DNA मराठी

राजकीय

Maharashtra Government: मोठी बातमी! मंत्रालयात ऑनलाईन ॲपद्वारे मिळणार प्रवेश

Maharashtra Government: मंत्रालय सुरक्षा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातंर्गत पहिल्या टप्प्यात चेहरा ओळख आधारित प्रवेश प्रक्रिया कार्यान्वीत करण्यात आली. तसेच टप्पा २ अंतर्गत प्रवेशासाठी व्हीजीटर मॅनेजमेंट सिस्टीम प्रणाली विकसित करण्यात आली आहे. मंत्रालयात क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, अभ्यागत यांना यापुढे कोणत्याही कामाकरिता प्रवेश हवा असल्यास त्यांना ‘डिजीप्रवेश’ या ऑनलाईन ॲप आधारित प्रणालीद्वारे मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे. अभ्यांगतांना मंत्रालयाच्या ज्या विभागात कामानिमित्त प्रवेश आवश्यक आहे. केवळ त्यांना दिलेल्या वेळेत आणि अनुज्ञेय असलेल्या मजल्यावरच प्रवेश करावा. अनधिकृत मजल्यावर प्रवेश केल्यास अभ्यागत कारवाईस पात्र राहतील. अभ्यागतांनी संबंधित विभागातील आपले काम पूर्ण झाल्यावर विहीत वेळेत मंत्रालयातून बाहेर पडावे. ज्येष्ठ नागरीक व दिव्यांग अभ्यागतांना रांगेत उभे राहण्यामुळे होणारा त्रास विचारात घेता त्यांना दुपारी १२ वाजता प्रवेश देण्यात येईल. तर दुपारी १२ नंतर ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग अभ्यांगत यांचेसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था राहील. तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग अभ्यांगत यांनी तत्संबंधीचे वैध प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. मंत्रालयात येणाऱ्या सर्व अभ्यागतांना दुपारी २ वाजेनंतर प्रवेश देण्यात येईल. अशा प्रवेशासाठी त्यांना डिजीप्रवेश या ऑनलाईन ॲप आधारीत प्रणालीद्वारे मंत्रालय प्रवेशपास घेऊन मंत्रालयात प्रवेश मिळविता येईल. अभ्यागतांनी मंत्रालयात प्रवेश मिळविण्यासाठी आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड आदी शासन मान्य ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. अशिक्षीत तसेच स्मार्टफोन नसलेल्या अभ्यांताकरीता गार्डन गेट येथे ऑनलाईन ॲप आधारीत प्रणालीद्वारे मंत्रालय प्रवेश नोंदणीकरीता तसेच मदतीकरीता एक खिडकी उपलब्ध असणार आहे. ‘डिजीप्रवेश’ ॲपद्वारे आपली नोंदणी केल्यानंतर मिळणाऱ्या क्यू आर कोड आधारे मंत्रालयाबाहेर असलेल्या खिडकीवर मंत्रालय प्रवेशाकरिता आरएफआयडी कार्ड वितरीत करण्यात येईल. हे आरएफआयडी कार्ड आधारे सुरक्षाविषयक तपासणी करून मंत्रालयात प्रवेश देण्यात येईल. अभ्यागतांना आरएफआयडी प्रवेश ओळखपत्र परिधान करणे व मंत्रालयातून बाहेर जाताना ते सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे जमा करणे बंधनकारक राहील. अभ्यागतांनी अशी करावी नोंदणी‘डिजीप्रवेश’ ॲप हे मोबाईल ॲप ॲण्ड्राईड आणि आयओएस ॲपल या दोन्ही प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. आपल्या मोबाईल च्या प्रणालीनुसार ॲण्ड्राईडमध्ये प्ले स्टोअर वर तर आयओएस ॲपलवर ॲपल स्टोअरवर digi pravesh हे सर्च केल्यास हे ॲप विनामुल्य डाऊनलोड करता येते. या ॲपवर सुरूवातीला केवळ एकदाच नोंदणी करणे आवश्यक राहील. नोंदणी झाल्यानंतर आधार क्रमांकावर आधारीत यंत्रणेद्वारे छायाचित्राची ओळख पटवून नोंदणी पूर्ण केल्यानंतर ज्या विभागात काम आहे, त्याचा स्लॉट बुक करून रांगेशिवाय प्रवेश घेता येईल. या संपूर्ण प्रक्रियेला तीन मिनीटांपेक्षा कमी कालावधी लागतो.

