DNA मराठी

राजकीय

राजकारणात कायमस्वरूपी मैत्री किंवा वैर नसतं, ‘जगताप-नागवडे’ पुन्हा एकत्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित

Rahul Jagtap : राजकीय व्याख्येत ‘काळ सगळ्यांचा असतो, पण वेळ कुणाचीही नसते’, याच उक्तीची प्रचिती आज पुन्हा एकदा आली आहे. एकेकाळचे कट्टर विरोधक, श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप आणि सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे दोघे आता एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करणार आहेत. राजकारणातील हे नवे समीकरण जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. विधानसभा निवडणुकीत नागवडे यांच्या पत्नी अनुराधा नागवडे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहत जगताप यांनी बंडखोरी केली होती. या बंडखोरीमुळे नागवडे पराभूत झाले आणि भाजपचे विक्रम पाचपुते आमदार म्हणून निवडून आले होते. यानंतर जगताप यांना राष्ट्रवादीकडून निलंबित करण्यात आले होते. दरम्यान, नागवडे कुटुंबीयांनीदेखील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला होता. मात्र, राजकीय समीकरणांमध्ये झालेल्या हालचालींमुळे दोघांनीही पुन्हा एकत्र यायचे ठरवले आहे. आज (,27 मे) मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन, नंतर तटकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त बैठकीत जगताप व नागवडे यांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला. याच बैठकीत त्यांचा पक्षप्रवेश निश्चित करण्यात आला. येत्या काही तासांत ते अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. या राजकीय घडामोडींचा सर्वाधिक फटका भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांना बसण्याची शक्यता आहे. कारण श्रीगोंदा मतदारसंघात पुन्हा एकदा जगताप-नागवडे यांच्या एकत्रित प्रभावामुळे भाजपला मोठं आव्हान निर्माण होणार आहे. राजकारणात काहीही अशक्य नसतं, कालचे शत्रू आजचे मित्र ठरतात, हेच या घडामोडींनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.

राजकारणात कायमस्वरूपी मैत्री किंवा वैर नसतं, ‘जगताप-नागवडे’ पुन्हा एकत्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित Read More »

बातमी खोटी, मुयरी जगताप प्रकरणात महिला आयोगाचा मोठा खुलासा

Rupali Chakankar : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मयुरी जगताप हगवणे यांनी महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केले होते तर आता महिला आयोगाने एक पत्र जाहीर करत मयुरी जगताप यांचे आरोप फेटाळले आहे. पुणे जिल्ह्यातील मयत वैष्णवी हगवणे यांची जाऊ मयुरी जगताप हगवणे यांना कौटुंबिक छळास सामोरे जावे लागत असल्याची तक्रार मेघराज जगताप आणि लता जगताप यांनी 6 नोव्हेंबर 2024 रोजी ई-मेलद्वारे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे दाखल केली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर 7 नोव्हेंबर 2024 रोजी या प्रकरणी राज्य महिला आयोगाकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पौड पोलिस स्टेशन यांना या प्रकरणात कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते, असे स्पष्टीकरण राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी दिले आहे. पुणे जिल्ह्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने सासरच्यांकडून हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे आत्महत्या केल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर या घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे दखल घेऊन 19 मे 2025 रोजी बावधन पोलिसांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार बावधन पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई सुरु आहे. त्याचप्रमाणे मयुरी जगताप यांच्या कौटुंबिक छळाच्या प्रकरणातही पोलीसांना कार्यवाहीचे निर्देश देण्यात आल्यानुसार त्यांनी तक्रार दाखल करुन पुढील तपास केला. पोलीस तपासाबाबत असमाधानी असल्याचे किंवा इतर कुठल्याही बाबींबाबत त्यानंतर तक्रारदार किंवा त्यांच्या कुटुंबियांनी आयोगाशी संपर्क साधलेला नाही. पौंड पोलिसांनी गुन्हा भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 74,115,352,296, 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करुन गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या आदेशाने 31 जानेवारी 2025 रोजी बावधन पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आला. मयुरी जगताप यांच्या प्रकरणी 22 मे 2025 रोजी 102/2025 अन्वये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. तक्रारदारांना याबाबतीत काही आक्षेप असल्यास आणि त्यांनी आयोगाकडे मदत मागितल्यास राज्य महिला आयोग न्यायोचित मदत करण्यास बांधील असून, अपुऱ्या माहितीच्या आधारे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाविरोधात जारी करण्यात येणाऱ्या वृत्ताचे महाराष्ट्र राज्य महिला आयोग खंडन करीत असल्याचेही डॉ. बैनाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी खोटी, मुयरी जगताप प्रकरणात महिला आयोगाचा मोठा खुलासा Read More »

