DNA मराठी

Ahilyanagar Crime

Ahmednagar Court

Ahilyanagar Crime: तहसील कार्यालयात गोळ्यांचा थरार; अॅड. रियाज पठाण हत्या प्रकरणात 7 जणांना मरेपर्यंत जन्मठेप

Ahilyanagar Crime: नेवासा तहसील कार्यालयाच्या आवारात भरदिवसा गोळ्या झाडून अॅड. रियाज पठाण यांची हत्या करणाऱ्या सात आरोपींना अखेर न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. तब्बल १३ वर्षांपासून गाजत असलेल्या या बहुचर्चित खून खटल्यात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी सातही दोषींना मरेपर्यंत जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावली. तर सबळ पुराव्याअभावी पाच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी केलेला प्रभावी युक्तिवाद या निकालात निर्णायक ठरला. १६ सप्टेंबर २०१३ नेवासा तहसील कार्यालयाचा परिसरात भरदिवसा बंदुकीच्या गोळ्यांचा थरार! अॅड. रियाज पठाण यांच्यावर आरोपी प्रवीण खर्चन याने पिस्तुलातून सलग तीन गोळ्या झाडल्या. त्यावेळी त्याच्या साथीदारांनी पठाण यांचे हात पकडून ठेवल्याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीतून समोर आले. या हल्ल्याने नेवासा तालुक्यासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. गोळीबारानंतर गंभीर जखमी अवस्थेत अॅड. पठाण यांना उपचारासाठी नेवासा येथून अहिल्यानगरमधील नोबेल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. घटनेनंतर पोलिसांनी मुख्य आरोपी प्रवीण खर्चन याला पिस्तुलासह ताब्यात घेतले. एका साक्षीचा गैरसमज आणि आखला हत्येचा कट एका खून खटल्यात अॅड. रियाज पठाण यांनी साक्ष दिल्याच्या गैरसमजातून आरोपींनी त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप सरकारी पक्षाने ठेवला होता. नेवासा पोलिसांनी या प्रकरणात एकूण १२ आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले.खटल्यादरम्यान सरकार पक्षाने तब्बल २९ साक्षीदार तपासले.प्रत्यक्षदर्शी साक्ष, वैद्यकीय अहवाल, शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक पुरावे यांच्या आधारे न्यायालयाने सात आरोपी दोषी ठरवले. निकमांचा युक्तिवाद; आरोपींचे बचावाचे दावे फोल मुख्य आरोपी प्रवीण खर्चन याने घटनेच्या वेळी आपण अज्ञान अर्थात नाबालिक असल्याचा दावा करून खटला चालविण्यास विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी हा दावा सप्रमाण खोडून काढत आरोपी सज्ञान असल्याचे न्यायालयासमोर सिद्ध केले. मोहन लष्करे आणि सादिक शेख यांनी घटनेच्या वेळी आपण नेवासा फाटा येथे असल्याचा दावा केला होता. मात्र, उलटतपासणीत त्यांचा हा दावा टिकला नाही. आरोपींच्या बचावाकडून पठाण गँग आणि गाढे गँगमधील वैमनस्यातून ही हत्या झाली असा युक्तिवाद करण्यात आला मात्र सरकारी पक्षाने हा दावाही पुराव्यांच्या आधारे खोडून काढला. अॅड. उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात केवळ दोषींविरोधातील भक्कम पुराव्यांवरच भर दिला नाही, तर ज्या पाच आरोपींविरोधात कटातील सहभागाचा प्रत्यक्ष व ठोस पुरावा उपलब्ध नाही, त्यांना निर्दोष सोडण्याची भूमिकाही स्पष्टपणे मांडली. न्यायालयाने ही बाब ग्राह्य धरत पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाने प्रवीण खर्चन, मोहन लष्करे, रामेश्वर गाढे, चौरंगीनाथ लष्करे, पवन नरुल्ला, सचिन चव्हाण आणि सादिक बशीर शेख या सात आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावली. तर अशोक जगताप, सत्यवान सोनकांबळे, विलास जिरे, सोपान गाढे आणि सुनील ऊर्फ सोन्या परदेशी यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.१७ नोव्हेंबर २०१८ पासून सुरू असलेल्या या प्रदीर्घ खटल्याच्या सुनावणीला अखेर न्यायालयीन पूर्णविराम मिळाला आहे. तब्बल १३ वर्षांपूर्वी तहसील कार्यालयाच्या आवारात झालेल्या त्या थरारक हत्येचा निकाल लागल्याने पठाण कुटुंबीयांसह नेवासा परिसराचे या निकालाकडे लक्ष लागले होते. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना अॅड. परिमल फळे यांनी सहाय्य केले.

