DNA मराठी

राजकीय

PM Kisan Samman Nidhi : अवकाळी पावसात शेतकऱ्यांना दिलासा! खात्यात जमा होणार 6000 रुपये

PM Kisan Samman Nidhi: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे.  मात्र आता शेतकऱ्यांसाठी एक दिलासा बातमी समोर आली आहे.  आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणार आहे. होय, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यासोबतच ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचे दुप्पट पैसेही राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत. म्हणजेच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 6000 रुपये जमा होणार आहे. पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या काळात पंतप्रधान किसान सन्मान निधीसोबतच राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचे पैसेही शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते किसान सन्मान निधीच्या 16व्या हप्त्याचे वितरण करतील. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आणखी एक भेट मिळणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य आणि केंद्राकडून मिळून 6000 रुपये मिळतील. राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता म्हणजे एकूण 4000 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच आज राज्यातील शेतकऱ्यांना एकूण 6000 रुपये दिले जाणार आहेत. महाराष्ट्रातील सुमारे 88 लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार लिंक बँक खात्यात 6,000 रुपये थेट जमा केले जातील. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. नमो शेतकरी योजना काय आहे? प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने राज्यात नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 86 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना दरवर्षी आणखी 6,000 रुपये दिले जातील.  राज्यातील शेतकऱ्यांना पीएम सन्मान निधीचे सहा हजार रुपये आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये दरवर्षी हप्त्याने मिळणार आहेत. म्हणजेच दरवर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 12 हजार रुपये पाठवले जातील.

PM Kisan Samman Nidhi : अवकाळी पावसात शेतकऱ्यांना दिलासा! खात्यात जमा होणार 6000 रुपये Read More »