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोफत बियाणे व खते द्या; हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

Harshwardhan Sapkal: राज्यातील शेतकरी संकटाचा सामना करत असतानाच मुसळधार पावसाने पुन्हा त्याला संकटात टाकले आहे. या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले पिकही वाहून गेले आहे. निसर्ग लहरी झाला असून राज्यातील फडणविसांचे सुलतानी सरकार शेतकरी व जनतेच्या मुळावर उठले आहे. संकटातील शेतकऱ्याला मदतीची गरज असून सरकारने पंचनाम्याचे सरकारी सोपस्कर बाजूला ठेवून नुकसानग्रस्तांना एकरी 20 हजार रुपये मदत तातडीने द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, बळीराजा संकटात आल्यास त्याला तातडीने मदत करण्याचे काम काँग्रेसचे सरकार असताना अनेकदा केले आहे. पिकावर रोग पडला, लाल्या पडल्या, गारपीट झाली, अवकाळी पावसाने नुकसान झाले की सरकारने कशाचीही पर्वा न करता शेतकऱ्याला मदत दिली आहे. आताचे सरकार मात्र शेतकऱ्याला मदत करण्याच्या विचाराचे नाही. केवळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन, कोरडी आश्वासने देऊन चालणार नाही, शेतक-यांना तातडीने मदत पोहचवली पाहिजे. खरिप हंगामाच्या सुरुवातीलाच मोठे संकट आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कर्जमाफी अद्याप जाहीर केलेली नाही, कर्जाचे पुनर्गठन तरी करून द्यावे. सरकारचे खरिपाचे काहीच नियोजन नाही याकडेही लक्ष वेधून अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी मोफत बियाणे व खते द्यावीत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. मुसळधार पावसाने भाजपा युती सरकारचे सर्व दावे फोल ठरले आहेत. कालवे फुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भ्रष्टाचार तसेच मुंबई तुंबल्याने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या भ्रष्टाचाराची त्सुनामी बाहेर पडली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुनही मुंबईत जागोजागी पाणी साचले, सर्व व्यवस्था कोलमडली. भुयारी मेट्रो मुंबईत शक्य नसल्याचा एमएमआरडीएचा अहवाल असतानाही काही लोकांच्या हट्टासाठी हा प्रकल्प राबविला त्याचे परिणाम आज दिसत आहेत. रात्रीच्या अंधारात हजारो वृक्षांची कत्तल करून मेट्रोचा अट्टाहास पूर्ण केला आहे. सत्ताधारी पक्षाचा कथित विकास एका पावसानेच उघडा पाडल्यानंतरही हे लोक आधीच्या सरकारकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहेत. 25 वर्ष भाजपा शिवसेनेसोबत मुंबई महापालिकेत सत्तेत होती, एकनाथ शिंदे सातत्याने नगर विकास खात्याचे मंत्री आहेत मग याकाळात भाजपा व एकनाथ शिंदे यांनी काय केले, असा प्रश्न उपस्थित करून सरकारने आरोप प्रत्यारोपाचा खेळ सोडून आत्मपरिक्षण करावे आणि जनतेला मदत करावी. महाराष्ट्र नैसर्गिक संकटाचा सामना करत असताना राज्याचे मंत्रिमंडळ मात्र अमित शाह यांची खुशामत करण्यात मग्न आहे. आपले मंत्रीपद शाबूत रहावे यासाठी मुख्यमंत्र्यांपासून सर्व मंत्री धडपड करत आहेत. अमित शाह यांनी निवडणुकीच्या प्रचारात दोन सिलिंडर मोफत देणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार, अशा वल्गणा केल्या, त्याचा आता त्यांना विसर पडलेला दिसत आहे. अमित शाह महाराष्ट्रावर ओढवलेल्या संकटावर एक शब्दही बोलले नाहीत. आता दिल्लीला जाण्यापूर्वी तरी त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा करून जावी कारण राज्यातील सरकार अमित शाह यांच्या शब्दाशिवाय कामच करत नाही अशी कोपरखळीही हर्षवर्धन सपकाळ यांनी मारली. या पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी व प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोफत बियाणे व खते द्या; हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी Read More »