Maharashtra Government: मोठी बातमी! मंत्रालयात ऑनलाईन ॲपद्वारे मिळणार प्रवेश Read More »

दिशा सालियन प्रकरण, आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल होणार? संजय निरुपमांचा मोठा दावा

Sanjay Nirupam On Disha Salian: दिशा सालियन हत्येमागे मुंबईतील सेलिब्रेटिंगचे ड्रग्ज रॅकेट आहे. असा धक्कादायक दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी केला आहे. तसेच सतीश सालियन यांनी नव्याने केलेले आरोप गंभीर असून त्यांच्या तक्रारीवर लवकरच मालवणी पोलीस ठाण्यात ‘एफआयआर’ नोंदवला जाईल, असा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला. शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम माध्यमांशी बोलताना म्हणाले की, दिशा सालियन हत्याकांडात उबाठा आमदार आदित्य ठाकरे यांची मोठी भूमिका असल्याचे पुरावे आहेत, लवकरच आदित्य ठाकरेवर गुन्हा दाखल होईल आणि ते हत्यादी ठाकरे बनतील, अशी घणाघाती टीका निरुपम यांनी केली. निरुपम म्हणाले की, नुकताच वडील सतीश सालियन यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे दिशा सालियन प्रकरणात तक्रार केली आहे. या तक्रारीत उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ही तक्रार मालवणी पोलीस स्टेशनमध्ये एफ.आय.आर करण्यासाठी पुढे पाठवण्यात आल्याची माहिती निरुपम यांनी दिली दिशा सालियनची ८ जून २०२० मध्ये हत्या झाली. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची दिशा सालियन मॅनेजर होती. दिशा सालियनची हत्या संशयास्पद झाली होती. या दिवशी दिशा सालियनच्या घरी झालेल्या पार्टीमध्ये सर्वजण उपस्थित होते, अशी चर्चा त्या दिवशी झाली होती, असे निरुपम म्हणाले. राज्य सरकारने या प्रकरणी एसआयटीची स्थापना केली असून त्याकडून चौकशी सुरु आहे. दिशावर सामूहिक अत्याचार करुन हत्या केल्याचा आरोप सतीश सालियन यांनी केला आहे. दिशा सालियनचा शवविच्छेदन अहवाल तीन दिवस उशीराने प्राप्त झाला. तिचा मृतदेह हा इमारतीपासून २५ फूट लांब आढळून आली. तिच्या शरिरावर कोणत्याही जखमा नव्हत्या आणि नग्नावस्थेत तिचा मृतदेह आढळून आला होता. या सगळ्या गोष्टी संशयास्पद असून त्याची नव्याने सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, असे निरुपम म्हणाले. सरकार विरोधी पक्षांचा बदला घेण्यासाठी दिशा सालियन प्रकरणाचे राजकारण करत आहेत, असा आदित्य ठाकरे यांचा आरोप खोटा आहे, असे निरुपम म्हणाले. ते पुढे म्हणाले की, आदित्य ठाकरेने सुप्रीम कोर्टात सीबीआयने क्लिन चीट दिल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले. मात्र सीबीआयने दिशा सालियन प्रकरणाचा नाही तर सुशांत सिंग हत्येचा तपास केला होता. आदित्य यांच्या खोट्या प्रतिज्ञापत्रावर देखील कारवाई होईल, असे निरुपम म्हणाले. या प्रकरणी आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, डी नो मोरिया आणि इतरांवर संशय आहे. हे सर्व ड्रग्ज रॅकेटशी संबधित असून त्यांना ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या समीर खान याने नार्कोटिस ब्युरोकडे कबुली दिली होती. आदित्य ठाकरे ड्रग्ज घेतो, असे समीर खानने चौकशीत म्हटले होते. त्यामुळे दिशा सालियनच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार, मुंबई पोलीस कटिबद्ध असल्याचे निरुपम म्हणाले. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चर्चा वाढल्यानंतर उबाठा गटाने कुणाल कामराचे वादग्रस्त गाणे जाणुनबुजून व्हायरल करण्यात आले. शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टीकेवर कुणाल कामरावर निश्चित कारवाई होईल, असे निरुपम म्हणाले.