ज‍िल्ह्यात 23 हजार रोजगार न‍िर्माण होणार –  पालकमंत्री राधाकृष्ण व‍िखे पाटील

Ahmednagar News:-  बेरोजगारीवर मात करण्यासाठी शासन प्रमाणिक प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र शासनाने नुकताच जर्मनीबरोबर सामंजस्य करार केला असून यामाध्यमातून ४ लाख बेरोजगार तरूणांना प्रशिक्षण देऊन नोकरी दिली जाणार आहे‌. दावोस येथे झालेल्या गुंतवणूक परिषदेत ३ लाख ७३ हजार कोटींचे करार करण्यात आले‌ असून यातून २ लाख तरूणांना रोजगार निर्माण होणार आहे.  राज्यात सुरू असलेल्या विभागीय नमो महारोजगार रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून २ लाखांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केली. नमो महारोजगार मेळावा व‌ करिअर मार्गदर्शन शिबिरास त्यांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून थेट सहभागी होत मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते.  कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभाग विभागीय नमो महारोजगार मेळावा व‌ करिअर मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ,जिल्हा पर‍िषदेचे मुख्य कार्यकारी अध‍िकारी आश‍िष येरेकर, महानगरपालिका आयुक्त डॉ.पकंज जावळे, कौशल्य व‍िकास व‍िभागाचे नाश‍िक व‍िभागीय उपायुक्त सुन‍िल सैंदाणे, ज‍िल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त न‍िशांत सुर्यवंशी आदी उपस्थित होते.  राज्यात नागपूर, लातूर नंतर अहमदनगर येथे नमो व‍िभागीय रोजगार मेळावा होत आहे. असे नमूद करून मुख्यमंत्री एकनाथ श‍िंदे म्हणाले, शासन हे सर्वसामान्य लोकांचे आहे. तरूणांना रोजगार देण्यासाठी शासन प्रामाण‍िक प्रयत्न करत आहे. राज्यात सर्व व‍िभागात रोजगार मेळावे आयोज‍ित केले जात आहेत. येत्या काळात बेरोजगार तरूणांच्या दारात जाऊन शासन त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे.  शासन आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात अडीच कोटी लोकांना शासकीय योजनांचा लाभ म‍िळाला. अशाच प्रकारे रोजगार मेळाव्यातून लाखो तरूणांना रोजगार म‍िळून तरूण त्यांच्या पायावर उभे राहून सक्षम होणार आहेत.  प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांतून ५० हजार तरूणांना प्रश‍िक्षण- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वनीमुद्रीत दृकश्राव्य संदेशाच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश दिला. ते म्हणाले की, राज्य शासन सातत्याने कौशल्य विकासावर भर देत आहे.  राज्यात दोन हजार प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात घेण्यात आला.  ३४ जिल्ह्यातील २५०  तालुक्यातील ५११ गावात  या केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे. या केंद्रातून दरवर्षी ५० हजार तरुण- तरुणींना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याने ग्रामीण भागात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहेत. प्रत्येक  उद्योग  व रोजगारक्षम युवा यांच्या संवादातून सुद्धा अनेक संधी निर्माण होत असतात. रोजगार मिळणे हे कुटुंबाच्या समृद्धीसाठी अत्यंत आवश्यक असते. या रोजगार मेळाव्यात प्रत्येकाला आपल्या गुणवत्तेनुसार, कौशल्याप्रमाणे  रोजगार मिळेल.  हा नमो महारोजगार मेळावा अनेक युवक-युवतींना आपल्या पायावर उभा करणारा ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. ज‍िल्ह्यात दोन ठ‍िकाणी संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधनी सुरू करणार – कौशल्य व‍िकास मंत्री मंगलप्रभात लोढा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री श्री.लोढा म्हणाले की, पंधरा दिवसांच्या आत राहाता (शि‍र्डी) व अहमदनगर येथे संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधनी सुरू करण्यात येईल. एक महिन्याच्या आत अहमदनगर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय कौशल्य व‍िकास संस्था सुरू करण्यात येईल. या संस्थेच्या माध्यमातून कौशल्याबरोबर परदेशी भाषेचे शिक्षण दिले जाईल. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक आयटीआय सुरू करण्यात येऊन युवकांना १५ दिवसाचा कौशल्य अभ्यासक्रम शिकविण्यात येईल.  ज‍िल्ह्यात  २३ हजार रोजगार न‍िर्माण होणार –  पालकमंत्री राधाकृष्ण व‍िखे पाटील महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, औद्योगिककरणाच्या दृष्टीने आपण मोठे पाऊल उचलले आहे. वर्षभरात दीड हजार एकर जमीन अहमदनगर जिल्ह्यात उद्योगांसाठी देण्यात आले. ५ हजार १४ कोटींचे सामंजस्य करारातून २३ हजार रोजगाराची निर्मिती होणार आहे. ज‍िल्ह्यातील औद्योगिक परिसरातील शांततेसाठी ज‍िल्हा प्रशासन  कटीबद्ध आहे. अहमदनगर जिल्हा सहा राष्ट्रीय महामार्गाने जोडला गेला आहे‌. जिल्ह्यातील तरूणांना जिल्ह्यातच रोजगारासाठी आमचा प्रयत्न आहे. प्रवरेत पंचवीस वर्षांपूर्वी कौशल्य विकासाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. अशी आठवण ही त्यांनी यावेळी काढली. या रोजगार मेळाव्यात १२ हजार तरूणांना रोजगार देण्याचा प्रयत्न राहणार असल्याची ग्वाही महसूलमंत्र्यांनी यावेळी दिली.  संत गाडगेबाबा कौशल्य संस्थेचे जिल्ह्यात राहाता तालुक्यातील शिर्डी व अहमदनगर शहरात केंद्र सुरू करण्यात यावे. अशी मागणी ही महसूलमंत्र्यांनी यावेळी केली. खासदार डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील कमीत कमी एक लाख बेरोजगार तरूणांना हमीचा रोजगार उपलब्ध करून देणारे नमो रोजगार मेळावे एक नवी सुरूवात आहे. मागील वर्षभरात ज‍िल्ह्यातील १८ हजार तरूणांना रोजगार न‍िर्माण होईल असे उपक्रम राबव‍िण्यात आले. ५०० एकराच्या तीन एमआयडीसी ज‍िल्ह्यात न‍िर्माण करण्यासाठी शासकीय जम‍िन महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिल्या. श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे  शेती महामंडळांची १८० कोटींची जमीन एमआयडीसीसाठी उपलब्ध करून देण्यात आली. यातून  अहमदनगर व नाश‍िक व‍िभागातील तरूणांना रोजगार उपलब्ध होणार आाहे. प्रास्ताविकात जिल्हाधिकारी श्री. सालीमठ म्हणाले की, या विभागीय रोजगार मेळाव्यासाठी ६४ हजार तरूणांनी नोंदणी केली आहे. यात ३०२ कंपन्या व आस्थापनांनी सहभाग घेतला आहे. यामेळाव्यातून १० हजार रोजगार न‍िर्माण होणार आहेत. ज‍िल्ह्यात घेण्यात आलेल्या गुंतवणूक पर‍िषदेच्या माध्यमातून ६४८ उद्योजकांसोबत सामंजस्य करार करून ५ हजार १४ कोटींची गुंतवणूक झाली आहे. कार्यक्रमात जिल्हा उद्योग केंद्राच्या पहिल्या निर्यात सुविधा केंद्राचे दूरदृष्‍य प्रणालीच्या माध्यमातून  मान्यवरांच्या हस्ते  उद्धाटन करण्यात आले.  जिल्हा उद्योग केंद्रामार्फत ‍ज‍िल्हा गुंतवणूक पर‍िषद सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या व देवाणघेवाण अहवाल प्रकाश‍ित करण्यात आला. यावेळी ज‍िल्ह्यातील व‍िव‍िध उद्योजक उपस्थ‍ित होते.  यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही  यूवक-युवतींना ॲप्रेंटीशिप नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