धनगर आरक्षणासाठी यशवंत सेनेचं पुन्हा आमरण उपोषण; कीर्ती स्तंभाजवळ आंदोलन सुरू

Dhangar Reservation : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर चोंडी गाव सज्ज होत असतानाच, याच गावात कीर्ती स्तंभाजवळ यशवंत सेनेने पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केलं आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळावे, या दीर्घकालीन मागणीसाठी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, शिंदे समितीचे सदस्य माणिकराव दांगडे, अण्णासाहेब रुपनवर व इतर कार्यकर्ते पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. “शासनाने फक्त अहवाल स्वीकारून वेळ मारून नेली” यशवंत सेनेने दोन वर्षांपूर्वीही आंदोलन छेडले होते. त्यावेळी राज्य सरकारने ‘शिंदे समिती’ची स्थापना करून धनगर समाजाच्या मागण्यांकडे लक्ष दिल्यासारखं केलं. समितीचा अहवालही स्वीकारण्यात आला. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालीच नाही, असा आरोप यशवंत सेनेच्या नेत्यांनी केला आहे. “निवडणुकीपूर्वी आश्वासने, नंतर दुर्लक्ष” बाळासाहेब जोडतले म्हणाले, “शासनाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी आरक्षणाचा मुद्दा गाजवला. मात्र निवडणुका झाल्यानंतर आम्हाला विसरलं. आजही आमची मागणी तशीच प्रलंबित आहे. शासनाने निव्वळ आमची फसवणूक केली.” राजकीय उपस्थितीत आंदोलकांचा दबाव शिंदे समितीचे सदस्य माणिकराव दांगडे यांनीही तीव्र नाराजी व्यक्त करताना सांगितलं, “शासन आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नसेल, तर आम्ही जन्मगावात अहिल्यादेवींच्या चरणी सत्याग्रह करतोय. ही केवळ मागणी नाही, तर आमचा हक्क आहे.” सरकारकडे अपेक्षेची नजर यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंत वर्ष मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. 31 मे रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि राज्यपाल रमेश बैस यांची चोंडी येथे उपस्थिती निश्चित आहे. अशा वेळी सुरू झालेल्या या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. सरकारने या आंदोलकांच्या आवाजाकडे कितपत लक्ष दिलं जातं, आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णायक पावलं उचलली जातात का, याची उत्सुकता आता सर्वत्र आहे.

धनगर आरक्षणासाठी यशवंत सेनेचं पुन्हा आमरण उपोषण; कीर्ती स्तंभाजवळ आंदोलन सुरू Read More »

वैष्णवी हगवणे प्रकरणात गंभीर खुलासे; उच्च पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीकडून जबरदस्तीने रुखवत खरेदी

Neelam Gorhe On Vaishnavi Hagavane Case : विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मयुरी जगताप आणि वैष्णवी हगवणे या दोन्ही सूनांच्या तक्रारीवर महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्या म्हणाल्या की, या दोन्ही प्रकरणांमध्ये हगवणे कुटुंबाच्या विरोधात छळाच्या गंभीर तक्रारी आहेत. काल त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत कस्पटे कुटुंबियांची भेट घेतली असता, त्यावेळी एका नव्या घटनेबाबत माहिती समोर आली. हगवणे कुटुंबाने लग्नावेळी एका उच्च पदस्थ पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या रुखवतातून रुखवत विकत घेण्यासाठी दीड लाख रुपये जबरदस्तीने घेतले, अशी तक्रार संबंधित मुलीच्या कुटुंबाने केली आहे. डॉ. गोऱ्हे यांनी यासंदर्भात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांशी तपशीलवार चर्चा केल्याचेही सांगितले. मयुरी जगताप या हगवणे कुटुंबाच्या दुसऱ्या सुनेशीही त्यांनी सविस्तर संवाद साधला असून, त्या प्रकरणातील तपशील देखील पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले आहेत. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, छळाच्या या दोन्ही घटनांमध्ये क्रूरतेची पद्धत स्पष्टपणे दिसते. मयुरी जगतापने दाखल केलेल्या 354 कलमाखालील तक्रारीचे प्रकरण सध्या पौड पोलीस स्टेशनवरून पिंपरी चिंचवड आयुक्तालयात वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणाची चार्जशीट अंतिम टप्प्यात असून, लवकरच ती सादर होणार असल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, या प्रकरणात कोणत्याही उच्च पदस्थ व्यक्तीला संरक्षण दिले जाणार नाही. साक्षीपुराव्यांमध्ये हस्तक्षेप करणाऱ्यांविरोधातही कठोर कारवाई डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, या प्रकरणात ॲड. राजेश कावेडिया आणि ॲड. उज्वला पवार यांची नावे पुढील कायदेशीर प्रक्रियेत असून, सरकारी वकिलांचीही नेमणूक आवश्यक ठरणार आहे. त्यांनी राज्य सरकारकडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सर्व माहिती सोपविणार असल्याचे सांगितले. राज्य महिला आयोगाच्या संदर्भात डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, त्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा होणे गरजेचे आहे. त्याला जर राजकीय हेतू म्हणायचं असेल, तर तो दृष्टीकोन चुकीचा आहे. महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दोष सिद्धीचे प्रमाण वाढावे, महिलांना न्याय मिळावा आणि पुनर्वसनाचे काम अधिक प्रभावी व्हावे, यासाठी आयोगाला अधिक निधी, कर्मचारी आणि कार्यक्षमता देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पुणें, नाशिक, आणि नव्या मुंबईतील अलीकडील महिलांच्या आत्महत्या तसेच राजगुरूनगर येथील बालिका अत्याचार घटनांचा दाखला देत, त्या म्हणाल्या की अशा घटना टाळण्यासाठी वेळेत न्याय देणं गरजेचं आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना आरोपींना फरार होण्यासाठी वेळ मिळू नये, यासाठी शासनाने ठोस भूमिका घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वैष्णवी हगवणे प्रकरणात गंभीर खुलासे; उच्च पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीकडून जबरदस्तीने रुखवत खरेदी Read More »