दिशा सालियन प्रकरण, आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल होणार? संजय निरुपमांचा मोठा दावा Read More »

गोमातेचे नाव असलेले तंबाखू व्यवसाय कायमस्वरूपी बंद करा अन्यथा…, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचा राज्य सरकारला इशारा

Vidya Gadekar: तंबाखूच्या सेवनामुळे दरवर्षी जगभरात सुमारे 80 लाख लोकांचा मृत्यू होतो तसेच आपल्या संस्कृतीत गोमाता ही मातेसमान असून मात्र  संगमनेर तालुक्यात मालपाणी उद्योग गाय मातेचा अपमान करून व्यवसाय करत असल्याने या व्यवसायावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी अन्यथा अमरण उपोषण करणार असा इशारा महाराष्ट्र राज्य, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी सेलच्या प्रदेश सचिव(संघटन) विद्या गाडेकर यांनी निवेदनाच्या माध्यमातून राज्य सरकारला दिला आहे. विद्या गाडेकर आपल्या निवेदनात म्हणाल्या की, 100 वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून मालपाणी उद्योग समूह हा व्यवसाय करत आहे मात्र गायछापच्या पाकिटावर तंबाखू हानिकारक असते असं लिहिले आहे तसेच तंबाखूची जी पुडी असते त्यावर गोमताचे चित्र असते गोमातेचे चित्र असलेल्याने ही एक प्रकारची विटंबना असून हा गोमतेचा घोर अपमान आहे.त्यामुळे या व्यवसायवर कायमस्वरूपी बंदी आणावी अन्यथा आमरण उपोषण करणार असा इशारा त्यांनी निवेदनात दिला आहे. विद्या गाडेकर निवेदनात पुढे म्हणाल्या की, या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करता व हिंदू धर्माचे प्रतीक गोमाता असताना आमच्या धर्माचे प्रतीक असलेल्या गोमातेची विटंबना गेल्या अनेक वर्षे करणाऱ्या मालपाणी उद्योग समूहाला धडा शिकवण्यासाठी त्वरित ” गाय छाप जर्दा” हे तंबाखू उत्पादन बंद करण्याचे संबंधिताना आदेश द्यावेत तसेच हे उत्पादन त्वरित बंद न केल्यास मी लवकरच आमरण उपोषण करणार आहे. असा इशारा विद्या गाडेकर यांनी दिला.

गोमातेचे नाव असलेले तंबाखू व्यवसाय कायमस्वरूपी बंद करा अन्यथा…, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचा राज्य सरकारला इशारा Read More »

ठाकरेंना धक्का, महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांचा राष्ट्रवादीत प्रवेश…

Snehal Jagtap: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देत आज महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लक्ष देतानाच ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मोठं करण्यात हातभार लावला आणि आपल्याला या पदावर बसवले त्यांना या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संधी देण्याचा विचार असल्याचे सुतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणारा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे.त्यामुळे आपल्या या पक्षाशी कार्यकर्ता जोडला गेला पाहिजे. आज पुरोगामी विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी स्नेहल जगताप आपल्या पक्षात आली आहे. माणिकराव जगताप यांचे आणि माझे फार जुने संबंध होते. ती पोकळी भरून काढण्याचे काम स्नेहल जगताप करतील असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. पक्षाची ताकद कोकणात वाढत आहे आणि स्नेहल जगताप यांच्यामुळे अजून वाढणार आहे. राजकारणात कोण कुणाचा कायम शत्रू नसतो हे सांगतानाच कोकणाने नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दिपक केसरकर, भास्कर जाधव, उदय सामंत, संजय कदम, मंदा म्हात्रे असे नेते घडवले याची आठवणही अजित पवार यांनी सांगितली. कोकणच्या सर्वांगिण विकासासाठी नेहमीच पुढाकार घेत असतो. कोकणात पायाभूत सुविधा कशा देता येतील यासाठी माझा प्रयत्न असतो असेही अजित पवार म्हणाले. तसेच शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारांशी कधीही तडजोड करणार नाही असे स्पष्ट करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजून मजबूत करुया असे आवाहन अजित पवार यांनी केले.

ठाकरेंना धक्का, महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांचा राष्ट्रवादीत प्रवेश… Read More »

Maharashtra Politics: विधानभवन परिसरात झाडावर चढून ईश्वर शिंदेच आंदोलन, कारण काय?