Ahilyanagar Crime: तहसील कार्यालयात गोळ्यांचा थरार; अॅड. रियाज पठाण हत्या प्रकरणात 7 जणांना मरेपर्यंत जन्मठेप Read More »

dheerajsingh pardeshi death

Dheerajsingh Pardeshi Death: मोठी बातमी! अहिल्यानगर शहरात जीवघेण्या हल्ल्यात धीरजसिंग परदेशीचा मृत्यू

Dheerajsingh Pardeshi Death: अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात पथदिव्यांच्या दुरुस्तीचे सार्वजनिक काम करत असताना महापालिकेच्या कंत्राटदार संस्थेच्या कर्मचारी धीरजसिंग परदेशी यांना करण्यात आलेल्या मारहाणीत मृत्यू झाला असून या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून काही संयशित आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर अहिल्यानगर महापालिकेने परिसरातील सर्व सार्वजनिक सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मिळालेल्या माहितीनुसार जुन्या वादातून धीरजसिंग परदेशी यांना मारहाण करण्यात आली होती. तर दुसरीकडे या प्रकरणात बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सार्वजनिक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणारे असे हल्ले निंदनीय असून, पोलिसांनी यापूर्वीच्या घटनांचे गांभीर्य ओळखून अशा जिहादी प्रवृत्तीच्या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि अशा प्रवृत्तींना आळा घालावा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी माध्यमांशी बोलताना केली. तर पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिस तपास कार्यात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Dheerajsingh Pardeshi Death: मोठी बातमी! अहिल्यानगर शहरात जीवघेण्या हल्ल्यात धीरजसिंग परदेशीचा मृत्यू Read More »

Crime

Ahilyanagar Crime : अनैतिक व्यापार प्रकरणी श्रीगोंदा येथील हॉटेल आम्रपाली लॉज अँड बार बंद करण्याचे आदेश

Ahilyanagar Crime : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील हॉटेल आम्रपाली लॉज अँड बारमध्ये अनैतिक व्यापार चालविला जात असल्याचे उघडकीस आल्याने अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ च्या कलम १८ अंतर्गत संबंधित आस्थापना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय न्याय संहिता तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियमांतर्गत दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने श्रीगोंदा-पारनेर उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी हा आदेश पारित केला आहे. अहिल्यानगर ते दौंड मार्गावरील काष्टी येथील या हॉटेलमध्ये मालक व चालकाकडून महिलांना बोलावून त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येत होती. त्यानंतर ग्राहक उपलब्ध करून देत पैशांच्या मोबदल्यात अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडून त्यांच्याकडून देहव्यवसाय करवून घेतला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात उरुळी कांचन, चेंबूर, नालासोपारा, वाघोली, वाशी, भिवंडी आणि कलकत्ता येथील सात पीडित महिलांचा समावेश असून, रणजित राम पुजारी, मुकेशकुमार गुरुदयाल यादव, नागनाथ लक्ष्मण इंगळे, ज्ञानेश्वर रमेश मुळीक, संदीप अशोकराव पाचपुते व किर्थिश सुधाकर हेगडे यांच्यासह शिरूर येथील एका ग्राहकाविरुद्धही श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी व श्रीगोंदा पोलीस निरीक्षक यांनी सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने संबंधित आस्थापनेवर कारवाईचा प्रस्ताव प्राप्त झाला होता. त्यानुसार संबंधितांना त्यांचे म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी देण्यात आली होती. यासाठी १५ जून व १९ जून रोजी सुनावणी आयोजित करण्यात आली होती. मात्र, संबंधित सुनावणीस गैरहजर राहिले. पोलीस विभागाच्या अहवालानुसार संबंधित जागेचा वापर अनैतिक व्यापारासाठी होत असल्याचे स्पष्ट झाल्याने सार्वजनिक हित व कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कारवाई करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यापूर्वीही संबंधित आस्थापनेचा अशा बेकायदेशीर कृत्यासाठी वापर झालेला असून, भविष्यात पुन्हा अशा प्रकारे वापर होऊ नये, यासाठी अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ च्या कलम १८ अंतर्गत संबंधित आस्थापना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून अनुपालन अहवाल सादर करण्याच्या सूचना श्रीगोंदा पोलीस निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत. तसेच, भविष्यात या जागेचा पुन्हा अनैतिक व्यापार अथवा कुंटणखान्यासाठी वापर झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी मूळ जमीन व घरमालकाची राहील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Ahilyanagar Crime : अनैतिक व्यापार प्रकरणी श्रीगोंदा येथील हॉटेल आम्रपाली लॉज अँड बार बंद करण्याचे आदेश Read More »