माजी आमदार आर.टी. जिजा देशमुख यांचे अपघाती निधन

R.T. Jija Deshmukh Dies: भाजपाचे माजी आमदार आर.टी. जिजा देशमुख यांचे अपघाती निधन झाल आहे. ही दुःखद घटना रविवारी संध्याकाळी घडली. लातूर जिल्ह्यातील औसा जवळील बेळकुंड येथे त्यांच्या गाडीचा अपघात झाला. या दुर्घटनेत गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी लातूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने बीड व लातूर जिल्ह्यांतील राजकीय, सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, आर.टी. जिजा हे औसाकडे प्रवास करत असताना, बेळकुंडजवळ त्यांच्या गाडीच्या काचांवर रस्त्यावरील पाणी अचानक आल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे वाहनाने तीन ते चार पलटी घेतल्या. गाडी (क्रमांक एमएच ४४ २७९७) अपघातग्रस्त झाल्यामुळे त्यात बसलेले जिजा देशमुख गंभीररित्या जखमी झाले. अपघातानंतर तातडीने त्यांना लातूरमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने एक तळागाळातील समाजाशी नाळ असलेला नेता हरपल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले असून, त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

माजी आमदार आर.टी. जिजा देशमुख यांचे अपघाती निधन Read More »

मोठी बातमी! शहीद संदीप गायकर यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची

Uday Samant : शहीद संदीप गायकर यांच्या ब्राम्हणवाडा गावी त्यांच्या कुटुंबीयांची उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार शहीद संदीप गायकर कुटुंबाला रोख पाच लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली. उद्योगमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते शहीद संदीप गायकर यांच्या पत्नी दिपाली गायकर तसेच त्यांच्या माता-पित्यांकडे पाच लाख रुपयांची रोख रक्कम देण्यात आली. या प्रसंगी जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे, पदाधिकारी राम रेपाळे, बाजीराव दराडे, एकनाथ यादव तसेच ब्राम्हणवाडा गावचे उपसरपंच सुभाष गायकर, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी आरोटे आदी उपस्थित होते. शहीदाच्या कुटुंबाशी संवाद साधताना डॉ. उदय सामंत यांनी आपल्या भावना व्यक्त करत गायकर कुटुंबाला मानसिक आधार दिला. “शहीदाचे बलिदान देश विसरणार नाही. त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे राज्य शासन नेहमीच उभी राहील,” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

मोठी बातमी! शहीद संदीप गायकर यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची Read More »

मोठी बातमी! फरार सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर अखेर पोलिसांच्या अटकेत…

Rajendra Hagavane : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी असलेल्या फरार सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी आज सकाळी (ता.23 शुक्रवार )अटक केली आहे. गेली सात दिवसांपासून ते पोलिसांना चकवा देत होते. या प्रकरणात वैष्णवीची सासू, पती आणि नणंद यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासानंतर उघड झालेल्या अनेक धक्कादायक बाबींमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. हगवणे यांना तत्काळ पोलिसांनी पकडावे आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी होत होती.त्यामुळे पोलिसांवर याबाबत मोठा दबाव आला होता. दरम्यान, वैष्णवीचा तिच्या सासरी संशयास्पद मृत्यू झाला होता. प्राथमिक माहितीनुसार, तीच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता, असा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. राजेंद्र आणि सुशील हगवणे हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून फरार होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केलं होतं. अखेर आज पहाटे पिंपरी चिंचवडमधील एका ठिकाणी त्यांचा ठावठिकाणा लागल्यावर पोलिसांनी सापळा रचला आणि छापा टाकत दोघांना ताब्यात घेतलं. सध्या या प्रकरणात चौकशी अधिक वेगाने सुरु झाली असून, सर्व आरोपींविरुद्ध ठोस पुरावे गोळा करण्याचं काम पोलिसांकडून सुरु आहे. लवकरच या प्रकरणात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! फरार सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर अखेर पोलिसांच्या अटकेत… Read More »