Maharashtra Politics: विधानभवन परिसरात मंगळवारी एका तरुणाच्या अनोख्या आंदोलनाने खळबळ उडाली. बीड जिल्ह्यातील शेतकरी नेता ईश्वर शिंदे या तरुणाने विधानभवन परिसरातील एका झाडावर चढून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले. तर दुसरीकडे प्रशासन आणि आमदारांनी त्याला खाली उतरवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेरीस धुळे येथील भाजप आमदार अनुप अग्रवाल यांनी क्रेनच्या साहाय्याने झाडावर जाऊन ईश्वर शिंदेची मनधरणी केली आणि त्याला खाली उतरवण्यात यश मिळवले. आंदोलनाची पार्श्वभूमी ईश्वर शिंदे हे बीड जिल्ह्यातील रहिवासी असून, ते शेतकरी नेता म्हणून परिचित आहेत. त्यांनी आपल्या आंदोलनादरम्यान हातात राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार गट) नेत्यांचे फोटो असलेले बॅनर झळकावले होते. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सूत्रांनी सांगितले. विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना त्यांनी विधानभवन परिसरात झाडावर चढून आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. क्रेनने झाडावर चढले आमदार अग्रवालईश्वर शिंदे यांना खाली उतरवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी सुरुवातीला प्रयत्न केले. मात्र, आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. यानंतर धुळे येथील भाजप आमदार अनुप अग्रवाल यांनी पुढाकार घेतला. त्यांनी क्रेनच्या साहाय्याने झाडाच्या दिशेनेवर जाऊन ईश्वर शिंदे यांच्याशी संवाद साधला. सुमारे अर्ध्या तासाच्या मनधरणीनंतर शिंदे खाली उतरण्यास तयार झाले आणि त्यांना सुरक्षितपणे जमिनीवर आणण्यात आले. घटनास्थळावरील गोंधळया आंदोलनामुळे विधानभवन परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. बघ्यांची गर्दी आणि माध्यमांचे कॅमेरे यामुळे प्रशासनाला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागली. ईश्वर शिंदे यांना खाली उतरवल्यानंतर त्यांची पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, त्यांच्या मागण्यांबाबत अधिक माहिती घेतली जात आहे. शेतकरी मागण्यांचा मुद्दा पुन्हा चर्चेतईश्वर शिंदे यांच्या या आंदोलनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना पुन्हा एकदा प्रकाशझोतात आणले आहे. त्यांनी आपल्या आंदोलनातून शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवल्याचे सांगितले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार गट) नेत्यांचे फोटो असलेले बॅनर वापरल्याने या आंदोलनाला राजकीय रंगही प्राप्त झाला आहे. याबाबत अद्याप पक्षाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. आमदार अग्रवालांचे कौतुकआमदार अनुप अग्रवाल यांनी संयम आणि धैर्याने परिस्थिती हाताळल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. “आंदोलकाला खाली उतरवणे हे आमचे प्रथम कर्तव्य होते. त्याच्या मागण्या काय आहेत, हे समजून घेऊन त्यावर चर्चा करण्याची आमची तयारी आहे,” असे अग्रवाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या घटनेनंतर विधानभवन परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून विशेष उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे. ईश्वर शिंदे यांच्या आंदोलनामुळे शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आले असून, सरकार यावर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Maharashtra Politics: विधानभवन परिसरात झाडावर चढून ईश्वर शिंदेच आंदोलन, कारण काय? Read More »

उपाध्यक्ष अण्णा बनसोडे सदस्यांच्या हक्कांचे रक्षण करणार अन् कामकाज निष्पक्षपणे चालवणार; अजित पवार

Ajit Pawar: ज्येष्ठ सदस्य अण्णा बनसोडे यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर विधानसभेच्या उपाध्यक्षपदापर्यंत मजल मारली आहे. त्यांचा राजकीय प्रवास राजकारण व समाजकारणात कार्यरत असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. मेहनत, संघर्ष आणि लोकसेवा या तीन गोष्टींवर श्रद्धा ठेवून वाटचाल करणाऱ्या अण्णा बनसोडे यांनी आज विधानसभा उपाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी स्वीकारली आहे. प्रत्येक सदस्याच्या हक्कांचे रक्षण करणे, सर्वांना समान न्याय आणि संधी मिळवून देणे, ही जबाबदारी ते निःपक्षपातीपणे पार पाडतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र विधानसभेच्या 22 व्या उपाध्यक्षपदी पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा दादू बनसोडे यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीच्या निमित्ताने विधानसभेत अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जेव्हा कोणी सभागृहाच्या अध्यक्षपदी किंवा उपाध्यक्षपदी निवडून येतो, तेव्हा तो एका पक्षाचा नसतो, तर संपूर्ण सभागृहाचा होतो. प्रत्येक सदस्याच्या हक्कांचे रक्षण करणे, सर्वांना समान न्याय आणि संधी मिळवून देणे, कामकाज निष्पक्षपणे चालवणे, ही मोठी जबाबदारी असते. मला विश्वास आहे की अण्णा बनसोडे ही जबाबदारी यशस्वीपणे निभावतील. पिंपरी-चिंचवड सारख्या उद्योगनगरीत स्थलांतरित कामगारांची मोठी संख्या आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अण्णांनी नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्ष म्हणून मोठे योगदान दिले आहे. विशेषतः झोपडपट्टी भागातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी विशेष काम केले आहे. कोरोना संकटाच्या काळात अण्णा बनसोडे यांनी त्यांच्या आमदार निधीतून कोरोना लसीकरणासाठी 25 लाख रुपये देण्याबरोबरच पिंपरी-चिंचवडच्या ‘वायसीएम’ रुग्णालयासाठी सव्वा कोटी रुपये देऊन आरोग्य सुविधांसाठी मोठा हातभार लावला. त्यांच्या समाजसेवेचा हा वारसा पुढेही सुरू राहील, तसेच उपाध्यक्षपदाची मिळालेली जबाबदारी ते यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