shrirampur crime

Shrirampur Crime: धर्माच्या नावावर गुन्हेगारीचे संरक्षण?

Shrirampur Crime : समाजात एखादी व्यक्ती धार्मिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक कार्याच्या माध्यमातून लोकप्रिय होत असते. परंतु त्याच व्यक्तीचे नाव वारंवार गंभीर गुन्ह्यांच्या तपासात, आरोपपत्रात किंवा पोलीस कारवाईत समोर येऊ लागले, की समाजाने आणि यंत्रणांनी स्वतःला काही कठोर प्रश्न विचारण्याची वेळ येते. प्रश्न एका व्यक्तीचा नसतो; प्रश्न असतो न्यायव्यवस्थेवरचा विश्वास, कायद्याची अंमलबजावणी आणि समाजाच्या नैतिक भूमिकेचा. अलीकडच्या काळात महाराष्ट्रातील काही भागांमध्ये धर्म, जात किंवा संघटनांच्या नावाने काही व्यक्तींना ‘रक्षक’ म्हणून उभे केले जाते. सोशल मीडियावरील प्रचार, मिरवणुका, वाढदिवसाचे बॅनर आणि समर्थकांच्या घोषणांमधून त्यांची प्रतिमा तयार केली जाते. परंतु जर अशाच व्यक्तींचे नाव वारंवार खून, खंडणी, मारहाण, दरोडे, मोक्का किंवा इतर गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणांत समोर येत असेल, तर समाजाने त्या प्रतिमेकडे चिकित्सक नजरेने पाहिले पाहिजे. कायद्याच्या दृष्टीने प्रत्येक आरोपी निर्दोष मानला जातो, जोपर्यंत न्यायालय दोष सिद्ध करत नाही. ही लोकशाहीची मूलभूत अट आहे. पण याचा अर्थ असा नाही की गंभीर आरोपांकडे समाजाने डोळेझाक करावी. एखाद्या व्यक्तीवर सातत्याने गुन्हे दाखल होत असतील, ती वारंवार अटक होत असेल किंवा संघटित गुन्हेगारीशी तिचे नाव जोडले जात असेल, तर त्या पार्श्वभूमीवर पोलीस, तपास यंत्रणा आणि सरकारी पक्षाची कार्यक्षमता तपासणे आवश्यक ठरते. अशा घटनांमध्ये आणखी एक धोकादायक प्रवृत्ती दिसते. गुन्हेगारीला धार्मिक किंवा सामाजिक ओळखीचे कवच मिळू लागते. समर्थकांचा एक वर्ग व्यक्तीच्या कथित सामाजिक कामांचा उल्लेख करून गंभीर आरोपांकडे दुर्लक्ष करतो. परिणामी, चर्चा व्यक्तीच्या कृत्यांवर न होता धर्म किंवा विचारसरणीच्या समर्थन-विरोधात वळते. हीच समाजासाठी सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे. गुन्हेगाराला धर्म नसतो त्याचा धर्म फक्त गुन्हा असतो. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी व्यक्तीच्या धर्म, जात, राजकीय संबंध किंवा लोकप्रियतेकडे न पाहता समान निकषांवर झाली पाहिजे. अन्यथा कायद्यावरील विश्वास कमी होतो आणि सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढते. आज गरज आहे ती व्यक्तिपूजेपेक्षा संस्थांवर विश्वास ठेवण्याची. पोलीस तपास निष्पक्ष असावा, सरकारी पक्षाने खटले प्रभावीपणे चालवावेत, साक्षीदारांचे संरक्षण व्हावे आणि न्यायालयीन प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी. तितकेच महत्त्वाचे म्हणजे समाजानेही कोणत्याही व्यक्तीचे समर्थन करताना तिच्या सार्वजनिक प्रतिमेबरोबर तिच्या सार्वजनिक उत्तरदायित्वाचाही विचार केला पाहिजे. प्रत्येक मोठ्या गुन्ह्यानंतर आरोपींची नावे चर्चेत येतात; परंतु त्याहून मोठा प्रश्न कायम राहतो गुन्हेगारी इतकी वाढूच कशी दिली जाते? प्रतिबंधात्मक पोलिसिंग, प्रभावी तपास, जलद न्याय आणि सामाजिक जबाबदारी या चारही गोष्टी एकत्र आल्या तरच अशा घटनांवर दीर्घकालीन नियंत्रण मिळवता येईल. लोकशाहीत कोणत्याही व्यक्तीला कायद्यापेक्षा मोठे स्थान नसते. धर्म, समाजकार्य किंवा लोकप्रियता ही न्यायप्रक्रियेची पर्यायी व्यवस्था होऊ शकत नाही. शेवटी टिकतो तो केवळ कायद्याचा अधिकार आणि न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास.