ज‍िल्ह्यात 23 हजार रोजगार न‍िर्माण होणार –  पालकमंत्री राधाकृष्ण व‍िखे पाटील Read More »

Ahmednagar News:  ते विधान रोहित पवारांसाठी सूचक असेल- राधाकृष्ण विखे पाटील

Ahmednagar News:  राज्याच्या राजकारणात अजित पवारांच्या वेगळ्या भूमिकेमुळे पवार कुटुंबातील मतभेद चव्हाट्यावर आले आहे.  आता बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढाई होईल असं बोललं जात आहे. त्यातच आता आमदार रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत शरद पवारांनी मला रोखलं नसतं तर त्यावेळीच फूट पडली असती असा गौप्यस्फोट केलाय . यावर बोलताना राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आप्पासाहेब पवार आणि विखे कुटुंबाचे जवळचे संबंध होते, आप्पासाहेब हे स्वाभिमानी जगणारे होते त्यामुळे त्याचा राजकारणावर कुठलाही परिणाम झाला नाही . त्यावेळेस शरदचंद्र पवार साहेब सक्रिय राजकारणात होते त्यामुळे कदाचित त्यांचा रोहित पवार यांना इशारा असेल जास्त धावपळ करू नको नाहीतर अजित पवार होणे तुझी ही फसगत होईल असं त्यांना सुचवायचं असेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Ahmednagar News:  ते विधान रोहित पवारांसाठी सूचक असेल- राधाकृष्ण विखे पाटील Read More »

Manoj Jarange Narco Test : ‘जरांगे पाटलांना अटक करून …… ‘, ‘त्या’ प्रकरणात भाजपने केली मोठी मागणी; अनेक चर्चांना उधाण 

Manoj Jarange Narco Test : ओबीसीमधून मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील गेल्या दोन दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहे.  पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांवर  विधिमंडळात सुरू असणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तीव्र पडसाद पाहायला मिळाले.  महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणात मोठा निर्णय घेत एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.   तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांना अटक करून त्यांचा  नार्को टेस्ट करा अशी मागणी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत केली आहे.  याच बरोबर पाटील यांच्या विधानामागे कोण आहे? याची देखील एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी देखील मागणी त्यांनी यावेळी केली. तर एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेशावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले, मी मराठा समाजाचे काम करत आहे आणि ते सत्तेचा वापर.  आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून देवेंद्र फडणवीस गोळी चालवणार आहेत मात्र मी मी कुठेच अडकू शकत नाही. कारण मला सगळ्यात जास्त फोन तुमचेच आले आहेत.

Manoj Jarange Narco Test : ‘जरांगे पाटलांना अटक करून …… ‘, ‘त्या’ प्रकरणात भाजपने केली मोठी मागणी; अनेक चर्चांना उधाण  Read More »

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण,इंटरनेट बंद! ‘या’ जिल्ह्यात संचारबंदी लागू

