा ओबीसी वाद हा झाला पाहिजे मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे मात्र इतिहास बरोबर इतर प्रश्न देखील दुर्लक्षित होतात. एकीकडे शेतकरी कर्जबाजारी होत आहे लोकांचे हाल होत आहे आज विद्यार्थ्यांना नोकऱ्या नाही या मूलभूत विषयांवरती चर्चा करायला सरकार उत्सुक नाही सत्ताधाऱ्यांना केवळ ओबीसीविरुद्ध मराठावाद हाच महत्त्वाचा वाटतोय. मराठी अमराठी व्हेज नॉनव्हेज हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा प्रश्नांमध्येच नागरिकांना गुंतवून ठेवून मूलभूत प्रश्नांना फाटा देण्याचे काम सध्या सरकारकडून सुरू आहे अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी सरकारवर ताशेरे ओढले.

तुम्ही सांगा तिथे मी येतो…, मराठा आरक्षण जीआरवरून विखे पाटलांवर रोहित पवार भडकले Read More »

Vijay Wadettiwar

Vijay Wadettiwar: GR मुळे ओबीसींचं नुकसान होणार, विजय वडेट्टीवारांचा दावा

Vijay Wadettiwar: राज्यात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणावरून राजकारण तापले आहे. यातच राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी जीआर जारी केल्याने आता ओबीसी समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे जीआरमुळे ओबीसींचं नुकसान होणार असल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यभरातील सर्व ओबीसी नेत्यांना फोन केला, साधारण 150 ओबीसी नेते उपस्थित राहतील, पक्षाचा पलीकडे जाऊन बैठक बोलावली आहे.ओबीसी हिताचे रक्षण करण्यासाठी सर्वाना येण्याची विनंती केली. सरकारने जीआर काढला त्यावर चर्चा करून आम्ही निर्णय घेणार आहे. मुख्यमंत्री काहीही म्हणत असले तरी ओबीसींचे नुकसान होणार आहे हे स्पष्ट आहे. पात्र शब्द पाहिले प्रमाणे ठेवला असता तर आम्हाला विरोध नव्हता, मराठा समाजाला काय द्यायांच आहे ते सरकारने द्यावे. त्याला आमचा विरोध नाही, सर्व भागातील मराठा समाज ओबीसीत येणार आहे. राहुल गांधींनी जी भूमिका आरक्षण मर्यादा 50 टक्क्यावर नेऊन, जात निहाय जंनगणना करून सर्वाना त्यांचा प्रमाणे आरक्षण द्यावे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, बबनराव तायवाडे यांची भूमिका पूर्वी होती ती आता दिसत नाही, ते कुठल्या चष्म्यातून बघतात ते त्यांना माहित नाही. पुढे येणाऱ्या दिवसात सत्य परिस्थिती लक्षात येईल, तायवाडे यांची भूमिका स्पष्ट नाही. छगन भुजबळ, हाके यांना निरोप दिला आहे, भुजबळ यांच्याशी मी स्वतः संपर्क केला. पण, माझा संपर्क झाला नाही. ऑफिसचा संपर्क झाला असेल. भुजबळ यांच्या मताशी आम्ही भूमिकेशी सहमत आहे.ओबीसीच नुकसान होत आहे. असा दावा देखील यावेळी त्यांनी केला.

Vijay Wadettiwar: GR मुळे ओबीसींचं नुकसान होणार, विजय वडेट्टीवारांचा दावा Read More »

rohit pawar on devendra fadnavis

Rohit Pawar On Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाने जाहिरात देणारे मंत्री कोण? रोहित पवारांचा हल्लाबोल

Rohit Pawar On Devendra Fadnavis: मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने जीआर जारी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने राज्यातील सर्व वर्तमानपत्रात जाहिरात देण्यात आली होती. सध्या या जाहिरातीवरून विरोधक राज्य सरकारवर जोरदार टीका करत आहे. तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप करत राज्य सरकारवर टीका केली आहे. या प्रकरणात रोहित पवार यांनी एक्स वर ट्विट करत म्हटले आहे की, एकीकडे राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या होत असताना आणि अतिवृष्टीने संपूर्ण महाराष्ट्र झोडपला असताना वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर तसेच अनेक विमानतळांवर कोट्यवधी रुपये उधळून मुख्यमंत्र्यांच्या मोठमोठ्या जाहिराती देण्याची सरकारची वृत्ती बघून मोठी चीड आली, परंतु मा. देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे मोठे नेते अशी चूक करणार नाहीत, हा विश्वास होता. या कोट्यवधी रुपयांच्या जाहिरातीबद्दल अधिक माहिती घेतली असता या जाहिराती देवेंद्र फडणवीस साहेबांना न कळवताच सरकारमधील एका मंत्र्याने परस्पर दिल्या असल्याचे समजले आणि विशेष म्हणजे हे मंत्री महोदय भाजपाचे नाहीत तर मित्रपक्षाचे आहेत असे देखील कळत आहे. मला मिळालेली माहिती खरी असेल तर मित्रपक्षाच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी निनावी पद्धतीने परस्पर एवढ्या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती का दिल्या? या जाहिरातीसाठीचे कोट्यवधी रुपये कुठून आले? हा मंत्री कोण? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. जाहिराती देणारे समोर आले तर या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील. असं रोहित पवार म्हणाले.

