Ahilyanagar Crime: चारचाकी गाडीला कट लागल्याच्या कारणावरुन ट्रक चालकाला मारहाण करत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने मज्जाव केला. याचा राग मनात धरून सुमारे १५ आरोपींनी दारूच्या नशेत पोलिस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करत लोखंडी गज, लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना ८ मार्च रोजी सायंकाळी डिग्रस फाटा येथे त्यानंतर रात्रीच्या दरम्यान राहुरी शहर हद्दीत घडली.
सायंकाळी ५ राहुरी तालुक्यातील नगर मनमाड महामार्गावर डिग्रस फाटा येथे १० ते १२ जण दारुच्या नशेत असताना चारचाकी वाहनाला कट लागल्याच्या कारणावरुन ट्रक चालकाला लाकडी दांडी व लाथा बूक्क्यांनी मारहाण करत होते. त्यावेळी राहुरी पोलिस ठाण्यातील पोलीस हवालदार विकास रंगनाथ वैराळ हे त्यांच्या चारचाकी वाहनातून नगरकडून राहुरीकडे येत असताना त्यांनी सदर प्रकार पाहिला. त्यावेळी त्यांनी आरोपींना ट्रक चालकाला मारहाण करण्यास मज्जाव केला. त्यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून दमदाटी केली होती. त्यानंतर हवालदार विकास वैराळ हे रात्री ११.३० वाजे दरम्यान राहुरी शहरातील ग्रीन हॉटेल चौक येथे ड्युटी करत असताना तेच आरोपी तेथे आले. त्यांनी हवालदार विकास वैराळ यांना पून्हा विनाकारण शिवीगाळ केली.
तसेच फायटर, लोखंडी गज, लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत हवालदार विकास वैराळ हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
त्यांनी दिलेल्या जबाबावरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी खंडु वसंत काळे, वैभव बाबासाहेब तारडे, संतोष अंकुश काळे, सर्व रा. बुरुडगाव, ता. जि. अहील्यानगर तसेच महेश निमसे व अनोळखी ११ इसम अशा एकुण १५ जणांवर गुन्हा रजि. नं. २२०/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११९ (१), ११८ (१), १८९ (२), १९१ (१), १९१ (३), १९०, ११५ (२), ३५१ (२), ३५२ प्रमाणे शिवीगाळ, दमदाटी, जीवघेणा हल्ला व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस पथकाने आरोपी खंडु काळे, वैभव तारडे, संतोष काळे यांना ताब्यात घेऊन गजाआड केले. तर इतर आरोपी पसार झाले.
तसेच आरोपींचे चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक समाधान फडोळ हे करीत आहे.