उपाध्यक्ष अण्णा बनसोडे सदस्यांच्या हक्कांचे रक्षण करणार अन् कामकाज निष्पक्षपणे चालवणार; अजित पवार Read More »

जयकुमार गोरे यांच्याकडून मातंग समाजाच्या न्यायात अडथळा, रोहित पवारांचा आरोप

Rohit Pawar: राज्यातील राजकारणात एक मोठा खळबळजनक प्रकार समोर आला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी थेट मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करत मोठा पर्दाफाश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पवार हे गोरे यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्याच्या तयारीत होते. मात्र आता त्यांनी गोरे यांच्या कथित गैरकारभाराची सविस्तर माहिती देत त्यांच्या कारभारावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मातंग समाजाला न्याय मिळण्यात अडथळारोहित पवार यांनी सांगितले की, “मी सुरुवातीपासून महिलेला न्याय मिळावा यासाठी प्रयत्नशील होतो. मात्र, मंत्री गोऱ्हे हे मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन दबाव आणण्याचे काम करत आहेत.” पवार यांनी असा धक्कादायक आरोप केला की, गोरे यांनी त्यांच्या भागातील कॉलेजला रस्ता मिळावा यासाठी मातंग समाजातील मृत व्यक्तीचे खोटे आधार कार्ड तयार करून त्याला जिवंत दाखवले. या मृत व्यक्तीचे नाव पिराजी भिसे असून, त्यांचा मृत्यू 8 ऑक्टोबर 2016 रोजी झाला होता. भिसे यांच्या कुटुंबाने याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली असून सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. खोट्या सहीने जमीन हडप करण्याचा आरोप“पिराजी भिसे यांचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांचे खोटे कागदपत्र तयार करण्यात आले. भिसे हे अंगठा लावत असताना त्यांच्या नावावर तोतयाने सही केली. ही गंभीर फसवणूक असून यामुळे अॅट्रॉसिटी कायद्याचाही भंग होतो. एवढ्या गंभीर प्रकारानंतरही गोरे यांना जामीन मिळाला,” असा आरोप पवार यांनी केला. विशेष म्हणजे, ज्या न्यायाधीशाने गोरे यांना जामीन दिला, त्यांना उच्च न्यायालयाने डिमोट केल्याचेही पवार यांनी सांगितले. कोरोना काळातील योजनांचा गैरवापरया प्रकरणात आणखी गंभीर बाब उघड करत रोहित पवार म्हणाले, “गोरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्याचा फोटो वापरून कॉलेज रजिस्टरसाठी कागदपत्रे तयार केली. कोविड काळात सामान्य माणूस बाहेर फिरू शकत नव्हता. याच काळाचा फायदा घेत गोरे यांनी आपल्या फायद्यासाठी कॉलेज रजिस्टर केलं.” तसेच “मायनी मेडिकलमध्ये 3 कोटी 25 लाख रुपयांची अनियमितता झाली असून, हे मेडिकल देशमुख कुटुंबाशी संबंधित आहे, ज्यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली होती,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला. गोरे यांना मोठ्या ताकदीचा पाठिंबा असल्याचा दावाया संपूर्ण प्रकरणात गोरे यांच्या पाठीमागे मोठ्या ताकदीचा पाठिंबा असल्याचा दावा करत रोहित पवार म्हणाले, “देवा भाऊ त्यांच्या पाठीशी आहेत, म्हणूनच ते वाचत आहेत. पण पाठीशी कितीही मोठी शक्ती असली, तरी आम्ही न्यायासाठी लढत राहू.” तसेच या प्रकरणात पूर्ण पारदर्शकता यावी आणि सत्य बाहेर यावे, यासाठी आपला लढा सुरूच राहील, असेही पवार यांनी स्पष्ट केले. राजकीय वर्तुळात खळबळया आरोपांमुळे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता या प्रकरणाची चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रिया कोणत्या वळणावर जाते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. रोहित पवार यांनी केलेले आरोप जर खरे ठरले, तर गोऱ्हे यांच्यासह संबंधितांवर मोठी कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जयकुमार गोरे यांच्याकडून मातंग समाजाच्या न्यायात अडथळा, रोहित पवारांचा आरोप Read More »