Shrirampur Crime: धर्माच्या नावावर गुन्हेगारीचे संरक्षण? Read More »

img 20260712 wa0035

Ahilyanagar Crime: तलाठ्याचा सत्कारात नाव पुकारलं नाही ; लोखंडी माईक डोक्यात घालून तरुणाला रक्तबंबाळ

Ahilyanagar Crime: जामखेड तालुक्यातील राजेवाडी येथे आनंदाच्या वातावरणात सुरू असलेल्या विवाहसोहळ्याला एका धक्कादायक घटनेने गालबोट लागले. स्वागतावेळी आपले नाव माईकवरून पुकारले नाही, या क्षुल्लक कारणावरून एका तलाठ्याने संतापाच्या भरात माईक हातातून हिसकावून तोच लोखंडी माईक एका तरुणाच्या डोक्यात घातल्याची धक्कादायक घटना शनिवारी (११ जुलै) दुपारी घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून जामखेड पोलीस ठाण्यात तलाठी शिवाजी सखाराम हजारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझं नाव माईकवर का पुकारलं नाही?; लोखंडी रॉड असलेला माईक घातला डोक्यात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळा (ता. जामखेड) येथील अशोक रामचंद्र पठाडे (वय ३७) हे राजेवाडी येथील मातोश्री मंगल कार्यालयात आयोजित विवाह सोहळ्यात सूत्रसंचालन करत होते. विवाहासाठी आलेल्या नातेवाईक आणि मान्यवरांचे ते माईकवरून स्वागत करत असताना तलाठी शिवाजी सखाराम हजारे यांनी त्यांच्याकडे येत माझं नाव माईकवर का पुकारलं नाही? असा जाब विचारला. या क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. आरोपानुसार, संतापलेल्या हजारे यांनी पठाडे यांना शिवीगाळ करत तोंडावर मारहाण केली. त्यानंतर हातातील लोखंडी रॉड असलेला माईक हिसकावून तो त्यांच्या डोक्यात जोरात मारला. या हल्ल्यात पठाडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. एवढ्यावरच न थांबता तुला खल्लास करतो अशी जीवे मारण्याची धमकी देत आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. घटनेनंतर विवाहसोहळ्यात एकच गोंधळ उडाला. उपस्थित जीवन मोहन रोडे, तानाजी लक्ष्मण पवार आणि प्रशांत भाऊसाहेब पवार यांनी तत्काळ धाव घेत भांडण सोडवले आणि जखमी पठाडे यांची सुटका केली. त्यानंतर प्रशांत मारुती शिंदे यांनी त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, जामखेड येथे दाखल केले.या प्रकरणी जखमी अशोक रामचंद्र पठाडे यांच्या फिर्यादीवरून तलाठी शिवाजी सखाराम हजारे याच्याविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार तुकाराम सोनवणे पुढील तपास करत आहेत.