Manoj Jarange Patil :  मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमक भूमिकेने राज्यभरात मराठा आंदोलकही आक्रमक होत आहेत. काही ठिकाणी एसटी बसेस जाळण्याच्या घटनाही समोर येत आहेत. मात्र, मनोज जरांगे यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. मनोज जरांगे बॅकफूटवर? मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी रविवारी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच अपशब्द वापरले. यानंतर त्यांचे सहकारी मंचावर आले आणि त्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण मनोज जरांगे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अंतरवली सराईत पत्रकारांशी बोलत असताना जरांगे अचानक आक्रमक झाले. जरांगे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. मुंबईतील फडणवीस यांच्या निवासस्थानी असलेल्या सागर बंगल्याला भेट देण्याचे त्यांनी ठरवले आणि लगेच निघाले.  नंतर रात्री जवळच्या भांबेरी गावात मुक्काम करून सकाळी पुन्हा मुंबईला जाण्याचा बेत होता, मात्र प्रशासनाने लादलेल्या विविध निर्बंधांमुळे मनोज जरांगे यांनी आपला निर्णय रद्द केला. ते पुन्हा अंतरवाली सराटीत परतले आहेत. त्यांनी मराठा आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून त्यांना परत येण्याची विनंती केली आहे. अंबड तालुक्यात हिंसाचार जालना – घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी गावात सोमवारी सकाळी आंदोलकांनी एसटी बस पेटवून दिल्याचा आरोप आहे. बस अंबडहून रामसगावकडे जात होती. आज पहाटे साडेसहाच्या सुमारास तीर्थपुरी गावात अज्ञातांनी बस थांबवून तोडफोड केल्यानंतर ती पेटवून दिली. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जालन्यात संचारबंदी लागू कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, सरकारी कार्यालये, शाळा, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक, दूध वितरण, प्रसारमाध्यमे आणि रुग्णालये यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. एसटी बससेवा बंद मनोज जरांगे यांच्या हालचाली पाहता प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व आगारातील एसटी बसेसची वाहतूक तात्पुरती बंद करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसेसची वाहतूक ठप्प झाली आहे. इंटरनेट डाऊन मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्येमुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 10 तास बंद राहणार आहे. गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे 10 फेब्रुवारीपासून अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. मात्र, राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला स्वतंत्र 10 टक्के आरक्षण देणारा अध्यादेश काढला.

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण,इंटरनेट बंद! ‘या’ जिल्ह्यात संचारबंदी लागू Read More »

PM Modi: पंतप्रधानांचं स्वच्छ भारत अभियानाचं स्वप्न होतंय साकार: खासदार डॉ. सुजय विखे पाटील

PM Modi: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविले जात असून प्रत्येक गाव स्वच्छ झाले पाहिजे या दृष्टिकोनातून आता इलेक्ट्रिक घंटागाडी वाटप मोहीम राबविली जात आहे. या माध्यमातून पंतप्रधानांचे स्वप्न साकार होत असल्याचे मत खा. विखे यांनी मांडले. ते महासंस्कृती महोत्सव येथील कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून जिल्हा नियोजन अंतर्गत नावीन्यपूर्ण योजनेतून कचरा संकलन व वाहतूक कामी इलेक्ट्रिक घंटागाडीचे वाटप तसेच उमेद अभियानांतर्गत महिला बचत गटांना कर्ज व लाभ वाटप आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, समर्थ शेवाळे, राहुल शेळके, उमेदचे सोमनाथ जगताप, महिला आर्थिक विकास महामंडळाचे  संजय गर्जे तसेच महिला व नागारिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खासदार विखे म्हणाले, महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता राखणे ही काळाची गरज आहे. या अनुषंगाने ग्रामीण भागामध्ये कचऱ्याचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करणे गरजेचे आहे. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करून त्याचे चांगले व्यवस्थापन देखील केले पाहिजे. यासाठी अहमदनगर महापालिकेच्या परिसरातील व नगर तालुक्यातील गावांना घनकचरा व्यवस्थापनासाठीच्या नियोजित प्रकल्पासाठी दहा एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती खासदार विखेंनी दिली. तसेच मागील ज्या इलेक्ट्रिक घंटा गाड्या आपण वाटप केल्या होत्या, त्या नगर एमआयडीसीमध्ये तयार करण्यात आल्या होत्या. नगरमधील युवकांना रोजगार मिळावा यासाठीचा आमचा हा प्रयत्न होता आणि त्या इलेक्ट्रिक घंटा गाड्या त्यांनी केवळ तीन लाख रुपयांमध्ये बनवल्या होत्या. यावेळी ज्या गाड्या दिल्या जात आहेत त्या पाच लाख रुपये किमतीच्या असून उत्तम दर्जाच्या गाड्या या ग्रामपंचायतींना आज आपण प्रदान केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान या संकल्पनेला चालना देण्याच्या उद्देशाने या घंटागाडीचा कचरा गोळा करण्यासाठी वापर करून कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे असे आवाहन यावेळी सुजय विखे पाटील यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून महिला रोजगार प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या अनुषंगाने या एका वर्षामध्ये महिला बचत गटांमध्ये सुमारे 185 कोटी रुपयांचे जिल्हा बँकेमार्फत कर्ज वाटप करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा नियोजनामध्ये महिला रोजगार निर्मिती करण्यासाठी कुणीही प्रयत्न केला नाही. परंतु राधाकृष्ण विखे पाटील साहेब ज्यावेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री झाले, तेव्हापासून अशा विविध हितावह धोरणांचा अवलंब करून महिला सक्षमीकरणासाठी अतोनात प्रयत्न केले जात आहेत. जोपर्यंत महायुती सरकार व आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब पालकमंत्री असतील तोपर्यंत महिलांना व महिला बचत गटांना कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही असे त्यांनी आश्वासित केले. तसेच महासंस्कृती महोत्सव झाल्यानंतर याच ठिकाणी 27 आणि 28 तारखेला नमो महा रोजगार मेळाव्याचे आयोजन देखील करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये 200 पेक्षा जास्त कंपन्या सहभाग घेणार आहेत. या माध्यमातून रोजगाराची संधी चांगल्या पद्धतीने उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे जास्तीत जास्त नगर जिल्ह्यातील युवकांनी या नमो महा रोजगार मेळाव्यात सामील व्हावे असे आवाहन देखील त्यांनी युवक वर्गाला केले.