मुंबई पोलिसांच्या मदतीने IPL मध्ये बेटींग, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

Ambadas Danve : मुंबई पोलीस विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत त्या संभाषणाचा पेनड्राइव्हच सभापतींकडे सादर केला. बेटिंग करणाऱ्यांमध्ये मेहुल जैन, कमलेश जैन आणि हिरेन जैन या व्यक्तींचा समावेश असून त्यांच्याकडून पाकिस्तानी खेळाडूंचा यासाठी वापर केला जात असल्याचा गंभीर आरोपही विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉपी मध्ये लोटस 24 नावाच्या ऍपच्या माध्यमातून बेटिंग केल्यानंतर आता या सर्व व्यक्ती मुंबईत आयपीएल साठी आल्याची माहिती दानवे यांनी अंतिम आठवडावरील प्रस्तावावरील भाषणात सभागृहाला दिली. राज्याच्या परिवहन, सिडको, महसूल, आरोग्य विभागातील घोटाळे, मंत्र्यावर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, अधिकाऱ्यांचे घोटाळे सादर करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारचे वाभाढे काढले. तसेच राज्यातील आर्थिक स्थिती रसातळाला जात असल्याचे म्हणत दानवे यांनी सरकारच्या कार्यपध्दतीवर निषेध व्यक्त केला. राज्याने गेल्या दोन वर्षांपासून क्राईम इन महाराष्ट्र अहवाल प्रसिध्द केला नाही. राज्यात 564 विविध गुन्हे दाखल झाले असून दंगलीच्या घटना घडल्या आहेत. नागपुर, पुणे,संभाजीनगरमध्ये बलात्कराच्या घटनांचा आलेख वाढला असून दररोज 22 बलात्कार, 45 विनयभंगाच्या घटना घडत आहेत. कायद्याचा धाक नसल्यामुळे या सर्व घटना घडत असल्याचे दानवे म्हणाले. सरकारने सुरु केलेले मिशन शक्ती अभियानात आतापर्यंत 22 टक्के रक्कम खर्च झाली असून ही दुर्देवी बाब असल्याचेही ते म्हणाले. कारागृहाची बंदीची क्षमता 27 हजार 114 बंदी असताना 43 हजार बंदी कोंबून ठेवले आहेत. राज्यात 51 हजार कोटी रुपयांची फसवणूकीच्या घटना घडल्या आहेत. राज्यात गुन्हयांच व सायबर गुन्ह्याच प्रमाण वाढल असून ते रोखण्यासाठी सायबर सेल प्रभावी होण्याची आवश्यकता आहे. अभिनेता सैफ अली खान यांच्या घरात घुसून चोरी करून त्याला मारण्याचा प्रयत्न झाला. बीड मस्साजोग सरपंच हत्येतील आरोपी अद्याप पकडला जात नाही. सोमनाथ सुर्यवंशी याचा मृत्यू मानव आयोगाच्या अहवालात पोलिसांनी केलेल्या मारहाणीत झाल्याचे स्पष्ट झाले. मंत्र्यांचा परदेशात चाललेल्या मुलाच विमान वळवलं जातं परंतु सूर्यवंशीला मारहाण करणाऱ्या लोकांवर सरकार कारवाई करू शकत नाही अशा शब्दांत दानवे यांनी नाराजी व्यक्त केली. अहमदाबादमधील सुधीर कोठडिया नावाच्या व्यक्तीने 2 हजार कोटी रुपये डिजिटल पध्दतीने जमवून हवाला मार्फत ते विदेशात पाठवले. यातील गुंतवणूकदारांची फसवणूक केली, याबाबत पराग अशोककुमार शहा यांनी तक्रार केली. मात्र याबाबत पुणे कि नारायण गावात गुन्हा दाखल व्हायला होता मात्र ठाण्यात पोलीस उपायुक्तांच्या सांगण्यावरून पोलीस आयुक्त गुन्हा दाखल करतात. याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी दानवे यांनी केली. सिडको योजनेतील खरपुडीची 247 हेक्टर क्षेत्र जमीन शेतकऱ्यांकडून सतीश अग्रवाल, कृष्णकुमार गोयल, राधेश्याम, चिप्पा रखमाजी आदींनी विकत घेतली. 