Ahilyanagar Crime: तलाठ्याचा सत्कारात नाव पुकारलं नाही ; लोखंडी माईक डोक्यात घालून तरुणाला रक्तबंबाळ Read More »

img 20260622 wa0001

Ahilyanagar Crime: नगर पाथर्डी रोडवरील हॉटेल शौर्य येथे तरुणाचा खून; एक जण गंभीर जखमी

Ahilyanagar Crime: अहिल्यानगर शहरातील पाथर्डी रोडवरील महेशनगर परिसरातील हॉटेल शौर्य येथे रविवारी रात्री झालेल्या हल्ल्यात एका तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सागर धोत्रे व त्यांचा सहकारी हॉटेलमध्ये जेवणासाठी बसले असताना त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सागर धोत्रे यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर साईदीप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, जयेश पाटोळे व त्याच्या दोन साथीदारांनी हा हल्ला केल्याच संशयित आरोपी आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलीस उपधीक्षक दिलीप टिपरसे, एपीआय तेजश्री थोरात यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची तपासणी केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, संशयित आरोपी जयेश पाटोळे याला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Ahilyanagar Crime: नगर पाथर्डी रोडवरील हॉटेल शौर्य येथे तरुणाचा खून; एक जण गंभीर जखमी Read More »

img 20260330 wa0005

Ahilyanagar Crime: गॅस टंचाईत अवैध रिफिलिंगवर कारवाई; 33 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर शहरात गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस टाक्यांमधून व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये अवैधरित्या रिफिलिंग करणाऱ्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले असून त्याच्याकडून ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहानवाज शौकत सय्यद (वय २४, रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शहरात पेट्रोलिंग करत असताना गुलमोहर रोड परिसरातील पारिजात चौकाजवळील एका पत्र्याच्या गोडाऊनमध्ये अवैध रिफिलिंग सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तत्काळ छापा टाकला असता, एक व्यक्ती घरगुती गॅस टाक्यांमधून व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये रिफिलिंग करताना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव शहानवाज शौकत सय्यद (वय २४, रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर) असे सांगितले. पोलीसांनी त्याच्या ताब्यातून १० गॅस टाक्या, दोन इलेक्ट्रिक मोटार मशीन तसेच पाच लहान गॅस टाक्या असा एकूण ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. चौकशीत आरोपी हा साद अन्वर खान (रा. मुकुंदनगर, सध्या फरार) यांच्या सांगण्यावरून हे काम करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींनी कोणताही परवाना न घेता ज्वलनशील पदार्थांची धोकादायक पद्धतीने साठवणूक करून स्वतःचे व नागरिकांचे जीवित धोक्यात घालून हा प्रकार केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Ahilyanagar Crime: गॅस टंचाईत अवैध रिफिलिंगवर कारवाई; 33 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत Read More »