PM Modi: पंतप्रधानांचं स्वच्छ भारत अभियानाचं स्वप्न होतंय साकार: खासदार डॉ. सुजय विखे पाटील Read More »

Maratha Reservation: सरकारने मराठा समाजाचा केसानी गळा कापला, रस्ता रोको आंदोलनाला सुरुवात

Maratha Reservation : राज्यात पुन्हा एकदा मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावा या मागणीसाठी आंदोलन सूरू झाले आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांच्या सूचनेनुसार आज नगर शहरातील विविध भागांमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रस्ता रोको आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.  या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. शहरातील एमआयडीसी परिसरातील बायपास चौकात मराठा आंदोलकांकडून रस्ता रोको करण्यात आला.   यावेळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक गोरख दळवी म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती मात्र त्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे.  एकदिवशीय विशेष अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाचा केसानी गळा कापला आणि मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केले नाही. राज्य सरकार निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाची फसवणूक करत आहे, अशी प्रतिक्रिया गोरख दळवी यांनी DNA मराठीशी बोलताना दिली.

Maratha Reservation: सरकारने मराठा समाजाचा केसानी गळा कापला, रस्ता रोको आंदोलनाला सुरुवात Read More »

Ahmednagar News: अहमदनगर शहरासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर :खा डॉ सुजय विखे पाटील

Ahmednagar News: नगर विकास विभागाच्या खात्यातून “महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद” या योजनेअंतर्गत अहमदनगर महानगरपालिका करिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्या असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितली. अहमदनगर महापालिका क्षेत्राचा विकास आता अधिक जलद गतीने होणार आहे. कारण शासनाकडून नागरी मुलभूत सेवा सुविधांसाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच महापालिकेला वर्ग केला जाणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.  पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून नगर विकास विभागाच्या खात्यातून “महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद” या योजनेअंतर्गत अहमदनगर महानगरपालिका करिता २० कोटी रुपयांच्या अनुदानास शासनाने मंजूरी दिली आहे. यामुळे शहरातील मुलभूत सोई सुविधा उभारण्यासाठी येणारी निधीची समस्या मार्गी लागली असून लवकरच शहरात विविध नागरी कामांना सुरवात केली जाईल असे खासदार विखे म्हणाले.  अहमदनगर महापालिका क्षेत्रात अनेक कामे निधीच्या अभावामुळे रखडली होती. यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्फत आणि माझ्यामार्फत महापालिकेला नागरी मुलभूत सेवा सुविधांच्या कामासाठी निधी मिळण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मागणीला प्रतिसाद देत सदर निधी मंजूर केला आहे.  सदर निधीतून शहरातील रस्ते, जलवाहिन्या, गटारे, सभामंडप आणि इतर विविध नागरी कामे मार्गी लागणार आहेत. यामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या कमी होऊन शहराचा विकास साधला जाईल असा आत्मविश्वास खासदार डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. सदर निधीसाठी योग्य तो पाठपुरावा केल्याबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, अहमदनगर निवडणूक प्रमुख महेंद्र गंधे आणि प्रिया जानवे व मयुर बोचकुळ यांनी आभार व्यक्त केले.