18 जून 2008 ला हे प्रदूषित क्षेत्र म्हणून घोषित केले त्यानंतर आर्थिक साहाय्यता नसल्यामुळे हा प्रकल्प रद्द केला होता. यात सिडकोचे उपाध्यक्ष विजय सिंघल यांनी डी एसके लीगल सर्व्हिसेसची अवैध नेमणूक करून देयके दिल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चौकशीची मागणी केली. मंत्री संजय राठोड यांचे खासगी सचिव विशाल राठोड यांनी स्वत:च्या सहीने गो बंजारा ट्रस्टची जागा मंत्र्याच्या नावे करून घेतली. उल्हास नगर महानगरपालिकेत युडीच उल्लंघन करून टीडीआर घोटाळा झाला आहे. यात ललित खोब्रागडे नावाच्या अधिकाऱ्याने युडीसिपीआर उल्लंघन केल्याचा गंभीर आरोपही दानवे यांनी केला. अंधेरी, के पश्चिम विभागातील चक्रपाणी नावाचे उपायुक्तांच्या वरदहस्ताने अवैध बांधकाम सुरु आहे. बोरिवली येथील पालिकेचे भगवतीचे हॉस्पीटलचे खासगीकरण करण्याचं प्रयत्न महापालिका करतेय.शत्रू संपत्तीबाबत पाकिस्तानच्या बॉंड वर आपल्याकडे कारवाई झाली. याबाबत मीरा भाईंदरच्या राजू शहा यांनी तक्रार केली असता, त्याला पाकिस्तान मधून धमकीचे फोन येत असल्याची माहितीही दानवे यांनी सभागृहात दिली. परिवहन विभागाने वाहतूक स्पीडवर मीटर मर्यादा निर्बंधाचा उल्लेख केला पाहिजे. वाहतूक स्पीडवर वेग नियंत्रक असले पाहिजे, त्यावर परिवहन विभाग लक्ष देत नाही. बेस्ट, टीएमटी, एनएमटीच्या बस धावत असलेल्या मार्गावर सिटी फ्लोच्या बसेस धावतात, त्यामुळे सार्वजनिक वाहतूकीच्या बसेसवर बंधन येतात, त्यामुळे सीटी फ्लोच्या बसेस बंद करण्याची मागणी दानवे यांनी केली. भोसरी एमआयडीसीत खुल्या जागेवर 150 शेड अवैधरित्या उभारले गेले. यासाठी विकी गोयल या व्यक्तीने बनावट कागदपत्रे बनवली. संभाजी नगरमध्ये हॉकी मैदानासाठी आलेले 21 कोटी रुपये संजय सबनीस व सुहास पाटील या अधिकाऱ्यांनी कंत्राटी कामगार हर्षकुमार क्षीरसागर यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करून गैरव्यवहार केला. रोहयोमध्ये पालघर येथे निवृत्त अधिकारी नंदकुमार यांच्यासाठी मिशन महासंचालक पद निर्माण केलं, त्यासाठी केंद्राने यावर आक्षेप घेतल गेले. मुंबईत आकाश ग्राहक नावाची संस्था नवीनचंद्र चालवितात आणि ते तांदळावर पॉलिश करून परराज्यात विकतात. त्यासाठी त्यांनी खोटी कागदपत्रे सादर करुन मुंबई, ठाणे जिल्हा विभाग असा उल्लेख करून शासनाची दिशाभूल केली. आता कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र दाखवल आहे, त्यामुळे याची चौकशी करण्याची मागणीही दानवे यांनी केली आहे. आरोग्य विभागात बनावट औषधांचा पुरवठा झाला. तत्कालीन आरोग्य मंत्री यांनी यांत्रिक पध्दतीने स्वच्छता करण्याच्या निविदेसाठी ७७ कोटी रुपये खर्च येणार असताना ६६८ कोटी रुपये दाखवून गैरव्यवहार केल्याचा आरोप दानवे यांनी केला. मुंबई ठाण्यातील हॉटेलमध्ये रुफ टॉपवर विदेशी दारू पुरविणे सुरु आहे. लीव्हीन लिक्वीड नावाची कंपनी त्यांच्या ऍपवर विदेशी दारू घर पोहच करून नियमाच उल्लंघन करतेय , त्यामुळे फोरेन लिकर बॉंडचे धोरण सरकारने स्पष्ट करण्याची मागणीही दानवे यांनी केली आहे. जलसंपदा विभागातील अधिकारी जलसंधारणमध्ये घेतले जातात, यामुळे या विभागातील अभियंतांवर अन्याय होतो. औरंगजेबच्या कबरीच्या देखभालीसाठी साडेसहा लाख रुपये तर सिंधुदूर्गमधील शिवरायांच्या मंदिरांच्या देखभालीसाठी 250 रुपये येतात. नागपूरमध्ये झालेल्या दंगलीचा उल्लेख करताना दानवे यांनी इतर धर्मांचाही मान राखला पाहिजे असे म्हणत हिंदूत्वादी म्हणणाऱ्या सरकारला सुनावले.