crime

Dhavalpuri Case : ढवळपुरी प्रकरण; श्रद्धेच्या आवरणामागचे भयावह वास्तव

Dhavalpuri Case: अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे उघडकीस आलेले अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण केवळ एक गुन्हेगारी घटना म्हणून पाहून चालणार नाही ते समाजाच्या नैतिक अध:पतनाचे आणि आंधळ्या श्रद्धेच्या धोकादायक परिणामांचे गंभीर उदाहरण आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा ही संत विचार, नैतिकता, समता आणि मानवतेच्या मूल्यांवर उभी आहे. मात्र, याच परंपरेच्या नावाखाली समाजात प्रतिष्ठा मिळवलेल्या व्यक्तीकडून असा अमानुष प्रकार घडल्याचा आरोप होणे, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. या प्रकरणात आरोपीने अल्पवयीन मुलीवर दीर्घकाळ अत्याचार केल्याचा आरोप असून, पीडितेला धमक्या देत गप्प ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. अधिक धक्कादायक म्हणजे, यापूर्वीही त्याच व्यक्तीवर बलात्कारासंदर्भातील गुन्हे दाखल झाले होते. एका प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली असली, तरी दुसरे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती समोर येते. यामुळे प्रश्न केवळ एका आरोपीपुरता मर्यादित राहत नाही तर समाज आणि व्यवस्थेने अशा संकेतांकडे वेळेत गांभीर्याने पाहिले का, हा मूलभूत प्रश्न उपस्थित होतो. भारतीय समाजात धार्मिक व्यक्तींना सहजपणे नैतिक श्रेष्ठत्व बहाल केले जाते. ‘महाराज’, ‘बाबा’, ‘कीर्तनकार’ अशा पदव्या अनेकदा प्रश्न विचारण्याची प्रवृत्तीच नष्ट करतात. परिणामी, पीडितांना आवाज उठवणे अधिक कठीण होते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सीमारेषा पुसली गेली की सत्तेचा गैरवापर सुरू होतो. ढवळपुरी प्रकरण हे त्याचेच उदाहरण मानावे लागेल. या घटनेत पीडित मुलीने अनेक वर्षे भीतीपोटी मौन बाळगल्याचे दिसते. हे मौन समाजाच्या अपयशाचे प्रतीक आहे. कुटुंब, शाळा, ग्रामव्यवस्था आणि स्थानिक समाजरचना या सर्व स्तरांवर मुलांना सुरक्षित वातावरण मिळणे अपेक्षित असते. परंतु जेव्हा प्रभावशाली व्यक्तीविरुद्ध तक्रार करण्याची भीती निर्माण होते, तेव्हा न्यायव्यवस्था उशिरा का होईना, हस्तक्षेप करते पण तोपर्यंत मोठी हानी झालेली असते. या पार्श्वभूमीवर दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. पहिली म्हणजे, धार्मिक किंवा सामाजिक प्रतिष्ठा ही कायद्यापेक्षा मोठी नाही, हा संदेश ठामपणे पोहोचणे आवश्यक आहे. दुसरी म्हणजे, अल्पवयीनांवरील अत्याचार प्रकरणांमध्ये तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया अधिक विश्वासार्ह आणि संवेदनशील बनवणे गरजेचे आहे. पोलिसांनी नागरिकांना पुढे येण्याचे केलेले आवाहन ही सकारात्मक बाब असली, तरी समाजानेही पीडितांच्या बाजूने उभे राहण्याची मानसिकता विकसित करणे तितकेच आवश्यक आहे. वारकरी संप्रदाय हा संत तुकाराम, ज्ञानेश्वरांच्या विचारांनी घडलेला आहे. करुणा, संयम आणि सत्य यांची शिकवण देणारा. त्यामुळे अशा घटनांमुळे संप्रदाय नव्हे, तर त्याच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या व्यक्ती उघडकीस येतात, हे समाजाने लक्षात ठेवले पाहिजे. अन्यथा, काही व्यक्तींच्या कृत्यामुळे संपूर्ण परंपरेवर संशयाची सावली पडण्याचा धोका निर्माण होतो. ढवळपुरी प्रकरण हे केवळ गुन्हेगारी बातमी नाही; ते समाजाला स्वतःकडे पाहण्यास भाग पाडणारे आरसे आहे. श्रद्धा ठेवावी, पण प्रश्न विचारण्याची क्षमता गमावू नये हाच या घटनेतून घ्यायचा सर्वात मोठा धडा आहे.