मोठी बातमी! राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी

Rajendra Hagavane : राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या सुनेच्या मृत्यूप्रकरणात गंभीर आरोप झाल्यानंतर पक्षाने ही कारवाई केली आहे. पुण्यातील भुकूम येथे 16 मे रोजी वैष्णवी हगवणे (वय 23) यांनी आत्महत्या केली. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला. एफआयआरनुसार, वैष्णवीच्या पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे अद्याप फरार आहेत. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ केल्याची माहिती युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणामुळे समाजात संतापाची लाट उसळली असून, महिलांवरील अत्याचार आणि हुंडा प्रथा याविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे.

मोठी बातमी! राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी Read More »

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण, आतापर्यंत काय काय घडलं? पोलिसांनी सांगितली A to Z माहिती

Vaishnavi Hagwane : राजेंद्र हगवणेला शोधायला 3 पथक तयार करण्यात आले असून हगवणेला लवकरच अटक करणार येणार असल्याची माहिती सुनील कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी दिली. तसेच आमच्यावर या प्रकरणात कोणाचाही दबाव नाही नाही आम्हाला कोणाचा फोन आला आहे. एका महिलेचा असा दुर्दैवी आणि अत्यंत क्रूरतेने अंत झाला आहे त्यामुळे या घटनेकडे आम्ही अत्यंत गांभीर्याने पाहत आहोत. आरोपींना कोर्टात हजर करून पोलीस रिमांड वाढवून घेणार असल्याची देखील माहिती त्यांनी दिली. माध्यमांशी बोलताना सुनील कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त पुढे म्हणाले की, शिवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी जे ॲडव्हान्स मेडिकल सर्टिफिकेट दिलेलं आहे. त्यामध्ये डॉक्टरांनी काही पार्ट्स काढून ठेवलेले आहेत ते पुढील तपासासाठी आम्ही पाठवणार आहोत. त्यामध्ये डॉक्टरांनी हँगिंगचं एक कारण दिलेला आहे आणि शरीरावर मारहाणीच्या खुणा आहेत. ॲडव्हान्स मेडिकल सर्टिफिकेटमध्ये या सगळ्यांचा उल्लेख आहे. त्यानुसार आम्ही कलम 304 हे वाढवले आहे. त्यासोबतच हुंडाबळी 80(2), 108 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. उर्वरित दोन आरोपी म्हणजे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा यांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या तीन-तीन बनवल्या आहेत आणि त्यांचा वेगवेगळ्या पथकांमार्फत तपास सुरू आहे त्यांना लवकरच अटक करण्यात येईल. या गुन्ह्याचा जो सिक्वेन्स आहे जे पुरावे आहेत त्यानुसार या घटनेचा जो लेखाजोखा आहे मारहाण केल्यापासून आत्महत्येस प्रवृत्त करण्यापर्यंतच्या दोन तासाचे अनेक पुरावे आम्हाला मिळाले आहेत. त्यामुळे आज आरोपींना कोर्टात हजर करून त्यांचं पोलीस रिमांड वाढवून घेणार आहोत. असं देखील ते म्हणाले. हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी त्यांच्या घरी असणारे पाच ते सहा सीसीटीव्ही कॅमेरे परिस्थितीजन्य पुरावे आहे. आजूबाजूला असणारे साक्षीदार यांना जमा करण्यास आम्हाला वेळ मिळाला आहे. आमच्यावर कोणताही राजकीय दबाव नाही आम्हाला कुणाचाही फोन आला नाही कायदेशीर पद्धतीने आमचा तपास सुरू आहे. ही घटना जी आहे. एका महिलेचा असा दुर्दैवी आणि अत्यंत क्रूरतेने अंत झाला आहे त्यामुळे या घटनेकडे आम्ही अत्यंत गांभीर्याने पाहत असून अगदी बारकाईने सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. अशी माहिती देखील सुनील कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी दिली.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण, आतापर्यंत काय काय घडलं? पोलिसांनी सांगितली A to Z माहिती Read More »