मुंबई पोलिसांच्या मदतीने IPL मध्ये बेटींग, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप Read More »

कुणाल कामराचं लोकेशन ट्रेस करतोय, कारवाई होणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा इशारा

Yogesh Kadam : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधान भवन आवारात पत्रकारांशी बोलताना वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्यावर कडक कारवाईचा इशारा दिला आहे. “कुणाल कामराचं लोकेशन आम्ही ट्रेस करतोय. जो कोणी कायदा हातात घेईल, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल,” असं कदम यांनी ठणकावून सांगितलं. संविधानाने बोलण्याचा अधिकार दिला असला तरी संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींवर टीका करणं योग्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ठाकरे गटावरही निशाणा साधताना ते म्हणाले, “ठाकरे गटाने कायदा आणि सुव्यवस्था आम्हाला शिकवू नये. राज्यात शांतता राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” कुणाल कामरा याने अलीकडेच सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतल्याचं दिसत आहे. कदम यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून, काहींनी याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचा आरोप केला आहे. तर काहींनी सरकारच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. कुणाल कामराने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही या मुद्द्यावर भाष्य केलं. ते म्हणाले, “एकनाथ शिंदेंचं कर्तृत्व मोठं आहे. व्यंगात्मक टीका ही ठाकरेंची ताकद होती, पण आता त्यांचे कार्यकर्ते असतील तर याकडे दुर्लक्ष करायला हवं. राजीव गांधींबद्दल एका सिरीजमध्ये काही बोललं गेलं तेव्हा राहुल गांधी म्हणाले होते की त्यांचं कर्तृत्व छोटं होत नाही. कलाकार काही बोलला म्हणून त्याचं ऑफिस फोडणं चुकीचं आहे.” पवार यांनी पुढे सावधगिरीचा इशारा देताना म्हटलं, “2014, च्या आधीचा काळ आता नाही. एखाद्या नेत्यावर बोलताना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मर्यादित झालं आहे, त्यामुळे काळजी घ्यावी. व्यंगात्मक टीकेमुळे एकनाथ शिंदेंची उंची कमी होत नाही.” या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. पुढील घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कुणाल कामराचं लोकेशन ट्रेस करतोय, कारवाई होणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा इशारा Read More »

Gulabrao Patil : गुलाबराव पाटलांचा कुणाल कामरा – राज ठाकरेंवर हल्लाबोल

Gulabrao Patil : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टीका केल्याच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली, तर राज ठाकरे यांच्या अलीकडील वक्तव्यावरही त्यांनी खरमरीत भाष्य केले. गुलाबराव पाटील म्हणाले, “कुणाल कामरा ही जी वृत्ती आहे, त्याने याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. त्याचं दुकान बंद झालं आहे. आता तो शिंदे साहेबांवर टीका करतोय. त्याला वाटत असेल की बोलल्यावर काही होणार नाही, पण तो चुकतोय.” पाटील यांनी पुढे सांगितलं की, शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी कुणाल कामराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. “दोन दिवसांत त्याने माफी मागितली नाही, तर शिवसेना स्टाईलने त्याच्या तोंडाला काळं फासू,” असा इशाराही त्यांनी दिला. त्यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधत म्हटलं, “संजय राऊत हा त्यांचाच माणूस आहे. त्यांच्याच सांगण्यावरून हे सगळं सुरू आहे.” दुसरीकडे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही पाटील यांनी टीकेची झोड उठवली. राज ठाकरे यांनी अलीकडेच केलेल्या वक्तव्याचा उल्लेख करत ते म्हणाले, “काल त्यांना स्वप्न पडलं असेल. साधा एक आमदार निवडून आणू शकत नाहीत. फक्त सभांना गर्दी असते. मी आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केलं असेल. पालिका निवडणुका येताहेत, त्यामुळे ही नौटंकी सुरू आहे.” पाटील यांनी राज ठाकरे यांच्या राजकीय प्रभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांची खिल्ली उडवली. कुणाल कामराच्या वक्तव्याने शिवसेना कार्यकर्ते संतप्त झाले असून, त्यांनी मुंबईतील युनिकॉन्टिनेंटल स्टुडिओमध्ये तोडफोड केली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. दरम्यान, गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. पालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना आणि मनसे यांच्यातील शाब्दिक चकमक तीव्र होताना दिसत आहे. या घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Gulabrao Patil : गुलाबराव पाटलांचा कुणाल कामरा – राज ठाकरेंवर हल्लाबोल Read More »