Dhavalpuri Case : ढवळपुरी प्रकरण; श्रद्धेच्या आवरणामागचे भयावह वास्तव Read More »

Maharashtra Police

Ahilyanagar Crime: धक्कादायक, नगर जिल्ह्यात चक्क पोलिसांना मारहाण; गुन्हा दाखल

Ahilyanagar Crime: चारचाकी गाडीला कट लागल्याच्या कारणावरुन ट्रक चालकाला मारहाण करत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने मज्जाव केला. याचा राग मनात धरून सुमारे १५ आरोपींनी दारूच्या नशेत पोलिस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करत लोखंडी गज, लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना ८ मार्च रोजी सायंकाळी डिग्रस फाटा येथे त्यानंतर रात्रीच्या दरम्यान राहुरी शहर हद्दीत घडली. सायंकाळी ५ राहुरी तालुक्यातील नगर मनमाड महामार्गावर डिग्रस फाटा येथे १० ते १२ जण दारुच्या नशेत असताना चारचाकी वाहनाला कट लागल्याच्या कारणावरुन ट्रक चालकाला लाकडी दांडी व लाथा बूक्क्यांनी मारहाण करत होते. त्यावेळी राहुरी पोलिस ठाण्यातील पोलीस हवालदार विकास रंगनाथ वैराळ हे त्यांच्या चारचाकी वाहनातून नगरकडून राहुरीकडे येत असताना त्यांनी सदर प्रकार पाहिला. त्यावेळी त्यांनी आरोपींना ट्रक चालकाला मारहाण करण्यास मज्जाव केला. त्यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून दमदाटी केली होती. त्यानंतर हवालदार विकास वैराळ हे रात्री ११.३० वाजे दरम्यान राहुरी शहरातील ग्रीन हॉटेल चौक येथे ड्युटी करत असताना तेच आरोपी तेथे आले. त्यांनी हवालदार विकास वैराळ यांना पून्हा विनाकारण शिवीगाळ केली. तसेच फायटर, लोखंडी गज, लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत हवालदार विकास वैराळ हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबावरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी खंडु वसंत काळे, वैभव बाबासाहेब तारडे, संतोष अंकुश काळे, सर्व रा. बुरुडगाव, ता. जि. अहील्यानगर तसेच महेश निमसे व अनोळखी ११ इसम अशा एकुण १५ जणांवर गुन्हा रजि. नं. २२०/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११९ (१), ११८ (१), १८९ (२), १९१ (१), १९१ (३), १९०, ११५ (२), ३५१ (२), ३५२ प्रमाणे शिवीगाळ, दमदाटी, जीवघेणा हल्ला व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस पथकाने आरोपी खंडु काळे, वैभव तारडे, संतोष काळे यांना ताब्यात घेऊन गजाआड केले. तर इतर आरोपी पसार झाले. तसेच आरोपींचे चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक समाधान फडोळ हे करीत आहे.

Ahilyanagar Crime: धक्कादायक, नगर जिल्ह्यात चक्क पोलिसांना मारहाण; गुन्हा दाखल Read More »

Crime 1

Ahilyanagar Crime : कोपरगावात धक्कादायक घटना; दगडाने ठेचून 33 वर्षीय युवकाचा खून  

Ahilyanagar Crime :  अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. संवत्सरजवळील रामवाडी येथे दगडाने ठेचून 33 वर्षीय युवकाचा खून करण्यात आला आहे. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, हनुमान मंदिरासमोर ही घटना घडली आहे. मृत युवकाचे नाव नवनाथ माधव कानफाटे (वय 33) असे असून, अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर दगड आणि विटांनी सपासप वार करत जागीच ठार मारल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात दगड-विटांचा खच आढळून आला असून, परिसर अक्षरशः रक्ताने माखलेला होता. या भीषण प्रकारामुळे रामवाडी गाव हादरून गेले आहे. घटनेची माहिती मिळताच शिर्डी विभागाचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती आणि कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने, पीएसआय दीपक रोठे यांच्यासह अधिकाऱ्यांनी पंचनामा करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. संशयितांचा माग काढण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.   खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी जुना वाद, वैयक्तिक वैर किंवा अन्य काही कारण या दिशेने पोलीस तपास करत आहेत. रात्री उशिरापर्यंत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास वेगाने सुरू आहे. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. गावकऱ्यांमध्ये भीतीचे सावट असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी जोर धरत आहे.  

Ahilyanagar Crime : कोपरगावात धक्कादायक घटना; दगडाने ठेचून 33 वर्षीय युवकाचा खून   Read More »