Ahmednagar News: अहमदनगर शहरासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर :खा डॉ सुजय विखे पाटील Read More »

Maratha Reservation: बारसकर हा गद्दारच, सरकारकडून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न! मराठा क्रांती मोर्चा

Maratha Reservation: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहे. यामुळे राज्य सरकारने मोठा निर्णय घेत मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिला आहे.   मात्र हा आरक्षण मान्य नाही, मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण द्या अशी मागणी पुन्हा एकदा पाटील यांनी केली आहे.  तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्यावर अजय महाराज बारस्कर यांनी गंभीर आरोप केल्याने सध्या मराठा आरक्षण संघर्षामध्ये फूट पाडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे आता सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. अजय महाराज बारस्कर यांनी केलेल्या आरोपांवर आता मराठा समाजाच्या संघटने पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून त्यांच्यावर टिका केली आहे.  अहमदनगर शहरात झालेल्या या पत्रकार परिषदेमध्ये अजय बारस्कर हा सुरवातीला खाकी कपडे घालून गाड्या लुटण्याचे काम करत होता असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.अजय बारस्कर यांनी एका लहान मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे आणि भिशी चालवण्याचे काम करत असताना भिशीचे पैसे घेऊन पळून गेले होते असं देखील आरोप यावेळी करण्यात आले.  सुरवाती पासून आंदोलनात फूट पडावी म्हणून बारस्कर प्रयत्न करत होते म्हणून त्यांना दोन महिन्यापूर्वीच संघटनेमधून हाकलून देण्यात आल्याची माहिती देखील देण्यात आली.  सरकारकडून या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला आहे.

Maratha Reservation: बारसकर हा गद्दारच, सरकारकडून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न! मराठा क्रांती मोर्चा Read More »

Maratha Reservation: शहरातील ‘ते’ अनिधीकृत बांधकाम हटवा, मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजची मागणी

Maratha Reservation : अहमदनगर मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाने अहमदनगर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देत नगर मनमाड रोड बोल्हेगाव फाटा येथील अनिधीकृत बांधकाम, अतिक्रमण व बेकायदा पद्धतीने बसविलेले महापुरूषांचे पुतळे यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.  संघटनेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर महापालिका हद्दीतील नगर – मनमाड हायवे लगत बोल्हेगाव फाटा येथे अजय बारस्कर याने मोठया प्रमाणावर अनधिकृत बांधकाम करून या अनधिकृत बांधकामाचा वापर त्याच्या व्यवसायसाठी गेल्या अनेक वर्षापासुन करत आहे.   या बेकायदा व्यवसायातून त्याने मोठया प्रमाणावर पैसा गोळा केला आहे. तसेच नगर मनमाड हायवे व अंतर्गत बोल्हेगाव फाटा मुख्य रस्त्यामध्ये बेकायदा पत्र्याची शेड, व्यवसायिक गाळे, दुकाने काढून वाहतूकीस मोठा अडथळा निर्माण केलेला आहे. या ठिकाणी अनेक वेळा लहान, मोठे अपघात झालेले आहेत, सदर ठिकाणी या व्यक्तीने स्वतःचे अतिक्रमण वाचविण्यासाठी बेकायदा पद्धतीने, कोणतीही पूर्व परवानगी न घेता महापुरुषांचे अर्धपुतळे उभारुण प्रशासनाला व जनतेला वेठीस धरले आहे. यामुळे या व्यक्तीने केलेले अनिधकृत बांधकाम त्वरीत पाडण्यात यावे तसेच वाहतूकीस अडथळा करून उभारलेले पत्रा शेड, व्यवसायिक गाळे, दुकाने इ. ची अतिक्रमणे तात्काळ हटविण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली आहे.  याच बरोबर या निवेदनात अतिक्रमण वाचविण्यासाठी बेकायदेशीर बसविलेल्या महापुरुषांचे पुतळे म.न.पा ने ताब्यात घेवून या बेकायदा कृती करण्याऱ्याविरुद्ध योग्य ते कायदेशीर गुन्हे दाखल करावेत अशी देखील मागणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे संबंधीत व्यक्तीबरोबर येत्या आठ दिवसात कारवाई करून अतिक्रमण हटवण्यात यावे नाहीतर आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये बेमुदत धरणे आंदोलन आणि अन्न त्याग आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

Maratha Reservation: शहरातील ‘ते’ अनिधीकृत बांधकाम हटवा, मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजची मागणी Read More »