Rohit Pawar On Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाने जाहिरात देणारे मंत्री कोण? रोहित पवारांचा हल्लाबोल Read More »

obc reservation

OBC Reservation : … तर महामोर्चा काढणार, मराठा आरक्षणावर ओबीसी संघटनांची महत्वाची बैठक

OBC Reservation: राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण देण्यासाठी काढलेल्या पहिल्या शासन निर्णयात पात्र असा शब्द वापरला होता. नंतर दुसरा शासन निर्णय काढून हा शब्द वगळण्यात आला. याचा अर्थ मराठा समाजाला ओबीसींतून सरसकट आरक्षण देणार असा होतो. हा मूळ ओबीसी समाजावर अन्याय आहे. याविरोधात लढा देण्यासाठी २५ प्रमुख लोकांची एक समिती गठीत करून ऑक्टोबरमध्ये नागपुरात ओबीसींचा महामोर्चा काढणार, अशी माहिती ओबीसी नेते तथा काँग्रेसचे विधानसभेतील पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. नागपुरातील रवी भवन येथे शनिवारी विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यातील ओबीसी संघटनांची बैठक झाली. या बैठकीत मार्गदर्शन करीत असताना वडेट्टीवार बोलत होते. व्यासपीठावर आमदार अभिजित वंजारी, माजी खासदार खुशाल बोपचे, ओबीसी नेते शेखर सावरबांधे, ओबीसी अभ्यासक नागेश चौधरी, ओबीसी नेते ईश्वर बाळबुधे, ओबीसी नेते ज्ञानेश वाकुडकर, अॅड. किशोर लांबट, ओबीसी युवा अधिकार मंचचे उमेश कोर्राम यांची प्रमुख उपस्थिती होती. तीन तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीत संघटनांच्या नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण देण्यासंदर्भात स्पष्ट विरोध दर्शविला. विजय वडेट्टीवार म्हणाले, आज ओबीसींसाठी लढताना अनेकदा आर्थिक चणचण जाणवते. पण, नेत्यांना ओबीसींची भीती वाटू लागताच ही अडचण आपसूकच दूर होईल. ओबीसींच्या लढ्यासाठी प्रसंगी हात पसरू पण न्यायालयीन लढाईसाठी कुठेही आर्थिक अडचण येऊ देणार नाही, अशी ग्वाहीदेखील दिली. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने काढलेल्या शासन निर्णयातून ओबीसींचे नक्कीच नुकसान होणार आहे. २७ टक्के आरक्षणातून १३ टक्के आधीच वजा होते. उरलेल्या १९ टक्क्यांतही मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसींना किती उरणार? ओबीसींचा हक्कच संपण्याची शक्यता आहे. कुणी कुठल्याही पक्षाचा असला तरी आपल्यासाठी झटणाऱ्याला साथ द्या, असे आवाहनही वडेट्टीवार यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आरक्षणाला विरोध आहे. त्यांच्या विचारसणीचे लोक सत्तेत आहेत. त्यांच्याकडून आपण ओबीसी आरक्षणाला धक्का न लागू देण्याची अपेक्षा कशी करू शकतो? आज आपण न्यायालयीन लढाई न लढल्यास ओबीसींना मोठा धक्का बसणार आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण संपविण्याचा त्यांचा डाव असल्याचा धोकाही वडेट्टीवार यांनी वर्तविला. दोन पातळ्यांवर लढाई लढणार नागपुरात येत्या १२ सप्टेंबरला प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात जाहीर शासन निर्णयावरील लढाईच्या अनुषंगाने व्यूहरचना निश्चित होईल. मात्र दोन स्तरावर लढाई लढण्याचे शनिवारच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. पहिली लढाई न्यायालयीन स्तरावर लढली जाणार आहे. विदर्भातून वकील संघटना पूर्ण ताकदीने न्यायालयात बाजू मांडणार आहे. त्यांना ओबीसी संघटनांचा पाठिंबा असेल तर दुसरा लढा आंदोलनाच्या माध्यमातून केला जाईल असेही वडेट्टीवार स्पष्ट केले. कुणावरही अन्याय होऊ नये, ही आमची भूमिका आहे. सोबतच आमच्या हक्काचे संरक्षण होणेही आवश्यक आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, ही आमची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले.

OBC Reservation : … तर महामोर्चा काढणार, मराठा आरक्षणावर ओबीसी संघटनांची महत्वाची बैठक Read More »